मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मलाही अध्यात्म समजत नाही. इतरांचं आध्यात्मिक अनुभवांबद्दलचं लिखाण वाचायला आवडतं. पण मला अध्यात्म टॅंजंट जातं. कदाचित माझा आवाका तेवढा नसेल.

हे मी तुम्हाला येथे सुचवले होते संप्रति, लक्षात आहे का ? जेव्हा आपण रमण महर्षींंवर बोललो होतो. तुम्ही म्हटला होता तुम्हाला निसर्गदत्त महाराज माहिती नाहीत पण शोधतो. हे वाचते पण एक्सायटमेंटमधे आधी लिहून टाकले, हेच पुस्तक सुचवले होते. Happy मला खात्री होती तुम्हाला ते आवडणारच कारण हे मॉडर्न स्पिरिच्युऍलिटीत येतं, इथे तुम्ही एकटेच आहात ते क्लिक होणारे याचा आनंद दुसरं काय ! Happy

Happy छान लिहिले आहे, हे पुस्तक मी दहा वर्षांपूर्वी दोनदा वाचले होते. घरी आहे. तो वसवस संपल्याचा प्लेटो किंवा एन्ड ऑफ नासमाया - तेही सुरू झाले. आता या थोरांचे एकेक सुविचार पुरतात, दिवसभर चिंतन मंथन करण्यासाठी. बहुतेक गोष्टी ओरिजनल वाटणं ही बंद झालंय, हे तर आधीच झालंय असं वाटून एक प्लेटो आलाय. बऱ्यापैकी शांतता आली आहे.

तुम्हाला आपलं बोलणं लक्षातच नाही बहुतेक, पण तुम्हाला आवडलं याचा आनंद आहे. Happy

संप्रति, शेवटचा परिच्छेद विशेष भिडला. पुस्तकाच्या शोधाची गोष्टही गोड.
तुम्ही ते मराठी म्हणून उडालात. नाव ऐकल्यावर मी गुगल केलं तर माझ्या आईबांच्या जिल्ह्यातले आणि आजोळच्या तालुक्याचे निघाले. त्यामुळे मी तर उडालोच. मलाही अध्यात्मात काही रुची आहे, असं नाही. पण गाववाले आहेत, एवढ्यासाठी म्हणून ऐकून पाहेन.

अस्मिता,
मला तुम्ही की सामो यांनी निसर्गदत्त महाराजांचा उल्लेख केलेला आठवतोय मागे, पण तेव्हा नाव ऐकून मला वाटलेलं की हे असेच कुणीतरी भक्ती संप्रदायातले किर्तनकार/प्रवचनकार वगैरे असतील.. तर ते डोक्यातून गेलं..
हे पाणी एवढं खोल आहे हे माहिती नव्हतं (आणि तुम्ही पण विस्कटून सांगितलं नाही तेव्हा Happy )
आत्ता जरा अंदाज आला. Wink

नंतर सविस्तर प्रतिसाद देतो.

मागे एकदा मित्राने पुस्तक दिलं होतं 'an autobiography of a yogi' ते त्याने विकत घेऊन वाचलं होतं. (या पुस्तकाचे ढीग फोर्टातल्या फुटपाथवर असत. स्टीव जॉब्स चरित्राचेही. )ते मी वाचून काढलं पण एक लक्षात येतं की या महाराज लोकांना येणारे अनुभव आपल्याला येणार नाहीत. शिवाय त्यांच्या सुखदुःखाची कारणं वेगळी असतात आणि ‍सामान्य माणसाच्या ( संसारी माणसाच्या) सुखदुःखाची. सामान्य माणसास त्याला हवं ते मिळालं, नाही मिळालं की तो आनंदी किंवा दुःखी होतो.
संन्यासी माणसाचे पुढे काय होतं? त्यास कोणतातरी मठ, आश्रम पकडून राहावं लागतं. कारण शरीर त्याच्या गरजा मागतंच

ऑटोबायग्राफी ऑफ योगीचा मराठी अनुवाद मी वाचला, योगीकथामृत. ते पुस्तक मला प्रचंड आवडलं. ते वाचून मला क्रियायोग शिकावा असं मात्र अजिबात वाटलं नाही, माझ्याकडे अध्यात्मिक दृष्टीकोन नाही किंवा पिंड नाही तो माझा पण ते पुस्तक प्रचंड ओघवते वाटलं मला, माझ्याकडे आहे. अधूनमधून मला आवडणारे प्रकरण मी वाचते.

ते वाचून नवरा आणि भावाला मात्र क्रियायोग शिकावा असं वाटलं, ते शिकले.

ऑटोबायग्राफी ऑफ योगीचा मराठी अनुवाद मी वाचला, योगीकथामृत. ते पुस्तक मला प्रचंड आवडलं. ते वाचून मला क्रियायोग शिकावा असं मात्र अजिबात वाटलं नाही, माझ्याकडे अध्यात्मिक दृष्टीकोन नाही किंवा पिंड नाही तो माझा पण ते पुस्तक प्रचंड ओघवते वाटलं मला, माझ्याकडे आहे. अधूनमधून मला आवडणारे प्रकरण मी वाचते>>>>

येस, मलाही हे पुस्तक खुप आवडले. कोणीतरी पिडिएफ दिली होती ती वाचलेली. नंतर पुस्तकही विकत घेतले. श्री एम यांचेही पुस्तक वाचलेय. पण अध्यात्म हा माझा प्रांत नाही.

मनात भक्ती नाही तर अनुभव कसा येणार असे वाटते. देवळात गेले की लक्ष तिथल्या स्थापत्याकडे असतं. आता तर काही मागायचेही सोडुन दिलेय. चांगल्या लोकांचे चांगले अनुभव येतात तेच आपले देवाचे अनुभव समजायचे.

सुखसंवाद बद्दल संप्रतींचा प्रतिसाद वाचुन उत्सुकता वाटली. त्यांचे आजवरचे लिखाण वाचुन त्यांचा अध्यात्म हा प्रांत नसावा असे वाटले, तरीही ह्या पुस्तकातुन त्यांना काहितरी मिळतेय हे वाचुन नेटवर शोधले. निसर्गदत्त महाराजांची वेबसाईट सापडली. तिथे पुस्तक ४०० रुला उपलब्ध आहे. मी आधी वर उल्लेखलेले विडिओ शोधते आणि मग पुस्तक मागवते.

श्री एम मीही वाचलं, आवडलं. मला वाचायला आवडतं, गुंतते मी त्यात पण ध्यानधारणा करणं वगैरे मेरे बसकी बात नही असं वाटतं. ती चिकाटी नाही माझ्याकडे, चंचल आहे, वळवळ फार. माफक पोथीवाचन, नामस्मरण वगैरे आवडतं.

माझा कर्मयोग असा आहे की माझ्या मुलांचं करणं प्रथम कर्तव्य, ते प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करते. मग फार वेळच नसतो, असो.

निसर्गदत्त महाराजांचे youtube वर बघेन.

संप्रति
निसर्गदत्त महाराज मुंबईत राहायचे ना?
पान टपरी की काय असे तत्सम दुकान होते.
पहिला उल्लेख माबोवर अस्मिताच्या पोस्टमध्ये वाचलेला आठवतंय.
पण पुढे उत्सुकतेने काही पाहिले नव्हते. पोस्टमधील फार काहै डोक्यात घुसले नव्हते ( बुद्धीच कमी आहे माझी )
नंतर योगायोगाने त्यांचे दुर्मिळ युट्युब वरील व्हिडीओ पाहिले. योगीकथामृत ची स्टोरी तुम्ही म्हणताय तशी काहीशी माझ्याबाबतीत घडली.
मला पत्ताच नाही की योगानंद नामक मोठे महर्षी होउन गेलेत, क्रियायोग असतो काहीतरी, लाहिरी महाशय होते वै.
गम्मत म्हणजे पुण्याहून कोल्हापूरला जाताना एका ठिकाणी डावीकडे लाहिरी महाशय ह्यांचा अरधोन्मलीत नेत्र आणि मांडी घालून मेडिटेशन करताना भला मोठा पोस्टर आहे तो खूप वेळा पाहिलेला.
कोल्हापूर मध्येच अंबाबाईच्या दर्शनाला जाउन आल्यावर भवानी मंडपातून बाहेर आलो आणि जिथे दुचाकी लावलेली तिथे जवळच अजब पुस्तकालय आहे. तिथे 50 रु मध्ये कोणतेही पुस्तक असे पोस्टर बघून घुसलो दुकानात.
जुनाट लाकडी जिन्याने वर गेलो आणि खूप सगळ्या पुस्तकातून हेच पुस्तक दिसले आणि घेतले.
माझ्या वडिलांच्या जन्माच्या आधी लिहिलेलं पुस्तक आणि तोवर मला पत्ताही नव्हता.
गम्मत वाटलेली.

आत्मा किंवा भूत म्हणा तो एका ठिकाणी साखळीने झाडाला बांधून ठेवला आहे म्हणे आणि ते एक पर्यटन ठिकाण झालंय. ......
( Chained tree of Lakkidi / waynad search) . वायानाडला गेलो नाही अजून पण ती गंमत पाहायची आहे. कोळ्हीकोड ते कालपेटा ( वायनाड) घाटाने वर गेल्यावर हे झाड घाट संपल्यावर रस्त्याकडे लक्कीडी येथे आहे. तर एकूण काहींना येतात अनुभव.

झकासराव माझेही सेम असेच झाले. २००७-८ च्या दरम्यान पुस्तकांच्या पिडीएफ मेलवरुन पाठवायची फॅशन आलेली (चेतन भगतचे २ स्टेट्स पण असेच कोणीतरी पाठवलेले). ऑटोबायग्राफी मिळाले, मिळाले म्हणुन वाचायला लागले. मला आधी फिक्शनच वाटले होते Happy नंतर नेटवर बाबाजी, लाहिरी महाशय व स्वामी परमहन्सबद्दल वाचले. ऑफिसात एकजण बाबाजीचा भक्त होता, त्याला माहिती होती. इतरत्र, मला वाटते नर्मदा परिक्रमेच्या अनुभवात देखिल बाबाजीबद्दल वाचल्याचे आठवते.

लाहिरी महाशय की बाबाजी - बहुतेक बाबाजी आहेत. ते पोस्टर आताही असावे. मीही पाहिलेय. तिथे आश्रम आहे बहुतेक.

Happy हो, आपण बोललो होतो झकासराव- युक्तेश्वर गिरी, लाहिरी महाशय आणि परमहंस योगानंदाबद्दल. मी निसर्गदत्त महाराजांबद्दल तपशीलात लिहिले नव्हते कधी, फारच वरवर लिहिले होते.

योगी कथामृत जरा सोपे आहे समजायला, त्यात बायबलचा उल्लेख फार वेळा आहे. त्याचे संदर्भ तपासून घेताना माझं बायबल वाचून घेतल्यासारखे झाले. ( त्याचा अर्क)

श्री एम ची दोन्ही पुस्तकं सुद्धा झाली पण आता 'ग्रो आऊट' का काय झाले, पुन्हा वाचवत नाहीत.

रमण महर्षींवरची पुस्तकं किंवा निसर्गदत्त महाराजांचे स्वसंवाद बऱ्यापैकी क्लिष्ट आणि अर्थगर्भ आहे. त्यावर परिचय लिहिणं सुद्धा आव्हानात्मक आहे. मलाही वाटत नाही मला पुरतं कळलंय वगैरे म्हणूनही बहुतेक लिहिले गेले नसेल.

मला मुलगा लहान असताना नालासोपारा इथल्या एका शेजाऱ्यांनी योगी कथामृत वाचायला दिलं (क्रियायोगी वगैरे नाहीयेत ते, त्यांना आवडलं म्हणून मला वाचून बघा म्हणाले), मोठं पुस्तक बघून अनेक महिने पडून होतं ते घरात, मग एकदाचे वाचायला घेतलं, मी वाचल्यावर नवऱ्याने वाचलं. गुंतवून ठेवलं त्या पुस्तकाने. स्वतः विकत घेऊन भाऊ, बहीण, नणंद वगैरेंना गिफ्टही दिलं.

बाबाजी, लाहिरी महाशय, युक्तेश्वर, परमहंस योगानंद अशी परंपरा आहे. योगानंद यांचा योगी होण्यापर्यंतचा प्रवास वाचनीय वाटला मला. पुढे युक्तेश्वर यांनी त्यांना अमेरिकेत क्रियायोग प्रचारासाठी पाठवले.

लहान असताना, चाळीत आमच्या शेजारी क्रियायोग करणारे होते पण आम्हाला माहितीच नव्हतं, बाबाजींचा फोटो त्यांच्याकडे होता आणि पहाटे उठून ध्यान करायचे. त्यांनी ते इतकं स्वतःपुरते ठेवलं की बास रे बास, अजिबात प्रचार नाही केला, नंतर ते सोडून जवळच दुसरीकडे गेले, भाऊ त्यांच्याकडे जायचा रोज, त्यांची मुलं खास फ्रेंड त्याची म्हणून जायचा. तरी भावाच्या काही गावी नव्हतं, त्याला विचारावं असंही वाटलं नाही, त्यांच्या मुलांना अजिबात नाही या मार्गाचं काही. भाऊ कोविड मध्ये online शिकला क्रियायोग, नवरा त्याआधी काही वर्ष offline. आता त्या काकांना जाऊनही खूप वर्ष झाली.

राम भोसले यांची दोन पुस्तकं घरात आहेत ती आणि शांता शेळके यांचं चौघीजणी वाचून होतच नाहीयेत, सुरुवात करून काही पाने वाचली मग विसरून गेले, हल्ली पुस्तकवाचन अजिबातच होत नाहीये, असं इथे लिहायला बरं वाटत नाहीये.

ते कारण नाहीये, मुलगा बाबाला बेडरूममध्ये झोपू देत नाही (त्यामुळे नवरा हॉलमध्ये झोपतो) आणि स्वतः रात्रभर तिथे खेळत बसतो, मी पी सी समोर हॉल मध्ये असते आणि लाईट बंद ठेवायला लागतो त्यामुळे पुस्तक वाचन होत नाही, मुलगा मला बेडरूममध्ये बसू देत नाही, तिथला लाईट सुरू असतो, त्यामुळे मी पीसीवर जास्त youtube, देश विदेश vlogs बघत बसते.किचनमध्ये जाऊन वाचायला हवं पुस्तक तर होईल वाचन. दिवसा मी झोपते. पूर्वी नवरा बेडरूममध्ये झोपायचा, मुलगा हॉलमध्ये खेळायचा तेव्हा लाईट लावून चालायचं. मी मधेच वाचायचे, मधेच पी सी समोर बसायचे.

मिवापुवर इतक्या नव्या पोस्टी बघून हरखले. पण इथल्या ताज्या गप्पांचा विषय हा माझा प्रांत नव्हे.

संप्रति, तुम्ही लिहिलंय चांगलं. पुस्तकशोध, वाचनानुभव यासहित पुस्तक परिचय वाचायला मला आवडतोच.

लेखन घडते कसे...... ब्रिटिशांनी इकडे असतांना फावला वेळ छंदोपासनेत घालवला. नोंदी निरीक्षणं केली. काही पत्रेही इंग्लंडमध्ये नातेवाईक किंवा मित्रांना लिहिली. समुद्रमार्गे टपाल जायचे आणि परत उत्तर यायला महिने जायचे तरीही चिकाटीने काम करत राहिले. या पत्रांतून किंवा दैनंदिनींतून नंतर पुस्तकं लिहीली. माहितीपर पुस्तकं यातून तय्यार झाली. डायरींचा उपयोग इकडच्या राजकारणातली व्यूह रचना करायला केला गेला. विशेष म्हणजे स्थानिक भाषा शिकणे ही त्यांची आवड होती.

दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी (बालाजी सुतार)

अस्वस्थ वर्तमान, बेरोजगारी; शहरीकरणाच्या रेट्यात गुदमरणारा, घुसमटणारा निमशहरी, ग्रामीण भाग; तरुणांच्या आकांक्षा धारातीर्थी पडणे; ऑनलाइन मैत्री आणि भ्रमनिरास; असे आधुनिक जगण्याचे वेगवेगळे पदर, त्यातले हेलकावे, त्यात अडकलेल्या व्यक्तिरेखा, त्यांचे मूड्स, यांच्याबद्दलचं हे लिखाण आहे. आणि ते प्रभावी आहे. पुढे पुढे वाचत राहावं असं वाटणारं आहे.

पुस्तकाचं ब्लर्ब वाचून हा कथासंग्रह असल्याचा माझा समज झाला होता. पैकी तीन व्यवस्थित ’कथा’ म्हणाव्यात अशा आहेत. त्यातली ’दोन जगातला कवी’ ही कथा मला खूप आवडली. कथेचा शेवट किंचित प्रेडिक्टेबल असूनही ’फँड्री’ सिनेमाप्रमाणे वाचकाला जोरदार फटकावतो. दुसरी कथा ’निळ्या चमकदार काळोखातले अप-डाऊन्स’ ऑनलाइन मैत्री-चॅटची दुसरी बाजू सांगणारी आहे. त्याला स्त्री-पुरुष भेदाभेदाचाही पदर आहे. काही ठिकाणी ही कथा जरा टिपिकल वळणावर जाते. त्यामुळे मला खूप आवडली नाही. तिसरी ’डहूळ डोहातले भोवरे’ सुद्धा ठीकठाक वाटली. प्रसंग, व्यक्तीचित्रण, वातावरणनिर्मिती तिन्हीतली आवडली.

दोन निमकथा-टाइप आहेत. त्यातली वातावरणनिर्मितीही खूप छान आहे. बाकी लेख म्हणजे निरिक्षणं, नोंदी, दीर्घ टिप्पणी असं स्वरूप आहे. (पुस्तकाच्या शीर्षकातही ’नोंदी’ म्हटलेलं आहेच.) काही नोंदी, टिप्पण्यांमध्ये फिक्शन-टाइप व्यक्तिरेखा येतात. त्यामुळे वाचायला सुरुवात केल्यावर कथेची अपेक्षा तयार होते. त्यांतले सूक्ष्म फरक लक्षात घेतल्यास एकूण हे लिखाण फेसबुक-पोस्ट्सच्या दिशेला जाणारं वाटतं. अर्थात ’लाइक्स’चा विचार न करता, प्रामाणिकपणे, विचारपूर्वक लिहिलेल्या ’चांगल्या’ फेसबुक पोस्ट्स.

पुस्तकाचं शीर्षक आणि 'इसवीसन १९९० ते २०१५ या पाव शतकास’ ही अर्पणपत्रिका, यावरून पुस्तकाच्या थीमचा साधारण अंदाज येतो. पुस्तक संपल्यावर तो अंदाज खोटा ठरत नाही.
यातलं लेखन अजिबात एकसुरी झालेलं नाही. त्यात जोरकसपणा आहे. पण एक-एक लेख/कथा/नोंदी जितक्या ताकदवान आहेत तितकं एकूण ’पुस्तक’ म्हणून परिणामकारक वाटलं नाही. तरीही अनेक ठिकाणी अनेकांकडून या पुस्तकाबद्दल ऐकलं होतं. त्यामुळे मला वाचायचं होतंच. मुखपृष्ठावरचं चित्र बहुदा लाकडी घाण्याचं किंवा कोलूचं असावं. पण मला नीट कळलं नाही.

आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवर लेखक म्हणून ठामपणे व्यक्त होणं - या निकषावर हे लेखन व्यवस्थित उतरतं.

“सिंधुतील साम्राज्ये" / “Civilizations of Indus” हे पुस्तक वाचलं. परिचय करून दिल्या बद्दल संप्रति यांचे मनःपूर्वक आभार. त्यांनी दिलेल्या परिचयापेक्षा अधिक काही लिहायची गरज नाही. “The Great Game" वाचल्यापासून भारताच्या वायव्येला असलेल्या प्रदेशांबद्दल खूप कुतूहल निर्माण झालय. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मजा आली. लेखिका ज्या ज्या ठिकाणी फिरली त्याचा गूगल मॅप्सवर धांडोळा घेतल्यावर खरच आश्चर्यचकित व्हायला होतं. पुस्तक संपल्यावर मात्र सिंधू नदीचा पर्यावरणीय नाश सतावत राहतो.

>>>>लेखन घडते कसे...... ब्रिटिशांनी इकडे असतांना फावला वेळ छंदोपासनेत घालवला. नोंदी निरीक्षणं केली. काही पत्रेही इंग्लंडमध्ये नातेवाईक किंवा मित्रांना लिहिली. समुद्रमार्गे टपाल जायचे आणि परत उत्तर यायला महिने जायचे तरीही चिकाटीने काम करत राहिले. या पत्रांतून किंवा दैनंदिनींतून नंतर पुस्तकं लिहीली. माहितीपर पुस्तकं यातून तय्यार झाली. डायरींचा उपयोग इकडच्या राजकारणातली व्यूह रचना करायला केला गेला. विशेष म्हणजे स्थानिक भाषा शिकणे ही त्यांची आवड होती.

रोचक आहे.

बालाजी सुतारांच्या फेसबुक पोस्टी खूप व्हायरल होत. हळूहळू ते लाईकजीवी आहेत असं वाटू लागलं.
लिखाण प्रामाणिक वाटलं नाही कधीच. त्यांच्या लिखाणात कुणाला तरी आवडावं अशी रचना असल्याचं जाणवतं.
त्यामुळं नाही वाचणार. Happy

>> >> रावणाची ऑटोबायोग्राफी>>
काय असेल?

त्याच्या लहानपणा पासून आर्य वडिलांकडून आईला मिळालेल्या अपनास्पद वागणूकीचा प्रतिशोध ते लंका स्थापने पर्यंत त्याची विचार धारा ते देवांना पराभूत करण्यामागची त्याची प्लॅनिंग. रामायणाचा भाग अजून वाचायचा आहे.

>> रावण राजा राक्षसांचा हे शरद तांदळेंच पुस्तक वाचतोय>>
Raavan: Enemy of Aryavarta असंही एक पुस्तक आहे. ( त्याचा अनुवाद आहे वाचनालयात) पण हे रामाचं चरित्र आहे का माहीत नाही. पुराणात एकाच ठिकाणी रावणाची संपूर्ण कथा नसून विखुरलेली आहे बहुतेक. रावणाला आपला गाववाला किंवा पूर्वज म्हणणारे भारतात आहेत असं विकी पान सांगतं.
.

वरच्या पोस्ट मध्ये योगी कथामृतचा उल्लेख आलाच आहे तर Paul Brunton यांचे
आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध हे पुस्तक जरूर वाचावे.

>>पुस्तक कादंबरी आहे असं दिसतं

पुस्तकच आहे पण लिहिलेलं आत्मचरित्रासारखं आहे असं म्हणायच होतं मला. ऑब्वियस्ली राम रावणाचं आत्मचरित्र आपल्याला वाचायला मिळणार नाहीय Happy

Pages