मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

"पुलंच्या बायकोने . . . ."
होय.
------
'तेल नावाचा इतिहास' संपवला. खूप खूप माहिती एकाच ठिकाणी आणि नेमकी दिली आहे. शेवटी आणखी पुढे काय हे प्रकरण आहे. तेल सर्वांनाच हवे आहे कारण मुख्य इंधन आहे. वारा,सूर्यप्रकाश,अणुशक्ती पासून जे इंधन मिळते - वीज मिळते त्यास मर्यादा आहेत. जेट इंजिनात निरुपयोगी. तर पुढच्या पन्नास वर्षांत कोणकोण किती लाचार होणार याची झलक नव्या शतकाच्या सुरुवातीलाच गंभीर झाली आहे. आणखी पन्नास वर्षे काढणे अशक्य वाटत आहे.

पुस्तकात कोणताही मुद्दा,घटना न सोडता संपूर्ण इतिहास {मराठीत} झटपट दिला आहे. आवडलं.

प्रभाकर जोशी (अर्थशास्त्र डॉ.) सुरुवातीला आइसीआइसीआइ आणि नंतर मेरींल लिंचमध्ये उच्चपदावर सेवेत होते. आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थेचा दांडगा अनुभव घेऊन निवृत्त झाले. त्याविषयाचं त्यांचं पुस्तक 'माझी अर्थविश्वातील भ्रमंती' (२०१०) वाचले. परदेशातील वित्तीय संस्थांच्या अनुभव आणि कामकाज कसे चालते ते लिहिलं आहे. या विषयाची माहिती नसल्याने फारसं कळलं नाही. काही भागात गमतीदार किस्से थोडक्यात दिले आहेत. ते आवडले. स्विस बँकेतील व्यवहारावर बँकेप्रमाणेच गुप्तता आणि मौन पाळले आहे. असो.
(पुस्तक प्रकाशित होण्याअगोदरच दुर्दैवाने जोशींचं निधन झालं. असं निवेदन प्रकाशक माजगावकरांकडून शेवटी दिलं आहे.)

SRD , गंमतीदार किस्से आवडले म्हणताय तर In The Wonderland Of Indian Managers - शरू रांगणेकर हे मिळालं तर वाचा.
मी वाचलेलं नाही. कधीतरी चाळलं होतं. आताचे लोक (मॅनेजर्स) ते कालबाह्य झालंय म्हणतात.

मुसाफिर -
अच्युत गोडबोले.(मनोविकास प्रकाशन)
२०१२,पाने ४६०.) लेखकांविषयी उत्सुकता वाढली होती. कारण त्यांची विविध विषयांवरील पुस्तके आहेत. हा मनुष्य नक्की करतो काय हे जाणून घ्यायचं होतं. आइआइटी पवईचा केमिकल एंजिनिअर. पण विविध गोष्टींची आवड,मित्रांची आवड आणि नवीन विषय दिसला की तो मुळापासून शिकायचा ही वृत्ती. सोलापूरला बालपण आणि शालेय शिक्षण झालं.
एकूण सोलापुरात वर्णन आणि माहिती फारच आवडली. तेव्हाच गाण्याशी संबंध आला. तो छंद त्यांनी जोपासला. पवई हॉस्टेलमधले किस्से, संगिताचे किस्से दिले आहेत ती पानं गाळून टाकली ( ते चवीने वाचण्याजोगे ज्ञान मला नाही.). पुढे नोकरी ( नोकऱ्या) केमिकल एंजिनिअरिंगशी संबंध नसलेल्या कंप्युटर डिजिटल क्षेत्रातल्या केल्या. त्यांचे किस्से आहेत गमतीदार. आदिवासी चळवळीत पडले,शिक्षा झाली. भरपूर वाचन आणि चर्चा ग्रूपमध्ये शोभाशी ओळख होऊन लग्न. पुढे मुलाला तिसऱ्या वर्षी ऑटिझम झाल्याने त्याविषयी वाचन आणि लेखन केले. तशा मुलांसाठी शाळाही काढून चालवत आहेत. लेखक फारच आवडला.
एकूण पुस्तक छान.पण . .साडेचारशे पानांच्या पुस्तकात फक्त चार पाच छोटे काळे पांढरे फोटो आहेत स्वतःचे. ते पंधरा वीस रंगीत वेगवेगळ्या ठिकाणचे हवे होते.

लोकसत्ताने काही मान्यवरांना गेल्या वर्षात वाचलेल्या पाच पुस्तकांची नावे कळवायला सांगितली होती. त्या याद्यांत भुरा- शरद बाविस्कर हे नाव सगळ्यांत जास्त दिसलं.

लिंक छान आहे भरत.
द गर्ल इन रूम 105 - चेतन भगत चं पुस्तक एका दमात वाचलं. संध्याकाळी सहज वाचायला घेतलं पण नन्तर पूर्ण होईपर्यंत ठेववेना. मर्डर मिस्ट्री च आहे, पण चेतन भगत स्टाईल मध्ये. मला तर थ्री इडियट मुव्हीसारखं ते स्वगत मधले पंचेस पण इमॅजिन करून हसू येत होतं. झारा ला आलिया भट मध्ये बघितलं आणि हिरो रणवीर सिंग. गोलू साठी कुणीही गोलमटोल मित्र चालेल. छान आहे. प्रेम कथा आणि न-प्रेम कथा ही.

दुर्गा भागवतांचं "आठवेल तसे" खूप आधी वाचलंय त्यामुळे नक्की आठवत नाहीये पण ते पुस्तक म्हणजे वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचे संकलन आहे असे वाटते.
ते वाचून माझेही मत किती कडवटपणे लिहिले आहे असेच झाले होते पण सुदैवाने ते पुस्तक वाचायच्या आधी त्यांची इfunction at() { [native code] }र अनेक पुस्तके वाचनात आलेली असल्यामुळे त्याबाबत माझे आकलन असे:

दुर्गाबाई ज्याला इंग्रजीत डेव्हील्स अ‍ॅडव्होकेट म्हणतात तशा प्रकारच्या भुमिका घेत असत. उदा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान विशेषतः मोरारजी भाई देसाई गृहमंत्री/ मुख्यमंत्री असताना केल्या गेलेल्या गोळीबारानंतर गुजराथी समाजाबद्दल एक प्रकारचा आकस मराठी समाजात रूढ होत होता त्यावेळी त्यांनी गुजराथी समाजाच्या योगदानाबद्दल किंवा तत्सम प्रकारचे भलामण करणारे लिखाण केले होते. त्याच बरोबर त्या गोळीबारात मरण पावलेले १०८ जण हुतात्मा म्हणून संबोधले जाऊ लागताच त्याही बाबतीत त्यातले काही जण आंदोलनात सामील नसलेले केवळ बघ्याच्या भुमिकेत असताना गोळीबारात निधन पावले होते त्यांना हुतात्मा का संबोधावे असाही प्रश्न उपस्थित केला होता.

दुर्गाबाई ह्या मुलतः हाडाच्या संशोधक. त्यांचे पहिले सर्व लिखाण इंग्रजीतून आणि संशोधनपर असेच होते.

एखाद्या विद्यमान, लोकप्रिय भुमिकेच्या संपुर्णतः आहारी न जाता त्या विषया / व्यक्तीच्या बाबतीत खोलात जाऊन साकल्याने आणि चहू अंगाने विचार करण्याची क्षमता आणि चिकीत्सक वृत्ती असणार्‍या व्यक्तीचे लिखाण असे ढवळून काढणारे नसते तरच विशेष. आधीच असलेल्या अफाट बुद्धीमत्तेला धाडसाची जोड मिळाल्यावर त्यांचे लिखाण परखड होणे हे ही स्वाभाविकच.

त्यामुळे असे वाटते की "आठवेल तसे" मधले लिखाण हे त्यांच्या परखड स्वभावाला अनुसरून 'एंजल्स'ची दुसरी बाजू नमूद करायच्या भुमिकेतून लिहिले असावे असे मानण्यास वाव आहे.

माझा वरील प्रतिसाद वाचनात पडलेल्या अनेक वर्षांच्या खंडानंतर आहे त्यामुळे तपशीलाच्या गफलती असू शकतात. निव्वळ लेटर्स न बघता स्पिरिट ऑफ द वर्डस बघा ही विनंती.
कृपया. धन्यवाद.

त्यामुळे असे वाटते की "आठवेल तसे" मधले लिखाण हे त्यांच्या परखड स्वभावाला अनुसरून 'एंजल्स'ची दुसरी बाजू नमूद करायच्या भुमिकेतून लिहिले असावे .

होय.

मी 'आठवेल तसे' वाचलेलं नाही, पण-
एखाद्या लोकप्रिय/ महान व्यक्तीभोवती असलेल्या वलयापलीकडे जाऊन त्या व्यक्तीचं मूल्यमापन करण्यासाठी कडवटपणाची गरज नसते असं माझं मत आहे.नरहर कुरुंदकर हे उदाहरण आहे. कुरुंदकरांचे अनेक व्यक्तींवरचे मूल्यमापनात्मक लेख मी वाचले आहेत. अगदी विनोबा भावे यांच्यावरही (आधुनिक काळातले ऋषी असं त्यांना सार्थपणे म्हटलं जातं म्हणून यांच्यावर'ही') त्यांचा मूल्यमापनात्मक लेख आहे त्यात चिकित्सा आहे, विसंगती दाखवणं आहे, टीका आहे, पण कडवटपणा औषधालाही नाही.

वैयक्तिक आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींबद्दल कडवटपणा आला असेल तर मात्र त्याबद्दल आपण काय बोलणार?

वावे , पुस्तक न वाचता मत नको बनवूस. आणि कुरुंदकर वेगळे भागवत वेगळ्या. ह्यांनी केले ते त्यांनी नाही आणि त्यांनी केले ते ह्यांनी.

किती कडवटपणे लिहिले आहे असेच झाले >>> ह्यात कडवटपणे पेक्षा कटू आठवणी असा शब्द प्रयोग योग्य ठरेल बहुतेक.
शिवाय ते लिखाण पुस्तकासाठी म्हणून एकटाकी झालेले नसावे, मात्र ते लेख एका मागोमाग वाचताना म्हणून ती चव जास्त ठळक पणे जाणवली असावी.

मी म्हटले तसे निव्वळ लेटर्स न बघता स्पिरिट ऑफ द वर्डस बघा ही विनंती.

पुस्तक परत एकदा वाचावे लागेल आता. Happy

पुस्तकाबद्दल मत नाही बनवलंय. मी जनरल लिहिलं आहे. तुम्ही लिहिलेल्या एखाद्या विद्यमान, लोकप्रिय भुमिकेच्या संपुर्णतः आहारी न जाता त्या विषया / व्यक्तीच्या बाबतीत खोलात जाऊन साकल्याने आणि चहू अंगाने विचार करण्याची क्षमता आणि चिकीत्सक वृत्ती असणार्‍या व्यक्तीचे लिखाण या भागामुळे कुरुंदकर आठवले म्हणून. ते वेगळे आणि दुर्गाबाई वेगळ्या, हे खरं असलं तरी.

मी ते पुस्तक वाचले आहे. दुर्गाबाईंबद्दल आदर असूनदेखील,याबाबत मला वावेचे म्हणणे पटले.आईने प्रथम ते पुस्तक वाचले.तिलाही ते लिखाण कडवट वाटले होते. हर्पेंन प्रमाणेच मीही तिला बोलले होते.पण ज्यावेळी पुस्तक वाचले त्यावेळी मलाही कडवटपne लिहिले आहे असेच वाटले.

पेक्षा कटू आठवणी असा शब्द प्रयोग योग्य ठरेल बहुतेक.......+1.

पीएचडीच्या गाईडने फसवले तर ते लिहायला हवे ना? तो लबाडच होता. दुर्गाला माहिती गोळा करायला लावली आणि स्वतःच्या नावे छापली. पाठ्यवेतन देण्याच्या कागदावर सही करून युनिव्हर्सिटीत पाठवायला नकार दिला. आणि दुर्गेने नंतरचा खर्च स्वत: केला.
इरावतीनेही काही ढापले होते. हे उल्लेख दुसऱ्या पुस्तकात( बहुरूपिणी : दुर्गा भागवत (चरित्र आणि चित्र) । अंजली कीर्तने .) आहेत. ते मागे लिहिलं आहे.
खरे लाभार्थी कुठेही सापडतात.

महाराष्ट्र दर्शन
गो.नी. दाण्डेकर.
नवीन आवृत्ती २००१,पाने २३५, मृण्मयी प्रकाशन.
(पहिली आवृत्ती १९६० )
महाराष्ट्रात गो.नी. भरपूर फिरले आणि जनजीवन पाहिले आणि आपल्यासमोर मांडताना "हा काही महाराष्ट्राचा संदर्भ ग्रंथ नाही" सांगतात. सदुभाऊ जोगळेकरांचे आभार मानून महाराष्ट्राची भौगोलिक जडणघडण,प्राणी,पशूपक्षी,वन्यजीवन,प्राचीनत्व,जाती जमाती,आदिवासी,गुहा,मंदिरे, इतिहासातील राजवटी,आहारविहार,वेशभूषा,उत्सव आणि सण,महाराष्ट्राचे साहित्य इत्यादी भरपूर माहिती २३५ पानांत दिली आहे.
मुखपृष्ठावरील एक फोटो सोडल्यास पुस्तकात फोटो नाहीत हे आताच्या पिढीला जाणवेल.
वाचनीय पुस्तक.

हर्पेन पटेल असचं लिहिलस. हो, वेगवेगळ्या वेळेस लिहिलेल्या आठवणींच्या लेखांचं संकलन असच आहे.
म्हणूनच प्रतिसादात " आठवलेल्या बहुतांश व्यक्तींबद्दल त्यांनी वाईटच लिहिलय, म्हणजे तसा अनुभवही असेल" असं लिहिलं.
मला मांडायचं होतं ते, " लोकांना रुचेल तेच लिहावं की नाही. रादर लोकांना रुचणार नाही असं लिहावं की नाही?" यावर. सामान्य वाचक म्हणून अपेक्षा असते की वाचून मला बरं वाटायला हवं. पण जसं अन जितकं वाचत जाऊ तितकं नुसतं रुचणारच नाही तर अनोळखी, प्रसंगी न रुचणारंही वाचावं. असं वाचन आपला अनुभवही विस्तारते अन आपल्या विचारप्रक्रियेला ढुशाही देतं Wink
बऱ्याचदा आपण आपल्या परिघातलं वाचन स्विकारतो, नवा लेखक, नवा जॉनर पटकन उचलत नाही. तर ती मर्यादा ओलांडता आली पाहिजे.
बाकी दुर्गाबाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. आमच्या घरासमोरच वरदाप्रकाशक भावेंच घर होतं. तिथे बऱ्याचदा बाई येत. त्यांचं मागच्या दारांतून थेट स्वयंपाक घरात येणं, बागेतली फेरी, मुलांशी वागणं, स्वच्छ, सुरकुती विरहीत चौकडीची नऊवारी नेसणं, करारी डोळ्यातून झिरपणारा स्नेह लांबूनच पाहिलाय. टोकाचा तत्वनिष्ठपणा स्विकारून, जोपासूनही हे मार्दव जिवंत असणं! ग्रेट!
माणूस वरून कठोर, तर्ककर्कश, कधीही तत्वाबाबत मुरड न घातलेला अन आतून बरक्या फणसासारखा मऊ राहू शकतो, अगदी टोकाचे वाईट अनुभव घेऊनही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाई!

वावे, हो दुर्गाबाईंनी जे वाईट अनुभव, स्वत:ला आले त्यावरूनच लिहिलय. एखादी आठवण आली ती लिहिली अन त्या काळात संपर्कात आलेल्या व्यक्तींवर त्या लिहित गेल्या आहेत. अन "आत्मचरित्राऐवजी आठवणी" ते अशी भूमिका असल्याने मला वाटतं की त्यांनी त्यातला सच्चेपणा तसाच ठेवला. म्हणजे जसं वाटलं तसं उतरलं, नंतर त्यात फेरफार करणं नसावं. सर्वसाधारणपणे लिहिल्यावर, कोणी दुखावलं तर जाणार नाही न? हे आपण (सामान्य माणूस) पहातो अन आवश्यक तर फेरफार करतो. तसं बदल जाणीवपूर्वक केले नसावेत, वा तसा त्यांचा विचारही नसावा. हे आपलं माझं मत हं

महाराष्ट्र दर्शन
गो.नी. दाण्डेकर.> बघायला हवं हे पुस्तक वाचनालयात मिळतं का. धन्यवाद srd.

अवलताई,
जसं अन जितकं वाचत जाऊ तितकं नुसतं रुचणारच नाही तर अनोळखी, प्रसंगी न रुचणारंही वाचावं. असं वाचन आपला अनुभवही विस्तारते अन आपल्या विचारप्रक्रियेला ढुशाही देतं
याला १०१% अनुमोदन! कुठलीच दारं बंद करून घेऊ नयेत. डोकावून तरी पाहता आलं पाहिजे.

तुम्ही दुर्गाबाईंबद्दलही छान लिहिलंय. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या काही जणांचे जे अनुभव वाचलेत त्यातही त्यांचं असंच, प्रसन्न व्यक्तिमत्त्व समोर आलं होतं.

एखादी आठवण आली ती लिहिली अन त्या काळात संपर्कात आलेल्या व्यक्तींवर त्या लिहित गेल्या आहेत. अन "आत्मचरित्राऐवजी आठवणी" ते अशी भूमिका असल्याने मला वाटतं की त्यांनी त्यातला सच्चेपणा तसाच ठेवला. म्हणजे जसं वाटलं तसं उतरलं, नंतर त्यात फेरफार करणं नसावं. सर्वसाधारणपणे लिहिल्यावर, कोणी दुखावलं तर जाणार नाही न? हे आपण (सामान्य माणूस) पहातो अन आवश्यक तर फेरफार करतो. तसं बदल जाणीवपूर्वक केले नसावेत, वा तसा त्यांचा विचारही नसावा. हे आपलं माझं मत हं>> हे मनापासून पटले. मलाही असेच वाटले .

अवल, हरपेन चांगलं लिहिलंय.
अवल, तत्त्वनिष्ठ आणि प्रेमळ/ रुज्यू (सॉरी लिहिता नाही आलं नीट) / मार्दव हे स्वभाव एका ठायी असले तर आपली अशी 'आजिम्या ब्रह्म पाहिले' गत का होते कोण जाणे. ते काही विरोधी शब्द नाही. कुठलाही डोकं ठिकाणावर असलेला माणूस तत्व कठोर असला तरी रोजच्या जीवनात प्रेमळ असतोच/ असलाच पाहिजे ना? म्हणजे ते गिव्हन, आणि २४-७ तिरसट अपवाद असला पाहिजे ना? पण आपल्याला त्या 'माणूसपणाचं' फार अप्रूप वाटतं. तुम्ही लिहिलं म्हणून तुमचं नाव घेतलं, पण आपल्या सगळ्यांनाच असं का वाटतं कोण जाणे.

Pages