अ‍ॅक्टींग तोडली !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2015 - 14:15

..
अ‍ॅक्टींग तोडली !
हा माझ्या वडीलांचा अत्यंत आवडता डायलॉग ..

त्यांची आवड म्हणजे अमिताभ !
जेव्हा तो त्याच्या स्टाईलमध्ये काही दमदार संवादफेक करायचा तेव्हा माझ्या वडिलांच्या तोंडून निघालेच पाहिजे.. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे मग मी आणि माझी आई, बरेचदा यावरून वडिलांची मस्करी करायचो ..
कोणी ओवरअ‍ॅक्टींग करत का होईना, पण जोशमध्ये काही संवाद फेकले की आम्ही मस्करीत सिरीअस होत म्हणायचो .. अ‍ॅक्टींग तोडली !

पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले आणि खरोखरच अ‍ॅक्टींग तोडली सीन समजू लागले ..
ते कोणते ते माझे मी लिहेनच, तुमचेही तुम्ही लिहा.. याच धाग्यावर Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला विषय आहे....आठवणीच्या गर्द सागरात शोध कार्य करताना 'अभिनया' ची विविध उदाहरणे नजरेसमोर आणणे फार आनंदाची बाब होऊ शकते.

दिलीपकुमार...सुचित्रा सेन...वैजयंतीमाला या त्रयीचा "देवदास'. शरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या याच नावाच्या कादंबरीचा नायक....बंगालीच काय पण जवळपास सार्‍याच भारतीय भाषांमध्ये अवतरलेला आणि प्रेमभंग झालेल्या युवकांचा अगदी आदर्श असा नायक. चित्रपटांविषयी तर वारंवार लिहिले बोलले जाते. देवदासच्या समोर पारो आणि चंद्रमुखी या दोन नायिका असल्या तरीही कथानकाचा केन्द्रबिंदू देवदास आणि त्याच्याच भोवती कॅमेरा फिरता. अशी स्थिती असतानाही "पारो" च्या भूमिकेत सुचित्रा सेन हिने एका प्रसंगात केलेला अभिनय अगदी दिलीपकुमारसारख्या दिग्गजाला मागे टाकून जातो.....पारोच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत तिच्या घरी. तिची तळमळ आहे देवदाससाठी. पण तो तर पडला जमीनदाराचा पुत्र...त्याच्या मनात तिच्याविषयी आहे प्रीति पण तो ज्येष्ठांच्या दबावात असल्याने प्रेम व्यक्त करू शकत नाही. दोघांनाही प्रेमाची जाणीव आहे. पण आता नाते तुटण्याच्या मार्गावर आहे हे पाहून पारो मध्यरात्री धीर गोळा करून आपल्या घरातून त्याच्या वाड्यात हळूच प्रवेश करते...दरवानांचे लक्ष चुकवून...देवदासाच्या खोलीत प्रवेश करते आणि झोपलेल्या देवदासच्या पायाला अगदी हळुवारपणे स्पर्श करून त्याला उठविते....तो गडबडून उठतोही...मध्यरात्री पारोला आपल्या कॉटवर बसलेले पाहून चक्रावतोही...तिथून सुरू होते केवळ पार्वतीची प्रेमाची कबुली..."देवदास मला स्वीकार....!" एवढेच तिचे मागणे...आणि या प्रसंगी सुचित्रा सेनच्या चेहर्‍यावरील भाव अगदी टिपून घ्यावेत असे अप्रतिम. आपल्या समोर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ अभिनेता आहे याची गंधवार्ताही सुचित्राजवळ नाही अशारितीने तिचा वावर.

अशोक मामा...

उत्तम सीन सांगितलात तुम्ही, सुचित्रा सेन भारी होती...जितक्या ताकदिने ती युसुफ साहेबांसमोर उभी राहिली तितक्याच ताकदिने संजीव कुमार समोर ही उभी राहिली...आंधी मध्ये संजीव कुमार च्या संयत अभिनया समोर आपला अभिनय कुठे ही लाउड न होउ देता तितकाच किंबहुना थोडा अधिक ताकदिचा अभिनय तिने उत्तम केला, चारित्र्यहननाचा आरोप लागल्यावर आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या इलेक्षन रॅली च्या सभेत आपल्या नवर्या बरोबर थेट व्यासपिठावर जाउन आपल्या वागण्याचे जस्टिफिकेशन देणे, त्या वेळी तिला नवर्याने मुक पाठिंबा देणे, आणि इलेक्षन जिंकल्यावर व्याकुळ नजरेने नवर्याला मै चलती हुं ! असे सांगणे आणि नवर्याने ही जाओ तुम, तुम्हारी वहा ज्यादा जरुरत है, मनु (त्यांची मुलगी) आयेगी तो कुछ दिन तुम्हारे पास भेज दुंगा असे सांगणे.....अ‍ॅक्टींग तोडली ! असेच सगळे सीन आहेत हे

संजीव कुमारचा अर्जुन पंडीत नावाचा चित्रपट पाहीला नसेल कोणी तर जरुर पहा!

हा माणूस इतक्या लवकर जाण्याने आपण कशाला मुकलो आहोत हे जाणवून हळहळायला होतं!

प्रसन्न...धन्यवाद.

फार मोठ्या क्षमतेची ती अभिनेत्री होती. विशेष म्हणजे कुठेही "लाऊड" न होताही केवळ संयत आणि मुद्राभिनायाला महत्त्व देवून तिने पारो साकारली....आता विषय निघालाच आहे तर सांगतो....तुम्ही हा प्रसंग आठवा की ज्यावेळी कलकत्त्याहून पदवीपरीक्षा पास होऊन देवदास गावी येतो आणि शेजारी राहाणार्‍या पारोच्या कुटुंबियांना नमस्कार करायला आलाय, त्यावेळी बालमैत्रिण पारोला भेटायची त्याला इच्छा होते आणि तिच्या आईला तो "पारो कहां है ?" असे सहज विचारतो, त्यावेळी वरच्या मजल्यावरील पारोच्या अंगची थरथर...उत्सुकता...ज्याच्याविषयी प्रेम सतत जागृत ठेवले आहे हृदयी असा तो तरुण देवदास आता आपल्या खोलीत येणार...कसे बोलायचे त्याच्याशी, कसे वागायचे...? हा भ्रमात पूर्ण बावरून गेलेली पारो...."पारो..." अशी हाक ऐकू येताच तिच्या सर्वांगाला भरलेले कापरे... सारे काही अप्रतिम...एक शब्द नाही मुखातून...बोलतात ते तिचे डोळे...चेहर्‍यावरील आतुरतेचे भाव....दिवा लावण्यासाठी पेटविलेली हाती घेतलेली आगपेटी...एक काडी... खुद्द पारोच !

बस्स....ही सुचित्रा सेन.

अशोक जी मी तो चित्रपट पाहिलेला नाही पण सुचित्रा सेन बद्दल जी माहिती आहे (आणि तुम्ही लिहीलेले जेवढे वाचले आहे Happy ) त्यावरून तुमचे निरीक्षण अचूक असणार यात शंका नाही. फक्त एक छोटा पॉइण्ट - तो देवदास १९५५ सालचा. दिलीपकुमार अगदी साधारण 'अंदाज' पासून धरला तरी या चित्रपटापर्यंत सुमारे ५-६ वर्षे इंडस्ट्रीत असावा. त्यामुळे आता आपल्याला मागे वळून पाहताना जेवढा दिग्गज वाटतो तितके त्याचे दडपण तेव्हा नसावे. साधारण त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर मधे अमिताभपुढे इतर कलाकारांना वाटत असेल तितपतच असेल ते.

मि अअ‍ॅन्ड मिसेस अय्यर मधे राहुल बोस स्वतःच्या खोट्या हनिमुन चे प्रसंग रंगवुन सांगत असतो एका कॉलेजग्रुपला आनि कोंकणा त्याच्याक्डे पाहात राहते तो सीन. शेवटी पण शांतपणे तिच्या हातात कॅमेरा रोल देऊन निघुन जातो रेल्वे स्टेशन वर तो वाला सीन.दोघही अ‍ॅक्टींग तोड कलाकार आहेत या चित्रपटा मधे.

फारएण्ड....नोंदविला तुमचा मुद्दा मी. थोडासा त्या संदर्भात खुलासा करणे योग्य मानतो मी (जरी मूळ विषयाशी संबंधित नसला तरीही...)

दिलीपकुमार १९४४ मध्ये 'ज्वारभाटा' द्वारा चित्रपटसृष्टीत आला. त्याच्या अभिनयाच्या क्षमतेची जाणीव १९४७ च्या 'मिलन' पासून झाली. १९४९ मध्ये आलेल्या "अंदाज" प्रदर्शनाला त्या त्रिकोणी प्रेमाच्या कथेने दिलीप राज नर्गिस तिघांनाही अतोनात प्रसिद्ध मिळाली होती हा तर इतिहासच झाला. अंदाजपूर्वीही नदिया के पार, मेला, अनोखा प्यार हे चित्रपटही त्याच्या भूमिकेने गाजले होते. 'अंदाज" नंतर शबनम, जोगन, बाबुल, तराना, हलचल, दीदार, संगदिल, दाग, आन, फूटपाथ....(हे सारे चित्रपट देवदास पूर्वीचे होते) या चित्रपटांतील दिलीपकुमार नजरेसमोर आणल्यास त्या काळातील सर्व ज्येष्ठ नायिकांचा तो नायक बनला होता हे दिसून येईल...नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, कामिनी कौशल, निम्मी...आदी अनेक....सार्‍या चित्रपटांना रौप्यमहोत्सवी यश लाभले होते.

"फिल्मफेअर" पारितोषिकांची सुरुवात झाली १९५४ पासून...आणि पहिलेच पारितोषिक मिळाले ते दिलीपकुमारलाच "दाग" बद्दल....परत १९५६ साली "आझाद" बद्दल.

या सर्व बोलबाल्यात सुरू झाला "देवदास"....तोही कुंदनलाल सहगल यांची स्मृती अद्याप त्या वेळेच्या रसिकांच्या मनी असताना....साहजिकच वातावरण असे होत गेले की आजच्या दिग्गज आणि कसलेल्या अभिनेत्या समोर देवदास भूमिकेचे आव्हान आले आहे...म्हणजेच सुचित्रा सेन आणि वैजयंतीमाला यांच्या नजरेत त्याची अभिनय क्षमता दिग्गजासम असेलच...असे मला वाटते....(या देवदासबद्दलही दिलीपकुमारला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचे फिल्मफेअर मिळाले होते...लगेच पुढील वर्षी पुन्हा "नया दौर" भूमिकेसाठी).

डोली सजाके रखना मधे देखील चांगला अभिनय केला आहे. विशेषतः शेवटचा सीन. जेव्हा पल्लवीची सोन्याची साखळी द्यायला अक्षय खन्ना फॅमिली सोबत येतो. सगळ्यांनी एक प्रकारचा अस्वस्थपणा/अवघडपणा सुंदर दाखवला आहे. मोहनिश बेहेल, परेश रावल, अनुपम ख्रेर, अक्षय खन्ना, अरुणा इराणी, मौसमी चॅटर्जी सगळे एकसे एक कलाकार होते. कमीत कमी संवाद असुन देखील झालेली विचित्र कोंडी दिग्दर्शक दाखवण्यात यशस्वी झालेला आहे Happy

"बस मेरे यार है" हे गाण्यात कमल हसन ने अप्रतिम अभिनय तर केलाच आहे. त्यात देखील "कोई सब जीते सब कोई हार दे ... अपनी हार है यार मेरे" या शेवटच्या वाक्यावर तो जसा काही हसतो त्यास तोड अजिबात नाही. हृदयावर तीक्ष्ण वस्तु ने चीर मारल्यासारखे ते हास्य आहे

मध्यांतरी एका धनुषचा तामिळ चित्रपट बघितला त्यात तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतो. करु का नको या दुविधेत तो असतो. त्याला आत्महत्येची भीती देखील वाटत असते. आणि आत्महत्या करायची देखील असते. नाव आठवत नाही त्या चित्रपटाचे. पण चांगला रंगवला आहे.

पुढे अक्कल आली तसे अभिनय कश्याशी खातात हे समजू लागले>>>>>>>>>

रुंन्मेश - ह्या वाक्याचा तुम्ही स्वताशीच पुन्हा पुन्हा रीव्ह्यु करावा ही विनंती.
ते जमले नाही तर गर्लफ्रेंड ला विचारा की हा समज बरोबर आहे का ते.

ऋन्मेषच्या धाग्यवर कमल हासनची तारीफ???? Proud

महानदी अख्खा सिनेमाच फार डिप्रेसिंग होता. बघवत नाही इतक्या वाईटरीत्या डोक्यात घुसतो.

एक्स्प्रेश्नच्या बाबतीत अजून एक बाप माणूस म्हणजे अर्शद वारसी. मुन्नाभाई खरंतर त्यानं तोलून धरलाय. लगे रहो मध्ये विद्या बालन "मेरे बच्चोंने भी सो सुना होगा" म्हणते त्या क्षणाला त्याचे एक्स्प्रेशन्स आणि ज्या तातडीनं तो संजय दत्तकडे येतो ते एकदम भारीये (आणि संजय टोटली नंब बसून असतो!!)

ऋग्वेद | 21 January, 2015 - 13:38 नवीन

डोली सजाके रखना मधे देखील चांगला अभिनय केला आहे. विशेषतः शेवटचा सीन. जेव्हा पल्लवीची सोन्याची साखळी द्यायला अक्षय खन्ना फॅमिली सोबत येतो. सगळ्यांनी एक प्रकारचा अस्वस्थपणा/अवघडपणा सुंदर दाखवला आहे. मोहनिश बेहेल, परेश रावल, अनुपम ख्रेर, अक्षय खन्ना, अरुणा इराणी, मौसमी चॅटर्जी सगळे एकसे एक कलाकार होते. कमीत कमी संवाद असुन देखील झालेली विचित्र कोंडी दिग्दर्शक दाखवण्यात यशस्वी झालेला आहे >>>> पूर्ण पोस्टीला अनुमोदन . विशेषतः मौसमी चॅटर्जीने अप्रतिम मुद्राभिनय केलाय

मला माहित आहे की ऐश्वर्या रय ला प्लास्टिक म्हट्ल.न जात.न. पण तरिही...

चित्रपट : मोहब्बते.

ती अमिताभ ची वाट बघत असते , ह्या आशेवर की वडील तिच्या आणि शा खा च्या प्रेमाला मान्यता देतील. आणि अमिताभ येऊन तिला सान्ग्तो की त्याने शा खा ला हाक्लून दिलेय. ज्या पधतीने ती आपली दारुण निराशा आणि दु:ख लपवून हातातले शिवणकाम सुरु करते...

मला ऐश्वर्याचा हा सीन खूप आवड्तो.

भाग मिल्खा भाग.

जेव्हा मिल्खा त्याच्या बहीणीला भेटायला येतो, तिला कोट घालतो आणि खिशात हात घातल्यावर तिला तिचे कानातले सापडतात. अक्खा सीन जबर्दस्त. हम्खास रडते मी.

(चित्रपटाचा क्लायमॅक्स असलेल्या शेवटच्या दृश्यामधील अजिंक्य देवचा अभिनय मला इथे नमूद करायचा आहे. चित्रपटाची कथा माहीत असल्याखेरीज ह्या दृश्याची परिणामकारकता समजणे अशक्य. अर्थातच चित्रपट फारच थोड्या जनतेने पाहिला असल्याने अनेकांना कथा ठाऊक नसेल असे समजून इथे आधी संपूर्ण चित्रपटाची कथाच थोडक्यात मांडत आहे.)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
============================================================================
मराठी चित्रपटः- पोरका
कलाकारः- पद्मा चव्हाण, विक्रम गोखले, अविनाश खर्शीकर, कुलदीप पवार, अजिंक्य देव, निशिगंधा वाड.
http://www.gomolo.com/poraka-movie-cast-crew/44870
============================================================================
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पद्मा चव्हाण ही काय फटकळ बाई होती प्रत्यक्षात आणि पडद्यावर देखील हे ज्यांनी तिचे मराठी चित्रपट पाहिलेत त्यांना चांगलेच ठाऊक असेल (हिंदी चित्रपटात मात्र फटकळ ऐवजी अगदीच फुटकळ भूमिका मिळायच्या. पण ते असो.). तर अशी ही पद्मा चव्हाण नेमकी विक्रम गोखलेची नायिका असलेल्या दोन्ही चित्रपटांमध्ये अगदी शांत सालस भूमिकेत दिसली. पहिला अनोळखी आणि दुसरा हा पोरका.

तर ह्या पोरका चित्रपटात विक्रम गोखले हे सैन्यात डॉक्टर असतात. त्यांच्यासोबतच त्यांचे दोन मित्र अविनाश खर्शीकर व कुलदीप पवार हे देखील सैन्यातच असतात. एकदा एका लढाईत कुलदीप पवार जखमी होतात. विक्रम गोखले त्यांना वाचवायचा आटोकाट प्रयत्न करतात परंतु यश येत नाही. कुलदीप पवार मृत्यूसमयी डॉक्टरांना आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याची विनंती करतात, या घटनेला अविनाश खर्शीकर हे देखील साक्षीला असतात.

तर पुढे डॉक्टर (विक्रम गोखले) आपले दिवंगत मित्र (कुलदीप पवार) यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांची विधवा पत्नी (पद्मा चव्हाण) हिच्यासोबत विवाह करतात. हा विवाह अर्थातच जबाबदारी च्या भावनेतून झालेला असतो. त्यानुसार विवाहानंतर आपण पद्मा चव्हाण चे पती म्हणून नव्हे तर तिच्या मुलाचे पिता म्हणूनच ह्या नात्यात राहू असे डॉक्टर स्पष्ट करतात. परंतु हा मुलगा डोक्यात 'सावत्र बाप' या संकल्पनेच्या अनुषंगाने भलते गैरसमज डोक्यात ठेवून वावरत असल्याने डॉक्टरांना कधीच आपल्या वडिलांच्या जागी मानत नाही. त्यांनी केवळ स्वतःच्या सुखासाठी मित्राच्या विधवा पत्नीला फशी पाडून स्वतःशी विवाह करणे भाग पाडले असे तो कायमच समजत राहतो. आई त्याला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न करते पण ते व्यर्थ ठरते. तो नेहमीच स्वतःला पोरका समजत राहतो.

पुढे मोठा झाल्यावर (अजिंक्य देव) तो आई व सावत्र वडिलांपासून वेगळा राहतो. सावत्र वडिलांचा द्वेष करणे अजुनही चालूच असते. त्यांच्या अनुपस्थितीत अधुनमधून आईला भेटत राहतो. स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय चालु करतो परंतु प्रचंड अपयशी ठरतो. त्याच्या कारखान्यातून उत्पादन होणार्‍या मालाला उठावच नसतो. मालाचा अतिरिक्त साठा होऊन राहतो परंतु तो न खपल्याने हातात पैसाच राहत नाही. इकडे डॉक्टर मात्र सदैव सावत्र मुलाच्या काळजीत असतात. त्याचा कारखाना चालत नाहीये तर भविष्याची चिंता म्हणून आपली बचत कधी नव्हे ती शेअर बाजारात गुंतवितात. इकडे मुलाला आईमार्फत हे समजते तर तो सावत्र वडिलांची वेड्यांत गणना करतो (चित्रपट १९९० सालचा आहे व त्या काळी मराठी माणसे शेअर बाजारात फारशी गुंतवणूक करीत नसत हे इथे समजून घ्यायला हवे). आई त्याला समजावते की त्याचा व्यवसाय चालत नसल्यानेच डॉक्टर अशी गुंतवणूक करीत आहेत, परंतु अर्थातच मुलगा हे मान्य करीत नाही.

पुढे मुलाला दूरच्या एका "क्ष' आस्थापनेकडून त्याच्या उत्पादनांकरिता मागणी येते. पुढे पुढे "क्ष" आस्थापनेकडील ही मागणी वाढतच जाते. हातात पैसा खेळू लागतो. उत्पादनाची किंमत देखील वाढू लागते. त्यानंतर इतर आस्थापनांकडून उत्पादनांना मागणी येऊ लागते. परंतु अर्थातच ह्या भरभराटीमागे त्या "क्ष" आस्थापनेच्या मागणीचाच मोठा वाटा असतो.

इकडे डॉक्टरदेखील आपली शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवत जातात. आपली जवळपास सर्वच जमा बचत त्याकरिता खर्च करतात. परंतु काही कालावधीनंतर मात्र आपण केलेली गुंतवणूक परतावा देत नसल्याचे व शेअर बाजार थंड होत असल्याचे पत्नीला सांगतात. आईमार्फत जेव्हा मुलाला ही बातमी कळते तेव्हा तो आईला मोठ्या फुशारकीने सांगतो की डॉक्टरांना कशी गुंतवणूकीची अक्कल नाही व त्यांनी आपला पैसा उधळला. याउलट आपला व्यवसाय आपल्या अक्कलहूशारीमुळे कसा जोरात चालला हे देखील तो सांगायला विसरत नाही.

पुढे पुढे डॉक्टरांची तब्येत ढासळू लागते आणि अचानक अशातच एके दिवशी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने अंत होतो. त्यांच्या मृत्युचे दु:ख न होता देखील केवळ आईला भेटण्याकरिताच मुलगा तिथे येतो तेव्हा सावत्र वडिलांच्या अंतिम इच्छेनुसार एक किल्ली व एक पत्ता असलेला कागद मिळतो. कागदावर लिहिलेल्या पत्त्यावर तो पोचतो. ते एक मोठे गोदाम असते. जवळील किल्लीने गोदामाचे दार उघडतो तर आतमध्ये त्याच्या उत्पादनाचा प्रचंड मोठा साठा केलेला असतो. ज्या अज्ञात "क्ष" आस्थापनेने त्याचे उत्पादन पुर्वी मागविलेले असते तेच इथे साठविलेले असते आणि आता तिथे मिळालेल्या माहितीनुसार ह्या सार्‍या उत्पादनावर त्याचाच हक्क राहणार असतो व आता बाजारात वाढलेल्या मागणीप्रमाणे व नव्याने वाढलेल्या दरानुसार तो आता हे उत्पादन पुन्हा बाजारात विकू शकणार असतो.

विजेचा धक्का बसल्याप्रमाणे वस्तुस्थितीची अचानक जाणीव झालेला तो मुलगा समजुन चूकतो की इतकी वर्षे आपण स्वतःला नाहक पोरका समजत होतो पण आज आपण खर्‍या अर्थाने पोरके झालो आहोत. याप्रसंगी अजिंक्य देवने टाहो फोडल्याचे जे दृश्य आहे ते खरेच हृदयद्रावक आहे.

त्रिशूल मधे..
वहिदा रहमानचा मृत्यु झाल्यानंतर अमिताभचे expressions..
रडण्याच्या सीमारेषेपासुन परत सख्त होत जाणारा त्याचा चेहरा...
जर अभिनयाचे पुस्तक असते तर त्यात धडा घालावा असा अभिनय...
https://www.youtube.com/watch?v=O5gzu4qEuU0
३:२८ ते ३:४० - १२ सेकंद..

ह्या धाग्यावर आलेले कित्येक चित्रपटातील दृषे ही खरतरं एका सुंदर चित्रपटाची अनुभुती आहेच. मला स्वतःला भावलेली काही दृषे

१) छोटा जवान चित्रपटात महेश कोठारे ज्या प्रकारे सीमेवरील परिस्थितीशी झगडून (प्रत्येक फ्रेप पाहण्यासारखी: हेमावैम)स्वतःच्या वडिलांना घेऊन येतो ते त्या लहान मुलाच्या डोळ्यातील भाव.
२) तारें जमींपर चित्रपटात दर्शील सफारी अमीर खानने कोणते चित्र काढले आहे ते पाहतो त्यावेळी त्याच्या डोळ्यातले भाव आणि नंतर फुटलेला अश्रुंचा बांध.

अजुन भरपुर आहेत पण सदमा, कोशीश आणि तारें जमीं पर भरपुर आवडीचे चित्रपट.

नंदिनी, अर्शद वारसी बद्दल सहमत. पहिल्या मुन्नाभाई मधे मुन्ना एमबीबीएस करणार म्हणून डिक्लेअर करतो, तेव्हाचे त्याचे (अ.वा. चे) एक्स्प्रेशन बघावे. मसाला चित्रपटात क्वचितच इतकी "इकॉनॉमिकल" प्रतिक्रिया बघायला मिळते Happy

दिलीपकुमार यांचं खरंच नवल वाटतं. ते योगायोगानेच या क्षेत्रात आले आणि अभिनयाची शाळा म्हणून प्रसिद्ध झाले. मग कुठलाही नवा कलाकार अभिनयात वेगळेपण दाखवू लागला की तुलना होऊ लागली. अभिनयाचे सामने रंगवले गेले. संघर्ष, विधाता मधे दिलीपकुमार - संजीवकुमार असा तर मुघल ए आझम मधे पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर होता. शक्ती मधे अमिताभ बच्चन बरोबर तर कर्मा मधे नसीरुद्दीन शाह बरोबर. एकही शब्द न बोलता डोळ्यातून व्यक्त होण्याच्या बाबतीत दिलीपसाबचा हात कुणी धरू शकत नव्हता. पुढे अमिताभ, संजीवकुमार, नसीर आदी इतर अभिनेते येईपर्यंत.

अमिताभच्या बाबतीतही असाच प्रकार होता. गिरफ्तार या सिनेमात कमल हसन आणि रजनीकांत असून अमिताभने बाजी मारली असे सगळे म्हणत.

कळू लागल्यावर हे सिनेमे पाहीले तेव्हां अभिनयाच्या बाबतीत दाद द्याविशी वाटतेच, पण यातले बरेच सिनेमे विशिष्ट अभिनेत्यासाठी लिहीलेत हे जाणवतं. नसीरुद्दीनच्या अभिनयाची जातकुळी वेगळी. स्पर्श मधले त्याचे एक्स्प्रेशन्स कसले लाजवाब आहेत. कुठेही लाऊड न होता सूक्ष्म अभिनय दाखवण्याची ताकद त्याच्यात आहे. हा सिनेमा दिलीपकुमारने किंवा अमिताभ बच्चनने कसा केला असता याची कल्पना करवत नाही. मिली, अभिमान मधला अमिताभ नंतर अमिताभकडूनही हरवला गेला. नसीरुद्दीन कमर्शियल सिनेमात सर पासून सेट झाला असावा. टाळ्या आणि शिट्ट्या घेणारा किंचित थिएट्रीकल,लार्जर दॅन लाईफ एक्स्प्रेशन्स आणि स्टायलीश संवादफेक हे स्टारला जमावं लागतं .

अर्थात हे न करताही संजीवकुमार प्रत्येक रोल मधे छाप पाडत राहीला. तो कधीही स्टार झाला नाही. तो अभिनेताच राहीला. नौकर मधलं त्याचं पल्लो लटके हे गाणं त्याच्यातल्या नर्मविनोदाची साक्ष देतं, आंधी मधला मॅनेजर त्याच्यातला संयत अभिनय दर्शवतो. बरंच काही आहे. नसीरुद्दीन ने नंतर समांतर सिनेमा सोडलाच. अफाट क्षमता असलेला हा अभिनेता नंतर अधून मधून दर्शन देत राहीला. अर्थात इश्कीया मधला त्याचा परफॉर्मन्स लाजवाबच. बलराज साहनी हे देखील अंडरप्ले करूनही लक्षात राहीले याउलट के के रैना हा एक नट नेहमीच अंडरप्ले मुळे लवकर लक्षात राहत नाही.

यातले सर्वांचे थोडे थोडे गुण कमल हसनकडे आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अफाट प्रतिभेच्या या अभिनेत्याला व्यवसायाची गणितंही ठाऊक होती, त्याचबरोबर टिपीकल साऊथचा भडक अभिनय नाकारून त्याने जम बसवला हे ही खरं. जयाप्रदा सारखी नृत्यांगनाही त्याच्यासमोर डावी वाटावी असं नृत्यकौशल्य, अंडरप्लेपासून ते लाऊड , मेलोड्रामाटीक अभिनय सुद्धा कधीच खटकणार नाही इतका सहजपणा. दुर्दैवाने हिंदी सिनेसृष्टीमधे त्याला दैवाने साथ दिली नाही. हिंदी सिनेसृष्टी एका चांगल्या अभिनेत्याच्या विलक्षण अभिनयप्रवासापासून वंचित राहीली. गिरफ्तार हा सिनेमा त्या वेळच्या लोकांना आवडला असेल, आता जर कुणी पाहीला तर या अभिनेत्यांच्या कॉमन सेन्सबद्दल शंका यावी इतका तो वाईट्ट होता. पण काय कालाय तस्मै नमः

पण यात कमल हसन वर किती अन्याय झालाय हे त्याचे सागर संगमम सारखे सिनेमे पाहील्यावर कळतं. वर महानदीचा उल्लेख झालाय. आता पाहीन तो ही सिनेमा. भाषेचा अडसर येणार नाही असं वाटतंय. इथल्या प्रतिसादावरून संजीवकुमारच्या सिनेमाची आठवण झाली. मौसम !

त्यातला संजीवकुमार विसरता येणं अशक्य !

जर अभिनयात स्टाईल देखील येते असे तुम्हाला वाटत असेल तर हा सीन नक्की बघा.. अ‍ॅक्टींग तोडलीच्या धाग्यावर स्टाईल तोडली म्हणाल..

best ever entry made by any actor in the history of the bollywood

कभी खुशी कभी गम
लिंक - https://www.youtube.com/watch?v=FI4S3X5ptsM

दृश्य तेच ते, जेव्हा शाहरूख हेलिकॉप्टर मधून उतरत धावत आपल्या घरी येतो. त्याच वेळी जयादिदींचा वात्सल्याचा सिक्स्थ सेन्स त्यांना शाहरूखच्या आगमनाची वर्दी देतो. जेव्हा सारे नाचगाण्यात मग्न असतात तेव्हा त्या एकट्याच आशेने दारावर नजर लावतात. एक नजर आईची जी आपल्या मुलाची वाट बघतेय. एक नजर जी सांगतेय माझा आतला आवाज कधी मला फसवणार नाही, आणि हा बघा आता त्या भल्यामोठ्या दरवाज्यातून माझा मुलगा आत येईल. पण तो काही दिसत नाही तसे त्या नजरेतले भाव हळूहळू बदलायला लागतात. आणि अचानक बॅग कुठेतरी अडकल्याने विलंब झालेला शाहरूख एंट्री मारतो..
ती बॅग खांद्यावर झेलत हलवत, भुरभुरणार्‍या केसांचा शाहरूख, एका बोट हलवत आईला विचारतो, "हे मां, मेरे आनेसे पहले तुम्हे हमेशा कैसे पता चल जाता है.."

शाहरूखची स्टाईल आणि जयादिदींचा अभिनय.. यांना एकाच प्लेटमध्ये सजवणारे करण जोहरचे लार्जर दॅन लाईफ दिग्दर्शन.. जर आतापावेतो बघितला नसेल तर मस्ट वॉच सीन !

कमल हसन वर अन्याय? Uhoh
मला अजिबात वाटत नाही उलट तिथे असल्याने विविध भूमिका करायला मिळाल्या हिंदीत अमिताभ जसा एकाच इमेज मधे अडकला तसे झाले असते

शक्ती मध्ये आई ( राखी ) गेल्यावर बापाला ( दिलीपकुमार) भेटायला मुलगा ( अमिताभ ) येतो, तो सीन जबरी आहे. मी अमिताभची जबरदस्त फॅन असुनही, त्या सीनमध्ये दिलीपकुमारने अमिताभवर मात केल्याचे जाणवले.
>>>
ह्या सीन करता मी शक्ती असंख्य वेळा पाहिलाय.... दिलिप कुमारला 'दादा' का म्हणतात याचा हा एकच सीन पुरावा आहे...

केवळ नि:शब्द सीन

Pages