स्पिती - मंतरलेले दिवस ! .... समारोप

Submitted by सव्यसाची on 13 November, 2017 - 23:34

आषाढ कृष्ण नवमी (१८ जुलै) - मुंबई

आता सकाळी कश्मीरी गेटला पोचतानाच जाग आली. बाहेर पडलो सामान ताब्यात घेतले आणि रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला मेट्रो स्थानक आहे हे कळल्यावर पलीकडे गेलो. उतरलो तेव्हा थोडीशीच का होईना थंडी होती. पण पलीकडच्या बाजूला जवळपास दीड किलोमीटर चालावे लागले त्यात सगळी थंडी पळाली आणि घामाघूम झालो. वेलकम टू दिल्ली ! मेट्रो स्थानकात शिरलो आणि घामाच्या पटीत वाढ झाली. मेट्रोची गाडी जरी वातानुकूलित असली तरी विमानतळाचे स्थानक सोडल्यास बाकी स्थानकात सगळीकडे वातानुकूलन बंद ठेवले होते. सोय नक्कीच असणार पण मग पैसे कोण खाणार? तरी नशीब गर्दी कमी होती. त्यामुळे पटकन तिकीट काढून गाडीत बसलो. पण हे सौख्य फक्त दोन स्थानकांचेच होते. तिथून एका मध्यवर्ती स्थानकात पोचलो. इथे आपल्या दादर स्थानकासारखी तूफान गर्दी होती. तिकिटासाठी लांबच लांब रांगा होत्या. मी एक रांग पकडून उभा राहिलो. आणि मग फुटलेल्या घामाची महती काय वर्णावी ! अगदी पार नखशिखांत भिजलो. डोक्यावरून घाम खाली येऊन हातावरून ओघळून बोटांवरून खाली धारेच्या स्वरूपात पडत होता आणि मी हताश मुद्रेने शांतपणे आलिया भोगासी म्हणत उभा होतो. खिडकीपाशी पोचल्यावर त्याने मला विमानतळाचे तिकीट तिकडे आहे असे म्हणून झिडकारले. पण खरंतर इथे मिळेल असं लिहिलेलं वाचूनच मी इथे उभा राहिलो होतो. पण नाहीच इथे असं म्हटल्यावर काय करणार ? मग तिकडे जाऊ लागलो तोच विमानतळाचे कर्मचारी वाटणारे कोणीतरी विचारू लागले की आपल्याला सामान चेकइन करायचे आहे काय. या मेट्रो स्थानकात जेट एअरवेज आणि एअर इंडिया यांचे सामान चेक इन करता येते. आम्ही हो म्हटले पण त्यांचे भाडे ऐकून नको म्हटले. आणि तसे केले ते बरेच झाले. कारण फार तर पंधरा वीस मीटरवरतीच चेकइन ची सोय होती. मला थोडी धाकधूक होती की खरच इथून सामान विमानात जाऊन आपल्याला मुंबईला मिळणार का. पण सोय नक्कीच चांगली होती. कारण सामान विमानतळापर्यंत आपण न्यायची गरज नव्हती. त्यामुळे सामान चेकइन करून टाकलं. आता आम्ही सडेफटिंग झालो. इथे वातानुकूलन चालू होते. विमानतळाचे तिकीट काढायला वेगळी खिडकी होती. थोडक्यात काय तर मेट्रोचे व्यवस्थापन सरळसरळ भेदभाव करते. इथे आम्हाला फक्त विमान प्रवाशांसाठीच उपलब्ध असलेले स्वच्छतागृह मिळाले जे खूपच चांगले होते. त्यामुळे आमचे कामच झाले. पण त्या तळमजल्यावर असलेल्या इतर स्थानकांमध्ये जी काही घुसमट होत होती त्यात जर प्रचंड गर्दीमुळे रेटारेटी वगैरे झाली तर नक्कीच अनावस्था प्रसंग ओढवेल. हे मला त्या वेळेस जाणवले होते. आणि आता इथे एल्फिन्स्टन स्थानकात तशीच घटना घडली.

विमानतळावर आम्ही बऱ्यापैकी लवकर पोहोचलो होतो. त्यामुळे जरा वातानुकूलन असलेल्या उपहारगृहात काहीतरी खात बसलो. खाद्य अगदीच अखाद्य होते. गेले नऊ दहा दिवस किती मस्त पराठे वगैरे मिळाले होते. आणि आता हे कदान्न ! पोटपूजा केल्यावर तडक विमानतळात गेलो. इथे खऱ्या अर्थाने वातानुकूलन मिळाले. त्यामुळे निवांतपणे स्थिरावलो. विमान थोडे उशिरा निघाले. या जेटच्या विमानात उत्तम खायला मिळाले. मुंबईला बऱ्यापैकी वेळेत पोचलो. खोगीरं देखील व्यवस्थित मिळाली. आता प्रश्न टॅक्सीचा होता. उबेर वापरून आधी मला कोपरीला सोडून अक्षय ठाणे रेल्वे स्थानकाकडे निघून गेला. मी ते खोगीर खांद्यावर टाकून चालत घरी आलो. यावेळेस कसला सुटसुटीत प्रवास झाला होता. सगळे काही ठरवल्याप्रमाणे अचूक झाले होते. घरात निवांतपणे अंघोळ करून तंगड्या वर करून चंद्रतालचे दिवस आठवत पडलो.

समारोप

लडाख आणि स्पिति वारी या दोन वाऱ्या दुचाकी वरून करायच्याच असं स्वप्न होतं ते यावर्षी पूर्ण झालं. आता मला स्वत चालवत चारचाकीमधून काही ठराविक भाग परत बघायचे आहेत. बघू कधी जमते ते. दिल्लीमध्ये झूम कार किंवा खाजगी संस्थांकडे एसयूव्ही भाड्याने मिळतात स्वतः चालवण्याकरता. तसे करता येईल. लडाख आणि स्पिति तुलना केली तर लडाखमधील अंतरं जास्त आहेत. पण स्पितीच्या मानाने रस्ते खूपच चांगले आहेत. स्पितीमध्ये रस्ते नाहीतच असा म्हणणं इष्ट ठरेल कदाचित. म्हणूनच इकडे अजूनही कमी गर्दी येत असावी. अर्थात, इकडे लडाखसारखे अति उंच घाट नाहीयेत हेही आहेच. पण इथले ओढे तोडीसतोड जबरदस्त आव्हान समोर ठेवतात हेही आहे. स्पिति थोडीशीच का होईना जास्त हिरवीगार आहे. स्थितीमध्ये पर्यटकांची संख्या कमी आहे. त्यामुळे जास्त निवांतपणा मिळतो. स्पिति अजून लडाख एवढे बाजारू झाले नाही.

प्रकर्षाने लक्षात राहिलेल्या काही गोष्टी म्हणजे

धुक्यातील जलोडी शिखर
सांगलाचे निवासस्थान
चिटकूलचा स्वर्गीय निसर्ग
काजातील स्थानिक कबड्डीची स्पर्था
वरून दिसणारी कि गुहा
चंद्रतालमधील मंतरलेला दिवस
भयंकर ओढे, खडतर रस्ता

अधिक फोटो पहाण्याकरता कृपया माझ्या फेसबूकला भेट द्या. hrushikesh bhide असा शोध घ्या. पहीला मीच दिसेन.
एवढे बोलून मी ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण करतो !

सव्यसाची

---

सर्व भाग

https://www.maayboli.com/node/64363 --- सुरवात
https://www.maayboli.com/node/64376 --- भाग २
https://www.maayboli.com/node/64383 --- भाग ३
https://www.maayboli.com/node/64394 --- भाग ४
https://www.maayboli.com/node/64408 --- भाग ५
https://www.maayboli.com/node/64423 --- भाग ६
https://www.maayboli.com/node/64431 --- भाग ७
https://www.maayboli.com/node/64464 --- भाग ८
https://www.maayboli.com/node/64471 --- भाग ९
https://www.maayboli.com/node/64486 --- भाग १०
https://www.maayboli.com/node/64495 --- भाग ११
https://www.maayboli.com/node/64500 --- समारोप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त ! सगळीच लेखमालिका मस्त झाली, वर्णन फोटो एकदम छान !
वाचून लगेच तिकडे जावेसे वाटते आहे.
धन्यवाद सव्यसाची !

छान झाली मालिका . फोटोज पण सुंदर. इतक्या छान जागांच्या वर्णनानंतर या भागात दिल्ली मेट्रो, गर्दी इ. नुस्ते वाचताना पण हवेतून दाणकन जमिनीवर आल्याचा आभास होतोय तर तुम्हाला तर किती जाणवलं असेल !!

Khoop chhan.
Lavakarach asa pravaas punha karayla milo !