मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साकल्य,
तुमचे सर्व विचार आजकालच्या काळात योग्य आहेत.
पण त्या काळात एका वीराची शस्त्रे राज्यसभेत काढून घेणे म्हणजे त्यांचे वस्त्रहरण करणेच. म्हणून दुर्योधनाने द्रौपदीची वस्त्रे भर राज्यसभेत काढायचे ठरवले.
मी त्या विचारांचे त्या काळातहि समर्थन केले नसते, पण काय करणार, दुर्योधना एव्हढे सामर्थ्यवान कोण होते तेंव्हा. तो हि दुर्दैवाने नीच वृत्तीचा. गर्विष्ठ. त्याला शंकाच नव्हे खात्रीच असणार की पांडव बदला घेतील. पण गर्व! शकुनीची बुद्धि नि स्वतःचे शंभर भाउ, कर्ण, अश्वत्त्थामा यांचे सामर्थ्य याचा प्रचंड गर्व.

पांडवानी लगेच वेळ मिळताच ......... कौरवांना युद्धासाठी ललकारायला हवे होते.
ते शक्य नव्हते. एकदा सम्राटाचे दास झाल्यावर भीष्म, द्रोण यांना दुर्योधनाच्या बाजूने लढावे लागले असते. पांडव सामर्थ्यवान असले तरी दुर्योधनाइतके गर्विष्ठ नव्हते, विचारी होते. वेळ अजून आली नाही असा त्यांचा, चूक बरोबर कसाहि असला तरी, अंदाज होता. वेळ जरी खूप खूप उशीरा आली तरी त्या वेळात ते स्वस्थ बसले नव्हते, सामर्थ्य, पाठिंबा गोळा केला.

बाकी, धर्माची धर्मनिष्ठा मला तरी अतिरेकीच वाटते. विशेषतः शकुनि जणू सहजपणे त्याचे भीष्माचे मुद्दे खोडून काढून शकत होता त्यामुळे.
मागे एका प्रसंगी कृष्ण भीष्माला सुद्धा सुनावतो की धर्मात बदल करायला पाहिजेत. पण कुणि ऐकतच नाहीत. मग अगदी युद्धाच्या सुरुवातीच्या आधीच अर्जुनाने हातपाय गाळल्यावर त्याला सगळा धर्म परत सगळ्यांना सांगावा लागला.

आता आज आपल्याला धर्म काय आहे ते नीटसे कळत नाही. नि धर्मावर बर्‍याच लोकांचा विश्वासच नाही. नि त्या काळी केवळ वासनेला सर्वात जास्त महत्व देताना शकुनीने धर्माचा, राजकारणाचा, पुढील परिणामांचा एक राजा या नात्याने विचार केला होता का?

महाभारतातच नाही तर इतरत्रहि असले सगळे वाचले की लोक म्हणतात धर्म ही अफू आहे. मी तसे समजत नाही, पण ते का म्हणतात ते मला समजते.

सध्या द्रौपदीचे काम आवडतेय मला. विशेषतः कालच्या भागात जेव्हा ती सर्वांना प्रश्न करते तेव्हा.
धृतराष्ट्र जरा विचित्र वाटत आहे मात्र.त्याचे कॅरॅक्टर कन्सिस्टन्ट नाही वाटत.कधी पापभीरु, हेल्पलेस दाखवतात थोडाफार, तर कधी अगदीच ठार वाईट.

शस्त्रे काढून घेणे हा वीरांचा अपमान समजला जात असेल मात्र शास्त्र काढून घेण्याचे प्रकार त्या काळात होत असावेत असे मानायला वाव आहे. मात्र एखाद्या स्त्रीचे भरसभेत वस्त्रहरण? निलाजरेपणाची हद्द आहे,विकृती आहे ही..रामायण, महाभारतात इतरत्र असा प्रकार कुठे वाचनात आला नाही. भीष्मादी महारथी आणि विचारी लोक असताना हा प्रकार घडणे खरोखर दुर्दैव आहे.भीष्म, द्रोण तर महाभारत युद्धात पण कौरवकडूनच लढले होते.तेव्हा ते विरोधात लढणार हे उघडच होते.युधिष्टीराचे अतिरेकी 'धर्माचे वहन करणे' अजिबात पटत नाही.
दुर्योधन पांडवाविरुद्ध लाक्षागृह, द्यूत खेळून दास बनवणे ई. प्रकार करतो ते राजकारण म्हणून एकवेळ ठीक आहे मात्र बायकांना यात मध्ये इतक्या खालच्या पातळीवर ओढणे अजिबात पटत नाही.द्रौपदीचा अपमान करायचा होता तर तिला दुर्योधनाने आपल्या बायकोची दासी बनवून काही दिवस सेवा करायला लावायची होती मात्र असे वस्त्रहरण वगैरे कुणाही वीर म्हणवनार्याला शोभत नाही.

मलाही द्रौपदीचे काम आवडत आहे. तिचा गेट अपही छान दाखावला आहे या पूर्ण प्रसंगात. तिचा त्रास तिच्या चेहर्‍यावरुनचं समजत आहे. अर्‍जुन (कसे लिहायचे?) मात्र चिडला की,कॉमेडी वाटतो.
एक कळत नाही. द्रौपदीच्या रक्शणाचे वचन विसरणे हा अधर्म नव्हे का? ती लग्नातल्या त्या वचनाचे स्मरणही करुन देते पण पांडव जागचे हालत नाहीत.
हा अधर्म का चालतो मग त्यांना?

द्रौपदी वस्त्रहरणाची वेळ येणं हा खरंच कलंक आहे, आणि ह्या पाच पांडवांबरोबर ती वनवासाला गेली, एकाची तरी लायकी होती का तिचा पती म्हणवून घ्यायची, तिच्यावर ही वेळ आली असतांना नुसते हतबल होते सर्व.

दोन दिवस द्रौपदीने काम छान केलं, तिच्या अभिनयाला पूर्ण वाव होता आणि तिने ते सर्व उत्तमप्रकारे निभावलं.

युधिष्टीर पूर्णतः या खेळाच्या आहारी गेला होता. त्याला धर्म-अधर्म, चांगले वाईट काहीही दिसत नव्हते. सत्ता संपत्ती हरण्यापर्यंत समजू शकतो, परंतु आपल्या भावांना आणि पत्नीला एक वस्तू म्हणून ध्युताच्या डावाला बांधणारा हा अति जुगारी असण्याचेच लक्षण दिसते.

गेला आठवडा शकूनीने गाजवला आणि हा द्रौपदीने खाऊन टाकला. पुढचा कदाचित कृष्‍णाच्या वाट्याला असेल... पण दोघांचे काम एकदम जबरी. खासकरून ते ओढून आणण्याचे दृश्य तर खरेखुरे वाटावे इतपत चांगले. पण, दुःशासन अजिबात नाही आवडला. त्याला अॅक्टिंगमधला ओ की ठो कळत नाही, असे वाटते. फक्त शरीरानेच वाढलाय आडदांड...
महाभारतातील अर्जूनाची निवड साफ चुकलीये... त्याला संवादच म्हणता येत नाहीत... नुसता दिसायला चांगला असून काय उपयोग? त्यामुळे तो ज्या फ्रेममध्ये असतो, त्यातील दुसरेच पात्र भाव खावून जाते... युधिष्ठिराची घालमेलही मस्त व्यक्त केलीये त्या कलाकाराने...
पुढच्या भागाची वाट पहायला लावणारी मालिका कितीतरी दिवसांनी बघतोय...

काल विकर्णने केलेला विरोध आवडला त्याला अजून काही कौरवांनी साथ दिली असती तर वस्त्रहरण टळले असते.

वस्त्रहरण हा कौरवांचा लोएस्ट पॉईंट होता यात काही वादच नाही . माणूस वाहवत गेला की जे काही होत याच ते उत्तम उदाहरण आहे . किंबहुना माझ्या मते हाच एक असा मुद्दा आहे की जिथे कुठल्याही तर्काने कौरवांच समर्थन करता येणारच नाही .

द्रौपदीचा अपमान करायचा होता तर तिला दुर्योधनाने आपल्या बायकोची दासी बनवून काही दिवस सेवा करायला लावायची होती >> एवढ समजत असत तर तो दुर्योधन कसला ?

पण द्रौपदीला दासी बनवल जाताना तिच्या "हे माझ्याबरोबरच का" या प्रश्नाच उत्तर तितकस अवघड नाहीये .
आंधळ्याचे पुत्र आंधळे , सूतपुत्राला वरणार नाही वगैरे वक्तव्य करताना त्याचा परिणाम काय होईल याचा विचारही करायला हवा होताच .
कौरवांच वैर पांडवांशी होते , त्याला स्वतःवर ओढवून घेतल स्वतः द्रौपदीनेच .

द्रौपदीने खालच्या पातळीला जाऊन टीका करणे हे मलापण अजिबात आवडले नाही पण वस्त्रहरण हे अतिशय खालच्या पातळीची गोष्ट झाली.

द्रौपदी वस्त्रहरणाचे एपिसोडमध्ये द्रौपदी, शकुनी, दुर्योधन आणि युधिष्ठिर, द्रोणांचे काम फार आवडले. पण पुन्हा एकदा असा प्रश्न पडलाच की पाच नवर्‍यांपैकी एकालाही आपल्या पत्नीची विटंबना थांबवता येऊ नये? भावाची आज्ञा इतकी शिरसावंद्य? काय झाले असते जर तेव्हाच भीमाने, अर्जुनाने शस्त्र उगारले असते? शेवटी महाभारत घडलेच - संपूर्ण कुरुवंशाचा सत्यानाश झाला. त्यापेक्षा भर सभेत दुर्योधनाचा, दु:शासनाचा बळी घेतला असता तर द्रौपदी जिवंतपणी मेली नसती. पण मग द्रुपदाने तिच्या जन्माच्या वेळी मागितलेले वरदान सत्य कसे होणार? जगातली सर्व अपवित्रता, विटंबना, दु:ख तिच्या वाट्याला येऊ दे तरी ती सर्वात पवित्र ठरु दे!
रामायण काय अन महाभारत काय स्त्रियांवर अनन्वित अन्याय होऊन पुढे परिणाम काय झाले हे ही आपल्याला ठाऊक आहे तरीही आज कित्येक स्त्रिया या द्रौपदी, सीतेची मरणं जगतायत. व्यर्थ वाटते सगळेच.

रामायण काय अन महाभारत......... व्यर्थ वाटते सगळेच.
अगदी खरे.
खरे तर ज्या तत्वज्ञानाच्या आधारावर धर्म (ते तत्वज्ञान रोजच्या जीवनात कसे आचरायचे याचे नियम) ज्यांनी केले त्यांनी सखोल विचारच केला नाही, काहीतरी नियम केले, रामाच्या वेळी सीतेचे झाले ते माहित असूनहि कुणि धर्माचा पुनः अभ्यास करून काही धर्मात सुधारणा करणे याची अक्कल नव्हती का?
खरे तर अजूनहि कुणाला नाही. उगीचच कसल्यातरी भाकड गोष्टींना धर्म मानून काहीहि करायचे. नि जे कुणि असला फालतूपणा मानत नाहीत त्यांच्या नावाने बोंब मारायची की धर्म बुडवला!
युधिष्टीर पूर्णतः या खेळाच्या आहारी गेला होता. त्याला धर्म-अधर्म, चांगले वाईट काहीही दिसत नव्हते.

दारूच्या व्यसनासारखे! तसेच परिणाम!

आंधळ्याचे पुत्र आंधळे , सूतपुत्राला वरणार नाही वगैरे वक्तव्य करताना त्याचा परिणाम काय होईल याचा विचारही करायला हवा होताच .

अगदी बरोबरच आहे. द्रौपदीने ते वक्तव्य करुन धृतराष्ट्र आणि दुर्योधन या दोघांचाही अपमान केलेला होता. द्रौपदीचे नवरे आणि तिची सासू आंधळ्या धृतराष्ट्राच्या घरातच आश्रितासारखे राहिले होते. याचाही तिला विसर पडला.

सगळ्यात हास्यास्पद म्हणजे हे सगळे महाभारत घडुन जेव्हा पांडव सुटतात तेव्हा परत दुर्योधन्/शकुनी धृतराष्ट्राला गळ घालुन पांडवांना द्युत खेळायला लावतात व पांडव ते मान्य करतात. यावेळी नियाम बदलले जातात व १२ वर्ष वनवास व १ वर्ष अज्ञातवास आहे. हा खुपच मोठा विनोद आहे. साधाराण ही वनवासाची वर्षे बघता सर्व पांडवांनी वयाच्या ५०-६०त युध्द केले.

डावाला बांधणारा हा अति जुगारी असण्याचेच लक्षण दिसते.
महाभारतात एव्हढा धर्माचा बोलबाला करतात, तरी एकेकाचे अतिरेकी वागणे काही सुटत नाही.
आता मीच एक नवीन धर्म काढतो - मला अगदी पक्के कळले आहे मनुष्याला महत्वाचे काय, कसे वागावे ते. फक्त स्वतः मला ६५ वर्षे उषीर झाला आहे. असो. माझा धर्म मला लखलाभ, मी दिवसेंदिवस अधिकाधिक आनंदाचा अनुभव करतो.

आज कित्येक महिन्यंनी सहज एक एपिसोड बघण्यात आला. वस्त्रहरणानंतरचा सीन चालू होता. आणि कृष्णाने पुन्हा एकदा जिंकले त्यात. नारीच्या सन्मान वर काय एकेक अप्रतिम डायलॉग त्याच्या तोंडी दिले होते. लिहिणार्‍याला सलाम आणि त्यानेही तितक्याच ताकदीने ते म्हटले.

अवांतर - तो दुर्योधन विराट कोहली सारखा दिसतो का?

दुर्योधन आहेच दिसायला मस्त. थोडा वाटतो तो कोहली.

पांडवांनी आज शाप देताना विकर्णला का नाही वगळले, त्याने तर विरोध केला होताना वस्त्रहरणाचा.

हो बरोबर आहे, विराट कोहली बरोबर साम्य आहे खरे!
आणि ते सभेतल्या सगळ्यांचे कपडे दागिने उडून द्रौपदीच्या पायाशी पडतात ही क्रिएटिव्हज ची नवीन अ‍ॅडिशन वाटतं. असं काही वाचलं नव्हतं कुठे! बरं वाटलं पण बघायला Happy
वस्त्रहरण भागानंतर कुंती आणि गांधारी पळत येतात ते बघून हिंदी सिनेमातल्या सगळे गुन्हे आटोपल्यावर येणार्‍या पोलिसांची आठवण झाली Happy
त्या नंतरच्या सीन मधे द्रौपदी झी हॉरर शोमधे अंगात प्रेतात्मा आल्यासारखी का बोलत होती! Happy

मैत्रेयी, द्रौपदीचा आवाजच बदलला होता त्यात. बहुतेक डबिंग असेल. पुर्वी एका भागात तर द्रौपदी ३दा आवाज बदलुन बोलली.

त्या नंतरच्या सीन मधे द्रौपदी झी हॉरर शोमधे अंगात प्रेतात्मा आल्यासारखी का बोलत होती!>>
सहमत मला तर मोन्जोलिकाची (विद्या बालन : भुल भुलैया) आठवण झाली तो सिन पाहुन,

कित्ती क्युट आहे दुर्योधन, मला आवडतो.
पण त्याचे महाभारतातले, विशेषतः नुकतेच चालू असलेले काम पाहिल्यावर लगेच एखाद्या हिंदी सिनेमात, कुठल्यातरी मुलीमागे, मागे शंभर एक लोक घेऊन, भलभलते कपडे घालून वेडेवा़कडे अंगविक्षेप करत, प्रेमाची दर्दभरी केविलवाणी गाणी म्हणत चालला आहे असा सीन डोळ्यासमोर येऊ शकेल का?

Pages