रंगभूमीची अप्रतिष्ठा होईल, वा तिचं पावित्र्य बिघडेल म्हणून मी माणसांचे हे जिणे नाटकाबाहेर ठेवायला मी तयार नाही. रंगभूमीपेक्षा माझ्या दृष्टीने माणसे आणि त्यांचे आयुष्य कधीही महत्त्वाचे आहे. एखाद्या प्रकारचे आयुष्य बाहेर ठेवून रंगभूमी पवित्र राहणार असेल, तर त्या पावित्र्याविषयी मला प्रेम नाही. माझी मराठी रंगभूमी मेलेल्या ’काल’ची किंवा ’आज’ची आहे म्हणून तिने एका सुस्थित जगाचीच स्वप्नरंजनात्मक वातड चित्रे रंगवीत जगता कामा नये. तिने आजचे, या घटकेचे खरेखुरे जगणे, काहीवेळा त्यातील उघडेवागडेपणासकट, सच्चेपणाने, अर्थपूर्णपणे व समर्थपणे दाखविले पाहिजे. सच्चेपणात मला तिची ताकद वाटते. - श्री.
"...मिलॉर्ड, जीवन ही एक महाभयंकर गोष्ट आहे. जीवनाची चौकशी करून त्याला नोकरीवरून काढून टाकलं पाहिजे...जीवनाला फाशी दिलं पाहिजे! या जीवनात फक्त एकच गोष्ट सर्वमान्य आहे...शरीर! तुम्ही नाही म्हटलंत तरी ते सर्वमान्य!
हे विसाव्या शतकातल्या सुसंस्कृत माणसाचे अवशेष. पाहा कसे एकेकाचे चेहरे रानटी दिसत आहेत ते. त्यांच्या ओठांवर झिजलेले सुंदर सुंदर शब्द आहेत. पोटात अतृप्त वासना आहेत." इति लीला बेणारे.
रंगकर्मींच्या अनेक पिढ्या तेंडुलकरांनी वाट सुकर केली, म्हणून दर्जेदार कलाकृती निर्माण करू शकल्या. मराठी रंगभूमीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्या श्री. अतुल पेठे यांनाही तेंडुलकरांनी व त्यांच्या नाटकांनी प्रभावित केलं होतं.
ज्येष्ठ साहित्यीक, नाटककार , पटकथाकार विजय तेंडुलकर यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते.
त्याना विनम्र श्रद्धांजली.