अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 July, 2011 - 09:46

वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....

आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?

तर कितीतरी केसेस मध्ये ते उत्तर ''नाही'' असेच म्हणावे लागेल. त्यासंदर्भात हाती आलेली आकडेवारीच बरेच काही सांगून जाते. (मिळालेल्या आकडेवारीनुसार अशा किमान ३०,००० 'परित्यक्ता' वधूंच्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत, किमान १२०० वधू फक्त ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये आश्रयाला आहेत.)

कोणत्याही अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये रिस्क किंवा धोका हा असतोच. कितीही खात्री करून घेतली असली तरी सर्वच माहिती कळालेली नसते. काही माहिती लपवलेली असते. परंतु माहिती नसलेल्या स्थळी, जिथे कायदे वेगळे आहेत, ओळखीचे वा नात्याचे जवळपास कोणी नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमच्या उदरनिर्वाहासाठी व अन्य कारणांसाठी सर्वस्वी अवलंबून आहात तेव्हा हा धोका कैक पटीने वाढतो. विवाह हा विश्वासाच्या नात्यावर आधारलेला असतो असे म्हटले तरी आपल्या बाजूने हा विश्वास अधिक बळकट व्हावा, आपल्याकडून चौकशीत काही कसर राहू नये व नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. त्या दृष्टीने वाग्दत्त वर व वधू या दोघांनीही आपली माहिती एकमेकांपासून दडवून न ठेवता उघड केली पाहिजे. चौकशीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींचे संपर्क तपशील, आपल्या नोकरीचे ठिकाण, सहकारी इत्यादींची माहिती एकमेकांना द्यायला हवी.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही.

कित्येकदा लग्न होऊन परदेशात गेलेल्या वधूला तिथे गेल्यावर आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा बाई/पुरुषाशी संबंध असल्याचे कळते, किंवा नवर्‍याला दुर्धर व्यसने आहेत/ मानसिक रोग आहे हे लक्षात येते. कधी शारीरिक तर कधी मानसिक / भावनिक / वाचिक हिंसा - अत्याचारांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती उलटही असू शकते.

कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?

१. लग्नानंतर हनीमून उरकून पती परदेशी रवाना होतो, पत्नीला तिकिट पाठवितो म्हणून सांगतो. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. अनेकदा पत्नी गर्भवती असेल तर आणखी प्रश्न निर्माण होतात. (अशा किमान २०,००० वधूंनी लग्न व हनीमूननंतर आपल्या नवर्‍याला पाहिलेलेच नाही!!)

२. लग्नानंतर पत्नी पतीसमवेत परदेशी जाते, परंतु तिथे तिच्या वाट्याला छळवणूक, हिंसा, मारहाण, कोंडून ठेवणे, बलात्कार, कुपोषण/ उपासमार इ. येते. एक वेळ तिला परत भारतात जायची परवानगी सासरच्यांकडून मिळते परंतु तिची त्या पतीपासून झालेली मुले तिच्याबरोबर भारतात पाठवली जात नाहीत.

३. पत्नीच्या माहेरच्यांकडून हुंडा किंवा तत्सम रक्कम वसूल करण्यासाठी तिला तिच्या मर्जीविरुध्द परदेशात पती वा पतीच्या नातेवाईकांतर्फे ओलीस धरले जाते / डांबून ठेवले जाते. तुमची मुलगी हाती पायी धड हवी असेल तर अमकी रक्कम तमक्या ठिकाणी जमा करा अशा धमक्या दिल्या जातात. किंवा पत्नीला नांदवयची असेल तर अमुक रक्कम / मालमत्ता तमक्याच्या नावे जमा करा अशा धमक्या येतात.

४. पत्नी पतीच्या घरी सासरी पोहोचते तेव्हा तो तिथे त्याच्या मैत्रिणीबरोबर / जोडीदाराबरोबर राहत आहे असे लक्षात येते. त्याने केवळ आपल्या आईवडिलांच्या म्हणण्याखातर हे लग्न केलेले असते. अशा परिस्थितीत जर पत्नीकडे स्वतःचे आर्थिक स्रोत नसतील व ती पतीवर अवलंबून असेल तर पत्नीपुढे असलेले ते महासंकटच ठरते.
तिथे जर तिला काही कायदेशीर मदत / आधार नसेल, कोणाची ओळख नसेल तर आणखी संकट!

५. पतीने लग्नाचे वेळी जर त्याची नोकरी, पगार, लग्नाविषयीचे त्याचे स्टेटस, मालमत्ता यांविषयी खोटी माहिती दिली असेल तरी त्यामुळे फसवणूक झालेल्याही अनेक केसेस आहेत.

६. त्या त्या देशातील घटस्फोटाविषयीच्या उदार कायद्यांचा आधार घेऊन पतीने पत्नीस तिच्या संमती विरुध्द, तिच्या अनुपस्थितीत, तिला अंधारात ठेवून घटस्फोट दिला असल्याच्याही अनेक केसेस आढळतात.

७. अनेक पीडित स्त्रियांनी नंतर नवरा किंवा सासरच्या मंडळींवर हुंडा मागणे अथवा लग्नानंतर केलेल्या अत्याचारांबाबत फौजदारी दावे ठोकले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की जोवर पती भारतात येत नाही, समन्स/ अटकेच्या वॉरंटला प्रतिसाद देत नाही तोवर त्या दाव्याचे पुढे काहीही होणार नाही.

८. अनेक स्त्रियांना आपल्या मुलांच्या कस्टडीसाठी किंवा पोटगीसाठी कोर्टात अतिशय कडवा लढा द्यावा लागला.
काहींवर स्वतःच्याच मुलांना जबरदस्ती पळवून नेण्याचे आरोप ठोकले गेले व त्याविरुध्द लढा द्यावा लागला.

९. काही स्त्रियांना भारताखेरीज अन्य देशात लग्न करण्यास भाग पाडले गेले व नंतर लक्षात आले की तिथे लग्न केल्यावर भारतातील न्यायालयांकडे त्याबद्दल फारच मर्यादित अधिकार आहेत.

१०. लग्नानंतर पती परदेशी जातो. पत्नी नंतर जाते. तिथे तिला एअरपोर्टवर आणायला कोणीच आलेले नसते. नवर्‍याने दिलेला पत्ता/ फोन इत्यादी सर्व खोटे असते किंवा तो गायब झालेला असतो. (काही केसेसमध्ये पती पत्नीचे सर्व सामान - तिची कागदपत्रे, कपडे, दागदागिन्यांसह ताब्यात घेतो व गायब होतो असेही घडलेले आहे.)

आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.

त्यानुसार वधू/ वधूच्या कुटुंबियांनी

काय करावे?

१. वर/ वधू ची इत्यंभूत चौकशी करावी. त्यांचे आर्थिक स्टेटस, वैवाहिक स्थिती (अविवाहित/ घटस्फोटित/ विधुर / विभक्त इ.), नोकरीचे तपशील, क्वालिफिकेशन, पगार, ऑफिसचा पत्ता, कोणत्या कंपनीत नोकरी, त्या कंपनीची स्थिती, इमिग्रेशन स्टेटस, व्हिसाचे तपशील, त्या देशात लग्नाचा जोडीदार नेण्याची परवानगी आहे / नाही इत्यादी.

२. आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, निवासी पत्ता, कौटुंबिक तपशील, व्हिसाचे तपशील, व्होटर आहे/ कसे, सोशल सिक्युरिटी नंबर याची चौकशी.

३. लग्नेच्छुक मुलामुलीना परस्परांना भेटून मोकळेपणाने बोलण्याची, वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात प्रश्न टळू शकतात. मुलाच्या/ मुलीच्या परिवाराशी नियमित संपर्कात रहावे.

४. भारतात धार्मिक लग्न विधींबरोबरच ते रजिस्टर्ड करण्याचे बघावे. लग्नाचे फोटोग्राफ्स, चित्रफिती पुरावा म्हणून असू द्याव्यात.

५. ज्या देशात मुलगी वधू म्हणून रवाना होत असेल त्या देशाचे कायदे, खास करून कौटुंबिक अत्याचाराविरुध्द चे कायदे असतील त्यांच्याबद्दल तिला माहिती असावी. जर अशा अत्याचाराला तिला तोंड द्यावे लागले तर तिला तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा / सुविधा मिळू शकते हेही माहिती असावे.

६. जर वधू ला असा अत्याचार (शारीरिक/ मानसिक/ वाचिक/ भावनिक/ आर्थिक/ लैंगिक) सहन करावा लागत असेल तर तिने त्याविषयी तिच्या विश्वासातील लोकांना सांगितलेच पाहिजे.

७. पत्नी/ वधूने स्वतःच्या नावाचा वेगळा बँक अकाऊंट आपल्या निवासस्थानाजवळच्या बँकेत खोलावा.

८. परदेशी राहणार्‍या नवविवाहितेने नवर्‍याचे एम्प्लॉयर्स, शेजारी, नातेवाईक, मित्र, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस, भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील स्वतःजवळ ठेवावेत.

९. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (व्हिसा, पासपोर्ट, बँक कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, लग्नाचे सर्टिफिकेट, इतर कागदपत्रे) छायांकित प्रती भारतात/ तुमच्या विश्वासाच्या माणसांकडे/ नात्यात ठेवून द्या.
या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपीही तुमच्याजवळ / तुमच्या विश्वासू व्यक्तीजवळ असू द्यात.

१०. तुमच्या नवर्‍याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची (व्हिसा, पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर, मालमत्तेचे तपशील, व्होटर कार्ड क्रमांक इत्यादी) प्रतही शक्य असल्यास जवळ ठेवा.

काय करू नये?

१. घाईघाईत काहीही निर्णय घेऊ नका, तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.

२. विवाहाचा उपयोग ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी/ परदेशी स्थायिक होण्यासाठी किंवा अन्य तत्सम फायदेशीर योजनांसाठी करू नका, तशा योजनांना बळी पडू नका.

३. लग्नासारखी गंभीर बाब फोन/ इमेल वरच्या संपर्काने ठरवू नका. प्रत्यक्ष मुलाला/ मुलीला व कुटुंबियांना भेटून, बोलून, इत्यंभूत चौकशी करून मगच काय तो निर्णय घ्या.

४. नुसत्या वरवरच्या देखण्या चित्राला भुलू नका. व्यवस्थित चौकशी करा, मगच होकार द्या.

५. जेव्हा मॅरेज ब्यूरो/ संकेतस्थळ/ मध्यस्थांमार्फत लग्न ठरते तेव्हा त्यांच्याकडील वधू/ वराचे तपशील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.

६. गुप्तपणे लग्नाच्या वाटाघाटी करणे टाळा. त्या लग्नाबाबत जितक्या लोकांना समजेल तेवढे चांगले. त्यानिमित्ताने मुला/मुलीची खरी माहिती कळायला मदत होईल.

७. परदेशांत लग्न करणे टाळा.

८. हुंडा किंवा तत्सम मागण्यांना परदेशस्थ जावई/ मुलीच्या सासरच्या मंडळींनी पुढे केल्यास गप्प बसू नका व त्यांना बळी पडू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना संपर्क साधा.

९. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या क्रौर्याचे बळी ठरू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना / क्रमांकांना संपर्क साधा.

१०. परदेशी जाण्याच्या खटपटीत कोणतीही कागदपत्रे नकली बनवू नका. किंवा कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नका.

११. नवरा राहत असेल त्या देशातील विवाहासंबंधातील कायदेशीर कारवाईत भाग घेणे टाळा. तुम्ही स्वदेशी नवर्‍यावर कोर्टात केस फाईल करू शकता. खास करून घटस्फोटाची केस.

१२. परदेशात तुमच्या पतीने तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत व तुम्हाला अंधारात ठेवून तेथील कोर्टानुसार घटस्फोट दिला तरी तो भारतात ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्ही त्या केसमध्ये सहभाग घेतला असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.

१३. नवरा किंवा सासरच्या मंडळींची बदनामी करणे टाळा, कारण ते तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकू शकतात. जे वास्तव आहे तेच बोला, आणि योग्य मंडळींसमोर : उदा : वकील, पोलिस, सोशल वर्कर, न्यायालय इत्यादी.

१४. कोणत्याही कारणास्तव कायदा स्वतःच्या हातात घेणे टाळा, व सूड उगवण्यासाठी अविचारी, हिंसक, बेकायदेशीर कृत्ये करू नका. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधा. खोट्या तक्रारी नोंदवू नका.

परदेशांतील भारतीय महिलांच्या संघटना / मैत्री संस्था/ मदत संस्थांचे पत्ते व इतर तपशील :

list_indian_women.pdf (115.95 KB)

तुम्ही एन आर आय सेलकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता :

http://ncw.nic.in/NRICell/frmNRIComplaints.aspx

तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते?

१. तक्रार नोंदविली गेल्याची पावती मिळते. तक्रारकर्त्यास त्याच्या नोंदविल्या गेलेल्या तक्रारीचा क्रमांक मिळतो, जो पुढील संदर्भ व कारवाईसाठी महत्त्वाचा असतो.

२. तक्रारीची नोंद झाल्यावर तिची तपासणी होते. त्यात कितपत तथ्य आहे, काय वास्तव आहे इत्यादींची पडताळणी केली जाते. त्यासाठी संबंधित पार्टीजना प्रश्न विचारले जाऊ शकतात.

३. कारवाई

अ] समुपदेशन : पीडित व्यक्तीला समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे तिला तिचे कायद्याच्या दृष्टीने भवितव्य, तसेच इतर उपलब्ध पर्याय यांची माहिती करून दिली जाते.

आ] मध्यस्थांमार्फत वाद मिटविणे : एन आर आय सेलमार्फत मध्यस्थांकरवी जोडीदाराशी ऑडियो/ व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा वार्तालाप करून किंवा व्यक्तिशः संपर्क साधून मध्यस्थी केली जाते.

इ] संबंधित वादाची सेटलमेन्ट करणे : ह्यात परिस्थितीनुसार, नवरा-बायकोच्या संमतीनुसार, कायदेशीर कारवाई निश्चित केली जाते. ती त्या देशात की भारतात हेही परिस्थिती, संमती इत्यादींनुसार बदलते. मध्यस्थीत अपयश आल्यास पत्नीला तिचे कायदेशीर हक्क समजावून दिले जातात आणि तिच्या मर्जी व संमतीनुसार तिला कायदेशीर कारवाई करण्यास मदत केली जाते.

तसेच त्याच वेळी एन आर आय सेल हेही कार्य करते :

क] त्या त्या राज्याच्या शासनाशी व पोलिसांशी कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने संपर्क करणे
ख] त्या राज्याच्या महिला आयोगाशी त्या केसला फॉलो करण्याचे दृष्टीने संपर्क साधणे
ग]परदेशातील सेवाभावी संस्था, मिशन्सच्या सहयोगाने त्या पीडित महिलेला सुरक्षित आश्रय, मध्यस्थी, सुरक्षा मिळवून देणे.
घ] लूक आऊट कॉर्नर नोटिस बजावण्याची, समन्स बजावण्याची शिफारस करणे.
च] क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १८८, २८५ व्या कलमांन्वये, पासपोर्ट कायद्यानुसार व अन्य कायद्यांनुसार कारवाईची शिफारस करणे.

संपर्क तपशील :

Contact for NRI Marriages Case

Mailing Address :
NRI Cell, National Commission for women
4, Deen dayal upadhya Marg,
New Delhi -110002

Telephone Numbers : +91 - 11 - 23234918
Fax : +91 - 11 –23236154/ 23236988
Email : nricell-ncw@nic.in

वरील माहितीत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे, माहितीची भर घातल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद!

-- अरुंधती

माहिती स्रोत : राष्ट्रीय महिला आयोग संकेतस्थळ : http://ncw.nic.in/default.aspx

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय, सध्या मुलांची फसवणूक झाल्याच्याही अनेक केसेस मीही ऐकत आहे. त्यामुळे सर्वात उत्तम म्हणजे मुलीच्या व मुलाच्या दोन्ही बाजूंनी आडपडदा न ठेवता एकमेकांच्या खर्‍याखुर्‍या माहितीची देवाणघेवाण करणे, व परस्पर चौकशी इत्यंभूतपणे करणे. ओळखीतले आहेत / नात्यातले आहेत/ उच्चशिक्षित आहेत / मोठ्या पदावर आहेत / मोठं नाव आहे इ. इ. गोष्टी असल्या तरीही चौकशीत कोणतीही कसर सोडूच नये. भले प्रेमविवाह असो की अ‍ॅरेंज मॅरेज.

अरुंधती ही वरची नियमावली फक्त एन्.आर्.आय लोकांनाच लागु का..
माझ्या पाहण्यात.. देशांतर्गत फसवणूकीचे प्रमाण जास्तच आहे..
एन्.आर.आय. कॅटेगरी मधे ज्या मुला/मुलींना अमेरिका/विदेशी संस्क्रुतीचे आकर्षण आहे तसेच लोक फसवणुक करण्याची शक्यता जास्त असते..
बाकी जे पब्लीक फक्त अर्थार्जन आणी करियर साठी फॉरेन ला जातात ते शक्त्यतो फसवणुक करत नाही..
सारख्या पेपर/टी.व्ही मधे येणार्या बातम्या/ ब्लॉग्स मधील दिलेली फसवनूकीची माहीती ह्यांचे एन्.आर.आय. हे सॉफ्ट टार्गेट आहे..
त्याची व्यक्तिश: पातळीवर चांगलीच झळ पोहचली आहे.. अमेरिकेत असताना ३ चांगल्या स्थळांकडुन नकार पचवला आहे.. फक्त आणी फक्त पेपर्/ न्युज वर ऐकलेल्या/वाचलेल्या बातम्या मुलीकडच्या त्यांच्या नातेवाईकानी तिखट मीठ लावुन सांगितल्या मुळे आणी अर्थातच व्यक्तीची व्यक्तीशी फक्त एन्.आर्.आय. स्टेटस संदर्भ घेऊन तुलना केल्यामूळे Sad ..

आवळा, परदेशात ओळखीचे, नात्याचे, जवळचे माणूस आधाराला नसेल; तेथील कायदे-कानूनाची माहिती नसेल, तुम्ही आर्थिक व अन्य दृष्टीने (जसे वाहन चालविण्याचा परवाना नसणे, डिपेन्डन्ट स्टेटस वर परदेशात जाणे), मदत कोठून मिळेल हे जर माहीत नसेल तर फसवणुकीच्या बाबतीत ज्या व्यक्तीची फसवणूक होते ती अगदीच संकटात सापडते. कौटुंबिक अत्याचाराला किंवा त्यापेक्षाही वाईट प्रसंगाला बळी पडू शकते. जर वेळीच कोणती खबरदारी घ्यावी, काय चौकशी करावी, लग्न जुळवायचे वेळीस कोणते पुरावे - कागदपत्रे - माहिती एकमेकांना देणे आवश्यक आहे हे दोन्ही पक्षांना कळाले तर बर्‍याच समस्या टाळता येऊ शकतात.

जर तुमच्या बाबतीत लोकांनी फक्त ऐकीव बातम्यांच्या आधारावर, तुमची प्रत्यक्ष शहानिशा करून न घेता नकार दिला असेल तर ते दुर्दैवी आहे. परंतु त्या लोकांना लग्नासारख्या मुळात रिस्की गोष्टीत कदाचित आणखी रिस्क नको असावी. काही शंका असेल तर देशात त्या मुलाला अथवा मुलाच्या नातेवाईकांना समक्ष भेटून-बोलून इत्यादी मार्गांनी मुलीचे नातलग संवाद साधू शकतात. परंतु अनेकदा परदेशात राहणार्‍या मुलांच्या बाबतीत शंकानिरसन शक्य होत नाही. अनेकदा मुलीलाच परदेशात स्थायिक होण्याची / जाण्याची इच्छा नसते. आणि कित्येकदा सांगायचे कारण व प्रत्यक्षातील कारण हेही वेगवेगळे असू शकतात, तेही लक्षात घ्यावे.

खुप चांगला लेख आहे. पण लोकांना NRI या शब्दाचे इतके वेड आहे कि या सगळ्या घटना घडल्यानंतरही लोक हेच करतील याची मला खात्री आहे.

आज ओळखीच्यातील एका सुशिक्षित मुलीला व तिच्या कुटुंबियांना फसवले गेल्याची केस कानावर आली. त्या मुलाच्या घरचे लोक (आईवडील) शहरी, सुशिक्षित, सुसंस्कृत, सधन, प्रतिष्ठित.... मुलीकडचीही मंडळी तशीच. मुलगा भारतात सुट्टीवर आला असताना झटपट लग्न ठरविले, लग्न झाल्यावर 'रजा नाही' म्हणून मुलगा लगेच परदेशी परत गेला, मुलीचा व्हिसा होईपर्यंत ती भारतात थांबली. नंतर व्हिसा झाल्यावरही सहा महिने तिला त्याने भारतातच थांबण्यासाठी टोलवले. अखेरीस कंटाळून तिच्या घरच्यांनी तिची परदेशी जाण्याची स्वतंत्र सोय केली. ती नवर्‍याकडे गेली असताना त्याच्यात दोष आहे हे तिला कळाले. तो तिला शरीरसुख देऊ शकत नाही. नव्याने ट्रीटमेन्ट घ्यायची तयारी नाही, या अगोदर घेतलेल्या ट्रीटमेन्ट्सने फरक नाही. मुलाच्या आईवडिलांना सर्व माहित असूनही ते गप्प राहिले असतील तर ही तर शुद्ध फसवणूकच ठरेल. मुलाला वस्तुस्थिती माहीत असताना त्याने असे फसवायला नको होते. आता ती मुलगी मायदेशी परतली असून घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. केस न्यायप्रविष्ट असताना त्याविषयी अधिक बोलणे उचित नाही. परंतु या केसेस सुशिक्षितांमध्ये, शहरी, पांढरपेशा वर्गात आजही मोठ्या प्रमाणावर घडतात याचा हा आणखी एक नमुना!

हल्ली दोन्ही प्रकारच्या केसेस भरपूर आणि सर्रास ऐकू येतात.

माझ्या एका मित्राने भारतात लग्न करून आल्यानंतर, बायकोच्या MS शिक्षणाचा खर्च केला, मध्यंतरी एक मुलगाही झाला आणि मग ग्रीनकार्ड होताच तिने Divorce घेऊन तिच्या पूर्व-प्रियकराशी (जो आता अमेरिकेत आहे) लग्न केलें.

दुसर्‍या एका मुलाने भारतात लग्न केलं. हनिमुनला जाऊन आल्यानंतर मुलाने त्याच्या आईला सांगितलं, 'मुलगी जवळ येऊ देत नाही'. त्यावर आई म्हणाली, 'थोडी वाट बघ, होईल तिला सवय'.
मग मुलाला सोडायला सगळी नातेवाईक मंडळी सेंटॉरला आली. तिकडे रात्री मुलगी 'कपडे फाडून' जोरजोरात रडत हॉटेलच्या Reception ला गेली, आणि 'नवरा Rape करण्याच्या प्रयत्न करतोय' असा आरोप केला.. मुलीच्या बहिणीकडून नंतर कळलं की मुलीचा प्रियकर अमेरिकेत आहे आणि मुलगी तिथे जाऊन त्याच्याबरोबर पळण्याच्या विचाराने विमानात बसायला आली आहे.

बर्‍याच केसेस मधे मुळात मुलाचा किंवा मुलीचा फसवणूक करायचा हेतू नसतो. पण मुला-मुलींचे पालक सगळे माहित असूनही इमोशनल ब्लॅकमेल करून आपल्या पाल्याला लग्न करायला भाग पाडतात. आपल्या पाल्याचे लग्न हा त्यांच्यासाठी एक प्रतिष्ठेचा प्रश्न असतो. यात दुसर्‍या व्यक्तीच्या आयुष्याचा विचारच केला जात नाही. असे प्रकार पूर्वीही व्हायच. फरक इतकाच की कसातरी संसाराचा गाडा ओढला जायचा, आता तसे घडत नाही.

स्वाती.... +१!! आणि अगोदर लग्न व नंतर विभक्त होणे + घटस्फोट व नंतर पुन्हा सावरणे यात शक्ती, पैसा, मनस्वास्थ्य, आत्मविश्वास यांचा चुराडा होतो तो वेगळाच! सध्याच्या काळातील शहरी तरुण मुलामुलींना इतर बाबतीत पालकांच्या मताविरुद्ध स्वतंत्र निर्णय घेण्यात काही प्रॉब्लेम येत नाही, परंतु लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयात ते इमोशनल ब्लॅकमेलला कसे काय बळी पडतात ते कळत नाही!

अरुन्धती, तुम्ही खुप छान लेख माण्ड्ला आहे. मी स्वत: अशीच १ पीडित आहे. आज १ वर्ष १ महिना झालाय घट्स्फोट होउन..
लग्ना आधि काही गोष्टी, ज्या नवरा-बायको या relation साठी महत्वाच्या असतात, त्याने मला सागितल्या नाहित. त्याच्या आई, वडिलानी सुध्धा लपवुन ठेवले. लग्न करायची इछ्छा नसताना, त्याने आई, वडील, समाजा साठी लग्न केले. आम्हि लग्न ठरवण्या आधी थोडी-फार चौकशी केली होती, पण लपवलेली गोष्ट तशी नाजुक असल्याने चौकशी तुन बाहेर येणे शक्य नव्ह्ते. लग्ना नतर, लगेचच U.S. ला गेलो. त्याने स्वतः काहीच सान्गितले नाही, पण् महिन्याभरात मला समजले. खुप मनापासुन प्रेम केले होते त्याच्यावर.. तो अतिशय हुषार, चागला माणुस आहे. त्यामुळे नवरा-बायको नाही, पण चान्गले friends म्हणुन आम्ही ५,६ महिने राहिलो. नतर भारतात येऊन treatment घेणार होतो. सुरुवातीला तो treatment घ्यायला तयार होता, परन्तु नतर त्या treatments चा काही फायदा होत नाही म्हणाला. त्याच्या मते, separate होऊन मी दुसरे लग्न करावे हेच योग्य ठरले. हो-नाही, हो-नाही करता करता दिड वर्ष गेले. शेवटी, Court मध्ये petition file केले.
मना पासुन प्रेम होते त्याच्यावर म्हणुन इतके दिवस वाट बघितली. ते नसते तर मला लपवलेल्या गोष्टी कळल्या नतर लगेचच मी स्वतःहुन निघुन आले असते... आज मी चागला job करतेय, independent आहे, पण external appearance जरी normal असला तरी मनाने मात्र अजुनही छ्छिन्न्-विछ्छिन्न च आहे. सगळे मागे सोडुन पुढे जाणे, हे मला समजतेय आणि ते मी करतेय सुध्धा, तरी पण मनाला समजवणे मात्र अवघड आहे..
खरेच, माणुस emotionally attach झाला कि आयुष्य सपे पर्यन्त त्या व्यक्ति\आठवणीना ह्रुदयात घेऊन जगतात..
आयुष्यातला असाही एक अनुभव..

प्राजक्ता..... काय म्हणू??!!! काही सुचत नाहीए....

तुम्ही आज स्वतःच्या पायावर उभ्या आहात, कोणावर अवलंबून नाही हे खूप चांगलं आहे. पण तुमची अशी फसवणूक व्हायला नको होती असंच वाटत राहतं. तुम्ही मनाने धीराच्या आहात म्हणून एवढ्या टिकू शकलात, कागदोपत्री का होईना त्यातून बाहेर येऊ शकलात.... मनानेही सावराल हळू हळू. काही जखमा भरून येण्यासाठी काळ जावा लागतो हेच खरे. पण मला खात्री आहे की तुम्ही यातून नक्की बाहेर याल. आयुष्य खूप मोठं आहे. कोणती मदत लागली तर जरूर कळवा. कोणाजवळ तरी मन मोकळं करा. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!

प्राजक्ता तुम्ही खूप धीराच्या आहात. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. मनाला झालेल्या जखमा हळू हळू भरून येतील. स्वतःला वेळ द्या. काळजी घ्या.

माझा मायबोली register केल्याचा दुसराच दिवस, हा लेख वाचण्यात आला आणि सहज मन मोकळे करवेसे वाटले म्हणुन लिहिले.. पण तत्पर reply येतील असे वाटले नव्ह्ते. धन्यवाद!

@प्राजक्ता
कसली treatment ? cancer कि आणखी काही ... जरा उलगडून लिहा .
झाले ते व्हायला नको होत . अजून काही वर्ष जावू द्या मनाने सुद्धा तुम्ही सुधाराल .पुढील जीवनासाठी शुभेच्छा .

प्राजक्ता, तुम्ही खूप धीराच्या आहात आणि मनाने खूप सुंदर आहात. इतके सगळे होऊनही ज्या व्यक्तीमुळे ही वेळ आली त्याच्या विषयीही तुम्ही किती सहानुभुतीने लिहिलय! या जखमाही भरुन येतील. तुम्हाला खूप खूप शुभेछा!

स्वाती२ अनुमोदन.
-प्राजक्ता , खरंच तुम्ही इतकं सोसूनही धीराने पुढची वाटचाल करता आहात.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

-प्राजक्ता, एक वाईट स्वप्न म्हणून हे विसरून जा.
माझ्या एका जिवलग मैत्रिणीचा सल्ला, वाईट आठवणी पुसायला, चांगल्या आठवणी तयार कराव्या लागतात. आणि त्या तयार करणे, पुर्णपणे आपल्या हातात असते.

प्राजक्ता, तुम्हि रोज मा. बो. वर येत जा, इथे वाचन्यासारखे खूप धागे आहेत, खूप नवीन गोष्टिंची माहिती मिळ्ते.
धीराने पुढची वाटचाल करत रहा. आणि देव नेहमी आपल्या बरोबर असतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !

प्राजक्ता, वाचुन वाईट वाट्ले... तु तुझ्या पायावर उभी आहेस. ते खुप चांगले आहे. नविन मित्रमैत्रिणी जमव....पण ते जमवताना काळजी घे.....तुझ्या घरचे तुझ्या बरोबर असतीलच. तुझ्या पुढील आयुष्यासाठी
शुभेच्छा!!

@ -प्राजक्ता
अश्विनीमामी आणि स्वाती२ +१
भावनिकदृष्ट्या स्वतःला स्थिरावायला वेळ द्या. जुन्या आठवणी टाळू नका, पण उगाळूही नका. (सल्ला देणे सोपे!) भविष्यासाठी शुभेच्छा!

प्राजक्ता ...काय म्हणू, खरंच खूप धीराच्या आहात तुम्ही आणि इतकं सगळं होउनही तुमच्या लिखाणात अजिबात दुसर्‍या व्यक्तीबद्दल कडूपणा नाही
ऑल द बेस्ट.

>>@प्राजक्ता
कसली treatment ? cancer कि आणखी काही .>> नीट लक्ष देऊन वाचलंत तर अंदाज बांधता येईल.
प्राजक्ता, गुडलक.

प्राजक्ता , खुप धीराच्या आहात. अशाच रहा. भविष्यासाठी शुभेच्छा!

अरुंधती मागे मी लिहिले होते एका मैत्रीणीबद्दल (अगदी प्राजक्तासारखीच), तिने petition file केलेय आणि ती आता पुढे शिकतेय ( MD पुर्ण करतेय). खुप लवकर सावरली ती.तुला पुन्हा एकदा धन्यवाद.

प्राजक्ता .... अती सोशीकपणा चांगला नाही, तसेच अगदिच तुटक वागणे पण. तुम्ही ज्या पद्धतीने हा प्रसंग हाताळलात त्याचे कौतुकच Happy

वेळ जाऊ द्या तोच या सगळ्यावर उत्तम इलाज आहे.

कॉलेजात असताना घरी न सांगता लग्न केलं. नंतर काही कारणाने बिनसलं. आणि मुलगी घटस्फोट न घेता दुसरं लग्न करुन लंडनला निघुन गेली. पण आता मुलाचं मात्र लग्न जमत नाहीय. कारण प्रयत्न केला की त्या मुलीँना/घरच्यांना कुठुन ना कुठुन त्याचं लग्न झालं होतं हे कळतयं. यावर त्या मुलाकडे कायदेशीर उपाय काय आहे?

मुलीने अगोदरच्या पतीशी घटस्फोट न घेता दुसरे लग्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तिचे तसे लग्न झाल्याचे सिद्ध करू शकल्यास त्या मुलीवर कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. वकिलांचा सल्ला घेऊनच पुढील कारवाई करावी.

Pages