वर्तमानात घेतलेला भविष्याचा शोध (Talaash - Movie Review)

Submitted by रसप on 1 December, 2012 - 00:42

अपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैं
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम हैं
- निदा फाजली
कमी-अधिक प्रमाणात असंच आपलं आयुष्य असतं. बहुतेक गोष्टी ओघानेच घडत असतात आणि आपण त्यासोबत घडत-बिघडत जातो. स्वबळावर आपली दिशा निवडणारे लोकही अनेकदा ह्या ओघासोबत वाटचाल करतातच. आपला असूनही आपला नसलेल्या किंवा नसूनही असेलल्या ह्या प्रवासात काही जाणीवा आपसूक होत जातात. कुणी त्याला ठाव लागणे म्हणतं तर कुणी शोध घेणे. फरक काही नसतो, काही तरी नवीन उमगलेलं असतं, फारसा प्रयत्न न करता किंवा प्रयत्न काही वेगळ्याच इप्सितासाठी असतो आणि हाताला काही वेगळंच लागतं. गुंतागुंतीचं आहे, पण बहुतेक वेळा सत्य गुंतागुंतीचंच असतं. नसेल पटत तर एकदा रीमा कागती दिग्दर्शित 'तलाश' पाहा, कदाचित पटेल आणि तरीही नाही पटलं तर हरकत नाही. ओघ चालू आहे, कधी ना कधी पटेलच; अशी मला - रणजितला - एक वेडी खात्री आहे.

सुर्जनसिंह शेखावत उर्फ सूरी (आमीर खान) मुंबई पोलीसदलातील एक निरीक्षक असतो. नव्यानेच ह्या शहरात दाखल झालेल्या 'सूरी'कडे केस येते एका विचित्र अपघाताची. हा अपघात साधासुधा नसतो, कारण तो फिल्म सुपरस्टार अरमान कपूरच्या गाडीला झालेला असतो आणि त्यात अरमान कपूर जागीच ठारही होतो. मध्यरात्रीच्या सुमारास, स्वत:च्या घरापासून बरंच दूर, एका वेश्यावस्तीजवळ असलेल्या समुद्र किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर, कुठलीही नशा केलेली नसताना, कधीच स्वत: गाडी न चालवणारा अरमान त्याच रात्री भरधाव गाडी का चालवत असतो? अपघाताच्या आदल्या दिवशी संध्याकाळी त्याने त्याच्या अकौंटन्टकडून मोठी रक्कम का घेतलेली असते ? रस्त्यावर कुणीही नसताना अचानक रस्ता सोडून, त्याची गाडी समुद्रात का उडी घेते ? असे अनेक विचित्र प्रश्न ह्या केसला क्लिष्ट बनवत असतात. काहीच विशेष हाती लागत नसल्याने एक अन्सोल्वेबल केस म्हणून ही फाईल बंद करावी, असंही वाटत असतं.
दुसरीकडे, एक कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून नाव कमावलेला सूरी स्वत:ला एक कर्तव्यशून्य पिता मानत असतो. कारण त्याचा अल्पवयीन मुलगा, त्याच्या अपरोक्ष अपघाती मरण पावलेला असतो. ह्या अकस्मात धक्क्यामुळे सूरी आणि त्याची पत्नी रोशनी (राणी मुखर्जी) खूप अस्थिर असतात. दोघांतला संवाद खुंटलेला असतो. मनातल्या अपराधी भावनेमुळे सूरी अबोल, एकलकोंडा झालेला असतो. ह्या मानसिक अस्वास्थ्यामुळे रात्रीची झोप हरवलेला सूरी बहुतेकवेळा रात्र-रात्र घराबाहेरच राहत असल्याने त्याचे व त्याच्या पत्नीचे नाते अजून बिघडत चाललेले असते.
अश्या विचित्र मानसिक व कौटुंबिक कोंडीत असलेल्या सूरीला एक अनाहूत वेश्या रोझी (करीना कपूर) अपघाताची केस सोडविण्यासाठी काही मदत करते आणि त्याला मानसिक आधारही देते. तो केसच्या मुळापर्यंत जाण्याच्या दिशेने झटू लागतो. हळूहळू गुंते उलगडत जातात आणि उघडकीस आलेले सत्य त्याचा वैयक्तिक आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोनही बदलते.

'तलाश' म्हणजे केवळ कुठली रहस्यकथा नाही किंवा फक्त एक भावनिक नाट्यही नाही. ही तलाश, हा शोध केवळ एका पोलिसाचा नसून एका पतीचा, पित्याचा आणि एका वेश्येचाही आहे. काही वेळी म्हणूनच आपल्याला असं वाटत राहातं की दिग्दर्शिकेला नक्की काय मांडायचं आहे ? थरारनाट्य की भावनाट्य ? उत्तर आहे - दोन्ही. फलित आहे - अप्रतिम !

talaash_350_110512050053.jpg

सिनेमा आमीर खानचा आहे, म्हटल्यावर सिनेमाभर आमीर असणारच, आहेच ! पण त्याने रंगवलेला सूरी व इन्स्पेक्टर शेखावत लाजवाब.
करीना व राणी, दोघींना मर्यादित वाव असला तरी दोघीही चोख काम करतात. राणी मुखर्जी खूप आकर्षक दिसते.
छोट्याश्या भूमिकेत नवाझुद्दिन सिद्दिकी परत एकदा आपली छाप पाडतो. त्याचा पाठलाग होत असतानाचा संपूर्ण भाग अतिशय थरारक झाला आहे.
पटकथा अजून जराशी आवळता आली असती, पण जशी आहे तशीही छानच !
दिग्दर्शिका रीमा कागती, दुसऱ्याच सिनेमात खूप प्रभावी पकड दाखवते.
बऱ्याच दिवसानंतर एका सिनेमात गाणी कानांवर बलात्कार करत नाहीत. त्यासाठी राम संपत ह्यांचे विशेष आभार !
हीरोच्या अंगावर 'खाकी' आहे म्हणून त्याने काहीही अचाट उड्या माराव्या, ठोसे लगवावे आणि 'माइंड इट' इष्टाईलने दुर्जनांचा नि:पात करावा असल्या दाक्षिणात्य मोहाला बळी न पडल्याबद्दल दिग्दर्शिका व एक्शन दिग्दर्शकाचेही आभार !!

काही ठिकाणी जराशी गती मंदावली असली, शेवट झाल्यानंतरही शेवट चालू ठेवला असला, तरी 'तलाश' नक्कीच ह्या वर्षातील उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहेच.

(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर !)

रेटिंग - * * *

http://www.ranjeetparadkar.com/2012/12/talaash-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिरा, रसपचं शीर्षक आणि उदयच्या पोस्टवरून अमीरच खूनी किंवा कोणीतरी एक पात्र भूत असणार वगैरे वगैरे शंका येऊ लागलेल्या आहेत....... Sad
नशीबाने अजूनतरी कोणी रहस्यभेद करणारे समस, मेल्स पाठवलेले नाहीत. पण आजच्या दिवसात चित्रपट पाहिला नाही तर उरलं सुरलं रहस्य पण रहस्य राहीलसे वाटत नाही.

मग उद्या एक तर लाइइफ ऑफ पाय बघायचा किंवा केवळ दिग्दर्शन आणि पटकथा कशी साकारलीये हे बघायला शेवट कळलेला चित्रपट जाऊन मुकाट बघायचा. Sad

जितू, आता कळलं तू सगळे पिक्चर पहिल्याच दिवशी पाहून फडशा का पाडतोस ते Proud
सुखी आहेस लेका.

@भुंगा आणि सगळे वाचक............

ही केवळ गंमत चालू आहे........
माझ्या लेखाच्या शीर्षकात व सिनेमाच्या कथेत/ रहस्यात 'तसे' काहीही कनेक्शन नाहीये!

आता पूर्ण स्टोरी लिहूनच टाका इथे. Angry

कुठलाही सिनेमा अथवा पुस्तक याचा शेवट इतरांना सांगू नये असा एक सर्वसाधारण संकेत असतो. तो तरी किमान पाळा.

काल ऑफिसच्या सहकार्यांबरोबर 'तलाश' बघितला. मुव्ही संपवून बाहेर आल्यावर पहिलाच विचार आला, छे, हा नक्कीच चांगला मुव्ही नाही... काहीच्या काही दाखवलय... पण तरीही कडबा खाऊन झाल्यावर गायी रवंथ करतात तसाच या मुव्हीचा रवंथ करताना काही पैलू लक्षात आले आणि वाटले अगदीच वाईट मुव्ही नाही.

का बघावा?

१) आमीर खानचे काम अगदी उत्कृष्ठ झाले आहे.
२) रात्रीची मुंबई कशी असते याचे अचूक चित्रीकरण केले आहे
३) मुव्हीचा ओपेनिंग सीन अप्रतिम शूट झाला आहे
४) करीना कपूर खूप सुंदर दिसली आहे
५) धक्कातंत्राचा सुरेख वापर केला आहे
६) सगळी पात्र अगदी चपखल घेतली आहेत
७) सगळी गाणी श्रवणीय आहेत
८) ढिशक्याव ढिशक्यावचा अतिरेक नाही
९) शेवटपर्यंत सस्पेन्स चांगला ठेवलाय
१०) "अनोखी पात्र" असूनही आइटम सोंग नाहीये

का पाहू नये?

१) मुव्हीचा गोफ विणताना अनेक धागे अनुत्तरीत सुटले आहेत
२) पात्रांची गुंतागुंत झाली आहे
३) काही शॉट न पटणारे आहेत
४) अंधश्रद्धा निर्मुलन या विषयला दृष्टीआड केले आहे
५) मुव्हीचा शेवट अक्षरशः गुंडाळला आहे
६) अनेकदा "आमीर तू सुद्धा?" असा विचार येऊन जातो
७) "जलपरी"चा शॉट अगदीच न पटण्यासारखा आहे
८) मुव्ही मधून नेमका काय बोध घ्यावा हेच कळत नाही
९) इंटर्वलपर्यंत स्लो आहे
१०) काही गोष्टी मुव्हीशी निगडीत नाहीत तरी त्यात दाखवल्यात

थोडक्यात काय तर, आमीर खानचा ३ Idiots किंवा रंग दे बसंतीचा साचा डोक्यात ठेऊन मुव्ही बघू नये... निराशा होईल Happy

अगदी निराश किंवा हताश किंवा हतबल व्हायला होत नाही ना शेरुखबाबाच्या शिणुमासारखे? मंग बघावाच बाई उद्याच्या उद्याला.:फिदी:

आम्हीही हा चित्रपट कालच पाहिला . रसप यांच परिक्षण वाचायसाठीच थांबलो होतो .
सगळ्यांचच एकमत होत की हा अलिकडचा आमीरचा सर्वात टुकार चित्रपट आहे .ढीगभर चुका आहेत . असंख्य गोष्टींची उत्तरे नाहीतच . शेवट तर ओढून ताणून केला आहे .
सग़ळ E-Square थिएटर शेवटचा सस्पेन्सचा सीन पाहिल्यावर हसल होतं (कोणता ते अजून लिहित नाही कारण इतर लोकाना अजून तो पहायचाआहे )
रसप जी , तम्हाला तुमची मते मांडण्याचा अधिकार आहेच पण Biased लिहिण वाईट नाही का ? आमीर खानने केला म्हणून चित्रपट फालतू असू शकत नाही का ? हाच चित्रपट आमिर खान चा नसता तर असच परिक्षण लिहिल असत ?

@केदार जाधव...

आमीर खान माझा आवडता वगैरे नाही. मी कुठल्याही 'बायस'ने आजपर्यंत तरी लिहिलं नाही.. कारण बायस्ड लिहिण्याएव्हढा मी अजून मोठा झालो नाही ! मी कुठल्या सिनेमावर काय लिहितो त्याने सिनेमाच्या बॉक्स ऑफिस वर - माझी इच्छा असतानाही - काहीही परिणाम होत नाही, होणारही नाही.. !! Sad

हम्म... उद्या खरोखरच माझ्या परीक्षणांना 'भाव' मिळायला लागला तर मी 'पेड रिव्ह्युज' लिहिन की नाही, ह्याबाबत आत्ताच सांगत नाही ! Wink

असो.

थोडक्यात... मी बायसने लिहिलं नाही. मी जे लिहिलं त्यावर मी ठामच आहे. मला व्यक्तिशः हा सिनेमा खरोखरच आवडला.

>>कुठलाही सिनेमा अथवा पुस्तक याचा शेवट इतरांना सांगू नये असा एक सर्वसाधारण संकेत असतो. तो तरी किमान पाळा.

+१

कारण बायस्ड लिहिण्याएव्हढा मी अजून मोठा झालो नाही ! मी कुठल्या सिनेमावर काय लिहितो त्याने सिनेमाच्या बॉक्स ऑफिस वर - माझी इच्छा असतानाही - काहीही परिणाम होत नाही, होणारही नाही.. !! अरेरे >> रसपजी , तुम्ही बायस्ड लिहिण्यामुळे कशात काहीही फरक पडतोय किंवा तुम्ही मुद्दाम काही हेतू मनात ठेवून बायस्ड लिहिलय अस मला अजिबात म्हणायच नव्हत .
उलट तुमच्या नकळ्तच तुम्ही बायस्ड होऊन लिहिताय (रादर सिनेमाही पाहताय त्यामुळे तुम्हाला त्यातले मोठे loop holes दिसत नाहीयेत ) हे मला म्हणायच होत . पण ते तर सगळ्यांचच होत त्यामुळे चलता है:)

चित्रपटाबद्दल उदयन, केदार यांच्या मताशी एकदम सहमत
पण दुर्देवाची गोष्ट की येथील चित्रपटाचे फक्त परीक्षण वाचले आणि खालील प्रतिसाद वाचलेच नाहीत व तलाश पाहुन आले.:अरेरे:

<<<<कुठलाही सिनेमा अथवा पुस्तक याचा शेवट इतरांना सांगू नये असा एक सर्वसाधारण संकेत असतो. तो तरी किमान पाळा. >>>>>>>

+१०००००००००००

हम्म...
लगेच पळत जाऊन पाहण्यासारखा नाही पण एकदा पहायला हरकत नाही एवढे यावरून समजले.
धन्यवाद.

अरे केदार ...हाच शाहरुख या इतर कुणाचा असता तर पार अक्कल बक्कल नक्कल काढली असती..
पण हा चित्रपट अतिहुशार स्वतःला समजणार्या एका सामान्य अभिनेत्याचा आहे... मुद्दामुन अश्या लोकांचे चित्रपट पाहत असताना डोके, डोळे बंद करुन बघायचे असतात ... कारण तो जो करतो ते बरोबरच असच काही लोकांचे मत असते....भले त्याने काहीही येडपटपणा करो.."मेला" असो या "धोबीघाट" सगळेच छान छान...;) बरोबर ना ???
.
(अवांतर : "जब तक हैं जान" पाहिल्यापासून जर कुणाला बॉलीवूड-अपचनाचा त्रास सुरू झाला असेल, तर 'तलाश'ची एक गोळी हा रामबाण उपाय ! - इति वैद्य रणजित पराडकर>>>>>>>>>>>>

"त - लाश" बघितल्यावर आता ज्यांना ज्यांना अपचनाचा त्रास झाला आहे त्यांनी या धाग्यावरच औषध घ्यायला यावे Lol वैद्य रणाजित फुकट वाटत आहे Biggrin

सगळ्यांचच एकमत होत की हा अलिकडचा आमीरचा सर्वात टुकार चित्रपट आहे <<

छे छे! सगळ्यात टुकार म्हणजे मंगल पांडे.
-पिक्चरमधलं ओकीठो कळत नसलेला
(}i{)

सगळ्यात टुकार म्हणजे मंगल पांडे>>>>>>नाही हो... आतंक ही आतंक आणि मेला....यांचा नंबर आधी लागतो नंतर आवडत्या बायकोचा धोबीपछाड ( धोबीघाट) ... Biggrin

साती, नक्की बघ सिनेमा. सायो म्हणते तसा वन टाइम वॉच आहे. टेकिंग चांगले आहे.
अगदी उत्कृष्ट नसला तरी चांगला आहे सिनेमा. Happy

लोकांनी इतक्या लाखोल्या वहाव्या असा तर निश्चितच नाही. मेला वगैरेशी तुलना तर अगदीच अनावश्यक. आणि आहट-सीआयडी तर हास्यास्पद ! असो.

अजून काही मुद्दे -
१. सव्वा दोन तासाचा सिनेमा आहे. त्यामुळे फार लांबण नाही.
२. हा केवळ रहस्यपट नाहीच. तसेच ह्या सिनेमातील रहस्याचा उलगडा 'होतो', केला जात नाही आणि त्या उलगड्यासोबत काही वैयक्तिक समस्याही सरल होतात.
३. सुरुवातीचे अपघाताचे दृष्य, तैमूरचा पाठलाग, शेवटचा अपघात - हे तिन्ही सीन्स इतके जबरदस्त जमून आले आहेत की काय सांगावं !
४. सगळीच गाणी छान आहेत. "जिया लागे ना.." आणि "होना हैं क्या.." हायलाईट्स ! खासकरून "जिया लागे ना.." चा क्लासिकल टच आजकाल विरळाच मिळतो.

एनिवे.. माझ्या मते हा एक मस्त सिनेमा आहे. एकदा तर नक्कीच पाहायला हरकत नाही. (मी पुन्हा पाहायलाही तयार आहे !)

अभिनय केवळ चांगला असल्या कारणाने...तरी कमीच लाखोल्या वाहील्या आहेत..:खोखो:
.
ज्यांना आवडला (चुकुन) Wink त्यांनी मी वर विचारलेल्या ९ पैकी कोणत्याही ३ प्रश्नाचे समाधानकारक उत्तर (अचुक उत्तर तर आमिर पण नाही देउ शकत ....:खोखो: असो.) द्यावीत...

मस्त सिनेमा...
मुलाच्या अपघाताने विस्कळीत झालेले वैयक्तीक/घरगुती आयुष्य आणि हत्येच्या तपासात आमीरच्या चेहर्‍यावरचे बदलनारे हावभाव बघण्यासारखे आहेत.
आमीर खान व करिना दोघांनी अभिनय छान केलाय, बाकी सर्वांवर 'नवाजुद्दीन सिद्दीकी' भारी पडलाय.
एकदा तरी पहावाच असा सिनेमा आहे.

बाकी, सिनेमात फक्त मौजमजा आणि चालूमसाला पहायला जाणार्‍या प्रेक्षकांची हा सिनेमा निराशाच करेल.

बाकी, सिनेमात फक्त मौजमजा आणि चालूमसाला पहायला जाणार्‍या प्रेक्षकांची हा सिनेमा निराशाच करेल. >> एकदम लोडेड वाक्य Happy
बाय द वे , रहस्यप्रधान सिनेमात रह्स्य नीट उकलले नाही , सुरूवातीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत म्हणून तो वाईट .
तो आमीर चा किंवा शाहरूखचा काय फरक पडतो ? सचिन ही शून्यावर बाद होतोच ना , मग आमीरचा सिनेमा का टुकार असू शकत नाही ?
उगाच इतर लोक मौजमजा आणि चालूमसाला पाहणारी असतात वगैरे कशाला ?

ओह त्तेरी.......

असं आहे होय ! म्हणजे मी शा.खा. भाऊंना हाणलं म्हणून हा पोटशूळ आहे काय!
तरीच म्हटलं इतके का पेटून उठले आहेत!

मान्य आहे शा.खा. माझ्या जित्का डोक्यात जातो, तितका आ.खा. जात नाही... पण माझा तो आवडताही नाही! आणि एकाला हाणला म्हणून दुसर्‍याला का हाणू? मला तर सिनेमा खरोखरच खूपच चांगला वाटला.

----------------------------------------------

उदयन भाऊ,

प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच दिली असती पण -

१. तुम्हाला 'समाधानकारक' उत्तरं हवी आहेत. 'समाधानकारक' म्हणजे काय? हेही तुम्हीच ठरवलेलं असणार, त्यामुळे काहीही उत्तर दिलं तरी समाधान होईल असे वाटत नाही.
२. तुम्ही आव्हान देताय, आवाहन करत नाही आहात... आव्हान स्वीकारायला मी कुस्तीगीर नाही... एक 'वुड बी' लेखक म्हणा हवं तर ! सो, सर्टनली नॉट माय कप ऑफ टी !

असं आहे होय ! म्हणजे मी शा.खा. भाऊंना हाणलं म्हणून हा पोटशूळ आहे काय!
तरीच म्हटलं इतके का पेटून उठले आहेत! >> रसप , मला वाटत नाही तस काही आहे , उदयन टुनटुन यांच्या पोस्ट मुळे भडकलेत इतकेच .
बाकी मी वर म्हटल्याप्रमाणे ,
रहस्यप्रधान सिनेमात रह्स्य नीट उकलले नाही , सुरूवातीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत म्हणून तो वाईट . तो कुणाचा आहे याने फरक पडू नय्रे .

Pages