सचिन फॅन क्लब

Submitted by फारएण्ड on 27 November, 2013 - 01:49

सचिन च्या मॅचेस, व्हिडीओ क्लिप्स, स्कोअरकार्ड्स चे संदर्भ देऊन त्याबद्दल फॅन-टॉक करण्यासाठी हा धागा उघडला आहे. बे एरियात आज ही चर्चा सुरू असताना इतरांनाही ती दिसावी व लिहीता यावे यासाठी. तुम्हीही लिहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संझगिरींच्या << त्याने नुसतं काळाला रोखलं नाही तर प्रचंड आनंद आपल्याला दिला.>> या वाक्यांत सारं कांहीं आलं !

सचिन च्या कारकीर्दीचे विविध भाग असतील. माझ्या डोक्यात आले तसे लिहीतो. बरोबर वाटते का सांगा

१. कसोटी पदार्पणापूर्वी - साधारण १९८७ ते नोव्हें. १९८९
या काळात मुख्यतः त्याच्याबद्दलच्या बातम्या येत असत. मुंबईतील लोकांनी त्याचा खेळ तेथे कदाचित पाहिला असेल. विनोद कांबळी बरोबरच्या भागीदारीपासून ते रणजी व दुलीप करंडकात पदार्पणातील शतके वगैरे. यातून गावसकर नुकताच निवृत्त झाल्यानंतर भारताला लगेच मुंबईतून दुसरा भारी बॅट्समन मिळत आहे असे दिसू लागले होते. अर्थात तेव्हाचा मुंबईचा दरारा पाहता असा बॅट्समन मुंबईतून निर्माण होणार हे inevitable वाटायचे तेव्हा. याकाळात १९८९ च्या (बहुधा) मे मधे भारतीय संघ विंडीज ला गेला होता. त्याच संघात सचिन ची निवड होणार असे चित्र निर्माण झाले होते. पण बहुधा अजून तो वयाने खूप लहान होता म्हणून त्याला घेतला नव्हता बहुधा. असेही तेव्हा म्हंटले जायचे की या एका दौर्‍यात जर अपयशी झाला (१९८९ ची विंडीज म्हणजे अजूनही खतरनाक होती) तर करीयर सुरू व्हायच्या आधीच संपू नये म्हणून गावसकर ने त्याला परावृत्त केले होते. खरे खोटे माहीत नाही.

या काळात एकदा टॉम आल्टर ने त्याची मुलाखत घेतली होती. ती आता मजेदार वाटते. मी तरी ही नंतरच पाहिली.

तर ७० च्या दशकात संझगिरी हाफपॅंट मध्ये धरायला हरकत नाहि >> अरे हो तुम्ही मधेच गावस्कर आणलात हे लक्षातच आले नाही Lol

या वाक्यांत सारं कांहीं आलं >> +१.

फा. विंडीजच्या दौर्‍याबद्दल मीही तसे वाचलेले होते पण गावस्करच्या मुलाखतीमधे त्याने ते नाकारले होते. तेंव्हा नेमका सल्ला कोणी दिला होता कोण जाणे.

२. नोव्हे. १९८९ ते १९९३ ची सुरूवात
नोव्हेंबर १९८९ मधल्या पाक विरूद्धच्या सामन्यापासून ते १९९३ च्या इंग्लंडविरूद्धच्या भारतातील सिरीज चा हा काळ. सचिन बद्दल आधी ऐकलेले व हाईप झालेली त्याची इमेज ही प्रत्यक्षात तितकीच, किंबहुना जास्तच भारी आहे असे सर्वांच्या लक्षात आले. पाक विरूद्ध विशेष काही केले नाही त्याने पण नंतर न्यू झीलंड मधे शतक थोडक्यात हुकल्यावर १९९० च्या इंग्लंड सिरीज मधे पहिले शतक, ते ही मॅचसेव्हिंग. मग १९९२ मधे ऑस्ट्रेलियात दोन व नंतर त्याच वर्षे द. आफ्रिकेत अजून एक. फास्ट पिचेस, बोलिंग, स्विंग, बाउन्स, कॅरी सगळे असलेल्या ठिकाणी, आणि विशेषतः बाकी भारतीय फलंदाजी अपयशी ठरत असतान सचिन उठून दिसल्याने त्याच्या ऑथेण्टिकपणाबद्दल खात्री पटली.

त्याकाळात गावसकर वगळता फास्ट पिचेस वर व विविध देशांतील कंडिशन्स मधे यशस्वी होणारे अगदी कमी होते भारताकडे. वेंगसरकर इंग्लंड मधला स्विंग चांगला खेळे पण ऑस्ट्रेलियात, विंडीज मधे चालला नाही. मोहिंदर विंडीज व पाक मधे चालला, पण इतरत्र तुलनेने कमी. त्यातल्या त्यात गुंडाप्पा विश्वनाथ बहुतांश सगळीकडे चांगला खेळला असेल. १९८० च्या दशकातही कमीच होते. अझर स्विंग चांगला खेळे पण त्याला बाउन्स खेळता येत नसे. मांजरेकर कडे तंत्र होते पण त्याला मर्यादित यश मिळाले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर जबरदस्त बॅकफुट प्ले, "व्ही" मधे (मिड ऑफ ते मिड ऑन च्या आर्क मधे - जो बॅट्स्मन च्या समोर असतो) मारलेले फटके व अंगभूत आक्रमकता यामुळे सचिन एकदम उठून दिसला. सर्वसाधारण भारतीय खेळाडू हे भारतात बाउन्स नसल्याने कोणत्याही बॉल ला फ्रंट फूट वरून मारत, तसेच स्विंग ही फारसा नसल्याने आहे त्या जागेवरून मारत. ते तंत्र परदेशात चालत नसे. या दोन्ही बाबतीत सॉलिड तंत्र असल्याने सचिन सगळीकडच्या समालोचकांच्या व विशेषतः जुन्या तज्ञ खेळाडूंच्या नजरेत भरला.

याकाळात त्याचे स्ट्रेट ड्राइव्ह्ज, ऑन ड्राइव्ह्ज, ऑफ ड्राइव्ह्ज आणि इनिंग मधे स्थिरावल्यावर मारलेले जबरदस्त कट्स हे कसोटीत जास्त दिसत. तर वन डेज मधे उचलून मारलेले फटके. पण हा काळ त्याचा कसोटीत स्थिरावण्याचा होता. वन डेज मधे तो मधल्या फळीत येत असे व थोडीफार फटकेबाजी करून आउट होत असे. वन डे मधे खूप गाजला नव्हता या काळात तो. एक दोन अपवाद म्हणजे १९९२ चा वर्ल्ड कप व त्यातही कपिल बरोबर जोरदार भागीदारी केलेली पाक विरूद्धची मॅच.

मात्र त्याच्या कसोटी पदार्पणात तो वकार समोर उभा राहिला याचे अवास्तव कौतुक होते असे मला वाटते. अनेकांच्या हे लक्षात येत नाही की ती वकारचीही पदार्पणाची सिरीज होती. वयातला फरक हा एक भाग सोडला तर दोघेही नवीनच होते. अक्रम समोर उभे राहणे हे भारी होते. पण या सिरीज बद्दल लोक जरा जास्तच भावुक होतात असे फॅन असूनही मला वाटते.

मात्र यानंतर एक दोन वर्षांतच त्याने पाक विरूद्ध खेळलेल्या एका जबरी डावाची क्लिप नुकतीच मिळाली. ती येथे टाकत आहे.

याकाळातील इतर प्रमुख फलंदाज - श्रीकांत, सिद्धू, मांजरेकर, वेंगसरकर, शास्त्री, अझर
कप्तानः पहिल्या सिरीज मधे श्रीकांत, नंतर पुढे अझर
ओपनरः श्रीकांत-सिद्धू, रमण-प्रभाकर, शास्त्री-सिद्धू, शास्त्री-श्रीकांत, शास्त्री-जडेजा, शास्त्री-प्रभाकर

<< मात्र त्याच्या कसोटी पदार्पणात तो वकार समोर उभा राहिला याचे अवास्तव कौतुक होते असे मला वाटते. >> नुसती वकारची वेगवान गोलंदाजी खेळल्याबद्दलचाच त्या कौतुकात भाग नव्हता तर भारत वि. पाक या सामन्यांचं आत्यंतिक दडपण घेवूनही एवढ्या लहान वयात, व तेंही पदार्पणाच्या कसोटी सामन्यात, वकार- अक्रम सारख्याना न बिचकतां आत्मविश्वासानं खेळणं याचा भाग अधिक होता. मला वाटतं त्यामुळें तें कौतुक अवास्तव होतं असं म्हणणं तितकंसं बरोबर नसावं.
<< अनेकांच्या हे लक्षात येत नाही की ती वकारचीही पदार्पणाची सिरीज होती >> पदार्पणात वेगवान गोलंदाजावर असणारं दडपण व फलंदाजावर असणारं दडपण यांत कितीतरी फरक असावा. गावसकर कारकिर्दीच्या शेवटीही म्हणायचा कीं पहिला चेंडू खेळेपर्यंत पोटांत गोळा असतोच [Butterflies in the stomach ] ! कोणत्याही गोलंदाजाला असं म्हणायची पाळी येत नसावी; त्याचा चेंडू वाईड जाईल, कदाचित षटकही खराब जाईल पण त्याला तंबूत परतावं तर लागणार नाहीं !.

३. १९९३ ची इंग्लंड विरूद्धची होम सिरीज ते १९९६ चा वर्ल्ड कप

या काळाचे विश्लेषण कोणत्याही एका पद्धतीने करणे अवघड वाटते मला. कसोटी मधे १९९३ व ९४ मधे भारत बहुतांश घरी खेळला व सर्वच फलंदाज तुडुंब रन्स करत होते. याच वेळेस अनिल कुंबळे, व्यंकटपथी राजू व राजेश चौहान चे त्रिकुट एकत्र आले. कपिल व प्रभाकर ४-४ ओव्हर्स टाकून स्पिनर्स कडे बॉल जाई. इंग्लंड्,झिंबाब्वे, लंका वगैरेंना गुंडाळून टाकून भारत सहज जिंके. यात सचिनच्याही धावा असत पण त्या उठून दिसत नसत. मग १९९५ मधे फारश्या मॅचेसच झाल्या नाहीत. एक न्यूझीलंड सिरीज होती पण तीही पावसाने वॉश आउट झाली. शेवटी १९९६ च्या इंग्लंड टूर मधे सचिन ने दोन सुंदर शतके मारली. एक एजबस्टन व दुसरे ट्रेन्ट ब्रिज ला. दोन्हीमधली त्याची बॅटिंग सुरेख आहे, विशेषत: ट्रेण्ट ब्रिज ची. यातले पहिले शतक म्हणजे त्याकाळातील भारताची नेहमीची रडकथा होती. तिसर्‍या इनिंग मधे एकूण २१९ मधे सचिन च्या १२२ व त्यानंतरचा सर्वोच्च स्कोअर १८.

वन डे मधे मात्र याकाळातच मोठा बदल झाला. १९९४ च्या न्यू झीलंड मधल्या सिरीज मधे सिद्धू जखमी झाल्याने सचिन ओपन करायला आला, आणि त्याने ४९ बॉल्स मधे ८४ मारल्यावर त्यापुढे तोच ओपन करणार हे नक्की झाले. त्याच वर्षी ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने आपले वन डे मधले पहिले शतक मारले - खेळू लागल्यावर जवळजवळ पाच वर्षांनी (मात्र त्यानंतर साधारण चार वर्षांत आणखी वीस मारली). १९९६ च्या वर्ल्ड कप मधेही त्याचा परफॉर्मन्स जबरी व अत्यंत आक्रमक होता. लंकेविरूद्धच्या सेमी फायनल मधे तो जर आउट झाला नसता तर चित्र वेगळे दिसले असते.

याच काळात टीव्हीवर कॉमेण्टरी मधे सचिन बद्दल "arguably world's best batsman" असे म्हंटले जाउ लागले. वास्तविक याच काळात लारा, स्टीव वॉ, मार्क वॉ व अरविंद डी सिल्वा हे वन डे व कसोटी दोन्हीकडे गाजवत होते. तरीही सचिन बद्दलचा 'बझ्झ' इतरंपेक्षा जास्त होता.

मग इंग्लंड मधल्या त्या जुलै-ऑगस्ट १९९६ च्या सिरीज मधे अझर व सिद्धू यांच्यातील भांडण, भारताचा पुन्हा पराभव वगैरेंमुळे अझर चे कप्तानपद गेले व सचिन कडे आले. त्यावेळचे जनमतही तसेच होते. मला स्वतःलाही त्याच्याचकडे कप्तानपद यावे असे वाटत होते व त्याच्या बॅटिंग वर परिणाम न होता उलट संघ आक्रमक होईल असे वाटले होते. ते चुकीचे होते हे खूप लगेच कळले.

याकाळातील इतर प्रमुख फलंदाज - सिद्धू, मांजरेकर, विनोद कांबळी, अझर. या काळात शेवटच्या सिरीज मधे द्रविड व गांगुली यांचे यशस्वी पदार्पण
कप्तानः अझर
ओपनरः सिद्धू-प्रभाकर, मोंगिया-सिद्धू, प्रभाकर-जडेजा, विक्रम राठौड-जडेजा, राठौड-मोंगिया

"नोव्हे. १९८९ ते १९९३ ची सुरूवात
नोव्हेंबर १९८९ मधल्या पाक विरूद्धच्या सामन्यापासून ते १९९३ च्या इंग्लंडविरूद्धच्या भारतातील सिरीज चा हा काळ. ... पाक विरूद्ध विशेष काही केले नाही त्याने"
फार एंड साहेब, माफ करा, पण सचिन ने पाक विरुद्ध बरेच काही विशेष केले. १९८९ च्या प्रदर्शनीय सामन्यात त्याने जी धुंवाधार फलंदाजी केली ती अविस्मरणीय आहे. तो खरा तर एक दिवसीय सामना होत. पण काही कारणाने फक्त २० ओवर्स खेळवला गेला. म्हणून त्याला अधिकृत दर्जा मिळाला नाही. परंतु कुठल्याही भारत-पाक सामन्याप्रमाणे तो एक भारत-पाक सामना होता. सचिनने जे षटकार मारले ते अभूतपूर्व होते. अजूनही तो सामना आठवतो. सचिनने पहिला षटकार मारला आणि मी माझ्या भावाला (तो घराबाहेर टिवल्याबावल्या करत होता) सांगायला धावत गेलो "सचिन तेंडूलकर ने सिक्स मारला!". तेव्हा सिक्स मारणे ही फार मोठी गोष्ट होती सहसा कोणी मारत नसत. आपले लोक तर त्याहून कमी. आणि त्यानंतर सचिन ने आणखी षटकारांची जी माळ पेटवली ती पाहून सर्वांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. त्याने १८ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. अशा खेळाची कुणी कल्पनाही केली नव्हती. अब्दुल कादिर चा जो कचरा केला त्याने कादिरची कारकीर्द लवकर संपुष्टात आली. कादिरचा दरारा नाहीसा झाला. कादिर त्यानंतर फक्त एक कसोटी मालिका आणि सहा एक दिवसीय सामनेखेळला. त्या सामन्यामुळे सर्वांच्या तोंडी सचिनचे नाव झाले.

फार एण्ड साहेब, ही एक प्रतिक्रिया अगदी राहवले नाही म्हणून केली. बाकी तुमचे सचिन वरचे लेखन म्हणजे मेजवानीच! त्याबद्दल धन्यवाद.

फारएण्ड, मस्त!! सचिन चं करीअर ईतकं व्यापक आणी सर्वसमावेशक आहे की त्याच्या करीअरच्या टप्प्या-टप्प्यावर अनेक करीअर्स सामावली आहेत. कुठला सचिन बघायचा हे सुद्धा ठरवणं कठीण आहे. तुम्ही जे टप्पे केले आहेत (आणी अजुन बाकी आहेत असं गृहीत धरून), त्या प्रत्येक टप्प्यातला सचिन म्हणजे एक वेगळा खेळाडूच आहे असं वाटावं ईतकं हे ट्रान्सफॉर्मेशन जबरदस्त आहे. श्रीकांत, वेंगसरकर, कपिल ह्यांच्या बरोबर खेळलेला सचिन, मांजरेकर, कांबळी, राजू बरोबर खेळलेला सचिन, द्रविड, गांगुली, श्रीनाथ बरोबर खेळलेला सचिन, झहीर, सेहवाग, गंभीर बरोबर खेळलेला सचिन आणी कोहली, रोहित शर्मा, धोनी, रैना बरोबर खेळलेला सचिन ही रेंजच (पाच क्रिकेट पिढ्या) मला जबरदस्त वाटते. त्याच्या प्रवासात सगळ्यात जास्त आणी मोठी साथ दिलेला एकमेव खेळाडू म्हणजे अनिल, 'द जंबो' कुंबळे.

भाऊ, अजबराव, तुमच्या मतांना माझा विरोध अजिबात नाही. नंतर सविस्तर लिहीतो. फेरफटका - हो तो एक महत्त्वाचा पैलू राहिलाच. या फेजेस मधे त्याचे कप्तान, सहकारी खेळाडू कोणते होते ते लिहीले तर आणखी माहिती जमेल. अ‍ॅड करतो वरती.

फारएन्ड, तुम्हीं क्र्मशः लिहीताय हें लक्षांत नाहीं आलं म्हणून मधेंच तोंड खुपसलं. सॉरी. << तुमच्या मतांना माझा विरोध अजिबात नाही >> असणंच शक्य नाहीं. कारण, तुम्ही तर माझ्यापेक्षांही सचिनचे मोठे फॅन आहांत व मीं आगाऊपणा केला असला तरीही तो सचिनची बाजू घेवूनच ! Wink

काय राव भाऊ, हा हिन्दी पिक्चर असता तर म्हंटले असते आप तो शरमिंदा कर रहे है :). तुम्ही जरूर लिहा. मी फक्त ते स्वतंत्र पॅरा लिहीण्यात व त्याच्या लिन्क्स शोधण्यात गर्क असल्याने नंतर त्याबद्दल लिहीन एवढेच.

४. ऑक्टोबर १९९६ ते डिसेंबर १९९७
कप्तानपद म्हणून पहिला डाव. कप्तान म्हणून सुरूवात दणदणीत - घरच्या मैदानांवर ऑस्ट्रेलिया (१ टेस्ट) व द. आफ्रिका (२-१) हरवून. पण नंतर फलंदाजीतील मर्यादित कामगिरी, बाकी खेळाडूंचेही अपयश व अनेकदा विजयाच्या जवळ जाउन अनिर्णित राहिलेले सामने. काही उदाहरणे - द आफ्रिकेत पहिले दोन सामने हरल्यावर तिसर्‍या सामन्यात संधी होती, ३५६ चेस करताना द आफ्रिका ९५/७ अवस्थेत होती. पण पुढे शेपुट गुंडाळणे जमले नाही व मॅच ड्रॉ. लंकेविरूद्ध होम सिरीज मधेही असेच. आधी सलग ५ मॅचेस (३ लंकेत व २ भारतात) ड्रॉ झाल्यावर मुंबईला त्यांना ३२३ करायचे होते व आपल्याला त्यांना ८२ ओव्हर्स मधे गुंडाळायचे होते. त्या आधी व त्यानंतर नेहमी भारताने हे केले आहे. पण या मॅच मधे ८२ ओव्हर्स मधे शेवटी लंका १६६/७ वर राहिली.

फलंदाज म्हणून तो मला या काळात बघायला अजिबात आवडायचा नाही. नेहमीसारखा दम त्याच्या बॅटिंग मधे क्वचितच दिसायचा. काही डाव चांगले खेळलाय तो पण पहिली मजा नव्हती. याला सणसणीत अपवाद म्हणजे दोन उदाहरणे - १९९६ पासून पुढे २-३ वर्षे टोरंटो मधे भारत-पाक वन डे सामने होत. त्यातील पहिल्याच गेम मधे अक्रम, वकार व अझर मेहमूद ची भरपूर धुलाई करून मॅचविनिंग ८९* मारले, तो डाव. वकारच्या स्विंगिंग यॉर्कर टाकायच्या प्रयत्नांना इतके जबरी उत्तर क्वचित मिळाले असेल. पुढे शोएब विरूद्ध तेच केले त्याने. स्विंगिंग यॉर्कर्स हे दोघांचेही सर्वात खतरनाक अस्त्र. पण ते जरा चुकले तर धुलाई होते या भीतीने ते पूर्वीइतके पाहिजे तेव्हा वापरणे त्यांचे बंद झाले व त्यांची धार बोथट झाली. तसेच ही दुसरी, वेस्ट इंडिज मधे १९९७ मधे मारलेले ९२. यातील फटके अत्यंत सुरेख आहेत. शॉर्ट पिच बोलिंग ला कट्स आणि हुक्स मारून जबरी उत्तर दिले त्याने. याच डावात एकदा फ्रंट फुट वरून मारलेला ऑफ ड्राइव्ह व लगेच बॅक फुट वरून मारलेला कव्हर ड्राइव्ह हे तर हजारो वेळा पाहण्यासारखे आहेत, आणि दोन्ही चांगल्या बॉल्स ना मारलेले. गावस्कर व टोनी कोझिअर शेवटी 'सुपरलेटिव्ह्ज' वापरून थकले. त्या बॅकफुट शॉट नंतर टोनी कोझिअर ची कॉमेण्ट - "That's the best of the lot! Of all those three boundaries, that one off the back-foot is brilliant, and beyond what most other batsmen in world cricket can do!"

याकाळातील इतर प्रमुख फलंदाज - सिद्धू, जडेजा, द्रविड, अझर, गांगुली
कप्तानः स्वतःच
ओपनरः मोंगिया-रमण, लक्ष्मण-सिद्धू, रमण-द्रविड, जडेजा-सिद्धू,

फारएंड - फार मस्त लिहित आहेस तु
मागील पानावर सचिनच्या २००१ मधील साउथ अफ्रिके विरुद्धच्या शतकाचा उल्लेख आहे, (विरुची पहिली टेस्ट)
त्याबद्दल बोलताना विरुनेही सांगितले आहे की सचिन म्हणत होता की हे लोक फक्त शॉर्टच बॉल टाकणार आहेत, तु कट कर थर्ड मॅनला, चौकार मिळायची शक्यता आहे.

खालील क्लिपमधे साधारण १८.४५ मिन. ला तो त्याबद्दल सांगतो आहे
https://www.youtube.com/watch?v=I-nu8XWAYaI

फारएण्ड, तो वकार ला मारलेला शॉट डोळ्याचं पारणं फिटवून गेला!! व्वा!!! वेट, मला हेच वाक्य त्या ऑफ ड्राईव्ह विषयी लिहायचं होतं. किती अवघड शॉट्स 'तो' किती लीलया मारायचा! सगळ्यात पंचाईत व्हायची ती गल्ली क्रिकेट खेळताना. आपणही असं नुसतं बॉल ला बॅट लावून बॉल बाऊंड्री पार (समोरच्या बिल्डींग च्या भिंतीला) मारून दाखवू म्हणून किती वेळा बॉल तिथल्या तिथे, पायापाशी मारला असेल ह्याला काही गणतीच नाही Happy

फारेण्ड भारी चालू आहे .. यात अवांतर पोस्ट नको म्हणून जास्त मध्ये मध्ये करत नाहीये.. हे सचिनपुराण देखील व्हॉटस्सपवर आमच्या क्रिकेट ग्रूपवर शेअर केले तर चालेल ना.. अर्थात नाव आणि येथील लिंकसहच

फारएण्ड, पुनःप्रत्ययाचा आनंद दिलात. धन्यवाद.
[ सचिनचे माझ्यासारखे ठार वेडे अगणित असतील, पण हॅम्लेटसारखं ज्यांच्या वेडांतही 'सिस्टीम' आहे, असे वेडे मात्र माबोवर प्रकर्षाने दिसतात ! Wink ]

५. जाने १९९८ ते जाने १९९९

"It can only get better from here!" रवी शास्त्री, शारजा डिसेंबर १९९७. शारजा स्पर्धेतील शेवटची मॅच भारत हरल्यावर.
१९९७ च्या डिसेंबर मधे शारजा ला झालेल्या वन डे स्पर्धेत भारत सगळे सामने हरला. सचिन च्या कप्तानपदाबद्दल चर्चा सुरू होतीच, या स्पर्धेनंतर जनमतही तसे होउ लागले. सुमारे वर्षभर बहुतांश बेकार परफॉर्मन्स झाल्याने सचिन चे कप्तानपद गेले व पुन्हा अझर कडे आले.

पण आमच्या डोक्यात गेल्या वर्षभरातला सचिन होता. प्रचंड ओझे अंगावर घेउन खेळत असल्यासारखा दिसणारा, तुलनेने स्लो खेळणारा. जानेवारी १९९८ मधे बांगलादेश च्या इण्डिपेण्डन्स कप ची स्पर्धा सुरू झाली. स्वातंत्र्यपूर्व भारताचे नंतर झालेले भागच एकमेकांशी खेळणार होते. भारत - पाक - बांगलादेश. पहिल्या मॅच मधे बांगलादेश विरूद्ध आधीच्या वर्षात खेळायचा तसेच खेळल्यावर पुढच्या पाक विरूद्ध मॅच मधे 'मोकळ्या' झालेल्या सचिन ची चुणूक दिसली. ४४ बॉल्स मधे ६७, ११ फोर. नंतर पुढच्याही मॅचेस मधे तशीच धुलाई. दुपारी ऑफिस मधे पहिल्यांदा जेव्हा सचिन चा स्कोअर कळला तेव्हा पब्लिक च्या लक्षात आले, Our man is back!

सचिन च्या कारकीर्दीतील तो सर्वात प्रभावी असलेला काळ शोधला तर १९९८ हे वर्ष बहुधा सर्वात वर असेल. तसेच तो कारकीर्दीत तीन वेळा मोठे ओझे उतरल्यासारखा मोकळा होउन खेळला त्यातील ही पहिली वेळ. फॉर्म, कौशल्य व फिटनेस तिन्ही बाबतीत सचिन या वर्षी जबरदस्त जोरात होता. त्याने खेळलेल्या बहुतेक मॅचेस मधला गेम त्याने कंट्रोल केला. या वर्षातील त्याचा खेळ अत्यंत आक्रमक होता.

फेब्रुवारी मधे मोठा गाजावाजा करत आलेल्या मार्क टेलर च्या संघाला त्याच्या कप्तानपदाखाली मुंबईने अडीच दिवसात धूळ चारली. खुद्द सचिन २०४ नाबाद, वॉर्न १११ देउन नो विकेट. वॉर्न ला त्याच्या पदार्पणाच्या टेस्ट ची आठ्वण करून देणारी कामगिरी. मग पुढे कसोटी सिरीज मधे सुद्धा सिरीज च्या पहिल्या डावात लौकर आउट झाल्यावर बाकी डावांमधे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीला पूर्णपणे हताश करून टाकले त्याने. याबद्दल जास्त माहिती मी वेगळी लिहीलेली आहे. पण त्या लेखात चेन्नईबद्दल लिहीले होते. याच सिरीज मधे कलकत्त्याला मारलेले ७८ व नंतर बंगलोर ला मारलेले १७७ हे ही तितकेच जबरदस्त आहेत ( या आधीही दोन तीन दा १७७ च्या आसपास बाद झालेला होता तो, त्याबद्दल विचारल्यावर त्याचे वक्तव्य "I have this unfortunate habit of getting out in late 170s"). मग वन डे सिरीज मधेही चांगली कामगिरी, आणि त्यानंतर लगेच झालेल्या शारजा सिरीज व 'डेझर्ट स्टॉर्म' बद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. शारजामधे तर तो इतका वरच्या लेव्हल ला खेळत होता, की एकदा त्याचा समोर मारलेला शॉट खाली उभ्या असलेल्या गांगुलीने कसाबसा चकवला व तो खाली पडला, तेव्हा टोनी ग्रेग म्हंटला होता "Sachin, you need somebody at the other end. Now I know why Ganguly wears a helmet. It is not to protect from the bowling, but to protect from this guy at the other end" Happy

मात्र या काळात वन डे च्या रॅण्डम तिरंगी/चौरंगी स्पर्धा अनेक होत असत. मे मधे भारतात, जुलै मधे श्री लंकेत, सप्टेंबर मधे टोरांटो व नोव्हेंबर मधे पुन्हा शारजा मधे भारत खेळला. सचिन ने कोणत्याही स्पर्धेत बाहेर बसणे हे सचिन, क्रिकेट बोर्ड, पब्लिक व स्पॉन्सरर्स कोणालाच नको असल्याने सचिन वर्षभर सतत खेळत राहिला. डिसेंबर मधे न्यूझीलंड मधे कसोटी व वन डे झाले, तर लगेच परतल्यावर भारतात आधी पाक विरूद्ध कसोटी मालिका आणि लगेच एक "एशियन टेस्ट चॅम्पियनशिप" झाली. या दरम्यान सचिनची पाठदुखी सुरू झाली, आणि चेन्नईच्या त्या फेमस सेन्च्युरी व तो बाद झाल्यावरच्या हाराकिरी नंतर सचिनचा हा प्रचंड फॉर्मचा काळ संपला.

पुढचे सहा महिने तो खेळला तो पाठदुखी घेउन. या काळात तो ब्रेक घेउन बाहेर का बसला नाही हे समजत नाही (बहुधा पुस्तकातही ते दिलेले नाही. लक्षात नाही). पण पाठदुखीमुळे फटके मारण्यावर निर्बंध आले, चेन्नई च्या अनुभवानंतर आपण आक्रमकपणे खेळून विकेट गमावली तर डाव कोसळतो या भीतीने तो बचावात्मक खेळू लागला. नंतर इंग्लंड मधे वर्ल्ड कप होता म्हणून निदान काही दिवस विश्रांती घेण्यासाठी तो त्या आधीच्या एक दोन क्रेझी स्पर्धांमधून बाहेर बसला.

नंतर १९९९ च्या कप मधली एक गेम झाल्यावर लगेच वडील गेल्याने त्याला मुंबईला परत जावे लागले. सचिन इफेक्ट एवढा जबरदस्त होता की पब्लिक लाही आता आपले काय होणार ही चिंता वाटू लागली. संघातही 'केऑटिक' वातावरण असावे - जे झिम्बाब्वे विरूद्ध खिशात असलेला सामना हरून भारताने दाखवले. मग बातमी आली की सचिन परतणार. तो परतला व पुढच्या केनियाविरूद्धच्या सामन्यात शतक मारले. मी या मॅच मधल्या भारताच्या बॅटिंग च्या दरम्यान पुण्याहून मुंबईला रेल्वेने गेलो होतो. पब्लिक चे सचिन प्रेम काय प्रकार आहे, पब्लिक ची किती त्याला सहानुभूती आहे हे सगळीकडे दिसत होते. अक्षरशः घरी असलेले सगळे टीव्हीला व बाहेर असलेले सगळे रेडिओ ला कान लावून बसले होते. त्याचे ते शतक व नंतर आकाशाकडे उंचावलेली बॅट हे क्रिकेट मधल्या कधीही न विसरले जाणार्‍या दृष्यांपैकी आहे.

हा १९९९ च्या पहिल्या सहा महिन्यातील काळ नक्की काय कॅटेगरीत टाकावा ते ठरवू शकलो नाही. म्हणून त्याबद्दल इथेच माहिती दिली. पण १९९८ मधला प्रचंड आक्रमक व फिट सचिन १९९९ च्या पहिल्या सहा महिन्यात एकदम त्याच्या फलंदाजीतील लाईफ काढून घेतल्यासारखा खेळत होता.

१९९८ च्या सप्टेंबर मधे एक बरीच चर्चा झालेले प्रकरण झाले. मलेशिया मधल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत क्रिकेट खेळले जाणार होते. भारताने तेथे आपला मुख्य संघ पाठवावा अशी इण्डियन ऑलिम्पिक असोसिएशन ची मागणी होती. तर ही नेहमीची क्रिकेट स्पर्धा नसल्याने (आयसीसी ची), बीसीसीआय ला आपले मूळचे श्येड्यूल जे होते तेच हवे होते - त्यानुसार याच दिवसांत टोरांटो मधे भारत पाक सामने ठरलेले होते. मग बरेच दिवस भारतीय संघ कोठे जाणार आणि त्यातही सचिन कोठे खेळणार यावर बरेच राजकारण, चर्चा व रस्सीखेच झाली. शेवटी असा तोडगा निघाला की सचिन मलेशियाला जाणार व बाकी थोडेफार खेळाडू टोरांटोला. भारताचा परफॉर्मन्स दोन्हीकडे वाईट झाला.

एकूण सचिन च्या पदार्पणानंतर त्याची आक्रमक, प्रतिस्पर्धी टीम ला चान्सेस देणारी रिस्की बॅटिंग, फिटनेस प्रॉब्लेम नसल्याने जड बॅट सुद्धा अत्यंत मोकळेपणाने फिरवून मारलेले कट्स व पंचेस हे सगळे १९९८ च्या शेवटापर्यंत दिसत होते. या काळात त्याचे फटके (विशेषतः कट्स, पुल्स व मिडविकेट ला मारलेले शॉट्स) पाहिलेत तर एक "चपराक" असे त्या शॉट्स मधे. जाने. १९९९ च्या पाठदुखीनंतर तो मोकळेपणा क्वचित दिसला व त्याची जागा पुन्हा कमावलेल्या कौशल्याने मारलेल्या व दुखापत टाळण्याच्या गरजेतून आणि कधीकधी तर दुखापत सहन करून मारलेल्या कलात्मक व 'क्लेव्हर' फटक्यांनी घेतली.

भारतीय फलंदाजी सचिन वर पूर्णपणे अवलंबून असण्याचा, पब्लिक च्या डोक्यात सचिन आउट झाला की भारताची बॅटिंग संपली असा समज पक्का असण्याचा हा काही वर्षांचा काळ साधारण इथपर्यंत होता. चेन्नई मधल्या पाक विरूद्धच्या पराभवाने, व आधीच्या अनेक चांगल्या कामगिरींमुळे ते अधोरेखित झाले. यापुढे हे चित्र द्रविड व लक्ष्मण मुळे बदलले, पण ही ८-१० वर्षे भारतीय क्रिकेट पाहिलेल्यांना सचिन वर बॅटिंग अवलंबून असणे, आख्ख्या बॅटिंग चे ओझे वाहणे म्हणजे काय ते चांगले लक्षात आहे. २०११ च्या विजयानंतर विराट कोहलीला सचिन ला त्याने उचलण्याबद्दल विचारले होते तेव्हा तो म्हंटला "He carried the Indian batting on his shoulders for many years, so it's time we carried him". त्या विजयानंतर नाचून पुन्हा शांतपणे समारंभ पाहायला बसलेल्या सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींनी तेव्हा मान डोलावली असेल.

<< फारएण्डा, अप्रतिम लिहितोयस मित्रा! क्या बात है!! >> १००% सहमत.

सचिनचं आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, 'रिव्हर्स फ्लिक', 'पॅडल स्ट्रोक' , बाऊन्सरना मारलेले 'अप्पर कट्स' इत्यादी अप्रचलीत फटक्यांना नाक न मुरडतां उलट ते आत्मसात करून त्यांचा औचित्यपूर्ण व शैलीदार वापर त्याने करुन घेतला.

सचिनच्या अचूक, शैलीदार व नेत्रदीपक फटक्यांइतकंच कौतुकास्पद असावं निग्रहाने कांहीं फटके टाळण्याचं त्याचं कसब; स्वतःचा कव्हर ड्राइव्ह थोडासा 'अप्पीश' जातोय हें लक्षांत आल्यावर, एका ऑस्ट्रेलियाच्या सबंध दौर्‍यात त्याने तो फटका एकदांही मारला नाही !

६. जुलै १९९९ ते मार्च २०००

सचिनचा दुसर्‍यांदा कप्तानपदाचा काळ. १९९९ च्या वर्ल्ड कप च्या शेवटी अझर चे कप्तानपद पुन्हा जाणार हे दिसू लागले होते. सचिन कप्तान नको असे अनेकांना वाटत होते. पण दुसरा कोणीही तयार दिसत नव्हता. त्यात अझर संघातूनही बाहेर जाईल अशीच चिन्हे होती. शेवटी नाईलाजाने परत दीड वर्षांनंतर सचिनकडे ती जबाबदारी दिली गेली असावी. आणि पुन्हा फॅन्स च्या दृष्टीने एक बोअर कालावधी सुरू झाला.

तसे सचिन ने या काळात भरपूर रन्स केले. पहिल्या न्यूझीलंड विरूद्धच्या सिरीज मधे एक शतक व एक द्विशतकही मारले. पण खरे सांगायचे तर ते लाइव्ह बघताना भयंकर बोअर झाले. टीपिकल सचिन ची इनिंग नव्हती ती. कप्तानपदाच्या पहिल्या काळाप्रमाणेच येथेही एरव्ही सहज जिंकू शकू अशा परिस्थितीतील मॅच भारताला जिंकता आली नाही न्यूझीलंड विरूद्ध घरच्या मैदानावर स्पिनर्स असूनही. मोहाली ला पहिल्या डावात केवळ ८३ वर ऑल आउट झाल्यावर दुसर्‍या डावात सचिन व द्रविड च्या शतकांमुळे व भागीदारी मुळे भारताने ५००+ रन्स मारले. पण किवीज ना ३७४ चे टार्गेट, त्यांना उडवायला जवळजवळ दीडशे ओव्हर्स व घरचे मैदान असतानाही आपण मॅच संपवू शकलो नाही. पण पुढची कानपूरची मॅच जिंकल्यामुळे आपण सिरीज जिंकली.

त्यात घरच्या मैदानावरील न्यूझीलंड विरूद्धच्या एकूण बर्‍यापैकी कामगिरीवरून भारतातील अनेक महाभाग आता हा संघ ऑस्ट्रेलिया दौर्‍याकरता तयार झालाय असे भाकीत करू लागले. पण संघनिवडीपासूनच अनेक गडबडी सुरू झाल्या. कोच म्हणून कपिल होता. आधी तो संघात असताना सचिन बरोबर त्याचे चांगले जमायचे पण या कोच-कप्तान जोडीचे फारसे जमले नाही. सचिन ला मनासारखा संघ मिळाला नाही अशी जाहीर चर्चा होत होती. त्यात बीसीसीआय च्या जयवंत लेले यांनी हा संघ ०-३ हरून परतेल असे वक्तव्य केले.

आणि जबरदस्त फॉर्मात असलेल्या ऑसी टीम विरूद्ध भारताची कामगिरी तशीच झाली. सचिन ची बॅटिंग चांगली झाली. मेलबोर्न ला इतर सगळे पडत असताना नवोदित ब्रेट ली विरूद्ध उभे राहून त्याने मारलेले शतक जबरदस्त होते. तसेच वन डे सिरीज मधे एकदा पाक विरूद्ध मारलेले ९३ ही. पण एकूण सुमार सांघिक कामगिरी मुळे संघावर व कप्तान म्हणून सचिन वर बरीच टीका झाली.

ही सिरीज संपल्यावर लगेच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होम सिरीज होती. त्या सिरीज मधल्या कसोटी सामन्यांत त्याने नेतृत्व केले पण ते सुरू होण्याआधीच त्याने घोषित केले की त्यानंतर तो कप्तानपद सोडणार. त्याप्रमाणे ते त्याने सोडले व गांगुली कप्तान झाला. सचिन च्या कप्तानपदाची कारकीर्द येथे संपली. पुढे २००५ च्या आसपास चर्चा सुरू होती पण सुदैवाने तो झाला नाही.

इतर फलंदाज - अझर, द्रविड, गांगुली, लक्ष्मण, देवांग गांधी, रमेश
ओपनर्स - रमेश-देवांग गांधी, (एम एस के) प्रसाद-लक्ष्मण

७. ऑक्टोबर २००० ते एप्रिल २००४
भाग #१

इथे मधली गॅप सोडून थेट ऑक्टोबर पासून धरले आहे. कारण सचिन ने कप्तानपद सोडल्यावर लगेच असलेल्या २-३ वन डे सिरीज मधे तो चांगला खेळला पण खेळण्याच्या पद्धतीत फार फरक नव्हता. नंतर मधे आजकाल दुर्मिळ असलेली गोष्ट म्हणजे बरेच महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नव्हते भारताचे (एखादी वन डे स्पर्धा झाली असेल, लक्षात नाही. पण एकूण फारसे क्रिकेट नव्हते). पूर्वी हे नेहमी असे. साधारण मे ते ऑक्टोबर खूप कमी क्रिकेट असे, फक्त इंग्लंड चा दौरा असलेले वर्ष सोडून.

मग ऑक्टोबर मधे नैरोबीला आयसीसी ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाली. सचिन डोक्यावरचे ओझे मोकळे झाल्यासारखा पुन्हा एकदा खेळू लागला. इथे त्याला आधी ऑस्ट्रेलियात सतावल्यावर मॅग्राथ परत पहिल्यांदाच भेटत होता. पण आता सचिन त्याच्यावर फोकस करायला मोकळा होता. आणि इथे जरी त्याने फक्त ३८ मारले, तरी मॅग्राथ वर चढवलेला हल्ला जबरदस्त होता. त्याची बोलिंग पूर्ण बिघडवली त्याने इथे - ९ ओव्हर्स मधे ६१ रन्स आणि नो विकेट. हेच तंत्र तो नंतर २००१ मधे त्याने वापरले, त्याची ही सुरूवात होती. या मॅच नंतर आफ्रिकेविरूद्ध ३९ मारले, आणि फायनल मधे न्यूझीलंड विरूद्ध आक्रमक ६९ मारून तो शतकाच्या वाटेवर होता, पण गांगुली व त्याच्यात गोंधळ झाल्याने तो रन आउट झाला. ही फायनल मधली त्याची बॅटिंग जबरदस्त आहे. इथे दोन वर्षांपूर्वीचा शॉट्स मधला 'पंच' आणि बॅट ची 'फ्लरिश' परत आले.

त्याचा आक्रमक खेळ पुन्हा सुरू झाला. २००१ ची ऑस्ट्रेलिया सिरीज लक्ष्मण च्या २८१ साठी प्रसिद्ध आहे. पण ती मॅच वगळता त्या सिरीज मधल्या बाकी दोन्ही मॅचेस मधे सचिन अतिशय जोरात होता. पहिल्या मुंबईच्या मॅचेस मधे बाकी सगळे चाचपडत असताना त्याचा फॉर्म बघून टोनी ग्रेग म्हंटला होता "There is Sachin. Then there is daylight. Then there are others." पहिल्या डावातील ७६ (इथे त्याने काळे आर्मबॅण्ड लावलेले दिसेल - ही सिरीज मधली पहिली मॅच सुरू व्हायच्या आदल्या दिवशी डॉन ब्रॅडमन गेला, म्हणून सगळ्या खेळाडूंनी ते लावले होते), व दुसर्या डावातील ६५ हा भारताकडून झालेला एकमेव प्रतिहल्ला, आणि तो ही दोन्ही वेळेस अत्यंत कमी स्कोअर वर दोन विकेट्स गेल्यावर केलेला. नंतर पुन्हा तिसर्या कसोटीत चेन्नईला मारलेले अत्यंत सुंदर शतक. हे शतक आम्ही त्या दिवशी रात्रभर जागून पाहिले होते. टेस्ट क्रिकेट मधे ज्या पेशन्स ने खेळावे लागते, बोलर्स च्या स्लेजिंग ला तोंड देउन लक्ष विचलित होउ न देता मोठी धावसंख्या उभारणे हा गोल जराही न विसरता खेळणारा सचिन इथे जबरदस्त दिसला. त्यात चेन्नई हे त्याचे आवडते ग्राउण्ड. इथे मॅग्राथ ने भरपूर स्लेजिंग केले, तरीही सचिन शांतपणे खेळत राहिला (आणि स्लेजिंग चा बदला नंतर वन डेज मधे घेतला).

या काळात प्रत्येक सिरीज मधे, प्रत्येक दोन तीन मॅचेस नंतर सचिन शतक मारणारच हे गृहीत धरलेले असायचे. पहिल्या दोन कसोटींमधे त्याने न मारल्याने तो चेन्नईला मारणार हे ऑस्ट्रेलिया संघाच्या प्लॅनिंग मधे धरलेले होते, हे जॉन बुखॅनन च्या मुलाखतीत वाचलेले आहे.

मग झालेल्या वन डे सिरीज मधे सचिन ने मॅग्राथ वर हल्ला करायचा हे टीम चे धोरण होते. त्याप्रमाणे जवळजवळ प्रत्येक मॅच मधे सचिनने त्याला धुतला. यातली सर्वात भारी इनिंग म्हणजे वायझॅग ला मॅग्राथ ची केलेली अभूतपूर्व धुलाई! त्यांच्या ३३८ स्कोअर ला चेस करताना सचिन ने ३८ बॉल्स मधे ६१ मारले. यातील अनेक क्लिप्स पुन्हा पुन्हा पाहण्यासारख्या आहेत. मॅग्राथ मुळात जबरदस्त अ‍ॅक्युरेट. त्यात शॉर्ट कव्हर च्या आसपास तीन फिल्डर्स लावलेले. ते ही ऑसी फिल्डर्स. मॅग्राथ म्हंटल्यावर लाईन ऑफ स्टंपची असणार यात काही आश्चर्य नव्हते. आधीच्या बॉलला सचिनने जरा रिस्क घेत थोडा वरून मारला. तो हवेतून गेला. तेथे फोर मिळाले पण शॉट रिस्की होता. पण मग लगेचच पुढच्या बॉल ला त्याने त्याच एरियातून इतका क्लीन मारला की बॉल बाउण्डरीचे अर्धे अंतर पोहोचेपर्यंत स्क्रीन वर फिल्डरच दिसत नाही. आणि प्रत्यक्षात तेथे तीन फिल्डर्स उभे होते. अशा वेळेस वाटते की पॉण्टिंग ला भारताविरूद्ध शतक करायला जितके प्रयत्न करायला लागत असतील त्याच्या दुप्पट प्रयत्न सचिनला त्यांच्याविरूद्ध शतक करायला लागत असतील. इथे फील्ड पोझिशन्स पाहिल्या तर सुईतून दोरा ओवल्यासारखे गॅप काढलेले शॉट्स आहेत.

सर्वात मोठी कॉम्प्लिमेण्ट त्याला इयान चॅपेल कडून थोडी नंतर मिळाली. पुन्हा एकदा मॅग्राथला टार्गेट केल्यावर चॅपेल म्हंटला "..Australians have got into the mind of Ganguly, well, Tendulkar has got into the mind of Glen McGrath. He (McGrath) is talking to himself at the moment."

याच वन डे सिरीज मधे इंदूर ला त्याने एक सुंदर शतक मारले.

फारेण्डा, भारी लिहितोयस.
निवांत सवडीने लिंक्सवरल्या क्लिप्स पाहणार !

७. ऑक्टोबर २००० ते एप्रिल २००४
भाग #२

२००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफी मधे भारताची नवीन टीम वेगळी आहे, आक्रमक बॅटिंग, आक्रमक बोलिंग आणि इतरांइतकीच चांगली फिल्डिंग करणारी, खुन्नस वाली आहे याचे चित्र दिसले होते. २००१ च्या या सिरीज मधे अतिबलाढ्य ऑस्ट्रेलियन्स ना हरवल्यावर या टीम मधे प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. पुढच्या १०-१२ वर्षांत मिळालेल्या अनेक यशांची सुरूवात इथून झाली.

त्या दृष्टीने मुंबईला १०-२० रन्स मधेच दोन विकेट उडाल्यावर खेळायला येणार्‍या सचिनला कलकत्त्याच्या विजयानंतर चेन्नई ला चांगली सुरूवात मिळाली ही त्या बदलाचीच चुणूक असेल. कारण यापुढे केवळ सगळे सचिन वर अवलंबून आहे असे राहिले नाही. सेहवाग, द्रविड, लक्ष्मण आणि गांगुली यांनी पुढची काही वर्षे आपली बॅटिंग मजबूत केली. बॅटिंग कागदावर आपली कायमच जोरदार दिसे पण प्रत्यक्षातही सगळे सणसणीत खेळत आहेत असे चित्र नंतर दिसू लागले. सचिन वरचे प्रेशर यानंतर खूप कमी झाले.

एकूण २००० पासून ते २००३ च्या वर्ल्ड कप पर्यंत सचिन जबरदस्त फॉर्म मधे होता. त्याचा खूप चांगला आक्रमक खेळ या काळात दिसला. त्याची या काळातील शतके, अर्धशतके सगळी अत्यंत सुंदर व त्याचे बॅटिंग मधले जबरदस्त स्किल दाखवणारी आहेत. त्याचे पहिल्यासारखे सगळे शॉट या मॅचेस मधे बघायला मिळतील. बहुधा त्याची पाठदुखी या काळात त्याला सतावत नसावी.

इथे आधीच्या पानावर २००१ मधल्या द. आफ्रिकेतील शतकाबद्दल लिहीले आहे ती इनिंग. नंतर मे २००२ मधे पोर्ट ऑफ स्पेन मधे विंडीज विरूद्ध मारलेले शतक. नंतर नॉटिंगहॅम ला इंग्लंड विरूद्ध मारलेले ९२ ही काही उदाहरणे. यातील सर्वात भारी मॅच म्हणजे २००२ च्याच सिरीज मधली लीडस ची. आपल्या नवीन टीम चा सर्वात जबरी परफॉर्मन्स. त्या काळात द्रविड, सचिन आणि गांगुली हे आपल्या बॅटिंग मधे तीन प्रमुख लोक. त्या तिघांची शतके या मॅच मधे आहेत. बर्‍याच संघांच्या घरच्या ग्राउण्ड्स पैकी एखादे हे अभेद्य किल्ला समजले गेलेले मैदान असते. त्या देशातील 'कंडिशन्स' त्या मैदानावर सर्वात प्रभावी असतात. ऑस्ट्रेलिया म्हंटले की पर्थ, विंडीज म्हणजे की बार्बाडोस, तसे इंग्लंड मधे लीड्स्/हेडिंग्ले. जेव्हा तेथे ढगाळ वातावरण असेल, तेव्हा स्विंग ची सवय नसलेल्या संघांना खेळायला सर्वात अवघड मैदान. इथेच प्राचीन काळी आपली अवस्था "४ आउट ०" अशी झालेली होती

मात्र या मॅच मधे द्रविड व संजय बांगर ने पहिल्या दिवशी अभेद्य सुरूवात करून दिल्यावर मग द्रविड १४८, सचिन १९३ आणि गांगुली १२८ यांच्या जोरावर आपण ६२८ मारल्या आणि इंग्लंडला दोन्ही वेळेस ला लौकर उडवून मॅच जिंकली. या मॅच मधल्या दुसर्‍या दिवशीच्या खेळाच्या शेवटी एक कायम लक्षात राहिलेली सिच्युएशन आली. इथे गांगुलीची कप्तान म्हणून आक्रमकता व त्याची आणि सचिन ची आक्रमक बॅटिंग हे दोन्ही एकत्र आले व इंग्लंडच्या हातातून मॅच गेली.

त्या दिवशी टी टाईम नंतर साधारण एक तास खेळ झाल्यावर बॅड लाईट मुळे अंपायर्सनी या दोघांना विचारले की खेळ थांबवायचा का. तेव्हा भारताची अवस्था अत्यंत सेफ होती. इथे आधीच्या मॅचची बॅकग्राउंड आहे - नॉटिंगहॅम ला इंग्लंड साधारण अशाच स्थितीत असताना त्यांनी लाईट ऑफर स्वीकारून खेळ थांबवला व एका अर्थाने ओव्हर्स वाया घालवल्या. मग शेवटी भारताने मॅच ड्रॉ केली तेव्हा साधारण तेवढ्याच ओव्हर्स त्यांना कमी पडल्या असे म्हंटले गेले. त्या पार्श्वभूमी वर येथे सचिन व गांगुली यांनी ती ऑफर नुसती नाकारलीच नाही, तर पुढच्या ११ ओव्हर्स मधे प्रचंड धुलाई करून जवळजवळ ९५-९६ रन्स मारले. ऑसीज करत तसे इंग्लंडचे mental disintegration करून टाकले या दोघांनी. या दिवसाचे वर्णन येथे मिळेल.

यानंतर भारताकडे वन डे मधे तीन ओपनर आले. मग मधे टीम मॅनेजमेण्ट ने असे ठरवले की सचिन ने मधल्या फळीत खेळावे. २००२ च्या उत्तरार्धात तो तसा खेळला, पण खूप मॅचेस झाल्याच नाहीत तेव्हा. नंतर आला तो २००३ चा वर्ल्ड कप. तेव्हा मात्र सचिनने आग्रहाने ओपनिंग स्लॉट परत मागितला. जॉन राईट व गांगुलीने ते मान्य केले. तेथे सुरूवातीला ऑस्ट्रेलियाविरूद्ध दणदणीत हरल्यावर भारतात जोरदार प्रतिक्रिया झाली होती. तेव्हा सचिननेच लोकांना तिकडून आवाहन केले होते पेशन्स चे. त्याचा खेळ तोपर्यंतही वाईट नव्हता. पण पुढच्या मॅचेस मधे त्याने तो उंचावला. त्यातली पाक विरूद्धची इनिंग तर सर्वांनाच माहीत आहे. पण इंग्लंड विरूद्धच्या ५० व श्रीलंकेविरूद्धच्या ९७ सुद्धा जबरदस्त आहेत. विशेषतः इंग्लंड विरूद्धचे फटके. त्यात एक तर कायमच लक्षात राहणारा आहे. आधीच्या फुल पिच बॉल वर फोर मारल्यामुळे पुढचा तो शॉर्ट टाकणार हे सचिनला माहीत होते. तो तयारच होता. त्यावर मारलेली कचकचीत सिक्स त्याच्या करीयर मधे कायम लक्षात राहिलेल्या शॉट्स पैकी आहे. मात्र नंतर फायनल मधे तो लौकर आउट झाला, व सेहवाग च्या रन्स सोडल्या तर भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या ३५९ ला फारसा प्रतिकार झाला नाही.

७. ऑक्टोबर २००० ते एप्रिल २००४
भाग #३

पुढच्या २००३-२००४ च्या सीझन मधे मात्र सचिन थोडा स्लो झाला. तो नैसर्गिक आक्रमक खेळ कमी झाला न्यूझीलंड विरूद्ध घरच्या सिरीज मधे फारसे खेळला नाही तो (एक फिफ्टी). मग झालेल्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सुरूवातीला त्याचे स्वतःचे अपयश व अंपायर्स नी दिलेले अचाट निर्णय यामुळे पहिल्या तीन मॅचेस मधे अपयशी ठरला. तेव्हा आपण ड्राइव्ह्ज मारायला जाताना सतत आउट होतो हे लक्षात घेउन सिडनेच्या चौथ्या टेस्ट मधे मात्र तो अत्यंत कंट्रोल ठेवून बहुतांश लेग साईडला खेळला. या इनिंग मधे त्याचे अगदी क्वचित एखादे शॉट्स ऑफ साईडला आहेत, ते ही बरेचसे नंतर मारलेले. त्याचे पहिल्या इनिंग मधले २४१ व दुसर्‍या इनिंग मधे ६० हे दोन्ही नाबाद होते व मॅच सेटप करून देणारे होते. मात्र आपल्याला मॅच क्लोज करता आली नाही. नाहीतर स्टीव वॉ ची फेअरवेल मॅच व सिरीज आपणच जिंकली असती.

त्यापाठोपाठ भारताने केलेल्या पाक दौर्‍यात पहिल्याच टेस्ट मधे सेहवाग (३०९) बरोबर सचिन ने (१९४) मारले, ते ही नाबाद (द्रविडने लौकर डाव घोषित केला - त्याबद्दलही इतरत्र बरेच लिहीले गेले आहे, त्यामुळे इथे आणखी लिहीत नाही). तेव्हा त्याने सलग दोन मॅचेस मधे आउट न होता ४९५ रन्स मारलेले होते. याच मॅच मधे तिसर्‍या दिवसअखेर मॅच बॅलन्स मधे असताना शेवटच्या बॉलवर मोईन खान ची दांडी सुरेख उडवून त्याने भारताकडे मॅच फिरवली.

ही टेस्ट आणि वन डे सिरीज जिंकल्यावर तो सीझन संपला तेव्हा भारताने बरेच काही साध्य केलेले होते. त्या आधी २-३ वर्षे सगळा संघ व सचिनही जबरदस्त क्रिकेट खेळले होते. परदेशात मॅचेस जिंकणे हे तोपर्यंत अत्यंत दुर्मिळ होते (१९३२ ते २००० या काळात फक्त ७ विजय). या २-३ वर्षांत भारताने वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, आणि पाकिस्तान मधे विजय मिळवले. त्यातही पाक मधे सिरीज जिंकल्याने त्याचे महत्त्व जास्त होते, कारण त्याआधी आपण कधीही तेथे कसोटी सामनाही जिंकला नव्हता. जॉन राईट व सौरव गांगुली यांचे ट्युनिंग मस्त जुळले होते, संघही पूर्ण दशक पुरेल असा जमलेला होता व बरेचसे करीयरच्या सुरूवातीलाच होते. द्रविड व कुंबळे हे नेहमीच मेहनती होते, पण या काळात ते मॅचविनर झाले. सचिनची लोकप्रियता तितकीच राहिली, किंबहुना वाढली. पण आता तो "बिग-५" पैकी एक होता (सेहवाग, द्रविड, सचिन, गांगुली, आणि लक्ष्मण). पहिल्या विकेट्स लौकर उडाल्या तर शिल्लक राहिलेला बॅट्समन सचिन असतो, ही २००० च्या आधीची परिस्थिती बदलून तो "मान" द्रविड कडे आला :). बोलिंग मधेही झहीर च्या जोडीला नेहरा, बालाजी व इरफान पठाण हे आले होते. कुंबळे अतिशय फॉर्मात होता.

मग दोन महिन्यांच्या ब्रेक नंतर आता हाच संघ खेळ आणखी उंचावेल असे वाटले होते. पण काहीतरी बिघडले. कदाचित या लेव्हलला येइपर्यंत उपयोगी पडलेले टॅक्टिक्स त्यापुढे चालले नाहीत. तेथून पुढे न्यायला वेगळ्या कप्तान व कोचची गरज होती. संघाला एक शैथिल्य/ complacency आलेली जाणवत होती. बॉडी लँग्वेज मधे 'फायर' दिसत नव्हती. जवळजवळ सर्वांचाच फॉर्म गेला होता. सचिनही अनफिट होता. या सीझन मधे २००५ च्या मार्च एप्रिल पर्यंत झालेल्या मॅचेस मधे अजिबात मजा नव्हती. यामुळे झालेले सर्वात मोठे नुकसान म्हणजे घरच्या सिरीज मधे ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव. वास्तविक थोडे नशीब व थोडे प्रयत्न याने भारताने ही सिरीज २-२ अशी ड्रॉ केली असती. पण चेन्नईला चांगली संधी असताना शेवटच्या दिवशी पूर्ण पाऊस झाल्याने भारताचा चान्स हुकला.

नंतर द.आफ्रिका व पाक विरूद्धच्या सिरीज मधे बरीचशी टीम पाट्या टाकत खेळत आहे असे वाटत होते. हातात असलेल्या मॅचेस जिंकू न शकणे, भिकार खेळून हारणे वगैरे दिसू लागले. त्यात जॉन राईटचे कॉण्ट्रॅक्ट संपले व त्याबरोबर सुमारे पाच वर्षातील विजय व पराभव धरले तर एक अत्यंत यशस्वी कालावधी संपला.

ती ईंग्लण्डला बॅडलाईटला दादा सचिनने केलेली धुलाई भारी होती. माझ्या आठवणीप्रमाणे बहुतेक दादाचा आधी एक झेलही सोडला होता आणि त्यानंतर तो जे सुटला तो सुटलाच. आणि बहुधा दादा आऊट झाल्यावर दोनतीन ओवर शिल्लक होत्या पण त्याने मागच्या खेळाडूला खेळवायची रिस्क न घेता आता बस बोल्लेला ..
घरून बघायला पाहिजे ती इनिंग परत..

प्रत्यक्ष सचिनला तरी इतक्या स्पष्ट आठवत असतील ह्या सर्व इनींग्ज ? मीं तर चक्रावूनच गेलोय तुम्हा सर्वांच्या स्मृतिपटलावर हें सर्व त्या थरारासह कोरलं गेलंय हें पाहून !! मानलं व धन्यवाद पुनःप्रत्ययाच्या या आनंदाबद्दल.

सचिन च्या खेळी लाईव्ह बघताना जे काही आतून वाटायचं तसं पुन्हा कधीच नाही वाटलं. ते वयच तसं होतं असं फार तर म्हणता येईल. पण फारएण्ड ने पुनःप्रत्ययाचा आनंद मिळवून दिला. धन्यवाद फारएण्डा.

Pages