आशा साहनी यांचा दुर्दैवी अंत

Submitted by महेश on 12 August, 2017 - 05:50

बातमीचा सारांश आणि नंतर लिंक देत आहे,

ऋतुराज साहनी हा भारतीय संगणक अभियंता १९९७ मधे अमेरिकेत जाऊन राहिला आहे.
मुंबईत लो़खंडवाला येथील बेलस्कॉट टॉवर नामक सोसायटीत दहाव्या मजल्यावर त्यांच्या दोन सदनिका आहेत.
वृद्ध आई वडिल दोघेच मुंबईत रहात होते, वडिलांचे २०१३ मधे निधन झाले आहे. नंतर आई (आशा) एकटीच रहात होती.
या मुलाचा आईशी शेवटचा संपर्क झाला होता एप्रिल २०१६ मधे, त्यानंतर काही संपर्क नाही.
काही दिवसांपुर्वी तो मुंबईत आला आणि सदनिकेचे दार आतुन कोणी उघडत नाही, म्हणुन चावीवाल्याच्या मदतीने दार उघडले,
तर आत शयनगृहात आशा साहनी यांचा मृतदेह आढळून आला तो सुद्धा अगदी सांगाडा अवस्थेत,
कारण त्यांचे निधन होऊन काही आठवडे / महिने झाले होते.
http://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-woman-s-skeleton-found-...

लोक करिअरमुळे एवढे भावनाशून्य कसे होत चालले आहेत ? वृद्ध आई एकटी कशी रहात असेल ? काय करत असेल ? कशाचीच काळजी कशी वाटली नसेल या माणसाला ? काय झाले आहे माणुसकीला ? Sad

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांकडे म्हातारपणाची तजविज म्हणून बघणं कधी थांबणार देशात?
नवीन Submitted by रीया on 13 August, 2017 - 03:55
>>>>
प्रगत देशात म्हातार्या लोकांची काळजी घ्यायची व्यवस्था आहे.तशी भारतात उभं करणं शक्य आहे का?

रिया तुही खूप छान लिहिलेयस. मीही माझी जमेल तशी तजवीज करतेय/करणार आहे. केवळ माझ्या पोटी जन्माला आली म्हणून माझ्या मुलीने तिची उमेदीची वर्षे माझ्या म्हातारपणी माझ्या सेवेत घालवावी हे मला मंजूर नाही.

माझी आईही एकटी राहते, तिच्या इच्छेने. मुले 10 मिनिटे ते 2 तास या अंतरावर आहेत. मी कधी रोज फोन करते कधी कधी आठवडाभर जमत नाही. तिने शेजारी सांगून ठेवलेय की रोज सकाळ संध्याकाळ दारावरून जाताना हाक मारून जात जा. शेजारची मुले आनंदाने हे काम करतात. बाहेर जाताना शेजारी सांगून जाते.

सरकारनेही वृद्धांची सोय लावायला हवी. पण आपल्याकडे कुठल्याही सोयीचा गैरफायदा घेतला जातो. सरकार फुकट सोय करते म्हटलयावर लोक वयाच्या चाळिशीतच स्वतःला साठीचे ठरवण्याची धडपड करतील.

साधना, छान पोस्ट आहे तुमची, पण,
>>मुलांच्या आत्महत्या म्हणजे पालकच नालायक, समाज नालायक; एकाकी वृद्ध म्हणजे मूलेच नालायक, समाज नालायक हे जे समज आपण दृढ करून घेतलेत त्यात एक घटक दोन्ही बाजूने नालायक ठरतो तो म्हणजे आपला समाज.

हे कितीही मान्य केले तरी एक ते दिड वर्षे अजिबात संपर्क नसणे हे पटत नाही, निदान भारतीय माणसाकडून तरी.
मी असे अजिबात म्हणत नाही की यात त्या बाईंची काही चूक नसेलच,
आमच्या नात्यातल्या एक बाई, आता वय ८५ असेल, नगरला बंगला आहे, मुले पुण्यात आहेत, पती निधनानंतर या बाई अजुनही नगरला एकट्या राहतात, पण मुलगा (अर्थात तोही ६० प्लस आहे), अगदी दर आठवड्याला आईकडे जाऊन २ दिवस राहतो.
तात्पर्य काय तर, वृद्ध माणसे अनेकदा स्वभावाने हेकट होतात, म्हणुन मुलांनी एवढा संपर्क तोडावा असे तर नाही ना.

मला पण मुलाने काय किंवा इतर कोणी परिचिताने किंवा नातलगाने दीड वर्ष काहीही काँटॅक्ट न ठेवणे लॉजिकली पटत नाही . काही तरी कच्चा दुवा आहे ह्यात.

काही तरी कच्चा दुवा आहे ह्यात.
>>>>

मी वरच म्हटलेय .. मर्डर असण्याची शक्यता आहे.

त्या मुलाकडे गेल्यात असे चित्र उभे केले गेले म्हणून कोणीही चौकशीला आले नाही.

वर्षभर जी बाई जिवंत आहे की गेली हे ज्यांना पडले नसेल त्यांनी तिचा प्रॉपर्टीसाठी मर्डर करणे शक्य आहेच. जर पोलिसाण्च्या नजरेतून विचार केला तर पहिला संशय असाच जातो.
अर्थात हा एक अंदाज आहे.

या केसमधे मला नाही वाटत पुढे काही होईल,
कारण जर कोणाची तक्रारच नसेल तर पोलिस तरी कशाला काय करतील ?
या केसची नोंद "वृद्धापकाळाने मृत्यु" अशी होऊन केस बंद होईल.
जन पळभर म्हणतील हाय हाय Sad

साधना रीया तुम्हा दोघींनाही अनुमोदन..सद्ध्या याचे वाईट पडसाद थोपूवर चालु आहे..अक्षरशः त्या पोराला लोकांनी ठेचून मारावं, फाशी द्यावी इथपर्यंत लोकांची मत वाचलीए.. खुप खुन्न वाटते अस वाचल कि.. सगळे एकाच बाजुने का बोलतात.. इथे संयत चर्चा चाल्लीए पाहुन बरं वाटलं.. गुड ओल्ड डेज् (ऑफ माबो) सारख..

मुलांनी आपलं आयुष्य सोडून आई वडीलांमध्ये गुंतून राहावं ही आपेक्षा का?

माझी आजी सातारला एकटी राहाते, तिला अनेक वेळा सांगितलंय आमच्या सोबत येऊन राहिला, तिचं नेहमी एकच वाक्य असतं 'मला माझ्या घरातच मरायचंय' ....>>>>>> खरंय ग तिचं.तुम्हा तरूण मुलींना आज हे कळणार नाही.तुमची कामाची व्यग्रता भरपूर आहे.मला तरी कुठे हे पटत होते?
माझ्या आईवरून कळत गेले.आपल्या घराची पण आपल्याला सोबत होत जाते.तिच्यासाठी मी मुंबईत भाड्याने फ्लॅट घेतला होता.ज्यावेळी इथे येईल तेव्हा राहील म्हणून.पण इथे आल्यावर ४-५ दिवसात परत माघारी जायची तयारी असायची.सेकंडरी सिटिझनशिप आवडत नसते ना कोणालाही.मधल्यामधे माझी चिडचिड व्हायची,विनाकारण अपराधी वाटायचे.पण नंतर एका टप्प्यावर ठरवले की जोपर्यंत तिचे हातपाय चालत आहेत तोपर्यंत किंवा शक्य होईल तोपर्यंत तिला तिच्या घरात राहू द्यायचे.मला ये-जा करावी लागेल इतकेच.

बोलण आणि प्राक्टीकली करणे यात फरक आहे.
४५ वर्षाच्या लग्न झालेल्या मुलाला पण तु घर सोडून जा आणि स्वतःचे बघ बोलत नाहीत १८ वर्षाच्या मुलाला सांगणे तर लांबची गोष्ट आहे

जेंव्हा वय 65 + होईल, टेबले टर्न होतील, तेंव्हा बघू किती जण म्हणतायत की मुलांनी आपले आयुष्य सोडून आई बाबां मध्ये गुंतून राहावे का..
आयुष्य सोडायची गरज नसते हो, पण निदान काळजी घेणे कर्तव्य आहे की...

आपलं घर ...

नवरा बायकोने हौसेने संसार उभा केला असतो. त्यांची मुलेही त्या संसाराचा हिस्सा असतात. त्या एकूण संसाराबाबत काय चांगले काय वाईट हे ठरवण्याचा अधिकार त्यांना असतो. बाईच्या दृष्टीकोनातून पाहिले तर जेवणात काय बनवावे हा देखील तिला आपला एक अधिकारच वाटत असतो. घराबाबतही ते कसे असावे, कसे सजवावे, कुठची वस्तू कुठे असावी असे कैक निर्णय ते कोणालाही न विचारता घेऊ शकतात.. म्हणून ते असते आपले घर..

पुढे मुलांचे आपले घर होते, ते आपला संसार थाटतात. आईवडील आणि मुलांचे एकमेकांवर कितीही प्रेम असले तरी एकाच घराबाबत दोघांनाही हे आपले घर अशी वर लिहिल्याप्रमाणे फिलीण्ग नाही येऊ शकत. आपल्या मर्जीने सजणारे आणि वागणारे असे ते आपापले घर बनवतात..

बस्स ईतकेच असते ते आपले घर..
पण आईवडील आणि मुलांच्या नात्याला कोणते दगडमातीचे घर जोडून नाही ठेवत. ते मायेचे नाते मूळातच असावे लागते. मग मुलांनी आपले घर परदेशात बनवा किंवा परग्रहावर, दोघांमधील संपर्क कधी तुटत नाही.

वरच्या केसमध्ये नेमके तेच मिसिंग आहे.
चूक मुलाची होती की आईची की दोघांची हे अर्धवट माहितीवर कोणी ठामपणे सांगू शकत नाही.
पण जे घडले ते दुर्दैवी असल्याने जो गेला त्याला सहानुभुती मिळतेय आणि जो राहिला त्याला शिव्या पडताहेत ईतकेच !

तरीही सालं काहीतरी काळंबेरं नक्कीच आहे. एखादी श्रीमण्त बाई वर्षभर गायबली तरी कोणालाही समजू नये. हे गौडबंगाल काय आहे हे शोधले गेले तर नक्की पुढे येईल..

लोकं का माहीत नसताना बाजू घेताहेत?

आम्ही भारतात परतलो कारण नवर्‍याचे आई वडीलां चे एकटेच असत भारतात ( आम्हाला कोणीही सांगितले नाही या वा जा) . पण आजारामुळे म्हणा किंवा वयाने, साबा (जे अतिस्नय हसत्मुख, सामाजिक वावर असलेले आणि प्रेमळ) इतके तिरसत , तापट झालेले की घरच्या फोनची वायरच काढत. दाराची बेल बंद करत( हा औषधांचा परीणाम होता). माझा नवरा चिंतेत.. आता भारतात जाउ की उद्या.
आम्हाला( मुलांना विषेश) परत्वणीच निर्णय घेणे भयानक त्रासाचे होते.पण आलो.
सतत हॉप्सिटल, डॉक्टर आणि नर्सेस (घरी साबांना) सांभाळायला, आर्थिक ओढाताण, मुलांची नाखुषी वगैरे सहन करून फक्त एकच खुषी की आई वडीलांजवळ आहित असे नवर्‍याला वाटे. साबांचे अतिशय दुखःद निधन झाले काही महिन्यांपुर्वी. आम्ही सावरतो आहोत अजूनही... अजूनही धक्काच आहे ...
टोमणे मारणारी टोमणे मारतातच की पैसा कमवला आणि बापाचे हाल केले इतकस सिरियस होउपरंत.
एक गोष्ट कळली आहे, नदीच्या काठाशे बसून शेरे मारु नये कोणीच...

टोमणे मारणारी टोमणे मारतातच की पैसा कमवला आणि बापाचे हाल केले इतकस सिरियस होउपरंत.
>>>
असूया... पैसे कमावणारयांबद्दल वाटणे साहजिकच आहे. भारतासारख्या कमालीची विषम आर्थिक परिस्थिती असलेल्या देशात तिचे प्रमाण जास्त असणेही साहजिक आहे. आणि परदेशस्थ म्हटले की एक लेवल आणखी वाढते Happy

असो,
वर उल्लेख झालाय की म्हातारपणाची सोय करावी. यात म्हातारपणाची सोय दोन प्रकारे लागू शकते. एक म्हणजे पैसा, दुसरे म्हणजे सोबत. सध्या पैश्यांवरच फोकस करूया. प्रॅक्टीकली भारतातील किती जणांना म्हातारपणी पुरतील ईतके पैसे साठवणे शक्य असावे. पन्नास हजार आणि जास्त मासिक उत्पन्न असणारयांना जमावे. पण ज्यांचे पोट हातावर आहे किंवा ज्या मध्यमवर्गीयांकडे महिन्याअखेरीस चणचण भासते त्यांनी म्हातारपणाची सोय म्हणून पोटाला आणखी चार चिमटे घेत पैसे साठवणे शक्य आहे का? बरे, माणसाच्या आयुष्याचा तसाही भरवसा नसतो. हालाखीत जगत पैसे जमवलेही, तरी ती वेळ येताच मृत्यू आल्यास आयुष्यभर स्वत:ची मन मारत केलेली फरफटही फुकटच गेली. अर्थात ही रिस्क यात असणारच, पण ज्याचा गुजारा आधीच मोठ्या मुश्कीलीने होतोय ते त्यापेक्षा तेव्हाचे तेव्हा बघू आणि पोरं सांभाळतील यावर विश्वास ठेवू अशीच भुमिका घेत असतील. बरं यात त्यांना पैसे किती साठवायचे हे देखील समजत नसेल. माझे आजोबा निवृत्तीनंतर तब्बल 34 वर्षांनी गेले. तितके वर्ष त्यांची पेन्शन चालू होती. जर नसती तर 34 वर्ष टिकाव धरायची सोय करणे त्यांना जमले असते का हा एक प्रश्नच आहे. ही सरकारी पेन्शन का बंद केली हा पण एक प्रश्न आहे मला. त्यापेक्षा सरकारनेच कमी पगार देत वरचे पैसे त्यांच्या म्हातारपणाला ठेवायचे होते. वेगळा धागा काढला असता, पण आता तो विषय जुना झाला.
बरं पैश्याचे गणित कधीच शाश्वत नसते. जो धडधाकट आहे तो पुन्हा शून्यातून उभा राहू शकतो. ज्याचे ते वय निघून गेले आहे त्याला ते अवघड.
मी वर उल्लेखलेला जेमतेम गुजारा होणारा आणि त्याही खाली असलेला असा आर्थिक गटच या देशात मोठा असावा. अश्यांना म्हातारपणाची तजवीज म्हणून मुलांकडे बघू नका, स्वत: पैसे साठवा म्हणून सांगणे मला धाडसाचे वाटते.

ज्यांना शक्य आहे , त्यांनी तर स्वतःच्या म्हातारपणाची तरतूद स्वतः करायलाच हवी.
दुसरीकडे मुलांच्या उज्जवल भविष्यासाठी स्वतःचा भविष्यकाळ अंधारात जाणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी.
आपलं सेव्हिंग मुलांच्या विवाहसमारंभावर उधळून लावू नये . भलं मोठं कर्ज काढून परदेशी शिक्षणासाठी पाठवू नये.
निवृत्तीनंतर मिळालेली रक्कम किंवा आपलं सेव्हिंग, मुलांच्या नावावर घर घेण्यासाठी देऊ नये.
आपल्या प्रकृतीची हेळसांड करून मुलांसाठी इमले बांधू नयेत.
हे झालं आर्थिक. पण अशीच स्वतःच्या म्हातारपणासाठी मानसिक, सामाजिक, आरोग्यविषयक गुंतवणूक करून ठेवावी. म्हणजे मुलांच्या संसारात गुंतावं लागणार नाही.

आता आयुष्यमान वाढतच चाललंय. त्यामुळे हे प्रश्न बिकट होत आहेत, आणखी बिकट होणार आहेत

आणि हे सगळं उद्या मुलं आपल्याकडे बघणार नाहीत, म्हणून नव्हे, तर म्हातारपणी आपण त्यांच्यासाठी ओझं ठरणार नाही, म्हणून. असं केल्याने कदाचित दोन पिढ्यांतले संबंध अधिक चांगले राहायल मदतच होईल.
(एकवेळ पुढ्यातलं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये, अशी म्हण आहे.)

या सगळ्याचा , किमान आर्थिक बाबींचा या घटनेशी संबंध असेलच असं नाही. पण विषय निघालाय म्हणून लिहिलं.

तो आलाच नसता तर ? तो का आला ? प्रेमापोटी का स्वार्थापोटी ? काय झाले असावे ?
सगळेच प्रश्न आता तरी अनुत्तरीत आहेत... ईश्वर मृतात्मास शांती देवो...

अरे हे काय पोस्ट संपादित नाही करता येत आहे माझी वरचीच पोस्ट.
देवा, मला माफी असो. चुकुन मी साबा लिहिले आहे. तिथे सासरेबुवा ह्यांचे विषयी लिबिले आहे. ती पोस्ट एडिट करता येइल का?

झंपी, आता पोस्ट संपादित करायला ४ तासांची मर्यादा आहे. त्यानंतर पोस्ट संपादित करता येत नाही.

भरत +१०१,
>>एकवेळ पुढ्यातलं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये, अशी म्हण आहे.
अगदी बरोबर

जेंव्हा वय 65 + होईल, टेबले टर्न होतील, तेंव्हा बघू किती जण म्हणतायत की मुलांनी आपले आयुष्य सोडून आई बाबां मध्ये गुंतून राहावे का..
आयुष्य सोडायची गरज नसते हो, पण निदान काळजी घेणे कर्तव्य आहे की... >>>>> +11111

साधना ,रीया पोस्ट आवडली.
भरत पोस्ट पटली.
मात्र हल्लीचे जबाबदार पाल्य ही आपल्या पालकांना,जे काही ते तुमच आहे.आम्हांला ही काहीतरी स्वतःच निर्माण करायची संधी ,जागा ठेवा.आनि तुमच्या मिळकतीचे काय करायचे हे तुम्हीच ठरवा.अस सांगताना दिसत आहेत.
वरच्या घटनेमधे अजुन खोल माहिती अस्ल्याशिवाय कोणालाही दोषी ठरवणे चुकच आहे.
मला रुन्मेष ने सांगितलेली शक्यता पटतीये,, त्या बाहेरगावी गेल्या अस भासवुन त्यांचा खुन केला गेला असावा.ह्यात कोनीही असु शकते.नातेवाईक्,शेजारी पासुन कोणीही.

एक सहजच, माझ्या मैत्रिणीचे सासरे वय ७९ बायको वारल्यानंतर एकटे राहतात. त्यांना दोन मुले आहेत , लहान मुलगा त्याची बायको भांडकुदळ आहे व आई बापाबरोबर पटायचे नाही म्हणून आधीपासूनच वेगळा राहायचा. मोठ्या मुलाचे लग्न झाले तर सासू सासर्याने त्या सुनेला (माझ्या मैत्रिणीला) आपलंस करून निदान तिला तरी आपल्याबरोबर नांदवायची तर तिचेही खटके उडू लागल्यावर त्यांना भाड्याने घर घेऊन वेगळे ठेवले. मोठ्या मुलाची नोकरी गेली. बायकोच्या जीवावर आता घर चालते. हे दोघे (सासू, सासरे)आता एकटेच राहू लागले त्यांना त्यांचे नातेवाईक चालायचे, पण सुना नाही. बायको गेल्यावर्षी वारली तर निदान मोठ्या मुलाला आपल्याबरोबर ठेवावे ते नाही बिचार्या माझ्या मैत्रिणीला घराचे भाडे, मुलांचे शिक्षण, आजारपण एकट्याने करावे लागते. निदान त्या सासर्यांनी याना आपल्या कडे ठेवल्यास घरभाडे वाचून थोडे पैसे मुलींच्या पुढील शिक्षणासाठी जमविले जातील ते पण नाही. आता मला असेच विचारायचे कि यात जे म्हातारे सासरे आहेत त्यांना एकटे राहणे आवडते म्हणून त्यांना मुलाला वेगळे ठेवणे योग्य वाटते आणि मग हे सुद्धा असेच एकटे कधी तरी कुणाच्या नकळत वारले तर लोक मुलाला जबाबदार धरणार.

Pages