शाहरूख खान, आमीर खान आणि असहिष्णुता !

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 November, 2015 - 16:48

धागा शाहरूखचा नाही असे आधीच म्हटलेले, म्हणून यात आमीरलाही घेतले.

म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.
पण येस्स, हा काढलाय मी शाहरूखचा एक चाहता म्हणूनच.

या देशात तीन गोष्टींवरच्या चर्चांना कधी मरण नाही. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण.
शाहरूख या तिन्हीत मोडतो.
सिनेमा म्हणाल तर बॉलीवूडचा तो आजघडीचा सुपर्रस्टार आहे. क्रिकेट म्हणाल तर आयपीएलमधील मोस्ट ग्लॅमरस फ्रेंचायझी आहे.
तसेच राजकारणात तो स्वत: सक्रिय नसूनही त्याचे नाव सतत राजकारणासंबंधित चर्चांमध्ये येत राहते.
कधी त्याची विधाने वादग्रस्त म्हणून चर्चेत असतात, तर कधी त्याच्या सिनेमांवर काही राजकीय संघटना बंदी आणत असतात. जातीधर्मावर राजकारण चालणार्‍या आपल्या देशात त्याचे अल्पसंख्यांक असणे यावरही राजकारण केले जाते, तर कधी थेट पाकिस्तानशी त्याचा संबंध जोडला जातो.

मी त्याचा चाहता आहे ते त्याच्या चित्रपटातील कामाचा आणि त्यासाठी तो घेत असलेल्या मेहनतीचा. त्याचा आजवरचा स्ट्रगल आणि थक्क करणारा प्रवास पाहता तो नक्कीच एक आदर्श व्यक्तीमत्व आहे. त्याव्यतिरीक्त त्याच्या ईतर गुण अवगुण दुर्गुणांचे ना मी समर्थन करत, ना त्याविरोधात भाष्य करतो.

पण बरेचदा त्याच्या नावावर काहीही अफवा फिरवल्या जातात. तसेच त्याच्या चाहत्यांनाही याचा जाब विचारला जातो. सोशलसाईटवर त्याच्याविरोधात फिरणार्‍या काही पोस्टी ईतक्या हिणकस असतात की त्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. तसेच कधी त्याच्या चित्रपटांची वा अभिनयाची चर्चा करावी तर तिथेही कोणी ना कोणी या गैरफिल्मी मुद्द्यांवर वाद घालायला येते आणि विषय भरकटतो. नुकतेच माझ्या "पडद्यावरील चिरतरुण कलाकार" या धाग्यावरही हा अनुभव घेतला, पण तिथे या विषयाला फुंकर न देता मी संयम बाळगला म्हणून धागा भरकटायचा वाचला.

असो, तर बस्स याचसाठी हा धागा, जेणेकरून ईतर धागेही भरकटणार नाहीत, तसेच आजवर जे जे काही त्याच्याविरोधात उठलेय ते सारे खरेखोटेही होऊन जाईल.

लिहायला बरेच आहे माझ्याकडे, पण इथे सारे काही मीच लिहिणार नाहीये.
तरी सुरुवात करतो एका जगप्रसिद्ध अफवेपासून ..

"मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" ... हे त्याचे वादग्रस्त ट्वीट गेल्या लोकसभा निवडणूकीच्या काळात फार फेमस झाले होते. अर्थात होणारच, कारण ते किंग खान शाहरूखचे होते. पण गंमत म्हणजे निवडणूका झाल्यावर, निकाल लागल्यावर आणि मोदी पंतप्रधान झाल्यावर ते ट्वीट शाहरूखचे नसून कोण्या कमाल खानचे होते असे स्पष्टीकरण संबंधितांकडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे त्या आधी शाहरूखकडूनही कोणते स्पष्टीकरण आले नव्हते. ते लपवून ठेवले गेले होते. मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र एका कार्यक्रमात त्याला मोदींबरोबर अगदी मित्रत्वाचे हस्तालोंदन करताना पाहिले. भाजपा महाराष्ट्राच्या शपथविधीलाही बहुतेक प्रमुख पाहुण्यांमध्ये त्याला आमंत्रण होते. एकंदरीत आनंदी आनंद होता.

मग आधी एवढी मोठी अफवा मार्केटमध्ये फिरतच कशी होती? कशावरून ती सेट केलेली नव्हती? नक्कीच यावरून मतांची कमाई झाली असणार. शाहरूखच्या स्टारडमला जो एक निगेटीव्ह पैलू आहे किंवा ज्याचे मुद्दामून तसे निगेटीव ब्रांडींग केले गेले आहे त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जातो का?

आयपीलदरम्यान तळ्यात मळ्यात असणारे भारत-पाक संबंध बिघडतात आणि अचानक पाक खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली जाते. शाहरूख हा एका आयपीएल संघाचा मालक या नात्याने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू हवेत असे विधान करतो आणि त्यावरून गदारोळ उठतो, त्याच्याविरोधात निदर्शने केली जातात. तेच दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेट समालोचक आणि कलावंत बिनधास्त भारतात येत जात राहतात. त्यांची पुस्तक प्रदर्शने भरतात. एकमेकांशी क्रिकेटचे दौरेही आखले जातात. प्रसारमाध्यमांकडून याचे स्वागतही होते. मात्र वरील विधान केवळ शाहरूखचे असल्याने त्यावर गदारोळ उठलेला असतो, तेच दुसर्‍या कोणाचे असते तर कोणाच्या गावीही नसते.

वानखेडेवरील सुरक्षारक्षकाशी त्याचा लफडा होतो. दारू पिऊन मारामारी करणे तर सोडा, मी दारू पिण्याच्याही विरोधात आहे. त्यामुळे मी याचे समर्थन कधीच करणार नाही. पण दुसर्‍या दिवशी सोशलसाईटवर मेसेज फिरू लागतात, ज्यात त्या सुरक्षारक्षकाचे मराठी असणे हायलाईट केले जाते. खरे तर हा वाद वैयक्तिक स्वरुपाचा असताना ज्याने कोणी असले मेसेज फिरवून त्याला ‘खान विरुद्ध मराठी’ असे जातीय रूप दिले त्या मेसेज बनवणार्‍याला पकडून फटके दिले पाहिजेत. पण असे होत नाही कारण काही जण यातूनही राजकारण करत असतात.

आता जरा येऊया लेटेस्ट मॅटरकडे, सध्या त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त असहिष्णुतेविरुद्ध त्याने काहीतरी म्हटलेय ज्यावरून सारे मार्केट तापलेय. रोज त्याच्या विरोधात किमान आठ-दाहा फॉर्वर्डेड पोस्ट व्हॉटसपवर वाचतोय. मी ना अजून त्यांच्याशी वाद घालायला गेलोय, ना शाहरूखने मुळात काय म्हटलेय हे चेक करायला गेलोय. कारण काय खरे आणि काय खोटे याचा आता भरवसाच राहिला नाही, उगाच नंतर ते शाहरूखने नाही तर अबक खानने म्हटले म्हणत टांगा पलटी व्हायचा.

असो, आतापर्यंत या असहिष्णूतेवरच्या वादात एवढ्या लेखकांनी आपापले पुरस्कार परत केले वा एवढ्या लोकांनी यावर आपले मत व्यक्त केले तरी त्यात म्हणावे तसे ग्लॅमरस नाव नव्हते. पण शाहरूखच्या एंट्रीने अचानक माहौल बनला. तर यामागे सुद्धा एक ठरवून खेळली गेलेली राजकीय खेळी आहे का? कोणाकडून ते नंतर शोधूया ... पण त्या आधी मला हे देखील कोणीतरी सांगा की नक्की त्याने काय म्हटलेय आणि त्यात काय वावगे आहे? आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी या विरोधात पुरस्कार परत केले आहेत, वा आपले विरोधी मत व्यक्त केले आहे त्यापेक्षा ज्यादा असे त्याने काही म्हटले आहे का? की इथेही शाहरूख आहे म्हणूनच वातावरण तापले आहे आणि त्याला राजकीय रंग देण्यात येत आहे?

त्याच्याबद्दल मनात ईतर कोणत्या गोष्टींमुळे आकस असेल तर त्या गोष्टीही इथे येऊद्या, कदाचित त्यामागचे सत्यही काहीतरी वेगळेच असेल जे खरेखोटे होऊन जाईल.

पहिले वाक्य पुन्हा रीपीट करतो, म्हटले तर हा धागा शाहरूखचा आहे म्हटले तर राजकीय.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो नक्कीच..
तिथे आमीर खान बायकोचे नाव घेत जे म्हणाला ते तिच्याकडून खरे खोटे न करताच सोशलसाईटवर तिच्याही नावाने शेलके मेसेज सुरू झाले. आणि गंमत म्हणजे हे लोकच नंतर त्याचा चित्रपट बघून त्याची चर्चा करताना थकणार नाहीत..

या दोघांच्या पिक्चरवर बहिष्कार टाका असेही फुकाचे मेसेज एव्हाना सुरू झाले आहेत हे वेगळे सांगायला नकोच.. आणि जेव्हा चित्रपट प्रदर्शित होतील तेव्हा असे काही होणार नाही हे भविष्यही वर्तवणे अवघड नाही.. फार तर चित्रपट काही एकट्या त्यांचा नसतो असा युक्तीवाद तेव्हा कामी येतो..

एकंदरीत ही सत्ताधार्यांची राजकीय खेळी वाटतेय.
जसे लोकसभा निवडणूकीच्या वेळी शाहरूखच्या तोंडी वाक्य घालण्यात आले होते, "जर मोदी पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन" आणि वातावरण तापवण्यात आले होते.
आताही खान सुपर्रस्टारच्या वादग्रस्त इमेजचा फायदा उचलत त्यांच्या तोंडी ही असहिष्णूतेची वाक्ये दिली आहेत किंवा विपर्यास केला गेला आहे. आणि एकंदरीतच हवा अशी काही तापवली गेली आहे की जो या देशात असहिष्णूता आहे असे बोलेल तो देशाचा अपमान करणारा देशद्रोही. आणि ज्या साहित्यिकांनी आणि कलावंतांनी जेन्युअनली निषेध नोंदवायला आपले पुरस्कार परत केले आहेत त्यांनाही अलगद या तागडीत टाकण्यात आले आहे.

काल व्हॉटसपवर या देशातील सध्याच्या वातावरणावर एक बोलकी प्रतिक्रिया वाचली.

वातावरण निश्चितच चांगले आहे. जेवढे सांगितले आणि बोलले जात आहे तेवढे वाईट नाही! आपण कित्येक भयानक दंगे अनुभवलेत.

पण काय खावे आणि काय नाही यावर जेव्हा उत्तेजक चर्चा, विवाद झडायला लागतात, तेव्हा मंदिर मशीद वगैरे सार्वजनिक धार्मिक वाद विवाद घराच्या चुलीपर्यंत पोहोचल्याची भावना जास्त अस्वस्थ करणारी असावी!

काय सहिष्णूता, सहिष्णूता करताय राव, आमच्या ऋन्मेषने एवढी आमिरखानवर दुसरा धागा काढायची फुलफ्लेज संधी असतानाही शाहरुखच्या धाग्यातच आमिरचीही बोळवणूक केली ही किमान मायबोलीवरची सहिष्णूता वाढल्याचेच उदाहरण नाही काय?
Happy

साती, बस्स सलमानची वाट बघतोय, त्याच्या तोंडून काही आले की आमचे खानदान पुर्ण.
पण भाईंचे आधीच एवढे दंगे आहेत की बहुधा याची गरज नसावी.

@ऋन्मेऽऽष : यु आर स्पोर्ट्स पर्सन !
( उपहासाने नाही , खरोखरच सांगतोय. )
धाग्याबद्दल , तुझ्यावर कितीही कंमेटस आलया तरी तोल सोडत नाहीस

बस्स सलमानची वाट बघतोय, त्याच्या तोंडून काही आले की आमचे खानदान पुर्ण.>>>>>>>>> हे नुसतं वाचुन सोडुन दिलेलं मी. पण दक्षिणाच्या आँ ने फिस्स्कन हसु आलं. Happy

काय गंमत आहे.

रोज पेपर वाचला की भारतातील असुरक्षिततेची जाणीव होते. हे होते म्हणूनच मी अमेरिकेला आलो असे तो जख्खी वारंवार लिहायचा.

त्याला कुणी देशद्रोही म्हटले नाही.

एका मुसलमान आमीरच्या हिंदू बायकोने आज हेच वाक्य म्हटले तर ती आणि तिचा नवराही देशद्रोही

आज एका फेसबुक मैत्रिणीने तिच्या घराच्या शेजारी कुणीतरी १०० डेसीबल्स पेक्षा जास्त आवाजाची भिंत उभारून हनीसिंगची गाणी लावलीत , तर काय करू असं विचारलेलं.
मी तिला समजावलं की कुठल्या तरी कलाने त्यांच्या घरच्या जान्ह्वीच्या बाबांना मी घर सोडून जाते अशी धमकी दिलेली असेल,,, घेऊ दे आनंद बिचा-यांना !!

तिच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय.

एकंदरीत ही सत्ताधार्यांची राजकीय खेळी वाटतेय.<<
कदाचित सत्तेवरुन उतरुन गेलेल्यांचीही असू शकते.

वा फारेण्ड, मस्त दुर्मिळ लिंक दिलीस Wink

वैद्य साहेब, लेखातील अभ्यासपुर्ण माहीती खरी आहे का? असल्यास आमीर डेंजर आहे. आणि राजा अकबर सही होता.

कदाचित सत्तेवरुन उतरुन गेलेल्यांचीही असू शकते. >> असू शकते. खेळी सध्या दोन्हीकडून चालल्या आहेत. याचा फायदा कोणाला जास्त झाला त्यावरून मी अंदाज व्यक्त केला ईतकेच.

घ्या आता आमीर खानचे अकबराच्या काळातले पूर्वज यांनी शोधून काढले. Proud
ज्यांनी एव्हढं उत्खनन केलं त्या अभिराम दीक्षित यांच्या पूर्वजांची माहीती त्यांना स्वतःला तरी आहे का ? कुठे तरी औरंजझेबाच्या जिझिया माफ असलेल्या यादीत त्यांचं नाव असेल, त्याच्या दरबारात मानाची नोकरी असेल, ब्रिटीशांच्या दरबारात नोकरी केली असेल त्याचीही यादी द्या ना बाप्पा !

कदाचित संत ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना धर्मबहीष्कृत करणारे , तुकोबांच्या पोथ्या इंद्रायणीत बुडवणारे हेच असतील. त्यांचे पूर्वज जर असे असतील तर मग त्याच न्यायाने त्यांच्या ब्लॉगकडे पाहीले पाहीजे , नाही का? तेव्हां लेखक जोवर आपले खानदान उघड करत नाही तोपर्यंत त्याच्या विचारांचं आकलन त्याच्या स्वतःवरून कसं काय करायचं/? त्याच्याच थिअरीवरून ? ज्यांनी ही लिंक दिलीय त्यांना ही थिअरी मान्यच असावी , नाही का ?

नारायण मूर्तींचीही कुंडली मांडा, कमल हसन, लता मंगेशकर यांचीही मांडा ना बाप्पा.

सर्वात महत्वाचं म्हणजे शहीद भगतसिंह यांच्या पणतूने देशात असहीष्णुता वाढत असल्याचं वक्तव्य केलं आहे, तेव्हां शहीद भगतसिंह हे कसे देशद्रोही होते हे त्यांची कुंडली काढून सिद्ध करा म्हणजे आम्ही मोकळे डोळे मिटायला !

ऋन्मेश,

लेखक पुरस्कारप्राप्त ब्लॉगलेखक आहेत आणि खऱ्या अर्थाने चिकित्सक आहेत. त्यांची मते सगळ्यांच पटतील असे नाही, पण ते खरे लिहितात.

एडीट: पुरस्कार शासनाचा नव्हता, एबीपी माझाचा होता. मयेकर, शंका उपस्थित केल्याबद्दल धन्यवाद, एडीटले आहे.

अहॉ,

ते खरं लिहीत असतील तर त्यांच्या थिअरीप्रमाणे त्यांचे पूर्वज नकोत का शोधायला ? Proud
भगतसिंहांच्या पणतणबद्दलचं त्यांचं मत नको का विचारायला ? खरं खरं मत.

नाहीतर आपल्याकडे ब्रिटीशांच्या दरबारात आणि ईस्ट इंडीया कंपनीत नोकरीला असलेल्या अनेकांच्या वंशजांनी भगतसिंहाचे नाव घेऊन आपण देशभक्त असल्याचे सर्टीफिकेट स्वतःच्या सहीने स्वतःला दिलेलेच आहे की ! शिवाय आझाद देशद्रोही असल्याचे सर्टीफिकेटही द्यायचा अधिकार यांच्याकडेच असल्याचे ठासून सांगितलेले आहे.

लेखक महोदय त्यांच्या लेखाची चिरफाड झाली की संबंधितांना ब्लॉकच्या काळ्या यादीत टाकण्याबद्दल महशूर आहेत. यांच्या लेखांची सातत्याने चिरफाड करणा-या एका लेखकाला त्यांनी आजवर इतक्या वेळा अनफ्रेण्ड केलंय आणि पुन्हा फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवलेली आहे की शेवटी त्याने त्यांच्या या उद्योगावर रेवडी उडवणारी पोस्ट लिहीली आणि तिला भरभरून प्रतिसाद मिळाला.

कदाचित ब्लॉकसम्राट अशी काही उपाधी असेल ती.

आमीर खानच्या सत्यमेव जयतेच्या वेळी तो ज्या संस्थांना मदत करतो त्यांचे दहशतवाद्यांशी लागेबांधे असल्याच्या पोस्टी फिरत असत. त्या संस्थांची नावे असलेली एक यादी फिरत असे. यथावकाश त्याने हिंदूंच्या संस्थांनाही मदत केल्याचे दिसून आले. शिवाय तो मुस्लिमांची बाजू घेतो असा आक्षेप होता. त्याने ज्या मुस्लिमांना समोर आणले त्यांनी कामच तसं केलं होतं, शिवाय त्यांना प्रसिद्धी द्यायला याआधी मीडीयाला कुणी रोखलेलं नव्हतं.

या छुप्या प्रचारात जराही तथ्य नव्हतं हे जेव्हां या पोस्टी पब्लीक होऊ लागल्या तेव्हां स्पष्ट झालं. त्या वेळी तर आमीरने देश सोडून जाण्याचं वक्यव्य केलेलं नव्हतं. गुजरात मधे फना प्रदर्शित होऊ दिला नव्हता. सरकारने बंदी घातलेली नव्हती तर हिंदू संघटनांनी थेटर मालकांना आवाहन केलं होतं. एका ठिकाणी प्रदर्शित झाला तिथे मोठ्या संख्येने प्रेक्षकांना हुसकावून लावण्यात आलं. एकाने तिकीट काढून आत जाण्याचं धाडस केलं, त्याला थोड्याच वेळाय बाहेर आणून जमावाने इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला.

तिन्ही खानांचे सिनेमे पाहणार नाही अशी प्रतिज्ञा केल्याचे इथे मायबोलीवर सांगणारेही आहेत.

थोडक्यात काय तर निमित्त मिळालं नाही तर तोडमोड करून घेतलं गेलेलं आहे. फिल्म इंडस्ट्रीत खानांना असलेलं महत्व संपवण्याचं आश्वासन अशा रितीने पूर्ण झालंय. तुम्हाला सिनेमे काढायचे असतील तर.....
हा संदेश गेला आहे.

आता पूर्वजां पर्यंत प्रकरण गेलेलं आहे. थोडक्यात गोडसेचे वंशज कसे वागतील हे त्याच्या पूर्वजांवरून ठरवायचे दिवस आता आलेले आहेत . यालाच बहुधा सहिष्णुता म्हणत असावेत.

आता मलाच देश सोडून जावसं वाटू लागलेलं आहे. माझ्या मुलांवर सहिष्णुतेचे हे संस्कार नकोत म्हणून !

शासन ब्लॉग्जना कधीपासून पुरस्कार द्यायला लागलं?
>>

माहिती नाही. तावडेंच्या हातून पुरस्कार स्वीकारतानाचे फोटो पाहिले होते आणि त्यात शासनाचा पुरस्कार म्हणून लिहिले होते. सापडले तर देतो.

ते दीक्षित पण वैद्य आहेत

@ अ. वैद्य, शासनाचा ब्लॉग बद्दल स्मायल्या टाकलेल्या नाहीत याची कृपया नोंद घेऊन ठेवणे. चुका होतात त्या काम करणार्या कडूनच होतात. एका पोस्टात आला न अनुभव? आणि या गोष्टीचा उल्लेख इतर संबंध नसलेल्या बाफवर पण नाही करणार हो...

अरे हे सोडा आता पहलाज निहलानी ला सॅक करणार म्हणे.
रुन्मेश गूगल कर.
बाफ काढ
नैतर राकु काढतील.
ह्या इशूतली हवा गेली आता.

Pages