चुकीच्या नावाने होणारे फॉर्वर्ड्स

Submitted by हरचंद पालव on 5 December, 2020 - 01:18

भोंदू फॉर्वर्ड्स ह्या धाग्यावर चर्चा अशी झाली की काही काही फॉर्वर्ड्स हे उगाच कुणाच्याही नावावर पसरवले जातात. ह्यातले सर्वच काही भोंदू असतात असं नाही, त्यामुळे हा वेगळा धागा तयार केला. तिथे चर्चिलेले काही फॉर्वर्ड्स आणि त्यात काही भर घालून हा धागा तयार करणेत येत आहे. आता ह्या लेखनात काही विनोद नाही, पण वाट्टेल ते साहित्य कुणाच्याही नावावर खपवणारे हे जे कुणी लोक आहेत, त्यांच्या विनोदबुद्धीला स्मरून हा धागा 'विनोदी लेखन' ह्या ग्रुपमध्ये तयार केला.

चुकीच्या नावाने फॉर्वर्ड झालेल्या साहित्यात बरेचसे साहित्य ह्या लोकांच्या नावावर आहे: पु ल, व पु, नाना पाटेकर, विश्वास नांगरे-पाटील, शेक्सपियर इत्यादी. जाणकारांनी यादीत अजून भर टाकावी.

खालीलपैकी फॉर्वर्ड्स तुम्ही देखिल पाहिले असतीलः
- 'नामधेयेन किम् फलम्' - महाकवी कालिदास
- "टॅलेंट च्या तांदळात परिश्रमाचे चिकन व प्रामाणिकपणाचा मसाला टाकला की यशाची बिर्याणी तयार होते " - डॉ अब्दुल कलाम.
एखादे गुलाबाचे चित्र. (विजय कुलकर्णी ह्यांच्या सौजन्याने)
- 'मी रोज आनंदी असतो कारण मी कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा धरत नाही' - शेक्सपियर (टवणे सरांच्या सौजन्याने)
- 'कॉलेजचे गेट, झाली तिथे भेट, घुसलीस मनात थेट - पुलंच्या कॉलेज जीवनातील कविता
- 'प्रेम बिम धोका आहे' - विश्वास नांगरे पाटील

आणखीन अनेक आहेत, कृपया भर टाकत जा.

lincoln.jpg

Group content visibility: 
Use group defaults

खालची पोस्ट सुंदर पिचाईच्या नावाने सुरू होऊन वामनराव पै यांच्या नावाने संपते. Lol

बापरे अतुल , हा तर Blog दिसतोयं. लोकं Blog वर पण थापा मारायला लागले का :कपाळाला हात:

मी बायडिफॉल्ट विश्वास ठेवत नाही. खरं ज्ञान नाही मिळालं तरी चालतं पण थापा नको. सगळी मायेची ज्ये.ना. मंडळी नियमितपणे फोरवर्ड करते. काही जणं तर फॉलो अप पण घेतात. 'अगं वाचलसं नं' म्हणून !! माझ्या लेखांना मात्र हाताचे टिक टिक करून पळून जातात. Biggrin

तुम्ही सदस्यनाम बदलून दुसरं काही घ्या आणि "नांदेडच्या जगविख्यात लेखिका - तुमचे नवे सदस्यनाम " यांचा अप्रतीम लेख असे सांगून त्यांना फॉरवर्ड करत जा.

Lol
नरहर कुरूंदकर यांचे नाव लावू का....
लबाड आयडिया येत आहेत. (आणि इथे मला नाव सुद्धा लपवता येत नाही. )

मलापण हिमालयाच्या पायथ्याशी गोरस विकणाऱ्या घरात जन्मलेला चुणचुणीत मुलगा पायथागोरस यावर एखादा लघुनिबंध लिहुन सोडावा काय अशा आयडिया येऊ लागल्यात.

अरे देवा Biggrin
तुमचेच फेक फोरवर्ड फिरून तुम्हाला येईल तेव्हा तर इतका आनंद होईल की तेवढा खऱ्या पायथागोरसला पण कधी झाला नसेल !

गणेश कोहली नावाचे गृहस्थ आहेत

Submitted by टवणे सर on 30 December, 2020 - 18:38>> होय होय, हाच. आता मला तो मेसेज सापडत नाहीये. पण व्हिडिओ हाच होता हे नक्की.

जबरी किस्से आहेत एकेक Happy तो डॉक्टरांचा किस्सा मला नीतू मांडके यांच्या नावाने आला होता Happy

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांना पत्रः हे माझ्या प्राथमिक शाळेत हेडमास्तरांच्या खोलीत फ्रेम करून लावले होते. पहिली-दुसरीत असताना काही कारणाने त्यांच्या खोलीत जायची वेळ आली तेव्हा ते बघितलं तेव्हा आपल्या हेडमास्तरांना लिंकनने पत्र पाठवलं, कसले जबरी आहेत ते, काय ग्रेट आहे आपली शाळा असं खूप मस्त वाटलं होतं तेव्हा Happy तिसरीतल्या एका मुलाने नंतर मग गैरसमज दूर केला Lol

अजून एक, धीरुभाईंच्या नावावर आलेला किस्सा. लोक कशाहीवरून काहीही निष्कर्ष काढतात. आता ह्या किश्श्यात त्यांचं वागणं किती चुकीचं आहे, तुम्हीच बघा:
----------------------******************------------------------
एकदा धीरूभाई अम्बानी एका अर्जेंट मिटिंग साठी जात होते.

वाटेत सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. ड्राइवरने अम्बानींना विचारले, ‘आता काय करू?’
त्याला अम्बानींनी उत्तर दिले — तू गाडी चालवत रहा.

पावसा मध्ये गाडी चालवणे मुश्किल होत होते. परत ड्राइवरने विचारले, ‘आता काय करू?’ त्याला अम्बानी म्हणाले ‘तू गाडी चालवत रहा’.

थोडे पुढे गेल्यानंतर ड्राइवरने पाहिले की वाटेत पावसा मुळे अनेक वाहने थांबली होती. ड्राइवरने अम्बानींना सांगितले, ‘मला आता गाडी थांबवायला हवी’ पुढचे दिसतांना खूप अवघड जाते. सर्व लोक गाड्या बाजूला घेऊन थांबलेत.

आता काय करू?
त्याला अम्बानींनी पुन्हा सांगितले ‘तू थांबू नको हळू हळू तुला जमेल तशी गाडी चालवत रहा’.

पावसाने रौद्र रूप धारण केले होते. परंतु ड्राइवरने गाडी चालूच ठेवली होती.
आणि थोडे पुढे गेल्यावर ड्राइवरला समोरचे साफ दिसायला लागले. पुढे काही अंतर गेल्यावर पाऊस पूर्ण पणे गेला होता. पुढे तर ऊन पडले होते.

धीरूभाई अम्बानी ड्राइवरला म्हणाले ‘आता तू गाडी थांबवू शकतोस’.
ड्राइवर म्हणाला आता कशाला?

धीरूभाई म्हणाले थांबव तर खरे. त्याने गाडी थांबवल्यावर ते स्वतः गाडीतून उतरले आणि म्हणाले, तू बाहेर ये आणि मागे वळून बघ. आपण जिथे आहोत तिथे पाऊस अजिबात नाही आहे. इथे तर चक्क ऊन पडले आहे. वाटेत थांबलेले लोक अजूनही तिथेच फसले आहेत आणि तू प्रयत्न न सोडता हळू हळू गाडी चालवत राहिलास आणि आता त्या धोक्यातून आपण पूर्ण पणे बाहेर पडलो. तू धीर खचून तिथेच थांबला असतास तर अजून खूप वेळ तिथेच थांबावे लागले असते.

हा किस्सा त्यांच्या साठी आहे जे आत्ता वाईट परिस्थितून जात आहेत.
कठीण काळी खूप माणसे प्रयत्न सोडून हार मानतात. त्यामुळे अडचणीतून त्यांना लवकर बाहेर पडता येत नाही. प्रयत्नच आपल्याला संकटातून बाहेर काढतात. ते न करता आपण नशिबाला दोष देतो.

-----------***************------------------

इथे टाटा, बिर्ला यांच्या नावानेही किस्से आहेत.

आपटून मरायला टेकला आणि अंबानी त्याला 'जियो धनधनाधन' म्हणाले, मग ड्रायव्हर परत गाडी चालवू लागला... असलं फॉर्वर्ड यायचं.... डोन्ट गिव्ह देम आयडीयाज...

मुळात इतक्या वादळात अंबानी जीवावर उदार होऊन कुठं चालले होते यावर संशोधन व्हायला हवं Happy

Submitted by आशुचँप on 31 December, 2020 - 09:53

Happy

रतन टाटांच्या नावे अजून एक फॉरवर्ड आला होता:.

२६/११ च्या घटनेनंतर काही महिन्यांनी टाटा उद्योग समूहाच्या ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स यांनी त्यांच्या देश विदेशातील हॉटेल्सचे नुतनीकरण व पुनर्रचना करण्याच्या कामाचे त्यांचे सर्वात मोठे टेंडर काढले होते. काही पाकिस्तानी कंपन्यांनी हे टेंडर भरले होते. आपले टेंडर प्रभावशाली ठरावे म्हणून पाकिस्तानातील दोन मोठ्या उद्योगपतींनी रतन टाटा भेटीसाठी पूर्व नियोजित वेळ देत नाहीत हे पाहून मुंबईतील “बॉम्बे हाऊस” या टाटाच्या मुख्यालयास समक्ष भेट देऊन टाटांची भेट घेतली.
त्या पाकिस्तानी उद्योगपतींना बॉम्बे हाऊसच्या स्वागत कक्षात ताटकळत ठेवण्यात आले. काही तासांनी त्यांना कळविण्यात आले की, रतन टाटा कामात व्यस्त असल्याने पूर्व परवानगीशिवाय ते कोणालाही भेटत नाहीत. निराश, त्रस्त,वैतागलेले पाकिस्तानी उद्योगपती दिल्लीला गेले. आणि त्यांच्या हायकमिशन मार्फत केंद्रीय व्यापार मंत्र्याला भेटले. या मंत्र्याने लगेच रतन टाटा यांना फोन करून विनंती केली की, त्या दोन पाकिस्तानी उद्योगपतींना आपण भेट द्यावी आणि त्यांच्या टेंडरचा आस्थापूर्वक विचार करावा.
त्यावर रतन टाटा ताडकन म्हणाले, “तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही”. त्यानंतर काही महिन्यांनी पाकिस्तानी सरकारने टाटा उद्योग समूहाला “टाटा सुमो” या वाहनाची खूप मोठी खरेदीची ऑर्डर दिली, मात्र रतन टाटा यांनी ती खरेदीची ऑर्डर स्पष्टपणे धुडकावून लावली …। या ऑर्डर च्या माध्यमातून टाटा समूहाला हजारो कोटींचा नफा कमवायची संधी होती पण त्यांनी त्यावेळी देशाचा विचार केला.

काय आहे सत्यता?
पण या पोस्टची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता हि पोस्ट २०१२ पासून शेअर केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. तेव्हाच हि पोस्ट खोटी असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र वारंवार हि पोस्ट शेअर केली जात आहे. BharathAutos या ऑटोमोबाईल वेबसाईटवर ८ ऑगस्ट २०१२ ला हि न्यूज पब्लिश करण्यात आली होती. BharathAutos ने हि न्यूज खोटी असल्याचे सांगत माफी देखील मागितली होती. टाटा कंपनीकडून हा बिजनेस नाकारण्यात आला होता मात्र याचे कारण वेगळे होते. भारत आणि पाकिस्तान दरम्यान कुठल्याही मोठ्या उच्चस्तरीय व्यापारावर प्रतिबंध घातलेले होते. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि टाटा मोटर्स मध्ये असा कुठलाही व्यवहार होणे अशक्य होते. टाटा मोटर्सचे एक ट्विट देखील हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करते.

(संदर्भ: https://www.facebook.com/1733553620192320/posts/2235002856714058/)

रतन टाटा असं कुणाला निर्लज्ज वगैरे म्हणतील हेच पटत नाही. त्या माणसाचा ऑराच वेगळा आहे. लोकांना अश्या खोट्या गोष्टी तयार करून काय मिळतं?

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका....

एक घडलेली गोष्ट...
१९७९ सालची सत्यघटना .

सकाळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती.

एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते.
तेवढ्यात एक उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती.

तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.

त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ.

त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे..
पुढे मोठ्या तुसडेपणाने - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे त्याने बरीच मुक्ताफळे उधळली. तरीही ती व्यक्ती शांतच होती,,,

थोड्या वेळाने - त्या गीता वाचणाऱ्या व्यक्तीने उठून आसन गुंडाळले तसे एकदम ४ दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला.

हे सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला.

त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली, तेव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की, "ज्या संस्थेत तू संशोधन करण्यास आला आहेस ना त्या भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे... डॉ. विक्रम साराभाई ."

मग मात्र तो नास्तिक , देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला...
तरीही डॉ, साराभाई शांतच..

ते म्हणाले, जर या जगात एखादी गोष्ट आहे , तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे, मग ती आजची असो की महाभारत कालीन असो .
आणि हे त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते. तेंव्हा - *टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा, सर्व सायन्स देखील यातच आहे .*

ही गोष्ट घडली तेव्हा भारतीय पातळीवरच्या विविध १३ संशोधन संस्था या डॉ. साराभाईंच्या नांवावर होत्या.
तर तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ. साराभाई यांची नियुक्ती केली होती.

चालू वर्ष हे डॉ. विक्रम साराभाई यांचे 100 वे जयंती वर्ष आहे...
म्हणून एक आठवण ...

त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन !

या धाग्याला साजेशी आणि डॉ. विक्रम साराभाई यांचा मृत्यू ३० डीसेंबर १९७१ रोजी झाल्याने अमानवीय धाग्यालाही साजेशी पोस्ट.

जबरी आहे पोस्ट! फक्त <<यांचा मृत्यू ३० डीसेंबर १९७१ रोजी झाल्याने अमानवीय धाग्यालाही साजेशी>> हे नाही कळलं.

ता.क.
ओह १९७९!!! आत्ता कळलं! Lol Lol Lol

डॉ. विक्रम साराभाई १९७९ त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा Lol

टाटा... फोटोवरचा मेसेज चांगला आहे. पण टाटांच्या फोटो शिवाय तो कोणी वाचला नसता असे वाटलं असेल लिहिणाऱ्यास

Lol ज्या नेत्यांना, इंडस्ट्री लीडर्सना, विचारवंतांना अजून व्हॉट्सअ‍ॅप मधून आपली फोटोसहित खरी/खोटी वचने फिरण्याचा मान मिळालेला नाही त्यांना नक्कीच असे वाटत असेल की वेळोवेळी असली वाक्ये आपल्या बोलण्यात पेरली असती तर बरे झाले असते Happy

त्रासाने भरलेल्या खोक्यावर
मी "आनंद" असं लिहितो
...आणि दुःख confuse होतं

येणाऱ्या प्रत्येक संकटाला
एक छानशी smile देतो
...आणि दुःख confuse होतं

खरं सांगायचं तर खूप वेळा
मी कोलमडून जातो
सगळं संपलं असं वाटून
अगदी गर्भगळीत होतो
कुठूनतरी देव येऊन
माझ्या हातात हात देतो
...आणि दुःख confuse होतं

संकटाच काय? ती येणारच
आल्यावर थोडं फार छळणारच
आपण स्थिर राहायचं काही काळ
संकटाचं पाणी पाणी होणारच
आलेलं संकट हसता हसता
नकळत नाहीसं होतं
...आणि दुःख confuse होतं

किती दिवसाचं हे आयुष्य
आज ना उद्या संपणारच
अमुक आहे-तमुक नाही
आपलं चालू राहणारच
फाटक्या गोधडीत पाय आखडून
मी सुखाने झोपी जातो
...आणि दुःख confuse होतं

म्हटलं तर जीवन सुंदर
म्हटलं तर वाईट आहे
मग त्याला सुंदर म्हणण्यात
सांगा काय वाईट आहे?
जीवनाकडे बघण्याचा
मी चष्मा विकत घेतो
...आणि दुःख confuse होतं.

*एक आवडलेली डाॅ अब्दुल कलाम साहेबांची कविता*

केवळ इंग्रजी आहे म्हणून रतन टाटांच्या नावावर खपून जातंय. तो बंबल बी paradox तर खूप प्रसिद्ध आहे. नक्की कुणी लिहिलंय माहिती नाही, पण आइन्स्टाइनसकट अनेक जणांच्या नावाने तो सांगितला जातो. गेल्या 70-80 वर्षात एरोडायनॅमिकस् मध्ये इतकं संशोधन झालं आहे की बंबल बी च्या उडण्याचे नियमही बऱ्यापैकी माहीत झालेत. त्यामुळे तो paradox तसाही आता बादच झाला आहे.

कायच्या काय पोस्ट!!! ही अशीच्या अशी मिपावरही (चुकीच्या नावाने आहे असं सांगणारी) दिसली.
--------------------
*लता मंगेशकर यांचे शेवटचे शब्द*
(खरं तर असे सेम टू सेम शब्द मायकल जॅक्सन आणी त्याच्या नंतर देवाघरी गेलेल्यांचेही होते)
*मृत्यूपेक्षा या जगात खरे दुसरे काहीही नाही.*
*जगातील सर्वात महागडी ब्रँडेड कार माझ्या गॅरेजमध्ये उभी आहे.*
*पण मला व्हीलचेअरवर बसवले जाते!*
*या जगात सर्व प्रकारच्या डिझाईन आणि रंग, महागडे कपडे, महागडे बूट, महागडे सामान हे सर्व माझ्या घरात आहे.*
*पण मी हॉस्पिटलने दिलेल्या शॉर्ट गाऊनमध्ये आहे!*
*माझ्या बँक खात्यात खूप पैसे आहेत पण त्याचा मला काही उपयोग नाही.*
*माझं घर माझ्यासाठी राजवाड्यासारखं आहे पण मी दवाखान्यात एका छोट्याशा बेडवर पडून आहे.*
*मी या जगातल्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये फिरत राहिले.* *पण आता मला रुग्णालयातील एका प्रयोगशाळेतून दुसऱ्या प्रयोगशाळेत पाठवले जात आहे!*
*एक काळ असा होता जेव्हा 7 हेअरस्टायलिस्ट रोज माझे केस बनवत असत.*
*पण आज माझ्या डोक्यावर केस नाहीत.*
*मी जगभरातील विविध 5 स्टार हॉटेलमध्ये जेवत होते.*
*पण आज दिवसातून दोन गोळ्या आणि रात्री एक थेंब मीठ हा माझा आहार आहे.*
*मी वेगवेगळ्या विमानांतून जगभर फिरत होते.*
*पण आज दोन लोक मला हॉस्पिटलच्या व्हरांड्यात जायला मदत करतात.*
*कोणत्याही सुविधांनी मला मदत केली नाही.*
*कोणत्याही प्रकारे शिथिल नाही.*
*पण काही प्रिय व्यक्तींचे चेहरे, त्यांच्या प्रार्थना, प्रार्थना मला जिवंत ठेवतात.*
*हे जीवन आहे, तुमच्याकडे कितीही संपत्ती असली, तरी शेवटी तुम्ही रिकाम्या हाताने निघून जा, दयाळू व्हा, ज्याला शक्य असेल त्याला मदत करा*
*पैसा आणि सत्तेसाठी लोकांना महत्त्व देणे टाळा.*
*चांगल्या लोकांवर प्रेम करा, जे तुमच्यासाठी आहेत त्यांची कदर करा, कोणालाही दुखवू नका, चांगले व्हा, चांगले करा कारण तो तुमच्यासोबत जाईल.*

*लता मंगेशकर,,,*

Pages