नर्मदार्पणमस्तु

Submitted by Narmade Har on 7 December, 2023 - 22:44

नर्मदार्पणमस्तु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

> > >तुमचे पाहिले दोन भाग वाचून हे विधान पटत नाही.
नास्तिकते कडे झुकणारा किंवा विज्ञानिष्ठ माणूस व्यक्तिपूजा करणारा नसतो. > > > कुठल्याही गोष्टीचे सरळ दोन भागात विभाजन करणे अशी एक मानसिकता आढळून येते . हे आहे किंवा नाही संपला विषय . परंतु प्रत्येक गोष्टींचे असे दोन सरळ भागांमध्ये विभाजन करता येत नाही . काळे आणि पांढरे या दोन रंगांमध्ये राखाडी रंगाच्या अनेक छटा असू शकतात . पूर्णपणे आस्तिकतेचे स्तोम न मानणारा मनुष्य सुद्धा आवडलेल्या व्यक्तीची पूजा करू शकतो . मी स्वतः शिंदे पुलावर दाभोळकर सरांचा फोटो लावून पूजा करणारे भक्त पाहिले आहेत . आता त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये बसवाल ?
जगाचे दोन रंगांमध्ये विभाजन करणे ही डावी मानसिकता आहे . जग बहुरंगी आहे , आनंद घ्या !

> >इथे पूर्ण यादी मिळेल. > >
केशव कुल आपण दिलेल्या यादी बद्दल धन्यवाद . मला हेच जाणून घ्यायचे होते की आपण धार्मिक कुणाला म्हणत आहात . कॅथोलिक पंथाच्या अनुयायांना धार्मिक मानणे थोडेसे धाडसाचे आहे . तो एका पुस्तकावर ,आणि एका व्यक्तीवर आधारित एक संप्रदाय असून हे सर्व लोक सांप्रदायिक होते . इतिहासामध्ये असे प्रमाद सांप्रदायिक लोकांनी केलेले आढळून येतात .धर्म ही फारच मोठी आणि व्यापक संकल्पना आहे . आपल्या देशामध्ये थोर ऋषीमुनी होऊन गेले त्यांना धार्मिक म्हणता येईल . धडा वगळणारे देखील धार्मिक नव्हेत राजकारणी आहेत .

> > तुमचे प्रतिसाद छान आहेत. > > धन्यवाद . खरे तर मला इथे इतकी चर्चा चालते याची काही कल्पना नव्हती . तसेच मला नर्मदा परिक्रमा या विषयावर लोकांशी चर्चा करायला अधिक आवडले असते . परंतु इथे अन्य विषयांवरच अधिक चर्चा सुरू आहेत . असो हरकत नाही . जिथे फक्त मला काही मांडावेसे किंवा खोडावेसे वाटले तिथे प्रतिसाद दिले . प्रत्येक व्यक्तीचा सुप्त हेतू काय आहे हे ओळखता येणे कठीण असते . मी प्रकट हेतु गृहीत धरून उत्तरे देत आहे . नर्मदे हर !

अरे व्वा!
सुरूवातीचे काही प्रतिसाद पाहून ब्लॉग वर जाऊन वाचायला सुरुवात करावी असे वाटतेय. इथे दिले तर उत्तमच.
तुमच्यात पडलेला दृश्य फरक बोलका आहे. मूळचे रूपडे तेजःपुंज आहे. साधूवेषात (तुम्ही साधूच असाल तर क्षमस्व) रूप राजबिंडे वाटतेय. या परिक्रमेने तुम्हाला जे मिळाले ते दिसतेच आहे.

मी नास्तिक आहे. पण तुमची श्रद्धा माझ्या जगण्याआड येत नसेल, निरूपद्रवी असेल आणि तुम्हाला त्यातून आनंद मिळत असेल, तर त्यात मलाही आनंद आहे.

अशा मोहिमा, साहसी मोहिमांचे आकर्षण आहेच. हे ही खरे की बाह्य फरकांपेक्षा अन्य काही फरक अनुभवता येतात. अनुभवविश्व समृद्ध होते..

अभिनंदन तुमचे. भेटूयात.

Narmade Har
नर्मदे हर !
जे लिखाण अजून पुरे व्ह्यायचे आहे त्याकडे लक्ष आणि वेळ पुरवावा ही विनंती.

खरे तर मला इथे इतकी चर्चा चालते याची काही कल्पना नव्हती>>> हो तर. दर्जेदार सकारात्मक चर्चा, प्रेम आणि आपुलकी यासाठी मायबोली प्रसिद्ध आहे. मायबोली म्हणजे मायेचा झराच जणू काही.

दरवेळेस माझी पादत्राणे फाटली की दुसरा नवीन जोड घेऊन कोणीतरी तयार असायचे आणि माप देखील परफेक्ट ! हा अनुभव सर्वच बाबतीत आला . मला परिक्रमेसाठी झोळी मिळाली , काठी मिळाली ,आसन मिळाले ,वस्त्रे मिळाली , पादत्राणे मिळाली ,कमंडलू मिळाले , पूजा साहित्य मिळाले , अगदी नर्मदा मैयाचा शृंगार देखील मिळाला . सर्व काही जेव्हा हवे तेव्हा मिळत गेले .>> ह्या सा ठी काही पैसे द्यावे लागले का हे फुकट उपलब्ध होते? म्हणजे यात्रा करायची असल्यास पैशाची जुळणी करताना आपला प्रतिसाद उपयोगी होईल.

> > >> ह्या सा ठी काही पैसे द्यावे लागले का हे फुकट उपलब्ध होते? म्हणजे यात्रा करायची असल्यास पैशाची जुळणी करताना आपला प्रतिसाद उपयोगी होईल. > > > कुठेही एकही रुपया द्यावा लागत नाही . तुम्ही दिले तरी लोक पैसे परत करतात . फक्त समुद्र पार करणारे नावाडी १५० रु आकारतात .ते देखील असतील तर अन्यथा माफ केले जातात .परिक्रमा करताना पैशाचे ऍक्च्युली ओझे होते कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही मध्ये . ना तुम्हाला काही खरेदी करावे लागत ना तुम्हाला काही विकत घेण्याची कुठे संधी मिळते . त्यामुळे वाटेत लोक जे पैसे देत होते ते सर्व मी तिकडेच वाटून टाकले . परिक्रमेचा सोपा नियम असा आहे की कोणी काही दिले तर घ्यायचे आणि कोणी काही मागितले तर द्यायचे . त्यामुळे दिलेले पैसे घ्यावेच लागतात . आणि ताबडतोब तुम्हाला योग्य वाटेल अशी व्यक्ती , संस्था , मंदिर किंवा कार्य पाहून ते देऊन टाकायचे . तुम्हाला लागणारी औषधे काही असतील तर ती मात्र विकत घ्यावी लागतात . परंतु नर्मदेच्या काठावर काही ठराविक मोठी शहरे सोडली तर बाकी कुठेही फारशी दुकाने वगैरे नाहीत . चपला वस्त्र व अन्य वस्तू लोक तुम्हाला जागेवर आणून देतात . बरेच आश्रम असे आहेत की तुम्हाला आल्या आल्या विचारतात की तुम्हाला कशाची गरज आहे सांगा आणि ती वस्तू पुरविली जाते . नर्मदे काठी दात्यांची खूप मोठी परंपरा आहे .

मी रोज ३ ते ४ किलोमीटर चालतो. आज चालताना तुम्ही एका लेखात लिहल्याप्रमाणे गाईची टेक्निक वापरून बघितली. जे अंतर पूर्ण करायला ४० मिनिटे जायचे ते ३० मिनिटात पूर्ण झाले. विज्ञान बाजूला ठेऊन तुम्ही तुमचे अनुभव सांगत गेलात तर अजून मजा येईल आणि आम्ही वाचक पण चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ

म्हणजे यात्रा करायची असल्यास पैशाची जुळणी करताना आपला प्रतिसाद उपयोगी होईल.>>> ह्या पद यात्रेला पैशा पेक्षा, शारीरिक and मनोबल वाढवणे, ही तयारी जास्त लागते.
एका मावशीने तिच्या साठीनंतर ( काहीच महिन्यांपूर्वी) ही पदयात्रा केली , पण काही महिने ती दररोज वजन घेऊन काही kilometer रोज चालण्याचा सराव करत होती.

हे लेखक तुलनेने तरुण आल्यामुळे आणि त्यांच्या सुरुवातीच्या भागणुसार त्यांची शारीरिक क्षमता चांगली असल्यामुळे बहुदा त्यांना ही जास्तीची तयारी करावी लागली नसावी.

तसेच मला नर्मदा परिक्रमा या विषयावर लोकांशी चर्चा करायला अधिक आवडले असते . परंतु इथे अन्य विषयांवरच अधिक चर्चा सुरू आहेत .>>> नोंद घेतली

Blog वर वाचते आहे. रसाळपूर्ण लेखन.

काही रागीट साधूंचे वर्णन वाचून प्रश्न पडला की साधू म्हणवणाऱ्या या लोकांमध्ये क्रोधावर संयम न ठेवता येणे हे सामान्यपण कसे काय?

साधुच्या वेषात फिरणारे सगळेच आध्यात्मिक भाव बाळगुन असतात असे कुठे आहे? साधु बनायची प्रत्येकाची कारणे असतात. गुन्हा करुन पळुन गेला आणि साधुवेष धारण करुन सेफ राहिला अशी उदाहरणे पेपरात वाचलेली आहेत. बाकी धर्मात चर्च किंवा मशीदीत मोठी पोस्ट हवी तर तसा अभ्यास करुन ती पोस्ट मिळवावी लागते. अभ्यास आपल्या धर्मातही आहे पण बंदिस्तपणा नसल्यामुळे एखाद्याची तशी इच्छा असल्यास तो साधु बनुन आरामात खोट्या आध्यात्माचा धंदा करु शकतो. ही उदाहरणे सुद्धा आहेत.

त्यामुळे कोणी साधुच्या वेषात आहे म्हणजे त्याने काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सरावर विजय मिळवुन आध्यात्माचा मार्ग पत्करला आहे असे समजणे बरोबर नाही. असे सर्वसंगपरित्यागी साधु मोजकेच असावेत, पैशाला पासरीभर रस्तोरस्ती भेटत नसावेत असे मला वाटते.

साधना आपण म्हणताय ते योग्य आहे . गुन्हे करून परिक्रमे मध्ये घुसणाऱ्या लोकांमुळेच आता परिक्रमावस्यांना प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आलेले आहे . आधार कार्ड दाखवल्याशिवाय ते मिळत नाही . परंतु अशा लोकांचे प्रमाण नगण्य आहे हे देखील खरे . उडदामाजी काळे गोरे

परंतु नर्मदा खंडातील लोक गेली अनेक वर्षे लाखो साधू आणि संधी साधू पाहत आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही नक्की कसे आहात हे पाहताक्षणी कळते , ही फार मोठी सिद्धी तेथील प्रत्येक माणसाला प्राप्त आहे असे मला जाणवले .

>>>>>>>गुन्हे करून परिक्रमे मध्ये घुसणाऱ्या लोकांमुळेच आता परिक्रमावस्यांना प्रमाणपत्र सोबत बाळगणे अनिवार्य करण्यात आलेले आहे .
म्हणजे? जर प्रमाणपत्र न घेता मी परिक्रमा केली तर मला मठात घेत नाहीत की मला जेवायला मिळत नाही? कळले नाही.
अजुन एक मी मारे प्रमाणपत्र घेइन पण माझ्या मनात लबाडी असेल तर?

>>>नर्मदा परिक्रमा स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित आहे .
हे ब्लँकेट विधान आहे - सरसकट विधान. असो. जे कोणी लोक परिक्रमा करतात ते प्रौढ, सज्ञान असातत तेव्हा कोणतीही जोखिम ते स्वतः मोलून घेतात. मग ती जंगली श्वापदांची असो की दरोडेखोरांची की उघड्यावर मठात, किंवा देवळात वगैरे, झोपण्याची.

हे लेखमाला विधान, मला, झेपत नाहीये. माफ करा.

ब्लॉग छान ओघवता आहे. दोन प्रकरणे झाली आहेत. उत्सुकता कायम आहे.
इथे उत्तरं देण्यात वेळ घलवू नये. ब्लॉग कडे लक्ष द्या. आधी ते पूर्ण करा.

ब्लॉग बराच वाचून झाला. तुमच्या आणि जे असे कमीत कमी सोयी आणि साधनांसह परिक्रमा करतात धाडसाबद्दल आणि डेडिकेशन बद्दल कौतुक आणि आदर वाटला. पण मुळात मनात अपार श्रद्धा असल्याशिवाय कुणी हे करेल का? असा जीव कष्टात घालेल का? असेही वाटले.
तुम्ही तर सुरुवातीलाच स्वतःला नास्तिक असे लेबल का लावले ते कळले नाही. पहिल्या पोस्ट पासून सगळीकडे तुम्ही देव, साधू, कोण कोण महाराज, खुद्द नर्मदा नदी इ. बद्दल खूप श्रद्धाभावनेनेच लिहिताय.
तुम्ही कित्येक विलक्षण अनुभवही लिहिलेत. ज्याला चमत्कार असे सामान्य माणूस म्हणेल. एकांतवासात, त्या अवघड प्रवासात, त्या वातावरणात आणि मानसिक स्थितीत ते तसे एक्सप्लेन न करता येण्यासारखे अनुभव येतही असतील, किंवा तसे भासत असतील. पण मनात तशी श्रद्धा असल्याशिवाय "मैयानेच बोलावले, मैयाने लाड पुरवले, दिवंगत व्यक्तीशी बोललो, शंकराने दर्शन दिले " असे कसे मनात येईल?
मग असे असताना स्वतःला आवर्जून नास्तिक म्हणवण्याचे प्रयोजन काय असे विचारावेसे वाटले. तुम्हाला योग्य वाटले तर उत्तर द्या. विषय वाढवायचा नसेल तर दॅट्स ओके!

ब्लॉग अगदी binge reading करत दोन तीन दिवसात संपवला!! इतक्या मोठ्या साहसाबद्दल आणि सुंदर अनुभवासाठी तुमचं खूप अभिनंदन. Happy भाग्यवान आहात. खरं सांगू का, चमत्काराचं analysis कशाला करताय, आम खाओ गुठलिया मत गिनो Happy माझ्या मनाला लॉजिक शिवाय कशावर विश्वास बसत नाही पण तरीही मला काही खूप आश्चर्यकारक अनुभव आलेले आहेत म्हणुन सांन्गते आहे.
पुढचे भाग लौकर टाका ब्लॉग वर.

मैत्रेयी.. अगदी मुद्द्याच बोललात.
मला त्यांचे दोन भाग वाचूनच अगदी असेच वाटले होते.

आणि सश्रद्ध असणं हे लपवायचे कशाला?

पण मुळात मनात अपार श्रद्धा असल्याशिवाय कुणी हे करेल का? असा जीव कष्टात घालेल का?>>> बाकीच्यांचे अनुभव वाचूनही/ ऐकूनही vatlel की असीम श्रध्दे शिवाय हे पूर्ण करू शकणे कठीण आहे.

किंवा जबरदस्त कुतूहल असेल तरी ते शक्य आहे कदाचित.

Submitted by maitreyee on 13 December, 2023 - 22:08 >> छान पोस्ट.

ण मुळात मनात अपार श्रद्धा असल्याशिवाय कुणी हे करेल का? असा जीव कष्टात घालेल का? असेही वाटले. >> हिमालयात अनेक असे ट्रेक आहेत. काही ठिकाणी श्रद्धा आहे काही ठिकाणी नाही. अंटार्क्टिका आणि हिमायलातल्या मोहिमांवर एक डॉक्युमेंटरी अशाच संस्थेत पाहिली होती. त्यात म्हटले होते कि एक विशिष्ट जीन असतो, जो या मंडळींना गप्प बसू देत नाही.

जीनचं माहिती नाही, पण असा एक स्वभाव असतो हे पाहण्यात आहे. श्रद्धा ही सुद्धा ड्राईव्हिंग फोर्सचं काम करते , पण सर्वच श्रद्धाळू खडतर ट्रेक करत नाहीत.

सविस्तर सांगतो . मी पूर्वी पूर्णवेळ डाव्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होतो . रत्नाकर मतकरी , मेधा पाटकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन महाविद्यालयीन जीवनात नर्मदा बचाव आंदोलनात देखील सामील झालो होतो . मी कुठेही मी नास्तिक आहे असे लिहिलेले नसून माझा पिंड नास्तिकतेकडे झुकणारा आहे असे विधान केलेले आहे . मला टिळे माळे अंगारे धुपारे गंडे दोरे याचे फारसे आकर्षण कधी राहिलेले नाही . छायाचित्रे पाहिल्यावर तुमच्या ते लक्षात येईल की फक्त अंगावरील वस्त्र सोडता मी अधिक काही धारण केलेले नाही . परंतु असा पिंड असलेल्या मनुष्याला देखील नर्मदा परिक्रमेमध्ये अनुभव येऊ शकतात हेच मी सांगू इच्छित आहे . मी पुरेसा आस्तिक नाही हे सत्य आहे . मी घरी साधी देवपूजा देखील कधी करत नाही . परंतु तरीदेखील मला काही अनुभव आले ते जसे आहेत तसे मांडलेले आहेत . चळवळीतील लोकांच्या दांभिकपणाचा अनुभव आल्यामुळे मी त्यातून बाहेर पडलो . मी ज्या ज्या साधू संतांचा उल्लेख परिक्रमे आधीच्या प्रकरणांमध्ये केलेला आहे त्या त्या सर्वांची पुरेशी परीक्षा माझ्या अल्प बौद्धिक पातळीवर मी घेतलेली आहे मगच त्यांना नमस्कार केलेला आहे . हे सत्य आहे त्यामुळे कोणी सांगितल्यामुळे मी स्वतःला आस्तिक जाहीर करणार नाही . मी पुन्हा पुन्हा सर्वांना तेच सांगतो आहे की जग बहुरंगी आहे . दोनच रंगांमध्ये त्याला कृपया रंगवू नये . मी श्रद्धा मानतो परंतु आजच्या जगात सहज दिसणाऱ्या भाबड्या अथवा निर्बुद्ध भक्तीच्या पक्षातला कदापि नाही . मला जे जे लॉजीक वाटले ते ते लिहीत आहे कदाचित कोणाला ते चुकीचेही वाटू शकते . कठोर चिकित्सा मगच स्वीकृती हेच तर आपल्या धर्माचे वैशिष्ट्य राहिलेले आहे . परीक्षा न घेता ग्रंथ प्रामाण्य किंवा व्यक्ती प्रामाण्य असे संकुचित स्वरूप इथे नाही .

> > >जर प्रमाणपत्र न घेता मी परिक्रमा केली तर मला मठात घेत नाहीत की मला जेवायला मिळत नाही? कळले नाही.
अजुन एक मी मारे प्रमाणपत्र घेइन पण माझ्या मनात लबाडी असेल तर? > > >
काही मठांमध्ये प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळत नाही उदाहरणार्थ ओंकारेश्वर येथील गजानन महाराजांचा मठ . बहुतेक मठांमध्ये तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे असे गृहीत धरले जाते . प्रत्येक मठामध्ये तुम्हाला मुक्काम केल्याचा सही शिक्का घ्यायचा असतो बऱ्याच ठिकाणी प्रमाणपत्र असल्याशिवाय सही शिका मिळत नाही . मुळात मध्ये तुमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही शेवटचा मुक्काम कुठे केला होता हे कळण्यासाठी पोलिसांना या नोंदीची मदत होत असते . नागा साधू किंवा आखाड्याचे साधू तसेही प्रमाणपत्र न घेताच फिरतात . तुम्ही प्रमाणपत्र घेतले आणि मनात लबाडी असेल तर तुमचे काय करायचे ते ठरविण्याची एक सुंदर व्यवस्था नर्मदा मातेने आखून ठेवलेली आहे . तो अनुभव ज्याचा त्यालाच येत राहतो . सर्वसामान्य संसारी माणसांनी परिक्रमा सुरू करण्यापूर्वी प्रमाणपत्र घेणे हे हिताचे आहे हे मात्र खरे . तुम्ही परिक्रमा पूर्ण केल्याचा तो एक लिखित पुरावा मानला जातो . इतकेच

नर्मदे हर.
अहो लोक त्यांची मतं व्यक्त करणारच. लगेच उत्तर देण्याची गरज नसते. इथे समंजस लोक आहेत. अशाने तुमची लिखाणासाठी आवश्यक एकाग्रता भंग पावेल. अनुभवाचे बोल आहेत हे. Lol

>>>>>.मुळात मध्ये तुमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही शेवटचा मुक्काम कुठे केला होता हे कळण्यासाठी पोलिसांना या नोंदीची मदत होत असते .
हां हे बरोबर आहे.
माहीतीबद्दल धन्यवाद.

> > >पण मनात तशी श्रद्धा असल्याशिवाय "मैयानेच बोलावले, मैयाने लाड पुरवले, दिवंगत व्यक्तीशी बोललो, शंकराने दर्शन दिले " असे कसे मनात येईल? > > >

हाच माझ्यामध्ये परिक्रमेमुळे झालेला मोठा बदल आहे . आधी मी नर्मदे कडे केवळ एक नदी म्हणून पाहत होतो परंतु परिक्रमेमुळे , अनुभूतीं मुळे आणि परिक्रमे मध्ये भेटलेल्या लोकांमुळे नर्मदा मैया कधी होऊन गेली कळलेच नाही . अश्रद्ध जिवाला सश्रद्ध बनवणारी नर्मदा ! असे म्हणा फारतर . अर्थात अजूनही मी घरी देवपूजा करत नाही . परंतु आता जगण्याचे कोडे बऱ्यापैकी सुटल्यासारखे वाटते हे तितकेच खरे !

> >अशाने तुमची लिखाणासाठी आवश्यक एकाग्रता भंग पावेल. अनुभवाचे बोल आहेत हे. Lol > >

त्यामुळे मी अजून लिहायला सुरुवात केलेलीच नाही .सलग शांतचित्त निवांत वेळ मिळाल्याशिवाय हे लिखाण करता येत नाही . उगाच जाता जाता लिहून जमत नसते तर ते लिहीत असताना मन अक्षरशः पुन्हा त्या ठिकाणी पोहोचलेले असते . कधीतरी असा निवांत वेळ मिळाला की सलग धडाधड लिहून काढेन पुढचे काही भाग . बाकी नवीन लिखाण टाकण्याचा दुवा मी सकाळपासून शोधतो आहे .थोडीशी कमी यूजर फ्रेंडली वेबसाईट वाटली क्षमस्व . कसे लिहावे वगैरे मुद्दे सापडले परंतु आता लिहा असे सांगणारे काही सापडत नाही .

Pages