अमानवीय...?

Submitted by आशुचँप on 27 November, 2009 - 09:06

आपल्यापैकी किती जणांचा भुता-खेतांवर विश्वास आहे?
मला मान्य आहे हा खूपच वादाचा मुद्दा आहे. काही जण याचे कट्टर समर्थक असतील तर काही विज्ञाननिष्ठ हे सगळे थोतांड म्हणून उडवून लावतील. मी स्वत:ही या जगात भुता-खेतांची वस्ती असेल असे मानत नाही. तरीदेखील मी हा विषय का आणतोय हे जाणण्यासाठी पुढील अनुभव वाचा.
प्रसंग १ - माझा ट्रेकींग-गुरू उमेशबरोबर आम्ही हरिश्चंद्रगडाचा बेत आखला. होय-नाही करता करता चौघेजण गाड्यांवरून निघालो. मंचर-आळेफाटा-खुबीफाटा मार्गे खिरेश्वरला पोचलो तेव्हा दिवस कलायला लागला होता. तेव्हा वेळ न घालवता पटकन चहा मारून चालायला सुरूवात केली. दाट जंगलातून वाट काढत जेव्हा टोलारखिंडीत पोहोचलो त्यावेळी चांगलाच अंधार पडला होता.
आजुबाजूचे वातावरण अन्य वेळी खूप छान वाटले असते, पण एकतर उमेश वगळता बाकी तिघे पहिल्यांदाच हरिश्चंद्रगडावर येत होतो. त्यातून या अशा अंधार्‍या रात्री (नंतर लक्षात आले त्या दिवशी अमावस्या होती), दाट जंगलात झाडांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या फांद्या, खिंडीच्या कोंदट जागेत भयाण वाटत होत्या.
मला वाचल्याचे आठवले की खिंडीमध्ये एक व्याघ्रशिल्प आहे. मी सहज त्याला विचारले "अरे खिंडीत एक व्याघ्रशिल्प आहे ना? कुठे आहे ते?"
त्याने मी जिथे बसलो होतो तिथे टॉर्चचा लाइट टाकला आणि म्हणाला "ते काय तुझ्या मागे"
मी मागे वळून पाहीले आणि एकदम दचकलो. माझ्या मागेच लालभडक शेंदूर फासलेले वाघोबा होते.
मनावर भितीचा अंमल बसत असतानाच आम्ही पुढे चालायला सुरूवात केली. रॉक्-पॅच ओलांडून वरती आलो. अमावस्या असल्यामुळे रात्र जास्तच अंधारी वाटत होती. त्यात कसा कोण जाणे उमेश वाट चुकला. फिर-फिरूनही वाट सापडेना तेव्हा थोडा वेळ थांबायचा निर्णय घेतला.
डिसेंबर असल्याने थंडी बर्‍यापैकी होती. एक मोकळी जागा पाहून बसलो. तोपर्यंत उमेशने पालापाचोळा गोळा करून शेकोटी पेटवली. जरी तो एकदम नॉर्मल असल्याचे दाखवत होता तरी त्याची अस्वस्थता आम्हा तिघांनाही जाणवली. त्याला विचारले तर त्याने उडवून लावले. शेवटी अगदी खनपटीलाच बसलो तेव्हा कुठे म्हणाला "मला या अशा ठिकाणी अजिबात रात्र काढायची नाहीये. फार वाईट अनुभव आहे" त्या ठिकाणी रात्र काढायची आमचीही अजिबात इच्छा नव्हती, तरीपण त्याला अनुभव काय आलाय हे ऐकण्याची जबरदस्त इच्छा झाली.
सगळ्यांनी अगदी आग्रह केल्यानंतर कुठे तो तयार झाला. आम्ही पुढे सरसावून बसलो, सगळे लक्ष त्याच्याकडे लागले. शेकोटीचा तांबडालाल उजेड त्याच्या चेहर्‍यावर पडत होता. आजुबाजूचा भयाण अंधार विसरायला झाला. त्याने जो अनुभव सांगीतला तो त्याच्याच शब्दात.................
साधारण तीन वर्षापूर्वी मी माझ्या काही मित्रांबरोबर या ट्रेकला आलो होतो. आमच्यामध्ये एक फडतरे म्हणून एक जण होता. तो पहिल्यांदाच ट्रेकला येत होता. आत्ता आपण आलो तसेच तेव्हाही संध्याकाळी उशीरा चालायला सुरूवात केली. पण फडतरेला चालवेना आणि तो खालीच बसला. आम्ही त्याला कसाबसा आणखी चालवला पण त्याचा स्टॅमिना अगदीच संपला होता. शेवटी असेच जंगलात थांबायचे ठरवले. सगळेजण ओळीत झोपलो, अर्थातच फडतरे मधे.
रात्री अचानक जाग आली ती फडतरेच्या आवाजामुळे. तो एकदम जोरजोराने ओरडत होता. मला पहिले काही समजेना. आधी वाटले त्याला साप - वगैरे चावला की काय. सगळेजण त्याभोवती गोळा झाले.
तो नुसताच ओरडत होता "नाही नाही ... नको नको"
त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो काही ऐकेना. शेवटी एकजण पुढे झाला आणि त्याने खाण्णकरून त्याला मुस्कडले. त्याचा आवाज तर बंद झाला. तसाच मुसमुसत थोडा वेळ पडून राहीला. नंतर त्याने जे सांगितले ते असे -- त्याला म्हणे स्वप्नात दोघेजण दिसले. ते त्याला म्हणत होते की तु आमच्याबरोबर चल.
अर्थातच आम्ही हा सगळा प्रकार हसण्यावारी नेला. त्याची जाम टिंगल-टवाळी पण केली. या प्रकारानंतर झोप कोणालाच आली नाही. पहाटेपर्यंत इकडतिकडच्या गप्पा मारत बसलो.
सकाळी उठून गडावर गेलो. मंदीरापाशी पहातो तर ही गर्दी. गडावर काही उत्सव असल्याचे माहीत नव्हते. अजून पुढे गेलो तर दोन पोलिसही दिसले. आता आम्ही बुचकळ्यात पडलो. एवढ्या पहाटे पोलिस काय करतायत इथे?
एक गावकरी भेटला. त्याच्याकडून अशी माहीती मिळाली की काल गडावर एक ग्रुप आला होता. त्यातले काही जण पोहायला म्हणून पुष्करणी तळ्यात उतरले आणि बुडून मेले. त्यांच्या डेडबॉडीज काढायचे काम रात्रभर चालले होते. आत्त्ता कुठे त्या मिळाल्या.
अरेरे... का हे लोक असे करतात? असा विचार करत आम्ही आणखी पुढे गेलो. तोच फडतरे घाईघाईने माझ्या जवळ आला आणि म्हणाला "उम्या, आत्ताच्या आत्त्ता गड उतरायचा. काय वाट्टेल ते झाले तरी."
मला कळेना याला आता परत काय झाले.
त्याने मला हळूच बाजूला नेले आणि म्हणाला "अरे या दोन डेडबॉडीज दिसतायत ना? मला हेच दोघे काल रात्री न्यायला आले होते,"

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेब.. माझा प्रतिसाद तुम्हाला नव्हे तर येउकामीच्या पोस्टला होता... तुमच्या बरोबर घडलेले खरेच दुख्ख:कारण आहे आणि मी त्यावर हसलेलो नाही. गैरसमज नसावा..

वेब वाईट झाले नक्कीच.'सेनापती' झोपाळु माणुसपण सकाळी लवकर महत्वाच्या कामाला जायचे असल्यास उठतोच कसाही.माझा मित्र झोपाळु किंवा आळशी नाही.

वेब >>>> Sad

कोकणात खेड्यात रात्री जाम भीती वाटते भूतांची.दाट झाडी आणि खारे दमट वातावरण त्यात भरच घालतात.

मला तर 'येऊकामी' हा आयडीच अमानवीय आणि भीतीदायक वाटतो आहे. कारण - १) जरा नाव गुढ आवाजात वाचुन बघा २) सदा न कदा मी फक्त याच धाग्यावर पाहिला आहे हा आय डी. इतरत्र कुठेही अस्तित्व नाही. Light 1 Happy

मनिमाऊ मी नवीन आहे माबोवर त्यामुळे सध्यातरी याच धाग्यावर कार्यरत आहेत.हा धागा इंटरेस्टींग आहे.ईतर धागे अपिल होत नाहित तितके पण हा धागा जबरा आहे.मी पडीक असतोच ईथे पण कधी कधी तुम्हीपण आपले विचार मांडावेत धाग्यावर.

ये--मी, मी काय विचार मांडणार या धाग्यावर? मी, माझे आई-वडिल, माझे मित्र-मैत्रिणी, माझे नातेवाईक अथवा ओळखीपाळखीचे... कोणीही अमानवीय अनुभव घेतले नाहीत. मी शहरात जन्मले आणि वाढले, इथे बिचारी भुतं नाहीत. मग मी काय शेअर करणार? बरं विश्वास आहे म्हणवत नाही आणि नाही म्हटलं आणि कोणी अस्तित्व शाबीत करायला अचानक शेजारी उभं राहिलं तर पंचाईत. Wink तुम्ही करा हो एन्जॉय. Happy फक्त अजुनही बरंच छान छान वाचायला आहे, तिथेही चक्कर मारा. चिक्कार करमणुक, माहिती, ज्ञान सगळं आहे इथे.

म..ऊ पुढच्या वेळी जेव्हा रात्री तुम्ही घरी एकट्याच असाल तेव्हा आजुबाजूला नीट लक्ष द्या कोणाच्यातरी 'वेदनादायी अस्तित्वाची' नक्कीच जाणीव होईल.

या सगळ्या मंडळीनी डॉ. अब्राहम कोवूर यांचे गॉड्स, डेमन्स अ‍ॅ.ण्ड स्पिरिट्स' व 'बिगॉन गॉडमेन' ही पुस्तके वाचावीत मग या धाग्यावर यावे.

>>ये--मी, मी काय विचार मांडणार या धाग्यावर? मी, माझे आई-वडिल, माझे मित्र-मैत्रिणी, माझे नातेवाईक अथवा ओळखीपाळखीचे... कोणीही अमानवीय अनुभव घेतले नाहीत. मी शहरात जन्मले आणि वाढले, इथे बिचारी भुतं नाहीत. <<

अस कस. काही दिवसापूर्वी मध्यरेल्वेच्या 'पारसिक बोगद्या' मध्ये हायव्होल्टेज केबलट्रेला आधार दिलेल्या एका चॅनेलला, लोकलच्या दरवाज्यात उभा असलेला एक जण धडकला. त्याची मान त्याच चॅनेलमध्ये अडकली व धड काही मीटर पूढे उडाले. आता लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या बर्‍याच लोकांना म्हणे त्याचे शीर तसेच तीथे अडकलेल दिसते. व मला वाचवा, वाचवा असा आवाजही ऐकू येतो. काल दादरहून डोंबिंवलीला येताना लोकलने ठाणे स्टेशन सोडताच, एवढी गर्दी असतानाही लोकांनी ट्रेनचे सर्व दरवाजे बंद केले होते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
©º°¨¨°º©!!! सर्व मायबोलीकरांना इंग्रजी नविन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !!! ©º°¨¨°º©

ये--मी, Proud

मंदारा, आपला तो विनोद, दुसर्‍याचं ते कैच्याकै ! Light 1 आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी असा खुसट मुडमधे का आहेस रे? म्हणजे मला माहित आहे, आमचं नविन वर्ष आहे, तुझं नाही Wink पण तरी आमच्या नविन वर्षाच्या सुरुवातीला जरा हस की. Happy

बरे झाले मनीमाऊ तु त्याला बोचकारलेस त्याला भुतांच्या घरांचा प्रश्न 'कैच्याकै' वाटतोय.हण्णा अजारेंकडून प्रेरणा घेऊन भूतांच्या राज्यात 'भूतपाल' विधेयक पास झाले.जोशी घ्या जरा भुतांकडून काहितरी.म्हणे कैच्याकै.

चातक... आपल्याला दचकवेल असा एखादा कवटी सदृश्य चेहरा शेवटी समोर येतो का त्याची वाट बघत होतो पण निराशा झाली.. Happy

साधारण १९७२ सालातील ही गोष्ट आहे. माझ्या वडिलांना आलेला हा विचित्र अनुभव मी त्यांच्याच तोंडून ऐकला आहे. त्यावेळी आम्ही एका अत्यंत दुर्गम खेड्यात रहात होतो. गावात जायला त्या काळी एकही एस.टी. बस नव्हती. मुख्य रस्त्यापासून सुमारे चार मैल चालत गाव गाठावे लागे. ती वाटही घनदाट जंगलातून होती. खालच्या बाजूला पंचवीस तीस फूट खोलवर वाहणारी नदी आणि एका बाजूला सरळसोट कातळाचा डोंगरी कडा यामधून ती जेमतेम फूट दोन फुटाची पायवाट वाटसरूला गावात आणून सोडे. तर अशा या गावातून बदली झाल्यामुळे आमचे घरगुती सामान ट्रकने दुसर्‍या गावात न्यायचे होते. गावाच्या एका बाजूस असलेल्या त्यातल्या त्यात सपाट कातळावरून आम्ही त्यावेळी रहात असलेल्या घरापासून किलोमीटरभर अंतरावर ट्रक नेणे शक्य होते. वडिलांनी त्यावेळी तालुक्याच्या ठिकाणी राहणार्‍या व रेशनची वाहतूक करणार्‍या ओळखीच्या एका ट्रक मालकाला सामान वाहतुकीबाबत विचारले होते. दोन दिवसांनी नेमका त्याच रस्त्यावरून पुढील गावास रेशनचे धान्य घेऊन त्याचा ट्रक जाणार होता. तो रिकामा होऊन परत येताना आमचे सामान घेऊन निघणार होता. परंतु त्याला परत यायला रात्र होणार होती. व ड्रायव्हरला आमचे सामान कोठून उचलायचे आहे याचा पत्ता नव्हता म्हणून त्या ट्रक मालकाने वडिलांना हमरस्त्यावर थांबण्यास सांगितले होते. त्या प्रमाणे वडिलांनी सायंकाळी प्रकाशाचे साधन म्हणून बॅटरी व हातात काठी बरोबर घेऊन घर सोडले. ज्या ठिकाणी रस्त्यावर ते ट्रकची वाट पहात तांबणार होते तिथे ओसाड माळावर एक वारेबुवा या नावाने ओळखल्या जाणार्‍या देवाच्या लहानश्या देवळाव्यक्तिरिक्त काहीही नव्हते. ट्रकला यायला मध्यरात्र होणार याची खात्री असल्यामुळे वडिलांनी बरोबर नेलेली शाल पांघरून घेऊन देवळात असलेल्या एकुलत्या एक लाकडी बाकावर ताणून दिली. आजूबाजूला वस्ती नसल्यामुळे शांतता होती. वडिलांचा डोळा लागून घटकाभर झाला असेल. एवढ्यात त्यांना कसल्यातरी आवाजाने जाग आली. देवळात असलेल्या गोटासदृष्य मूर्तीभोवती जोरदार श्वासोच्छ्वास करीत, जमिनीवर पाय ओढत कोणीतरी चालत आहे हे त्यांना जाणवले. उशाशी असलेली बॅटरी हातात घेत त्यांनी पेटविली व सगळीकडे प्रकाश टाकून पाहिला देवळात कोणीही नव्हते. मात्र आवाज चालूच होता. तितक्यात दुरून ट्रकचा आवाज येऊ लागला व अवघ्या पाच मिनिटात ट्रक आला त्यातून ते घरी परतले. हा अनुभव त्यांनी दुसरे दिवशी आम्हाला सांगितला. विशेष म्हणजे एवढा अनुभव आलेला असूनही त्यांचा भुताखेतांवर फारसा विश्वास नव्हता. चर्चा करताना ते हा एक अतर्क्य अनुभव आहे हे मान्य करीत, पण ही भुताटकी आहे हे मान्य करीत नसत. नेहमीच त्यांचे म्हणणे देवळात भूत येईलच कसे हे असे

वा, वा. हा धागा पुन्हा सुरू झाला. किस्से वाचून घाबरायला मज्जा येते अगदी. Happy

अनंत छंदी, ते एखादं कुत्रं असू शकतं ना.

मामी,
वडिलांनी सर्वत्र बॆटरी मारून पाहिल्याचे वर लिहिले आहे. शिवाय जेथून आवाज येत होता त्या जागेपासून ते केवळ चार, पाच फ़ुटांवर होते.

व्वॉव .... हाउ हॉरीबल ना... Proud

मामी तुमचा एखादा मानविय किस्स इथे टाकायला हरकत नाही.

नको. विषयांतर होईल ते.
नाही नाही.... तुमच्यासाठी विषयांतर असेल ते... पण मला खात्री आहे की आम्हाला ते अमानवीयच असतील....... Happy Light 1

Pages