"बाजीराव मस्तानी" : चित्रपटविचार

Submitted by अमेय२८०८०७ on 18 December, 2015 - 23:23

महाराष्ट्रात नसल्याने म्हणा किंवा काय पण बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शनपूर्व वादाचा इतका परिणाम झाला नव्हता. पिंगा बिंगाही एक दोनदा कुतूहल म्हणून यू ट्यूबवर पाहिले होते तितकेच त्यामुळे बघायला जाताना पाटी बऱ्यापैकी कोरी होती.

सिनेमा सुरू झाला आणि रंगीलाच्या आमिरप्रमाणे पहिला विचार मनात आला तो म्हणजे,"खर्चा कियेला है". सिनेमॅटोग्राफरने जबरदस्त काम केले आहे पण इथेच विसंवादी सूर लागायला लागतो. भंसालीला उत्तरेतील राजे किंवा मुघलांची आणि मराठी योद्धयांची जीवनशैली यात असलेला सांस्कृतिक फरक दुर्दैवाने समजलेला नाही त्यामुळे शनिवारवाड्याचा आईनेमहाल (आईने अकबरी नव्हे) करणे, युद्ध जिंकल्यावर, 'वाट लावली', म्हणत बाजीराव सैनिकांसोबत नाचणे आणि रजनीकांतची श्टाईल उधार घेऊन बाजीरावाने घोड्यावर दौड मारता मारता शत्रूचे बाण हातात पकडणे अशा फालतू गोष्टी अगदी चकचकीत होऊन समोर आल्या तरी नकोशा वाटतात.

'राऊ' खूप आधी वाचली असल्याने सर्वज्ञात ढोबळ गोष्टी सोडल्या तर बाजीरावाच्या आयुष्यातील बारकावे मला माहिती नाहीत. हा चित्रपट बघताना एक जाणवले की बाजीरावाच्या काळाचा विचार करता ही एक व्यामिश्र आणि अनेक पातळ्यांवर ताण असलेली वेगवान जीवनकथा आहे. सततची युद्धे, परधर्मीय स्त्रीवर जडलेले प्रेम आणि ते निभावून नेण्याची हिंमत, धर्मसत्तेविरुद्ध उचललेले पाऊल, काशीबाई आणि मस्तानीची घुसमट, राधाबाई आणि इतर आप्तांची मानसिकता यासारखे अनेक वैशिष्ट्यपूर्ण कंगोरे असलेली बाजीरावाची कथा आहे. इथे मात्र दिग्दर्शक दर्शनी भव्य दिव्यतेच्या नादात कार्यकारणभावाच्या मुळाकडे जाऊच धजत नाही त्यामुळे होणारा परिणाम फार वरवरचा राहतो.

दिग्दर्शकाने बनवलेले पिच निसरडे असूनही कलाकारांनी पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांका चोप्रा आणि दीपिका दोघींनीही अनेक प्रसंगात छोटे छोटे बारकावे छान खुलवले आहेत. त्यांना कंबरेच्या खाली नऊवारी नेसवणाऱ्या वेषभूषाकाराला मात्र शनिवारवाड्यावर फटके दिले पाहिजेत.
रणवीर सिंग हा थोडासा वीरेंद्र सेहवागसारखा आहे. सेहवागचा खेळ आवडतो म्हणून त्याच्याकडून कोणी टिप्स घ्यायला गेले तर जसे फारसे हाती लागणार नाही तसेच रणवीरचे आहे. वैयक्तिक छबी काहीशी उथळ असल्याने त्याच्या भूमिकांकडेही तसेच बघितले जाते असे मला वाटते. खरेतर प्रत्येक भूमिका समंजसपणे आणि आपल्या मर्यादा नीट ओळखून सादर करणारा हा कलाकार आहे. चित्रपटातील बाजीरावाची बोली ही मला सर्वात आवडलेली गोष्ट. रांगडा लढवय्या जसा वागेल बोलेल तसाच रणवीरचा वावर आहे. मराठी आघात असलेली हिंदी त्याने छान निभावली आहे. एरवी सिनेमात कामवाली बाई, रिक्षावाले नाहीतर साईडव्हीलन यांची मराठीमिश्रीत हिंदी चेष्टेसाठी वापरली जाते पण बाजीरावाच्या बोलीची तशी चेष्टा करावीशी वाटत नाही.

अशा काही जमेच्या बाजू असल्या तरी बाजीरावाच्या आयुष्यातील मूळ ताणच अतिशय उथळपणे चित्रित करून ठेवल्याने माध्यमाची सवलत म्हणून कितीही गोष्टी माफ करून टाकल्या तरी हा चित्रपट, महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूतकाळातील एक महत्त्वाची  ऐतिहासिक व्यक्ती म्हणून, बाजीरावाबद्दल कुठल्याही विशेष भावना प्रेक्षकांपर्यन्त पोचवण्यात सपशेल अपयशी झाला आहे असेच वाटत राहिले.

 त्यातल्या त्यात, हौसेने 'दिलवाले' बघून आलेल्या आणि अंतू बर्व्याच्या भाषेत 'गणित सपशेल चुकलेल्या पोरासारखे' भाव घेऊन क्रुद्ध चेहऱ्याने सकाळी झाडांना पाणी घालत असलेल्या शेजाऱ्याइतके फ्रस्ट्रेशन देणारा हा चित्रपट नव्हता, हेच समाधान. शेजाऱ्याने आस्थेने दिलेले दिलवाले पाहण्याचे निमन्त्रण नाकारून फारशी चूक केली नाही, हे येथील आणि इतरत्र येत असलेल्या प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते आहेच.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सलमान आणि बाजीराव??? असोच.

रणवीरसिंग खरच वाटतो बाजीराव. बाकी काही अ च्या अ प्रसंग टाकुन भन्साळी नावाला जागलेत ते दुर्लक्शिले तर सिनेमा चांगला आहे एकुणात.

बाजीराव मस्तानी पाहिला.रणवीर च काम आवडल.तोच जास्त शोभुन दिसतोय बाकी दोघीपेक्षा.तापाच्या ग्लानीत असलेल्या बाजीरावा ला जेव्हा मि.सो दांडपट्टा हातात देतो तो शॉट भारी.
पीसी ने परत असल पात्र करु नये अस वाटल पुर्ण वेळ पाहताना.हा धागा वाचल्यामुळे पीसी उडी मारुन सा.बा कडे बसते त्या प्रसंगाला दणकून हसले.
दिपिका चा खुप काही इंपॅक्ट जाणवलाच नाही. तिची तलवारबाजी चांगली वाटली पण.दोघ अगदी इतक्या प्रेमात कधी पडले.. असे कुठलेच प्रसंग दाखवले नाही.स्वतःच्या पोराला घेऊ जाऊ देताना ती त्याच्याशी जे बोलते ते ही आवडल.त्यावरुन च बहुधा त्याला मारणार नसावे.अदरवाईज तिने इतक्या शांतपणे जाऊ दिल नसत.अस मला वाटतय.
बाकी सेट मस्त.प्रत्येक सेट मधे पाणी,कारंजी,तळे,नदी दाखवुन ..आय मीन पाणी शी रीलेटेड भन्साली साहेबांना,,नात्यांची काय उकल दाखवायची होती ते कळले नाही.

या चित्रपटातला बाजीराव मस्तानी भेटणे ते मरणे यातला टाईम स्पॅन नक्की किती आहे?
मस्तानीचा मुलगा लहान दिसतो पण काशीचा मोठा मुलगा जो बाळात पाळण्यात घालताना ८-९ वर्षाचा असेल तो एकदम खूप मोठा झालेला दाखवलाय.एकंदर सलीभ चित्रपटांतील नायक नायिका कन्युनिकेशन चे वांधे पाहता त्या काळी मोबाईल असायला हवे होते असे बरेचदा वाटून गेले.

अनु, मस्तानीचा मुलगा आणि बाजीरावांचा त्याचवेळी झालेला मुलगा सिनेमात एकाच वयाचे दाखवलेत. आणि त्याचेच नाव रघुनाथ दाखवलेय.
वास्तवात रघुनाथराव त्या आधीचे आणि काशीबाईंना मस्तानीच्या बरोबरच झालेले बाळ जगले नाही असे वाचल्याचे आठवते.

जे अचानक मोठे झालेले आहेत असे वाटते ते नाना आहेत ते मस्तानी यायच्या आधीपासूनच शाहू महाराजांकडे शिकायला ठेवलेले असतात. (हे बहुतेक खरेही आहे आणि सिनेमातही आहे.)

नाना म्हणजे मोठा मुलगा ना?जो सुरुवातीला मस्तानी नसताना बाजीरावांबरोबर फिरताना वगैरे दाखवलाय?
आणी टेक्निकली एका कैद्याला खरोखर जिथे सारखे जाता येईल अशा बंदीवासात ठेवण्या ऐवजी इतक्या पायर्‍या चढून जावे लागेल आणि कैद्याच्या समोर ओपन दरी व्ह्यू असेल अशा जागी का ठेवावे? ती जागा मस्त आहे बाय द वे.

कपड्यांचे इरा गंडवले असले तरी प्रियंका/दिपीका ने केस मोकळे सोडलेले असताना त्यांचे आधुनिक स्टेप लेयर कट्/सरळसोट केलेले केस न दाखवता नॉर्मल केस दाखवल्याबद्दल केशभूषाकारांचे आभार आणि कौतुक. एक दोन टिव्ही वरच्या धार्मिक सिरीयल्स मध्ये केस मोकळे असताना अर्जुनाचा शॉर्ट स्टेप कट्/द्रौपदीचा स्ट्रेटन्ड हेअर लेअर कट आणि चाणक्याची हेअर स्ट्रेटन्ड शेंडी बघून जरा दचकायला झालं होतं.

कितिही आवडुन घेवुन बघायचा म्हटल तरी मला अजिबात आवडला नाही बाम!...इतिहासाच्या सदर्भाना धुडकावुन सलिभने जि काही प्रेमकथा मान्डलिय ती प्रेमकथा सुधा वाटत नाही... रणविर-दिपिकामधे काही कनेक्सनच वाटत नाही, काही काही सीन मधे दिपिका कोरा चेहर्‍याने वावरलिय अगदी...सो फार दिपिकाचा सगळ्यात सुमार अभिनय,
वेल्वेट चे ब्लाउज, पोट दाखवणार्‍या साड्या, दागिने सगळच विचित्र...

पिंगा गाणे दिपिकाचे स्वप्न म्हणुन दाखवले असते तर खपले असते. >> स्वप्नात अहोंबरोबर दंगा की सवतीबरोबर पिंगा ? ती काय रामसेंचे सिनेमे बघून झोपी जात असते का ? Proud

या सगळ्या चर्चेला भन्साळीने कुठे उत्तर दिल्याचे वाचले नाही. तो बहुदा पुढच्या चित्रपटाच्या जुळवणीला लागला असेल.

एन डी टी व्ही वरच्या मुलाखतीत प्रियांकाने राऊ चा उच्चार राव.. असा केला !

ती पूर्वी गाणी असायची ना. कि समोर कोणीतरी नाचतंय गातंय . हिरवीण बघता बघता डोळे मिटते , स्वप्नात जाते आणि त्या गाण्यात नाचायला जाते . तस करायला पहिजे होत पिंगाच .
मस्तानी तिच्या महालातून काशीबाईच्या घरातील मंगळागौर बघतीये आणि मग स्वप्न

अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांना आणी दिग्दर्शकांना देवनागरी वाचता येत नाही, त्यांना मराठी आणि हिण्दी संवाद रोमन मधून दिले जातात.

बाकी ह्या चित्रपटाला केवळ एक चित्रपट म्हणून पाहिले तर कायच खटकत नाय, पिंगाच्या वेळच्या साड्यांशिवाय आणि पीसी च्या इतर आणि साड्या आणि ओव्हरॉल पीसी शिवाय कायच खटकत नाय..

दिनेशदा,
पण राव चेच राऊ हे अपभ्रंशित रूप (किंवा वाईस वर्सा) असू शकते असेही वाटते.

ना.सं. इनामदारांनी राऊ लिहिलेय, तेच प्रमाण असे कसे गृहित धरायचे?

बाजीराव मधल्या राव चे हळू हळू राऊ असे होण्याची ही शक्यता वाटते.

आधीच्या पोस्ट्स मध्ये कुणीतरी क्लायमॅक्स सीन मधल्या काशीच्या हातातल्या गडू वर चर्चा केलीये. मी परत नीट पाहिले. गांगाजलाचा ही गडू नाही की भानू ने दिलेला अस्थीकलशही नाही गं, बायानो! Happy

रावसाहेब तापाच्या ग्लानीत उठून बसतात तेव्हा काशी त्यांना बळे बळे खाली बसवते आणि 'वैद्यराजने आपको उठनेसे मना किया है" असं म्हणत माठातले पाणी काढायला जाते. तेव्हा चा गडू आहे तो. साधे पाणे देत असते हो नवर्‍याला. गंगाजल नव्हे! Wink

बाजीराव किंवा राऊ मराठी वाटते. नुसते राव म्हणले तर कानडी किंवा अदिती राव हैदरी मधला हैद्राबादी राव वाटतो. मराठी माणसा जागा हो!!! (संदर्भ हेराफेरी Wink )

खरं तो मिसो बाजी च्या हातात दांडपट्टा देतो आणि बाजी भ्रमात पाण्यात जातात तेव्हा मला पण वाटलं की काशी ने हातात 'आता संपलंच' म्हणून गंगाजलाचा गडू ठेवला आहे. पण मी रणवीर कडे बघत असल्याने नीट लक्ष दिले नाही Happy
परत पाहयला हवा आता..

Pages