मालिका परीक्षण: स्टार प्लसवरचे महाभारत !! ( दर्जा: * * * * )

Submitted by निमिष_सोनार on 9 November, 2013 - 03:10

मालिकेचे नाव : महाभारत
निर्माते : स्वस्तिक पिक्चर्स
वाहिनी : स्टार प्लस (भाषा : हिंदी ) वेळ : सोम शुक्र रात्री 8:30 pm
वाहिनी : स्टार प्रवाह (भाषा : मराठी - डब) वेळ : सोम शुक्र संध्या ६:30 pm
मालिकेचा दर्जा : उत्तम ( * * * * )
संगीत दर्जा : उत्तम ( * * * * )

पुनर्प्रसारणाबद्दल :

सोमवार ते शुक्रवार रात्री 8:30 pm आणि पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:00 am. तसेच शनिवारी आठवड्याभराचे एपिसोड संक्षिप्त स्वरूपात सकाळी 8 to 9 am या वेळेत आणि शनिवारी संध्याकाळी 5 to 7:30 pm संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात. रविवारी सुद्धा सकाळी संपूर्ण आठवड्याभराचे एपिसोडस असतात.

प्रस्तावना :

स्टार प्लस वर १६ सप्टेंबर २०१३ पासून महाभारत सुरू झाले आहे. ते छान आहे. नक्कीच!
जेव्हा विदुर दृतराष्ट्रा ऐवजी पांडूला राज्याभिषेक करावा असे सांगतो त्या एपिसोड पासून मी बघायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे मला हे महाभारत सुरू झाले याबद्दल कल्पना नव्हती, पण जेव्हा चॅनेल बदलता बदलता एक एपिसोड पाहिला तेव्हा त्याचा दर्जा पाहून लगेचच लक्षात आले की होय, हे महाभारत नक्कीच लोकप्रिय होणार आणि ते लोकप्रिय होत आहे हे नंतर विविध बातम्यांतून कळत गेले.

परीक्षण :

बऱ्याच काळानंतर एक सरस आणि दमदार सादरीकरण असलेले महाभारत आले आहे आणि त्यानंतरचे एपिसोड बघितल्यावर हा समज अधिक दृढ होत गेला. आपण बघत नसाल तर बघायला सुरुवात करा असे मी सांगेन. आधी महाभारता बद्दल माहिती असेल आणि नसेल तरीही हे बघताना मजा येईल. ज्ञान वाढेल. बोध मिळेल. दृष्टिकोन बदलेल.

मी लहान असताना दूरदर्शनवर 1988-90 साली बी. आर. चोप्रांचे महाभारत लागत होते. पण त्यातले संदर्भ वयानुसार कळत नव्हते.
त्यात "समय" आपल्याला कथा सांगताना दिसायचा (म्हणजे ऐकू यायचा). त्यात त्या काळाच्या मानाने स्पेशल इफेक्ट्स चांगले होते, निदान रामानंद सागर च्या रामायणाच्या तुलनेत ते इफेक्ट्स उच्च दर्जाचे होते.

त्यानंतर एकता कपूर ने 9X वाहिनीवर "कहानी हमारे महाभारत की" ही सिरियल सुरू केली होती पण त्याची भट्टी काही जमून आली नाही. टीकेमुळे ते बंद पडले. ते बरेच झाले.

आता चे हे स्वस्तिक प्रकाशनाचे स्टार प्लस वरचे महाभारत अधिक अभ्यास आणि मेहनत करून बनवले आहे, हे नक्की बघताना जाणवते! अबाल वृद्धांना आवडेल असेच ते बनवले गेले आहे आणि या महाभारतातले स्पेशल इफेक्ट्स लाजवाब आहेत. आपण एखादा चित्रपट बघतो आहे असेच वाटत राहते.

त्यातले वेळोवेळी पात्रांच्या तोंडी येणारे सुविचार, अधून मधून कृष्ण येऊन घडलेल्या प्रसंगावर भाष्य करतो ही कल्पना छान आहे. दर वेळेस तो म्हणतो, "स्वयं विचार किजिये" आणि खरेच त्याचे ते भाष्य आपल्याला विचार करण्यासारखे असते आणि आपल्याला जाणवते की आपल्याच भारतातल्या प्राचीन ग्रंथांमध्ये ऐतिहासिक व्यक्तींनी असे अनेक प्रकारचे तत्त्वज्ञान लिहून ठेवले आहे की त्यात आजच्या खासगी आणि व्यावसायिक, कोर्पोरेट जीवनातल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते. (महाभारत, चाणक्य, रामायण, शिवाजी, पेशवे, महाराणा प्रताप वगैरे)

अगदी सोप्यात सोप्या शब्दांत कृष्ण हे तत्त्वज्ञान सांगतो ते अगदी वाखाणण्याजोगे !!!

महाभारताच्या कथेबद्दल दोन तीन वेगवेगळी मते नक्कीच असतील. त्या अनुषंगाने निरीक्षणा अंती मला असे जाणवले आहे की रोज "कल देखिये" मध्ये जे प्रसंग दाखवतात ते थोडे बदलवून दुसऱ्या दिवशी मात्र वेगळेच दाखवतात. मला वाटते अगदी सूक्ष्म अभ्यास करून अगदी भव्य दिव्य प्रमाणात सढळ हाताने खर्च करून हे बनवलेले दिसते. म्हणून त्यांनी एकच प्रसंग वेगवेगळ्या प्रकारे चित्रित केलेला दिसतो पण वेळे अभावी त्यांना ते सगळेच दाखवता येत नसावे. म्हणून ते "कल देखिये"मध्ये थोडे वेगळे दाखवतात.

सेट्स उत्तम आहेत. इस्माइल दरबार आणि अजय अतुल यांचे संगीत सुद्धा अप्रतिम आहे. त्यामुळे हे महाभारत अक्षरशः जिवंत बनले आहे.

कालपर्यंत गोष्ट इथवर आली आहे:

भीमावर दुर्योधन आणि शकुनी यांनी मिळून खिरीतून विषप्रयोग करतात आणि मेल्यानंतर त्याला नदीत फेकून देतात. त्यानंतर वासुकी कडून विष नष्ट होवून भीमाला शंभर हत्तींचे बळ मिळते आणि स्वतःच्या तेराव्याला भीम हस्तिनापुरात परतून भीष्म, पांडव आणि कुंती यांना आश्चर्याचा सुखद धक्का आणि दुर्योधन शकुनी यांना आश्चर्याचा दुःखद धक्का देतो. त्यानंतर भीष्म कठोर पावले उचलून सर्व कौरव आणि पांडव यांना शिक्षणासाठी द्रोणाचार्यांकडे पाठवायचे ठरवतात आणि शकुनीला गांधार राज्यात हाकलून देण्याची तयारी करतात.

मराठीतून :
स्टार प्रवाह वर सुद्धा मराठीत डब करून हेच महाभारत सुरू झाले आहे. ते संध्याकाळी साडेसहा ला प्रसारित होते. पण त्याचे पुनर्प्रसारण नसते. त्याची कथा बरीच मागे आहे.

अधिक माहितीसाठी खालील दुवे बघा
http://en.wikipedia.org/wiki/Mahabharat_(2013_TV_series)
https://www.facebook.com/OfficialMahabharat

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्जुनाने पण जिंकला की द्रौपदीने तरातरा येऊन अर्जुनाला हार घातला अन दॅट्स इट, लगेच लांबूनच बापाला म्हणाली आग्या दिजिये, अन चालूच पडली तिथून!!>>>>>>>>>> हो हो. मी पण म्हणले कसली घाई लागलीये एवढी.

ती द्रौपदी यज्ञातून आल्यापासूनच लग्नाळलेली आहे. बघावं तेव्हा स्वयंवर, लग्न आणि अर्जुनाचं चित्र बघतेय. दुसरं काय केलंय?

बाकी, अर्जुनाचं नुस्तं चित्र पाहिलेलं असताना या बयेने तो आल्यावर "देखो वो आ गया" टाईप एक्स्प्रेशन दिले होते आणि त्याच्यासोबत लहानाचे मोठे झलेले दुर्योधन दु:शासन मात्र त्यांना ओळखत नाहीत हा अजून एक बॉलीवूडी फंडा.

" हस्तिनापूरके राजपरिवारने आर्यावर्तके राजकुमारीयोंका भस्म करनेका पण ले रख्खा है क्या"

शाब्बास द्रौपदी. अगदी माझ्या मनातले बोललीस!!

निमिषजी धन्यवाद!
बकासुरवध हा प्रसंग बहुदा द्रौपदी स्वयंवराआधी येत असावा. बकासुराला अजून मारलेले कसे दाखवले नाही हे मला पण समजले नाही. बहुतेक पुढे flashback दाखवणार असतील.

कसला बोरिंग प्रकार सुरु आहे! Uhoh त्या काळात एका पत्नीचे अनेक पती हे आकाश कोसळण्याइतके अधर्मी नव्हते ना?!! . इथे त्या विषयावर किती काथ्याकूट आणि द्रौपदीला ह्युमिलिएट करणे सुरु आहे!

हो, आठवडाभर तेच दळण चालू आहे. वास्तविक तेव्हा पण भीष्म असाच आरडत ओरडत सुटला होता का? सगळा मेलोड्रामा चालू आहे.

दुर्योधनाचा पार बॉलीवूड व्हिलन करून दाखवला आहे. "राज्याभिषेक" झाला म्हणजेच सर्व संपलं का? राजकीय डावपेच, आखणी, फितुरी वगैरे काहीसुद्धा नाही!!! अगदीच बोरींग प्रकार.

साकल्य,
बकासुरवध हा प्रसंग बहुदा द्रौपदी स्वयंवराआधी येत असावा.>>
बकासूरवध हा पांडव अज्ञातवासात असताना आहे. भीम एका गावात आचारी (बल्लव) बनून राहत असतो. त्यावेळी तो गावकऱ्यांना बकासूराच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी स्वतःच जेवण घेऊन जातो, असे मला वाटते.

त्या कर्णाने छान काम केले, इतका तो शकुनीमामा आणि दुर्योधन आरडाओरडा करत असताना, मस्त संयमी दाखवलाय त्यामुळे सर्व लक्ष ह्या लोकांपेक्षा त्याच्याकडेच होते माझे.

ए हो. द्रौपदी स्वयंवरापासूनच किती ताणाताणी चालली आहे. बोअर होतंय.

बकासूर वध गाळलाच. तेव्हापासूनच काय ती स्वयंवराची घाई झाली होती! उलट ग्राफिक्स वापरून मस्त भाग झाला असता बकासूर वधाचा. महाभारताचे स्वतःचे आधुनिक इन्टरप्रिटेशन करण्याच्या नादात खूपच स्वातंत्र्य घेत आहेत Sad

आधुनिक कसलं डोंबल? भीष्म सगळ्यात वृद्ध असून काल काय लहान पोरासरखा वागत होता. वैताग आला.

आणि हे पाच जण नवरीला घेऊन घरी येइपर्यंत यांच्या आज्यांना आणी चुलत्यांना पाचही जणांनी लग्न केलेलं माहितच नाही? राजे आहेत की जेम्स बॉन्ड? गुप्तहेर काय मासे पकडायला गेले होते का?

आणि आल्याआल्या धडाघडा सांगता येत नाही... की ब्वा आमच्या आयशीला न बघताच "वाटून घ्या पोरांनो" असं म्हटल्यामुळे आम्ही पांचाली शब्दाचा फारच शब्दशः अर्थ घेतला. (ती कुंती कधी पोरांना वैतागून "कस्ली कार्टी आहेर्त, उलथत पण नाहीत एकदाची मसनात जाऊन" वगैरे ओरडली नव्हती का? आणि ओरडली तर पोरांनी तेव्हा पण "माते का आदेश" समजून योग्य ती कार्यवाही केली असती का?")

आल्याआल्या धडाघडा सांगता येत नाही... >> या क्वालिटीमुळेच टीव्हीवर अनेक चॅनल्सवरचे अनेको सिरियल्सचे दळण निर्विघ्नपणे चालू आहे! Proud

मला वाटते ख्रिश्चन लोकांनी हे महाभारत पाहिले असावे. महाभारतात जसे भीष्म म्हणेल तो कायदा तसे इथे पोप म्हणेल तो कायदा.

पुढे जॉर्ज वाशिंग्टन, जेफर्सन, मॅडीसन हे दुर्योधन प्रवृत्तीचे लोक आल्यावर त्यांनी अमेरिकेच्या घटनेत लिहीले की पैले धर्म नि सरकार वेगळे वेगळे करा. म्हणजे उगाच एका माणसाने सांगितले ते खरे असे नको. त्यापेक्षा जो जास्त पैसे देईल तो म्हणेल ते खरे! कारण नग्गद पैसा खरा! बाकीचे म्हणजे उगीचच कुणाचे तरी मत!

हे जर पांडवांच्या काळी त्यांना समजले असते, तर त्यांना एव्हढा त्रास सहन करावा लागला नसता. कारण त्यांचे शौर्य अगाध, सगळीकडचे पैसे त्यांनी लुटून आणले असते!
मग एकपत्निव्रत, एकपतिव्रत असले काहीतरी जुनाट नियम मोडून एकदम फ्री फॉर ऑल, लै धम्माल करा लेको! फक्त पैका आणा!!

मला ब्वॉ आता काही कळतच नाही.... दहा-बारा किंवा त्याहुनही कितीतरी जास्त बायका प्लस इतर अंगवस्त्रे ठेवली तरी यांचे धर्म बुडत नाही पण एका बाईने ऑफिशियली काय ते देव, ब्राम्हण, आई-बाप यांच्यासमोर पाच पुरुषांना नवरा मानले तर इतके काय मोठे पाप घडले कि मोठा हाहाकार माजला. द्रोपदी तर उठसुट सुर्याला साकडे घालत असते मी जर पवित्र असेन तर तु असे कर.. तु तसे कर.

त्याकाळी एका स्त्रीने एकाहुन जास्त पुरुषांना पती मानुन विवाहित होणे हे एवढे धर्म बुडल्याची हाकाटी पेटविण्याइतका मोठा इश्यु नव्हता. कदाचित खुप रेअर प्रकार असेल. बहुतेक सिरियलवाले द्रोपदी वस्त्रहरणाची पार्श्वभुमी बनवत आहेत कि दुर्योधन व पार्टी तिला कुरु खानदानकी बहु झाल्यापासुनच पाच भावांशी केलेल्या लग्नाचा इश्यु करुन तिला व तिच्या नवरयांना धर्मभ्रष्ट दाखवत आहेत.

यावरुन डिस्कव्हरीवर बघितलेला एक एपिसोड आठवला. त्यामध्ये अजुनही भारतातील उत्तरेकडील काही भागात पांडव-द्रोपदी परंपरेवरुन एक स्त्री एकाहुन अधिक असलेल्या सख्ख्या भावांबरोबर लग्न करते. त्यात डोक्यावरुन पदर घेतलेली स्त्री, तिच्याहुन कितीतरी मोठे व कितीतरी लहानदेखील असे तिचे नवरे यांचे चित्रीकरण होते.

खान्डव प्रस्थ चे इन्द्रप्रस्थ कसे झाले हे आता नीट समजले.
"महाभारत" सिरीयल बनविण्यास हातभार लावणार्या सर्वांना प्रणिपात !!
खरेच अगदी छान रंगतदार एपिसोड बनत चालले आहे.
अगदी सखोल अभ्यास केलेला दिसतोय.
जंगलातला तक्षक म्हणाला की मी अर्जुनाची शेवटची पिढी नष्ट करेन.
म्हणून तो परीक्षित राजाला (अभिमन्यूच्या मुलाला) चावतो हे आता कळले.
पण मग जनमेजय चे पुढे काय होते?

बीचवर शिखंडीनी अंबेने तर सरळ सरळ भीष्माला धामाकावूनच टाकले काही दिवसांपूर्वी !!!
"हस्तिनापुर च्या सिंहासन साठी तू अखेरपर्यंत धावत राहाशील भी SSS ष्म !!!"

मी मस्त रात्री उशिरा यु ट्यूबवर बघते. स्लो असेल तर पुढे जाता येतं. मागच्या आठवड्यात एका भागात युधिष्ठिरला खूप डायलॉग होते त्या दिवशी त्याने काम छान केले.

मस्त चालू आहे महाभारत .
फक्त तो अर्जुन आला की मागे म्युझिक लागतं ना, गांडीवधारी अर्जुन काहीतरी... ते लागले की असं वाटते अर्जुन धनुष्य फेकून डान्स करायला लागणार आता.. Proud
द्रौपदी नाही आवडते मला.. फारच अर्जुनाच्या प्रेमात वाट्ते.. Happy

त्या अर्जुनाचे नशीब काही चांगलं नाही द्रौपदी आणि सुभद्रा दोघी माठ आणि सो सो आहेत आता उलूपी आणि चित्रांगदा तरी चांगल्या दाखवा.

चित्रांगदाचा रोल चित्रांगदानेच केला पाहीजे. Happy

उलूपी कोण आता? मला नाही आठवते.

पण मग जनमेजय चे पुढे काय होते?
तो नागांचा सूड घ्यायला सर्पयज्ञ करतो.
तसे अंबेने भीष्माचा सूड घेणे हे देवांना बरोबर वाटले नाही.पण जनमेजय पांडवांचा वंशज असल्याने त्याला सर्व माफ.

तर तो यद्न करतो नि त्यात तक्षकाची आहुति द्यायचा प्रयत्न करतो. पण तक्षकाला इंद्राचे रक्षण असते. तर जनमेजयाचे पावरबाज गुरु म्हणतात इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा!! प्रसिद्ध वा़क्य आहे.
म्हणजे इंद्रालाहि द्या टाकून आगीत!
इंद्राचे एकेक चाळे आठवता त्याला आधीच टा़कायला पाहिजे आगीत. पण तो आधुनिक काळातील नेहेरूंच्या वंशजांप्रमाणे काही केले तरी पंतप्रधान!
पुढे काय होते माहित नाही.

Pages