अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी

Submitted by Rajesh Kulkarni on 16 December, 2015 - 00:04

अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी
.
अनिरुद्धबापू म्हणवून घेणारे एक प्रस्थ अनेक वर्ष महाराष्ट्र राज्यात आहे. हे बापू शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत. कदाचित वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अध्यात्मातल्या गुरूगिरीचा बाजार मोठा असल्याचे त्यांनी वेळीच ओळखल्यामुळे ते इकडे वळले असावेत.

ते स्वत: शिर्डीचे साईबाबा, राम व विष्णु यांचे अवतार आहेत असे सांगितले जाते. ते शाळेत असल्यापासूनच ते शिर्डीचे साईबाबा असल्याचे त्यांना वाटे म्हणे. म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना कुठल्या तरी विद्यापीठाने डॉक्टरकीची पदवी दिली असे समजुयात. त्यांना राम म्हणावे, तर त्यांची पत्नी सीता व त्यांचा एक भाऊ किंवा जवळचा मित्र हनुमान. त्यांना विष्णु म्हणावे तर त्यांची पत्नी लक्ष्मी व तो मित्र किंवा भाऊ शेषनाग असा मौजेचा मामला आहे.

मध्यंतरी या मित्राचे किंवा भावाचे त्यांच्याशी मतभेद झाले व त्याला बदलून दुसरा त्या जागी आला. काही भक्तांनी सांगितले की तो आधीचा लक्ष्मण किंवा शेषनाग फ्रॉड होता, आताचा हा खरा आहे असे बापूंनी सांगितले. इतक्या लोकांचे अवतार असलेल्या बापूंना तो फ्रॉड आहे हे आधीच कसे कळले नाही असे प्रश्न यात विचारायचे नाहीत.

बापू हेलिकॉप्टरने जेथे जेथे जातात तेथे त्यांना हार घालण्याची इच्छा असलेल्यांना २५,००० रू. वगैरे मोजावे लागतात असे अनेक उल्लेख माहितीजालावर दिसतात.

त्यांचा भक्तपरिवार अफाट आहे. याचाच अर्थ आपले डोके त्यांच्याकडे गहाण टाकलेल्यांची संख्या बरीच आहे. अर्थात आपल्याकडे अशा लोकांची कमतरता नाही. यातले अनेकजण सुशिक्षित आहेत बरे का! त्यांना सावध करायला जा तर त्यांचा फणकारा पहायला मिळतो इतक्या घातक प्रमाणावर त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले आहे. आसाराम व त्याचा दिवटा नारायण यांचे धंदे माहित होऊनदेखील ते नराधम तसे करणारच नाहीत याची खात्री असलेले लोक अजुनही त्यांच्या सुटकेची वाट पहात आहेत, तसेच.

कोणाला वाटेल लोक बापूंच्या निमित्ताने देवधर्माच्या मागे लागले आहेत तर त्यात वाईट काय आहे?

काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण झाले, त्यानंतर काही दिवसात या महाभागाने एक प्रवचन झोडले. त्यात बलात्काराच्या संदर्भात त्याने जे तारे तोडले, ते ऐकताना एक सुशिक्षित म्हणायला अक्षरश: लाज वाटते. त्यांनी तोडलेले तारे पहा. त्यांनी पाच कलमे सांगितली.
१. स्त्री किंवा पुरुष यांच्यापैकी कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल.
२. जी व्यक्ती रोज पाच वेळा गुरूक्षेत्र मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. अगदी १०० लोक जरी बलात्कार करायला गेले तरी त्यांना ते शक्य होणार नाही.
३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने मातृवात्सल्य उपनिषदातले दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
४. ज्यांना लिहिता वाचता येत नसेल किंवा अगदी मुक्या व्यक्तींनी मनातल्या मनात जरी अनिरुद्ध अनिरुद्ध असे म्हटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु म्हणजे बापू स्वत: करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
५. अहिल्या संघाच्या माध्यमातून ते असे काही तंत्र शिकवणार आहेत की ती स्त्री बलात्का-याला जागच्या जागी छक्का (त्यांच्याच भाषेत) करून टाकू शकेल.

मात्र हे सारे काही टर्म्स व कंडिशन्सवरच अवलंबून आहे बरे का! जसे जाहिरातींमध्ये fine print असते तसे. कारण बापू सांगतात की तुमची बापूंवर भक्ती, प्रेम व श्रद्धा असेल तरच हे शक्य होईल. आता कळले की निर्भया प्रकरणानंतरही देशातच काय सा-या जगात बलात्कार चालूच का आहेत? कारण त्यांची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही. आता बलात्कारावरचा एकच उपाय, तो म्हणजे सा-या जगाला बापूंच्या चरणी घालायचे. तरीही तसे काही प्रकरण झालेच, तर खुशाल समजायचे की त्या बलात्कारित स्त्रीची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही किंवा नव्हती. इतका साधा मामला आहे. अर्थात श्रद्धा आहे की नाही हे तपासायला बॅटरीचा चार्ज किती आहे ते तपासू शकेल असे लाल-पिवळा-हिरवा असे रंग दाखवणारे यंत्र काही बापू देत नाहीत बरे का! म्हणजे तुमची त्यांच्यावर पुरेशी श्रद्धा अाहे की नाही हे बापूच ठरवणार. आहे की नाही गंमत.

हे सारे प्रवचन युट्युबवर आहे बरे! बापूंना काही दिव्य शक्ती असल्या तरी त्यांना हे प्रवचन देताना मधूनमधून खोकला मात्र येतो बरे! मुळात डॉक्टर असल्यामुळे मध्येच अर्धे-एक वाक्य इंग्रजीतही बोलतात.

बलात्कार झालेल्या स्त्रीला आयुष्यभर त्याचे ओझे वहावे लागते अशा अर्थाचे तारे पण तोडलेले आहेत. कोठेही हे सांगणे नाही, की जे झाले त्यात त्या स्त्रीची काहीही चूक नाही, जे झाले ते विसरून पुढे पाहिले पाहिजे, आयुष्य फार सुंदर आहे, वगैरे.

बापूंचे हे असे बरळणे चालू असताना त्यातला फोलपणा समोरच्या प्रेक्षकांपैकी, माफ करा, भक्तांपैकी एकाही मुर्खाच्या लक्षात आला नाही. म्हणजे डोके वा मेंदू गहाण ठेवणे हे कुठल्या थराला जाऊ शकते ते पाहून अंगावर काटा येतो. तो जादुटोणा कायदा इतका अर्थहीन केला गेला की यांच्यासारखे लोक त्यात अडकू शकणारच नाहीत.

हे एक प्रवचन झाले. आणखीही आहेत. पहा, ऐका व धन्य व्हा.

आता सांगा अशा धार्मिक गुरूंची जागा तुरूंगात हवी की मनोरुग्णालयात? आणि त्यांच्यासमोर बसून हा मूर्खपणा शांतपणे ऐकून घेणा-यांचे काय करावे? आपण अशा ठिकाणी नसतो ना, हे पाहण्याची जबाबदारी शेवटी आपलीच की.

या धन्य प्रवचनाची आठवण येण्याचे कारण म्हणजे काही शाळांमध्ये प्रवचने नियमितपणे आयोजित केली जातात यासंबंधीची बातमी. तर अशा शाळांमधील मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल ते वेगळेच.

मागे मी चेन्नईतल्या कल्कीमहाराजाच्या नादी लागलेल्या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित कुटुंबाबद्दलही लिहिले होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिरूद्ध बापू म्हणे साईसत्च्चरित्र लिहीणार्‍या हेमाडपंतांच्या नातवाचे डॉक्टर!! मग साईबाबांचे प्रस्थ पाहून त्यांनी स्वतःला साई अवतार म्हणवून घेऊ लागले... मग या अवतारात एकट्याचेच मार्केटिंग होतेय म्हणून विष्णु अवतार मग जोडीला गृहलक्ष्मी आली... अजून एक पार्टनर मिळाला असणार मग... रामावतार!! मार्केटिंग मात्र जोरात! पेन्स, स्टिकर्स, लॉकेट्स, वह्या बक्कळ विकल्या गेल्या...

जुना धागा धम्माल होता... ज्या माताजींनी महती सांगणारा धागा काढलेला त्यांनी सरळ सरळ नीधप आणि इतर मंडळींना धमकी दिलेली बहुदा!!

बाकी भक्त मंडळींचे बालीश अनुभव, त्याहून बालीश व बाष्कळपणे त्यांच्या बाबा,बुवा,बापूंनी तोडलेले अकलेचे तारे यावर काहीच बोलायचं नाहीये!!

रच्याकने : अंबज्ञ म्हणून शोधलं तर गुगलकाका अंजीर दाखवतायत Happy

अंबज्ञ म्हणजे अंबेचा आज्ञाधारक ! हे सातार्‍याकडील आहे बहुतेक !

त्या जुन्या धाग्यावर निल नामक एक आयडी होता, त्याने तर स्वतःचे अनुभव दिलेले आहेत. आधी तो भक्त की कार्यकर्ता कायसेसे होता. मग त्याला कल्टचे एकेक गुण दिसल्यावर त्याचे डोळे उघडले, इ. इ.

अवांतर - अंबज्ञ म्हणून शोधलं तर गुगलकाका अंजीर दाखवतायत स्मित>> dreamgirl सगळेच गुगलबाबा म्हणतात तुझेच कसे काका? हीही बापुची लिला

बरोबर आहे.
बापुंना काय बी वाइट बोलाल तं तं
१. लोकलम्धे चढताना तुमच्या चपलेचा अंगठा तुटणार,
२.व्हॉट्स्पवर जोक वाचताना कॉल येणार.
३. इंटर्व्हु साठी कंसल्टंट चा कॉल आला की फोनची बॅटरी ढुस्स सम्जाच.
४. डोसा करताना पीठ पात्तळ किंवा डोसा तव्यावर टाकला की दरवाज्याची बेल वाजणार तुम्ही तिकडे दरवाजाकडे गेलात की इकडे डोस्याचा को..ळ..सा !
५. सिग्नलवर पोलीस पकडणार, नेमका तुमच्या गाडीचे पीयुसी संपलेले.
६. आणी इतर....वेळेअभावी सध्या इतकेच......

त्यांच्या मिसेस च्या साड्या आणि दागिने बघितले का? फोटोच्या poses? मला फेसबुक वर त्या बाईंची रिक्वेस्ट आली होती. मी नम्रपणे नाकारली.

मला फेसबुक वर त्या बाईंची रिक्वेस्ट आली होती. मी नम्रपणे नाकारली.>> >काय नम्रपणा दाखवलास वत्से?

अरे ४० वेळा माझे नाव घ्या बलात्कारी नपुंसक होईल या वक्तव्यासंदर्भाने जो धागा निघाला होता त्याची लिंक सापडतेय का?

मुकु त्यापेक्षा सगळेच गुगलबाबा म्हणतात ही बापुची लीला नव्हे का Proud

साई, राम, विष्णु आता अंबा.... सगळ्या कॅटेगरीतल्या भक्तांना कव्हर केलेय!! मार्केटिंग स्ट्रॅटेजी लय तगडी आहे!!

आपली वैयक्तिक ओळख नसलयाने फ्रेंडशिप देऊ शकत नाही अस मनातल्या मनात म्हटल आणि डिलीट केली डोळा मारा>> भावना देवी पर्यंत अगोदरच पोहोचल्या होत्या,:P

<<अरे ४० वेळा माझे नाव घ्या बलात्कारी नपुंसक होईल या वक्तव्यासंदर्भाने जो धागा निघाला होता त्याची लिंक सापडतेय का?>>
------ बाफ गायब करण्याची क्षमता पण बाळगुन आहेत... बापू बलात्कार झाल्या नन्तरचा इलाज सान्गतात पण तसा प्रसन्ग टाळण्यासाठी काही प्रतिबन्धात्मक उपाय त्यान्च्याकडे नाही का ?

<<साई, राम, विष्णु आता अंबा.... सगळ्या कॅटेगरीतल्या भक्तांना कव्हर केलेय!! मार्केटिंग स्ट्रॅटेजी लय तगडी आहे!!>>
------ चार दोन नावे काय.. सर्व ३३ कोटी देवान्चा अवतार म्हणजे आपले लाडके... प पु...

कसे काय लोक भजनी लागतात कुणास ठाऊक.. चांगले चांगले आपल्याला माहित असलेले लोक - शिकले सवरलेले सुध्दा.. अर्थात शिकलेले अन न शिकलेले सगळेच ब्रेन्वॉश होऊ शकतात म्हणा.. असो Sad

वत्सला तुला बापूंच्या बायकोने रिक्वेस्ट पाठवली होती? भारी आहे Happy पण तो धागा जबरी होता. कुणीतरी एक विचारे बाई होती ना त्या धाग्यावर? अटलांटाचीच होती. जाम भांडायची तिकडे.

बरं, कुणीतरी एकाखाली एक असे "बापुंचे समाजाला असलेले धोके" "चॉक आऊट" कराना.........
झालच तर धोका बापूंपासुन आहे की त्यांच्या भक्तांपासून की दोघांपासून ते ही लिह्वा........

म्हणजे काये ना, की हातासरशी या धोक्याच्या यादीवरुन त्या ह्यांना सांगुन बापुंविरुद्ध/भक्तांविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवायला बरी.... अन त्या ह्यांना पोलिसांनी विचारले की तक्रार कशावरुन, तर ते वर सांगितल्याप्रमाणे "चॉक आऊट" केलेल्या धोक्यांचा संदर्भ देऊ श्कतातच ... हो की नै?
तेव्हा लागा बरं कामाला बिगीबिगीने....

अंगावरच्या मळापासून बनवलेल्या हत्तीचं डोकं असलेल्या देवाच्या भक्तांना अनिरुद्ध बापूंच्या भक्तांवर निर्बुद्धपणाची टीका करायचा काहीही नैतिक अधिकार नाही.

>>अंगावरच्या मळापासून बनवलेल्या हत्तीचं डोकं असलेल्या देवाच्या भक्तांना अनिरुद्ध बापूंच्या भक्तांवर निर्बुद्धपणाची टीका करायचा काहीही नैतिक अधिकार नाही.<<
आमची ती श्रद्धा तुमची ती अंधश्रद्धा! Happy
असो पण चोराला चोर म्हणण्यासाठी आपण सावच असले पाहिजे असे काही नाही.

जुन्या मायबोलीवरची बापू रिलेटेड चर्चा वाचली. भयंकर मनोरंजन झाले. बापु फॅन क्लब टोळधाडीच्या सगळ्याच पोस्टस करमणूक करणार्‍या आहेत. त्यात 'बापूजकिड' या आयडीची तर फारच! पण त्याचबरोबर व्यक्तीपूजा कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकते हे बघून खेद वाटला. DEAREST BAPU, WE ALL YOUR KIDS LOVES YOU, DON’T WORRY WE ARE YOURS TILL OUR LAST BREATH. >> काय हे??? दुसर्‍या कोणाचं का व्हावं हे मुळात कळलं नाही. फार तर त्यांची काय बडबड असेल त्यात काय अध्यात्म, तत्वज्ञान दिसत असेल ते घ्या, पाळा पण WE ARE YOURS TILL OUR LAST BREATH???
एवढ्या कमकुवतपणाला उपचार म्हणजे मानसोपचार तज्ञच पण अर्थात ह्या सांगण्याचा काही उपयोग नाही आणि सांगणार्‍यालाच धमक्या!

रायगड, खरंय.
मला मागे जवळच्या कोणी तरी भरीस पाडून एका कल्ट्च्या क्लासला आग्रहाने पाठवले. मी फार पूर्वीपासून योगासनं, प्राणायाम वगैरे करते त्यामुळे मला काही खास वेगळं वाटलं नाही, किंवा मी इंप्रेस झाले नाही. क्लास मध्ये योगासनं, मेडीटेशन सोडून, एकमेकांचे हात हातात घेणे, डोळ्यात डोळे घालणे असे अचरट प्रकारही होते. मी तो क्लास पूर्ण केला नाही आणि न आवडल्याचं त्यांना नमूद केलं. त्यांनी मला इमानदारीत पैसे परत केले (good on their part कारण क्लास स्वस्त नव्हता). ह्यात इतर HR टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटीज बरोबर एक दिवस चर्चेमध्ये तुमच्या आयुष्यतला सर्वात आनंदाचा प्रसंग कुठला असं विचारलं तर लोकांची उत्तरं तोंडात बोट घालायल लावणारी होती. एकीने सांगितलं की The happiest moment of my life was when Guruji looked at me for the first time. Uhoh बाकीचीही बरीच उत्तरं गुरुजींच्याच भोवती फिरणारीच. गुरुजी कितीही चांगला असो/नसो, पण अशी डोकं बाजूला ठेवून सगळं गुरुजींना अर्पण केलेली भक्तमंडळी पाहिली की त्यांच्या बुद्धीची आधी शंका येते. बर ही सगळी भक्तमंडळी अ‍ॅटलांच्या नामवंत युनिव्हर्सीटीचे विद्यार्थी, आयटीमधली मंडळी आणि इतर उच्चशिक्षीत.
सायंटॉलॉजीमधूनही असह्य होऊन बाहेर पडलेल्यांना इतर भक्तमंडळींनी कसा त्रास दिला ह्याबद्दल एका सेलिब्रिटीने सांगितलेलं ऐकलं. ही आंधळी भक्तमंडळीच नंतर जास्त ड्यांजरस होते!

Pages