इझी चेअरवर बसून फ्रेंच विन्डो मधून पावसाच्या सरींचा आनंद घेत, हातातल्या मग मधून चहाचे घुटके घेत होतो. कोकण चा पाऊस जितका चांगला तितकाच वाईट. झोडपायला लागला तर थांबतच नाही. नाही तर, क्षणात आहेआणि क्षणात गायब. घराच्या पुर्वेला टेकडीवर धो धो कोसळणारा पाऊस आणि पश्चिमेला समुद्रात मावळत्या सूर्याचे दर्शन. कोकणाच्या पावसाचं खरच काही खरं नाही.
गुरूवार बिर्याणी आणि खिचडी. दुपारी व्हेज बिर्याणी आणि रात्री मुगाची खिचडी. नेव्ही चा मेनू कधी कोणी ठरवला माहित नाही. भारतात कोणत्याही नेव्हल युनिट किंवा शिप वर गेलं तरी मेनू तोच. थोडाफार फरक. पण मंगळवारी पूर्ण शाकाहारी, गुरूवारी बिर्याणी ठरलेलंच. मला पण तीच सवय जडलेली. सवयी लवकर सुटत नाहीत.
त्यात, एकटा जीव सदाशिव. कोण विचारणार नाही. बिर्याणी, वर साजूक तुपाची धार, सोबत लिंबाचं लोणचे आणि टॉमेटो सॉस, शेवटी दही साखर. मस्त मेनू.
सकाळचं जॉगिंग, प्राणायाम, आन्हिक, नाश्ता उरकला होता. वेळ सकाळचे ९:३० झालेले.
आज मंगळवार. आठवडे बाजार भरण्याचा दिवस. मिलिटरीत मेस सेक्रेटरी असल्यापासून सवय लागली, आठवडा भराची भाजी, फळे एकदाच आणायची. आई नेहमी म्हणायची "जितकं लागेल, जसं लागेल तसं आणत जा. एकदम सगळं आणू नको". पण सवय ती सवयच. नाही मोडली.
घराच गेट बंद केलं. ब्राऊनी ला आवाज दिला. आणि बाजाराकडे निघालो. पायीच जायच हा पण अलिखित नियम होता.
दुधी, दोडकी, कार्ली, कांदे अस करत करत खरेदी झाली. रिक्षा स्टॅंड वर चहा प्यायचा आणि घराकडे निघायचा नेहमीचा शिरस्ता.
आज रविवार. मग उद्या सकाळी पळणे नाही. रनर्स चा सोमवार हा विश्रांती दिवस. कोणी, कधी, का ठरवलं माहीत नाही आणि कधी त्यावर विचार करावा असा विचार सुद्धा जवळपास फिरकला नाही. पण हा नियम कित्येक वर्ष पाळत आलोय..
तर, उद्या निवांत. म्हणजे आज उशिरा झोपता येईल. आजची कामे उद्या केली तरी चालतील.
डिनर उरकलं. दार लोटलं आणि समुद्राकडे पावले वळली. आज पौर्णिमा. घरामागील टेकडी आडून पूर्ण चंद्रबिंब डोकावत होते. चालता चालता दूर पर्यंत आलो होतो. ओल्या वाळूत उमटणारी पाऊलखुणांना भरतीच्या लाटा पुसत होत्या. मधूनच वाळूतून पांढरे खेकडे डोकावत होते.
सी फेसिंग घराच्या गच्चीवर चहा पिण्याची मजा काही औरच...
संध्याकाळी टेरेस वर चहा घेऊन बसलो होतो. समोर नारळांच्या झाडामधून समुद्रात बुडणार्या सहस्त्ररश्मी ला न्याहाळत होतो. दिवाकराला सामावून घेताना रत्नाकराचा आनंद उफाळणार्या लाटांमधून व्यक्त होत होता....
दिवाभितांचे राज्य सुरू होणार म्हणून त्यांचे आनंदाचे चित्कार कानी पडत होते. तर दिवसभर भटकून घराकडे जाणार्या पक्ष्यांची लगबग सुरू होती....