तू....तूच ती!! S२ भाग ८

Submitted by किल्ली on 11 January, 2019 - 02:04

आधीचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा:
भाग १ : https://www.maayboli.com/node/66728
भाग २ : https://www.maayboli.com/node/66880
भाग ३ : https://www.maayboli.com/node/67283
भाग ४ : https://www.maayboli.com/node/67712
भाग ५ : https://www.maayboli.com/node/68160
भाग ६ : https://www.maayboli.com/node/68226
भाग ७ : https://www.maayboli.com/node/68459

श्रुती म्हणाली, "जास्त वेळ नाही घेणार मी तुझा. एवढंच विचारायचं होतं की काल रात्री तू आणि तुझी टीम जे महत्वाचं काम करत होता, त्या टीममध्ये सौम्या होती का? रात्रभर काम करत तीही जागलीये का? "
आदित्य: "हो, सौम्याचं module involved होतं ना, तीही bug fixing करत होती. पण मी तिला म्हटलं की, ऑफिसला येऊ नको. घरून काम कर. ती घरून connect झाली होती, तेव्हढी काळजी घेतो मी माझ्या employees ची"
"ओह! खरंच काळजी घेतोस तू त्यांची? वाटत नाही तसं " श्रुती तिरकसपणे म्हणाली.
आदित्य: "तुला नेमकं काय म्हणायचं आहे श्रुती? का चिडली आहेस सकाळी सकाळी माझ्यावर?"
श्रुती: "मला काय म्हणायचं आहे हे अजून समजलं नाही तुला आदित्य. आज सौम्याचा साखरपुडा आहे. तू हे पूर्णपणे विसरून गेलास आणि तिला काम करायला लावलस. आज तिला फ्रेश राहणं गरजेचं आहे. खूप मोठा दिवस आहे तिच्या आयुष्यातला आणि ज्या दिवशी तिचे लाड होणं अपेक्षित आहे त्यादिवशी तिची झोपेची किमान गरज पूर्ण झालेली नाहीये. Thanks to her employee friendly boss! "
"ओह नो, मी खरंच विसरलो गं. असं कसं वागलो मी हेच समाजात नाहीये मला. एक तर कामाचं खूप टेन्शन होतं. त्यात अचानक तू भेटलीस. ह्या सगळ्या गडबडीमुळे माझा कालचा दिवस किती विचित्र गेला माहितेय ना तुला. मला खरंच सौम्याबद्दल वाईट वाटत आहे. "
श्रुती: "आदित्य निष्काळजीपणाची हद्द केलीस तू. तुला माहितेय ना की तुझ्या कुठल्याही production issue पेक्षा महत्वाच्या लग्न, साखरपुडा ह्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी असतात. त्यात सौम्याचा प्रेमविवाह आहे. मोठ्या मुश्किलीने त्यांनी घरच्यांना लग्नासाठी होकार द्यायला तयार केलं होतं. समजा काही झालं असतं, तर तिच्या सासरचे लोक किती आणि काय काय बोलले असते? त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हे क्षण ती परत जगणार नाहीये. आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर वेळ घालवतानाचे हे खुप हळवे, सुंदर आणि तरल दिवस असतात. आयुष्यात एकदाच होतं असतं असं. "
"प्रेमही आयुष्यात एकदाच होत असतं श्रुती, त्यानंतर फक्त व्यवहारी संसार उरतो." आदित्य पुटपुटला
श्रुती: "काय?"
आदित्य: "काही नाही मी म्हणत होतो, तिने माझी तक्रार केली का तुझ्याकडे? तुला कसं कळलं सौम्याच्या साखरपुड्याचं?"
श्रुती: "काल तिने मला तिच्या साखरपुड्याचं निमंत्रण द्यायला फोन केला होता. तिने आग्रहाने बोलवलंय.
सौम्या गोड मुलगी आहे, तिने तक्रार तर केली नाहीच. शिवाय ती मला म्हणाली की आदित्य सरांबरोबर काम करताना खुप शिकायला मिळतंय. कोडिंगची मजा येते म्हणे."
खरं तर आयुष्यात एकदाच होणाऱ्या पहिल्या प्रेमाला वाट पाहायला लावून आपणही त्रासदायक वागलोय हे लक्षात न येता श्रुती भडाभडा बोलत होती. आदित्यच्या मनात तिची बोलणी खाताना तिच्याबद्दल असं काही आलं नाही. मात्र इतक्या दिवसांनी तिच्याबरोबर आपल्या प्रेयसीबरोबर झालेल्या ह्या मोठ्या संवादामध्ये अशा विषयावर स्पष्टीकरण द्यावे लागतेय आणि अपेक्षित असलेले गोड बोलणे किंवा किमान सहज साधा संवाद न होता भांडणच होतेय म्हणून त्याला वाईट वाटत होते. अजून किती मानसिक अवस्थांच्या चढउताराला सामोरे जायचे आहे हे त्याला कळेना. हे सगळे सहन न होऊन तो म्हणाला, "मी सौम्याची माफी मागेन. श्रुती मी तुझा चूक दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे. आता तुझं चिडचिड करून झाल असेल तर मी झोपायला जाईन म्हणतो. I am physically and mentally tired. I need to take a rest very badly."
“काय केलं मी हे, बिचाऱ्याची दिवसाची सुरुवात बिघडवली मी. शेवटी त्याला परत एकदा बोलून दाखवावं लागलं की मला झोपू दे. मी दरवेळेला अशीच माती खाते. तो तर काहीच बोलत नाही. सांगायला गेले एक आणि झालं भलतंच. त्याची माफी मागितली पाहिजे. आता जर हे नाही केलं तर उशीर होईल आणि गोष्टी अजून कठीण होत जातील.”
श्रुती असा विचार करून त्याला बोलेपर्यंत आदित्य रूममध्ये गेला होता. खरंच उशीर झाला होता. जे नातं परत फुलणार होतं ते पुन्हा एकदा कोमेजलं होतं.”
“आपण त्याला साधा चहा सुद्धा विचारला नाही. आता नाश्त्याची वेळ होतेय खरं तर. घरात दोघे असताना आता मी एकटीच खाणार आहे. श्रुती खूप स्वार्थी आहेस गं तू. “
अशा विचाराने श्रुतीच मन खाऊ लागलं. आदित्य उठल्यानंतर त्याच्यासोबतच खाऊया, मग तो जेव्हा उठेल तेव्हा खाणं झालं तरी चालेल. असं ठरवलं तेव्हा कुठे श्रुतीला बरं वाटलं. तिने किचन मध्ये जाऊन एक कडक कॉफी बनवायचे ठरवले. पण कॉफी बनवायला घेतली आणि पुन्हा आदित्यबरोबरच्या सकाळी घडलेल्या तिच्या वाईट वागणुकीची आठवण येऊन रडू येऊ लागलं.
एक गोष्ट तिला समजली नव्हती की, तिचा मुद्दा नेहमी बरोबर असतो. ती योग्य वेळी एखाद्या व्यक्तीसमोर तो मुद्दा मांडते सुद्धा. पण ती ज्या प्रकारे मांडते तिथे काहीतरी चुकतं आणि माणसं दुरावतात. ह्याला फटकळपणा म्हणावं कि स्पष्टवक्तेपणा ह्याचा थोडासा गोंधळच आहे. पण गोष्टी थोड्या सौम्य करून सांगितल्या आणि त्या सांगण्याची पद्धत बदलली तर श्रुतीसारखी चांगल्या स्वभावाची मुलगी नाही कोणी. एखादा चारी बाजूंनी तीव्र कोपरे असलेला ठोकळाजर त्वचेवरून सरकत गेला तर लागतं, वेदना होतात. पण त्याचे कोपरे घासून गुळगुळीत केले, त्या ठोकळ्याचा चेंडूसारखा गोल आकार बनवला तर तो कुठेही आघात न करता अलगद घरंगळत जातो. श्रुतीच्या बाबतीत नेमकं हेच करण्याची गरज होती. तिच्या स्वभावातले फटकळपणाचे कोपरे काढून टाकण्याची!
नेमकी तिच्या स्वभावाची ही बाजू तिला माहित नसल्यामुळे तिच्या स्वभावात काहीही फरक पडला नव्हता. जे जवळचं मित्रमंडळ होतं त्यांना तिचा हा गुण माहीतच नव्हता कारण त्यांच्याबरोबर ती व्यवस्थित वागायची. आता आदित्यनेच तिला ही गोष्ट समजवून सांगायला हवी होती. पण गम्मत अशी की लवकरच ती वेळ येणार होती हे त्यालाही माहित नव्हतं.
आदित्य दमला असल्यामुळे पडल्या पडल्या लगेच झोपला. सुमारे ४-५ तास झोपल्यानंतर त्याला जाग आली. फ्रेश होऊन तो बाहेर आला तेव्हा त्याला श्रुती घरात दिसली नाही. आदित्य किचनमध्ये डोकावला. तिथे जेवण बनवून तयार होतं. कुक दादा येऊन गेले वाटतं असं मनाशी म्हणत त्याने जेवण वाढून घेतले. जेवण्यापूर्वी एकदा श्रुतीला विचारावे जेवलीस का म्हणून त्याने तिला घरभर शोधले. तिच्या रूमच्या दरवाजा बंद होता. त्याने हाका मारल्या पण उत्तर आले नाही. त्याला समजेना ही कुठे गेली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. श्रुती बागेत होती. तिथे ती फोनवर बोलत होती. आदित्य हळूच तिच्या मागे गेला आणि तिच्या डोक्यावर टपली मारली. त्याच्या ह्या कृतीमुळे त्याला सकाळच्या घटनेमुळे राग नाही आला, त्याने ते खेळीमेळीने घेतले हे श्रुतीला एका क्षणात समजले. एकेकाळी रोज सोबत राहिले होते ते दोघे! एव्हढं तर एकमेकांना नक्कीच ओळखत होते.
मघासपासून श्रुतीच्या मनावर जो ताण होता तो नाहीसा झाला. आदित्यचा स्वभाव होताच तसा! पटकन मन जिंकून घेणारा! श्रुतीचं बोलणं संपलं तसं तिने फोन ठेवला व ते दोघे घरात आले.
आदित्य: "चल जेवूया, खूप भूक लागलीये. मुख्य म्हणजे झोप झालीये. जेवणही गरम आहे. आपले कुक दादा एकदम भारी आहेत बरं का., पण तुला एव्हाना लक्षात आला असेलच की ते चवदार स्वयंपाक करतात ते. आज तर माझ्या आवडीचं जेवण आहे. खमंग वास दरवळतोय. घेऊ का तुझं ताट?"
श्रुती: "कित्ती वेळ झोपलास तू आदित्य, पण बरं झालं आराम केलास ते. आता फ्रेश दिसतोयस. सकाळी चेहऱ्यावरून एकदम दुःखीकष्टी वाटत होतास."
आदित्य: "चला, म्हणजे फायनली तुला माझ्याकडे बघायला वेळ मिळाला. बरोबर आहे, सकाळी उपदेशाचे डोस पाजून झाले आहेत. आता गोड बोलते आहेस. हो ना?"
श्रुती: "तुला खरंच असं वाटतं?"
"गम्मत करतोय गं बाई, कुठल्या गोष्टी कधी गंभीरपणे घ्यावात हे तुला कधी समजणार आहे काय माहित." आदित्य श्रुतीसाठी वाढून घेत म्हणाला.
ऐक ना, मला ती वांग्याची भाजी नको वाढूस. आवडत नाही. बाकी सगळं चालेल.
आदित्य: "काय? भरली वांगी आवडत नाहीत? अगं एकदा खाऊन तर बघ, मूड चेंज होईल. "
श्रुती: "नको रे, मी जास्त मसालेदार खात नाही. साधं जेवण आवडतं"
आदित्य: "अमेरिकेत जाऊन आलीस तरीही आवड बदलली नाही म्हणायची. मग स्वभाव पण तसाच आहे का, कोणालाही सोबत न घेता, न सांगता-सवरता, आपापल्या विश्वात राहण्याचा?"
श्रुती: "फार त्रास दिला का रे तुला मी? मला खरंच तसं करायचं नव्हतं रे. मला तुला सगळं खुप सांगायचं आहे"
आदित्य: "हा विषय आता नको श्रुती. मला व्यवस्थित जेवण करायचं आहे. सांगता सांगता मध्येच तुझा मूड बदलला तर भांडण करशील आणि जेवण राहून जाईल. दुसऱ्या विषयावर बोलू आपण."
"मी तुला एवढी त्रास देत असेल तर का बोलतोयस माझ्याशी, राहू दे. नाही सांगणार" श्रुती पोळीचा घास चिवडत म्हणाली.
आदित्य: "अगं वेडे, बघ पुन्हा सिरिअसली घेतलंस. आता आपण बोलत बसलो तर उशीर होईल आणि सौम्याच्या साखरपुड्याला जायचंय ना तुला. अजून तयार झाली नाहीयेस. त्यामुळे आता नको बोलूया एवढच म्हटलं मी. माझं जेवण फास्ट होतं. बघ, तू अजूनही पोळीच खात आहेस" आदित्य वरण-भात बोटांनी कालवत म्हणाला.
श्रुती: What do youn mean by मला साखरपुड्याला जायचंय, तुही येतो आहेस ना? तू यायलाच हवस. सगळे जुने लोक भेटतील पुन्हा कंपनीतले, गप्पा होतील. मुख्य म्हणजे सौम्या किती आनंदी होईल? हे सगळं खुप मिस केलं रे गेल्या काही वर्षात."
"म्हण ना श्रुती की तू मला मिस करत होतीस, पण नाही, तू असं बोलणार नाहीस. मलाच बोलावं लागणार आहे." आदित्य मनात विचार करत होता.
“ठीके येतो चल, पण तुला चालेल ना माझ्यासोबत यायला? आणखी एक गोष्ट मघासपासून विचारीन म्हणतो, तू माझ्या बाईकला का हात लावलास? मला आवडत नाही हा. आज मी त्याच बाइकवरून जाणार आहे कार्यक्रमाला. बघ येतेस का सोबत?” आदित्य डोळे मिचकावत म्हणाला.
"जा तू बाईकने मी येईल माझी माझी"
चिडणार नाही ती श्रुती कसली. तिने ताट सिंकजवळ नेऊन ठेवले, हात धुतला आणि फणकाऱ्याने रूममध्ये जायला निघाली. आदित्य हसतच होता. त्यामुळे ती जास्तच चिडली.
"जरा बरे कपडे घालून लवकर तयार हो श्रुती, वाट पाहतोय" हे आदित्यचे शब्द ऐकतच ती रूममध्ये शिरली आणि दरवाजा लावून घेतला. आदित्यही खरकटा हात धुवून तयार होण्यास गेला. थोड्याच वेळात आदित्य तयार झाला. तिला तयार व्हायला अजून वेळ असेल असं गृहीत धरून तो लॅपटॉपवर काहीतरी फुटकळ काम करत बसला. त्याला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी हार्ड डिस्क लागणार होती. त्याची हार्डडिस्क त्याने मित्राला दिली होती. श्रुतीकडे असेल तर तिला विचारावं म्हणून तो तिच्या रूमच्या दरवाज्यावर नॉक करू लागला. श्रुतीचं आवरलं होतं. दरवाजा उघडून ती बाहेर आली. आज आदित्यचा बहुतेक श्रुतीला पाहून घायाळ होण्याचा दिवस होता. अबोली रंगाचा फ्लोर लेंग्थ अनारकली कुर्ता, त्यावर मॅचिंग झुळझुळती ओढणी असा ड्रेस तिला खुलून दिसत होता. हलकासा मेकअप, गळ्यातली नाजूक साखळी आणि त्यावर सूट होणारे कानातले, एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात नेहमीच घड्याळ अशा पेहेरावात श्रुती गोड दिसत होती. तिच्या कपड्यांचा अबोली रंग जणू गालावर सांडला होता. त्यामुळे तिच्या लुकची खुमारी अजूनच वाढली होती. आदित्य तिच्याकडे स्तिमित होऊन पाहतच राहिला.

“आवरलं माझं, ठीक आहे ना?" श्रुती कॉम्पलिमेन्टच्या अपेक्षेने म्हणाली. कसं असतं ना, मुळात जिथे मुलींना प्रशंसेची अपेक्षा असते किंवा तू छान दिसतेस असं साधं वाक्य का असेना, ते त्या खास व्यक्तीकडून ऐकायचं असतं, तिथेच मुलांना appreciation देता येत नाही. एरवी बरीच बडबड करतील, पण मुलगी जेव्हा कॉम्पलिमेन्टची अपेक्षा करते तेव्हा नेमक्या त्याच क्षणी ही मुलं माती खातात.

"लाट उचंबळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे |
तसे गाली हासता तुझ्या व्हावे
उचंबळोनी लावण्य वर वहावे ||"
लहानपणी पाठ केलेल्या ह्या कवितेच्या ओळींचा अर्थ त्याला समजत होता. ह्या ओळी तिला बघून त्याच्या मनात रुंजी घालू लागल्या . पण बोलण्याचे धाडस होईना. काय बोलावे त्याला सुचेना. नुसताच वेंधळ्यासारखा पाहत राहिला. त्याची उडालेली धांदल पाहून श्रुतीला हसू आलं.
आदित्यचंही असंच झालं. काय बोलावे त्याला सुचेना. नुसताच वेंधळ्यासारखा पाहत राहिला. त्याची उडालेली धांदल पाहून श्रुतीला हसू आलं.

"आदित्य, निघूया, उशीर होतोय. त्या बाजूला किती ट्रॅफिक असेल ते माहित नाही. आताच निघालो तर वेळेवर पोहोचू, चल." असं म्हणून श्रुतीने पायात सॅंडल घातले. घराची चावी, पर्स, फोन वगैरे सोबत घेतलं आणि घराच्या मुख्य दरवाज्याजवळ जाऊन थांबली.
मघाशी राहून गेलेलं वाक्य आता बोलावं म्हणून आदित्य चाचरत बोलला, "श्रुती, ऐक ना.”
“काय रे”
“आपलं ते हे. मला तुला असं सांगायचं होतं की”
“बोल पटकन, उशीर होतोय रे”
"मला actually विचारायचं आहे तुला"
"हम्म, विचार"
“हार्डडिस्क आहे का तुझ्याकडे, दे ना,काम आहे थोडं, उद्या परत करतो”
"हे सांगायचं होतं का, काय रे, देईन आल्यावर. आता चल पण"
“मला जे सांगायचं होतं ते मी केव्हाच सांगितलंय श्रुती, आता तुझी उत्तर देण्याची टर्न आहे. वाट पाहायला लावून माझी वाट लावलीयेस.” आदित्य श्रुतीकडे रोखून बघत म्हणाला.
"मी मी, ... ,
पार्किंग मध्ये थांबतेय. ये तू."
पुन्हा एकदा उत्तर टाळून श्रुती आदित्यसमोरून निघून गेली होती. महत्प्रयासाने हवं ते नेमकं त्याने विचारलं होतं आणि त्याची निराशा झाली होती.

पण त्याला कुठे माहित होतं की आशा निराशेच्या ह्या खेळाची उजवी बाजू त्याला दिसणार होती. आदित्यपासून दूर राहून त्याच्या खऱ्या प्रेमाला समजून घेणारी श्रुती लवकरच मनातली गोष्ट तिच्या हटके style मध्ये त्याला सांगणार होती!!!!
(क्रमशः )
----------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mstch...

धन्यवाद Urmila Mhatre , पुढचा भाग लवकरच लिहीण्याचा प्रयत्न करते Happy

@pravintherider

आज रात्री लिहीते

रोज मायबोली वर चक्कर टाकतोय.>>> धन्यवाद खुप सारे

आज बर्‍याच दिवसा/म्नी इकडे आले, मायबोलीवरच्या सगल्या नव्या गोश्टी वचल्या
तुमची ही कथा खुपो आवदते मल्ला
लवकर पोस्ट करा पुधचा भाग.....................................

छान आहे लेख
पुढचा भाग लवकर टाका ना...

Pages