वजन कसे कमी केले - एक स्वानुभव !

Submitted by अगो on 3 October, 2009 - 23:35
weight loss apple

या वर्षीच्या २६ जानेवारीला मनाशी पक्क ठरवलं की काही करुन वजन कमी करायचं. तसं लग्न होईपर्यंत माझं वजन अगदी आदर्श म्हणावं असंच होतं. फार कमी नाही आणि फार जास्त नाही. पण गेल्या पाच वर्षांत ते दर वर्षी चार-पाच किलो असं ठरवून घेतल्यासारखं वाढतच गेलं. प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांत माझं ३० पौंड वजन वाढलं होतं ( साधारण १४ किलो ) त्यानंतर त्यातले २१ पौंड कमीही झालं होतं पण बाळंतपण करुन आई भारतात परत गेल्यावर बाहेरच्या खाण्यावरचं नियंत्रण सुटलं आणि वजन वाढतच राहिलं. इंटरनेटवर खूप दिवस वाचत होते आहार आणि व्यायाम या विषयी. आमच्या जवळच्या नात्यात ओबेसिटी आणि वेट लॉस कन्सलटंट तज्ञ डॊक्टर असल्याने त्यांच्या बोलण्यातूनही काही गोष्टी कळल्या होत्या. त्यावर शांत बसून विचार करुन माझ्यासाठी आहाराची एक दिशा ठरवून घेतली आणि वजन कमी करायच्या दॄष्टीने पावलं उचलली. सुरुवात केल्यापासून पहिल्या पाच महिन्यांत जवळजवळ पंधरा किलो वजन कमी झालं. त्यानंतरच्या तीन महिन्यांत तो वेग थोडा मंदावला पण तरीही वजन कमी होतंच राहिलं. या २६ सप्टेंबरपर्यंत अजून तीन किलो उतरुन एकूण अठरा किलो वजन कमी झालं. लग्नाच्या आधी जे वजन होतं त्याहीपेक्षा एक किलो कमीच झालं आणि अजूनही थोडं कमी करायचा माझा प्रयत्न असेल. मायबोलीवर एक-दोन जणींनी ह्या प्रवासाबद्दल लिही असं सुचवलं आणि खरंच वाटलं की हा अनुभव लिहावा. ह्यातून अजून काही जणांना वजन उतरवायला मदत झाली तर खूप बरं वाटेल.

वजन कमी करताना कळीच्या गोष्टी म्हणजे आहार आणि व्यायाम. या पैकी लहानपणापासून व्यायामाची शरीराला फारशी सवय नाही. त्यामुळे सुरुवातीलाच ठरवलं होतं की व्यायाम अशा प्रकारचा निवडायचा जो आपल्याला व्यवस्थित झेपेल आणि वजन कमी केल्यानंतरही त्यात सातत्य राखता येईल. दिवसातला साधारण पाऊण ते एक तास व्यायामासाठी काढायचा असं ठरवलं. त्यात सकाळी दहा ते पंधरा मिनिटं थोडं स्ट्रेचिंग आणि हळूहळू वाढवत नेलेले सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार घालताना त्यातलं प्रत्येक आसन सावकाश, योग्य रीतीने होतंय ना याकडे मुद्दाम लक्ष दिलं. आणि सूर्यनमस्कारासारखा सर्वांगसुंदर व्यायाम नाही असं का म्हणतात ते अगदी पुरेपूर कळलं. माझा मुलगा लहान असल्याने संध्याकाळी नवरा घरी आल्यावर सातला जिमला जायचं असं ठरवलं. सुरुवातीला एलिप्टिकल करायचा प्रयत्न केला पण ते फार जड जातंय असं वाटलं. मग ट्रेडमिलवर पन्नास मिनिटं चालायचं ( साधारण साडे-तीन मैल प्रती तास या वेगाने ) असं ठरवलं. साधारण तीन मैल ( ४.८ किमी ) होतील इतका वेळ चालता आलं तर उत्तम.( बरेचदा घरी परतायची घाई असायची ) पण ते नाही जमलं तरी रोज एकाच वेळी जिमला जाणं आणि किमान अर्धा तास तरी चालणं हे झालंच पाहिजे अशी खूणगाठ बांधून घेतली.

व्यायाम कुठल्या प्रकारचा आणि किती वेळ करावा ह्या बद्दल नेटवर इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माहिती होती की गोंधळून गेल्यासारखं होत होतं. साधं ट्रेडमिलवर चालायचं तरी वेट-लॊस झोन मध्ये ( कमी वेगाने ) चालायचं की कार्डीयो झोन मध्ये ( जास्त वेगाने ), किती वेळ, चढ ठेवून की नुसतंच असे अनेक प्रश्न. वजन उचलायच्या प्रकाराबाबतही तेच. किती किलो वजन उचलावे. किती वेळा उचलावे ह्या बद्दल संभ्रम ! पण जसजसं व्यायाम करायला लागले तशा काही गोष्टी लक्षात यायला लागल्या.

१. व्यायामाचा मूळ उद्देश हा चरबी ( fat ) कमी करण्याचा आहे स्नायूंची झीज करणे नव्हे. शरीराची पुरेशी तयारी नसताना जोरजोरात धावल्याने मसल मास बर्न होते चरबी जिथल्या तिथे राहते.
२. स्नायूंवर भार न पडता चरबी जाळण्याच्या योग्य मार्गावर व्यायाम आहे हे कसे ओळखावे ? माझ्यापुरता मी निकष लावला की जिममधून घरी आल्यावर जर गळून गेल्यासारखे वाटत असेल तर मसल मास बर्न होत असल्याची शक्यता जास्त. व्यायाम केल्यावर ताजेतवाने, हलके वाटले पाहिजे.
३. चालताना हलका श्वास वाढेल पण खूप धाप लागणार नाही अशा वेगाने चालायचे ( माझ्यासाठी हा वेग साधारण साडेतीन मैल प्रति तास ) चालताना दोन्ही हातही शरीराला समांतर ठेऊन हवेत पुढे मागे स्विंग केले तर जास्त चांगला व्यायाम होतो. ( क्रॊस कंट्री स्किईंग मध्ये दोन्ही पोल्स हाताने जसे पुढे मागे ढकलतात तशी पोझिशन )
४. नियमित व्यायामाने तीव्रता वाढवता येते. सुरुवातीला मला एलिप्टिकल करणे जमायचे नाही. पण चालण्याचा व्यायाम करायला लागल्यावर काही दिवसांतच एलिप्टिकल जमायला लागले. नंतर ते अर्धा ते पाऊण तास करणेही जमायला लागले. ( जमायला लागणे म्हणजे व्यायामानंतर दमल्यासारखे न वाटणे ) चालण्याचा वेगही हळूहळू वाढतो.
५.व्यायामात सातत्य राखले तरी आठवड्याचे सलग सातही दिवस व्यायाम करायची गरज नाही. उलट एक दिवस सुट्टी घेतल्याने स्नायूंना आवश्यक विश्रांतीच मिळते. त्यामुळे आठवड्यातून कमीतकमी चार दिवस आणि जास्तीतजास्त सहा दिवस जिम.
६. वेट्स उचलताना कमी वजन सावकाश लयीत जास्त वेळा उचलले तर चरबी जाळून मसल मास वाढवायला जास्त उपयोग होतो. ( उदा, पाच पाऊंड वजन प्रत्येक हातात प्रत्येकी बारा वेळा उचलायचे, थोडं थांबून ( ३० से. ते एक मिनीट ) सोळा वेळा उचलायचे, परत थोडं थांबून वीस वेळा उचलायचं ) सरावाने नंतर वजन उचलायची क्षमता वाढवता येते. स्ट्रेंग्थ ट्रेंनिंगची जी लेग प्रेस वगैरेसारखी मशिन्स येतात त्यावरही हाच नियम लागू.
७.शरीरातले फॆट कमी होऊन मसल मास जसे वाढत जाईल तशी कॆलरीज जाळायची शरीराची क्षमता वाढते. चयापचय ( metabolism ) सुधारतो. त्यामुळे वजन वाढण्याची एक टेंडन्सी झालेली असते त्यातही बदल होतो.

व्यायामातली ही पथ्ये मला खूप फायद्याची ठरली. व्यायामाइतकंच किंबहुना जास्तच महत्व मला आहार ठरवून घेण्याचं होतं. मी डाएट सुरु करायच्या सुमारास माझ्या नवऱ्याचं कॊलेस्टेरॊल थोडसं वाढलेलं टेस्टमध्ये आलं होतं. त्यामुळे आहार ठरवताना तो कॊलेस्टेरॊल कमी करायलाही मदत करेल असा ठरवून घेतला. आहार आखताना खालील गोष्टी विचारात घेतल्या :

१. माझे वय, उंची वजन यानुसार जर मला दिवसाला दोन हजार कॆलरीज लागत असतील असे धरले ( हे चार्ट्स इंटरनेट वर अगदी सहज उपलब्ध असतात ... how many calories do i need ? असा गुगल सर्च करुनही मिळतील. ). त्यापैकी निदान पाचशे कॆलरीज तरी कमी घ्यायच्या असे ठरवले.
२. दिवसातून चार-ते पाच वेळा थोडे-थोडे खाणे. मी दुपारी झोपत असल्याने दिवसातून चार वेळा खायचे असे ठरवून घेतले. दुपारी न झोपणाऱ्यांना साडे-तीन च्या सुमारास एक छोटे स्नॆक खायला हरकत नाही.
३. तळ्कट, तुपकट, चीज वगैरे घातलेले हेवी खाणे शक्यतोवर टाळायचंच. पण बरेचदा आपण घरीही हाय कॆलरी पदार्थ करतो जसे आलू पराठे, बिर्याणी,श्रीखंड, ग्रेव्ही / तेल थोडे जास्त असलेल्या भाज्या. त्यावर मला डॊ.बंगंच्या पुस्तकात वाचलेली ओर्निश मेथड अतिशय आवडली. एखाद्या पदार्थाचा मोह टाळता येणे शक्य नसेल तर मी त्याचे मोजून दोन-तीन घास बाजूला काढून घ्यायचे आणि माझ्या डाएटवाल्या जेवणात ते सुरुवातीला एक, मध्ये एक आणि शेवटी एक असे खायचे. ते खाताना अगदी सावकाश तोंडात घोळवत आस्वाद घेत खायचे. खरोखरच तो पदार्थ पोटभर खाल्ल्याचे समाधान मिळते. त्यामुळे नवऱ्याला काही चांगलेचुंगले करुन घातले तरी माझे डाएट कधी मोडले गेले नाही.
४. जे व्यायामाच्या बाबतीत तेच आहाराच्या बाबतीत ! सलग सात दिवस डाएटवाले फूड खायचे नाही. कमी कॆलरी घेऊन घेऊन शरीराला तेवढ्याच कॆलरीत भागवायची सवय होते आणि चयापचय मंदावतो. परिणामी वेट लॊसही ! म्हणून आठवड्यातून एकदा एक पोर्शन जे मनाला येईल ते खायचे असे ठरवले.
५. सगळ्यात महत्वाचे जे डाएट करतानाही आणि आत्ताही माझ्या उपयोगाला येते ते म्हणजे ’पोर्शन कंट्रोल’ ... प्रमाणात खाणे ! खाताना नंतर पाणी प्यायचे आहे या हिशेबाने खावे. म्हणजे भूक भागल्यासारखी वाटतेय पण पोट हलकेच आहे अशा स्टेजलाच थांबावे. पाणी प्यायल्यावर तड लागेल इतक्या प्रमाणात जेवण घेऊ नये. आपल्या हातून ओव्हर इटिंग इतकं सहज होते की त्यातही आपण जास्त कॆलरीज पोटात ढकलत असतो ह्याचा आपल्याला पत्ताही नसतो.

ह्या गोष्टी पाळून माझा आहार साधारण असा होता :

उठल्या उठल्या दोन-तीन ग्लास कोमट पाणी पिणे. चहा-कॊफी नाही. ( पाण्यात लिंबू पिळून घेतले तर जास्त फायदा होतो असे वाचले आहे पण मी नुसतेच पाणी पित होते ) वेट लॊस पूर्ण झाल्यावरही आता इतकी सवय झाली आहे की अजूनही मी चहा-कॊफी घेत नाही.

साधारण साडे-आठ नऊ च्या सुमाराला ब्रेकफास्ट. अर्धा कप क्विक कुकिंग ओटस आणि दोन चमचे ओट ब्रान एकत्र करुन ते व्यवस्थित बुडेपर्यंत 1% दूध, चिमूटभर मीठ ( याशिवाय ओटमीलला चवच येत नाही ), थोडेसे अगोडच राहील इतपत साखर ( पाऊण ते एक चमचा )घालून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवणे. बाहेर काढल्यावर त्यात दोन अक्रोड चुरुन आणि एक ओंजळ ब्लू-बेरीज घालून खाणे. ब्लू-बेरीज नाही मिळाल्या तर स्ट्रॊबेरीज, सफरचंद किंवा दोन चमचे बेदाणे घालून ! केळं मात्र नाही.

बारा-साडेबाराला जेवण. जेवणाची सुरुवात एखादं फळ खाऊन मुखत्वे सफरचंद किंवा पेअर ! काकडी, गाजर, टोमॆटॊ यापैकी काहीतरी. हे रोजचे कॊमन फॆक्टर्स !
उरलेल्या जेवणात आलटून पालटून खालीलप्रमाणे :
दोन फुलके, अगदी कमी तेलावर केलेली दाल / उसळ, कमी तेलावर केलेली भाजी / पालेभाजी इत्यादी. ( बटाटा, सुरण, छोले सोडून )
ब्राऊन राईसची जिरं,मिरं घालून केलेली खिचडी ( त्या दिवशी पोळ्या नाहीत )
उकडलेली अंडी दोन-तीन पण फक्त पांढरं. ( बलक मला खूप आवडतो खरं तर पण मन घट्ट करुन फेकून द्यायचे. कारण मुलाला आवडत नाही आणि नवऱ्याच्या तब्बेतीसाठीही चांगला नाही. ) १०० % होल व्हीट / मल्टीग्रेन ब्रेडचे दोन स्लाईस मध्ये अंडी घालून
अंड्याच्या पांढऱ्यात भाज्या आणि थोडसं लो फॆट चीझ घालून बेक केलेलं कीश
सॆलड बोल बनवून. त्यात लेट्यूस सारखं सॆलड, लो फॆट ड्रेसिंग, क्रुटॊन्स, थोडं चीज आणि इथे मिळणाऱ्या सोय पॆटी ( ५/६ ग्रॆम फॆट असणाऱ्याच ) कुसकरुन. खूप पोटभरीचा होतो हा बोल त्यातल्या पॆटीमुळे.
आठवड्यातून एकदा फिश ( तळलेलं नव्हे ) / व्हाईट मीट चिकन.
मल्टीग्रेन पास्ता ( मैद्याचा नाही ) भाज्या, दोन चमचे ऒलिव्ह ऒईल घालून.
एकंदरीत तेल, तूप कमी ( दिवसाला एक-दीड टेबलस्पून प्रत्येकी या हिशोबाने भाजी/ आमटीला घालणे ) , पण लसूण, आलं , इतर मसाले ह्याचा चव आणायला सढळ वापर. ग्रेव्ही वाली भाजी केली तर कांदा-टोमॆटोचीच ग्रेव्ही. नारळ-काजू वर्ज्य !
भाज्या, चिकन, मुगाचं पीठ, तांदूळ-उडदडाळीचे २/१ प्रमाण असलेली इडली. काहीही चालेल. फक्त कॆलरीजचा विचार करुनच. भात मी पूर्वीही फारसा खायचे नाही. या सहा महिन्यांत तर पांढरा तांदूळ जवळजवळ वर्ज्यच केला. आताही ब्राऊन राईसचाच पुलाव वगैरे करते. मुलालाही ब्राऊन राईसचीच खिचडी देते.

संध्याकाळी पाच-साडेपाचला अर्धा कप पाणी / अर्धे १ % दूध या मध्ये बनवलेला व्हे प्रोटीन शेक ( व्हे प्रोटीन वॊलमार्ट / टारगेट मध्ये सहज मिळते. प्रत्येक स्कूप मध्ये अंदाजे २३ ग्रॆ. प्रोटीन असते ) + लो फॆट होल ग्रेन क्रॆकर्स. खूपच भूक असेल तर एखादे फळ ( केळं, आंबा सोडून ) व्हे प्रोटीन हे आहारात प्रोटीन वाढवायचा उत्तम मार्ग आहे. हे मी प्रेग्नन्सीतही घेतले होते. प्रेग्नन्सीत घ्यायचे असेल तर आधी डॊक्टरांना विचारावे.

साडे-आठच्या सुमारास रात्रीचे जेवण.
सकाळसारखेच. फळ खाऊनच सुरुवात करणे. ( खरं तर संध्याकाळी सातला जेवून घेतले तर वजन कमी करायला मदत होते असे वाचले होते पण मला जिमला जायला तीच एक वेळ मिळत असल्याने जेवणाची वेळ उशीराच ठेवावी लागली. )

या व्यतिरिक्त दिवसाला नऊ ते दहा ग्लास पाणी

मल्टीव्हिटॆमिन आणि कॆल्शिअमच्या सप्लीमेंट्स.

जेवल्यानंतर दहा-पंधरा मिनिटं शतपावली. ( जी हल्ली घातली जात नाही Happy )

आहारात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त राहील हे पाहिले पण त्याचा अर्थ असा नाही की कार्ब्स पूर्ण वर्ज्य केले. पण कार्ब्स फक्त फळं, भाज्या आणि होल ग्रेन्स यातून जातील हे पाहिले. मैदा,तांदूळ, बटाटा जवळजवळ बाद.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

डाएट चालू करायच्या सुरुवातीला खूप निराशा आली होती की वजन कमी होणार की नाही ( खरं तर त्या आधी कधी प्रयत्नच केला नव्हता कमी करायचा ) त्यावेळी नेट्वर GM डाएटची भारतीय आवॄत्ती सापडली होती ( बीफ ऐवजी पनीर + मोड आलेले मूग ) एक धक्का मिळाला तर हवा होता म्हणून GM diet ( 7 day crash diet ) केले होते. ते खालीलप्रमाणे :

दिवस १ : फक्त फळे ( केळं सोडून ... शक्यतो मेलन ग्रूप मधली कलिंगड, कॆंटलूप वगैरे )
दिवस २ : सकाळी ब्रेकफास्टला एक बटाटा उकडून ( थोडे मीठ, मिरपूड आणि किंचित बटर घालून ) नंतर दिवसभर फक्त भाज्या ( बटाटा, सुरण, छोले, राजमा, चणे नाही )
दिवस ३ : फळे + भाज्या ( केळं, बटाटा, छोले, राजमा इ. सोडून )
दिवस ४ : ८ केळ्यांपर्यंत केळी + ४ ग्लास साय काढलेले दूध ( मी सहा केळीच खाल्ली होती )
दिवस ५ : मोड आलेले मूग + १% दुधाचे पनीर घरी करुन. ( एकूण २८० ग्रॆ. पर्यंत ) + ६ टोमॆटो
दिवस ६ : मोड आलेले मूग + १% पनीर पाहिजे तितक्या प्रमाणात.
दिवस ७ : बाऊन राईस + भाज्या + फळे ( बटाटा, केळं इ. नाही )
रोज किमान दहा ग्लास पाणी.

मी कधीही उपास करत नसल्याने ह्या डाएटचे पहिले तीन दिवस अक्षरश: जीवघेणे होते. वजन दोन कि. कमी झाले ( पाच पाऊंड ) फक्त. एक धडा मात्र मिळाला की long term diet करायचे तर खाणे आवडीचे असले पाहिजे आणि त्या सात दिवसांत सतत वाटत होते की हे असे खाण्यापेक्षा साधे फुलके आणि मुगाचं वरण म्हणजे स्वर्ग आहे Happy वजन व्यवस्थित कमी होत असतानाही मे च्या अखेरीस मला परत अजून जास्त वजन कमी करायची घाई झाली आणि परत एकदा हे GM diet केले. ह्या वेळी फक्त १ पाऊंड ( अर्धा कि. ) वजन कमी झाले. आणि खाण्याच्या क्रेव्हिंग्जवर माझा जो छान ताबा आला होता तोही जातो की काय अशी भिती वाटू लागली. थोडक्यात GM diet मला फारसे फायदेशीर वाटले नाही. long term मध्ये तर नाहीच नाही. मात्र नेहेमीचं डाएट खूप एंजॊय केलं आणि त्यानेच वजनही कमी झालं.

टीप : मी काही कुणी आहारतज्ञ नाही. व्यायाम आणि आहार मी संपूर्णपणे माझ्या आकलनाप्रमाणे आखून घेतला होता ह्याची कॄपया वाचकांनी नोंद घ्यावी.

(मायबोलीवरचे वजन कमी करण्याचे इतर अनुभव
खाऊन पिऊन वजन कमी करा !
दिक्षीत डाएट आणि अनुभव
-वेमा)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे वजन ५७ होते मागच्या आठवड्यात ,
त्यानंतर थोडा वीक्नेस होता म्हणुन घरीच होते ६ ७ दिवस
मग वजन केले तर ५६ झालेल

२ दिवस झाले फक्त फळे खायच्या प्रयत्नात आहे

१ भा प्र> इडली ने जास्त कॅ वाढु शकतात का?

दिवसातुन किती चालणे (म्हणजे १० मिनिट, १५ मिनिट नव्हे तर किती किलोमिटर ) जनरली अपेक्षित आहे?
एका मैत्रिणी ने सांगितले की तांदुळ भाजुन मग भात करावा त्यतले फॅट्स की काय जतात आणि तसा भात खाणे चांगला म्हणुन? सगळ्यांचे काय मत?

>>तांदुळ भाजुन मग भात करावा
आयुर्वेदाप्रमाणे, भर्जित धान्यं पचायल हलकी असतात!! म्हणून असेल!!!

मनी जीलियन मायकलच्या व्हेजी प्लान आहे का ग ...शोधतिये नाही सापडते... माहीत असेल तर लिन्क पाठव ना .

GM diet केले होते का ? मी केले होते ..सुरुवतिला मस्त कमी झाले वजन पण नतर जैसे थे... Sad

_आनंदी_

मैत्रिणीचे हे मत कशाच्या आधारावर बनले आहेत ते तिलाच विचारा अन इथे पण सांगा .

अमेरिकेच्या डिपार्टमेटं ऑफ अ‍ॅग्रिकल्चरची ही साईट आहे जिथे अनेक अन्नपदार्थांचे घटक, पोषण मूल्य याबाद्दल शास्त्रीय माहिती ( स्टँडर्ड डेव्हिएशन सकट) शोधू शकता http://ndb.nal.usda.gov/ndb/search/list.

तिथे Rice, white, medium-grain, cooked असे शोधल्यास एक मेझरिंग कप ( आकारमानाने जवळपास पाव लिटर, भाताचे वज्ञ १८६ ग्रॅम ) भातात ०.३९ ग्रॅम्स फॅटस आहेत असे दिसेल.
त्यात टोटल कॅलरीज २४० आहेत - म्हणजे २००० कॅलरी डायेट च्या १० % पेक्षा जास्त कॅलरीज एक कप भाताने पोटात जातात.

एवढ्या भातातून ते अर्ध्या ग्रॅमपेक्षा कमी असलेले फॅट्स, समजा पूर्ण नाहीसे झाले तरी उष्मांकावर, शरीरतल्या साखरेच्या लेव्हलवर कितीसा परिणाम होईल ?

कुणाला जीलियन मायकलच्या 30 days shred चा काही अनुभव आहे कां? ऑनलाईन रिव्ह्यु बरेच पॉझीटेव आहेत.>>>>> चांगला अनुभव आहे. घरातली मंडळी ही सिडी वापरुनच व्यायाम करतात. Happy

माझी मैत्रिण भात रटरटायला लागायच्या आधी वरचं पाणी काढून टाकून मग बारीक गॅसवर झाकण घालून शिजवते. असे स्टार्च काढून टाकल्याने फरक पडतो का? त्यांची ती ट्रॅडिशनल मंगलोरी पद्धत आहे म्हणे. (त्याचा कार्ब्ज वगैरेही संबंध बहुतेक नसावा)

सुहास्य, अगं हा डायेट्प्लॅन नाहीये. व्यायाम आहेत. ३० दिवस करायचे असतात. युट्युबवर आहेत.
वैद्यबुवा, मी आताच चालू केलेयत. १ महीन्याने बघते किती फरक पडस्तो ते पण इन्सॅनीटीपेक्षा फार बेटर आहेत. इंसॅनीटी करताना टाच दुखावलीये आणि गुडघ्यांकधून कर-कर आवाज यायला लागलाय. Sad

मनी, मी करायचे ती ३० डेज श्रेड. चांगला(च) व्यायाम करवून घेते ती (बीस्ट) जिलियन मायकल.. Proud उत्तम व्यायाम आहे, फक्त गुढघ्यांना सांभाळून. म्हणजे पहील्याच दिवशी सगळी सिडी संपवायची किंवा ती करते तसंच करायची हिंमत करू नये. हळूहळू झेपेल तसं वाढवावं, नाहीतर दुसर्‍या दिवशी मेजर वाट लागते.. (पण मला समहाऊ असे वाट लागणारे व्यायामप्रकार आवडतात. चॅलेंजिंग वाटतात.. Happy )

अगं जिलियन मायकलच्या व्यायामाने तसा त्रास झाला नाही पण इंन्सॅनीटीने गुढ्ग्यांची वाट लागलीये... कर-कट असा आवाज येतो जीने चढताना आणि टाचापण हर्ट झाल्यात.. मीच अगाऊपणा केला विना शूज व्यायाम केला.
या गुढग्यांचा आवाज जाण्यासाठी काही उपाय आहे कां?

halu halu intensity vadhat janare....online exercises ahet ka? aslyas linka dyala ka ?

काल मी बाबा रामदेव youtube याचें व्यायाम करत होते ,पायाला खुप कळ आले, हळु हळु जमेल असे वाटत आहे
रचाक्याने ते वज्रासना वर बसुन होते

सुमेधा, युट्युबवर जिलीयन मायकल ३० डेज श्रेड लेवल १ शोधा. २७ मिनिटांचा एक व्हिडीओ आहे. तोच फॉलो करायचाय. लेवल २ किंवा ३ पण असतील बहुतेक.

जिथे जिथे हा प्रश्न योग्य वाटत आहे तिथे तिथे लिहित आहे..
जर पेशंट पीसीओएस डिटेक्ट झालेला असेल तर..
१) वजन कमी करण्यातला एक उपाय म्हणुन सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घ्यायला सांगतात .. यात मध पीसीओएस ला चांगला पडेल काय ?
कारण मध शुगर लेव्हल वाढवु शकतो.. मग अगदी एक टी स्पून मध आणि २-३ टी स्पून लिंबू रस घेतला तर चालेल काय?
२) नुसते लिंबाचा रस आणि कोमट पाणी घेतले तर फरक पडतो का?

जिम लावलीये. रिलायन्स वेलनेस सेंटरच्या बाजूलाच फिटनेस वन म्हणून जिम आहे. याच बिल्डींगमधे माझे डॉक्टरही आहेत. अगदी जवळ असल्याने तिन्ही कामं एकत्रच होतात. जे काही व्यायाम सांगितलेत ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येणं हा फायदा आहे. सध्या योगा आणि इतर फ्लोअर एक्सरसाईजेस सांगितलेत. सहा आठवड्यांनी नवे व्यायाम सांगतील. त्रास होतोय पण करणं भाग आहे.

मीही थोडेफार आसनं केले रामदेव बाबांचे, पण २-४ आसनं जमतच नाही. रामदेवबाबा तिकडे उलटेपालटे होतात, मी मात्र मख्खासारखा बघत बसतो. Happy

मी वजन कमी करण्यासाठी साउथ बीच डायट केला होता फोलो दोन महीने पण सोबतीला व्य्आयाम होताच. नेट्वर त्याच्या स्टेप १,२,३ मधे खायच्या गोश्टीन्ची यादी दिली आहे. शाकाहारी लोकानाही खूप पदार्थ खाता येतात यात. थोडी क्रियेटिव यादी बनवावी लागेल.
उदा: डाळीचे डोसे, कोशिम्बिरी सर्व प्रकारच्या, मोड आलेल्या कडधान्यचे सालाड, इ.

विदया.

नुसते लिंबाचा रस आणि कोमट पाणी घेतले तर फरक पडतो का?>>>>>>>>>>> मला काहीच फरक पडला नाही... Sad

दक्षिणा दी ने दिलेल्या झोपुन करायच्या काही एक्सर्साईझ मी रोज न चुकता केल्या....आणि दिवसा नॉर्मली आपण जे जेवतो खातो ते तसच ठेउन रात्री भात कमी केला ( बंद नाही ) आणि त्या बदल्यात अ‍ॅप्पल, संत्री, कलिंगड असा खुराक चालु केला .... Wink माझी उंची ५'-१०" आणि वजन ८० कि. होत आता वजन २-३ महिन्यात ७३ वर आलेय......

पण व्यायाम न चुकता रोज....आणि तोही फक्त २० ते २५ मिन....

आळशी असल्याने धावणे, पळणे असले प्रकार होत नाहीत.....एक आठवडा तेही केले एकदम जोशात....पण अती तेथे माती या म्हणीप्रमाणे धडपडले आणि नी लिगमेन्ट तोडुन पर्टिकल फ्रॅक्चर पण करुन घेतले..... Sad

एकंदर चर्चा पहाता मला काही जाणवणारे मुद्दे

१. वजन कमी करतना खुप जण अगदी मनाचा कंट्रोल, भरपूर व्यायाम, साखर बंद, बाहेर गेलं तरी फक्त सूप्+सॅलेड इ.इ. करतात. इच्छित वजन कमी झाले की परत ये रे माझ्या मागल्या..... कारण आपल्या भारतिय जिवनशैलीत एकदम सगळ्या गोष्टी सोडणे शक्य नसते. त्या मुळे आहे त्या गोष्टी तच काही वैविध्ये करुन आपण वजन कंट्रोल्मधे आणु शकतो.

२. व्यायाम व हेल्दी खाणे ही आपली जीवशैली असायला हवी. फक्त वजन कमी करण्या पुरते नको.

३. अजिबात तेल, तूप, गोड न खाणे हे ही योग्य नाही. आपण उगाचच वेगळे पडतो. का असं रहायचं? जे काही खायचय ते मर्यादेत खाणे हा खरा कंट्रोल. प्रत्येक वेळीच न-कारात सामर्थ्य असतेच असे नाही. त्यामुळे आपण जीवनातले छोटे छोटे आनंद हरवुन बसु. ( परवा लेकीने पहिल्यांदाच स्वतः एकटीने गाजर हलवा केला. मी खाल्ला वाटी भर. कित्ती आनंद झाला तिला...)

सध्या माझे वजन टोटल १७ किलो कमी झाले (४ महिन्यात). मी पहिले १० किलो अगदी व्यवस्थित आहार फॉलो केला. पाय दुखणे वगिरे तक्ररी कमी झाल्या. चालण्यचा स्टॅमिना वाढला. नंतर मात्र हळु हळु नेहेमीचे पदार्थ खायला सुरुवात केली पण कमी प्रमाणात व काही पथ्य पाळुन जसे चहा दिवसातुन२ वेळा बीन साखरेचा, तेल अगदी कमी, दिवस भरात आर्धा चमचा घरचे साजुक तूप, एक वाटी डाळ, ज्वारी भाकरी, भरपूर सॅलेड, फळे, ताक, थ्रेप्टिन ची २ बिस्किटे, दुधी ज्युस, भाज्या ( नेहेमी प्रमाणे गुळ, खोबरे घालुन ). घरात काही गोड आणले तर एकच वडी/पीस. भात मात्र पूर्ण बंद. ईडली फक्त २ (एका वेळी). व्हीट फ्लेक्स, बदाम, अक्रोड, खुब खाओ चे ज्वरी पफ, भजी केली तर फक्त २ पिस. बटाटे वडा एका वेळी एकच....

मध्यंतरीच्या काळात दोन लग्न, एक वास्तुशांत, एक बारसं, दोन दिवसांची ५स्टार कॉन्फरन्स, दिवाळी... असे अनेक धक्के आले. पण ज्या दिवशी सकाळे/ वा रात्री जास्त खाणे होइल, त्याचा पुढला आहार मात्र अगदी डाएट. उदा सकाळी लग्नाचे जेवण ( मर्यादितच) झाले तर रात्री फक्त फळ्+ताक किंवा सूप्+सॅलेड आणि नाश्त्यात फक्त व्हीट फ्लेक्स ( ३ चमचे+आर्धा कप दूध) व त्याच बरोबरीने व्यायामात आर्धा तास वाढ. असे फॉलो केले. त्या मुळे कन्सिस्टंट्ली वजन कमी होत गेले. खुप कॉन्फिडन्स आला आहे. अजून १० किलो घटवायचा प्लॅन आहे.

त्याच बरोबरेने आझं मेडिटेशन चालुचाहे. मनोध्यर्य टिकवायला फार उपयोग होतो. रोज अंतर्मन जागॄत करण्याचे एक्सर्साइज करतेच. सध्या अ‍ॅक्युप्रेशर शिकत आहे. त्याचाही फायदा होतो आहे छोट्या छोट्या तक्रारींवर.

रोजचे खाउन वजन कमी होण्याचा रेट कमी होइल, पण इकडे घाई कोणाला आहे. आपल्याला थोडीच उद्या रँप वर चालायचे आहे. मागच्याच आठवड्यात सगळ्या टेस्ट परत केल्या. सगळं नॉर्मल आहे. मागे वजन कमी व्हायच्या आधी एक दोन रीपोर्ट खराब होते ते ही सुधारले. अजुन काय हवं आहे. परवा खुप वर्षांनी आवडत्या गाण्यावर १५ मोनिटं मनसोक्त न दमता नाचु शकले बेभान होवुन..... अजुन काय पाहिजे?

मोहन की मीरा >>> इन्स्पायरिंग...
सोप्या शब्दात खुप छान सांगितलत...
Happy

बरोबर आहे. एकदा वजन कमी झाले की ते टिकवण्यासाठी कायम लक्ष ठेवणे जरुरी आहे. कारण परत वजन वाढण्याची शक्यता असतेच आणि उत्साह मात्र कमी झालेला असतो. भारतीय कपड्यान्मधे विशेष करून स्त्रियान्च्या कपड्याना नाड्या असतात किन्वा थोडे ढिले असतात. पन्जाबी ड्रेस, सअड्या याना. त्यामुळे पोट सुटले तरी लगेच जाणवत नाही. जीन्स किन्वा प्ञ्न्ट मधे ते लवकर कळून येते. त्यामुळे नियमित आहाराकडे लक्श असणे जरुरी आहे.

विद्या.

Pages