मुलगी शिकली, प्रगती झाली. पण स्त्रियांना चूल आणि मूल सुटले आहे का कधी. तुम्ही फुल टाईम गृहीणी असाल तर प्रश्नच नाही, पण नोकरीला असाल तर तरी आपल्या आणि आपल्या नवर्याच्या वाटणीचे घरकाम तुम्हाला करावेच लागते. पण हल्ली विभक्त कुटुंबात नोकरी सांभाळून सारेच घरकाम जमणे शक्य नसते. तेवढा वेळच नसतो.
मग भांडी घासायला बाई ठेवली जाते. पण तिला घासायला भांडी काढून देणे आणि घासून झाल्यावर ती तिथेच रचून जात असेल तर जागच्याजागी ठेवायचे काम आपल्यालाच करावे लागते.
मग कचरा साफ करायला देखील बाई ठेवली जाते. पण तिच्यावर लक्ष आपल्यालाच ठेवावे लागते. टोपलीतल्या जमलेल्या कचर्याची आपल्यालाच विल्हेवाट लावावी लागते.
मग कपडे धुवायला वॉशिंगमशीन घेतली जाते. पण ती वापरावी आपल्यालाच लागते. कोणते कपडे कधी धुवायचेत वगैरे हिशोब आपल्यालाच ठेवावे लागतात.
मग असे एकेका कामात शॉर्टकट घेतले जातात., पण स्वयंपाक मात्र आपल्याला चुकत नाही.
फार तर पोळ्या करायला बाई ठेवली जाते किंवा मग आमच्या ह्यांना बाईच्या हातच्या चपात्या आवडत नाही असे नाईलाजाचे कौतुक करत त्या देखील आपल्यालाच कराव्या लागतात.
काही नवरे करतात मदत, पण ती मदतच असते. कामाचा एक ठराविक भाग. तो देखील रोजच्या रोज करतील याची खात्री नाही. खायला मात्र रोजच लागते. आणि जे काही थोडेबहुत करतील ते उपकार केल्यासारखे बोलून दाखवतील.
खरं सांगा, किती घरात सकाळी सहाचा अलार्म वाजल्यावर पहिली उठणारी व्यक्ती ही बायकोच असते. जवळपास सर्वच घरात. मग ती तासाभरात तिची तयारी करते. त्यानंतर सातचा अलार्म वाजल्यावर नवर्याला उठवते. तो सात ते आठ आपली तयारी करतो, तेव्हा ही आदर्श गृहीणी दोघांचा डब्बा आणि साहजिकच सकाळचे दोघांचे चहापाणी करण्यात बिजी असते. अगदी त्याला चहा बनवता येत असला तरी सकाळी मुद्दाम लवकर उठून दोघांसाठी चहा बनवून घेणारा नवरा फारसा ऐकण्यात येत नाही. त्यातही माझा नवरा हॉस्टेलवर राहणारा असल्याने त्याला कांदा चिरता येतो, मॅगी बनवता येते असे काहीबाही कौतुक असते बायकांना. एखादा नवरा असतोही फर्मास चिकन बिर्याणी बनवणारा. पण कधीतरी काहीतरी बनवून वाहवा, कौतुक मिळवणे आणि रोजचा भाजीपोळीचा थॅंकलेस जॉब करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
थॅंक गॉड, हे सारे अनुभव माझे नाहीत, तर माझ्या विवाहीत मैत्रीणींचे आहेत. माझे लग्न अजून झाले नाही आणि लग्नानंतरही हे सारे करायचा विचार नाही. कारण मुळातच मला स्वयंपाकच करता येत नाही. आईला तशी थोडी चिंता आहे की या पोरीचे अश्याने लग्न कसे जमायचे. पण ती माझ्या टेक्निकल नॉलेज आणि नॉन ट्रेडिशनल कौश्ल्याबाबत अनभिद्न्य असल्याने तिची शंका रास्त आहे. त्या जीवावर मी माझे अगोदरच जमवले / जुळवले आहे. पण लग्नाआधी आपण सारी कामे वाटून करूया असे म्हणणारा प्रियकर जेव्हा नवरा बनतो तेव्हा फार तर लग्नाचा खर्च अर्धा वाटून घेण्यापलीकडे त्याची मजल जात नाही. स्वयंपाकाची अपेक्षा तो आपल्याकडूनच करतो. कधी उशीरा घरी आलात तर चल आज बाहेरून ऑर्डर करूया हा सोपा पर्याय निवडतो. पण रोज बाहेर खाणे खिश्याला आणि तब्येतीला परवडणारे नसल्याने मग चरफडत का होईना आपल्यालाच सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघराचा उंबरठा ओलांडावा लागतो. मूल झाल्यावर तर मग मूलासाठी घरचेच बनवावे लागते आणि एक आई म्हणून मग तो सारा भार आपल्यालाच वाहावा लागतो. मूल आणि मग मूलासाठी चूल. मूलाचे बाबा त्याला फक्त तेव्हाच सांभाळतात जेव्हा आपण स्वयंपाकघरात असतो. त्यामुळे स्त्रियांना हे हक्काचे स्वयंपाकघर आधी सुटले पाहिजे किंवा त्यांनी सोडवून घेतले पाहिजे असे मला वाटते.
तर मग आता या सर्वातून सुटका करून घ्यायला जर आपण पाककला शिकलोच नाही तर...
कदाचित आपण सार्याजणी आता शिकून मोकळ्या झालो असू,
पण येणार्या पिढीतील आपल्या मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर.....
काय अडेल त्यांचे?
खरेच काही अडेल का? ....
मुलग्यांचे काही अडते का?
विचार करा .....
पण येणार्या पिढीतील आपल्या
पण येणार्या पिढीतील आपल्या मुलींना स्वयंपाक करायला शिकवलेच नाही तर.....
काय अडेल त्यांचे? >>> ऋन्म्याला विचारा
खरेच काही अडेल का? .... >>> ऋन्म्यालाच विचारा
मुलग्यांचे काही अडते का? >>> हे पण ऋन्म्यालाच विचारा
काही ढेकळं अडत
काही ढेकळं अडत नाही.
रस्त्यावरचे चहावाले, मिसळपाववाले, इडलीवाले, हॉटेलवाले सगळे पुरुषच असतात ना?
एक फेब्रुवारीपासुन संध्याकाळचा जॉब सोडून देणार आहे.. मग एक वेळ पाकक्रिया.
............................................................................................................................
ज्योतिबा फुल्याना ठार करायला कर्मठ लोकानी मारेकरी पाठवले होते.. त्यावेळी सावित्रीबाईना समजले की ते लोक पोटासाठी हे कृत्य करत आहेत व ते आजही अजुन उपाशीच आहेत. तेंव्हा सावित्रीबाईनी त्याना मध्यरात्री स्वयपाक करुन जेवायला दिले होते. पुढे ते मारेकरी ज्योतिबांचेच अंगरक्षक बनले.
ना ओळखीचे ना पाळखीचे, ना सासरचे ना माहेरचे, पण सावित्रीबाईनी त्याना जेवायला घातले.
आणि आज त्याच सावित्रीबाईंचे नाव घेऊन आधुनिक बायका स्वयपाक हे जोखड मानून त्यातून मुक्ती हवी म्हणून स्त्रीमुक्तीच्या नावे कोकलतात.
पॉइंट ऑफ व्ह्यू समजला, व
पॉइंट ऑफ व्ह्यू समजला, व ऑलरेडी पटलेला आहे.
याची दुसरी बाजू,
सर्व बाप-आयांनी आपल्या अपत्यांना, मुलगा/मुलगी असा भेद न करता, मुलांना घरकाम व स्वयंपाक, तसेच पुरुषी कामेही (बारीक सारिक रिपेयर्स, बँका, बाजाराचे व्यवहार व इतरही सो कॉल्ड पुरुषी कर्तव्ये) मुलींना शिकवणे हा यावर इलाज आहे.
अनेकदा, मुलींना होममेकरचा रोल चांगला करता यावा, व तेणेकरून तथाकथित गृहसंस्था चांगल्या रितीने चालू रहावी (अर्थात, लग्न करून सुखाने {....} राहता यावे) या दॄष्टीकोनातून त्यांना लहानपणापासून ट्रेनिंग दिलेले असते. मुलिंना शिकवून काय करायचंय, या बुरसटलेल्या दृष्टीकोनासोबतच, शिकून काय करायचंय? असा विचार करणार्या मुलीही कमी नाहीत हे नोंदवलेच पाहिजे.
>>पण कधीतरी काहीतरी बनवून
>>पण कधीतरी काहीतरी बनवून वाहवा, कौतुक मिळवणे आणि रोजचा भाजीपोळीचा थॅंकलेस जॉब करणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ------
पटलेच.
>>>मूल आणि मग मूलासाठी चूल. --
हे ही खरेच.
पण माझ्या घरी मी ही सगळी परिस्थिती आताशा सुधारली आहे. नवरा जेव्हा म्हणतो मला चपात्या येत नाहीत. अमुक तमुक भाजी बनवता येत नाही. तेव्हा मी विचारते मग खाता कशी येते? ईंटरनेट वापर आणी कर. मग करतो तो पण अमाप कौतुक हवे असते. परत नीट्नेटकेपणा नाहीच. तेलही खुप वापरतो. जाउदे, बरिच सुधारणा आहे म्हणते आणी सोडुन देते. एक मात्र आहे, आमच्या घरी तोच लवकर उठुन चहा करतो.
श्री काय हे सगळंच ऋणम्याला
श्री काय हे सगळंच ऋणम्याला विचारा .
तो न विचारताही येईलच कि सांगायला
हल्ली मुले, मुली दोघांनाही
हल्ली मुले, मुली दोघांनाही किमान स्वतःपुरते बनवुन खाता येईल एवढे शिकावेच लागते. शिक्षण, नोकरी निमित्त इथे तिथे रहावे लागणारी मुले मुली हे आपसुकच शिकतात पण लग्नानंतर सोयिस्कर रित्या विसरुनही जातात.
आजुबाजुला नवीन जोडपी पाहते आहे जी दोघेही कामावर जातात. मुल असेल तर ते चाईल्ड केअर मध्ये असते. कुकींग हे आउटसोर्स करतात. येतं सगळं बनवता पण प्रश्न हाच की कुणी बनवायचे?
सुजा, त्याला विचारा
सुजा, त्याला विचारा म्हणण्यामागे कारण आहे
>सर्व बाप-आयांनी आपल्या
>सर्व बाप-आयांनी आपल्या अपत्यांना, मुलगा/मुलगी असा भेद न करता, मुलांना घरकाम व स्वयंपाक, तसेच पुरुषी कामेही (बारीक सारिक रिपेयर्स, बँका, बाजाराचे व्यवहार व इतरही सो कॉल्ड पुरुषी कर्तव्ये) मुलींना शिकवणे हा यावर इलाज आहे)
हेच योग्य आहे. प्रत्येकाला स्वयंपाक, घरातली आणि बाहेरची कामं करता आली पहिजेत, आणि प्रत्येकाने ती केली पाहिजेत. स्वतःच्याच घरात स्वत:साठी जेवण बनवता येणं असो किंवा आणि बाहेरची कामं करता येणं असो - या गोष्टींचं कौतुक व्हावं अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे हे शिकवलं पाहिजे लहान असतानाच.
एक फेब्रुवारीपासुन
एक फेब्रुवारीपासुन संध्याकाळचा जॉब सोडून देणार आहे.. मग एक वेळ पाकक्रिया.>>>>>> हे किती सहज सांगत आहात.बायका नोकरी करून दोन्हीवेळचा स्वयंपाक करतात हो.;)
शिकून काय करायचंय? असा विचार करणार्या मुलीही कमी नाहीत हे नोंदवलेच पाहिज>>>>>>> अगदी अगदी! राग ,कीव दोन्ही येते असं काही ऐकले की.
श्री तर्रीच मी विचार करत
श्री तर्रीच मी विचार करत होतो, जेवण झाल्यावर ढेकर यायला हवेत तर उचक्या का लागत आहेत
अर्चनाजी, अहो सगळेच नवरे तसे नसतात हो. मी तर शेजारच्या पिंट्यालाही करून खाऊ घालतो. मग विचार करा गर्लफ्रेंड बायको बनून घरी येईल तेव्हा तिला काय काय आणि किती किती खाऊ घालेन
आणि सर्वच लोकांनी ठरवले की मुलींना स्वयंपाक शिकवायचा नाही तर पोळ्या (चपाती?) करायलाही बाई मिळताना मारामार होईल. विचार करा
जोक्स द अपार्ट, मी सहज गंमत केली. मात्र आपल्या विचारांशी आणि भावनांशी सहमत आहे. आपण हे उपरोधाने वा उद्वेगाने लिहिलेय याची कल्पना आहे.
कधीतरी जेवणाचे प्रयोग हौस म्हणून करणारा मी पण आहे, पण त्यावरूनच पाककलेची आवड नसताना रोजचा स्वयंपाक करणे हा खरेच कंटाळवाणा थॅन्कलेस जॉब कसा असू शकतो याची कल्पना करू शकतो. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या खरेच हेच चालत आलेय. अगदी माझे आईवडील दोघे नोकरीला असूनही जेवणाचे डिपार्टमेंट आईकडेच असायचे आणि ते वडिलांकडे का नाही हा कधी विचारही मनात आला नाही एवढी ही संस्कृती आपल्या मनात भिनली आहे. अगदी फिफ्टी-फिफ्टी नाही तरी हळूहळू ट्वेंटी-एटी, थर्टी-सेव्हंटी असा बदल घडायला हवा. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलींना स्वयंपाक शिकवला नाहीत तरी मी माझ्या मुलग्यांना नक्की शिकवणार. आर्थात स्वत:ही शिकायला हवेच. आणि नुसते शिकून कामाचे नाही, करायलाही हवेच.
शिकून काय करायचंय? असा विचार
शिकून काय करायचंय? असा विचार करणार्या मुलीही कमी नाहीत हे नोंदवलेच पाहिजे.
>>>
असा विचार करणार्या मुली का आहेत, त्यांच्या या विचारामागे काय परीस्थिती जबाबदार आहे, याचाही विचार व्हायला हवा
>>मी तर शेजारच्या पिंट्यालाही
>>मी तर शेजारच्या पिंट्यालाही करून खाऊ घालतो. मग विचार करा गर्लफ्रेंड बायको बनून घरी येईल तेव्हा तिला काय काय आणि किती किती खाऊ घालेन-
ते सगळे लेफ्टोवर्सचे पदार्थ होते. काहीतरी ताजा स्वयंपाक करायला शिकलास तर छान. (फु.स.)
राया, त्यात अंडे नामक कच्चा
राया, त्यात अंडे नामक कच्चा पदार्थ असतो की, झालंच तर म्यागीही कच्चीच. त्यावर भाजणे जाळणे करपवणे असल्या प्रक्रिया करतो .. अगदी फोटो काढत सर्व्हही करतो..... पण येस्स, ते असेच टाईमपास आहे आणि त्याला काही अर्थ नाही हे कबूल करतोच
काहीही न शिकवण्यापेक्षा मला
काहीही न शिकवण्यापेक्षा मला झाडूंची दुसरी बाजू जास्ती आवडते.
कुठलाही भेदभाव न करता दोन्ही गोष्टी दोघांनाही (मुले - मुली) शिकवाव्यात !
सध्या ऋन्मेऽऽष मॅगी करतो आहे. हळू हळू कणिक मळून पोळ्या करायला शिकेलच. पिंट्या किती दिवस ऐकणार आहे.
असा विचार करणार्या मुली का
असा विचार करणार्या मुली का आहेत, त्यांच्या या विचारामागे काय परीस्थिती जबाबदार आहे, याचाही विचार व्हायला हवा>>>>>>>> माझ्या ऑफिसमधल्या काही तरूण मुली मजेत असं बोलायच्या.कारण घर सांभाळून नोकरी
करायची.यात त्यांना आपण खूप काही घरच्या लोकांवर उपकार करतो,असं का वाटते त्याच जाणे.
काही ठिकाणी बाईला याबाबत गृहित धरले जाते ते खेदजनक आहे.
हेच योग्य आहे. प्रत्येकाला
हेच योग्य आहे. प्रत्येकाला स्वयंपाक, घरातली आणि बाहेरची कामं करता आली पहिजेत, आणि प्रत्येकाने ती केली पाहिजेत.>> +१
माझ्या नवर्याला अगदी पोळ्या वगैरे येत नसल्या तरी तो पीठ मळणं, स्वयंपाक झाल्यावर नंतर ओटा साफ करणं अशी बरीच कामं आनंदाने आणि मुख्य म्हणजे हक्काने करतो. अर्थात भरपूर जाहिरात करून
स्त्री आणि पुरुष दोघांचं एक
स्त्री आणि पुरुष दोघांचं एक युनिक सायकोफिजिकल नेचर असतं.
स्त्रियांना बारीक बारीक, टापटिपता असलेले कामं जास्त व्यवस्थितपणे करता येतात पण तेच कामं पुरुष तितक्या टापटीपटेने नाही करू शकत. आता तुम्ही म्हणणार की त्यांना तसं शिकवावं लागेल, पण मुळातच ते त्यांच्या नेचरमध्ये नाही बसत. ते म्हणजे सोनाराचं काम लोहाराने केल्यासारखं होईल. जितकी काळजी आई बाळाची घेईल, तितकीच काळजी वडील त्याच्यावर प्रेम असूनही नाही घेऊ शकत.
त्याचपद्धतीने पुरुष बाहेरचे कामं जास्त व्यवस्थित करू शकतात. जसे, समाजात एक स्थान बनवणं, प्रॉपर्टी चा विस्तार करणं, कुटुंबावर संकटं आली तरी सर्वांना स्वतः दुःखी असूनपण धीर देणं ई.
दोघांनीपण एकदुसर्याला समजून आपापले कामं करावेत.
मुलींनी स्वयंपाक शिकला नाही तर, मुलांना करावा लागेल पण तो त्या दर्जाचा राहिलंच याची शक्यता खूपच कमी राहील. (प्रत्येक गोष्टीत काही अपवाद असू शकतात.)
आणि एक गोष्ट विचित्र वाटते जर मुलीला घरकाम व्यवस्थित कसं करावं, स्वयंपाक कसा करावा, पाहुणे आले तर त्यांची सोय कशी ठेवावी ई. शिकवणं म्हणजे चूल आणि मूल म्हटलं जातं. आणि तेच विद्यापीठात शिकवलं, तर हॉस्पिटॅलिटी, हॉटेल मॅनेजमेंट सारखे मोठे कोर्सेस म्हणवले जातात, ज्यामध्ये भरपूर मोठ्या घरातले मुलं भरपूर फी देऊन ऍडमिशन घेतात. फक्त घरात आई शिकवते आणि तिथे तथाकथित प्रोफेशनल्स शिकवतात.
या विषयात अजून पुढे भरपूर काही सांगता येईल. पण थोडक्यात सांगायचे तर, एक पुरुष(स्त्रीचं शरीर & पुरुषी विचार) दुसऱ्या पुरुषासोबत आयुष्यभर शांततेत आणि समाधानाने राहू शकत नाहीत.
पण थोडक्यात सांगायचे तर, एक
पण थोडक्यात सांगायचे तर, एक पुरुष(स्त्रीचं शरीर & पुरुषी विचार) दुसऱ्या पुरुषासोबत आयुष्यभर शांततेत आणि समाधानाने राहू शकत नाहीत.
<<
यू मीन गे मॅरेज इज ऑल्वेज अ फेल्युअर. राईट?
I can't say about always, but
I can't say about always, but mostly..
Do you think such gay marriages, long still last breath?
What do you think, why in some of the western countries divorce rates are high?
निसर्गाने स्त्रियांना मातृत्व
निसर्गाने स्त्रियांना मातृत्व दिले आहे तसेच काही गुणांची देणगी पण दिलेली आहे.
घराची, मुलांची देखभाल, स्वयंपाक करणे, इ. गोष्टी ममतेने स्त्रिया जास्त चांगल्या करू शकतात.
याचा अर्थ फक्त स्त्रियांनीच हे करावे आणि पुरूषांनी करू नये असे नाही,
तर जे कोणी चांगले करू शकत असेल त्याला / तिला जास्त प्रमाणात करू द्यावे.
एक पुरुष(स्त्रीचं शरीर &
एक पुरुष(स्त्रीचं शरीर & पुरुषी विचार) दुसऱ्या पुरुषासोबत आयुष्यभर शांततेत आणि समाधानाने राहू शकत नाहीत..
...
न रहायला काय झालं ? घरकाम करणारा नवरा शोधून त्याला घरी बसवून तिने नोकरी करावी.
पण तिथेच घोडी पेंड खाते !
बायका स्त्रीसत्ताक पद्धत आणत नाहीत.
पद्म, तुम्ही सविस्तर लिहिले
पद्म, तुम्ही सविस्तर लिहिले आहे त्याच्याशी अगदी सहमत !
न रहायला काय झालं ? घरकाम
न रहायला काय झालं ? घरकाम करणारा नवरा शोधून त्याला घरी बसवून तिने नोकरी करावी.>>>>> मग इथे असा व्यक्ती शोधावा लागेल ज्याचं शरीर पुरुषाचं आणि सायकोफिजिकल नेचर स्त्रीचं असेल...तरंच जमेल.
>>पण तिथेच घोडी पेंड खाते
>>पण तिथेच घोडी पेंड खाते !
>>बायका स्त्रीसत्ताक पद्धत आणत नाहीत.
त्याचे कारण निसर्गाने त्यांना तसे बनविले आहे
(अर्थात याला अपवाद आहेत, लगेच अनेकांनी येऊन आकांडतांडव करू नये)
Divorce rate is low in India
Divorce rate is low in India . This doesn't mean that indian people are more happy in their married life.
Hospitals are less in India. Does it mean Indians are healthier than others ?
anilchembur, माफी असावी! no
anilchembur, माफी असावी! no more comments............
सायको फिजिक वगैरे काही
सायको फिजिक वगैरे काही नसतं.... पुरुष घरकामही आनंदाने करु शकतात.
स्त्रीया नोकरीही आनंदाने करु शकतात.
>>सायको फिजिक वगैरे काही
>>सायको फिजिक वगैरे काही नसतं
असते असते, मुळात त्या त्या व्यक्तीच्या मानसिकतेची नैसर्गिक घडण आणि प्लस लहानपणापासुन त्यावर झालेले अॅडिशनल संस्कार यावर हे ठरत असणार
(असणार अशासाठी की आम्ही मेडिकलवाले नाही आहोत म्हणुन, आम्ही = आ.ब.व.)
अर्चनाजी, आपल्याला बॉयफ्रेंड
अर्चनाजी, आपल्याला बॉयफ्रेंड नाही का?
असल्यास त्याचे यावर काय म्हणणे हे पण सांगा.
ऋन्मेष बघा, गर्लफ्रेंड कडुन सगळी माहिती काढुन तयार असतो.
असो: @ विषयः चांगली कल्पना आहे.
टक्के टोणपे खाल्ल्यानेच माणुस शिकतो.
मुलग्यांनापण स्वयंपाक करायला शिकवणे, हे पुरेसे ठरणार नाही.
"घरी स्वयंपाक करणे आणि घरच्या सदस्यांना व्यवस्थित खाउ घालणे, त्यात न्यूट्रीशनचा पण योग्य विचार करुन स्वयंपाक बनवणे, ही रोजची जबाबदारी आहे, ती योग्य रितीने पार पाडलायच हवी" हे शिकवणे जास्त गरजेचे आहे.
पण हे करणार कोण?, आणि पुरुषप्रधान संस्कृतीत त्याला मनावर घेणारे किती असतील बरे?
तेव्हा तुम्ही सुचवलेला पर्याय चांगला वाटतोय.
त्यात न्यूट्रीशनचा पण योग्य
त्यात न्यूट्रीशनचा पण योग्य विचार करुन स्वयंपाक बनवणे
>>>
हा विचार कसा करतात ते पण सांगा. आता शिकायचे तर सगळेच
Pages