आज तरी कुणी जरा इकडे लक्ष देईल काय?
शकूनीच रक्त पुन्हा विमल करता येईल काय?
जिथे तिथे उभेच हे, मही- रावण- दुर्योधन
राम कॄष्ण बुध्दाला इथे जगता येईल काय?
अहिल्याच्या शिळेला आज देखिल वाटते भिती
साधुवानी रावण, रुप राघवी घेईल काय?
तुटलेली ही नाती आणि फाटलेली ही मनं
दुभंगल्या आकाशी आत्मा तरी जाईल काय?
प्रश्नांचीच पिशाच्च नाचतात माझ्या भोवती
कोणी मला त्यांची चोख उत्तरे देईल काय?
काढू नकोस ऐसे अंदाज या मनाचे
अवशेष फक्त येथे रक्ताळल्या रणाचे
गेले लढून होते येथे तुझे इशारे
सांगेल रक्त ते ही माझ्या कणाकणाचे.
गर्दी अमाप होती भुलली तुझ्या रुपाने
रेखून चित्र गेली डोळी तुझ्या तनाचे.
गर्दीत याच लफंगे साधून डाव गेले
झाले किती आघात माझ्यावरी जनाचे.
ए॓कून घे जराशी उठते इथे आरोळी
गारूड त्यात आहे माझ्या मुकेपणाचे.
येथे कुणी न रडला दु:खास माझ्या तेंव्हा
ते वाजत थेंब आले पझरल्या घनाचे.
अश्रूंच्या या पुराने वाहून आज न्हेले
मंजुळ गीत आपले वेळूतल्या बनाचे.
छेडू नकोस आता निर्भाव हे तराणे
झाले तसेही जगणे भिंगूरल्या क्षणाचे.
झाला उजेड वैरी अंधार शोधतो मी
तुझ्याविना झुले आठवांचा हिंदोळा
ओथंबले दु:ख जरी सुगंधी या कळा
व्याकुळला कसा आज संधीकाळ
हरवल्या क्षणांची फुले दिपमाळ
झर्यातून येई जुन्या दिवसाची हाक
असेल का आज तरी कुणी तिथे एक
तळ्याकाठी फांदीवर बोलावितो काक
अनाठायी उगा लागे जिवाला या धाक
कशा कधी उलगल्या मनातल्या गाठी
मोहरल्या पुन्हा चंद्र-बनातल्या भेटी
अजूनही प्रियकरा इथे तुझ्यासाठी
रोज एक स्वप्नतारा जळे माझ्या दिठी
हलताना संथ स्वैर बदकांच्या माळा
अजूनही साक्ष देई तो जलाशय निळा
तुझ्याविना झुले आठवांचा हिंदोळा
ओथंबले दु:ख जरी सुगंधी या कळा.
जे व्हायचे ते घडून गेले
इथे पावसाळे रडून गेले.
कोण वाचतो शब्दास आता
ज्ञान ग्रंथात सडून गेले.
घातले दाणें जरी मुठीने
उपाशीच पक्षी उडून गेले.
माझी मी दिली कुर्हाड ज्यांना
माझ्याशीच ते लढून गेले.
रक्तावर पोसले तरु जरी
पानगळीत हे झडून गेले.
गर्दीत पाहीले सोयरे जे
नजरे समोरच दडून गेले.
किती सावरावं प्रत्यकाला?
आसवात गाव बुडून गेले.
रात्रीच स्वछ निळं, पारदर्शी आभाळ. एका दुरवरच्या पोकळीतील उच्चश्राव्यावरून एक प्रखर चांदणी, आपली अलगद पावले टाकत स्थिरपणे खाली उतरते. तिच्या पाठी तिच्या शुभ्र वस्त्रांचा घोळ अस्थिरपणे थरथरत पायर्यांवरुन खाली सरकतो. तिची ही वस्त्रे विजेच्या तारांप्रमाणे शुभ्र- प्रखर असली तरी तिच्या डोळ्यात मात्र खोल कुठेतरी सांजेचा निस्तेजपणा आहे. मन व्याकुळ करणारा. ती नभोमंडपातील इतर तारकांच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागते. इतर तारकां ही तिला वाट करुन देतात. ती चांदणी मधेच एकदम थांबुन भिरभीर नजरेनं सगळीकडे पहाते.
मी येण्या आधी येथे, मला कधी ना कळले होते
प्रत्यकाचे हात इथे पापधुळीने मळले होते.
शाळेत शिकलो एक अन् जगी पाहीले दुजेच काही
अज्ञानाचेच दळण येथे सज्ञानाने दळले होते.
नशा, वासना, लाचारी पैशाचे हे मंगळ येथे
चंगळ पाहुन मन माझे, कधी जराशी चळले होते.
सभ्यतेवर थुंकूण जेंव्हा जुगार्याचा डाव मांडला,
मागुन आल्या शब्दांनीच मनास तेंव्हा छळले होते.
विसरुण या जगास आता स्वप्नात रमणे ठरले पण,
मनात माझ्या स्वप्नांचे गावच अवघे जळले होते.
कशासाठी कुणी ही भांडू नका रे
उगाच हा खेळ असा मांडू नका रे.
सुंदर हे जग आहे, नासू नका रे
माणसात दैत्यासम भासू नका रे.
कुणास ही कुणी शिव्या मोजू नका रे
दगडाला देव म्हणुन भजू नका रे
मर्यादेच्या पलीकडे जाऊ नका रे
सत्वालाही डाग कधी लावु नका रे.
हसणारी कळी कधी तोडू नका रे
कुणाचे ही सुख कधी ओढू नका रे
दुजासाठी दुजे होत नडू नका रे
स्वतःसाठी स्वतःच रडू नका रे.
जोडलेल्या नात्यास तोडू नका रे
माणसात माणुसकी सोडू नका रे.
शब्दांवर माझ्या असे चिडू नका रे
सोडताना श्वास मला भिडू नका रे.
येता भरुन आभाळ
उठे शब्दांचे वादळ
घुंगूरले मन होय व्याकूळ व्याकूळ.
सारे कल्पनेचे भास
तरी लागते का आस ?
रंगवेडी सांज होते उदास उदास.
वारा खेळे अंगणात
बोले पाखरु तृणात
कोकीळेच गाणं हिरव्या पानात पानात.
काजळले निळे पाणी
थरारली पापणी
आठवते जुने काही पुन्हा फ़िरुन फ़िरुन.
जेंव्हा उतरली रात
हले चांदणे पाण्यात
देई मोर केका दूर बनात बनात.
घुमे घुबड रानात
भरे काहूर मनात
दडुनीया गेली सांज खोल पाण्यात पाण्यात.
एका श्रीमंत घरी एक कवी मुलगी पहाण्यासाठी येतो. सोबत त्याचे बाबा आणि ताई असते.
तिघेही अलिशान घरातील कोचावर जाऊन बसतात. औपचारीक पाहुंचारा नंतर मुलीला बोलवलं जातं. ताईला तर वहीनी पहाण्याची केंव्हापासून घाई झाली होती. मुलगी येते, पदर सवरत अगदी न लाजता समोर येऊन बसते. आणि तिचा हाच बाणेदारपणा कवीच्या बोलघेवड्या ताईला खुप आवडतॊ. मुलीकडे पहात न राहून पहील्यांदा तिच बोलायला सुरुवात करते. आणि सुरुवात करते ती ही अशी की यापुर्वी खुप दिवसाची ओळख असल्याप्रमाने,
ताई : अं.... तुम्हाला कविता आवडतात? नाही म्हणजे आमचा दादा देखिल कवी
आहे म्हणुन म्हटलं.
एकांतात तुझे गाणें स्फुराया लागले
तुझ्याविना स्वप्नातच मन मुराया लागले.
अबोल्या या मनाची जणु ओळखुन भाषा
झाड-झाड माझ्यासवे बोलाया लागले.
लपविले किती जरी मी डोळ्यातले पाणी
फूल-फूल नजर माझी निरखाया लागले.
आसवांत चमकली शुभ्र तारकांची माळ
चांदणें ही माझ्यासवे हसाया लागले.
एकटाच आलो मी आता एकटेच जाणे
खोल खोल आत हे आता रुजाया लागले.