'वेगळेपण' सामावताना... - श्रीमती चित्रा पालेकर

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतात कलम ३७७अंतर्गत 'अनैसर्गिक' लैंगिक संबंध बेकायदेशीर आहेत. भारतीय कायद्यानुसार समलिंगी संबंध ठेवणंही अर्थातच बेकायदेशीर आहे. इंग्रजांनी एकोणिसाव्या शतकात लिहिलेला, दोन सज्ञान व्यक्तींच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करणारा, त्यांना गुन्हेगार ठरवणारा हा कायदा भारतात पाळला जातो.

काही वर्षांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं हा कायदा घटनाविरोधी ठरवला. या निकालाविरुद्ध अनेक धार्मिक संघटना सर्वोच्च न्यायालयात गेल्या. दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल भारतात सर्वत्र लागू व्हावा, म्हणून काही सामाजिक संघटना आणि समलिंगी मुलामुलींचे एकोणीस पालकही न्यायालयात गेले. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल रद्द केला.

उच्च व सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार्‍या पालकांपैकी एक होत्या श्रीमती चित्रा पालेकर. चित्रा व अमोल पालेकर यांची मुलगी शाल्मली समलिंगी आहे. ऑस्ट्रेलियात एका विद्यापीठात ती प्राध्यापक आहे. गेली अनेक वर्षं चित्राताई भारतात समलैंगिकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ नये, त्यांना समान हक्क मिळावेत, यासाठी लढा देत आहेत.

२०१२ साली 'माहेर'च्या दिवाळी अंकात चित्राताईंनी समलैंगिकतेबद्दल एक लेख लिहिला होता. हा लेख प्रकाशित झाल्यावर अनेकांचे फोन, ईमेल आले. आपला मुलगा / मुलगी समलिंगी असल्याची शंका असणारे पालक, आपला मुलगा / मुलगी समलिंगी आहे, हे माहीत असणारे पालक हा लेख वाचून पुढे आले. भारतात अजूनही या विषयाबद्दल किती अज्ञान, भीती, संकोच आहे, हे या निमित्तानं लक्षात आलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या प्रतिक्रियांमधूनही हे जाणवलं. समान हक्क नाकारणार्‍या या कायद्याच्या बाजूनं किती मोठा समुदाय उभा आहे, हे समोर आलं. म्हणूनच चित्राताईंनी लिहिलेला लेख इथे (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही बदलांसह) पुन्हा प्रकाशित करत आहे.

CP and Shal.jpg

`माझा मुलगा जर समलिंगी असेल, तर समलैंगिकतेला वाईट समजणार्‍या पारंपरिक रूढ कल्पनाच साफ चुकीच्या, असं मी ठामपणे मानतो.'

एका ख्रिस्ती बिशपचे हे उद्गार. मुलानं स्वतःची लैंगिकता उघड केल्यावर त्याची निर्भर्त्सना करण्याऐवजी, त्याला नाकारण्याऐवजी, मुलावर विश्‍वास ठेवून त्याला पूर्ण पाठिंबा देताना काढलेले! दोन वर्षांपूर्वी ’स्ट्रेट पेरेंट्स्, गे चिल्ड्रन : कीपिंग फॅमिलीज टुगेदर’ असं लांबलचक शीर्षक असलेलं पुस्तक वाचताना ते शब्द माझ्या नजरेस पडले. एका धर्मप्रचारकानं त्याच्या धार्मिक नीतिनियमांची तमा न बाळगता अशी भूमिका उघडपणे घ्यावी, याचं खूप बरं वाटलं. त्याचबरोबर, वीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीनं ती लेस्बियन आहे, असं मला सांगितल्यावर मला काय वाटलं होतं, ते पुन्हा एकवार आठवलं.

त्या काळी समलैंगिकतेबद्दल मला फारशी माहिती नव्हती (आता साठीत असलेल्या माझ्या पिढीला स्त्री-पुरुष संबंधांबद्दलसुद्धा उघड बोलायला संकोच वाटे, तिथे समलैंगिकतेचं काय घ्या?). ही गोष्ट कधीच स्वप्नातदेखील न आल्यामुळे, मुलीनं तसं म्हटल्यावर मी चकित होणं साहजिक होतं, पण मी अजिबात हादरून वगैरे गेले नाही. वर उल्लेख केलेल्या बिशपप्रमाणेच मला वाटलं, की जर माझी मुलगी लेस्बियन असेल, तर ती गोष्ट वाईट असणं शक्यच नाही. लेक म्हणाली, ''तू काळजी करू नकोस. लैंगिकता ही गोष्ट सोडून बाकी सर्व बाबतींत मी अगदी तीच आहे... माझ्या जन्मापासून आत्ता, काही क्षणांपर्यंत मी जी होते, जिला तू जाणत होतीस तीच... तुझी शाल्मली". वास्तविक तिनं हे बोलून दाखवायची गरज नव्हती. तिच्या वागण्याबोलण्यात कुठलाच फरक नाही, हे मला स्पष्ट दिसत होतं. मी केवळ हलकंसं स्मित करून होकारार्थी मान हलवली. शाल्मली बरीच रिलॅक्स झाली.

''अम्मा, समलिंगी असणं हा आजार नाही, बरं का! हे व्यंग किंवा विकृतीदेखील नाही", लेक समजावत होती. "समलैंगिकतेला अनैसर्गिक मानणं तर साफ चुकीचं आहे. तू लहान असताना डाव्या हाताचा वापर वाईट मानला जाई, नाही का? बिचार्‍या डावर्‍या मुलींना पूर्वी फटके मारून उजव्या हातानं लिहा-जेवायला भाग पाडत, हे तूच मला सांगितलं होतंस, पण आज डाव्या हाताला मान्यता मिळाली आहे. त्याचा वापर अनैसर्गिक, असं कुणी म्हणत नाही. अशा लोकांचं प्रमाण कमी असतं. समाजातल्या बहुतेक लोकांहून ते वेगळे असतात, पण त्यांच्या कृती नैसर्गिकच मानल्या जातात. समलिंगी असणं हे एका परीनं डावरं असण्यासारखंच आहे.''

''समाजात बहुतांश लोकांची लैंगिकता स्त्री-पुरुष संबंधाशी निगडित असते. त्यांच्या तुलनेत समलिंगी लोकांची संख्या कमी; पण ते बहुतेकांपेक्षा वेगळे आहेत म्हणून समाजानं त्यांच्यावर अनैसर्गिक असा शिक्का मारणं योग्य आहे का? खरंतर लैंगिकता केवळ बायोलॉजिकल फॅक्ट आहे. डोळ्यांच्या रंगांप्रमाणे. सर्व माणसांचे डोळे जसे एकाच प्रकारचे असत नाहीत - काळे, निळे, राखाडी असे वेगवेगळ्या रंगांचे असतात, त्याचप्रमाणे लैंगिकतादेखील केवळ एकाच प्रकारची - स्त्री-पुरुषसंबंधी नसते. समलैंगिकता हे ऐतिहासिक वास्तव तर आहेच. त्याशिवाय आता समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, तसंच जीवशास्त्रीय संशोधनांतून या विषयावर अधिकाधिक प्रकाश पडत चाललाय आणि अशा सगळ्या अभ्यासांतून जो निष्कर्ष निर्विवादपणे निघालाय, तो हाच, की गे किंवा लेस्बियन (होमोसेक्शुअल) असणं हे स्ट्रेट (हेटेरोसेक्शुअल) असण्याइतकंच नैसर्गिक आहे.''

वीस वर्षांची माझी लेक तर्कशुद्ध विचार अतिशय सुसंगतपणे मांडत होती. वास्तविक मी व तिचे वडील अनेकदा तिच्याबरोबर वेगवेगळ्या विषयांवर वाद घालत असू, चर्चा करत असू, पण आज केवळ तात्त्विक चर्चा होत नव्हती. तिच्या-माझ्यातला हा संवाद अतिशय नाजूक होता... आम्हां दोघींचं नातं, जवळीक पारखणारा, आणि म्हणूनच अतिशय महत्त्वाचा होता. शाल्मली पोटतिडिकीनं बोलत होती, पण मधूनच अम्माला हे पटतंय का, अशी शंका तिच्या चेहर्‍यावर उमटून जात होती... कधी निराशेचा सूर डोकावत होता. मी तिला कुशीत घेऊन म्हटलं, ''तू मुळीच काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी सांगण्यापूर्वी तू जी माझ्यासाठी होतीस, तीच अजूनही आहेस... माझी लाडकी लेक. बस्स...'' आणि मग एकमेकींना मिठी मारून आम्ही खूप हसलो आणि थोडंसं रडलोसुद्धा. आपल्या वडलांना, जवळच्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना तिनं सांगितल्यावर सगळ्यांनी तिचा सहजपणे स्वीकार केला. माझ्यासारखंच सर्वांना वाटलं, तिचं-आपलं जे प्रेमाचं, आपुलकीचं नातं आहे, त्यात तिच्या लेस्बियन असण्यानं काय फरक पडतो? तो तिचा खासगी प्रश्‍न आहे! तिला आपल्या पुढच्या आयुष्यात सोबती म्हणून स्त्री हवी आहे, पुरुष नाही, इतकंच. सर्व जवळच्या, प्रिय लोकांनी स्वीकार केल्यामुळे माझ्या लेकीचं मानसिक बळ खूप वाढलं, यात शंका नाही. आज ती परदेशात एका महत्त्वाच्या विश्‍वविद्यालयात प्राध्यापक आहे. स्वतःच्या विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला मान्यता मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर तिचं खासगी जीवनदेखील अतिशय सुखी, समृद्ध आहे. याचं श्रेय तिच्या आत्मविश्‍वासाला आणि कर्तृत्वाला जातं, तिच्या सहचरणीच्या प्रेमाला जातं, तसंच तिच्या जवळच्या सर्व माणसांच्या पाठिंब्यालाही जातं, अशी माझी खात्री आहे.

''आपण लेस्बियन आहोत हे जाणवल्यावर तू लगेच मला का नाही सांगितलंस? मध्ये इतका काळ का जाऊ दिलास?'' मी लेकीला विचारलं. बालपणापासून कुठलीही गोष्ट तिनं माझ्यापासून लपवली नव्हती, पण या बाबतीत ती चार-पाच वर्षं गप्प राहिली, हे मला थोडंसं खटकलं होतं. ''मी तेव्हा चौदा-पंधरा वर्षांची असेन. एव्हाना माझ्या मित्रांना मुलींबद्दल आणि मैत्रिणींना मुलांबद्दल 'गुलुगुलु' वाटायला सुरुवात झाली होती. सगळे मला त्यांची गुपितं सांगत. आवडणार्‍या मुलीशी किंवा मुलाशी ओळख करून द्यायची विनंती करत! मी सगळ्यांची दोस्त! त्या वेळी माझ्या लक्षात आलं, की मला स्वतःला मुलांबद्दल निर्भेळ मैत्रीपलीकडे काही वाटत नाही... मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. त्या वयात वेगळेपणाची भीती वाटते, तशी मलाही वाटली. मी लेस्बियन तर नसेन, अशी शंका मनात डोकावल्यावर तर फारच. अर्थात, हे सगळे शब्द तेव्हा माझ्या परिचयाचे नव्हते. माझ्या मनाचा गोंधळ उडाला. कुणाशी तरी बोलणं आवश्यक होतं, पण आजूबाजूच्या माणसांत कुणीही समलिंगी नव्हतं, किंवा कुणी असल्याचं मला माहीत नव्हतं. मी कुणाचा सल्ला घेणार?'' 'म्हणूनतर माझ्याकडे यायचंस ना...' असं मी म्हणणार, इतक्यात शाल्मली पुढे म्हणाली, ''तुझं व बाबांचं या विषयी नेमकं काय मत आहे, मला ठाऊक नव्हतं. आपल्या घरी अनेक कलात्मक, राजकीय, सामाजिक, साहित्यिक विषयांवर चर्चा चालत, पण समलैंगिकतेचा कधी कुणी उच्चारही केला नाही. तुम्ही केवळ या विषयाकडे दुर्लक्ष करत होतात, की त्याच्या विरोधात होता, हे मला कसं कळणार? मी तुम्हांला सांगितलं, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हांला माझा राग येईल का... शरम वाटेल का... तुम्ही माझ्यापासून दूर जाल का... माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम कराल का? नाहीनाही त्या शंकाकुशंका मला सतावत होत्या. तुमच्यापाशी यायला मी धजावत नव्हते. याशिवाय अनेकदा अनेक ठिकाणी गे किंवा लेस्बियन माणसांबद्दल गलिच्छ कुजबूज, विनोद माझ्या कानी येत होते. अतिशय वाईट शब्दांत, अश्‍लील पद्धतीनं त्यांचा उल्लेख होताना मी ऐकलं होतं. क्लबमध्ये वा शाळेत नाजूक दिसणार्‍या मुलांना इतर मुलं किती वाईट वागवत, हे मी पाहिलं होतं. साहजिकच मी लेस्बियन आहे असं कळलं, तर माझ्याशी सगळे असंच वागतील, अशी भीती माझ्या मनात घर करून होती. हे सगळे धोके पत्करण्यापेक्षा गप्प राहणंच शहाणपणाचं होतं, नाही का?'' मी सुन्न होऊन तिचे अनुभव ऐकत होते.

काही क्षण गप्प राहून शाल्मली हसली आणि म्हणाली, ''पण गंमत म्हणजे जसजशी मी मोठी झाले, तसतसं माझ्या लक्षात आलं, की 'आपल्यात काही कमी आहे, तिरस्कार वाटण्यासारखं आहे, आपलं मन गलिच्छ आहे' असलं काही मला अजिबात वाटत नाहीये. मी मित्रमैत्रिणींपेक्षा 'वेगळी' असेन पण माझ्यात कमतरता मुळीच नाही. उलट अभ्यास, खेळ, गाणं सगळ्यांत मी पुढेच आहे. हळूहळू या विषयावरचे अभ्यासपूर्ण निबंध, लेख वाचायला मी सुरुवात केली. त्यावर विचार करायला लागले. माझा आत्मविश्‍वास बळकट झाला आणि वाटलं, अम्मा-बाबाला सांगायला का घाबरावं? शेवटी तुम्हीच तर मला सत्याची चाड धरायला शिकवलं होतं. निर्भय होण्याचे धडे दिले होते. शिवाय लेस्बियन असण्यानं मी कुणाचंही वाकडं करत नव्हते, कुणालाही इजा करत नव्हते! हो ना?''

उत्तरादाखल मी तिला पुन्हा मिठीत घेतलं. माझ्यापाशी शब्द नव्हते. आईच्या नात्यानं मी तिच्या सर्वांगीण वाढीची सदैव काळजी घेतली होती. प्रत्येक बाबतीत तिला प्रोत्साहन दिलं होतं, पण जेव्हा तिच्या किशोरवयात तिला समलैंगिकतेची, स्वतःच्या 'वेगळेपणा'ची जाणीव झाली आणि ती गोंधळून गेली, तेव्हा तिला माझ्या मायेची, आधाराची खरी गरज होती आणि नेमकी तेव्हाच, मुलीची हेटेरोसेक्शुअ‍ॅलिटी गृहीत धरण्याची चूक केल्यामुळे मी कमी पडले होते!

समलैंगिकता मुलीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा घटक आहे, हे कळल्यावर त्या बाबतीत सर्व काही व्यवस्थित जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटली. मी तिला प्रश्‍न विचारायला, शंका बोलून दाखवायला सुरुवात केली आणि तीदेखील मनमोकळेपणानं, कसलाही संकोच न करता समजावून देऊ लागली. लेख, पुस्तकं वाचायला देऊ लागली. पुढे बर्‍याच समलिंगी स्त्री-पुरुषांशी माझी ओळख झाली, अनुभवांची देवाणघेवाण सुरू झाली. या सर्व प्रयत्नांतून, पूर्वी धूसर असलेलं समलैंगिकतेचं विश्‍व हळूहळू माझ्यापुढे साकार होऊ लागलं. समाजात त्यांच्याबद्दल ज्या समजुती प्रचलित आहेत, त्यांत वास्तव किती, दंतकथा किंवा फोल कल्पना किती, हे स्पष्ट व्हायला लागलं.

***

माझी या जगाशी ओळख झाली त्या वेळी म्हणजे १९९०च्या दशकात, समलैंगिकतेबद्दल भारतात सर्वसाधारणपणे प्रतिकूल वातावरण होतं. शतकानुशतकं ज्यांच्यावर अन्याय झाला, ज्यांचा आवाज दडपला गेला, हक्क हिरावले गेले अशा दलित, स्त्रिया, आदिवासी इत्यादी घटकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी स्वतंत्र भारताच्या चाळीस वर्षांत संघटना उभ्या राहिल्या होत्या, चळवळी सुरू झाल्या होत्या. सामाजिक कार्यकर्त्यांच्या जोडीनं खुल्या विचारांचे बुद्धिजीवी, कलाकार, पत्रकार यांत भाग घेत होते. सरकारवर दबाव आणत होते. अल्पसंख्याकांच्या प्रश्‍नांबद्दलही त्या सर्वांना सहानुभूती वाटत होती. आणीबाणीनंतर घटनेत नमूद केलेल्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी व प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत हक्कांविषयी समाजात अधिक जागरूकता होती; पण समलैंगिक मात्र अल्पसंख्य, अन्यायाचे बळी असून, त्यांचे मूलभूत हक्क हिरावले गेले असूनदेखील उपेक्षित व अंधारात राहिले. एकदा स्त्रीमुक्ती चळवळीशी संबंधित एका प्रसिद्ध कार्यकर्त्रीला ''तुम्ही स्त्रियांच्या प्रश्‍नांबरोबर लेस्बियन्सचे प्रश्‍नही हाती घेता का?'' असं मी विचारलं. यावर त्या बाई म्हणाल्या, ''छे! तो तर वरच्या वर्गातल्या बायकांचा प्रश्‍न आहे. आम्ही ज्या बायकांबरोबर काम करतो, त्यांचा नाही.'' ही त्यांची समजूत साफ चुकीची होती, हे अर्थात मला पुढे कळून चुकलं. (आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत काम करणार्‍या अनेक कार्यकर्त्या एलजीबीटी चळवळींत सक्रीय सहभाग घेतात.) वास्तविक समलैंगिकता दुनियेतल्या सर्व वंशांत, खंडांत, आर्थिक घटकांत, सामाजिक स्तरांत, जाती-जमातींत, तसंच धर्मांत सापडते. पाश्‍चात्त्य-पौर्वात्य, श्रीमंत-गरीब, शहरी-ग्रामीण अशा सगळ्या समाजात अस्तित्वात आहे. अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत.

समलैंगिकता मूळ भारतीय नाही, तर ती पाश्‍चात्त्य संस्कृतीतून आपल्याकडे आली, असं आपले संस्कृतिरक्षक सांगतात; पण तेही खरं नाही. प्राचीन भारतीय संस्कृतीत समलैंगिकता प्रचलित असल्याचे पुरावे पुरातन शिल्पांमध्ये व ग्रंथांमध्ये संशोधकांना सापडले आहेत. उलट ज्या नीतिमत्तेच्या कल्पनेतून समलिंगी लोकांवर हल्ला चढवला जातो, ती बुरसटलेली नीतिमत्ता राणी व्हिक्टोरियाच्या काळात आपल्यावर लादली गेली, तेव्हा खरंतर ही नीतिमत्ताच पाश्‍चात्त्य आहे!

समलैंगिकांबद्दलच्या चुकीच्या कल्पनांची यादी लांबलचक. अशी माणसं ठरावीक (बायकी?!) क्षेत्रांत वावरतात, ही अशीच एक गैरसमजूत! वास्तविक, समलिंगी माणसं कुठल्याही क्षेत्रात सापडतील. ती डॉक्टर, इंजिनीअर, वैज्ञानिक, राजकीय पुढारी, अर्थतज्ज्ञ, बँकर, पत्रकार, खेळाडू असे कुणीही असू शकतात. पोलिस, सैन्य वगैरे 'पुरुषी' क्षेत्रांतदेखील ही माणसं आढळतात. कला, फॅशन, जाहिरात यांत वावरणारे अनेकदा ओळखू येतात. प्रस्थापित क्षेत्रांत, करीअरवर घाला येऊ नये म्हणून बहुतेक जण समलैंगिकता लपवतात. देशातला समलैंगिकतेबद्दलचा कायदा, समाजातली सहिष्णुता यांवर या लोकांचं 'प्रकाशात येणं' बरंच अवलंबून असतं.

इतिहासात अनेक प्रसिद्ध समलिंगी व्यक्ती होऊन गेल्या. उदा. 'मोनालिसा' या प्रख्यात चित्राचा जनक लिओनार्दो दा विंची. चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र, विज्ञान अशा सर्व तर्‍हेच्या विषयांतलं त्याचं श्रेष्ठत्व आज सहाशे वर्षांनंतरदेखील अबाधित आहे; पण त्याच्या काळात (पंधराव्या शतकात) इटलीतल्या कायद्याप्रमाणे, समलिंगी असल्याच्या आरोपावरून त्याला त्रास देण्यात आला, धार्मिक चित्र रंगवण्यास मनाई करून त्याचा अपमान करण्यात आला. एकोणिसाव्या शतकात ऑस्कर वाइल्ड या थोर आयरिश लेखक-नाटककाराला तो समलिंगी असल्याचं उघडकीला आल्यावर व्हिक्टोरियन कायद्यानुसार तुरुंगवास भोगावा लागला; पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा मार्टिना नवरातिलोवा या प्रसिद्ध टेनिसपटूनं आपण लेस्बियन असल्याचं जाहीर केलं, तेव्हा अनेकांच्या भुवया जरी वर गेल्या, तरी तिला क्रीडाजगतात (आणि त्याबाहेरही) मानाची वागणूकच मिळाली. आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच व्हिक्टोरिया राणीचा वंशज प्रिन्स विलियम याच्या लग्नसोहळ्यात एल्टन जॉन हा प्रसिद्ध समलिंगी गायक व्हीआयपी पाहुणा म्हणून आमंत्रित केला गेला!

आपल्या देशात 'इंडियन पीनल कोड कलम ३७७' खाली समलैंगिकता हा गुन्हा आहे. 'लैंगिक क्रियेचा एकमेव हेतू 'गर्भधारणा व त्यातून प्रजोत्पत्ती' हाच असायला हवा आणि म्हणून, केवळ सुख-समाधान देणारी लैंगिकता पाप आहे', असं मानणार्‍या सनातन धार्मिक विचारांतून, तसंच व्हिक्टोरियन काळातल्या संकुचित नीतिमत्तेतून या कलम ३७७चा उगम झाला. कायद्याच्या पाठिंब्यामुळे बुरसटलेल्या विचारांना पुष्टी मिळाली. समाजानं समलैंगिकांना वाळीत टाकलं. धर्म आणि समाज यांच्या दडपणाखाली कुटुंबीय आपल्या समलिंगी मुलांना नाकारायला लागले, लैंगिकता उघड झाल्यास नोकरी मिळणं मुश्किल, समाजात अवहेलना, वर कुटुंबाचा आधारही नाही! एखादा पुरुष 'गे' असल्याची नुसती शंका जरी आली तरी इतर पुरुषांकडून मारहाण, छळ, बलात्कार होण्याची शक्यता असे. असे समलिंगी पुरुष पोलिसांच्या अत्याचाराचेही वारंवार बळी होत, पण कायदाच प्रतिकूल असल्यावर दाद कुणाकडे मागणार?

लेस्बियन बायकांची कमीजास्त फरकानं अशीच स्थिती होती, पण यांना कुटुंबीयांचीच जास्त भीती होती. आपल्या पुरुषप्रधान समाजात मुलींची किंमत कमीच. मुलींच्या नियमबाह्य वागण्यामुळे कुटुंबाच्या प्रतिष्ठेला किंचित जरी धक्का बसला, तरी मुलीला कठोर शिक्षा करायला (प्रसंगी तिची हत्या करायला) घरचे पुरुष मागेपुढे पाहायचे नाहीत. स्ट्रेट मुलींची ही गत, तर लेस्बियन मुलींना वाली कुठून असायचा? अशा अनेक कारणांमुळे समलैंगिकतेभोवती अंधार पसरला; त्यांच्याविषयी सच्ची, वस्तुनिष्ठ माहिती मिळणं मुश्किल झालं आणि परिणामी चुकीच्या कल्पना, गैरसमजुती वाढत गेल्या. हे दुष्टचक्र चालत राहिलं आणि त्यातून समलिंगी मुलं आईबापांच्या प्रेमाला मुकली, स्वाभिमानास पारखी झाली, खरं रूप लपवावं लागल्यामुळे अस्मिता गमावून बसली, दुहेरी जीवन जगू लागली. अनेकदा त्यांच्यावर लग्नाची सक्ती झाल्यामुळे, त्यांचं स्वतःचं, तसंच त्यांच्या वधू/वराचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

२००९ साली दिल्ली उच्च न्यायालयानं ३७७ या कलमात बदल करून सम व अन्य लैंगिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकलं. न्यायालयाचा निकाल होता- 'दोन प्रौढ समलिंगी व्यक्तींचा परस्पर संमतीनं खासगीत केलेला संग गुन्हा नाही.' कायद्यातल्या या अतिशय महत्त्वाच्या बदलामुळे देशातल्या एलजीबीटी (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्ससेक्शुअल) लोकांत चैतन्याची लाट पसरली, त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. यांच्या विरोधात सनातन विचारांचे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले, तेव्हा समलैंगिकांना सहानुभूती दर्शवणारे लोक वेगवेगळ्या शहरांतून, निरनिराळ्या क्षेत्रांतून खूप मोठ्या संख्येत पुढे आले. त्यात वकील, प्राध्यापक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ अशांचा समावेश होता. अनेक तज्ज्ञांनी ऐतिहासिक, वैद्यकीय दाखले देऊन समलैंगिकतेच्या बाजूनं शपथपत्रं न्यायालयात सादर केली. एक महत्त्वाचं शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलं ते एकोणीस आईबापांनी- ज्यांत मीही होते- आपल्या मुलांवर आजपर्यंत (म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयानं कलम ३७७मध्ये बदल करण्यापूर्वीपर्यंत) कसा अन्याय झाला,त्यांना मानसिक, प्रसंगी शारीरिक छळ समाजात कसा सहन करावा लागला, आई-बाप या नात्यानं आमची कशी घुसमट झाली अशा अनेक गोष्टी त्यात मांडल्या होत्या. त्याचबरोबर लैंगिकता ही आमच्या मुलांची खासगी बाब आहे. त्यामुळे आमच्या मुलांत काहीही कमी आहे, असं आम्हाला वाटत नाही. ते सगळ्या बाबतींत आदर्श नागरिक आहेत. त्यामुळे त्यांना गुन्हेगार मानणं अन्याय्य आहे. आमच्या मुलांना त्यांचे घटनांतर्गत हक्क मिळायला हवेत आणि त्यासाठी कलम ३७७मधला बदल अत्यावश्यक आहे, हे आम्ही ठामपणे शपथपत्रात लिहिलं.

आमच्या या कृतीचा खूप मोठा परिणाम झाला. आई-बापांनी विरोधकांना न भिता उघडपणे मुलांची बाजू घ्यावी, त्यांच्या व आपल्या भावना व्यक्त कराव्यात, हक्कासाठी झगडावं, याचं अनेकांना आश्‍चर्य वाटलं, कौतुक वाटलं. तशातून टीव्ही, वर्तमानपत्रं, मासिकं यांनी आजवर दुर्लक्षित असलेल्या (किंवा केवळ अश्‍लीलतेच्या संदर्भात उल्लेख झालेल्या!) समलैंगिकतेची बाजू उचलून धरली. आई-बापांच्या, मुलांच्या मुलाखती, मान्यवर तज्ज्ञांबरोबर चर्चा, लेख, इत्यादींमधून या लोकांची वस्तुस्थिती, त्यांचे अनुभव, या विश्‍वाबद्दलची शास्त्रोक्त माहिती समाजातल्या इतर लोकांपर्यंत पोचू लागली. समाजातल्या सहानुभूतीचा ओघ काही अंशी वाढला.

आता दरवर्षी निरनिराळ्या शहरांत एलजीबीटी लोकांचे, त्यांच्याबद्दल सहानुभूती असणार्‍यांसह मेळावे भरतात, सार्वजनिक जागेत कार्यक्रम होतात, मिरवणुका निघतात. आई या नात्यानं मी अशा बर्‍याच गोष्टींत भाग घेतला आहे. भोवती जमलेल्या बघ्यांच्या चेहर्‍यावर नवल असतं, कुतूहल असतं; पण तिरस्कार मात्र मी आजकाल कधी पाहिलेला नाही. दगडफेक, अश्‍लील शेरे असलंही काही अनुभवलेलं नाही. तेव्हा एकूण वातावरण बर्‍याच अंशी निवळलंय. निदान मोठ्या शहरांत तरी होमोफोबिया कमी झालाय, यात शंका नाही; पण उत्साहाच्या भरात हे विसरून चालणार नाही, की गुन्हेगारीचा ठप्पा पुसला जाणं ही निव्वळ पहिली पायरी आहे. एलजीबीटींना त्यापुढेही खूप मजल मारायची आहे. नागरिक या नात्यानं लागू होणारे भारतीय संविधानातले सगळे हक्क मिळवायचे आहेत. नोकरी, आईवडलांची मालमत्ता, आर्थिक मदत अथवा सरकारी कर्ज इत्यादी बाबतींत समलैंगिकतेवरून भेदभाव (डिस्क्रिमिनेशन) होऊ नये, यासाठी जागरूक राहायचं आहे. समलिंगी जोडीदाराला साहचर्याचे हक्क मिळावेत, समलिंगी जोडप्याला 'कुटुंब' मानलं जावं, या जोडप्यांना मुलं दत्तक घेता यावीत, अशा अनेक गोष्टींत कायदेशीर तरतुदी करून घ्यायच्या आहेत. निव्वळ मोठ्या शहरांतच नाही, तर छोट्याछोट्या गावांतही समलैंगिकांना स्वीकारलं जावं, यासाठी झटायचं आहे. परंतु या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपापल्या आईवडलांची, भावाबहिणींची, जवळच्या इतर कुटुंबीयांची मानसिकता पालटून, त्यांचा मनापासूनचा पाठिंबा मिळवायचा आहे.

आज समलैंगिकतेविषयीचं संशोधन खूप पुढे जात आहे. समलिंगी असणं म्हणजे पाप आहे, अनैसर्गिक आहे इत्यादी कल्पना चुकीच्या असून, त्या निव्वळ अज्ञानातून उद्भवल्या आहेत, असं मत तज्ज्ञांनी पूर्वीच व्यक्त केलं होतं (आणि माझ्या मुलीनं ते वीस वर्षांपूर्वी मला सांगितलंही होतं). त्याच्यापुढे जाऊन हल्ली वैद्यकीय संशोधनातून हेही सिद्ध झालं आहे, की 'सम अथवा विषम लैंगिकता जन्मतःच निश्‍चित होते.' जन्मतः निश्‍चित झालेली, नैसर्गिक समलैंगिकता ही 'बायोलॉजिकल फॅक्ट' असेल, तर 'आईवडलांना पसंत नाही, समाजाला पटत नाही' असल्या कारणांवरून ते बदलणं कसं शक्य आहे? अशा मुलांवर दडपण आणून, त्यांना साधूंच्या पायांवर घालून, अंगारे लावून, किंवा एखाद्या पैसेखाऊ डॉक्टरकरवी शॉक ट्रीटमेंट देवऊन त्यांची समलैंगिकता नाहीशी होईल, असं मानणंदेखील साफ चुकीचं आहे. खरी लैंगिकता लपवून, खोटं जीवन जगायला भाग पाडल्यास मुलं दुःखी होतात, तणावाखाली जगतात, कधी आत्महत्या करतात. अनेकदा तर आपल्या दबल्या लैंगिकतेला कसा ना कसा वाव देण्याच्या प्रयत्नांत रोगांची अथवा नीच लोकांची शिकार बनतात.

याउलट, आज उपलब्ध असलेल्या आधुनिक शास्त्रीय ज्ञानाचा/माहितीचा आधार घेऊन आईबापांनी जुन्या, चुकीच्या कल्पनांना तिलांजली दिली, तर त्यांना कौटुंबिक/सामाजिक विरोधाची काळजी करण्याचं कारण उरणार नाही. आपल्या समलैंगिक मुलांना तोडून, त्यांचं जीवन नष्ट करण्याऐवजी आईबाप त्यांचा मनापासून स्वीकार करू शकतील. आपल्या इतर मुलांसारखंच प्रेम व आधार त्यांना देऊ लागतील. अशा स्वीकृतीमुळे मुलंही आनंदानं जगतील, कर्तृत्ववान होऊ शकतील. समलैंगिकांना आईबापांचा पाठिंबा लाभल्यास, समाजाच्या मुख्य धारेत सामावलं जाणं त्यांच्यासाठी मुळीच अशक्य नाही, अशी माझी खात्री आहे.

***

समलैंगिक मुला-मुलींच्या पालकांना, किंवा समलिंगी मुलामुलींना काही शंका असतील, किंवा संवाद साधायचा असेल तर श्रीमती चित्रा पालेकर यांच्याशी parents@queer-ink.com या इ-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल. तुमचा पत्रव्यवहार, तुमची ओळख यांबाबतीत संपूर्ण गोपनीयता पाळली जाईल.

***
विषय: 
प्रकार: 

एक लक्ष्यात घ्या तुम्ही किंवा गामा कोणी अष्टप्रधान मंडळ, पंतप्रतिनिधी, किंवा व्हेटो अधिकार असणारे अधिकारी नाहीत की एलजीबीटी कम्युनिटी किंवा त्यांच्या समान अधिकारांसाठी धडपडणारे अ‍ॅडवोकेटस आम्हाला 'आपले' म्हणा म्हणून तुमच्या निर्णयाची किंवा तुमच्या बुरसटलेल्या सामाजिक जाणीवा आणि भावना बदलण्याची वाट बघत आहेत.

लाख मोलाचे वाक्य.
सिमन्तीनीचे पेपर स्प्रेवाले वाक्य ख-त-र-ना-क. शंभर पोस्टी वाचण्याचे कष्ट सार्थकी लागले. Happy

लोटेंनी त्यांच्याही नकळत एक इंटरेस्टिंग मुद्दा वर आणला आहे. ३७७ कलम हे मुखमैथुन, गुदमैथुन वगैरे ज्या कथित 'अनैसर्गिक' प्रकारांबद्दल बोलते, ते सर्व प्रकार या ना त्या प्रकारे फोर्निकेशनशी निगडीत आहेत असा माझा समज आहे. (नसल्यास दुरुस्ती करावी.) मग लेस्बिअन कपल्सना चालू स्थितीत सदर कलम लागू नाही, असा याचा अर्थ होतो का?

<मग लेस्बिअन कपल्सना चालू स्थितीत सदर कलम लागू नाही, असा याचा अर्थ होतो का?>

नाही ज्ञानेश. कलम ३७७नुसार समलिंगी स्त्रिया, समलिंगी पुरुष, आणि मुखमैथुन-गुदमैथुन करणारे भिन्नलिंगी स्त्रीपुरुष या कायद्याच्या कक्षेत येतात.

सिंगापुरातही हाच कायदा आहे आणि तिथे मात्र तुम्ही लावलेल्या अर्थाप्रमाणे समलिंगी स्त्रियांवर गुन्हा दाखल होत नाही.

आमचे येथे माफक भावात पेपर स्प्रे मिळतील. सम्पर्कातून मेल करा. पत्रव्यवहार गुप्त ठेवला जाइल

आमची इतर उत्पादने : फुल प्य्याण्ट व ७ वाजेचा गाजर करणारे घड्याळ

>> इब्लिस, Lol

५ आणि ६ वाजता करता वॉर्निंग म्हणून निदान चाईम्स बसवून देणार का?

महान!
मानवी समाजाची वाटचाल कोण्या एका क्ष बिंदूपासून दुसर्‍या तथाकथित अधीक चांगल्या य बिंदूपर्यंत चालली आहे हा समज आणि त्याचा व्यत्यास हे दोन्हीही भ्रम आहेत. त्यामुळे जे लोक माबोवरच जुना काळ ग्रेट होता आणि आता र्‍हास होतो आहे म्हणून गळे काढतात तेच इथे पुराणातली उदाहरणे देऊ नका म्ह्णत आहेत हा अतिशयच विनोद आहे.
समाजात समलैगिकता पहिल्यापासूनच होती कारण ती नैसर्गिक आहे, फक्त ती सामाजिक दडपणामुळे प्रकाशात येत नव्हती. हाच प्रकार इनफिडेलिटीच्या बाबतीतही होताच. एड्स कसा पसरतो हे कळल्यावर तो मध्यमवर्गाचा प्रश्न नाही कारण तिथे सगळेच 'नैतिक' गळू सांभाळणारे आहेत असा भ्रम अनेकांना होता. जे घाण, अनैतिक ठरवले गेले आहे ते अस्तित्वातच नाही, त्यामुळे त्याची चर्चाच नको हा फार सोपा मार्ग झाला.
आपल्याच धारणांची चिकित्सा करायला घाबरणे हीच मोठी विकृती आहे.

<आपल्या विकृतीला प्रकृती ठरवून तिच संस्कृती आहे असे निर्लज्जपणे ठसवणे हीच एक विकृती आहे.>

आता ऋग्वेदातच 'विकृती एव प्रकृती' असं लिहिलं असल्यानं इलाज नाही. Proud

आपल्याच धारणांची चिकित्सा करायला घाबरणे हीच मोठी विकृती आहे. >>>>
प्रत्येकाने ह्या कसोटीवर आपले विचार तपासून पहावेत !!!

आपल्या विकृतीला प्रकृती ठरवून तिच संस्कृती आहे असे निर्लज्जपणे ठसवणे हीच एक विकृती आहे.

>>> हीच संस्कृती आहे असा दावा समलैंगिकतेच्या बाजूनं बोलणार्‍या कोणीही केलेला नाहीये. समलैंगिकांना माणुसकीनं वागवा आणि ते ही मेनस्ट्रीम समाजाचा एक भाग आहेत हे लक्षात घेऊन त्यांना त्यांचा हक्क लाभू द्यात असा माणुसकीचा दावा नक्कीच केला आहे.

मात्र भारतीय संस्कृती बद्दल गळे काढ्णार्‍यांना संस्कृती आणि माणुसकी या दोन भिन्न गोष्टी आहेत असं वाटतं कारण डोळ्यावरची झापडं आणि विचारांवरची जळमटं दूर करण्याची इच्छा नसते.

सर्व समलैंगिक विकृत आणि वखवखलेले असून त्यांना समाजमान्यता मिळाली की ते सर्वच्या सर्व दुराचरणास सुरुवात करतील आणि आपली ही उच्च आणि महान संस्कृती रसातळाला जाईल असा विरोधकांचा दावा आहे.

या लोकांपासून देशाला काही फायदा आहे का? यांना पोरं होणार नाहीत, त्यामुळे ह्यांचा संगोपण वगैरेत वेळ पैसा जाणार नाही... त्यामुळे चंगळ व्यसन याच्यापाठी हे विकृत जाणार आणि संस्कृतीची वाट लावणार. यांच्याकडचा पैसा पडून राहणार त्यामुळे हे षंढ त्याचा गैर वापर करणार..जास्त किंमतीला वस्तु घरे खरेदी करणार ,महागाई वाढवणार आणि स्ट्रेट लोकांना बसावे लागेल हात हलवत...

Baapre. Are you seriously saying this? Then I think you have a lot of ground to cover Sir.

कैच्याकै नाही खरं त्येच लिहतोय, उद्या ही षंढ संस्कृती वीस टक्क्यावर जरी गेली तरी देशाला याची जबर किंमत मोजावी लागेल.
वेळ आणि पैसा मुबलक असेल तर चांगला सकृत माणुसही विकृतीकडे वळतो ,इथे तर फर्स्ट प्लेसलाच विकृत आहेत ,मग विचार करा...

लोटे महाराज की जय हो!

महाराज,
आपण म्हणता,

>> जास्त किंमतीला वस्तु घरे खरेदी करणार , <<
हा पैसा यांच्याकडे कुठून येणार? व हे लोक या वस्तु कुणाकडून खरेदी करणार? ज्याच्याकडून विकत घेतल्या, त्याला काहीच मिळणार नाही का?

अन हा पैसा यांच्याकडे जर आहे, तर,

>>या लोकांपासून देशाला काही फायदा आहे का?<<

या वाक्याला काही अर्थ आहे का?

>>वेळ आणि पैसा मुबलक असेल तर चांगला सकृत माणुसही विकृतीकडे वळतो >
कठीण आहे! तुमचे लॉजिक वाचून हसूही आले नाही. वेळ आणि पैसा मुबलक असलेला चांगला सुसंस्कृत माणूस त्या वेळेचा अणि पैशाचा सदुपयोग करेल. समाजकार्य करेल .विकृतीकडे कशाला वळेल? विरोधासाठी म्हणून काहीही लिहावे? सुसंस्कृत असण्याचा मक्ता काय फक्त हेटरोनीच घेतलाय? रेप करणारे, विनयभंग करणारे, पत्नीला स्त्रीभ्रुण हत्या करायला भाग पाडणारे, लाच खाणारे हेटरो काय सुसंस्कृत असतात?

५०१.

एवढ्या पोस्ट्स वाचूनदेखील कुणाचेही मतपरिवर्तन झालेले दिसत नाही, तस्मात माथेफोड चालू ठेवावी याला पर्याय नाही.

लगे रहो!!!

कुणाचेही मतपरिवर्तन झालेले दिसत नाही >>>>>

मुळात मतपरिवर्तन कशावर आणि कोणी करावे हा एक प्रश्न असल्याने त्याचे उत्तर सापडत नाही..

वर गामा "साहेबांनी" मी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर म्हणुन काहीतरी लिहिले आहे .. ते जे काही लिहिलेले आहे ते त्याच्या इतर पोस्टींपेक्षा विरुध्द आहे.. तरी पण त्यांचे मत वेगळे आहे....

आत्ता कळले "उत्तर का सापडत नाही?"

एवढ्या पोस्ट्स वाचूनदेखील कुणाचेही मतपरिवर्तन झालेले दिसत नाही>>>>>>>
आपणच मोठे शहाणे आणि दुसरे इडियट्स या भावनेने कुत्सिततेने लिहिलेल्या ५०० काय ५००००० पोस्ट्स पडल्या तरी काय बोडक्याचे परिवर्तन होणार? संवादापेक्षा वितंडवाद झाल्यावर यापेक्षा काय वेगळे अपेक्षित होते इथे?

या लोकांपासून देशाला काही फायदा आहे का?
>> तो तर कित्येक भिन्नलिंगी लोकांपासुनदेखील नाहीये. पण बिचार्‍या देशाकडे काही चॉईस आहे का?

यांना पोरं होणार नाहीत
>> हा असलाच तर फायदाच असेल. भारत लोकसंख्या विस्फोटाच्या विळख्यात असतांना शक्यतो मुले न झाली तर बरे असं म्हणायची वेळ आलीये आपल्यावर.
अजुन एक.. 'मुल नको' असं मानणारे कित्येक भिन्नलिंगीय कपल्स आजुबाजुला आहेत. त्यांच्याबद्दलही आपले हेच मत आहे का? कि 'मुल नको' असं मानणारे सगळे समलैंगिकच?

त्यामुळे ह्यांचा संगोपण वगैरेत वेळ पैसा जाणार नाही...
>> बरंय मग.. यांची प्रॉडक्टिव्ह एनर्जी आणि पैसा अनेक विधायक ठिकाणी वापरता येईल त्यांना आणि देशालाही. शिवाय वारस नसेलच तर मरतांना सगळा पैसा ते कोणालातरी दान करुन मरतील.
बाकी भारतातल्या कित्येक सन्माननीय व्यक्तीमत्वांना (त्यांचे ओरिएंटेशन माहित नाही) मुले नाहीत त्यामुळे त्यांचा वेळ संगोपन वगैरेत जात नाही. त्यामुळेच त्यांचा अमुल्य वेळ आपल्याला मिळतो आहे. मुले जन्माला घालणे आणि वाढवणे याहिपेक्षा महत्वाच्या बर्‍याच गोष्टी आहेत जगात.

त्यामुळे चंगळ व्यसन याच्यापाठी हे विकृत जाणार आणि संस्कृतीची वाट लावणार.
>> मुले नसलेले भिन्नलिंगी चंगळ व्यसन यापाठी जात नाहीत का? मुले असलेले भिन्नलिंगी चंगळ व्यसन यापाठी अज्जिबात जातच नाहीत का? संस्कृती म्हणजे काय? भरपुर मुले जन्माला घालणे?

यांच्याकडचा पैसा पडून राहणार त्यामुळे हे षंढ त्याचा गैर वापर करणार..जास्त किंमतीला वस्तु घरे खरेदी करणार ,महागाई वाढवणार आणि स्ट्रेट लोकांना बसावे लागेल हात हलवत...
>> हे मुले नसलेल्या भिन्नलिंगी व्यक्तीकडुनही होऊ शकते. शिवाय अनेक भिन्नलिंगी मुलेबाळे असलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांकडे भरपुर काळा पैसा पडुन आहे. ते काय दिवे लावताहेत भिन्नलिंगी आहेत म्हणुन?

मुले नसणे = चंगळवाद? अवघड आहे. Uhoh

त.टी. जर समलैंगिकांनी अनाथ मुलांना घरटी एक याप्रमाणे दत्तक घेतले तर तुमचे हेच मत असेल का?

वा वा धम्माल चालीये .,

या लोकांपासून देशाला काही फायदा आहे का?
<< हो , आहे , तुम्हीच लिहिलाय देशाचा फायदा इनडायरेक्ट्ली !


यांना पोरं होणार नाहीत, त्यामुळे ह्यांचा संगोपण वगैरेत वेळ पैसा जाणार नाही..
त्यामुळे चंगळ व्यसन याच्यापाठी हे विकृत जाणार आणि संस्कृतीची वाट लावणार

<<
वा..बेस्टच कि , 'चुल अन मुल' सारखी बथ्थड संस्कृति काही प्रमाणात कमी होईल ,दोघं वेळ सत्कारणी घालवतील , करिअर वगैरे करतील - छन्द जोपासतील , स्वतःचा पैसा स्वतः साठी वापरतील!
लोकसंख्येला अळा बसेल , अ‍ॅडॉप्शन सारख्या चांगल्या गोष्टींचा विचार होईल !

यांच्याकडचा पैसा पडून राहणार त्यामुळे हे षंढ त्याचा गैर वापर करणार..जास्त किंमतीला वस्तु घरे खरेदी करणार ,महागाई वाढवणार आणि स्ट्रेट लोकांना बसावे लागेल हात हलवत...
<< हे पण उत्तम .. स्ट्रेट लोक बसतील घरी मग , तेवढीच रस्त्यावर गर्दी , रस्त्यावर प्रदुषण कमी !
Wink

वा..बेस्टच कि , 'चुल अन मुल' सारखी बथ्थड संस्कृति काही प्रमाणात कमी होईल ,दोघं वेळ सत्कारणी घालवतील , करिअर वगैरे करतील - छन्द जोपासतील , स्वतःचा पैसा स्वतः साठी वापरतील!
लोकसंख्येला अळा बसेल , अ‍ॅडॉप्शन सारख्या चांगल्या गोष्टींचा विचार होईल !

>> अगदी अगदी !!!

समाजाने आमच्या डोक्यावर चालीरिती पाळण्यासाठी किती मौल्यवान सोनेरी मुगूट ठेवले आहे, आम्ही समलैंगिक नसल्यामुळे मुलांना जन्म घालण्याची आणि वाढवण्याची कौटुंबिक सामाजिक जबाबदारी आली आहे (जे आमचे प्रेस्टिज आहे आणि त्यामुळे आम्हालाच समाजात 'मिरवायचा' हक्क मिळाला आहे). आमच्या कौटुंबिक आणि सामाजिक कमिटमेंट्मुळे आम्हाला ऊत्पन्नातला बराच पैसा तसे स्टेटस जपण्यासाठी खर्च करावा लागतो!!
तर तुम्ही कोण आलात हे सगळे झुगारून ऐषोरामात जीवन घालवणारे?
समलैंगिक झाले की तुमची कशी सगळी मज्जा मज्जा आहे राव्/बाई. आणि आमच्याकडे कोण ढुंकूनही पहाणार नाही. तुमचे पार्टनर्स कसे स्वावलंबी, तुमच्यावर आजिबात जबाबदारी न टाकणारे. नवरा, बायकोचा वेगवेगळा हुद्दा नसल्याने तुम्हाला कशी 'समाजमान्य' कामांतून आणि जबाबदार्‍यातून मुक्ती मिळाली. मुलं नाहीत तर स्वतःसाठी किती मोकळा वेळ मिळाला. अनावश्यक कौटुंबिक जबाबदार्‍या नाहीत तर किती पैसे वाचले आणि किती सुबत्ता आली.
छ्या बुवा ते काही नाही. तुम्हाला कोणी सुखी होण्याचा अनैसर्गिक हक्क दिला. असे सुखी होणे अनैतिक आहे. आम्ही नाही तुम्हाला सुखी, आनंदी बघू शकणार. आम्ही नाही तुम्हाला असे ऐषोरामी जीवन घालवण्यास मान्यता देणार. तुम्हाला मुलं होऊ शकत नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला षंढ म्हणू (भलेही रात्री सात नंतर कोपर्‍यावरून दूध आणायला सांगितले की आम्ही 'मला भिती वाटते तूच जा' म्हणू). तुमच्या सुबत्तेचा आम्हाला मानसिक त्रास होतो म्हणून आम्ही तुम्हाला त्रास देऊ. आमच्या नैसर्गिक आणि नैतिक समाजात तुमची बदनामी करू. तुमच्या विरुद्ध कायदे बनवू. वेळ आल्यास मारून/ठोकून आमच्या मुलांनाही आमच्यासारखेच नैसर्गिक आणि नैतिक सुखी बनवू.
बोला. विषमलैंगिकांचा विजय असो, समलैंगिक मुर्दाबाद. समलैंगिक हटाओ, समाज बचाओ.

लोकहो, अनेकांना एकत्र प्रतिसाद देतोय.

वैद्यबुवा,

१.
>> गामा_पैलवान, काय मुर्खपणा चालवलाय हा?

अच्छा, म्हणजे गुन्हेगार लैंगिक अल्पसंख्य असला तर तसा उल्लेखही करायचा नाही? मग दै.लोकमतच्या नावाने बोंब मारा. माझ्या नावाने कशाला कोकलताय? एकंदरीत तुमच्या शहाणपणाची पातळी पाहता मी मूर्ख असणेच श्रेयस्कर.

२.
>> असली उदाहरणं देऊन वाट्टेल ते जनरलायजेशन्स करत बरळणं म्हणजे खुपच खालची पातळी गाठली

बातमी नीट वाचा. महेश जाधव गे सारखा लैंगिक अल्पसंख्य आहे. गे असेलंच असं नाही. त्याने बाईचे कपडे घालण्याचा हक्क बजावला. तोही कामावर पोलीस चौकीत असतांना. तेही अनेक वेळा अनेक तरुणांसोबत.

बाईचे कपडे कशाला घातले? मी लैंगिक अल्पसंख्य असल्याने समाजाचे टोमणे सहन झाले नाहीत. म्हणून मनाचा तोल जाऊन असं कृत्य घडलं. असा बचाव करता येईल नाही?

बाकी, मला बिनडोक म्हणतांना तुम्ही तरी काय मोठी वरची पातळी गाठली आहे? तुम्ही वटवाघूळासारखे खाली डोकं वर पाय अशा अवस्थेत तर लटकलेले नाहीत? वरच्याखालच्या पातळीबद्दल तुमचा गोंधळ आहे म्हणून शंका आली. शिवाय, वरच्या (तुमच्या भाषेत खालच्या) प्रतिसादात मी जनरलायझेशन काय केलंय? दाखवून द्या. वटवाघूळास कमी दिसतं म्हणतात, तेव्हा सांभाळून.

असो.

असामी,

>> गामा, तुमच्या बातमीमधला महेश जाधव गे होता कि अजून काही हा निष्कर्ष कसा निघाला त्या
>> बातमीमधून नक्की ? हे आपल्याला सोयीस्कर असे खोटे निष्कर्ष काढून फियर माँगरिंग करणे थांबवा.

त्याचं काय आहे की, लैंगिक अल्पसंख्य म्हणून गुन्ह्यास माफी मागितली जायचा धोका आहे.

असो.

चमन,

>> चिनुक्स, पालेकर आणि ह्या कम्युनिटीचे दु:ख आणि त्रास कमी व्हावे अशी आशा करणारा एकेक जण
>> एका शब्दानेही का होईना ... शंका निरसन करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आडमुठी भुमिका घेत तुम्ही
>> अश्या माणूसकीला धरून असणार्‍या बदलाबद्दल नुसते ऊदासीनच नाहीत तर त्याच्याविरुद्ध अपप्रचार देखील
>> करत आहात.

क्र.३७७ चं कलम मागे घेण्याबद्दल मला वाटतं आपण सारे सहमत आहोत. पण यापुढे मूल दत्तक घेणे वगैरे बाबींकडे वळण्यापूर्वी गे समूहाच्या समस्या चर्चिल्या जाव्यात. पाश्चात्य देशांत बराच डेटा उपलब्ध आहे. त्यातून आपण भारतीयांनी शिकायला हवं ना? तसा प्रयत्न कुठेही दिसतो का? उर्वरित समाजाला नावं ठेवण्यावाचून दुसरं काहीतरी निष्पन्न झालंय का गेल्या ५००+ संदेशांतून?

गे असणं हे समस्याकारी (प्रॉब्लेमॅटिक) आहे हेच मुळातून मान्य नाही इथल्या लोकांना! अलाण्याचा आटिट्यूड आणि फलाण्याचा फाटिट्यूड कसाही बदलला तरी समस्या हलक्या होणार नाहीत. गे माणसाने स्वत: जबाबदारी घ्यायला नको का? उर्वरित समाजाकडून यथोचित मदत मिळवणं तुलनेनं सोपं आहे.

एक महत्त्वाची समस्या तोतया संधीसाधू गे लोकांची आहे (धन्यवाद महेश!). खरे आणि खोटे गे ओळखण्यासाठी परीक्षा विकसित करायला हव्यात. मानसिक चाचण्या (सायकॉलॉजिकल टेस्ट्स) असतात तशा धर्तीवर. That's the step in the right direction. Not some phoney adoption rights.

निव्वळ अधिकार प्राप्त झाल्याने समस्या सुटत नसतात. तसंही पाहता भारतीय जीवनशैलीत कर्तव्यास अधिक महत्त्व आहे. वस्तुस्थिती काय आहे, पक्ष कोण आहेत, त्यांच्या मर्यादा काय आहेत, त्यांची कर्तव्ये काय आहेत या क्रमाने चर्चा व्हायला हवी. चर्चेत अधिकार सगळ्यात शेवटी यायला हवेत. ते सोडून समाजाला शिव्या!

आता विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. चिनूक्स इथे बघा काय म्हणताहेत :

>> हा मानसिक आजार नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने तसं मान्य केलं आहे. शिवाय ज्या ज्या देशांमध्ये
>> समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता आहे, त्या सर्व देशांनी तसं जाहीर केलं आहे. भारत सरकारनेही सुप्रीम
>> कोर्टात तसं सांगितलं आहे.

तांत्रिक क्षेत्रात काम करणार्‍या मनुष्याने असं बाबावाक्यं प्रमाणं म्हणून चालेल का? शिवाय असं म्हंटल्याने पुढे गे लोकांचं समुपदेशन करणं अवघड नाही का होणार? हा आजार नाही तर समस्या का उत्पन्न होताहेत असा प्रश्न शेवटी उरतोच.

तेव्हा समस्याकेंद्रित चर्चा व्हावी एव्हढीच माझी इच्छा आहे.

असो.

आता थांबतो.

आ.न.,
-गा.पै.

Pages