कोविड १९ घडामोडी : समज, गैरसमज

Submitted by कुमार१ on 16 June, 2020 - 23:52

(शेवटचे संपादन : १४/७/२०२०)
........................

जानेवारी २०२० पासून कोविड१९ चे पडघम वाजू लागले. लवकरच त्याचा जागतिक प्रसार झाला. मार्चमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने या हजाराची महासाथ आल्याचे जाहीर केले. यास अनुसरून इथे (https://www.maayboli.com/node/73752) “हात, जंतू, पाणी आणि साबण" हा धागा काढला . त्यात मुख्यत्वे हातांच्या दैनंदिन स्वच्छतेवर भर होता. पुढे त्या धाग्यात कोविडवर अधिक चर्चा होत गेली. त्यातून आपल्यातील अनेकांनी खूप चांगले प्रश्न विचारले. त्या धाग्यावर हातांची स्वच्छता आणि आजाराची माहिती यांची बरीच सरमिसळ झाली आहे. म्हणून एक कल्पना मनात आली. त्या धाग्यात आणि मला अन्यत्र विचारलेल्या गेलेल्या या आजाराबद्दलच्या प्रश्नोत्तरांचे एक स्वतंत्र संकलन करावे. त्यासाठीच हा नवीन धागा काढत आहे. इथून पुढची कोविडची सर्व चर्चा इथे व्हावी, ही विनंती. एक प्रकारे हा धागा म्हणजे 'कोविडपर्वाचा' उत्तरार्ध असेल.

मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांतून असे जाणवले की या आजाराचे बाबतीत समाजात बरेच गैरसमज पसरले आहेत. त्यांचे निराकरण करावे या उद्देशाने हा स्वतंत्र धागा काढत आहे. तो लेख स्वरूपात नसून लोकांकडून प्रत्यक्ष जे प्रश्न विचारले गेले त्यांची उत्तरे, या स्वरूपाचा आहे. अजून जसजसे लोकांचे प्रश्न वाढत जातील तशी या प्रश्नोत्तरांमध्ये भर घालता येईल. विविध प्रश्न शक्यतो प्रश्नकर्त्याच्या भाषेतच ठेवले आहेत.

नवीन वाचकांसाठी हे संकलन उपयुक्त ठरेल अशी आशा. सूचनांचे स्वागत !
........................................................
प्रश्न :

१. कोविडसाठी Antibodies चा उपाय पारंपारिक विषाणूनाशक औषधांपेक्षा भारी असतो का?

‘भारी’ असे नाही म्हणता येत; उपचारांच्या त्या दोन दिशा आहेत. सध्या सुमारे ५० प्रकारच्या करोनाविरोधी औषधांच्या चाचण्या चालू आहेत. ढोबळ मानाने त्यांचे असे वर्गीकरण करता येईल:
१. पारंपरिक रासायनिक औषधे ( HCQ इ.)
२. विषाणूविरोधी औषधे
३. अ‍ॅन्टिबॉडीज
४. मूळ पेशींचे उपचार.
या सर्वांचे रुग्णप्रयोग शास्त्रीय पद्धतीने चालू आहेत. त्यांचे दखलपात्र निष्कर्ष बाहेर यायला काही महिने जावे लागतील. काही रुग्णांना अ‍ॅन्टिबॉडीजच्या जोडीने विषाणूविरोधी औषधे देखील द्यावी लागतात.
पुरेसे निष्कर्ष हाती आल्याखेरीज अमुक एक उपचार ‘भारी’ आहे असे म्हणता येणार नाही.
…………………………………………………………………………………………………………..
२. कोविडसाठी बीसीजी लसीचे उपचार उपयुक्त आहेत का ?

बीसीजी लस आणि कोविड यांचा संबंध तपासण्यासाठी एप्रिलपासून अनेक रुग्णप्रयोग चालू झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष हाती यायला सुमारे ४ महिने तरी लागतील.
यानिमित्ताने बीसीजीबद्दल काही उपयुक्त माहिती:

१. ज्या देशांत ती बालपणी सर्वांना देतात, तिथे बालकांच्या श्वसनाच्या गंभीर आजारांचे प्रमाणात घट दिसली आहे.
२. मुळात ही लस जरी जीवाणूविरोधी असली तरी तिच्यात काही विषाणूविरोधी गुणधर्म आहेत.
३. या लसीचे देखील काही उपप्रकार आहेत. त्यानुसार तिचे गुणधर्मही बदलतात. याचाही पुरेसा अभ्यास व्हायचा आहे.
४. सध्यातरी करोना- 2 आणि बीसीजीचे उपचार यासंदर्भात पुरेसा विदा मिळालेला नाही
………………………………………………………………………………………………………………………………………….
. ड जीवनसत्व आणि कोविडची तीव्रता यांचा कितपत संबंध आहे ?
यासंबंधी आता जोरदार संशोधन आणि काथ्याकूट होत आहे त्यासंदर्भात काही रोचक मुद्दे असे आहेत:

१. आपल्या त्वचेत तयार होणारे ड आणि आपले राहण्याचे भौगोलिक स्थान यांचा घनिष्ट संबंध असतो. हे स्थान विषुववृत्तापासून जसजसे उत्तरेकडे वरवर जाते तसे ड कमी प्रमाणात तयार होते.
२. ज्या शहरांत हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण खूप असते तिथे देखील शरीरात ड कमी तयार होते.
३. वरील दोन्ही घटक वुहान, तेहरान, मिलान, सिएटल, न्यूयॉर्क आणि लॉस एंजेलिस या शहरांना लागू होतात.

४. वाढत्या वयानुसार देखील त्वचेतील ड चे उत्पादन कमी होत जाते. बरेच जेष्ठ लोक आहारातून पुरेसे ड मिळेल याची काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्यांना ड ची कमतरता होते.
५. तसेच दीर्घकाळ धूम्रपान केल्यास देखील ड ची कमतरता होते.

६. ड ची पातळी आणि श्वसनसंस्थेची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध काही अभ्यासांत दिसला आहे.
..... जसे या विषयावर अधिक संशोधन होत राहील, तसा अधिकाधिक प्रकाश पडेल.
………………………………………………………………………………………………………………………..
४. गेल्या काही दिवसात “अमुक-तमुक रसायने खा आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवा”, या आशयाचे अनेक सल्ले ढकलपत्रांतून फिरवले गेले. त्यात किती तथ्य ?

या संदर्भात मला एका वैद्यकीय तज्ञांचे मत दखलपात्र वाटले. ते इथे लिहितो.
शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी लागणाऱ्या विविध घटकांपैकी जर कशाची खरोखर कमतरता असेल, तरच तो घटक बाहेरून देण्याने उपयोग होतो.
“ प्रतिकारशक्ती वाढवा (बूस्ट)” हे विधान मुळात अशास्त्रीय आहे. जर एखाद्या कमतरतेमुळे प्रतिकारशक्ती कमी झाली असेल, तर ती कमतरता बाहेरून घटक देऊन भरून काढली जाते. त्यामुळे कमी झालेली प्रतिकार शक्ती पूर्ववत (नॉर्मल) होते.
तेव्हा नागरिकांनी निव्वळ ढकलपत्रातील संदेश वाचून वैद्यकीय सल्याविना कुठलेही रसायन/ औषध घेण्यात मतलब नाही.

कोविड-प्रतिबंध आणि जीवनसत्वे:
१. क जीवनसत्व : औषधरूपात घेण्याची गरज नाही. रोजच्या आहारात लिंबू आणि मोसमानुसार पेरू, आवळा इत्यादी फळे व्यवस्थित खावीत.
२. ड जीवनसत्व : वयाच्या 50 ते 55 नंतर जर हाडांची दुखणे उद्भवली असतील तरच संबंधित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधरूपात घ्यावे. उगाचच स्वतःच्या मनाने नाही.
……………………………………………………………………………………………………………………………………………….
. कोविड१९ साठी रक्तद्रव उपचार :
गेल्या काही दिवसात यावर खूप चर्चा होत आहे. म्हणून या बद्दलची काही शास्त्रीय माहिती :

१. या उपचारासाठी दात्याची निवड कशी करतात ?
खालील निकष पूर्ण करणारा दाता सुयोग्य असतो:

*वय १८ ते ५५ दरम्यान.
*१०१.३ अंश F च्यावर ताप येऊन तो तीन दिवस वा अधिक टिकलेला असणे.

*असा दाता स्वतः कोविडसाठी उपचार घेऊन नुकताच बरा झालेला असतो. त्यानंतर सुमारे १४ दिवस त्याला या आजाराची कुठलीही लक्षणे नसावी लागतात. त्याची प्रयोगशाळा चाचणी सलग दोनदा नकारात्मक यावी लागते.
*पहिले लक्षण आलेल्या दिवसानंतर एक महिन्याने त्याच्या रक्तातील IgG बॉडीजचे प्रमाण चांगले असते.

२. या उपचारात प्राप्तकर्त्या रुग्णास काही धोका असतो का ?
वरवर पाहता तसा नसतो पण, एक शक्यता राहते. जेव्हा आपण सध्याच्या करोनाविषाणू विरोधी antibodies दिल्या, तर कालांतराने या विषाणूच्या अन्य प्रकारापासून संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो.
…………………………………………………………………………………………………………………………………………………
६. कोविड होण्याचे प्रमाण आणि लिंगभेद यात तथ्य किती ?
या प्रश्नाचे उत्तर वंश आणि देशानुसार वेगवेगळे आहे. तरी काही निरीक्षणे लिहितो.
या विषाणूचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा लिंगभेद नाही. पण, हा आजार झाल्यानंतर तो गंभीर होण्याचे आणि त्यातून पुढे मृत्यूंचे प्रमाण काही देशांत पुरुषांत अधिक दिसून आले आहे.

याची कारणमीमांसा तशी रोचक आहे. अद्याप यावरील संशोधन चालू आहे. अंदाजे काही निष्कर्ष असे आहेत :
१. साधारणपणे स्त्रियांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची कार्यक्षमता अधिक असते. यामागे स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोन्सचा वाटा असतो. तसेच स्त्रीमध्ये दोन X गुणसूत्रे (XX) असल्याचाही या शक्तीला काही फायदा होतो. त्यामुळे शरीरात घुसलेल्या रोगजंतूंचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होतो.

२. बऱ्याच देशांत धूम्रपानाचे प्रमाण पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा अधिक आहे, हाही मुद्दा विचारात घ्यावा लागतो.
३. या विषयाची अजून एक बाजू. जागतिक महासाथीमुळे जे विपरीत मानसिक परिणाम होतात, ते मात्र स्त्रियांमध्ये अधिक तीव्र असतात.
………………………………………………………………………………………………………………………………………..
. कोविडसाठी (संसर्गातून) सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याबाबत विशेष असं संशोधन जगात चालू आहे का?
होय, असे काही अभ्यास चालू आहेत.

१. अशा अभ्यासात बाधित लोकांपैकी किती मृत्यू पावतात याचे गुणोत्तर काढले जाते. ते देशानुसार भिन्न आहे.
२. एकदा बाधित झाल्यानंतर पुन्हा तोच संसर्ग होतो का हे आजमावले जाते. त्यासाठी माकडांवर काही प्रयोग झाले आहेत.
३. बऱ्या झालेल्या रुग्णांत विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज किती प्रमाणात निर्माण झाल्यात हेही मोजले जाते.
४. एकंदरीत करोना या विषाणू जमातीने शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अल्पकालीन असावी, असा सध्याचा अंदाज आहे.
५. त्यामुळेच लस शोधणे महत्त्वाचे ठरेल.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………….
८. घरगुती पातळीवर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सगळ्यांनी मोजावी का?
प्रश्न चांगला आहे पण त्याचे उत्तर सरळ नाही ! बरेच उलट-सुलट मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
१. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अन्य श्वसनाच्या आजारात देखील कमी होऊ शकते. उदा. न्युमोनियाचे अन्य प्रकार, अन्य दीर्घकालीन श्वसनविकार .

२. घरगुती वापराच्या oximeter यंत्रांची अचूकता बरीच कमी असते. विशिष्ट ऑक्सिजन पातळीच्या खाली त्यांची उत्तरे विश्वासार्ह नसतात.
३. अशी मोजणी घरी करताना दक्षता घ्यावी लागते. हात पुरेसे गरम असावे लागतात तसेच संबंधित बोटाच्या नखाला नेलपॉलिश असलेले सुद्धा चालत नाही.
४. उठसूट घरगुती मोजणीमुळे विनाकारण भीतीचे प्रमाण वाढत जाते.
हे सर्व बघता या उपकरणाचा उठसूट सर्वांसाठी वापर सुचविलेला नाही.
…………………………………………………………………………………………………………………………………………………………
९. कोविडमुळे मृत्यू होण्याची कारणे काय आहेत ?

कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जगभरात बरीच आहे. अशा काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते.
त्यातून मृत्यू होण्याची कारणे अभ्यासली जातात. आतापर्यंत विच्छेदनातून समजलेली तीन कारणे अशी आहेत:
१. विषाणूच्या थेट हल्ल्यामुळे झालेला शरीरपेशींचा नाश
२. अनेक रक्तवाहिन्यांमध्ये झालेल्या रक्तगुठळ्या
३. या विषाणूला रुग्णाच्या शरीराने दिलेला hyperimmune प्रतिसाद >>> अधिकाधिक पेशींचा नाश.
.......................................................................
१०. करोना २ ची लस खरेच लवकर उपलब्ध होईल का? ती घाईने बाजारात आणल्यास काही तोटे?

लसीचा मुद्दा उपस्थित केलाय हे छान झाले. सध्या या संदर्भात माध्यमांतून काही उलटसुलट आणि अर्धवट बातम्या आलेल्या आहेत. या निमित्ताने काही अधिकृत माहिती इथे देतो.
कुठलीही लस प्रत्यक्ष वापरात येण्यापूर्वी ती सुरक्षित आणि प्रभावी अशी सिद्ध व्हावी लागते. हे दीर्घकालीन काम असते. एखाद्या लसीवरील संशोधन परिपूर्ण व्हायला तब्बल वीस वर्षे जावी लागतात. आता सध्याच्या आजारावरील लस्सीबद्दल पाहू.

ही लस जर घाईघाईत तयार केली तर तिच्या संशोधनातील बरेच टप्पे नजरेआड करावे लागतात. कुठलीही लस तिच्या संशोधनादरम्यान अनेक लोकांना देऊ पहावी लागते, तसेच तिचे निरनिराळे डोस देखील देऊन पहावे लागतात. त्यानंतर संबंधित लोकांचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यावरच योग्य निष्कर्ष निघतात.
हे सर्व पाहता सुरक्षित आणि प्रभावी अशी लस लवकर वापरात येणे अवघड दिसते. म्हणून कोविडशी सामना करीतच बराच काळ जावा लागेल असे दिसते.
.................................................................................................................................................
११. करोनाचा संसर्ग डोळ्यांच्यावाटे होतो का?

ज्याप्रमाणे फ्ल्यूचे अन्य विषाणू डोळ्यांच्यावाटे शिरू शकतात तसेच हाही विषाणू शिरू शकतो. पण, अशा प्रकारे संसर्ग झालेल्या व्यक्ती अत्यल्प आहेत. किंबहुना त्याचा पुरेसा विदा उपलब्ध नाही. आरोग्यसेवकांनी काम करताना आपला चेहरा पूर्ण झाकावा हे योग्यच. पण सामन्यांसाठी तशी शिफारस नाही. नाक व तोंड झाकणे पुरेसे आहे. हात नेहमी स्वच्छ ठेऊन ते डोळ्यांना लागणार नाहीत, ही काळजी घेतली की पुरे.
...................................................................................................
१२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?

याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. मारक (Neutralizing)
2. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.
........................................................................................................................
१३. “ आपला विशिष्ट रक्तगट (A) आणि कोविड१९ होण्याची शक्यता यांचा खरंच संबंध आहे का ?

या संदर्भात मोजके अभ्यास युरोपमध्ये झालेले आहेत. त्यामध्ये ‘ए’ रक्तगट असणाऱ्या रुग्णांचा विशेष अभ्यास केला गेला.
या गटाच्या माणसांना जर कोविड झाला, तर त्यांच्यात श्वसनकार्य मोठ्या प्रमाणावर ढासळू शकते (failure). इतकाच सध्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
अर्थात रक्तगट आणि हा आजार होण्याची अधिक शक्यता, यावर अजून पुरेसे संशोधन झालेले नाही. तेव्हा घाईने या मुद्द्याचे सरसकटीकरण करता येणार नाही.

१३ ब
ओ (positive,निगेटिव्ह) रक्तगट आणि covid 19 च्या आजाराची तीव्रता ह्याचा काही संबंध आहे का ?

२००८ मधील करोना-१ या विषाणू संदर्भात असे काही जुजबी संशोधन प्रयोगशाळेत झाले होते. तूर्त सध्याच्या करोना-२ बाबत मात्र असे संशोधन बाल्यावस्थेत आहे. ‘ओ’ गटाच्या लोकांमध्ये काही विशिष्ट antibodies तयार होत असतात. त्यांच्यामुळे या विषाणूला पेशीत शिरण्यास प्रतिबंध होतो, असे एक गृहीतक आहे. पण सध्या कुठलाही निष्कर्ष काढलेला नाही........................................................................................................................................................
१४. हा आजार उच्चरक्तदाबाच्या रुग्णांना जेवढा वाईट आहे तेवढा दम्याच्या लोकांना नाही, असे वाचले. हे खरं आहे का ?

होय त्यात काही तथ्य आहे.
या आजाराचा विषाणू पेशीत शिरताना एका विशिष्ट एंझाइमला चिकटतो आणि मग पुढील प्रक्रिया होतात. त्यातून आजार उद्भवतो.
रक्तदाबाच्या आणि हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये या एंझाइमचे प्रमाण जास्त असते. याउलट ते प्रमाण दम्याच्या बऱ्याच रुग्णांमध्ये कमी असते.
सध्या हे गृहितक चर्चेत आहे. अधिक संशोधन होत आहे.
.................................................................................................................................................................................
१५. रुग्णाचा कोविड’मुळे’ मृत्यू झाला की अन्य आजार आणि कोविड’सह’ मृत्यू झाला, हे कसे ठरवायचे ?

मृत्यूचे निदान ही अचूक गोष्ट असते. पण, मृत्यूचे खरे कारण ही मात्र काही वेळेस (विशेषतः साथींच्या काळात ) वादग्रस्त गोष्ट ठरते. बऱ्याच वेळा मृत्यूचे कारण हे संबंधित डॉक्टरांचा अनुभव आणि परिस्थितीजन्य पुरावा यावरून दिले जाते. मृत्यूनंतर काही मृतदेहांचे अभ्यासासाठी शवविच्छेदन केले जाते. त्यातच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होते. अर्थात ही प्रक्रिया सर्वांचे बाबतीत केली जात नाही; तसे शक्यही नसते.
..........................................................................................
१६. “कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.
आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर:
१. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत.
२. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत.
३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.
...............................................................................................
१७.
हॅप्पी हायपोक्सिया हा काय प्रकार आहे ?

‘हॅपी हायपोक्सिआ’ हे भयानक चुकीचे टोपणनाव आहे. योग्य वैद्यकीय नाव ‘सायलेंट H’ असे आहे.
म्हणजे काय ते सांगतो.

१. निरोगी माणसात ऑक्सिजनचे रक्तप्रमाण सुमारे ९५ mmHg इतके असते.
२. काही श्वसन आजारात ते कमी होऊ लागते. परंतु ते जेव्हा ६० पर्यंत खाली येते तेव्हाच रुग्णास जोराचा दम लागतो.

३. म्हणजेच ९५ ते ६० या टप्प्यात रुग्ण सायलेंट H अवस्थेत असतो.
४. या अवस्थेत रुग्णात दम लागलेला तर नसतोच, पण तो शांत आणि वरवर ‘सुखी’ (लक्षणविरहित )असतो. हा खरा विरोधाभास आहे.

५. मात्र असा रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत (decompensation) जाऊ शकतो, हा या अवस्थेतील गर्भित धोका आहे. म्हणून त्याला हॅपी म्हणणे चुकीचे आहे.
.................................................................................
१८. करोना- २ विरोधी औषध शोधायला एवढा वेळ का लागतोय?

या संदर्भात काही मूलभूत माहिती:
विषाणूंच्या रचनेनुसार त्यांचे DNA व RNA असे दोन प्रकार आहेत. करोना- २ RNA या प्रकाराचा आहे. अशा प्रकारच्या विषाणूंची काही वैशिष्ट्ये:

१. त्यांचा जनुकीय संच खूप लहान असतो.
२. त्यामुळे त्यांचे जनुकीय बदल वेगाने आणि वारंवार होतात.

३. त्यांची रचना बरीच भिन्न स्वरूपाची असते.
४. त्यांची उत्क्रांती वेगाने होत राहिल्याने औषधांना त्यांचा 'पाठलाग' करणे तुलनेने अवघड जाते.

५. म्हणून नवनवी औषधे लवकर निष्प्रभ होऊ शकतात.
...........................................................................
१९. करोना विषाणू हवेतून पसरतो काय?

यावर डॉ. सौम्या स्वामीनाथन ( वैज्ञानिक WHO) यांचे स्पष्टीकरण असे आलेले आहे:

१. हा विषाणू हवेतून पसरतो, पण अत्यंत मर्यादित वातावरणात.
२. मुख्यता हवेतून पसरणारे जे विषाणू (उदाहरणार्थ गोवर) असतात, त्या तुलनेत करोनाचे पसरणे बरेच कमी आहे.

३. करोनाचे वातावरणात उडालेले कण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहत नाहीत.
४. जर तो वरील २ प्रमाणे मुख्यतः हवेतून पसरणारा असता, तर एव्हाना आपणा सर्वांनाच त्याचा संसर्ग झाला असता.
………
२०. वाफ घेणे व रोगप्रतिबंध

वाफ आणि श्वसनसंस्था याबद्दल काही मूलभूत माहिती:
कुठल्याही श्वसनविकारात जेव्हा नाक चोंदणे, घशात खूप द्राव साठणे असे होते, तेव्हा वाफेने ते स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होते. सूक्ष्म श्वासनलिकांपर्यंत वाफ पोचत नाही. तेव्हा ‘वरच्या’ श्वसनमार्गाची स्वच्छता हा वाफेचा खरा उपयोग आहे.
तो कुठल्याही विशिष्ट सूक्ष्मजंतूच्या विरोधातील उपाय असत नाही.
त्याचे महत्व श्वसनविकारातला पूरक उपचार इतकेच आहे.
.............................................................................
२१. इटोलीझुमॅब आणि रेमडेसीविर यात काय फरक असतो ?

१. रेमडेसीविर हे थेट विषाणूविरोधक आहे. ते आपल्या पेशींतील या विषाणूची तुफान वाढ थांबवते. ( अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘विर” असते. Antiviral या अर्थी)

२. इटोलीझुमॅब ही मुळात विशिष्ट प्रकारची antibody आहे. (अशा सर्व औषधांच्या नावात अंत्य ‘मॅब’ असते). जेव्हा विषाणू पेशीत हल्ला चढवतो, तेव्हा त्याला प्रतिकार म्हणून तिथे प्रचंड दाहप्रक्रिया होते. काही वेळेस ही अनियंत्रित होते >> गंभीर आजार >> मृत्यू.
हे औषध दाहप्रक्रिया नियंत्रित करते.
...............................................................................................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20200625-WA0007.jpg
हे का?
मलापण तोच प्रश्न पडला. आयुष मंत्रालयाने सुचवलेले जिन्नस काढ्यात आहेत.
पण इथे काढ्याच्या नावातच आयुष आहे

>>>> याचे उत्तर आयुर्वेदिक तज्ञांनी द्यावे हे बरे.
सर, माझा प्रश्न ... अशा प्रकारच्या औषधांच्या विक्रीवर (सरकारी मंत्रालय अधिकृत) काही नियंत्रण नाही का? विशेषतः अस्थिरोग, मधुमेह , हृदयइरोगांच्या इलाजावरील दाव्यांवर?????

रेव्यु,
मला काही कल्पना नाही. कोणी सांगितल्यास आवडेल.

मागे एकदा एका आयुर्वेदिक संशोधकांशी गप्पा झाल्या होत्या. ते म्हणाले, “सध्या जाहिरातबाजीने खपवली जाणारी बरीच तथाकथित आयुर्वेदिक औषधे बाजारात आहेत. तशी औषधे बऱ्याचदा मूळ वनस्पतीपासून देखील केलेली नसतात. जे रुग्ण आमचा सल्ला घ्यायला येतात, त्यांना आम्ही प्रमाणित प्रकारातीलच् औषधे लिहून देतो. जाहिरातींना भुलून थेट दुकानातून औषध घेणाऱ्यांबद्दल आम्ही काय बोलणार?”

पळवाटा काढून दावे केले जातात
खाली साधारण 5 नंबरचा चष्मा लावून दिसेल अश्या सूक्ष्म फॉन्ट मध्ये 'कंडिशन्स अप्लाय, रिझल्ट्स मे डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन' लिहिलेलं असतं.
तक्रार झाल्यावर वेळोवेळी सरकार कारवाई करून जाहिरातीतून हे शब्द, दावे काढायला लावतं.
थेट दारूची जाहिरात करू नये म्हणून एक ब्रँड दारू सारखे दिसणारे ग्लास, नशिले डोळे,जड आवाज वगैरे माहोल दाखवून खाली बारीक शब्दात 'क्लब सोडा' असं लिहून ती जाहिरात फॅमिली टाईम ला राजरोस दाखवू शकतं.

कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.

आता हा आजार समाजात उद्भवल्याला सहा महिने उलटलेत. त्यादृष्टीने काही माहितीची भर:

१. असे काही रुग्ण तब्बल तीन महिने अंथरुणात खिळून आहेत.

२. काहींना उपचारानंतर लक्षणे अजिबात नाहीत, पण दोन महिने उलटल्यावरही त्यांच्या चाचणीचे निष्कर्ष होकारात्मकच आहेत.
३. काहींमध्ये कालांतराने विशिष्ट प्रकारचा न्युमोनिया होऊ शकेल.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने बनवलेले करोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने बनवलेले करोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण करोना व्हायरसमधून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.

आपल्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशा परिस्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. एका व्यक्तीला करोना झाला ती व्यक्ती बरी झाली तर त्या व्यक्तीला पुन्हा करोना होण्याची भीती असते का? यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे डायरेक्टर रणदीप गुलेरिया यांनी उत्तर दिलं आहे. एकदा करोना होऊन गेल्यानंतर त्याचा संसर्ग पुन्हा होण्याची चिन्हं फारच कमी आहेत. कारण करोना झाल्यानंतर जे इलाज केले जातात त्यामुळे शरीरात काही अँटीबॉडीज तयार करतात. ज्यामुळे रुग्णाची प्रतिकार शक्ती वाढते. अशा रुग्णाला पुन्हा करोना होण्याची शक्यता फारच कमी आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/very-unlikely-to-get-it-twice-...

ब्लॅक कॅट तुम्ही मास्क वापरणे,अंतर राखणे,साबणाने हात धुणे हे सोडू नका.
एकदा corona Jhala ki parat tya व्यक्तीला corona hot nahi ha निष्कर्ष अपुऱ्या अभ्यासावर आहे.
सर्व निकष पाळून तो निष्कर्ष काढलेला नाही.
एकीकडे रामदेव बाबा वर टीका करायची आणि दुसरीकडेि अशास्त्रीय अपुऱ्या अभ्यासावर आधारित निष्कर्ष वर विश्वास ठेवायचा .
असे वागू नका.

एकदा ॲन्टीबॉडी तयार झाल्यावर कोरोना व्हायची शक्यता कमी असावी,लसीच्यामागे हेच शास्त्र आहे.एकदा ॲँन्टीबॉडी तयार झाल्यावर इम्युनीटी मिळते.जाणकारांनी प्रकाश टाकावा.

@के तु,
एकदा ॲँन्टीबॉडी तयार झाल्यावर इम्युनीटी मिळते.जाणकारांनी प्रकाश टाकावा. >>>
याचे उत्तर मूळ लेखात प्र. क्र. १२ मध्ये दिलेच आहे.
पुन्हा डकवतो :

१२. सध्या जे रोगी कोविड१९ होऊन बरे झाले आहेत त्यांना यापुढे हा आजार पुन्हा होत नाही, हे खरे आहे का?

याचे उत्तर गुंतागुंतीचे आहे. जे रोगी या आजारातून बरे झाले आहेत, त्यांच्या रक्तातील विशिष्ट प्रथिनांचा (antibodies) चा अभ्यास केला जातो. ही प्रथिने दोन प्रकारची असतात :
1. मारक (Neutralizing)
2. अ-मारक
यापैकी फक्त पहिल्याच प्रकारची प्रथिने त्या विषाणूने पुन्हा हल्ला केल्यास उपयुक्त ठरतात. ज्या रुग्णांत ही प्रथिने भरपूर तयार झाली असतील, त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असेल. (अर्थात अशी प्रथिने किती काळ रक्तात टिकू शकतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही).
पण ज्यांच्यात दुसऱ्या प्रकारची प्रथिने जास्त असतील, त्यांना हा फायदा होणार नाही. कारण ही प्रथिने त्या विषाणूचा (पुढच्या संसर्गात) नाश करू शकत नाहीत.

हा आजार झाल्यानंतर रुग्णास मिळणारी प्रतिकारशक्ती किती काळ टिकते?” या विषयावरील काही ताजी माहिती:

१. हा आजार जगभरात फैलावलेला आहे. त्यामुळे कुठल्याही एका देशातील ठराविक रुग्णांच्या अभ्यासातून या प्रश्नाचे अंशतःच उत्तर मिळते.

२. आजारातून मिळणारी प्रतिकारशक्ती दोन प्रकारची असते:
a. अँटीबॉडीज निर्मितीमुळे, आणि
b. विशिष्ट प्रकारच्या पांढऱ्या पेशींच्यामुळे ( T cells)

३. वरील २ पैकी बहुतांश अभ्यासांत फक्त अँटीबॉडीज मोजतात, कारण ते सोपे असते. दुसऱ्या प्रकारचा पेशींचा अभ्यास हा संशोधन पातळीवर सावकाश करावा लागतो.

४. एका अभ्यासात, काही रुग्ण बरे झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी त्यांच्यातील अँटीबॉडीजचे प्रमाण पुन्हा मोजले गेले. तेव्हा त्या प्रमाणात ७०% टक्‍क्‍यांपर्यंत घट झालेली आढळली..
...................
सारांश : काही ठोस उत्तरांसाठी वाट पहावी लागेल.

इथे लोक गोंधळात .
देवी च लस खूप वर्ष संरक्षण देते .
ते संरक्षण लसी मुळे निर्माण झालेल्या antibody mule aste asa समजले जाते.
जश्या विविध लसी खूप दिवस संरक्षण देतात .
त्या मुळे corona virus विरूद्ध antibody निर्माण झाल्या की रोग होणार नाही असा साधा विचार सामान्य लोक करणार ते साहजिक आहे.
डॉक्टर तुम्ही हा मुद्धा स्पष्ट करावा.

एकाच माणसाला सारखा सारखा करोना व्हायला लागला तर ही साथ कधी नष्टच होणार नाही.

माझ्या मते , हा कब्बडीचा खेळ आहे, काही लोक मधली लाइन ओलांडून पलीकडे गेले व आउट झाले,

काही पलीकडे गेले, पण पुन्हा सुरक्षितपने परतले.

काही अजुन पलीकडे गेलेच नाहीत.

परत आलेले लोक म्हणजे इंफेक्शन , रोग होउन बरे झालेले, हे लोक आता हर्ड इम्युनितिचा गट वाढवतील, गट 70 % झाला तर(च) साथ जाईल

हेमंत,
लसीमुळे आणि आजारातून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती यात गुणात्मक फरक पडू शकतो.

१. लस देताना ती प्रयोगसिद्ध योग्य मात्रेत सर्वांना दिली जाते.
२. याउलट निरनिराळ्या लोकांना झालेला आजार हा कमी अधिक तीव्रतेचा असतो. त्यानुसारच प्रतिकारशक्तीचे प्रमाण राहते.
३. सध्या लक्षणविरहित करोना-संसर्ग झालेल्या लोकांमध्ये एंटीबॉडीजचे प्रमाण खूप कमी आहे आणि त्या अत्यल्प काळ टिकतात.

Bl C,
कबड्डीची उपमा आवडली !

जर लस देऊनही उपयोग झाला नाही तर अवघड आहे.कारण डॉक्टर म्हणाले तसे तीन महीन्यात ॲन्टीबॉडीज कमी झाल्या तर एकाच माणसाला सारखी लस टोचावी लागेल. ऑक्सफर्ड लस फक्त एक वर्ष प्रोटेक्शन देते

कोरोनामुळे लहान मुले आणि ६०च्या वरील लोकांना जास्त धोका आहे म्हणतायेत पण प्रत्यक्षात यांच्या मधल्या वयोगटातीलच भरपूर लोक बळी पडत आहेत आपल्याकडे मग उद्या हर्ड इम्म्युनिटीतरी कशी तयार होणार?
https://indianexpress.com/article/cities/mumbai/audit-of-545-deaths-in-m...
https://indianexpress.com/article/cities/lucknow/up-amid-death-spike-con...

प्रणवंत,
तुमचे दोन्ही दुवे वाचले. पहिली बातमी मुंबई तर दुसरी उत्तर प्रदेशची आहे. या प्रतिसादात फक्त मुंबईचे विश्लेषण करतो.
१. आजही वयानुसार मृत्यूदर मोजला तर तो ६०+ मध्येच सर्वोच्च आहे.

२. या कालावधीत जे तरुण या आजाराने मृत्यू पावले, त्यांच्यात थायरॉईड -न्यूनता, मधुमेह आणि लठ्ठपणा हे आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. कोविड होण्यापूर्वी हे अन्य आजार ‘अंधारात’ (undiagnosed) राहिले होते.

३. 41 ते 50 वयोगटातील मृत्यू झालेल्यामध्ये उच्चरक्तदाब देखील आढळला.

४. त्यामुळे ,तरुण वर्गात जे खरोखर निरोगी आहेत, त्यांना जर कोविड झाला तर तो गंभीर व्हायची शक्यता बरीच कमी राहील.

प्रणवंत,
आता उत्तर प्रदेशची बातमी बघू.

१. तिथेही सर्वोच्च मृत्युदर ६०+ मध्येच आहे.

२. इथे अन्य कुठला मोठा आजार नसलेले 21 ते 60 या गटातील मृत्यू लक्षणीय आहेत, हे बरोबर. पण त्याचे स्पष्टीकरण तेथील डॉक्टरांनी असे दिले आहे :

३. काही लोक वरवर निरोगी दिसले तरी त्यांना एखादा जीवाणू संसर्ग आधीच झालेला असतो. त्यात आता कोविडची भर पडते. त्यातून परिस्थिती चिघळते.

४. काही लोकांत congenital immune suppression या प्रकारचे आजार जन्मजात असतात. त्यांना आता कोविड होतो >> प्रतिकारशक्ती लगेच खूप ढासळते >> गंभीर आजार >>> मृत्यू.

कुंतल, चांगला प्रश्न.

Autoimmune या स्वरूपाचे आजार असलेले लोक एका अर्थाने प्र-शक्तीशी तडजोड झालेले
(immunocompromised) असतात. त्यांना immunosuppresants या प्रकारची काही औषधे देखील दीर्घकाळ चालू असतात.

त्यामुळे अशा रुग्णांना कोविड होण्याची शक्यता अधिक राहते, आणि तो झाल्यास त्यातून न्यूमोनियासम कटकटी वाढण्याची शक्यता असते.

माझ्या बाजूला अशीच केस झाली .
पहिला खोकला नंतर श्वास घेण्यास त्रास मग हॉस्पिटल मध्ये दाखल.
ऑक्सिजन लेवल एकदम कमी heart beat
60 chya pan khali.
सर्व corona chi lakshan म्हणून corona test pan निघाला नुमोनिया.
पण फुफुस थोडी damage झाली असा पण रिपोर्ट आला.

फिल्मी,
तुमच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर काही वेळाने देणार आहे.

अस्मिता, धन्यवाद.
तुम्ही मागच्या धाग्यात मागच्या महिन्यात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर या धाग्यात वर घेतले आहे.
तुम्ही ते वाचलेच असावे.

“कोविड१९ हा आजार दीर्घकालीन होऊन त्याचे भविष्यात मोठे दुष्परिणाम होतील का?” हा प्रश्न १ महिन्यापूर्वी माझ्या या आधीच्या धाग्यात विचारला गेला होता.....
हो वाचले. तुम्ही आठवणीने उत्तर दिल्याबद्दल खास आभार. Happy

फिल्मी,
‘हॅप्पी हायपोक्सिआ’ हे भयानक चुकीचे टोपणनाव आहे. योग्य वैद्यकीय नाव ‘सायलेंट H’ असे आहे.
म्हणजे काय ते सांगतो

१. निरोगी माणसात ऑक्सिजनचे रक्तप्रमाण सुमारे 95 mmHg इतके असते.

२. काही श्वसन आजारात ते कमी होऊ लागते. परंतु ते जेव्हा ६० पर्यंत खाली येते तेव्हाच रुग्णास जोराचा दम लागतो.

३. म्हणजेच 95 ते 60 या टप्प्यात रुग्ण सायलेंट H अवस्थेत असतो.
४. या अवस्थेत रुग्णात दम लागलेला तर नसतोच, पण तो शांत आणि वरवर ‘सुखी’ असतो. हा खरा विरोधाभास आहे.

५. मात्र असा रुग्ण अचानक गंभीर अवस्थेत (decompensation) जाऊ शकतो, हा या अवस्थेतील गर्भित धोका आहे. म्हणून त्याला हॅप्पी म्हणणे चुकीचे आहे.
.....................
(उत्तर वाचल्याची पोच मिळाल्यास बरे होईल).

Pages