मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दुर्योधन आवडतो. त्याचे ते वेगळेच दागिने, ते निळाशार कलरचे उत्तरीय. फार मस्त आहे.
परवा अर्जुन चिडून बोलताना, टँट्रम्स थ्रो करतानाचं बाळ वाटत होता. मला हसूच यायला लागले नंतर.

पण वस्त्रहरणाच्या प्रसंगात चित्रण फार चांगले घ्तले आहे. म्हणजे अंधारून आल्यासारखे. काहीतरी अशुभ घडणार आहे हे कळत होते नुसती फ्रेम पाहून.

जुन्या महाभारतातही दुर्योधन (पुनीत इस्सार) आणि कृष्णच (नितीश भारद्वाज) भाव खाऊन गेले होते. नव्या महाभारताने परंपरा कायम राखली. या तसेच शकुनी आणि द्रोणांच्या कास्टिंगमध्येच ते जिंकले आहेत. Happy
काल कृष्ण द्रौपदीला समजावतो ते फार पटले. आपण स्वत:ला जोवर माफ करत नाही, दु:ख विसरत नाही तोवर काहीही चांगले आपण करू शकत नाही.

जुन्या महाभारतात कर्णपण चांगला होता. पंकज धीरने चांगलं काम केलं होतं. आताचा कर्णपण चांगला आहे.

यावेळेच्या युधिष्ठिरने चांगला अभिनय केलाय.

एक शंका-
महाभारताच्या युध्दात शेवटी अश्वत्थामा द्रौपदीच्या पाचही मुलांना झोपेत मारतो. आणि त्यासाठी त्याला शि़क्षाही होते.
पण सिरिअलमध्ये अजून द्रौपदीला मुले झालेली दाखवलीच नाहीयेत. तपशील दाखवत नाहीयेत म्हणावं तर सुभद्रा तर दाखवली आहे ना प्रेग्नंट....
द्रौपदीला मुले होतील कधी आणि युध्दभूमीमध्ये जाण्याएवढी मोठी कधी होतील?
आता वनवासात तर व्यासांनी घातलेल्या अटी पाळणे कठीण नाही का होणार?
मूळ महाभारतात काय आहे? इंद्राप्रस्थला असतानाच द्रौपदीला पाच मुले झाली होती का?

@ प्राची,या महाभारतात दुसर्यांदा द्यूत खेळताना दाखवले नाही.काही घटना या महाभारतात वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत. वेगळे वर्जन रेफर करत असावेत.जुन्या महाभारतात पाच पांडव आणि द्रौपदी पणाला लावण्याचा प्रसंग पण वेगळ्या पद्धतीने दाखवला आहे.तसे वस्त्रहरणाचा प्रयंत्न फसल्यानंतर द्रौपदी पाची पांडवाना व स्वताला दास्यत्वातून मुक्त करवून घेते (गांधारी तिला वर मागायला लावते). एवढे झाल्यावर परत एक डाव -वनवास/ अज्ञातवास यासाठी खेळला जातो असे दाखवले आहे. द्यूत नाही खेळले तर पांडव युद्ध करतील म्हणून शकुनी पण धृतराष्ट्राला द्यूताला परवानगी द्यायला लावतो असे दाखवले आहे. काही घटना वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत.बकासुरवध वगैरे घटनाना तर कात्री लावली आहे तर काही घटना जास्त विस्ताराने दाखवल्या आहेत.मात्र एवढे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला द्यायला हरकत नसावी.

या महाभारतात बरेचं बदल केले आहेत आनि ते जुन्या महभारतापेक्शा जास्त logical करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. द्युत प्रसंगात जुन्या महाभारतामध्ये धर्मराज वहावुन गेलेला दाखवला आहे जे की खरं वाटत नाही. या नवीन मध्ये शकुनीच्या शब्दात अडकुन तो खेळत राहतो. चुकचं वाटतं पण जुन्याच्या comparatively जरा जास्त logical वाटतं.
व्यासांनी अटी घातलेला एपिसोड मला का कुनास ठाउक मिळालाचं नाही. काय अटी सांगतात ते या महभारतात? एकुण संवादांवरुन तर पांडव आणि द्रोपदीमध्ये पती पत्नीचे संबंध नसल्यासारखे वाटत आहे.

द्रौपदीला मुले होतील कधी आणि युध्दभूमीमध्ये जाण्याएवढी मोठी कधी होतील?
त्याची काळजी नको.
त्या काळात कुणाला कशी मुले होतील याचा भरंवसा नव्हता. जसे आ़जकाल काँप्युटरमधे कधीहि कुठुनहि व्हायरस येतो तशी तिथे मुले होत!
मुळात पांडवांचे जन्म, कौरवांचे जन्म, पंडू, ध्रुतराष्ट्र विदूर यांचे जन्म कसे झाले?

आज विदुराबद्दल एक गोष्ट ऐकली.
जसे भीष्म, शिखंडिनी वगैरे लोकांना पूर्वीच्या जन्मांशी संबंध आहे तसे पूर्वीच्या बहुतेक व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या पूर्वजन्मीचा संबंध आहे.
त्यावरूनच दिसते तसे नसते अशी म्हण या काळात पडली असावी! त्या काळात तर ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या असे संस्कृतमधे म्हंटले एव्हढेच. अर्थ तोच.
परिणामहि तोच. जग फसते!

युध्दभूमीमध्ये जाण्याएवढी मोठी कधी होतील?>>>>>>>>> त्यांची मुले युध्दभुमीवर जाण्याएवढी मोठी नव्हतीच ..फार फार तर १७-१८ वर्षाची असतील.. कर्ण आणि अर्जुन दोघांची मुले लहानच होतीत..अभिमन्यु लहानच होता शिक्षण अर्धवटच झालेले.. अन्यथा त्याने "चक्रव्हयु" ज्ञान पुर्ण करुन घेतले असते ...

चार दिवसांच्या एपिसोड मध्ये बारा वर्षांचा वनवास का संपवला काही कळत नाही ...
मला वाटते अज्ञात वासाचा भाग खुप सविस्तर दाखवणार असावेत ...

शकुनीच्या प्रार्थनेमुळे वगैरे अजिबात पटलं नाही जरी ते त्याच्या पिताश्रीच्या अस्थींचे होते तरीही, काहीही दाखवलंय.>> फासे जरासंधाच्या अस्थींचे होते.

यावेळेच्या युधिष्ठिरने चांगला अभिनय केलाय.>> अगदीच रड्या वाटला मला तो. मला भीम सोडून कोणीच पात्र पटली नाहीत. जुन्या महाभारतातील पात्रनिवड काय परफेक्ट होती. हनुमान पाहीला यात? आणि स्टोरी पण वेगळी सांगितलेय यात. भीमाचे गर्वहरण करण्यासाठी हनुमान वृद्ध माकडाचे रूप घेऊन रस्त्यात शेपूट टाकून बसलेला असतो. भीमाला म्हणतो माझयात ताकद नाही, तूच माझी शेपटी उचलून बाजूला कर. त्याला जमत नाही. यात लाडू वगैरे घुसडलेय मसाला म्हणून.

मलाही काही कळले नाही, आता द्रौपदीची मुलं वगैरे कसं दाखवणार आहेत ? फारच गुंडाळत सुटलेत. या वेगाने २ आठवड्यत महाभारत संपेल Happy

अन्यथा त्याने "चक्रव्हयु" ज्ञान पुर्ण करुन घेतले असते .. >>

अभिमन्यू पोटात असताना (गर्भ) असताना सुभद्रा चर्कव्युव्हात कसे शिरायचे ते ऐकते. ते अभिमन्यूला ज्ञात होते, पण परत कसे यायचे हे तिने ऐकले नाही म्हणून त्यालाही कळत नाही. ते ज्ञान त्याला उपजत असते.

द्रोपदीला मुलं ही वनवासात जायच्या आधी झाली आहेत. त्यांची नावे श्रृतविंद्य, श्रृतसोम, श्रृतानिक, श्रृतकिर्ती, श्रृतकर्मा.

तिने ऐकले नाही म्हणून त्यालाही कळत नाही. ते ज्ञान त्याला उपजत असते.>>>> तेच म्हणालो मी अर्धवट ज्ञान पुर्ण नाहीका केले असते त्याने Happy

या महाभारतात जरा फिल्मीपणा करायला जातात व गोष्टी गंडवत आहेत. उदा: परत द्युत, द्रोपदीची थाळी, भीमाचे गर्वहरण. वनवासामधल्ल्या मुख्य गोष्टी दाखवल्यावर कशाला दळत बसायचे. बरेच आहे की पळवत आहेत ते. कास्टींग गंडलेलीच आहे. दुर्योधन, भीम, भीष्म, शकुनी, द्रोणाचार्य व काही प्रमाणात कृष्ण/कर्ण एवढेच चांगले आहेत. आता द्रोपदीहरण वगैरे असेल ना. नंतर युध्दात दळायला बराच स्कोप आहे. Happy

ड्रीमगर्ल धन्यवाद, मला त्या अस्थी शकुनीच्या पिताश्रींच्या वाटल्या.

वस्त्रहरणाच्या आधीच्या एपिसोडसमध्ये द्रौपदीची मुले दाखवायला काय हरकत होती. धन्यवाद केदार नावासकट माहिती दिल्याबद्दल.

कांदापोहे पटली तुमची पोस्ट.

द्रौपदीला इंद्रप्रस्थात असतानाच मुले झाली होती. जुन्या महाभारतात जेव्हा तिला धृतराष्ट्र वस्त्रहरणानंतर वर मागायला सांगतो, तेव्हा पहिला वर "माझ्या पुत्रांना कोणी दासपुत्र म्हणू नये" असा मागते.

वनवासात गंधर्व दुर्योधनाला हरवतात आणि मग अर्जुन जाऊन त्याला सोडवतो, जयद्रथ द्रौपदीचे हरण करु पाहतो या आणि अश्या अनेक कथा का वगळल्यात?

धृतराष्ट्र जेव्हा वरदान देत असतो तेव्हा पांचाली फक्त २ च वर घेते, त्याहून जास्त वर घेणे म्हणजे भीक घेण्यासारखे आहे असे धृतराष्ट्राला ठणकावून सांगते हा प्रसंग असायला हवा होता.

अर्जुनाला नपुंसक व्हायचा शाप मिळतो ती कथा तरी दाखवली आहे का?

जयद्रथ द्रौपदीचे हरण करु पाहतो >> काल रात्रीच झाला हा एपिसोड. आणि पांडव आता अज्ञातवासाला निघतील. Happy

युद्धावरुन आठवलं जुन्या महाभारतात युद्धाचे प्रसंग दाखवताना मेन हिरोंच्या पाठी लढणारे सैनिक असायचे ते नाचत वगैरे असायचे..पण आपण मुख्य पात्रांना बघण्यात गढुन गेले असल्याने ते लक्षात यायचं नाही...त्या वेळी मी ८ वर्षांची वगैरे असेन....पण गेल्या वर्षी कोणाकडे तरी सि डी वर जुनं महाभारत पाहिलं तेव्हा ते लक्षात आलं......

वस्त्रहरणाच्या आधीच्या एपिसोडसमध्ये द्रौपदीची मुले दाखवायला काय हरकत होती.
त्यांच्या बद्दल फारसे काही ऐकले नाही कधी. आता बकासूराला सुद्धा दाखवले नाही, त्याची गोष्ट तर जास्त प्रसिद्ध आहे.
सैनिक असायचे ते नाचत वगैरे असायचे.. आणि आय्टेम साँग्स पण म्हणायचे का? शिवाय नाचणारी बाई पण असे का?
कदाचित या वेळी ते पण दाखवतील - युद्ध करून थकून आल्यावर दुर्योधन, दु:शासन, शकुनी नाच बघत बसले आहेत, कोंबडी पळाली वगैरे गाण्यावर, त्यांचे चित्त विचलित करण्यासाठी कृष्णाची करणी! मग कर्ण येऊन त्यांना थांबवतो!
मात्र एवढे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला द्यायला हरकत नसावी.
Light 1

काल झी टिव्ही वर एनिमेटेड महाभारत चित्रपट पाहिला. त्यात बरेच वेगळे कथानक आहे.
अमिताभ भीष्म आहे. अनिल कपूर कर्ण. अजय देवगण अर्जून. सनी देओल भीम.

जुलै पर्यंत चालणार म्हणे!
धर्मयुद्ध तर १८ दिवसच चालले, मग दाखवणार तरी काय? की परिक्षित नि जनमेजयांच्या राज्यातल्या काही सुरस व चमत्कारिक गोष्टी दाखवणार?
मात्र एवढे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला द्यायला हरकत नसावी.

१२ वर्षांचा वनवास खूप लवकर संपवला. खरे तर गंधर्वराज चित्रसेनाची कथा तरी दाखवायला हवी होती. आपले वैभव पाहून पांडव आणि द्रौपदी मनातून जळावेत, त्यांना दुःख व्हावे म्हणून दुर्योधन, शकुनी,, कर्ण आणि बाकी कौरव तिथे लवाजमा घेवून जातात आणि तिथे असणार्या गंधर्वांशी त्यांचे युद्ध होते ज्यामध्ये गंधर्वसेना दुर्योधनाला बंदी बनवते, कर्णाला पण समरभूमीतून पळ काढावा लागतो. ही गोष्ट युधिष्टिराला समजताच तो भीम आणि अर्जुनाला आज्ञा देतो कि दुर्योधनाची सुटका करा (खरे तर कौरवांना अद्दल घडली म्हणून भीम जाम खुश झालेला असतो मात्र ज्येष्ठ भावाची आज्ञा मानून तो जातो). अर्जुन आणि भीम दुर्योधन आणि इतरांची सुटका करतात. आपापसात लढायचे तेव्हा लढू मात्र बाहेरच्यांशी लढताना आपण शंभर अधिक पाच एकत्र आहोत असे सांगून युधिष्टिर दुर्योधनाला हस्तिनापुरकडे जाण्यास सांगतो आणि दुर्योधन पण खजील होवून परततो.दुर्योधन आणि कर्णाची या प्रसंगमध्ये पार पिसे निघालेली असतात.हा प्रसंग दाखवायला हवा होता.

Pages