माझे शाकाहार पुराण!!

Submitted by शांतीसुधा on 1 July, 2011 - 15:43

मांसाहाराशी ओळख

मी जन्मापासूनच शाकाहारी आहे ती आजतागायत. मांसाहारी असलेले लोक म्हणतील ज्याची कधी आयुष्यात चव चाखली नाही त्याच्या चवदारपणाची कल्पना हिला काय असणार? मान्य. पण मला कधी अंडं सुध्दा खावंसं वाटलं नाही. कोणाचंही मांस खाणं ही कल्पना सुध्दा नको वाटते. मग भले दिसायला ती पाककृती कितीही चवदार दिसली तरीही. घरचे सगळे, नातेवाईक कोणीच मांसाहारी नसल्याने मला कधी त्यावर विचार करायची सुध्दा संधी मिळाली नव्हती.

माझा आणि मांसाहाराचा संबंध आला तो मी अरूणाचल प्रदेश-आसाम मध्ये काम करायला गेल्यावर. तिथे जवळ जवळ ९९% लोक मांसाहारी. शाकाहारी एक टक्का माझ्यासारखे. अरूणाचल प्रदेश किंवा आसाम मध्ये कार्यकर्त्यांच्या घरी गेलं की मांसाहाराने स्वागत असे. मग त्यांना मी शाकाहारी आहे हे सांगायला कसरत होत असे. खरंतर मांसाहार कसा दिसतो (म्हणजे अगदीच प्राण्याच्या तंगड्या वगैरे बाहेर आलेल्या दिसल्या नाहीत तर) हे सुध्दा मला माहीत नव्हते. मग तर त्याचे वेगवेगळे प्रकार माहीती असणं दूरच. असेच एकदा मी आसामला असताना एका कार्यकर्त्याच्या घरी गेले. आम्ही गप्पा मारत बसलेलो असताना चहा बरोबर त्यांनी ब्रेड पण आणला. मला पुसटशी कल्पना सुध्दा आली नाही की ते नॉनव्हेज आणतील. एव्हाना हे सुध्दा माहीती झाले होते की लोकांना आम्ही शाकाहारी आहोत हे सांगणं तितकंसं आवडत नसे. म्हणून तो पिवळसर दिसणारा ब्रेडचा स्लाईस मी उचलला. मला वाटलं बटर लावलं असेल. गप्पांच्या नादात एक घास तोडून तोंडात घातला. घास चावताना काहीतरी वेगळं वाटलं. पण दुर्लक्ष करून दुसरा घास घेतला. गिळताना खात्रीच पटली की गडबड झालेली आहे. तोंडातलं थुंकुन टाकणं वाईट दिसलं असतं म्हणून तो घास कसाबसा घशाखाली उतरवला आणि उरलेला स्लाईस तसाच ठेवून दिला. चहा पिऊन टाकला. थोड्यावेळाने त्यांनी मला विचारलं की ब्रेड्चा स्लाईस का नाही खात. मग मी त्यांना विचारलं की त्या स्लाईसवर ते पिवळं नक्की काय होतं? त्यांनी ते अंडं असल्याचं सांगीतल्यावर मी त्यांना म्हणाले पण मी शाकाहारी आहे. तर मला म्हणतात पण हे शाकाहारीच आहे. त्यांच्या दृष्टीने अंडं शाकाहारात मोडत होतं. पण माझी फारच वाईट अवस्था झालेली होती. तिकडून घरी आल्यावर दुसर्‍या दिवशी वमन धौती करून पोटातील कण अन कण काढून टाकला. त्यारात्री मला नीट झोप काही लागली नाही. हा सगळा मानसिकतेचा परिणाम आहे हे कळत होतं पण वळत नव्हतं. आता मला वासाने एखाद्या पाककृतीत अंडं आहे की नाही हे समजायला लागलं होतं. बंगाल मध्ये मासे हा शाकाहार समजतात हे सुध्दा समजलं. याबाबतीत माझी इतकी प्रगती होण्यात आसाम मधील वास्तव्याचा फार मोठा वाटा आहे.


मांसाहाराची जास्त ओळख पण पूर्ण शाकाहारी राहूनच

जेव्हा केंब्रीजला गेले तेव्हा मांसाहाराशी माझी पुन्हा गाठ पडली. ह्यावेळी परदेशात असल्याने गायी, डुकरं या सगळ्यांच्या मांसाचे प्रकार पाह्यला मिळाले. काहीवेळा तर अनेक पाककृती इतक्या फसव्या दिसायच्या की नुसतं पाहून समजायचं नाही की शाकाहारी की मांसाहारी. इंडक्शन च्या दिवशी डिपार्टमेंट मध्ये एका सिंगापूरच्या मुलाची ओळख झाली आणि मी शाकाहारी आहे हे समजल्यावर लगेच विचारलं डु यु इट मिल्क प्रॉडक्ट्स? आर यु अ व्हीगन? मी आयुष्यात पहील्यांदाच व्हीगन हा शब्द ऐकत होते. त्याने व्हीगन ही संकल्पना स्पष्ट केल्यावर मी म्हणाले नाही, मी मिल्क प्रॉडक्ट्स खाते म्हणजे मी व्हीगन नाही. जेव्हा जेव्हा फॉर्मल हॉल ला किंवा एखाद्या पार्टीला जायचं असेल तर आपण शाकाहारी असल्याचं आधीच सांगायला लागायचं म्हणजे आपल्या टेबल पाशी फक्त शाकाहारीच जेवण येतं. पार्टी मध्ये तशी शाकाहार व मांसाहार अशी स्पष्ट विभागणी असायची. त्यामुळे मला खूप टेन्शन कधीच आलं नाही.

आमच्या डीपार्टमेंट मध्ये जेव्हा आमच्या कोर्सच्या शेवटच्या दिवशी एक छोटीशी पार्टी आयोजित केली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही ५ वेगवेगळ्या देशांचे लोक होतो. मी एकटीच भारतीय. बाकी ग्रीस, सायप्रस, सिंगापूर, तैवान, ब्रिटीश असे इतर लोक होते. प्रत्येकाने आपापल्या देशातील मेनु बनवुन आणायचा असं ठरलं. मी मायक्रोवेव्ह मध्ये बनवलेला पुलाव घेवून गेले. माझ्या व्यतिरीक्त फक्त सिंगापूर वाल्या मुलाने एक व्हेज डीश स्वत: बनवुन आणली होती. बाकी सगळ्यांनी मांसाहारी पदार्थच ते ही विकतचे आणले होते. मला ते पदार्थ खाणं केवळ अशक्यच होतं. तसं मी त्यांना सांगीतलं. तर सायप्रस च्या चार मुलींना राग आला. त्यांना वाटलं की मी मुद्दाम तसं म्हणते आहे. कारण त्यांना काही लोक पूर्ण शाकाहारी असू शकतात ही संकल्पनाच पूर्णपणे नवीन. माझी तर पंचाईत झाली. त्या चार मुली सोडल्या तर बाकीच्या सगळ्यांनी मी नेलेला पुलाव अतिशय चविनं आणि आवडीनं खाल्ला. त्या सायप्रसच्या मुलींना कसं समजवावं हे मला समजत नव्हतं.

पहीले तीन महीने सेल्फ कंटेन्ड ब्लॉक मध्ये काढले ते याच शाकाहारी खाण्यासाठी. नंतर मग एका शेअर्ड कीचन असलेल्या ब्लॉक मध्ये मी रहायला गेले. आता माझी बरीच प्रगती झाली होती. म्हणजे एकाच शेगडीवर बाजूच्या बर्नरवर जर कोणी मांसाहार शिजवत असेल तर शेजारच्या बर्नरवर मी माझी शुध्द शाकाहारी भाजी शिजवून तिथेच बसून व्यवस्थित (पोटात न ढवळता आणि रात्री सुखाने झोपून) जेवत असे. माझ्या किचन मधील इतर देशांच्या मित्रमंडळींना आतापर्यंत माझं शुध्द शाकाहारी असणं माहीती झालं होतं आणि ते मला कधी आग्रह पण करत नसत. पण तेच मित्रमंडळी मी शिजवलेलं शाकाहारी अन्नं चवीने आणि आवडीने खात.
एकदा आमच्या किचन मध्ये एका झेक रिपब्लीकच्या मैत्रीणीचा मित्रं आला. तो पूर्ण शाकाहारी. तो तिला कायम शाकाहारी बनण्याविषयी आग्रह करत असे. आणि ती मात्रं तब्येत वीक होईल असं कारण पुढे करत असे. त्यांना मी पूर्ण शाकाहारी असल्याचं समजलं. तिच्या मित्राने मला किती वर्षं झाली शाकाहारी झाली आहेस? असं विचारलं. तो प्रश्न विचारण्या मागचं कारण न समजुन मी त्याला उत्तर दिलं बाय बर्थ. त्याला इतकं आश्चर्य वाटलं. तो येव्ह्ढं सुध्दा म्हणाला की माझ्या कडे पाहून (उंची, अ‍ॅथलॅटीक बिल्ट) विश्वास बसत नाही की मी जन्मापासून शाकाहारी आहे. मध्ये भारतात आल्यावरही एका डॉक्टरांनी पण असंच म्हंटल्याचं आठवतंय की माझ्याकडे बघुन मी पूर्ण शाकाहारी असेन असं वाटत नाही. असो.

मी शाकाहारी आहे हे समजल्यावर परदेशात काही लोकांचा हमखास प्रश्न असायचा बाय रीलीजन ऑर बाय एथिक्स? हाप्रकार नक्की काय आहे ते हळूहळू समजायला लागलं. पाश्चात्य देशांत व्हेजीटेरीअन किंवा व्हीगन बाय एथीक्स हेच लोक जास्त असतात. म्हणजे "Animals are my friends and I do not eat my friends" या George Bernard Shaw यांच्या उक्तीप्रमाणे चालणारे असतात ते व्हेजीटेरीअन किंवा व्हिगन बाय एथीक्स असतात. त्यांचा असा समज असतो की भारतात सर्व हिंदू लोक शाकाहारीच असतात म्हणजे व्हेजीटेरीअन बाय रीलीजन. पण यातील सत्यासत्यता आपल्याला माहीती आहे. म्हणजे शुद्ध शाकाहारी असलेले पण घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कुत्रं दिसलं तरी घराच्या आतून त्याला हुसकवुन लावण्यासाठी अथक प्रयत्न करणारे महाभाग दिसतील तसेच प्राण्यांवर अतिशय प्रेम करणारे पण मांसाहारी लोक सुद्धा दिसतात. त्यामुळे हा फरक पाश्चात्य देशांत एक फॅशनचा भाग आहे असंच वाटतं. असो.

शाकाहार की मांसाहार - काही वादाचे मुद्दे:

आमच्या केंब्रीजच्या शेअर्ड किचन मध्ये एक पाकीस्तानी मुलगी आली. कालांतराने तिची आणि माझी ओळख झाली. सतत तीन महिने मला रोज रात्री भात-आमटी-लोणचं-पापड खाताना बघुन एक दिवशी तिने मला विचारलंच. हे काय तुला तेच इअतके महीने खाऊन कंटाळा कसा नाही येत? मी म्हणाले माझं रीसर्चचं काम चालू असल्याने भाज्या विकत आणायला आणि चिरून शिजवायला वेळ नाहीये. मग तिला लक्षात आलं की मी पूर्ण शाकाहारी असल्याने बाहेर तयार मिळत असलेल्य गोष्टी चालत नाहीत आणि आवडत नाहीत. मग ती म्हणाली की तिला केंब्रीजला आल्यापासून शाकाहारी रहावं लागतंय. मला समजलंच नाही की ती असं का म्हणत होती ते. मग तिनेच खुलासा केला. की इंग्लंड मध्ये मिळणारं मांस हे हलालचं नसतं. आता ही सगळी माझ्या सामान्यज्ञानात भरच होती. मी लगेच तिला विचारलं हलाल म्हणजे काय? मुस्लीम लोकांमध्ये प्राण्यांना हळूहळू मारतात. म्हणजे फक्त गळा चिरून त्याचं पूर्ण रक्त वाहून गेलं की मगच ते मांस वापरतात. त्यालाच हलाल म्हणतात. पाश्चिमात्य देशांत प्राण्यांना इलेक्ट्रीसीटीचा शॉक देवून मारतात आणि त्यांचं रक्तं तसंच गोठवतात. हे इस्लाम मध्ये चालत नाही. म्हणून तिला शाकाहारी रहावं लागतंय. मग या प्रवचना पाठोपाठ तिने मला माणसाने मांसाहारी असण्यासाठी निसर्गानेच त्याला कसे सुळे दिलेत इत्यादी इत्यादी टीपीकल मांसाहार समर्थकांचे युक्तीवाद सांगायला सुरूवात केली. त्यातीलच एक म्हणजे, "शाकाहारातील भाज्या, पानं, वनस्पती ह्यांच्यात पण जीव असतो. मग तुम्ही शाकाहारी त्यांना मारून खाताच की. म्हणजे तुम्ही शाकाहारी नाही". आता पर्यंत मला व्हेजीटेरीयन बाय रीलीजन आणि व्हेजीटेरीयन बाय एथिक्स याविषयी पूर्ण माहीती झाली होती. ही पाकीस्तानी बया माझ्याशी हिंदूं मधील शाकाहार ही संकल्पना कशी फुटकळ आहे आणि कुराण मध्ये त्याचं कसं समर्थन केलं आहे यावर प्रवचनच देत होती. तिचं बोलणं पूर्णपणे ऐकून घेतल्यावर मी सुध्दा तिला तिच्या हिंदू धर्मा विषयी असलेल्या कल्पना किती चुकीच्या आहेत आणि सगळेच हिंदू शाकाहारी नसतात आणि त्याचा हिंदू धर्माशी असा काहीही संबंध नाहीये ह्या विषयी लेक्चर दिलं. अगदी जीवोजीवस्य जीवनम पासून ते आपल्या कडील यज्ञां मधील प्राण्यांच्या आहूती, देवीला बळी देण्याची संकल्पना हे सर्व सांगीतलं. माझा बराच वेळ गेला पण मला एका तरी पाकीस्तानी व्यक्तीशी यशस्वी सामना केल्याचं समाधान लाभलं.

मधे एका विशेषांकात शाकाहारा विषयी भाज्या सजीव आहेत हाच युक्तीवाद स्विकारून आपण कसा मांसाहार स्विकारला अश्या आशयाचा एक लेख वाचनात आला आणि ह्या सगळ्या आठवणी जागृत झाल्या. मला शाकाहारा विषयी लोक हा जो मुद्दा उभा करतात तो पटतच नाही. आपण जरी असं मानलं की झाडं, फुलं, पानं यात जीव असतो तरी प्रत्येक सजीवाची आत्मभानाची जाणीव (कॉन्शसनेस लेव्हल) असण्याचा स्तर हा वेगळा असतो. डास, मुंगी, माशी यांसारखे कीटक सुध्दा जीव असलेलेच असतात पण त्यांची कॉन्शसनेस लेव्हल ही गाय, बकरी, माणूस यांपेक्षा नक्कीच कमी आहे. अगदी प्राण्यां मध्ये सुध्दा ही पातळी वेगवेगळी असते. जर एखादी कुत्र्यांची जोडी असेल आणि काही पिल्लं असतील. काहीतरी होवून जर त्यांतील एखादा मरून पडला तर बाकीचे फक्त हुंगतात आणि काहीच न झाल्यासारखे पुढे जातात. पण हेच जर हत्तींच्या कळपातील एखादा हत्ती मरण पावला तर सर्व कळपा मध्ये माणसां सारखं वर्तन दिसून येतं. अगदी त्या मेलेल्या हत्तीच्या शवावर फुलांच्या फांद्या ठेवण्या पासून ते शोक करत तिथेच बसून राहण्यापर्यत सगळे प्रकार होतात. एखादा डास किंवा, मुंगी यांना मारलं तर त्यांच्या भावना किंवा त्यांचा शेवटचा आवाज, किंचाळणे, ओरडणे कधी ऐकल्याचे माझ्यातरी ऐकीवात नाही. हेच एखादी भाजी, फळ खाताना कोणी ऐकलंय हे सुध्दा ऐकीवात नाही. डॉ जगदीशचंद्र बोस यांनी जरी प्रयोगाअंती हे सिध्द केलं की झाडां मध्ये पण कॉन्शसनेस असतो तरी त्यांच्या कॉन्शसनेस ची पातळी आणि तीव्रता नक्कीच वेगळी असते. पण हेच कोंबडी, बकरी कापताना त्यांच्या गळ्यातून येणारा आर्त आवाज मन हेलावून टाकतो. पाश्चात्य देशां मध्ये तर डुकरं, गायी यांची पैदास केवळ तेव्हढ्याच साठी केली जाते. एखाद्या डुकराला, बकर्‍याला पकडुन नेतानाचा आर्त आवाज खूप काही सांगत असतो...कत्तल खान्यात देण्यासाठी गायींना जेव्हा नेतात तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगत असतात.... या सगळ्यांचे दु:ख समजण्यासाठी आपला कॉन्शसनेस जागृत असावा लागतो.

जंगली प्राण्यांमध्ये आणि माणसा मध्ये खूप मूलभूत फरक आहेत. जंगलातील जीवोजीवस्य जीवनम हा नियम माणसांसाठी खरंच लागू होतो का? माणसाला निसर्गाने दिलेल्या विचार करण्याच्या आणि अधिक बुध्दीच्या जोरावर त्याने पुषकळच प्रगती केली आहे. पण प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची शिकार भूक लागली की करावीच लागते. जर भूक नसेल तर ते त्या प्राण्यावर हल्ला सुध्दा करत नाहीत. तसेच आधीच मेलेला प्राणी फक्त गिधाडं खातात....वाघ सिंहासारखे प्राणी आपलं भक्ष्य स्वतः मारतात आणि मग खातात. ह्या उलट माणूस गरज नसताना प्राणी तसेच इतर माणसं यांना मारणे, कारण नसताना केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी प्राण्यांची शिकार करणे, त्यांना मारून त्यांची नखं-कातडी विकणे हे प्रकार करतो. पृथ्वीतलावर जिथे डाळी तयार होणं अवघड आहे, भाज्या १२ पैकी २-३ महीनेच मिळतात (उदा: भारतात अरूणाचल प्रदेश) अशा ठिकाणी जर लोक मांसाहारी असतील तर ते गरज म्हणून आहे. शास्त्रीय दृष्ट्या मांसल भाग की ज्यामुळे आपल्याला प्रथिनं आणि मेद मिळतो तो सजीव प्राण्याचा भाग म्हणजे मांस. आता या व्याख्येत सगळे सजीव येत नाहीत. झाडाच्या मांसल भागाला मांस म्हणत नाहीत. भाज्या, फळे यांच्या मधुन आपल्याला जीवनस्त्त्व आणि कार्बोदके मिळतात ना की प्रथिनं. त्यामुळे भाज्यां मध्ये जीव आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाही म्हणून आपण भाज्या शाकाहारी म्हणून खातो हा युक्तीवादच पोकळ आहे.

पण एका टप्प्यापर्यंत ज्यांना सापापासून सगळ्यांच्या आकृत्या त्यांना खाण्याच्या केवळ कल्पनेने मागेपुढे करतात त्यांनी केवळ भाज्या खातेसच नं त्यांचं ओरडणं एकू येत नाही मग दृष्टीआड सृष्टी या नियमाप्रमाणे प्राणी जोपर्यंत तुमच्या समोर मारले जात नाहीत तो पर्यंत ते खायला काय हरकत आहे? असा प्रचंड फसवा आणि टीपीकल युक्तीवाद केल्यावर ताबडतोब सगळं विसरून मांसाहारी बनावं.........हे पचायला जड जातं. ह्या युक्तीवादाला शरण जाणं म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की आपल्या डोळ्यांसमोर जर वाईट गोष्टी घडत नसतील (मी वाईट अश्यासाठी म्हणते आहे की जेव्हा प्राणी समोर कापताना त्यांचं ओरडणं आपल्याला ऐकवत नसेल म्हणजे ते वाईट आहे असे आपण मानता) तर इतत्र वाईट गोष्टी घडल्या तरी आपल्या डोळ्यांसमोर न दिसल्याने आणि कानांना ऐकू न आल्याने आपण त्याबध्दल फारसा विचार का करावा? म्हणजेच जर काश्मिरात अतिरेकी घरं जाळत हिंडत आहेत पण आमच्या डोळ्यांसमोर काही दिसत नाहीये, आम्हाला त्यांच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीयेत (थोडक्यात अतिरेकी जोपर्यंत मुंबईत घुसून तेच तांडव करत नाहीत) तोपर्यंत आम्ही कशाला विचार करा? ही प्रवृत्ती झाली. कारण आपल्या समोर अतिरेक्यांनी मृत्युचा नंगा नाच घातला तेव्हा आपल्याला त्याची तीव्रता आणि भयानकता लक्षात आली. आता जर कोणी असं म्हणत असेल की काश्मीर मध्ये अतिरेकी हल्ले झाले तरी आम्हाला तेव्ह्ढंच वाईट वाटतं. मग प्राणी आपल्या डोळ्यांसमोर मारले गेले काय किंवा दृष्टीआड, आपल्याला त्यांच्या आर्त किंकाळ्या ऐकू आल्या किंवा नाहीत काय.....आपल्याला वाईट वाटून आपण मांसाहार केला नाही पाहीजे. प्राणी आणि माणूस यांच्या बाबतीत आपला दुजा भाव का? मग तसं असेल तर आम्ही (शाकाहारी वाल्यांनी) प्राणी आणि भाजी यात दुजा भाव ठेवला तर बिघडलं कुठे?

याच्प्रमाणे अजुन एक पोकळ युक्तीवाद म्हणजे गाईचं दूध म्हणजे तिचं रक्तं. मग आईचं दूध म्हणजे आईचं रक्त पिऊनच लहान मूल वाढतं. मग या न्यायाने सगळेच रक्तपिपासू का? कोंबड्यांना अंड्यात जीव न राहण्यासाठी म्हणून विशिष्ट प्रकारचं इंजक्शन दिलेलं असतं. म्हणून त्या अंड्यात पिल्लं नसतात. पण हेच जर इंजक्शन दिलेलं नसेल आणि अंडं विशिष्ट तापमाना वर उबवलं तर त्यात नक्कीच पिल्लू तयार होतं. त्यामुळे सगळ्याच अंड्यांमध्ये पिल्लं नसतात हा युक्तीवाद सुध्दा पोकळ आहे. अंड्यातील पिवळा बलक हा त्या कोंबडीच्या कोणत्या शारीरिक द्रवापासून तयार झालेला असतो हे तर जगजाहीर आहे.

माझे मुद्दे हे कोणी मांसाहारी असावं की शाकाहारी यापैकी एकाचं समर्थन करण्यासाठी नसून दृष्टी आड सृष्टी या युक्तीवादावर आहेत. कोणाला जर मांसाहार आवडत असेल तर स्पष्ट तसे लिहून आणि म्हणून मी मांसाहारी आहे असे म्हंटले तर माझी काहीही हरकत नाही. म्हणजे कोणीही कोणताही आहार करावा तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे. माझा आक्षेप फक्त वरील मांसाहार समर्थकांच्या भाजी विषयी आणि दृष्टीआड सृष्टी या प्रवृत्तीच्या समर्थनाच्या युक्तीवादाला आहे. तसं असेल तर जे मांसाहार समर्थक असं मानतात की भाज्या खाणे हे सुध्दा एक मांसाहारच आहे तर मी केलेल्या वरील विधानांच्या विरोधात स्पष्टीकरण लिहावे. मी स्वतः शाकाहारी आहे हे काहीअंशी जन्मतःच कधी मांसाहार केला नाही यामुळेही आहे तसेच नंतर संधी आली तरी इच्छा मात्र झाली नाही हे मुख्य कारण. यात कुठेही बाय रीलीजन किंवा बाय एथीक्स वगैरे नाही. मी शाकाहारी म्हणून इतरांना तुम्हीही शाकाहारीच असायला पाहिजे असं सांगायला मी जात नाही. त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींचे शाकाहारी लोकांना मांसाहारात कन्व्हर्ट करण्यासाठीचे युक्तीवादही मला पटत नाहीत. जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे.

(निवेदनः हा कुठेही व्यक्तीगत वादाकडे नेण्यासाठी लिहीलेला लेख नाही हे वाचकांनी लक्षात घ्यावे. चर्चेत आपली विरोधी मतं जरूर मांडावीत फक्त विषयांतर होणार नाही याची काळजी घ्यावी.)

गुलमोहर: 

लेख आवडला. जरी लेखिकेचा स्टॅण्ड सूप्तपणे शाकाहाराचे समर्थन करणारा पण उघडपणे तटस्थपणा दाखवण्याचा प्रयत्न करणारा असा मला जाणवला असला तरीही... शिवाय त्यांची लिहिण्याची पद्धत, तसेच त्यांची प्रतिसादांमधील संयतता भावली.

लहानपणी माणसाचे मन जास्त संवेदनशील असते का? कारण मला लहानपणी मांसाचा वासही सहन व्हायचा नाही. आपल्यासारखा रक्तांमांसाचा एक जीव आपण मारुन खातोय, ह्या जाणीवेनेच खाण्याची इच्छा मरायची... अशी अनेक लहान मुलं आजही पाहते, जे फक्त रस्सा खातात आणि मांस खायला नको म्हणतात!

लहानपणी टिव्हीवर मनेका गांधींचा कार्यक्रम नियमितपणे पहायचे. त्यात माणसाने शाकाहार अंगिकारावा, ह्यासाठी प्राण्यांना किती क्रौर्याने मारलं जात असे, हे दाखवायचे. तसेच गाई-म्हशींनी जलदगतीने दूध द्यावं म्हणून त्यांना हार्मोनचे इंजेक्शन देत असत ज्यामुळे त्यांना प्रसुतीवेदनांसारख्या वेदना होत, ही माहिती मिळाली होती. कोंबड्यांना ज्या प्रकारे खुराड्यात डांबून ठेवत, ते पाहून अस्वस्थता येई. तसेच मोठ्या जनावरांना मारण्यासाठी किती वार करावे लागत, हे पाहून पोटात ढवळून येत असे. तो कार्यक्रम नियमित पाहिल्यामुळे मी सलग ४-५ वर्षे शाकाहारी झाले होते.

एक दिवस माझी संवेदनशीलता झोपी गेली आणि मी पुन्हा चवीने मांस खाऊ लागले. मग एकदा एका जैन-म्हणजेच कट्टर शाकाहारी आणि इतर- म्हणजेच मांसाहारी फ्रेंड्स ग्रुपमध्ये शाकाहार-मांसाहार या विषयावर चर्चा झाली, (ज्यात मी फक्त श्रवणभक्ती केली होती.) तेंव्हा माझा झोपी गेलेला विवेक जागा झाला आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा शाकाहारी झाले ते ही बरीच वर्षे!!!

आताही अनेकवेळा मी मांसाहार करतांना मला ती चव आवडते, ह्या बाबतीत मला स्वतःची घृणा वाटत असते आणि तरीही मी खाते!!!!! काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ इमेल फॉरवर्डने आला "फार्म टू फ्रिज" म्हणून... http://www.youtube.com/watch?v=THIODWTqx5E ज्यात प्राण्यांचे आपण कल्पनाही करु शकणार नाही असे हाल फार्ममध्ये केले जातात, हे सगळे दाखवले आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्याची माझ्यात हिम्मत नाही. ज्यांच्यात आहे त्यांनी पहावा!!!! आता हा व्हिडिओ पाहिल्यापासून तर अपराधीपणा जाता जात नाहीये... आणि मांस खाण्याची इच्छा मेलेली आहे.

थोडक्यात मी मांसाहार करणारी, त्याची चव एन्जॉय करणारी, मध्येच क्रौर्याने मारल्या जाणार्‍या प्राण्यांचा विचार करणारी आणि मांसाहार सोडणारी, परत काही काळाने सुरु करणारी अशी एक कन्फ्युज्ड व्यक्ती आहे. मी मांसाहार करुनही त्याचे कुठल्याच पद्धतीने समर्थन करु शकत नाही.

ह्या लेखाच्या निमित्ताने सतत दोलायमान अवस्थेत जगणार्‍या माझे मी फक्त मन मोकळे केले आहे. मला यातून काहीही संदेश द्यायचा नाही की वाद घालायचा नाहीये...

वाचल्याबद्दल धन्यवाद!

महेश, आजही जगात अनेक प्रदेशात मांस कच्चेच खाल्ले जाते (सहज उदाहरणे देऊ शकेन, पण गरज नाही.) अग्निचा शोध लागल्यानंतरच ते भाजून खायची पद्धत रुढ झाली. त्यामूळे कच्चे अन्न मानव पचवू शकत नाही, हा मुद्दा गौण आहे. यात अनेक पिढ्यांच्या खाद्यपद्धतीचा परिपाक आहे.

आणि वाघ सिंह क्रूर असतात म्हणजे काय. त्यांचे भक्ष्य त्यांना पठलाग करुनच पकडावे लागते. तसेच त्यांच्या मानेचाच वेध घ्यावा लागतो. त्यात क्रूरपणा कसला ? उलट पोट भरल्यावर, भूक नसताना मजा म्हणून ते कधीच प्राण्यांना मारत नाहीत. अगदी डोळ्यासमोर एखाद्या हरणाची वा झेब्र्याची शिकार झाली, तरी बाकीच्या झेब्र्यांच्या वा हरणांच्या मनावर त्याचा फारसा परिणाम होत नाही. पोट भरलेला वाघ आजूबाजूला असला तरी ते आरामात चरतात, पाणी पितात.

काहि उदाहरणात अपल्याला क्रूरपणा वाटतो (व्हेल जेव्हा सीलच्या पिल्लाला उड्वून उडवून खातो. मांजर उंदराला खेळवत खेळवत मारते, माकडांची एक टोळी कट करुन, एका माकडाला मारते. या सर्वाचे चित्रीकरण झालेले आहे.) पण त्यावेळच्या त्या शिकारी प्राण्यांच्या मानसिकतेची पूर्ण कल्पना आपल्याला आलेली आहे, असा दावा करता येत नाही.

मास्तुरे म्हणताहेत तेही खरे आहे. एक किलो मांस तयार करण्यासाठी किती धान्य, पाणी वगैरे लागते त्याचा हिशोब, यू ट्यूब वरच्या होम या लघुपटात आहे. पण त्याचा परिणाम होऊन, आज सर्व मांसाहारी आपला आहार बदलतील, याची शक्यता नाही. कारण हा उद्योग आज अवाढव्य प्रमाणात वाढला आहे.

तसेच आहारावरुन स्वभाव ठरतो हे पण मला तितकेसे पटत नाही अगदी नाव ठेवतोय असे नाही, पण सूनांना क्रूरपणे छळणार्‍या सासवा, एका विशिष्ठ धर्मातच जास्त असतात, असे आपल्या सगळ्यांनाच जाणवलेले असेल.

म्हणून परत माझ्या मूळ मुद्याकडे.. जो जे वांछील तो ते खाओ..

आताही अनेकवेळा मी मांसाहार करतांना मला ती चव आवडते, ह्या बाबतीत मला स्वतःची घृणा वाटत असते आणि तरीही मी खाते!!!!! >>अगं साने... तु ग्रेट आहेस saashtang%20namaskar_0.gif

म्हणून परत माझ्या मूळ मुद्याकडे.. जो जे वांछील तो ते खाओ.. >> दिनेश दा आपणासही मना पासुन घालावासा वाटला.... saashtang%20namaskar_0.gif

माणूस प्राण्यांना खाण्याकरता मारताना कशा क्रूर पध्दतीने मारतो>>>> मास्तरांचा.

माणुस खाण्याकरता मारतो तेव्हा काहितरी तरी समजते पण माणुस काहिहि कारण नसताना मारतो आणी माबोवर मास्तर तुम्हि गांधीजींना अहिंसेबद्दल नावे ठेवली आहेत पुर्वी. एकदम प्राण्यांबद्दल हा कळवळा कोठुन आला ?

सानी मी ही तुझ्याच "कन्फुज्ड" कॅटॅगरीत Sad

आणि मला कुणाच्याही खाण्याला कमी लेखणे/त्यावरुन वाद घालणे अतिशय अतिशय अतिशय असंस्कृत वाटते.

ह्या लेखाच्या निमित्ताने सतत दोलायमान अवस्थेत जगणार्‍या माझे मी फक्त मन मोकळे केले आहे. मला यातून काहीही संदेश द्यायचा नाही की वाद घालायचा नाहीये... >>>>>

माणसाने स्वतःच्या हुदयाचे एकावे. Happy

मांसाहार करणारी लोक पापी असे काहि नाहि. मनात एकदा हिंसा आली की प्रत्यक्ष मारले अथवा नाहि याने काहि फरक पडत नाहि. शाकाहार करणाया माणसाने मनातुन कित्येकांचे मुडदे पाडलेले असु शकतात त्यामूळे consciousness बद्दल ज्याचा त्याने स्वतःचा प्रामाणिकपणा पहावा.

मेडिटेशन करायला लागले की माणुस बदलत जातो. माणुस आतुनच बदलला की बाहेरची हिंसा कमी होणारच. मांसाहार खाणे सुटणे आणी सोडणे यात खुप मोठा फरक आहे. आणी म्हणुनच सानीची पोस्ट प्रातिनिधिक आहे.

निसर्गात सहज दिसून येते की जे प्राणी मांसाहारी आहेत ते हिंस्त्र आणि क्रूर असतात (उदा. वाघ, सिंह) व जे शाकाहारी आहेत ते शांत स्वभावाचे असतात. (उदा. गाय, हत्ती)
मनुष्य स्वभावाचे असेच आहे.

महेश तुम्ही अजुन पिसाळलेल्या गाई आणि हत्ती पाहीले नसतील. गाईने शिंगाने वार करुन माणसे व जनावरे मारण्याची उदाहरणे आहेत. हत्ती पिसाळले की एका दमात कितीतरी माणसे, इतर जिव पायाखाली चेंदामेंदा करतात.

जागू अहो तुम्ही पिसाळलेल्या प्राण्यांबद्दल सांगत आहात. पण तो काही त्यांचा मुळ स्वभाव नसतो.
बाकी जिभेबद्दल मला एकदा तपासून पाहिले पाहिजे. Happy मांजराच्या जिभेबद्दल मला खात्री आहे,

सानी, नताशा; कनफ्यूज्ड राहू नका. चव आवडते ना मग मनात अपराधीपणा न आणता खात जा.
जगात अनेक माणसे अर्धपोटी असतात म्हणून प्रामाणिकपणे कमावलेले अन्न मी खायचे नाही का ?

माझ्यासारखीच अवस्था असलेलं कोणीतरी आहे तर! नताशा, तुझा प्रतिसाद पाहून बरं वाटलं.... माझी बहिण, नवरा आणि आता तू पण Happy

दिनेशदा... धन्यवाद! तुमचे बोल म्हणजे पडत्या फळाची आज्ञा मानून पाळण्याचा मोह होतो आहे! Happy पण विवेकाला कायमचे झोपवल्याशिवाय ही कन्फ्युज्ड अवस्था संपणार नाही, हे ही नक्की!!!

चातक, येथून पुढे तुम्ही माझे नाव नीट लिहा -- 'बि' नाही 'बी' असे लिहा अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आणि मला तुमच्याशी वाद घालण्यात काडीचाही रस नाहीये हेही बजावून सांगतो आहे. तुम्ही मांसाहारी आहात म्हणून स्वतःला निबिड अरण्यातील वाघ किंवा सिंह समजू नका. उंट, घोड, हत्ती हे प्राणी शाकाहारी असून ताकदवान आहेत!

आणि मला तुमच्याशी वाद घालण्यात काडीचाही रस नाहीये हेही बजावून सांगतो आहे.>>> मग काय मला आहे..? Uhoh ...असो....या तुमच्या प्रतिसादावरुन दिसुन येते तम्ही वाद घालण्यास कीती रसभरीत आहात ते...काय गरज होती ..बि.. बी..सिबी उकरण्याची आता इथे..? आणि वाघ सिंह उंट घोडे आणण्याची? मी स्व:ताला काहीही समजेन्....मी वाघ झालो तर तुमच्या तोंडुन खाणार आहे का मांस? Uhoh

आणि हे काय...?

सानी, तू शाकाहारीचं रहा! >>> कशाला लोकांना ही धमकी? का ही जबरदस्ती? किती हा हिंस्त्रपणा स्वभावात?....
म्हणे आम्ही शाकाहारी Lol Lol

खर्‍या शाकाहारी लोकांच्या दोन पोष्टी आहेत वर त्या पहा.

किव आणी दया येते तुमच्या सारख्या लोकांची...तुमच्या सारख्यांना मनातुन सतत वाटत राहते कुणाचं तरी काळीज भाजुन खावं पण आपले तथाकथीत शाकाहारी पणाची महानता मिरवण्यासाठी गाजवण्यासाठी दुसर्‍याला नावं ठेवता. Biggrin

तू उपरोधाने म्हणत असलास तरीही... >>> साने मी तो मनापासुन सा. नमस्कार घातला आहे....
आणि ते मुळ लेखात असायला पहीजे होतं असं मनापासुन वाटलं..म्हणजे हे तु (दिनेशदा) जे मनोगत दिले ते या लेखाच्या लेखीकेचे असले पाहीजे होते...असे मनातुन वाटुन गेले... एकुण हा लेख एकांगी आहे. तुमचे विचार दोन्ही बजुने आहेत. Happy

इथे लेखिकेने सांगीतले आहे की? मला तरी लेखीकेची माँसाहाराची कशी ओळख झाली, शाकाहारामुळे येणार्‍या काही अडचणी (परदेशात) असाच काहीसा सूर दिसला, कुठे अगदी, माँसाहारी म्हणजे वाईट आणि मीच शहाणी असा सुर दिसत नाही>>>डिट्टो

काही देशात मांसाहार करणारे मानवी मांस,अर्भक पण आवडीने खातात.
आता आपल्याला काय त्याचे? जो जे वांछील तो ते खाओ. Rofl

*लेखाचं शीर्षक माझे शाकाहार पुराण आणि संपूर्ण लेख मात्र मांसाहार आणि मांसाहारी लोकांशी आलेल्या संबंधांबद्दल?

*"जसं एखादा ख्रिश्चन मिशनरी जर हिंदू मानसाला तुझा धर्म किती फुटकळ आणि चुकीचा आहे आमचा धर्म बघ किती चांगला आहे असं पटवुन देण्याचा प्रयत्न करतो हे जितकं निंदनीय आहे तितकंच एखादी मांसाहारी व्यक्ती शाकाहारी व्यक्तीला किंवा उलट कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करते हे निंदनीय आहे. " ही दोन टोकाच्या गोष्टींमधली तुलना न पटणारी.

*संपूर्ण लेख मांसाहार कसा अयोग्य हे वेगवेगळ्या तर्‍हेने पटवायचा प्रयत्न करून पुन्हा या वाक्याने लेखाचा शेवट करण्यातली तर्कसंगती कळली नाही.

*माणूस निसर्गत: शाकाहारी आहे, हे सांगताना त्याची इतर प्राण्यांशी तुलना केली आहे. तसा माणूस बर्‍याच अनैसर्गिक गोष्टी करतो, जसे कपडे घालणे, विवाहबद्ध होऊन एकाच व्यक्तीशी जन्मभराचे शरीरसंबंध ठेवणे (किमान तसा प्रयत्न करणे) इ.
माणूस शेती करायला लागण्यापूर्वीपासून प्राण्यांची शिकार करून खात असे, अग्नीचा शोध लागल्यावर मांस भाजून खाऊ लागला असे यात तर वाद नाही. जर (तथाकथित) निसर्गनियमच पाळायचा तर शाकाहारसुद्धा न शिजवता करता येईल तेवढाच करावा.

*PETA च्या एका पत्रात भारतात दुग्धोत्पादनासाठी पाळल्या जाणार्‍या गाईम्ह्शींना किती क्रूरपणे वागवले जाते, त्यांच्या स्वच्छतेकडे , आरोग्याकडे कसे दुर्लक्ष केले जाते याचे सचित्र वर्णन होते. या न्यायाने प्राण्यांना त्रास द्यायचा नसेल तर व्हेगन व्हायला हवं किंवा स्वत: गाय/म्हैस/बकरी पाळून त्यांना नीट सांभाळून मग त्यांचं दुध वापरायला हवं.

*सानी हे तुमच्यासाठी : शिरीष पै यांना बाजारात जाऊन चिकन .मटण आणताना त्या प्राण्याला मारले जाताना पाहून फ़ार दु:ख व्हायचे, अपराधी वाटायचे; पण घरी येऊन ते शिजवू लागल्यावर सुटणारा वास घेतला की आपोआप सगळे विसरायला व्हायचे.

लेख आणि प्रतिसाद सगळं वाचलं, कुणाला काय म्हणायचंय ते ही कळलं.
एका गोष्टीशी सहमत आहे की काही शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना उगिचच शहाणपणा शिकवत, शाकाहार च कसा योग्य आहे हे सुचवताना दिसतात. मी शाकाहारी असून ही शक्यतो तसे करत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला त्याने/तिने काय खावे हा अधिकार आहे, त्याहूनही जास्ती ती व्यक्ती राहते तिथली भौगोलिक परिस्थिती त्याला जास्ती कारणीभूत आहे. शिवाय जीभेवर केलेले संस्कार.

ज्याच्या त्याच्या जीभेवरच्या संस्कारांचा आदर राखला गेला पाहिजे. मांसाहार किंवा शाकाहार दोन्ही सारखेच आहेत, त्यामुळे कोणीही कोणाच्याही मतपरिवर्तनासाठी आपला वेळ व्यर्थ घालवू नये. पुर्वी मला मांसाहार शेजारी बसून केलेला चालायचा नाही, मांस शिजवलेली भांडी/ताटं यांना मी हात सुद्धा लावत नसे.. पण आता मला काहीही वाटत नाही. अगदी कोणी माझ्या ताटात ठेवून खाल्ले तरीही मला त्याचे काही वाटणार नाही.

काही शाकाहारी लोक मांसाहारी लोकांना उगिचच शहाणपणा शिकवत, शाकाहार च कसा योग्य आहे हे सुचवताना दिसतात. <<<
तसेच काही मांसाहारी लोक उगिचच तुच्छ लेखत, कुचेष्टा करत आणि मांसाहार करण्यातच स्वर्ग आहे हे सुचवताना दिसतात.

इथेही समान मांडणी आहे बाकी दुसर्‍याचे अन्न आपल्याला पटले नाही तरी त्याला नावे ठेवू नयेत एवढे मात्र नक्की.

दक्षीणा तुझ्याच प्रतिसादाची वाट पाहत होते.

माणूस शेती करायला लगण्यापूर्वीपासून प्राण्यांची शिकार करून खात असे, अग्नीचा शोध लागल्यावर मांस भाजून खाऊ लागला असे यात तर वाद नाही.

अगदी माझे मतही हेच आहे.

स्वतःला निबिड अरण्यातील वाघ किंवा सिंह समजू नका. उंट, घोड, हत्ती हे प्राणी शाकाहारी असून ताकदवान आहेत >>>:खोखो:

अरे काय हे! एवढे विनोदी वाक्य मी शाकाहार व मांसाहारच्या चर्चेत कधीही एकले नव्हते! मजा आ गया! Biggrin

अगदी कोणी माझ्या ताटात ठेवून खाल्ले तरीही मला त्याचे काही वाटणार नाही. >> दक्षे तु मांसाहारातुन सुटलीस Happy अगदी १००.०१ % सुटलीस.

अभिनंदन..!!! Happy

तुही खर्‍या शाकाहारी लोकांत.
हा तिसरा शुध्द शाकाहारी प्रतिसाद तुझा.

काही देशात मांसाहार करणारे मानवी मांस,अर्भक पण आवडीने खातात.>>> काहीच्या काही म्हणतात ते हे
ही एक मानसिक विकृति झाली.
>>>>>
जो जे वांछील तो ते खाओ. Rofl

राजे, किमान एका तरी देशाचे उदाहरण द्या

चीन

पाकीस्तान मध्ये नुकतेच एका कुटूंबाला माणसाचे मांस (हात) शिजवतांना पकडले (बॉडी स्टोअर रुम मध्ये होती) बातमी दै.दिव्य मराठी

मग आपण संशोधन करु....कोणत्या देशात असे मानव राहतात ते.

आता पुरावे नका मागु Rofl

चिन
पाकीस्तान मध्ये नुकतेच एका कुटूंबाला माणसाचे मांस (हात) शिजवतांना पकडले (बॉडी स्टोअर रुम मध्ये होती) बातमी दै.दिव्य मराठी

>>. पुन्हा सांगतो हि एक मानसिक विकृति झाली......आणि या अमानविय घटनेला आपण इतक्या सहजतेने घेत आहोत ही आपली नालस्ती. Sad

राजे या घटनेचे जाणून तुम्हाला असुरी आनंद झाला आहे ना..? Sad ग्रेट आहात आपण.

राजे या घटनेचे जाणून तुम्हाला असुरी आनंद झाला आहे ना..?
>>>
मला वाईटच वाटते ते सर्वंच मांसाहाराचे.

पुन्हा सांगतो हि एक मानसिक विकृति झाली......
>>>
ही तुम्हाला विकृती वाटते, जे खातात त्यांना नाही.

चातक,

ते अमानवी असले तरी दुर्दैवाने ते खरच आवडीने केले जात आहे. बॉईल्ड बेबी अशी जाहिरात केली जाते. फार भयंकर प्रकार आहे.

अर्थात, मांजरी स्वतःचे पिल्लू खाते ते आपल्याला अमानवी (कारण ती मांजर असते) वाटत नाही हेही तितकेच आश्चर्यकारक!

कुठल्याकुठे गेला धागा!

-'बेफिकीर'!

ते अमानवी असले तरी दुर्दैवाने ते खरच आवडीने केले जात आहे. बॉईल्ड बेबी अशी जाहिरात केली जाते. फार भयंकर प्रकार आहे. >>

पण ही 'उपमा' भारतीय मांसाहारी लोकांना देणे किंवा एखाद्याचा असे उदाहरण देउन 'उपहास' करणे (खास करुन शाकाहारी लोकांना) किती साजेसे/योग्य वाटते..?

शाकाहारी मनाची अवस्था अशीच असावी तर्... नको असले शाकाहारी मन.

कुठल्याकुठे गेला धागा! >> हो.

Pages