मायबोली गणेशोत्सव २०१९ समारोप.

Submitted by संयोजक on 18 September, 2019 - 01:16

नमस्कार मायबोलीकरहो,
मायबोली गणेशोत्सवाचे हे यंदाचं २० वे वर्ष. जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले मायबोलीकर ज्यांना इच्छा असूनही गणपतीत घरी जाता येत नाही अश्या सर्वांसाठी अगदी आपला घरचा उत्सव. उत्सव ऑनलाइन असला तरी यात आरत्या होत्या, पंचपक्वान्नांचा नैवेद्य होता, आरास सजलेली, विविध उपक्रम होते, पानाफुलांच्या रांगोळ्या सजल्या, स्पर्धा झाल्या. उत्सवात मायबोलीचं वातावरण पण एकदम उत्साहपूर्ण असते आणि म्हणूनच नेहमी उत्सव दणक्यात होतो.

यंदा स्पर्धा आणि उपक्रम काय ठेवावा यासाठी बराच किस पडला. शेवटी भरगच्च उपक्रम असावेत यावर सर्वांचे एकमत झाले. शब्दधन (सोळा आण्याच्या गोष्टी, चंद्र अर्धा राहिला आणि हास्यलहरी), काव्यतरंग (गझल, चित्रकाव्य आणि त्रिवेणी/हायकू), रुचकर मेजवानी (रॉक अँड रोल, आजीचा खाऊ, हॅव अ सूप), सामाजिक उपक्रम (आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा, सांस्कृतिक उपक्रम (रांगोळी), बालगोपालांचा मेळावा (करकटवलेली चित्रे, बालमुद्रा, बालवैज्ञानिक), खेळ (ओळखा पाहू- एक गंमत खेळ,झब्बू) असा भरगच्च कार्यक्रम यावेळी ठेवलेला.

सर्व स्पर्धांना कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळाला. सोळा आण्याच्या गोष्टी साठी दिलेल्या उदंड प्रतिसादासाठी यंदाचे मंडळ सर्व मायबोलीकरांचे आभारी आहे. बालगोपाळांसाठी यंदा काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले होते पण एकही प्रवेशिका आली नाही याची खंत वाटली. अर्थात यासाठी मंडळ उपक्रम पोहचवण्यात कमी पडले असेल. आपत्ती व्यवस्थापन प्रश्न आणि चर्चा या धाग्याचा भविष्यात मायबोलीकरांना फायदा होईल अशी आशा आहे. ओळखा पाहू खेळामुळे अनेक गावे त्यांच्या एका प्रसिद्ध गोष्टींमुळे लक्षात राहतील तर बरेच लेखकही पुन्हा त्यांच्या खास ओळींमुळे आठवले.

मतदानाऐवजी परिक्षण:
मतदान की परिक्षण याबद्दल मंडळाबाहेर जितक्या चर्चा झाल्या तितकाच किंबहुना थोडा अधिकच काथ्याकूट मंडळात हा निर्णय घेण्यादरम्यान झाला.... बाहेर जसे मतभेद होते तितकीच मतभिन्नता मंडळामध्येही होती पण एक टीम म्हणून काम करताना विविध शक्यतांचा विचार करून एका निर्णयाप्रत यावे लागते आणि एकदा खुप विचारांती एखादा निर्णय घेतला की एकमताने त्या निर्णयावर ठाम राहणे ही मंडळाची जबाबदारी असते!

परिक्षणाचा निर्णय झाल्यावरही, मंडळाबाहेरचा कमीत कमी एकतरी परिक्षक असावा यावर बहुसंख्य सदस्यांचे एकमत होते. परंतु, मंडळाची घोषणा होवून मंडळ स्थापन झाल्यानंतर उत्सवापुर्वी मिळालेल्या अल्पशा वेळेत, बाहेरचे परिक्षक शोधून त्यांचा होकार येईपर्यंत थांबण्याइतका पुरेसा अवकाश नव्हता. त्यामुळे परत एकदा खुप चर्चेअंती मंडळातल्या सभासदांनी परिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी मंडळावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मंडळ खरच खुप आभारी आहे!

मायबोली गणेशोत्सवात संयोजक आपापल्या परीने चांगलं काम करत असतात पण हे काम करत असताना, बाप्पांची सजावट आणि इतर जाहिराती व विजेत्यांची प्रमाणपत्रं अशी महत्वाची तसेच विशेष कसब असावी लागणारी कामे केल्याबद्दल मंडळ "अज्ञानी" यांचे आभारी राहील

गणेशोत्सवात काम करण्याची संधी दिल्याबद्दल admin व webmaster यांचे आभार आणि हो ज्यांच्यामुळे हा उपक्रम निर्विघ्न पार पडला अश्या सर्व मायबोलीकर वाचक, लेखकांचे विशेष धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया!! पुढल्यावर्षी लवकर या !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजकांनी घेतलेल्या मेहनतीसाठी आत, बाहेर, काठावर, परीक्षक, नॉन परीक्षक अशा सर्व संयोजकांचे अनेक आभार. तुम्ही आयोजनाची जबाबदारी उचलली म्हणुन उपक्रम आणि स्पर्धा होऊ शकल्या.

पण त्याच बरोबर हे सुद्धा म्हणेन की आजवरच्या सर्वात गलथान आणि बेजबाबदार संयोजनाचा नमुना म्हणजे ह्या वर्षीचा गणेशोत्सव.
परीक्षाणाबद्दलची सारवासारवी हास्यास्पद आहे.

खुप चर्चेअंती मंडळातल्या सभासदांनी परिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आणि या सगळ्या प्रवासात बहुतांश मायबोलीकरांनी मंडळावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मंडळ खरच खुप आभारी आहे!>>>> हा मानभावीपणा थक्क करणारा आहे! विश्वास कसला, सगळीकडे लोक प्रश्न विचारत होते, आक्षेप घेत होते. लोकांची नाखुषी उघड होती पण संयोजकांनी सरळ दुर्लक्षच करायचे ठरवले. हे जाणून बुजून होत आहे हे लक्षात आल्यावर काही लोक अजून वेळ का वाया घालवा अशा विचाराने गप्प बसले, काहींनी नाद सोडला, भाग घेतला नाही, काही अजून बोलत, निषेध करत राहिले.
वर आता "विश्वास दाखवल्याबद्दल" आपलीच पाठ थोपटून आभार प्रदर्शन हे खरंच विनोदी अहे! धन्य!

मैत्रेयीशी सहमत. स्पर्धा नाविन्यपूर्ण होत्या, पण सहभाग (शशक सोडता) किती कमी होता. स्पर्धा छान आणि संयोजन वाईट होतं.

यावर्षीचा गणेशोत्सव छान पध्दतीने अरेंज केल्याबद्द्ल संयोजकांचे आभार व अभिनंदन.

यावेळी घोषणा तशी उशिराच झाली होती तरी हाती असलेल्या कमी वेळात तुम्ही चांगलं संयोजन केलं. शशक स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व रिस्पॉन्समुळे तर एक वेगळाच माहौल क्रिएट झाला होता. रोज नवनवीन गोष्टी वाचायला, समजून घ्यायला मजा आली.
बाकी कोणाचा निगेटिव्ह फीडबॅक लर्निंग म्हणून घ्यायचा आणि कोणाचा ट्रोलिंग म्हणून इग्नोअर मारायचा हे तुम्हाला कळत आहेच Happy

मैत्रेयीला अनुमोदन.
या संयोजक मंडळाची संपूर्ण उत्सवातली वर्तणूक पारदर्शीतर नव्हतीच, पण निष्काळजी आणि अरेरावीची होती. यंदाच्या उत्सवात भाग घ्यावासा वाटला नाही.

हा दहा दिवसाचा उत्सव मंडळाने उत्साहाने पार पाडला याबद्दल संयोजन मंडळाचे अभिनंदन आणि आभार.

संयोजनासाठी वेळ फारच कमी होता. त्यामुळे थोड्या कमी स्पर्धा ठेवल्या असत्या तरी चालले असते असे वाटून गेले. थोड्या स्पर्धा पण त्या व्यवस्थित आखल्या गेल्या तर जास्त मजा येते.

शिवाय आपण संयोजन करत असलेला उत्सव वादावादी न होता खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडला जावा ही संयोजन मंडळाचीच जबाबदारी असते. ते यंदा घडले नाही याचे वाईट वाटले. असो.

यंदाच्या संयोजन मंडळात कोण कोण होते ते समारोपात खाली लिहायला हवे.

हा दहा दिवसाचा उत्सव मंडळाने उत्साहाने पार पाडला याबद्दल संयोजन मंडळाचे अभिनंदन आणि आभार. संयोजनासाठी वेळ फारच कमी होता. त्यामुळे थोड्या कमी स्पर्धा ठेवल्या असत्या तरी चालले असते असे वाटून गेले. थोड्या स्पर्धा पण त्या व्यवस्थित आखल्या गेल्या तर जास्त मजा येते. >> +१

पण परिक्षकांऐवजी मतदान असते तर कमी गोंधळ झाला असता असे वाटून गेले.

संयोजकांना (चे नाही) उत्सव आयोजित केल्याबद्द्ल धन्यवाद. तुम्ही पुढे होऊन संयोजनात भाग घेतलात म्हणून उत्सव पार पडला. Happy

वरच्या हाब, मै, स्वाती यांच्या प्रतिक्रियांशी सहमत. मतदान का नाही याबद्द्ल एखादा तरी मुद्दा समजला असता, निदान मुद्दा अ‍क्नॉलेज करुन आता ते शक्य नाही इतपत जरी संयोजकांनी लिहिलं असतं तरी गणपतीत उगा वाद नको म्हणून मी आणि इतरांनीही माघार घेतली असती याची खात्री वाटते. पण तेव्हा तर नाहीच आजही 'काथ्याकूट झाला आणि विचारांती निर्णय घेतला' असं काहीतरी मोघम लिहिलंय. तोच 'विचार' काय होता हे अजुनही लिहिलं नाहिये. बरं परिक्षण करणार तर बरोबर जे काही बेसिक एथिक्स पाळले पाहिजेत ते अगदीच पायदळी तुडवले गेले. असो.

पुढच्या वेळी लक्षात ठेवा, जेन्युअनली लिहित चला. चुका झाल्या तरी स्वच्छ मनाने केलेल्या चुका तुलनेने सहज डोळ्याआड करता येतात. पण मानभावीपणा फार चटकन समजतो आणि मग लोकं दूर लोटली जातात. अशी मखलाशी आऊटराईट अरेरावीची दिसते.

एकदा मनाशी विचार करा पाककृती, कविता, झब्बू, मुलांचे खेळ ह्या हमखास यशस्वी उपक्रमांना किरकोळ किंवा शून्य प्रवेशिका आल्या त्याचं कारण काय असेल? 'उपक्रम पोहोचवण्यात यशस्वी झालो नाही' हे तर आहेच, पण त्यापेक्षाही मंडळ रिचेबल न्हवतं. आपलेपणाची भावना, ओलावा अजिबात जाणवत न्हवता.
असो.
इष्टकामसमृध्यर्थ्ं पुनरपि पुनरागमनायच. मंगलमूर्ती मोरया!

खरं सांगायला गेलं तर सुरुवातीलाच या संयोजक मंडळातील काही मंडळीच्या उतावीळपणामुळे नकारात्मक मत झालं होतं, आणि त्यात गझल स्पर्धेने तर अजून भर घातली,
पण....
या मंडळातील लोकांना अडमीन किंवा वेबमास्टरने काही पगारी नोकर ठेवलं नव्हतं. स्वतःच्या बिजी स्केडुल मधून वेळ काढून त्यांनी ही जबाबदारी शिरावर घेतली होती. बरेच महाभाग आज मुद्दाम या धाग्यावर उनीदुणी काढायला उगवलेले दिसतायेत, मग स्वतः संयोजक मंडळात का भाग घेतला नाही? की अडमीनने तुमचा आय डी ब्लॉक केला होता तेव्हा? टिपिकल कोती मनोवृत्ती दिसतेय, सगळं यथासांग पार पडल्यावर आयोजकांना नावे ठेवण्याची. आम्ही किती ग बै हुशार, आमचं सगळं किती किती छान, परफेकत, गोड गोड, बघा, किती गोंधळ घातला यांनी, हे सगळं लग्नसमारंभ उरकून गेल्यावर उरलेल्या काकूंबाईंसारखं काम झालं. (काही काकवा तर आजच उगवल्यात! नाहीतर त्यांचा अड्डा आहेच पडून राहायला.)
मोर or लेस, इट्स थँकलेस जॉब, बट स्टील थँक यु संयोजक मंडळी, यु रियली डिड अ ग्रेट जॉब. पुढच्या वेळी स्वतःहून या उत्साही किडेकरूंना विपु करा, आणि संयोजक मंडळात ढकला. ते मानभावीपणे नकार देतीलच याची खात्री आहेच.
पुन्हा एकदा संयोजक मंडळाचं अभिनंदन!!!!
Aaradhya, 'सिद्धि', मधुरा कुलकर्णी, स्वरुप, mayu4u, अज्ञानी, अभि_नव तुम्हा सगळ्यांच अभिनंदन!!!!

टिपिकल कोती मनोवृत्ती दिसतेय, सगळं यथासांग पार पडल्यावर आयोजकांना नावे ठेवण्याची. आम्ही किती ग बै हुशार, आमचं सगळं किती किती छान, परफेकत, गोड गोड, बघा, किती गोंधळ घातला यांनी, हे सगळं लग्नसमारंभ उरकून गेल्यावर उरलेल्या काकूंबाईंसारखं काम झालं. (काही काकवा तर आजच उगवल्यात! नाहीतर त्यांचा अड्डा आहेच पडून राहायला.) >>

नक्की कोणावर रोख आहे ते स्पष्ट लिहिलं नाहीयेत तुम्ही. पण समझनेवाले को इशारा ,,,

मैत्रेयी , पराग , अमित , धनि हे २०१७ सालच्या गणेशोत्सवाच्या संयोजनात होते. स्वाती आंबोळे संयुक्ताच्या व्यवस्थापनात होत्या , दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर होत्या, मुख्य संपादिका होत्या. गणेशोत्सवाकरता ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करुन पाठवलेली आहे . इतरही उपक्रमांचा अनुभव असेल या सर्वांना. हायझनबर्ग यांनी देखील एस्टी वाय ची सुरुवात लिहून दिलेली आहे.

मोर or लेस, इट्स थँकलेस जॉब, >> ते संयोजक मंडळात आणि इतर उपक्रमात यशस्वीपणे भाग घेतलेल्या सर्वांना माहित आहे.

आडून आडून काही आयडींविरुद्ध आणि बाफं विरुद्ध बोलायचंच असेल तर निदान डिफेंसिबल बोला.

आपण संयोजन करत असलेला उत्सव वादावादी न होता खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडला जावा ही संयोजन मंडळाचीच जबाबदारी असते. ते यंदा घडले नाही याचे वाईट वाटले >> मामीला अनुमोदन.

महाश्वेता, एकदा एका कार्यात स्वतःच्या इच्छेने भाग घेतला की त्यातुन पगार मिळतो की नाही याचा फरक पडत नाही. कोणीही जबरदस्तीने पाठवलेले नसते की ‘जा आम्हाला नाही करायचे, तुम्ही करा‘. स्व आनंदासाठीच सगळे स्वयंसेवक होतात. ‘जबाबदारी घेतली ना? मग आता मी ती नीट पार पाडणार’, हा विचार महत्वाचा. इथे हा विचार संयोजकांच्या दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीतुन आमच्यापर्यंत पोचला नाही दुर्दैवाने.

भाग घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन व धन्यवाद.

विजेत्यांचे, स्पर्धकांचे आणि संयोजकांचे अभिनंदन!

संयोजकांना संयोजनासाठी खूपच कमी वेळ मिळाला. त्या कमी वेळात केलेले आयोजन वाखाणण्यासरखेच होते.
"सोळा आण्याची गोष्ट" हा अभिनव उपक्रम होता आणि त्याला प्रतिसादही छान मिळाला.
व्यक्ति तितक्या प्रकृती , तेव्हा प्रत्येकाला खूष करणे शक्य नसतेच.

तर संयोजक, थम्स अप फॉर यू !

संयोजक मंडळींचे अभिनंदन.
येथील प्रतिक्रिया मराठी मंडळींसाठी शोभून दिसतात. फारसं मनावर घेऊ नये. Happy . अहो संयोजक आपल्यातीलच हौशी मंडळी आहेत हे विसरू नका. .

पुढच्या वर्षी लवकर या.

संयोजक मंडळीचे अभिनंदन..

कमी वेळ असूनही छान आयोजन केलं तुम्ही..

शुगोल ह्यांच्या प्रतिसादाला अनुमोदन..
>>
व्यक्ति तितक्या प्रकृती , तेव्हा प्रत्येकाला खूष करणे शक्य नसतेच<<<<

शशकचा रिस्पाॅन्स सांगतोय तुम्ही हिट आहात..
प्रत्येकाने आपला उजवा हात पाठीवर टॅप करा आणि माझ्यातर्फे स्वतःलाच म्हणा...I (You) did great job...!!!

संयोजक मंडळाचे अभिनंदन.

फॉर अ चेंज, यंदाच्या सगळ्या स्पर्धा व उपक्रम खूप चांगले होते. संयोजकांच्या कल्पकतेला सलाम!!! त्यामानाने काही ठिकाणी अत्यल्प प्रतिसाद बघुन वाईट वाटले.

कार्यक्रम घोषित करायला उशीर झाला. अत्यल्प प्रतिसादाचे ते एक कारण असावे व संयोजक मंडळाचा इतर लोकांशी किंवा भाग घेऊ शकणाऱ्या लोकांशी रॅपो नसणे हे अजून दुसरे असावे. जवळपास प्रत्येक वर्षी शेवटच्या दोन तीन दिवसात सहभाग अचानक वाढतो हे पाहिले आहे. याला कारण एकतर लोक घरच्या गणपतीतून थोडे मोकळे झालेले असतात आणि दुसरे म्हणजे संयोजक व्यक्तिशः लोकांना भाग घ्यायला प्रवृत्त करतात. असो.

नाउमेद वगैरे व्हायची आवश्यकता नाही. जिथे प्रतिसाद लाभला तिथे तो भरघोस लाभला. ओळखा पाहू गंमतखेळ खूपच चांगला झाला. त्या निमित्ते नवी गावे कळली, लेखक व पुस्तके परत आठवली. शशकने न-लेखकांनाही लेखक बनवले Happy Happy गंमत म्हणजे 'आता बस्स झाले, शशक आवरा' असे वाटायला लागेतो एखादी चांगली शशक यायची..

संयोजक मंडळ व्यक्तिशः सर्वत्र दिसत असताना जिथे लोक हाकारे घालुन त्यांना बोलावून प्रश्न विचारत होते तिथे ते अनुपस्थित होते हे खूप खटकले. असे व्हायला नको. लोकांना प्रश्न पडले असतील तर त्यांची योग्य अयोग्य जी काय असतील ती उत्तरे यायला हवीत.

यंदाच्या मंडळातले अनेक / बहुतेक संयोजक पहिल्यानेच संयोजनात भाग घेतलेले होते. आधीच्या गणेशोत्सवांत कधी सहभाग न घेतलेलेही अनेक होते. त्यांच्या हाताशी आलेला वेळ कमी होता, तरी उपक्रम भरगच्च होते. त्याबद्दल कौतुक. भरगच्च गणेशोत्सवाबद्दल अभिनंदन आणि आभार!

त्रिवेणी, हायकू , गझला हे तिन्ही काव्यप्रकार तंत्रकिचकट होते.

संयोजकाचा झगा घातल्यावर वैयक्तिक भावभावना बाजूस सारणे अपेक्षित असावे. संयोजक मंडळ टीका करणार्‍या प्रतिसादांची दखल घेत नाहीत, असे जाणवले. मग तो या धाग्यावर दाखवलेला साधा चुकीचा शब्द वापरल्याचे सांगणारा प्रतिसाद का असेना!

गावे ओळखायच्या खेळातली अनेक नावे तालुका किंवा जिल्ह्यात जगप्रसिद्ध थाटाची होती.

आमची बॅट , आमची पिच लॉजिक इथे कसे बसेल? संयोजक हे समस्त माबोकरांचे प्रतिनिधी असतात. गणेशोत्सवही मा यबोलीकरांसाठी असतो. संयोजकांच्या मालकीचा नसतो - त्याबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचा असला तरी.

यावेळी घोषणा तशी उशिराच झाली होती तरी हाती असलेल्या कमी वेळात तुम्ही चांगलं संयोजन केलं. शशक स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व रिस्पॉन्समुळे तर एक वेगळाच माहौल क्रिएट झाला होता. रोज नवनवीन गोष्टी वाचायला, समजून घ्यायला मजा आली.
बाकी कोणाचा निगेटिव्ह फीडबॅक लर्निंग म्हणून घ्यायचा आणि कोणाचा ट्रोलिंग म्हणून इग्नोअर मारायचा हे तुम्हाला कळत आहेच. +१११

खूप छान झाला गणेशोत्सव...
कोणते माबोकर लेखक म्हणून, संयोजक म्हणून, आणि एक व्यक्ती म्हणून कसे आहेत, ते फार चांगल्या पद्धतीने उलगडलं गेलं...
आणि कोणत्याही उत्सवाचे हेच उद्दीष्ट्य असतं असं मला वाटतं... Happy

संयोजक मंडळाचे अभिनंदन.
कार्यक्रम घोषित करायला उशीर झाला. अत्यल्प प्रतिसादाचे ते एक कारण असावे व संयोजक मंडळाचा इतर लोकांशी किंवा भाग घेऊ शकणाऱ्या लोकांशी रॅपो नसणे हे अजून दुसरे असावे. जवळपास प्रत्येक वर्षी शेवटच्या दोन तीन दिवसात सहभाग अचानक वाढतो हे पाहिले आहे. याला कारण एकतर लोक घरच्या गणपतीतून थोडे मोकळे झालेले असतात आणि दुसरे म्हणजे संयोजक व्यक्तिशः लोकांना भाग घ्यायला प्रवृत्त करतात. असो.
नाउमेद वगैरे व्हायची आवश्यकता नाही. जिथे प्रतिसाद लाभला तिथे तो भरघोस लाभला >> साधनाच्या पोस्टच्या या भागाला +१

Pages