वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्षण/पाठांतर पद्धती.

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 March, 2015 - 08:42

खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या विषयाकरिताच निर्माण झालेली आहे. हिला सामन्यतः मौखिकी अध्यापन पद्धती असे म्हटले जाते. ह्या पद्धती विषयी खूप जणांच्या मनात कुतुहल,आस्था,चिकित्साभाव इत्यादी असते. आंम्हा पुरोहित मंडळीना काम करत असताना,पाठांतर पाहुन ह्या अनुषंगानी काहि प्रश्नंही विचारले जात असतात. अश्या सर्व प्रश्नकर्त्यांना हा विषय नीट माहिती व्हावा,एव्हढ्याच हेतूने हा सदर लेख येथे देत आहे.

@संथा देणे म्हणजे काय? >> संथा देणे म्हणजे ,वेदपाठ शिकविणारे गुरुजी , समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचे छोटे तुकडे(चरण)पाडून ,वदवून आपल्या मागे घोकायला/म्हणायला सांगतात..याला प्राथमिक अर्थानी संथा-देणे असे म्हटले जाते. यापुढे...(विद्यार्थ्यांनी)संपूर्ण पाठांतर करण्याच्या विशिष्ट पद्धतीला, संथा घालणे अगर संथा म्हणणे ..असे म्हटले जाते. एखादा विषय/याज्ञिकातला प्रयोग/संहितेचा अध्याय (तोंड)पाठ करताना, संथा म्हणण्याचे ४ ट्प्पे असतात.
१) चरणाची संथा(४वेळा) २) अर्धनीची संथा(४वेळा) ३) ऋचेची संथा(४वेळा) ४) गुंडिकेची संथा(४वेळा) = एकंदर १६ संथा.

१)चरणाची संथा:- चरणाच्या संथेत, गुरुजिं..प्रथम समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना मंत्राचा एकेक चरण दोनदा सांगतात.. मग विद्यार्थ्यांनी पोथित बघून तो त्यांच्या मागून ७वेळा घोकायचा. यात म्हणताना चूक झाली,की पुन्हा सुरवात. यात शुद्धअक्षर,जोडाक्षर,त्याचे गुरुत्व,अनुस्वारांचे उच्चार,स्वराघात,र्‍हस्व आणि दीर्घ/प्रदीर्घ-अश्या काना ,मात्रा,वेलांट्या,उकार, विसर्ग आणि त्यांचे तसेच उच्चार ,हे शंभर टक्के शुद्ध होत आहेत की नाहीत? हे गुरुजी कसून तपासत असतात. (कारण एकदा अशुद्ध पाठ झालं..की ती (मेंदूत उमटलेली) प्रींटाऊट,नंतर पुसणं कर्मकठीण असतं.) तर..हे स्तोत्रातले पाडलेले एकेक चरण ७ वेळा घोकत संपूर्ण अध्याय वा स्तोत्र - पूर्ण केलं जातं... ही झाली "चरणाची" पहिली संथा. अश्या चार संथा झाल्या की 'चरण' पूर्ण होतो. ही सगळी संथा गुरुजिंसमक्ष होते. (कारण तेच-मंत्रात अजिबात अशुद्धी राहू नये.)

२)अर्धनीची संथा:- अर्धनीच्या संथेत ,सामान्यतः दोन चरण एकत्र घेऊन..किंवा मंत्राची अर्धी ओळ सात वेळा म्हटली जाते. (काहि वेळा जगतिच्छंदा सारखा,मंत्राचा लांबलचक छंद असेल,तर एका ओळीत ४/४ किंवा अगदी ६/६ चरणंही पाडावे लागतात) आधी चरण डोक्यात-बसलेला असतोच..त्यामुळे इथपासून गुरुजी समोर नसले,तरी चालते. तर.. ही...एकामागून एक ओळ पूर्ण ७ वेळा घोकत ...संपूर्ण अध्याय पूर्ण केला... की अर्धनीची १ संथा झाली...आता अश्याच पुढे अजुन ३ संथा म्हणायच्या..म्हणजे या अर्धनीच्या चार संथा होतात.

३)ऋचेची संथा:- ऋचेच्या संथेत..मागील अर्ध्या ओळीच्या संथेचा पुढचा भाग सुरु होतो..म्हणजे आता २ ओळिंची संपूर्ण ऋचा ,आणि पुढच्या ऋचेचा पहिला चरण(धरुन) ..,तसे ७ वेळा म्हणायचे. यातील पुढच्या ऋचेचा पहिला चरण त्यात घेण्याचे वैशिष्ठ्य असे..की यामुळे संपूर्ण अध्यायातल्या प्रत्येक पहिल्या ऋचेची-दुसर्‍या ऋचेशी गुंफण तयार होते. (कनेक्टींग होते.) ऋचे'तल्या या (पहिल्या)संथेवर,शिकविणार्‍या गुरुजिंचे बारीक लक्ष असते. (कारण तेचः- अशुद्धी आली कींवा मधे कुठे तयार झालेली आहे काय? हे पहाणे.) ह्या ऋचेच्या परत पुढे तीन संथा म्हणायच्या. म्हणजे या ऋचेच्याही एकंदर चार संथा पूर्ण होतात.

४) गुंडीकेची संथा:-..हा शेवटचा, परंतू अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. आता मागील ऋचेच्या संथेनी हीचेच निम्मे काम केलेले असते. पण तरिही.., आता कितीही पाठ येत असले..तरी(यातल्या पहिल्या संथेला) पोथीत पाहूनच..सदर पाठांतराच्या अध्यायाचा एकेक अनुवाक अथवा वर्ग (पॅरेग्राफ) ७/७ वेळा म्हणायचा असतो. आणि तो सगळा अध्याय पूर्ण करायचा असतो. ही झाली गुंडिकेची पहिली संथा.. अश्या अजुन तीन म्हणून ,ह्या गुंडिकेच्या चार संथा पूर्ण करायच्या. या गुंडिकेच्या संथेमधे, साधारणपणे दुसर्‍या किंवा तिसर्‍या संथेपासून ,(आता) विद्यार्थ्याची..इच्छा अगर तयारी-नसली तरी विद्यार्थ्यांनी पोथित न पहाताच ,मान वर करुन संथा म्हणायची असते. कारण त्याशिवाय-पाठ येणे..ही क्रीयाच आकाराला येऊ शकत नाही. अर्थात कोणत्याही सर्व सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला यातल्या शेवटच्या २ संथांमधे सर्वकाहि बिनचूक तोंडपाठ-येतेच. पण त्याहून(बुद्धिनी) आगे/मागे जे असतील..त्यांना कमी अगर जास्त कष्ट घ्यावे लागतात. तर,अश्या ह्या एकंदर १६ संथा घातल्या की आपल्याला अपेक्षित असलेला पाठांतराचा विषय-तयार होतो.

आता आपण याचे-संकलित..,एका स्तोत्रपाठांतराच्या उदाहरणाद्वारे पाहुया. (हे आणखि डिटेलिंग,विशिष्ट हेतूनी आणि जाणिवपूर्वक करत आहे.)

चरणाची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं,(७वेळा) गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यं, (७वेळा)आयुःकामार्थसिद्धये॥(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च,(७वेळा) एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं,(७वेळा)गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
असेच प्रत्येक चरण म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे चरणाची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की चरणाची मुख्य संथा पूर्ण होते.

अर्धनिची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।(७वेळा)
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥(७वेळा) ॥

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।(७वेळा)

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ (७वेळा).....
अशीच प्रत्येक अर्धनि/अर्धी ओळ म्हणत स्तोत्राच्या शेवटापर्यंत जायचे असते..मग येथे अर्धनिची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की अर्धनिची मुख्य संथा पूर्ण होते.

ऋचेची म्हणायची संथा:- प्रणम्य शिरसा देवं, गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥..प्रथमं वक्रतुण्डं च(७वेळा)

प्रथमं वक्रतुण्डं च, एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ लम्बोदरं पञ्चमं च(७वेळा).....
अशीच प्रत्येक ऋचा ,पुढल्या ऋचेचा पहिला चरण तिच्यात लावुन म्हणत स्तोत्र एकेक ऋचेनी म्हणत पूर्ण घोकायचे असते..मग येथे ऋचेची एक संथा पूर्ण होते.अश्याच अजुन तिन संथा म्हटल्या,की ऋचेची मुख्य संथा पूर्ण होते.

गुंडिकेची म्हणायची संथा:-
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥ (सुरवात ते शेवट -७वेळा..)
.....असेच सुरवात ते शेवट -७वेळा.. म्हटले,की मग येथे गुंडिकेची एक संथा पूर्ण होते.अश्याच प्रकारे अजुन तिन संथा म्हटल्या,की गुंडिकेची मुख्य संथा पूर्ण होते.

आता आपल्याला आवश्यमेव असा एक प्रश्न पडेल,की "(बुद्धिचा..)इतका बारीक किस पाडून, ही पाठांतर पद्धती तयार होण्या/करण्यामागचे प्रयोजन काय बरे असावे???" Happy

उत्तरः- ज्या काळात ही पद्धती आली/विकसीत झाली.तो काळ लेखनकलेची सुरवातहि न झालेला असा काळ होता. अश्या वेळी आपल्या जिवापाड जपाव्याश्या वाटणार्‍या गोष्टींपैकी, ही मंत्र /काव्य/स्तोत्र जतनाची एक गोष्ट होती. आणि याशिवायंही ,पुढे लेखनकला विकसीत झाल्यावर..जो विषय वारंवार म्हणावा,वापरावा लागणार आहे..त्यासाठी भल्यामोठ्ठ्या पोथ्यांची बाडे बरोबर घेऊन हिंडणे.हे ऋषीमुनिंपासून ते सामन्यजनांपर्यंत सर्वांनाच त्याकाळी सोपे नव्हते. त्याशिवाय पोथ्या पाण्यानि/आगिमुळे,वाळवी/कसर लागण्यापुळे खराब होणे अशिही कारणे होतिच. आणखि म्हणजे, परस्पर विरोधीमतांच्या गटांनी एकमेकाचे लिखित स्वरुपातिल वांङगमय नष्ट करणे,हे ही एक प्रबळ कारण त्याकाळी होतेच...या अश्या सर्व कारणांसाठी हे ज्ञान मुखोद्गत-पाठ ठेवावे लागले असेल.(आमच्याकडला अचुक शब्द म्हणजे-जिवंत ठेवावे लागले असेल.) आणि विशेषतः जर ते जसे च्या तसे पाठ ठेवावे लागले असेल,तर त्याला अशीच तंतोतंत शब्दपाठांतराची पद्धती असायला हवी होती. आणि म्हणुन तसे जर का एकदा पाठ झाले,आणि त्याच्या वारंवार आवृत्या* म्हणुन पाठ ठेवलेही गेले, तर वरिल कारणांनी येणारे नष्टतेचे भय बाळगावे लागत नाही, हे तर निश्चित आहे. (आज आपण हे आपल्याला हव्या त्या सर्व विषयांसाठि, हजारो प्रकारच्या रेकॉर्डिंगच्या साधनांनि करतच असतो. Happy )

आता जसेच्या तसे...म्हणजे काय हो नक्की? तर खाली दिलेले हे गणपतिस्तोत्र पहात पहात ह्या लिंकवर http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3 जाऊन हे क्लिपिंग ऐका. जेणेकरुन ह्या पद्धतिनी पाठ केले असता,जसेच्या तसे मेंदुत उमटते..म्हणजे काय होते? ते कळणे सहज होइल Happy
(गायकबियक कुणी नाही.. मीच आमच्या(उच्चार)पद्धतिनी म्हटलेलं आहे हां! Wink )
http://mfi.re/listen/zxd8acxaxqxwc2i/ganapatistotra_myself.mp3
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यमायुःकामार्थसिद्धये ॥ १॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् ।
तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥ २॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥ ३॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ॥ ४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः ।
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरः प्रभुः ॥ ५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥ ६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ ७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥ ८॥

.........................................................................................................................

आवृत्ति*:- हा वेदाध्ययनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. एकदा पाठ झालेला विषय/अध्याय..किमान २ वर्ष तरी दररोज १ आवृत्ती म्हणून जिवंत-ठेवावा लागतो. नाहितर आमच्याकडल्या प्रसिद्ध म्हणी प्रमाणे..तो नवव्या दिवशी नवा-होतो. म्हणजे अक्षरशः पुन्हा संथा-घेऊन शिकण्याच्या पातळीवर येतो. आणि असंही हे सोपं काम नसतच. नुसती ऋग्वेदाची संहिता घेतली..तरी त्यात आठ अष्टके..म्हणजे ६४ अध्याय आहेत. अध्ययन सुरु झाल्यापासून जसजसे पाठांतर वाढत जाइल..तसतसा हा आवृतीचा काळ वाढत जातो. आणि दर दोन वर्षानी समांतर होत रहातो. मग पुढे ब्राम्हण/आरण्यक्/उपनिषदे/शिक्षाचतुष्टय/ज्योतिष(फलज्योतिषवालं नव्हे!)/शास्त्र/निरुक्त असे अनेक ग्रंथोपग्रंथ पचवत, जिवंत ठेवत, अध्ययन करावे लागते..एका वेदाच्या दशग्रंथांच्या अध्ययनाला पहिल्या वर्षाला ६ तास.. इथून सुरवात होऊन..शेवटच्या वर्षाला हा शिक्षण कालावधी १६ ते १८ तासांपर्यंत जाऊन बसतो. म्हणूनच ऋग्वेदाचे दशग्रंथ पूर्ण कंठस्थ (पाठ) होण्याचा कालावधी किमान १२ वर्षे आहे.

पाठांतरातील अग्निदिव्य :- संचार जाणे .. संचार.., हा पाठांतराच्या वाटेतला अटळ सहप्रवासी आहे. आता संचार म्हणजे काय? तर एकसमान किंवा तोच तोच.. शब्द वा मंत्र ,संपूर्ण अध्ययनाच्या विषयांमधे कुठेही वारंवार येणे.. यामुळे काय होते? तर ..एका महारस्त्यावर जवळ जवळ सारखी नावं असलेले दोन फाटे असतील..तर नामसाधर्म्याच्या गोंधळामुळे, माणूस जसा या ऐवजी त्या गावात पोहोचावा. तसे काहिसे, हे सारखे-मंत्र अथवा शब्द करीत असतात. ऋग्वेदाच्या नुसत्या संहितेमधे असे हजारो संचार आहेत. नुसतं त्याच संहितेमधून वेगवेगळे पाच अध्याय व दोन सूक्त एकत्र करून निर्मिलेलं जे पंचसूक्त पवमान आहे..त्यात सुमारे आडिचशे संचार आहेत. बरं.., हे संचार म्हणजे फक्त (समान)शब्द आणि संपूर्ण अथवा अर्ध्या (समान)मंत्राचेच आहेत काय? आणि नुसते तेव्हढेच आहेत काय? तर..तसे नाही. काहि ठिकाणी तर, फक्त या अध्यायात या ओळीत विशिष्ट शब्दावर मात्रा आहे ..आणि एकदम पुढच्या कुठल्या तरी अध्यायात तोच मंत्र पण त्याच ओळिवर विशिष्ट शब्दावर (आता) मात्रा नाही, एव्हढाच फरक आहे. म्हणजे ही पवमानातली गंमत बघा. एके ठिकाणी "शुंभमा ऋतायुभि:" असे आहे,तर दुसरीकडे , "शुंभमानो ऋतायुभि:" असे आहे. परत दोन्ही कडच्या पुढच्या ओळी निसंशय वेगळ्याच असतात. आणि मग जर का हे लक्षात राहिले नाही..तर या अध्यायातून त्या अध्यायात उडी पडते. याच घडणार्‍या प्रकाराला म्हणतात, संचार-जाणे! उदाहरणा दाखल आपण आजुन एक दोन संचार पाहू .. सुदुघाहि-पयस्वती: आणि सुदुघाहि-घृतःश्चुतः.. हा शब्दाचा संचार झाला.हा ही सहज लक्षात रहातो. पण अनुस्वारांचे संचार म्हणजे,मेंदूची शस्त्रक्रीया करतांना जितकं बारीक..आणि नजर न हलता लक्ष ठेवावं लागेल..तसला भयंकर प्रकार. तो असा - पतामांतरिक्षा आणि पवंतामांतरिक्षा - या शब्दातल्या दुसर्‍या अक्षरावर ,म्हणजे व - वर ..प्रथम अनुस्वार नाही आणि नंतर पुढे, तोच अनु-स्वार-झालेला आहे!!! इतका सूक्ष्म फरक लक्षात राहाणे मुश्किल..आणि मग इकडून तिकडच्या आध्यायात उडि पडणे निश्चित! (यातलं पंचसूक्त पवमान..हे पाठ-ठेवायला अत्यंत कर्मकठिण आहे. मला स्वतःला हे पाठ झाल्यापासून सलग तिन महिने याची आवृती ठेवल्यानंतरही..पुढे पुन्हा सलग २ महिने पाठ म्हणताना, रोज २ अथवा ३ संचार-जायचेच! आणि ते ही रोज वेगवेगळे! आज ह्या गल्लीत चुकलो,की उद्या त्या गल्लीत! रामा..शिवा..आणि गोविंदा..बाकि काही नाही! )

आता आपल्या सुप्रसिद्ध रुद्रातला हा शब्दसंचार..,प्रत्यक्षच कसा-जातो..?ते पहा...
(रुद्रामधे, आकरा नमका'चे आणि आकरा चमका'चे असे एकंदर २२अनुवाक आहेत.)

यातल्या नमकाच्या पहिल्या अनुवाकातल्या तिसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनुरघोरा पापकाशिनी। आणि पुढची (वेगळी)ओळः- तयानस्तनुवा शंतमया गिरिशंता भिचाकशीहि॥

आता इथून सरळ नमकाच्या दहाव्या अनुवाकातली दुसर्‍या ऋचेतली पहिली ओळः- यातेरुद्र शिवातनु:शिवाविश्वा हभेषजी। आणि पुढची (वेगळी)ओळ:- शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥

आता यात जर का रुद्र म्हणणारा माणूस पहिल्या अनुवाकात , यातेरुद्र शिवातनु च्या पुढे शिवाविश्वा हभेषजी असे चुकून म्हणून गेला..तर त्याची पाठांतर पद्धतीमुळे मेंदूत कोरली गेलेली पुढची ओळ ही दहाव्या अनुवाकातली ,म्हणजे शिवारुद्रस्य भेषजी तयानोमृड जीवसे॥
.., हीच तोंडातून उमटणार. हा गेला संचार! आणि याच्याही अगदी उलट घडून दहाव्या अनुवाकातून पहिल्या अनुवाकात असा उलटंही तो येणार.म्हणजे - संचार जाणार!

आणि कित्तीही कुशाग्र बुद्धिमत्तेचा माणूस असला , तरी संपूर्ण एका वेदातले असे हजारो संचार लक्षात ठेवणं हे सामान्य बुद्धीमत्तेच्या बाहेरचचं काम.. मग हे काम सोप्प व्हावं म्हणून पुढे .. वेदांमधे पद/क्रम/जटा/माला/घन अशी सोय निर्माण करण्यात आली. याचा उचित वापर केला..कि हे संचारचं गाडं आडवं आलं, तरी त्याला नीट उभं करता येतं. (याविषयी पुन्हा केंव्हा तरी असच लिहिन! ) अर्थात, ज्या अध्ययनाचा आधार फक्त आणि फक्त पाठांतर हाच (राहिला)होता, त्या अतीप्राचीन (लेखनकलेची सुरवातही न झालेल्या) कालखंडात अश्या तर्‍हेच्या युक्त्या अथवा सोयी सुचणं, हे ही त्याच मानवी बुद्धीशी सुसंगतच म्हटलं पाहिजे. मग त्याचं समर्थन आजच्या आणि यापुढच्या काळात कोणत्याही पद्धतीनी अगर हेतूनी होवो.

आज हा पाठांतर पद्धतीचा छोटासा आढावा घेणारा लेख लिहुन झाला याचं समाधान एका कारणानी तर आहेच आहे.

१) वेदज्ञान.., हे त्या किंवा आजच्या अथवा पुढच्या काळात उपयोगी/अनुपयोगी .. उपकारक/अनुपकारक..असं कसंही असलं .तरी .. हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. Happy ) याशिवाय.., जे लोक:- "ह्हॅ!...हे शिकायला काय अक्कल अथवा बुद्धी लागते?" असे (कोणत्याही हेतूने) म्हणतात..त्यांना.. किमान हा लेख वाचल्यानंतर,पुन्हा असं म्हणताना,काहि क्षण थांबून विचार करावा लागेल...
धन्यवाद. Happy
===============================================
पराग दिवेकर..(हिंदू पुरोहित.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

limbutimbu

@इतक्या उत्कृष्ट विषयावरील निम्म्यापेक्षा जास्त पोस्टी या केवळ हिंदू धर्मचाली व त्यांचे समर्थन करणारा गामा कसे मूर्ख आहेत हे सिद्ध करण्याकरता व्हाव्यात व स्वतः धागाकर्ताही शेवटी " बहुसंख्य लोकेच्छेपुढे" नमुन त्यात सामिल व्हावा व गामांना लेखनबंदी करावी असे मत व्यक्त करावे यासारखी दुसरी दुर्दशा नाही. धागाकर्त्याकडून तरी हे अपेक्षित नव्हते. असो. >>> अत्यंत अपेक्षित प्रतिसाद. तुमच्यासारख्यांच्या जाणिवपूर्वक अंधत्वाचं मला पूर्वीही नवल वाटलेलं नाही. आजही वाटत नाही. असो!

आता तुम्हाला काहि प्रश्नः-
१) मी बहुसंख्येच्या लोकेच्छेपुढे नमलो.. हे तूम्हि कशाच्या आधारे म्हणता? का काहि अक्कल वापरायचीच नाही..असं जाणिवपूर्वक ठरवूनच असली बिनडोकं विधानं करायची तुम्हाला सवय आहे?
अर्थात .. , मी सुरवातीपासूनच आधुनिकतेच्या मतीचा आहे,हे धागाविषयातंही आणि प्रतिसादातंही नीट ध्वनीत झालेलं आहे,पण ते तुम्हाला नीट दिसलेलं नाही,हे नक्की. किंबहुना तुम्ही ते जाणिवपूर्वक पाहिलेलं नाही,हेच खरंही आहे. असो. आता मीच धाग्याच्या एंडिंगचं एक वाक्य देतो..त्यात डार्क केलेली ओळ लिहिण्याचा एकंदर अर्थ काय? हे सांगा.. बघू तुमची बुद्धी कीती उड्या मारते ते!

" हे ज्ञान पूर्वी आणि आजही पाठ ठेवणारे जे वेदाध्यायी आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेची जाणिव..या लेखनामुळे करवून देता आली.(एरवी..हे नुसतं सांगून शक्य नाही,आणि नसलंही पाहिजे. ) "

२) गामांना लेखनबंदी करावी,असं मत व्यक्त करण्यात चूक काय? उलट ते अत्यावश्यक आहे. स्वतःचा संबंध नसताना वाट्टेल तेव्हढे प्रतिसाद्/उपप्रतिसाद देत हा माणूस एका माहितीपुर्ण धाग्याची गाझापट्टी करतो. अश्या माणसाला लेखनबंदीच नव्हे,तर संस्थळावरून हकलून द्यायला हवं... असं वास्तविक तुमच्यासारख्या जुन्या सभासदानी म्हणायला हवं होतं. ते का म्हणत नाही?

का काहि अक्कल वापरायचीच नाही..असं जाणिवपूर्वक ठरवूनच असली बिनडोकं विधानं करायची तुम्हाला सवय आहे? <<<
याला म्हणतात र्‍हेटोरिक का कायसा प्रश्न.. Happy

अहो त्याना या संकेत स्थळावरून अनेक वेळा हाकललेले आहे . तरीही 'पुनःपि जननं , पुनःपि मरणं... "असे जपत जपत पुन्हा नव्या नावाने एथे जन्म घेतात आणि त्यांच्या संघटनेचे विषाणू येथे पसरवत असतात....

>>>> अश्या माणसाला लेखनबंदीच नव्हे,तर संस्थळावरून हकलून द्यायला हवं... असं वास्तविक तुमच्यासारख्या जुन्या सभासदानी म्हणायला हवं होतं. ते का म्हणत नाही? <<<< LOL
मी म्हणण्यापेक्षा, माझ्याबद्दलच अशी "सदिच्छा" बाळगणारे तुम्हाला भेटतील, त्यांनाच ही गळ घालावित.... Wink

अतृप्त, मी स्वतःपुरते, तुमच्या धाग्यांवर काहीही लिहीण्यापासून स्वतःला थांबवितो. इतकेच मी करू शकेन.

@मी म्हणण्यापेक्षा, माझ्याबद्दलच अशी "सदिच्छा" बाळगणारे तुम्हाला भेटतील, त्यांनाच ही गळ घालावित.... >> धन्यवाद.

@अतृप्त, मी स्वतःपुरते, तुमच्या धाग्यांवर काहीही लिहीण्यापासून स्वतःला थांबवितो. इतकेच मी करू शकेन. >>> हे हि खूप आहे. आपल्या बुद्धिमत्तेचा तळही त्यातून दिसून येतोच. फारच आभारी आहे आपला.

अतृप्त, तुम्ही तुमच्या लेखनात कट्टर धार्मिक, 'खर्‍याखुर्‍या' गुरूजींचा उल्लेख केला आहे, त्यावरून आठवलेला हा किस्सा सांगावासा वाटतो.
आमच्या काकांच्या गावाकडचे एक गुरूजी अतिशय धार्मिक आणि मुख्य म्हणजे 'परान्न न घेण्याबद्दल' प्रसिद्ध होते. कुठल्याही कार्याला ते स्वतःच्या घरून डबा आणायचे, कार्यालयातील किंवा यजमानाच्या घरातील कुठलाही अन्नपदार्थ ते घेत नसत. त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती आणि व्यवसायही जोरात चालायचा. पुढे वयोमानामुळे त्यांनी व्यवसाय बंद केला. काकांचे मित्र त्यांचे अगदी जवळचे स्नेही होते. त्यांच्याकडून काकांना नंतर कळलं की त्या गुरुजींना मधुमेह होता आणि बरीच पथ्येही होती त्यामुळे घरचे साधे अन्नच त्यांना चालू शकत होते. त्यामुळे तब्येतीवर ताबा ठेवण्यासाठी आणि यजमानाच्या घरील अन्नाचा अव्हेर त्यांना अपमानास्पद वाटेल अशा रितीने न करण्यासाठी त्यांनी 'परान्न चालत नाही' असे सगळ्यांना सांगायला सुरुवात केली, तब्येतीचे खरे कारण सांगितले नाही. त्यामुळे उलट त्यांचा भाव जास्तीच वधारला! शेजारच्या गावातूनही त्यांना बोलावणी यायची, लोक नेहमीच्या गुरु़जींना डावलून यांना बोलवायचे! तर अशी ही अंदरकी बात होती Happy

पराग जी....

तसे पाहिले तर काहीशा उशीरानेच (लेख प्रसिद्धी तारीख २५ मार्च दिसत्ये आहेच) हा लेख वाचायला घेतला. त्याला कारण म्हणजे शीर्षकावरूनच लक्षात आले की घाईघाईने हा विषय व त्याची मांडणी वाचणे म्हणजे लेखक आणि त्याच्या लेखनकौशल्याचा अपमान करण्यासारखे आहे. निवांतपणे लेख तसेच त्यानंतर इथे आलेले उत्साहवर्धक असे प्रतिसाद व त्याना पुन्हा (अत्यंत शांतचित्ताने...) तुम्ही दिलेली अभ्यासपूर्ण उत्तरे वाचणे म्हणजे बौद्धिकवाचनाची एक अत्यंत लाभदायक अशी मेजवानी मला मिळाली आहे हे विनम्रपणे आपणास सांगू इच्छितो.

मौखिकी अध्यापन पद्धती सहस्त्र वर्षापासूनच तसेच पारंपारिक असून त्याबद्दल अन्यांना (जे या ज्ञानग्रहणापासून वंचित राहिले...कारणे कोणतीही असोत, त्यांचा इथे उल्लेख नको...त्याची जरूरीही नाही) आस्थापेक्षाही जिज्ञासा वा चिकित्सा राहीली आहे. यात गैर काही नाही, उलटपक्षी कालानुरूप आपल्या अनुभवाच्या, बुद्धीच्या सीमा रुंदावण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे या विषयी मनी तहान निर्माण होणे हे देखील निसर्गनियमाला अनुसरून योग्यच होते...असते. आता मौखिकी अध्यापनाची संधी व्यापक प्रमाणात नेमकी ज्या वर्गाला मिळाली त्यानीही ती स्वतःपुरती न ठेवता इतरांनाही पोच करण्याचे अगदी पवित्र म्हटले जावे असे कार्य केले आहे. ते देवतुल्य कर्तव्य करण्यार्‍यांना अनेकविध विरोधांना तोंड द्यावे लागले, प्रसंगी रोष पत्करावा लागला हे इतिहास सांगतोच.

आज तुमच्यासारखे पुरोहित ज्ञानाची ही पोतडी जालीय माध्यमातून खुली करून अध्यापनाच्या पद्धती तसेच त्यामागील कार्यकारण भाव विशद करीत आहात ते पाहून मन संतोषाने भरून गेले आहे. चार वेद, जुनी आरण्यके, उपनिषदे, सूत्र ग्रंथ, त्यांचा कालखंड आदी प्रगतीच्या अनेक अवस्था स्पष्ट करताना पुरोहिताकडे निव्वळ मौखिक शैली असून चालत नाही तर ती लेखीरुपात द्यायची झाल्यास शब्दसामर्थ्याचे भांडारही असणे अत्यंत गरजेचे आहे. आज तुम्ही वापरलेली भाषा (लेख आणि प्रतिसादांना दिलेल्या उत्तरातील...) अभ्यासताना मला तीव्रतेने जाणवत गेले आहे की सरस्वती तुमच्यावर प्रसन्न आहे. वाचन करत असतानाच "श्री" नजरेसमोर येत गेले आणि जणू काही त्यांच्या मूर्तीसमोर बसून, हात जोडून मी हे ज्ञान घेत आहे असेच समजत गेलो....मनी आलेली ही भावना तुम्ही समजून घ्याल असे वाटते.

एका प्रतिसादकाला उत्तर देताना आपण "..ऋग्वेद हा देवतांना आवाहन करण्यास,म्हणजे मंत्र म्हणून बोलाविण्यास योग्य...." असे म्हटले आहे. पण या देवता म्हणजे आकाश, पृथ्वी, प्रभात, पाणी अशा निसर्गदेवता होत हेही स्पष्ट करायला हवे, अन्यथा सर्वसाधारणतः वाचक "देवता" नाव घेताच आपापल्या मगदुराप्रमाणे वा विश्वासाने तीन प्रमुख देवतांना नजरेसमोर आणण्याची (मला) साधार भीती वाटते. तसे झाले तर ऋग्वेदाचा अर्थच बदलून जाईल. यजुर्वेदातील शुक्ल आणि कृष्ण संप्रदायांवर काही लिखाण झाल्यास संहिता आणि गद्य प्रार्थनांचे संग्रह समजण्यास मदत होईल...सामवेद मंत्र गायनास योग्य मानला गेल्याने त्यास स्वतंत्र मूल्य असण्याचे कारण नाही...तरीही अथर्ववेदात लोकसमजुती आणि अंधश्रद्ध यांचे चित्रण असल्याने मला वाटते ऋग्वेदाची अथर्ववेद हीच दर्जेदार अशी पुरवणी आहे. अर्थात तुमच्या मूळ लेखात संथावर तुम्ही विशेष लक्ष दिले असल्याने ऋग्वेद आणि त्यातील पोटकलमे आणि व्याख्या यांचाही तुम्ही विचार यातच करावा असे मी काय कुणीच म्हणणार नाही....कारण या सर्वांचा अभ्यास तसेच मांडणी अगदी इलियड आणि ओडिसी ह्या दोन ग्रीक महाकाव्याच्या दर्जाची आणि त्याहीपेक्षा अधिकच्या व्याप्तीची असल्याने तुमच्यासारख्या अभ्यासूंचे सारे आयुष्य त्यासाठी खर्च करावे लागेल इतकी त्याची महती आहे.

विद्येच्या महासागरातून आपल्या परंपरेचा असा आनंददायी वर्षाव जालीय माध्यमाद्वारे तुम्ही अथकपणे करत राहाल हे नि:संशय...त्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, समय आणि महत्त्वाचे म्हणजे मनःशांती (जी खूप गरजेची असते एखाद्या अभ्यासकाला...) आपणास लाभो हीच सदिच्छा !

फारएण्ड,

१.
>> लिंबू, मला नाही वाटत येथे ती जी पाप-पुण्याची, त्यात भागीदार होण्याची संकल्पना आहे त्याला कोणी विरोध
>> केलेला आहे. निदान बहुतांश लोकांचा त्यावर रोख नाहीच आहे. पण त्याचा पत्नीने पतीच्या अर्ध्या वचनात राहण्याशी
>> काय संबंध?

विवाहोत्तर पतीचे अर्धे पुण्य पत्नीस मिळते आणि तिचे अर्धे पाप पतीला लागते. याच्या बदल्यात पत्नीने पतीची साथ द्यावी अशी अपेक्षा आहे. म्हणून तिला अर्धांगी म्हणतात.

२.
>> आणि लग्नाच्या वयातील मुलाने तोपर्यंत असे काय पुण्य कमावलेले असते, आणि त्या वयाच्या मुलीने तोपर्यंत असे
>> काय पाप केलेले असते?

इथे पापपुण्य ही चालू जन्मासोबत पूर्वजन्मीचीही संचिते आहेत.

आ.न.,
-गा.पै.

नीधप,

तुमचा इथला संदेश वाचला. माझ्यावर आणि धर्मावर जे आरोप झालेत त्याला उत्तर द्यावंसं वाटतं.

१.
>> वाल्या कोळ्याच्या बायकामुलांनी पापात सहभागी व्हायला नकार दिला म्हणून यच्चयावत स्त्रिया पापमय असतात
>> आणि यच्चयावत पुरूष पुण्यात्मे.
>> ज्यातून स्वतःचा जन्म झाला ते विनाशकारी तत्व.
>> असली गृहिते मांडणार्‍यांकडून लॉजिकल उत्तराची अपेक्षा?

तुम्ही सीता, तारा, मंदोदरी, सावित्री, अनसूया ही नावं ऐकलीत का हो? यांना पंचकन्या म्हणतात. दररोज सकाळी त्यांचं स्मरण केल्याने पुण्य वाढतं. कळलं कोण पुण्यवती आहे ते?

माझा स्वत:चा जन्म ज्याच्यातून झाला ते सृजनकारी आहे. पण योग्य वेळेत त्यात जीव पडला नाही तर ते विनाशकारी होतं.

२.
>> काहीही अभ्यास न करता, चार लोक सांगतायत म्हणून तेच धर्मशास्त्र असे आंधळेपणाने पण ठासून सांगणे
>> यापलिकडे वेगळं काय करतात हे लोक?

हाच मुद्दा तुम्हालाही लागू पडतो. कशाच्या आधारावर वैदिक साहित्य आणि वेदपठण करणाऱ्यांना तुम्ही सामाजिक विषमतेचे जनक बनवलंत? वेदांचा वर्णव्यवस्थेशी संबंधच काय मुळातून?

३.
>> यांच्या कुठल्याही गृहितांना समानता, विज्ञान तर सोडाच माणुसकीचाही स्पर्श नाही. आणि त्याला विरोध केला
>> धर्माला विरोध म्हणत अंगावर येणार.

तुम्हाला आधुनिक विज्ञानाची काडीइतकीही माहिती नाही. हे आधुनिक विज्ञान ज्या गणिताच्या पायावर उभं आहे त्याबद्दल तुम्हाला ओ की ठो माहीत नाही. स्वत:ला फुटक्या कवडीइतकीही माहिती नसतांना इतरांच्या आकलनावर ताशेरे झाडू नयेत.

आणि माणुसकीचं म्हणाल तर तुमचा बाई म्हणून ज्याने/जिने अपमान केला त्यांना माणुसकी नाहीये. त्यांची पावती धर्माच्या नावावर का फाडताय?

४.
>> कुणी एक पुरोहित खरोखर लॉजिकल विचार करून बदल घडवायचा प्रयत्न करतोय, अभ्यास करतोय तर हे
>> म्हणणार हा तर लोकानुनय.

मी इथे दोन महत्त्वाचे प्रश्न विचारलेत. ते असे : १. वेदांचा वर्णव्यवस्थेशी नक्की संबंध काय? २. वेदपठण करणारा जर अर्थज्ञानी नसेल (म्हणजे केवळ भारवाही असेल) तर तो शूद्राहून श्रेष्ठ का मानावा?

तुम्ही म्हणता तसा लॉजिकल विचार करून पुरोहितांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. त्यांच्याकडे नसतील तर तसं मान्य करावं. मी इतरत्र उत्तरं शोधेन.

५.
>> यांच्यामते आंधळेपणा हीच धर्मपरायणता.

आंधळेपणाने धर्म पाळला असता तर वरचे प्रश्न विचारता आले असते का?

आ.न.,
-गा.पै.

नंदिनी,

>> मूळात इथं हिरीरीनं जे "धर्माची" बाजू मांडत अहेत त्यांचा धर्माचा असा काय सखोल अभ्यास आहे?

नेमका हाच प्रश्न वर्णव्यवस्थेबाबत उत्पन्न होतोय, नाहीका? मुळात इथं हिरिरीनं जे वर्णव्यवस्थेसाठी वेदांना जबाबदार धरताहेत, त्यांचा धर्माचा असा काय सखोल अभ्यास आहे?

आ.न.,
-गा.पै.

रॉबिनहूड,

>> कोल्हापूर परिसरात बहुजन समाजातले लोक जैन झालेले दिसतात त्याचे मूळ कारण हेच आहे . यांची अमानुष बंधने.

हो? आज जैन लोकं सर्वात कडक बंधनं पाळतांना दिसतात. कोल्हापुरी जैन वेगळे आहेत होय? बरं ते जाऊदे. तुम्ही मला दिलेली लिंकपिसाट ही पदवी आवडली बरं का! Biggrin बिचाऱ्या लिंबूटिंबूंना उगीच वाईट वाटलं!

आ.न.,
-गा.पै.

सीता, तारा, मंदोदरी, सावित्री, अनसूया
...
लंडन मdhalya का ?

अहिल्या द्रौपदॅ सीता तारा मंदोदरी ... या पंचकन्या आहेत ना ?

.......

@ एका प्रतिसादकाला उत्तर देताना आपण "..ऋग्वेद हा देवतांना आवाहन
करण्यास,म्हणजे मंत्र म्हणून बोलाविण्यास योग्य...." असे म्हटले
आहे. पण या देवता म्हणजे आकाश, पृथ्वी, प्रभात,
पाणी अशा निसर्गदेवता होत हेही स्पष्ट करायला
हवे, अन्यथा सर्वसाधारणतः वाचक "देवता" नाव घेताच आपापल्या
मगदुराप्रमाणे वा विश्वासाने तीन प्रमुख देवतांना नजरेसमोर
आणण्याची (मला) साधार भीती वाटते.
तसे झाले तर ऋग्वेदाचा अर्थच बदलून जाईल. यजुर्वेदातील
शुक्ल आणि कृष्ण संप्रदायांवर काही लिखाण झाल्यास संहिता
आणि गद्य प्रार्थनांचे संग्रह समजण्यास मदत होईल...सामवेद मंत्र
गायनास योग्य मानला गेल्याने त्यास स्वतंत्र मूल्य असण्याचे कारण
नाही...तरीही अथर्ववेदात
लोकसमजुती आणि अंधश्रद्ध यांचे चित्रण असल्याने मला वाटते
ऋग्वेदाची अथर्ववेद हीच दर्जेदार
अशी पुरवणी आहे. >> अतिशय अचूक विश्लेषण. फ़क्त मी तिकडे इतका विस्तार करण योग्य समजलो नाही.

बाकी आपला संपूर्ण प्ररिसाद म्हणजे, माझ्या अंतर्मनाला मिळालेली ही एक आशिर्वादाची न संपणारी शिदोरीच आहे.. अशोकजी... आपले मन:पूर्वक धन्यवाद! __/\__

मायाबोली प्रशासनास विनंति:- गामा पैलवान यांचे अशोकजिंच्या नंतर आलेले सर्व प्रतिसाद अप्रकाशित करावेत. आणि शक्य झाल्यास सदर आय डी ला , वाचनमात्र करावे. __/\__

एकदम सुंदर लेख. प्राचिन काळात एवढे प्रचंड ग्रंथ कसे मुखोद्गत करीत असतील याबद्दल नेहमीच कुतुहल वाटायचे. हा लेख वाचल्यावर त्या पाठांतर पध्दतीची चांगली माहिती मिळाली. लेखातील मुळ विषयाचे अत्यंत तपशीलवार आणि समजण्यास सोप्या अश्या भाषेत माहिती करून दिल्याबद्दल आपले खुप खुप आभार.

संपुर्ण प्रतिसाद वाचता आले नाहीत, पण अशोकमामांचा प्रतिसाद खुप आवडला.

हे सदर धागा विषयाशी सुसंगत असे एक प्रकटन आहे. व ज्यांना घनपाठ प्रत्यक्ष ऐकण्याची इच्छा आहे,अश्यांना याचा जरुर लाभ घेता येइल. सदर घनपारायण करणारे वे.मू. निळकंठ वासुदेव जोगळेकर(गोकर्ण) यांच्याबद्द्लची माहिती तसेच हे घनपारायण म्हणजे नेमके काय? का? व कशाचे ? याचिही माहिती खालील फोटोकॉपींमधे आहे. तेंव्हा ज्यांना या विषयाचा अभ्यास करणे,माहिती घेणे कींवा कुतुहल म्हणून सदर पारायण (मिरज येथे) जाऊन ऐकणे आहे,त्यांचे साठी ही एक सुवर्णसंधी आहे. (पारायण कालावधी सुद्धा सुमारे महिनाभराचा आहे.) शिवाय घनपारायण हा नेहमी जुळून येणारा योगायोग नाही..सबब हा दुर्मिळ योगायोग आहे. तेंव्हा जरुर लाभ घ्यावा,ही विनंती.

अत्रुप्त आयडी का बदलला ...हापण छानच...मी अमानवीय Happy हल्ली सग्ळेच नाव का बदलत आहेत. माझे नाही मी कधीच बदलणार.

वेदशास्त्रसंपन्न परागशास्त्री दिवेकरांस गामा पैलवानाचा सादर साष्टांग नमस्कार.

मिरजेत घनपारायण होत आहे हे वाचून आनंद झाला. वेदमूर्ती नीळकंठ वासुदेव जोगळेकर यांच्याविषयी कौतुक, आदर आणि अभिमान वाटला. कार्य तडीस नेण्यास श्री समर्थ आहेत.

वार्ता प्रसृत केल्याबद्दल आपले विशेष आभार. Happy

आपला नम्र,
-गामा पैलवान

वयाच्या चोविसाव्या वर्षी घनपाठी होणे ही चेष्टा नव्हे. निळकंठ जोगळेकरांचे कौतुकच आहे. या त्यांच्या साधनेकडे त्यांनी अभ्यासू दृष्टीने पाहत व आधुनिक संशोधनांच्या साधनांनी त्याचा अधिक अभ्यास करावा अशी इच्छा. गोकर्णला त्यांचे कुटुंब पौरोहित्य व्यवसायात प्रसिद्ध आहे.

घनपाठावरून एक घरात ऐकलेला किस्सा: माझ्या आईचे आजोबा घनपाठी होते - काशीस राहून त्यांनी अभ्यास केला होता व त्यांचा तिथे यथोचीत सम्मान केला होता. आपल्या आई-वडिलांची सेवा करायची म्हणुन व एक व्रत म्हणुन त्यांनी गणपतिपुळ्यास स्थानसन्यास घेतला होता. म्हणजे शक्य असेतो वर गाव सोडायचे नाही. त्याकाळी गणपतिपुळ्यात केवळ ८-१० घरे होती व अतिथींचे राहणे-जेवण हे ते सेवाभावे करत असे ऐकले आहे. तर पुळ्यात काय घनपाठ वगैरे होत नसत वा त्याचा वापर करण्याची व्यावसायिक गरज पडत नसे. परंतू हे ज्ञान टिकून राहावे, विसर पडू नये म्हणुन ते आयुष्यभर रोज दुपारी देवळात बसून संथा म्हणत. हे त्यांनी आयुष्यभर केले.

माझ्या आजोबांनी म्हणजे आईच्या वडलांनी वाणी शुद्ध राहावी म्हणुन कधी संस्कृतात नसलेले उच्चार केले नाहीत. उदा. ते काफी म्हणत, कॉफी कधी म्हटले नाही. मी त्यांना एकदा विचारले की एव्हडा हेकटपणा का? तर त्यांचे उत्तर होते की भिक्षुकी हा त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय होता. त्यात असलेले सर्व बंध पाळणे हा त्यांचा धर्म होता. मग बाहेर कुठे न खाणे, व्यसन न करणे, सचोटीने वागणे, वाणी शुद्ध असणे वगैरे सर्व बंध त्यांनी पाळले. त्यांच्या व्यवसाया व इतर गोष्टींत त्यांचे माझे पटत नसले तरी हे त्यांचे बिझनेस एथिक मला आता पटते (तेव्हा मी त्यावरही वाद घालायचो).

@अत्रुप्त आयडी का बदलला ...हापण छानच...>> आत्म्याला मुक्त केले, अतृप्ती मात्र माझेबरोबरच जाणार. Wink

इथे चूकुन लिहिले ते खोडले.
पोस्टच खोडायची असल्यास अ‍ॅडमिनकडून खोडुन घेणे

इथे चूकुन लिहिले ते खोडले.
पोस्टच खोडायची असल्यास अ‍ॅडमिनकडून खोडुन घेणे

लोकहो, वेदशास्त्रसंपन्न परागशास्त्री दिवेकरांच्या विनंतीस मान देऊन सदर कथन उडविले आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान

लोकहो, वेदशास्त्रसंपन्न परागशास्त्री दिवेकरांच्या विनंतीस मान देऊन सदर कथन उडविले आहे.
आपला नम्र,
-गामा पैलवान

गामा, ते पान फक्त अल्फा लोकांनाच पाहता येतं - म्हणजे विनोदी गुलमोहोराचा भाग असलेल्या. प्रशासकांची विनोद बुद्धी, आणखी काय. मं/नि, यु-ट्युबवर घनपाठाचा भाग सापडेल. अचाट प्रकार आहे, पण थोड्याचवेळात तोचतोपणा वाटतो

Pages