सिंध परिसरातला अरबांचा उपद्रव कमी झाला असला तरी तोखारिस्तानात बुध्दविहार, बौद्ध प्रतिमा नष्ट करणे, जबरदस्तीने
धर्मांतरे करवणे इत्यादी अरबी दहशत सुरु होती. त्यामुळे ललितादित्याने तोखारिस्तानवर हल्ला करून अरबांचा पाडाव केला.
(तोखारिस्तान - आत्ताचे बल्ख, अफगाणिस्तान)
काश्मीरच्या अरबांवरील या विजयाप्रीत्यर्थ काश्मिरी लोक उत्सव साजरा करतात हा उल्लेख अल् बरुनीने ११ व्या शतकात, सुमारे ४०० वर्षानंतर केला आहे. त्यावरून हा किती महत्वाचा विजय होता हे समजेल. तोखारिस्तानातला चंकूण (सेनापती)
ललितादित्याच्या दरबारी होता असे कल्हणाने राजतरंगिणीत लिहिले आहे.
आता मोर्चा उत्तरेकडे वळवून ललितादित्याने गिलगिटमधील दरद लोकांची व चित्रलमधल्या टोळ्यांची बंडाळी मोडून काढली.
(चित्रल, गिलगिट, लडाख स्वारी)
तारापीडाच्या काळात गिलगीटवर असलेले काश्मीरचे वर्चस्व कमी होऊन तिबेटने तिथे पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली होती. तसेच हिमालय ओलांडून नेपाळमार्गे मगध व बंगालवर सत्ता मिळवण्याचा तिबेटचा प्रयत्न होता. चीनमधून भारतात येणारे पाचही व्यापारी मार्ग तिबेटच्या नियंत्रणाखाली आले होते.
तिबेटच्या विस्तारवादी धोरणाला आला घालण्यासाठी ललितादित्याने उत्तरेकरून व यशोवर्मनने दक्षिणेकडून तिबेटवर हल्ला करून तिबेटच्या अधिपत्याखाली असलेले व्यापारी मार्ग खुले केले. तिबेटला शह देण्यासाठी ललितादित्याने चीनला
महापद्मनंद नाग (वुलर सरोवर) परिसरात सैनिकी तळ उभारण्याची परवानगी दिली परंतु कमजोर चिनी राज्याने तळ उभारला नाही.
या नंतर स्कार्दू, लडाख व द्रास हे तिबेटच्या अंमलाखाली असलेले प्रदेश ललितादित्याने जिंकून घेतले.
इसवी सन ७२५ मधल्या राज्यारोहणानंतर सुरु झालेल्या या मोहीम साधारण इ. स. ७३३ पर्यंत सुरु होत्या.
या विजयानंतर काश्मीरमध्ये परतलेल्या ललितादित्याने परिहासपूर (आत्ताचे पट्टण) या नव्या राजधानीची व मार्तंड मंदिराची
निर्मिती करवली.
परिहासपुरात त्याने मुक्तकेशव, परिहासकेशव या देवळांची निर्मिती केली. उत्तर विजयातून ललितादित्याने अमाप संपत्ती मिळवली. कल्हणानें मुक्तकेशवाची मूर्ती ८४००० तोळे सोने वापरून बनवली असा उल्लेख राजतरंगिणीमध्ये केला आहे. आजच्या हिशोबाने केवळ या मूर्तीची किंमत ९ अरब २७ कोटी ३६ लाख रुपये होईल. परिहासकेशवाची मूर्ती ८४०००तोळे चांदीची होती. आत्तापर्यंत शैव प्रभाव असणाऱ्या काश्मिरात ललितादित्याने वैष्णव भक्तीला सुरुवात केली.
त्याने एक चैत्य स्तूपही बनवला, ज्यात बामियानच्या धर्तीवर आकाशाला भिडणारी बुद्धमूर्ती होती.
आता त्याच्या सैन्यात तुर्क व कंबोज सैनिकांचाही भरणा होता. तोखारिस्तान, काबुल, झाबूलच्या मोहिमांदरम्यान मोहिमांदरम्यान त्याचा ईशानदेवीशी विवाह झाला.
केवळ साम्राज्य वाढवण्याकडे ललितादित्याचा कल नव्हता तर त्याच्या प्रजेला समाधानाने जगता यावे यासाठी त्याने लोकोपयोगी कामेही केली. उंचावरील गावांना मोठे रहाट बसवून पाणीपुरवठा करणे, कालवे बनवणे, ठिकठिकाणच्या खिंडीतले मार्ग सुधारणे इत्यादी कामे त्याने केलीच.
त्याच्या तिन्ही राण्यांनी काश्मीरमध्ये बाजार, स्तूप, मंदिरे अशी प्रचंड निर्मितीकार्य केली.
पहलगामपासून मट्टन येथल्या मार्तंड मंदिरापर्यंत काढलेल्या लिद्दर नदीच्या कालव्याचे अवशेष जागोजागी दिसतात. याच
कालव्यापासून पाट काढून मंदिरात वाहत्या पाण्याची सोय केलेली आजही दिसते.
जमीनदार/सरदार (काश्मीरमधले डामर) वरचढ होऊन मध्यवर्ती सत्तेला आव्हान देऊ नयेत तसेच प्रजेला त्रास देऊ नयेत म्हणून त्यांच्याकडे मोजके पशुधन व अन्नधान्याचा साठा ठेवण्याचा त्याचा आदेश होता.
ऋणनिर्देश :
1. कर्कोटक राजांची वंशावळ व ललितादित्याचा दिग्विजय इ. माहिती राजतरंगिणीच्या श्रीमती अरुणा ढेरे व श्री प्रशांत तळणीकर यांनी केलेल्या मराठी अनुवादातून घेतली आहे.
2. अत्यंत महत्वपूर्ण अशी या राजांचे कालखंड, वेगवेगळ्या मोहिमांची विस्तृत माहिती श्री. संजय सोनवणी यांच्या ‘काश्मीरचा सम्राट ललितादित्य’ या पुस्तकातून घेतलेली आहे.
भाग १ - एक उपेक्षित सम्राट
भाग २ – नागभूमी
भाग ३ - कर्कोटक वंश
भाग ४ – चंद्रापीड
भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड
भाग ६ - उत्तर विजय व राज्य
भाग ७ – दिग्विजय
रोचक मस्त.
रोचक
मस्त.
इंटरेस्टींग माहिती.
इंटरेस्टींग माहिती.