अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 July, 2011 - 09:46

वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....

आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?

तर कितीतरी केसेस मध्ये ते उत्तर ''नाही'' असेच म्हणावे लागेल. त्यासंदर्भात हाती आलेली आकडेवारीच बरेच काही सांगून जाते. (मिळालेल्या आकडेवारीनुसार अशा किमान ३०,००० 'परित्यक्ता' वधूंच्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत, किमान १२०० वधू फक्त ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये आश्रयाला आहेत.)

कोणत्याही अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये रिस्क किंवा धोका हा असतोच. कितीही खात्री करून घेतली असली तरी सर्वच माहिती कळालेली नसते. काही माहिती लपवलेली असते. परंतु माहिती नसलेल्या स्थळी, जिथे कायदे वेगळे आहेत, ओळखीचे वा नात्याचे जवळपास कोणी नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमच्या उदरनिर्वाहासाठी व अन्य कारणांसाठी सर्वस्वी अवलंबून आहात तेव्हा हा धोका कैक पटीने वाढतो. विवाह हा विश्वासाच्या नात्यावर आधारलेला असतो असे म्हटले तरी आपल्या बाजूने हा विश्वास अधिक बळकट व्हावा, आपल्याकडून चौकशीत काही कसर राहू नये व नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. त्या दृष्टीने वाग्दत्त वर व वधू या दोघांनीही आपली माहिती एकमेकांपासून दडवून न ठेवता उघड केली पाहिजे. चौकशीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींचे संपर्क तपशील, आपल्या नोकरीचे ठिकाण, सहकारी इत्यादींची माहिती एकमेकांना द्यायला हवी.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही.

कित्येकदा लग्न होऊन परदेशात गेलेल्या वधूला तिथे गेल्यावर आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा बाई/पुरुषाशी संबंध असल्याचे कळते, किंवा नवर्‍याला दुर्धर व्यसने आहेत/ मानसिक रोग आहे हे लक्षात येते. कधी शारीरिक तर कधी मानसिक / भावनिक / वाचिक हिंसा - अत्याचारांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती उलटही असू शकते.

कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?

१. लग्नानंतर हनीमून उरकून पती परदेशी रवाना होतो, पत्नीला तिकिट पाठवितो म्हणून सांगतो. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. अनेकदा पत्नी गर्भवती असेल तर आणखी प्रश्न निर्माण होतात. (अशा किमान २०,००० वधूंनी लग्न व हनीमूननंतर आपल्या नवर्‍याला पाहिलेलेच नाही!!)

२. लग्नानंतर पत्नी पतीसमवेत परदेशी जाते, परंतु तिथे तिच्या वाट्याला छळवणूक, हिंसा, मारहाण, कोंडून ठेवणे, बलात्कार, कुपोषण/ उपासमार इ. येते. एक वेळ तिला परत भारतात जायची परवानगी सासरच्यांकडून मिळते परंतु तिची त्या पतीपासून झालेली मुले तिच्याबरोबर भारतात पाठवली जात नाहीत.

३. पत्नीच्या माहेरच्यांकडून हुंडा किंवा तत्सम रक्कम वसूल करण्यासाठी तिला तिच्या मर्जीविरुध्द परदेशात पती वा पतीच्या नातेवाईकांतर्फे ओलीस धरले जाते / डांबून ठेवले जाते. तुमची मुलगी हाती पायी धड हवी असेल तर अमकी रक्कम तमक्या ठिकाणी जमा करा अशा धमक्या दिल्या जातात. किंवा पत्नीला नांदवयची असेल तर अमुक रक्कम / मालमत्ता तमक्याच्या नावे जमा करा अशा धमक्या येतात.

४. पत्नी पतीच्या घरी सासरी पोहोचते तेव्हा तो तिथे त्याच्या मैत्रिणीबरोबर / जोडीदाराबरोबर राहत आहे असे लक्षात येते. त्याने केवळ आपल्या आईवडिलांच्या म्हणण्याखातर हे लग्न केलेले असते. अशा परिस्थितीत जर पत्नीकडे स्वतःचे आर्थिक स्रोत नसतील व ती पतीवर अवलंबून असेल तर पत्नीपुढे असलेले ते महासंकटच ठरते.
तिथे जर तिला काही कायदेशीर मदत / आधार नसेल, कोणाची ओळख नसेल तर आणखी संकट!

५. पतीने लग्नाचे वेळी जर त्याची नोकरी, पगार, लग्नाविषयीचे त्याचे स्टेटस, मालमत्ता यांविषयी खोटी माहिती दिली असेल तरी त्यामुळे फसवणूक झालेल्याही अनेक केसेस आहेत.

६. त्या त्या देशातील घटस्फोटाविषयीच्या उदार कायद्यांचा आधार घेऊन पतीने पत्नीस तिच्या संमती विरुध्द, तिच्या अनुपस्थितीत, तिला अंधारात ठेवून घटस्फोट दिला असल्याच्याही अनेक केसेस आढळतात.

७. अनेक पीडित स्त्रियांनी नंतर नवरा किंवा सासरच्या मंडळींवर हुंडा मागणे अथवा लग्नानंतर केलेल्या अत्याचारांबाबत फौजदारी दावे ठोकले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की जोवर पती भारतात येत नाही, समन्स/ अटकेच्या वॉरंटला प्रतिसाद देत नाही तोवर त्या दाव्याचे पुढे काहीही होणार नाही.

८. अनेक स्त्रियांना आपल्या मुलांच्या कस्टडीसाठी किंवा पोटगीसाठी कोर्टात अतिशय कडवा लढा द्यावा लागला.
काहींवर स्वतःच्याच मुलांना जबरदस्ती पळवून नेण्याचे आरोप ठोकले गेले व त्याविरुध्द लढा द्यावा लागला.

९. काही स्त्रियांना भारताखेरीज अन्य देशात लग्न करण्यास भाग पाडले गेले व नंतर लक्षात आले की तिथे लग्न केल्यावर भारतातील न्यायालयांकडे त्याबद्दल फारच मर्यादित अधिकार आहेत.

१०. लग्नानंतर पती परदेशी जातो. पत्नी नंतर जाते. तिथे तिला एअरपोर्टवर आणायला कोणीच आलेले नसते. नवर्‍याने दिलेला पत्ता/ फोन इत्यादी सर्व खोटे असते किंवा तो गायब झालेला असतो. (काही केसेसमध्ये पती पत्नीचे सर्व सामान - तिची कागदपत्रे, कपडे, दागदागिन्यांसह ताब्यात घेतो व गायब होतो असेही घडलेले आहे.)

आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.

त्यानुसार वधू/ वधूच्या कुटुंबियांनी

काय करावे?

१. वर/ वधू ची इत्यंभूत चौकशी करावी. त्यांचे आर्थिक स्टेटस, वैवाहिक स्थिती (अविवाहित/ घटस्फोटित/ विधुर / विभक्त इ.), नोकरीचे तपशील, क्वालिफिकेशन, पगार, ऑफिसचा पत्ता, कोणत्या कंपनीत नोकरी, त्या कंपनीची स्थिती, इमिग्रेशन स्टेटस, व्हिसाचे तपशील, त्या देशात लग्नाचा जोडीदार नेण्याची परवानगी आहे / नाही इत्यादी.

२. आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, निवासी पत्ता, कौटुंबिक तपशील, व्हिसाचे तपशील, व्होटर आहे/ कसे, सोशल सिक्युरिटी नंबर याची चौकशी.

३. लग्नेच्छुक मुलामुलीना परस्परांना भेटून मोकळेपणाने बोलण्याची, वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात प्रश्न टळू शकतात. मुलाच्या/ मुलीच्या परिवाराशी नियमित संपर्कात रहावे.

४. भारतात धार्मिक लग्न विधींबरोबरच ते रजिस्टर्ड करण्याचे बघावे. लग्नाचे फोटोग्राफ्स, चित्रफिती पुरावा म्हणून असू द्याव्यात.

५. ज्या देशात मुलगी वधू म्हणून रवाना होत असेल त्या देशाचे कायदे, खास करून कौटुंबिक अत्याचाराविरुध्द चे कायदे असतील त्यांच्याबद्दल तिला माहिती असावी. जर अशा अत्याचाराला तिला तोंड द्यावे लागले तर तिला तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा / सुविधा मिळू शकते हेही माहिती असावे.

६. जर वधू ला असा अत्याचार (शारीरिक/ मानसिक/ वाचिक/ भावनिक/ आर्थिक/ लैंगिक) सहन करावा लागत असेल तर तिने त्याविषयी तिच्या विश्वासातील लोकांना सांगितलेच पाहिजे.

७. पत्नी/ वधूने स्वतःच्या नावाचा वेगळा बँक अकाऊंट आपल्या निवासस्थानाजवळच्या बँकेत खोलावा.

८. परदेशी राहणार्‍या नवविवाहितेने नवर्‍याचे एम्प्लॉयर्स, शेजारी, नातेवाईक, मित्र, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस, भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील स्वतःजवळ ठेवावेत.

९. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (व्हिसा, पासपोर्ट, बँक कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, लग्नाचे सर्टिफिकेट, इतर कागदपत्रे) छायांकित प्रती भारतात/ तुमच्या विश्वासाच्या माणसांकडे/ नात्यात ठेवून द्या.
या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपीही तुमच्याजवळ / तुमच्या विश्वासू व्यक्तीजवळ असू द्यात.

१०. तुमच्या नवर्‍याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची (व्हिसा, पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर, मालमत्तेचे तपशील, व्होटर कार्ड क्रमांक इत्यादी) प्रतही शक्य असल्यास जवळ ठेवा.

काय करू नये?

१. घाईघाईत काहीही निर्णय घेऊ नका, तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.

२. विवाहाचा उपयोग ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी/ परदेशी स्थायिक होण्यासाठी किंवा अन्य तत्सम फायदेशीर योजनांसाठी करू नका, तशा योजनांना बळी पडू नका.

३. लग्नासारखी गंभीर बाब फोन/ इमेल वरच्या संपर्काने ठरवू नका. प्रत्यक्ष मुलाला/ मुलीला व कुटुंबियांना भेटून, बोलून, इत्यंभूत चौकशी करून मगच काय तो निर्णय घ्या.

४. नुसत्या वरवरच्या देखण्या चित्राला भुलू नका. व्यवस्थित चौकशी करा, मगच होकार द्या.

५. जेव्हा मॅरेज ब्यूरो/ संकेतस्थळ/ मध्यस्थांमार्फत लग्न ठरते तेव्हा त्यांच्याकडील वधू/ वराचे तपशील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.

६. गुप्तपणे लग्नाच्या वाटाघाटी करणे टाळा. त्या लग्नाबाबत जितक्या लोकांना समजेल तेवढे चांगले. त्यानिमित्ताने मुला/मुलीची खरी माहिती कळायला मदत होईल.

७. परदेशांत लग्न करणे टाळा.

८. हुंडा किंवा तत्सम मागण्यांना परदेशस्थ जावई/ मुलीच्या सासरच्या मंडळींनी पुढे केल्यास गप्प बसू नका व त्यांना बळी पडू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना संपर्क साधा.

९. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या क्रौर्याचे बळी ठरू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना / क्रमांकांना संपर्क साधा.

१०. परदेशी जाण्याच्या खटपटीत कोणतीही कागदपत्रे नकली बनवू नका. किंवा कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नका.

११. नवरा राहत असेल त्या देशातील विवाहासंबंधातील कायदेशीर कारवाईत भाग घेणे टाळा. तुम्ही स्वदेशी नवर्‍यावर कोर्टात केस फाईल करू शकता. खास करून घटस्फोटाची केस.

१२. परदेशात तुमच्या पतीने तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत व तुम्हाला अंधारात ठेवून तेथील कोर्टानुसार घटस्फोट दिला तरी तो भारतात ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्ही त्या केसमध्ये सहभाग घेतला असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.

१३. नवरा किंवा सासरच्या मंडळींची बदनामी करणे टाळा, कारण ते तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकू शकतात. जे वास्तव आहे तेच बोला, आणि योग्य मंडळींसमोर : उदा : वकील, पोलिस, सोशल वर्कर, न्यायालय इत्यादी.

१४. कोणत्याही कारणास्तव कायदा स्वतःच्या हातात घेणे टाळा, व सूड उगवण्यासाठी अविचारी, हिंसक, बेकायदेशीर कृत्ये करू नका. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधा. खोट्या तक्रारी नोंदवू नका.

परदेशांतील भारतीय महिलांच्या संघटना / मैत्री संस्था/ मदत संस्थांचे पत्ते व इतर तपशील :

list_indian_women.pdf (115.95 KB)

तुम्ही एन आर आय सेलकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता :

http://ncw.nic.in/NRICell/frmNRIComplaints.aspx

तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते?

१. तक्रार नोंदविली गेल्याची पावती मिळते. तक्रारकर्त्यास त्याच्या नोंदविल्या गेलेल्या तक्रारीचा क्रमांक मिळतो, जो पुढील संदर्भ व कारवाईसाठी महत्त्वाचा असतो.

२. तक्रारीची नोंद झाल्यावर तिची तपासणी होते. त्यात कितपत तथ्य आहे, काय वास्तव आहे इत्यादींची पडताळणी केली जाते. त्यासाठी संबंधित पार्टीजना प्रश्न विचारले जाऊ शकतात.

३. कारवाई

अ] समुपदेशन : पीडित व्यक्तीला समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे तिला तिचे कायद्याच्या दृष्टीने भवितव्य, तसेच इतर उपलब्ध पर्याय यांची माहिती करून दिली जाते.

आ] मध्यस्थांमार्फत वाद मिटविणे : एन आर आय सेलमार्फत मध्यस्थांकरवी जोडीदाराशी ऑडियो/ व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा वार्तालाप करून किंवा व्यक्तिशः संपर्क साधून मध्यस्थी केली जाते.

इ] संबंधित वादाची सेटलमेन्ट करणे : ह्यात परिस्थितीनुसार, नवरा-बायकोच्या संमतीनुसार, कायदेशीर कारवाई निश्चित केली जाते. ती त्या देशात की भारतात हेही परिस्थिती, संमती इत्यादींनुसार बदलते. मध्यस्थीत अपयश आल्यास पत्नीला तिचे कायदेशीर हक्क समजावून दिले जातात आणि तिच्या मर्जी व संमतीनुसार तिला कायदेशीर कारवाई करण्यास मदत केली जाते.

तसेच त्याच वेळी एन आर आय सेल हेही कार्य करते :

क] त्या त्या राज्याच्या शासनाशी व पोलिसांशी कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने संपर्क करणे
ख] त्या राज्याच्या महिला आयोगाशी त्या केसला फॉलो करण्याचे दृष्टीने संपर्क साधणे
ग]परदेशातील सेवाभावी संस्था, मिशन्सच्या सहयोगाने त्या पीडित महिलेला सुरक्षित आश्रय, मध्यस्थी, सुरक्षा मिळवून देणे.
घ] लूक आऊट कॉर्नर नोटिस बजावण्याची, समन्स बजावण्याची शिफारस करणे.
च] क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १८८, २८५ व्या कलमांन्वये, पासपोर्ट कायद्यानुसार व अन्य कायद्यांनुसार कारवाईची शिफारस करणे.

संपर्क तपशील :

Contact for NRI Marriages Case

Mailing Address :
NRI Cell, National Commission for women
4, Deen dayal upadhya Marg,
New Delhi -110002

Telephone Numbers : +91 - 11 - 23234918
Fax : +91 - 11 –23236154/ 23236988
Email : nricell-ncw@nic.in

वरील माहितीत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे, माहितीची भर घातल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद!

-- अरुंधती

माहिती स्रोत : राष्ट्रीय महिला आयोग संकेतस्थळ : http://ncw.nic.in/default.aspx

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच उपयुक्त माहिती.
आकडेवारी अन वेगवेगळ्या केसेस बद्दल वाचून धक्का बसला.

बापरे ! ही माहिती आणि त्यापेक्षा आकडेवारी धक्कादायक आहे. मायबोलीसारख माध्यम फारक तोकड आहे अकु. इतर वर्तमान पत्र आणि अन्य माध्यमांच्या मार्फत ही माहिती जनसामान्यांच्या पुढे यायला हवी.

ही माहिती किती उपयुक्त आहे हे नव्याने या विषयाकडे पाहणार्‍याला तर कळेलच पण तीव्रतेने जाणवेल त्याना जे किंवा ज्यांचे नातलग अशा प्रकरणात फसले गेले आहेत. मी स्वतः अशा एक फसवणुकीच्या केसचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. वाईट इतकेच की नात्यातील जी मुलगी यात होरपळली ती फिजिक्स विषयात एम.एस्सी. असूनही केवळ मुलगा परदेशस्थ आहे आणि असे स्थळ आले म्हणून बहकली, अन् वाहवत गेले ते तिचे चक्क सरकारी अधिकारी असलेले वडील आणि माध्यमिक शाळेत शिक्षिका असलेली आई. केवळ एका मध्यस्थाने ई-मेल करून डेटा पाठविला आणि तो या मूर्ख मातापित्यांनी 'अ‍ॅक्सेप्ट' केला आणि त्यावर कडी म्हणजे विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या त्या विदुषीसम मुलीनेही मेलमधील मजकुराची Authenticity तपासण्याची दक्षता घेतली नाही. तो परदेशस्थ होता इतकीच बाब सत्य होती, बाकी सगळे आयाराम-गयारामच.

मध्यस्थाला तरी काय दोष द्यायचा ? आचार्य अत्रे यानी १९६० च्या आगेमागे 'तो मी नव्हेच' मधून अशा मध्यस्थ गंगुताई घोटाळे यांची जालिम ओळख करून दिली असूनही आज त्या नाटकाला ५० वर्षे झाली तरी आम्ही काहीही शिकलो घेतला नाही हाच धडा त्या एम.एस्सी. मुलीला मिळाला.

(सदर प्रकरण आता कोर्टात असल्याने जास्त तपशील देणेही अनुचित ठरेल म्हणून थांबतो)

पण आता अरुंधती कुलकर्णी यांचा या विषयावर इतका सविस्तर लेख वाचल्यानंतर पटले की आजही अंधारात कुणीतरी कंदील घेऊन वाट दाखविण्यास तयार आहेत. हा लेख मी कॉपी करून वरील केसमधील मुलीसारख्या हुरळून जाणार्‍या फॅमिलाना जरूर वेळीच दाखविण....जर लेखिकेची परवानगी असेल तर.

धन्यवाद.

चांगली माहिती दिलीस अकु. वेळोवेळी पुढाकर घेऊन वेगवेगळ्या विषयांवर बाफ काढणे, योग्य ती माहिती देणे ह्याबद्दल तुझे खरच कौतुक आहे.

अत्यंत उपयोगी माहिती.
खरे तर या लेखाची प्रत प्रत्येक वधूवर सुचक मंडळात नोंद करणार्‍या सभासदाला द्यायला हवी म्हणजे परदेशात लग्न करण्यापुर्वी काय करायचे याची माहिती मिळेल.
सध्या बरेच लोक जागृत झालेले दिसतात व परदेशात डोळे मिटून लग्न करायला तयार होत नाहीत हे चांगलच आहे.
अवांतर : याचा साइड इफेक्ट असा आहे की जे प्रामाणिक लग्नेच्छु लोक परदेशात आहेत त्यांची लग्न जमायला त्रास होतो. लोक त्यांच्यावर विश्वास टाकायला तयार होत नाहीत.
माझे स्वतःचे असे किमान तिन-चार मित्र आहेत ज्यांची लग्न जमायला अडचण येतेय कारण ते परदेशात आहेत.

अकु खुप चांगला, उपयुक्त लेख !
सिंडरेला>>>वेळोवेळी पुढाकर घेऊन वेगवेगळ्या विषयांवर बाफ काढणे, योग्य ती माहिती देणे ह्याबद्दल तुझे खरच कौतुक आहे.<<< अगदी, अगदी.
धन्स अकु.

यांची लग्न जमायला अडचण येतेय कारण ते परदेशात आहेत. >> माझ्याही दोन तीन गुलटी मित्रांचे लग्न झाले नाही कारण त्या मुली इकडे यायला तयार नाहीत असे त्या त्या मित्राचे म्हणने आहे. तेंव्हा मी ही चमकलो होतो. Happy पालकांच्या मनोवृत्तीत बदल होत आहे हे नक्की.

गेल्या तीन चार वर्षापासून परदेशात लग्न करून जायचे व राहाय्चे खूप कमी झाले आहे. कारणे बरीच आहेत. मुली पण जॉब नाही तर करियर करत आहेत त्यामुळे त्यांना आपले करियर सोडून केवळ एच ४ वर यावे वाटत नाही. भारतीय स्त्रीयांसाठी हा खूप चांगला बदल आहे. शिवाय मिळणारे पैसे ह्यात फारशी तफावत राहिली नाही. इथे एकाच्या पगारापेक्षा तिथे दोघे कमावतात व खूप चांगले राहतात, शिवाय परदेशातील सगळ्या गोष्टी तिथे मिळतात. (धुळ अन धुर सोडून Happy )

अरूंधती लेख चांगला व महत्त्वाच्या विषयावर आहे.

२००२ साली आमच्या HR ने त्याच्या बायकोला ठोकून काढले, दोघेही भारतीय. तिने बाथरूम मध्ये जाऊन ९११ लावला, केस झाली, तो जेल मध्ये आहे.
आणखी ओळखीच्यापैकी एक, तो बायकोला मारतो असे घरून कळाले, ती अजूनही सहन करते. दोघेही उच्चविद्याभूषीत वगैरे . मुलगा अमेरिकेत आहे म्हणून लग्न केले.

निव्वळ मूर्खशिरोमनी लोक आहेत असे.

अकु, खूपच छान आणि उपयोगी माहिती. अनेक दिवसापासून हे सगळा लिहून रुनी म्हणते त्याप्रमाणे भारतातल्या वधू-वर सूचक मंडळांकडे पाठवायचं मनात होतं. पण काही कारणाने लिहिण झालं नाही आणि दुसरं म्हणजे काही जणांचं असं म्हणणं पडलं की ती मंडळे असलं काही चालवून घेणार नाहीत कारण त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
पण आता विषय सुरु झालाच आहे तर नक्कीच अपेक्षा आहे की आपल्या सगळ्या जागरूक संयुक्ता भगिनींनी आपापल्या परीने प्रयत्न करून मुली व त्यांच्या पालकांना या गोष्टींची जाणिव करून द्यावी व अमेरिकेत असलेल्यांनी अशा कठिण परिस्थितीत असलेल्यांना मदत करावी.

अकु- खूप खूप धन्यवाद.
सिंडरेला आणि रुनीला अनुमोदन.

केदार- अरे बापरे.

सुरेख माहिती.

भारतीयांशी लग्न संबंध करताना अनिवासी/ परदेशस्थ भारतीयांनी काय खबरदारी घ्यावी? कारण त्यांनाही देशी झटके बसू शकतात. अ‍ॅसेट्स कसे प्रोटेक्ट करावेत? मला तर अमेरिकेतला प्रीनप प्रकार फार आवड्तो.
एक चुक झाली तरी त्याची झळ जीवनाच्या इतर भागांना बसू नये असे काहीतरी.

Pages