अनिवासी भारतीय (एन. आर. आय.) विवाह : संबंधित धोके, शक्यता, खबरदारी व मदत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 July, 2011 - 09:46

वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....

आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?

तर कितीतरी केसेस मध्ये ते उत्तर ''नाही'' असेच म्हणावे लागेल. त्यासंदर्भात हाती आलेली आकडेवारीच बरेच काही सांगून जाते. (मिळालेल्या आकडेवारीनुसार अशा किमान ३०,००० 'परित्यक्ता' वधूंच्या केसेस नोंदविल्या गेल्या आहेत, किमान १२०० वधू फक्त ब्रिटनमध्ये वेगवेगळ्या शेल्टर्समध्ये आश्रयाला आहेत.)

कोणत्याही अ‍ॅरेंज मॅरेजमध्ये रिस्क किंवा धोका हा असतोच. कितीही खात्री करून घेतली असली तरी सर्वच माहिती कळालेली नसते. काही माहिती लपवलेली असते. परंतु माहिती नसलेल्या स्थळी, जिथे कायदे वेगळे आहेत, ओळखीचे वा नात्याचे जवळपास कोणी नाही आणि तुम्ही तुमच्या जोडीदारावर तुमच्या उदरनिर्वाहासाठी व अन्य कारणांसाठी सर्वस्वी अवलंबून आहात तेव्हा हा धोका कैक पटीने वाढतो. विवाह हा विश्वासाच्या नात्यावर आधारलेला असतो असे म्हटले तरी आपल्या बाजूने हा विश्वास अधिक बळकट व्हावा, आपल्याकडून चौकशीत काही कसर राहू नये व नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. त्या दृष्टीने वाग्दत्त वर व वधू या दोघांनीही आपली माहिती एकमेकांपासून दडवून न ठेवता उघड केली पाहिजे. चौकशीसाठी आपल्या मित्रमैत्रिणींचे संपर्क तपशील, आपल्या नोकरीचे ठिकाण, सहकारी इत्यादींची माहिती एकमेकांना द्यायला हवी.
पण प्रत्यक्षात तसे होत नाही.

कित्येकदा लग्न होऊन परदेशात गेलेल्या वधूला तिथे गेल्यावर आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा बाई/पुरुषाशी संबंध असल्याचे कळते, किंवा नवर्‍याला दुर्धर व्यसने आहेत/ मानसिक रोग आहे हे लक्षात येते. कधी शारीरिक तर कधी मानसिक / भावनिक / वाचिक हिंसा - अत्याचारांना तोंड द्यावे लागते. ही परिस्थिती उलटही असू शकते.

कोणकोणत्या प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात?

१. लग्नानंतर हनीमून उरकून पती परदेशी रवाना होतो, पत्नीला तिकिट पाठवितो म्हणून सांगतो. प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. अनेकदा पत्नी गर्भवती असेल तर आणखी प्रश्न निर्माण होतात. (अशा किमान २०,००० वधूंनी लग्न व हनीमूननंतर आपल्या नवर्‍याला पाहिलेलेच नाही!!)

२. लग्नानंतर पत्नी पतीसमवेत परदेशी जाते, परंतु तिथे तिच्या वाट्याला छळवणूक, हिंसा, मारहाण, कोंडून ठेवणे, बलात्कार, कुपोषण/ उपासमार इ. येते. एक वेळ तिला परत भारतात जायची परवानगी सासरच्यांकडून मिळते परंतु तिची त्या पतीपासून झालेली मुले तिच्याबरोबर भारतात पाठवली जात नाहीत.

३. पत्नीच्या माहेरच्यांकडून हुंडा किंवा तत्सम रक्कम वसूल करण्यासाठी तिला तिच्या मर्जीविरुध्द परदेशात पती वा पतीच्या नातेवाईकांतर्फे ओलीस धरले जाते / डांबून ठेवले जाते. तुमची मुलगी हाती पायी धड हवी असेल तर अमकी रक्कम तमक्या ठिकाणी जमा करा अशा धमक्या दिल्या जातात. किंवा पत्नीला नांदवयची असेल तर अमुक रक्कम / मालमत्ता तमक्याच्या नावे जमा करा अशा धमक्या येतात.

४. पत्नी पतीच्या घरी सासरी पोहोचते तेव्हा तो तिथे त्याच्या मैत्रिणीबरोबर / जोडीदाराबरोबर राहत आहे असे लक्षात येते. त्याने केवळ आपल्या आईवडिलांच्या म्हणण्याखातर हे लग्न केलेले असते. अशा परिस्थितीत जर पत्नीकडे स्वतःचे आर्थिक स्रोत नसतील व ती पतीवर अवलंबून असेल तर पत्नीपुढे असलेले ते महासंकटच ठरते.
तिथे जर तिला काही कायदेशीर मदत / आधार नसेल, कोणाची ओळख नसेल तर आणखी संकट!

५. पतीने लग्नाचे वेळी जर त्याची नोकरी, पगार, लग्नाविषयीचे त्याचे स्टेटस, मालमत्ता यांविषयी खोटी माहिती दिली असेल तरी त्यामुळे फसवणूक झालेल्याही अनेक केसेस आहेत.

६. त्या त्या देशातील घटस्फोटाविषयीच्या उदार कायद्यांचा आधार घेऊन पतीने पत्नीस तिच्या संमती विरुध्द, तिच्या अनुपस्थितीत, तिला अंधारात ठेवून घटस्फोट दिला असल्याच्याही अनेक केसेस आढळतात.

७. अनेक पीडित स्त्रियांनी नंतर नवरा किंवा सासरच्या मंडळींवर हुंडा मागणे अथवा लग्नानंतर केलेल्या अत्याचारांबाबत फौजदारी दावे ठोकले तेव्हा त्यांना असे लक्षात आले की जोवर पती भारतात येत नाही, समन्स/ अटकेच्या वॉरंटला प्रतिसाद देत नाही तोवर त्या दाव्याचे पुढे काहीही होणार नाही.

८. अनेक स्त्रियांना आपल्या मुलांच्या कस्टडीसाठी किंवा पोटगीसाठी कोर्टात अतिशय कडवा लढा द्यावा लागला.
काहींवर स्वतःच्याच मुलांना जबरदस्ती पळवून नेण्याचे आरोप ठोकले गेले व त्याविरुध्द लढा द्यावा लागला.

९. काही स्त्रियांना भारताखेरीज अन्य देशात लग्न करण्यास भाग पाडले गेले व नंतर लक्षात आले की तिथे लग्न केल्यावर भारतातील न्यायालयांकडे त्याबद्दल फारच मर्यादित अधिकार आहेत.

१०. लग्नानंतर पती परदेशी जातो. पत्नी नंतर जाते. तिथे तिला एअरपोर्टवर आणायला कोणीच आलेले नसते. नवर्‍याने दिलेला पत्ता/ फोन इत्यादी सर्व खोटे असते किंवा तो गायब झालेला असतो. (काही केसेसमध्ये पती पत्नीचे सर्व सामान - तिची कागदपत्रे, कपडे, दागदागिन्यांसह ताब्यात घेतो व गायब होतो असेही घडलेले आहे.)

आजवर अनेक भारतीय स्त्रियांना परदेशस्थ भारतीयांशी लग्न केल्यावर आलेल्या गंभीर समस्या/ अडचणी/ सहन करावे लागणारे अत्याचार इत्यादींबद्दल सतर्क होत राष्ट्रीय महिला आयोगाने संसदेच्या महिला सबलीकरणाच्या समितीच्या सूचनांचा विचार करून काही मार्गदर्शक उपाय / खबरदारी / मदत इत्यादींबाबत काही जाहीर सूचना केल्या आहेत.

त्यानुसार वधू/ वधूच्या कुटुंबियांनी

काय करावे?

१. वर/ वधू ची इत्यंभूत चौकशी करावी. त्यांचे आर्थिक स्टेटस, वैवाहिक स्थिती (अविवाहित/ घटस्फोटित/ विधुर / विभक्त इ.), नोकरीचे तपशील, क्वालिफिकेशन, पगार, ऑफिसचा पत्ता, कोणत्या कंपनीत नोकरी, त्या कंपनीची स्थिती, इमिग्रेशन स्टेटस, व्हिसाचे तपशील, त्या देशात लग्नाचा जोडीदार नेण्याची परवानगी आहे / नाही इत्यादी.

२. आर्थिक परिस्थिती, मालमत्ता, निवासी पत्ता, कौटुंबिक तपशील, व्हिसाचे तपशील, व्होटर आहे/ कसे, सोशल सिक्युरिटी नंबर याची चौकशी.

३. लग्नेच्छुक मुलामुलीना परस्परांना भेटून मोकळेपणाने बोलण्याची, वावरण्याची संधी द्यावी, जेणेकरून भविष्यात प्रश्न टळू शकतात. मुलाच्या/ मुलीच्या परिवाराशी नियमित संपर्कात रहावे.

४. भारतात धार्मिक लग्न विधींबरोबरच ते रजिस्टर्ड करण्याचे बघावे. लग्नाचे फोटोग्राफ्स, चित्रफिती पुरावा म्हणून असू द्याव्यात.

५. ज्या देशात मुलगी वधू म्हणून रवाना होत असेल त्या देशाचे कायदे, खास करून कौटुंबिक अत्याचाराविरुध्द चे कायदे असतील त्यांच्याबद्दल तिला माहिती असावी. जर अशा अत्याचाराला तिला तोंड द्यावे लागले तर तिला तिथे कोणत्या प्रकारची सुरक्षा / सुविधा मिळू शकते हेही माहिती असावे.

६. जर वधू ला असा अत्याचार (शारीरिक/ मानसिक/ वाचिक/ भावनिक/ आर्थिक/ लैंगिक) सहन करावा लागत असेल तर तिने त्याविषयी तिच्या विश्वासातील लोकांना सांगितलेच पाहिजे.

७. पत्नी/ वधूने स्वतःच्या नावाचा वेगळा बँक अकाऊंट आपल्या निवासस्थानाजवळच्या बँकेत खोलावा.

८. परदेशी राहणार्‍या नवविवाहितेने नवर्‍याचे एम्प्लॉयर्स, शेजारी, नातेवाईक, मित्र, अ‍ॅम्ब्युलन्स, पोलिस, भारतीय दूतावासाचे संपर्क तपशील स्वतःजवळ ठेवावेत.

९. तुमच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (व्हिसा, पासपोर्ट, बँक कागदपत्रे, मालमत्तेची कागदपत्रे, लग्नाचे सर्टिफिकेट, इतर कागदपत्रे) छायांकित प्रती भारतात/ तुमच्या विश्वासाच्या माणसांकडे/ नात्यात ठेवून द्या.
या सर्व कागदपत्रांची सॉफ्ट कॉपीही तुमच्याजवळ / तुमच्या विश्वासू व्यक्तीजवळ असू द्यात.

१०. तुमच्या नवर्‍याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची (व्हिसा, पासपोर्ट, सोशल सिक्युरिटी नंबर, मालमत्तेचे तपशील, व्होटर कार्ड क्रमांक इत्यादी) प्रतही शक्य असल्यास जवळ ठेवा.

काय करू नये?

१. घाईघाईत काहीही निर्णय घेऊ नका, तसेच कोणाच्या दबावाखाली येऊन निर्णय घेऊ नका.

२. विवाहाचा उपयोग ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी/ परदेशी स्थायिक होण्यासाठी किंवा अन्य तत्सम फायदेशीर योजनांसाठी करू नका, तशा योजनांना बळी पडू नका.

३. लग्नासारखी गंभीर बाब फोन/ इमेल वरच्या संपर्काने ठरवू नका. प्रत्यक्ष मुलाला/ मुलीला व कुटुंबियांना भेटून, बोलून, इत्यंभूत चौकशी करून मगच काय तो निर्णय घ्या.

४. नुसत्या वरवरच्या देखण्या चित्राला भुलू नका. व्यवस्थित चौकशी करा, मगच होकार द्या.

५. जेव्हा मॅरेज ब्यूरो/ संकेतस्थळ/ मध्यस्थांमार्फत लग्न ठरते तेव्हा त्यांच्याकडील वधू/ वराचे तपशील बरोबर असल्याची खात्री करून घ्या.

६. गुप्तपणे लग्नाच्या वाटाघाटी करणे टाळा. त्या लग्नाबाबत जितक्या लोकांना समजेल तेवढे चांगले. त्यानिमित्ताने मुला/मुलीची खरी माहिती कळायला मदत होईल.

७. परदेशांत लग्न करणे टाळा.

८. हुंडा किंवा तत्सम मागण्यांना परदेशस्थ जावई/ मुलीच्या सासरच्या मंडळींनी पुढे केल्यास गप्प बसू नका व त्यांना बळी पडू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना संपर्क साधा.

९. पतीच्या किंवा सासरच्या मंडळींच्या क्रौर्याचे बळी ठरू नका. लगेच संबंधित अधिकार्‍यांना / क्रमांकांना संपर्क साधा.

१०. परदेशी जाण्याच्या खटपटीत कोणतीही कागदपत्रे नकली बनवू नका. किंवा कोणत्याही बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करू नका.

११. नवरा राहत असेल त्या देशातील विवाहासंबंधातील कायदेशीर कारवाईत भाग घेणे टाळा. तुम्ही स्वदेशी नवर्‍यावर कोर्टात केस फाईल करू शकता. खास करून घटस्फोटाची केस.

१२. परदेशात तुमच्या पतीने तुम्हाला तुमच्या अनुपस्थितीत व तुम्हाला अंधारात ठेवून तेथील कोर्टानुसार घटस्फोट दिला तरी तो भारतात ग्राह्य धरला जात नाही. जर तुम्ही त्या केसमध्ये सहभाग घेतला असेल तरच तो ग्राह्य धरला जातो.

१३. नवरा किंवा सासरच्या मंडळींची बदनामी करणे टाळा, कारण ते तुमच्यावर बदनामीचा दावा ठोकू शकतात. जे वास्तव आहे तेच बोला, आणि योग्य मंडळींसमोर : उदा : वकील, पोलिस, सोशल वर्कर, न्यायालय इत्यादी.

१४. कोणत्याही कारणास्तव कायदा स्वतःच्या हातात घेणे टाळा, व सूड उगवण्यासाठी अविचारी, हिंसक, बेकायदेशीर कृत्ये करू नका. संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधा. खोट्या तक्रारी नोंदवू नका.

परदेशांतील भारतीय महिलांच्या संघटना / मैत्री संस्था/ मदत संस्थांचे पत्ते व इतर तपशील :

list_indian_women.pdf (115.95 KB)

तुम्ही एन आर आय सेलकडे ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता :

http://ncw.nic.in/NRICell/frmNRIComplaints.aspx

तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते?

१. तक्रार नोंदविली गेल्याची पावती मिळते. तक्रारकर्त्यास त्याच्या नोंदविल्या गेलेल्या तक्रारीचा क्रमांक मिळतो, जो पुढील संदर्भ व कारवाईसाठी महत्त्वाचा असतो.

२. तक्रारीची नोंद झाल्यावर तिची तपासणी होते. त्यात कितपत तथ्य आहे, काय वास्तव आहे इत्यादींची पडताळणी केली जाते. त्यासाठी संबंधित पार्टीजना प्रश्न विचारले जाऊ शकतात.

३. कारवाई

अ] समुपदेशन : पीडित व्यक्तीला समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे तिला तिचे कायद्याच्या दृष्टीने भवितव्य, तसेच इतर उपलब्ध पर्याय यांची माहिती करून दिली जाते.

आ] मध्यस्थांमार्फत वाद मिटविणे : एन आर आय सेलमार्फत मध्यस्थांकरवी जोडीदाराशी ऑडियो/ व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा वार्तालाप करून किंवा व्यक्तिशः संपर्क साधून मध्यस्थी केली जाते.

इ] संबंधित वादाची सेटलमेन्ट करणे : ह्यात परिस्थितीनुसार, नवरा-बायकोच्या संमतीनुसार, कायदेशीर कारवाई निश्चित केली जाते. ती त्या देशात की भारतात हेही परिस्थिती, संमती इत्यादींनुसार बदलते. मध्यस्थीत अपयश आल्यास पत्नीला तिचे कायदेशीर हक्क समजावून दिले जातात आणि तिच्या मर्जी व संमतीनुसार तिला कायदेशीर कारवाई करण्यास मदत केली जाते.

तसेच त्याच वेळी एन आर आय सेल हेही कार्य करते :

क] त्या त्या राज्याच्या शासनाशी व पोलिसांशी कायदेशीर कारवाईच्या दृष्टीने संपर्क करणे
ख] त्या राज्याच्या महिला आयोगाशी त्या केसला फॉलो करण्याचे दृष्टीने संपर्क साधणे
ग]परदेशातील सेवाभावी संस्था, मिशन्सच्या सहयोगाने त्या पीडित महिलेला सुरक्षित आश्रय, मध्यस्थी, सुरक्षा मिळवून देणे.
घ] लूक आऊट कॉर्नर नोटिस बजावण्याची, समन्स बजावण्याची शिफारस करणे.
च] क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या १८८, २८५ व्या कलमांन्वये, पासपोर्ट कायद्यानुसार व अन्य कायद्यांनुसार कारवाईची शिफारस करणे.

संपर्क तपशील :

Contact for NRI Marriages Case

Mailing Address :
NRI Cell, National Commission for women
4, Deen dayal upadhya Marg,
New Delhi -110002

Telephone Numbers : +91 - 11 - 23234918
Fax : +91 - 11 –23236154/ 23236988
Email : nricell-ncw@nic.in

वरील माहितीत आणखी काही महत्त्वाचे मुद्दे, माहितीची भर घातल्यास स्वागतच आहे.

धन्यवाद!

-- अरुंधती

माहिती स्रोत : राष्ट्रीय महिला आयोग संकेतस्थळ : http://ncw.nic.in/default.aspx

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अकु. आर्य समाज पद्धतीने लग्न केलेलं. मुलगी मारवाडी आणि मुलगा जैन. लग्नाच सर्टीफिकेट वगैरे मुलीकडेच होतं. जे तिने+भावाने जाळुन टाकलं. आता तिच्या दुसर्या लग्नालापण बरीच वर्ष झाली ५वर्षाँचा मुलगा आहे आणि ती लंडनमधे ६वर्ष राहतेय.
पहील्या नवर्याकडे फोटो वगैरे काही आहेत की नाही माहीत नाही...

त्या मुलीला तिचं दुसरं लग्न बेकायदेशीर आहे व त्याचे परिणाम तिच्यासाठी व तिच्या कुटुंबासाठी (आताचा पती व मूल) चांगले होणार नाहीत, भविष्यात तिचे लग्न बेकायदेशीर सिद्ध झाल्यास तिला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल याची स्पष्ट कल्पना देता यायला हवी. जर त्या मुलीचा काही संपर्क असेल तर तिला पहिल्या पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी प्रवृत्त करायला हवे.

पहिल्या पतीनेही तिच्याशी घटस्फोट घेण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. लग्नाच्या सर्टिफिकेटची कॉपी मागविता येऊ शकेल. लग्नाला उपस्थित साक्षीदार, लग्न लावून देणारे लोक यांची स्टेटमेन्ट्स महत्त्वाची ठरतील. लग्नाचे फोटो, साक्षीदारांची निवेदने येथे कामी येऊ शकतात. तसेच या मुलाचा व त्याच्या बायकोचा त्यानंतर काही पत्रव्यवहार झाला असेल तर तोही कामी येऊ शकतो.

खुप खुप आभार अकु. एकंदरच कॉम्प्लिकेटेड प्रकरण झालय.. 'आर्य पद्धतीच लग्न फक्त त्या समाजतल्या लोकांसाठीच कायदेशीर असते, इतर धर्मियांसाठी नाही' असा काहीतरी निकाल वाचलेला. म्हणुन म्हणल इथे विचारुन पाहु तो पहीला विवाह कायदेशीर तरी आहे का. परत ती मुलगी आता अनिवासीदेखील आहे. आपल्या कायद्यांचा धाक चालले का तिच्यासाठी.. Sad

लग्नाचं सर्टिफिकेट ज्या अर्थी अस्तित्त्वात होतं त्या अर्थी त्या लग्नाची नोंदणी केली गेली होती. कोणतेही अधिकृत रीतीने नोंदणी केलेले लग्न कायदेशीरच असते. आर्य समाज पद्धतीने केलेले लग्नही कायदेशीर आहे. म्हणूनच म्हटले वकिलांना गाठलेत तर ते योग्य मार्ग दाखवतील. अनिवासी भारतीयांवरही कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. फक्त भरपूर पेशन्स व वेळ घालवायची तयारी हवी.

ह्या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळू शकेल व तक्रारही नोंदविता येईल. तसेच चुकीची (खोटी) तक्रार नोंदविल्यास त्याबद्दलही कारवाई होऊ शकते याची जाणीवही संबंधितांना असायला पाहिजे : http://ncw.nic.in/frmNRICell.aspx

तक्रार दुवा : http://ncw.nic.in/NRICell/frmNRIComplaints.aspx

हे कोणत्याही प्रकारच्या छळाशी रिलेटेड नाही. पण लग्न करुन डिपेंडंट विसावर परदेशी गेलेल्या स्त्रीयांशी निगडीत आहे. इथे रिलिव्हंट नसल्यास सांगावे. संपादीत करेन.

http://www.asvvad.blogspot.in/2013/06/blog-post_20.html

>> डिपेंडंट विसावर अमेरिकेत गेलेल्या एकीचे मनोगत..

पण आता मुलाचं मात्र लग्न जमत नाहीय. कारण प्रयत्न केला की त्या मुलीँना/घरच्यांना कुठुन ना कुठुन त्याचं लग्न झालं होतं हे कळतयं.

>>>>> अस्मिता या वाक्याचा अर्थ कळला नाही. मुलाचं लग्न बघताना त्याच्याकडूनच त्याचं आधीच एक लग्न झालं होतं ही माहिती दिली जात नाहीये का? असं असेल तर का बरं? पहिलं लग्न लपवून ठेवणे हे चूक आहे.

मुलाने प्रथम पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले तर तो गुन्हा आहे व त्याला त्याबद्दल शिक्षा होऊ शकते.

>>अस्मिता या वाक्याचा अर्थ कळला नाही. मुलाचं लग्न बघताना त्याच्याकडूनच त्याचं आधीच एक लग्न झालं होतं ही माहिती दिली जात नाहीये का? असं असेल तर का बरं? पहिलं लग्न लपवून ठेवणे हे चूक आहे.>>> +१

मुलाने प्रथम पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले तर तो गुन्हा आहे व त्याला त्याबद्दल शिक्षा होऊ शकते. >> हो सांगते त्यांना.

पियु परी

लिंक वाचली... अशी परिस्थीती आज अनेक स्त्रीयांची भारतातही आहेच.... तिकडे गेल्यावर बंधनं आलीआहेत ती आर्थातच वेगळी आहेत. अत्ताच १ महिना अमेरिकेला जाउन आले. एकंदर आयुष्य फार कठीण आहे. सपोर्ट सीस्टीम हा प्रकार अस्तित्वात नाही. मोठ्ठी घरं आहेत पण जर त्यांची नीगा आपण राखली नाही तर त्यांचे उकिरडे व्हायला वेळ लागत नाही. सतत कार्यरत राहिल्या शिवाय कही खरंनाही.... मग इकडे जर अशी सवय नसेल तर मात्र पिट्ट्या पडायला वेळ लागणार नाही.

खरच ज्या मुलिंना / मुलांना तिकडे जाउन फसवणुक, अत्याचार, मारहाण इ.इ. सहन करायला लागतं त्यांची काय हालत होत असेल...... दिवसेंदिवस रस्त्यांवर माणूस दिसत नाही... मदत काय मागणार आणि कोणा कडे?.....

अशी परिस्थीती आज अनेक स्त्रीयांची भारतातही आहेच>>

खरं आहे मोकिमी..

पण डिपेंडंट विसा वर तिकडे गेलेल्या मुलींचा इंडिपेडंट विसा (काय म्हणतात ते माहीत नाही) कधी होतो? का त्या आयुष्यभर डिपेंडंट विसा वरच राहातात?

खरच ज्या मुलिंना / मुलांना तिकडे जाउन फसवणुक, अत्याचार, मारहाण इ.इ. सहन करायला लागतं त्यांची काय हालत होत असेल...... दिवसेंदिवस रस्त्यांवर माणूस दिसत नाही... मदत काय मागणार आणि कोणा कडे?.....

>> हो. आणि योग्य त्या ठिकाणी मदत मागण्यात/ मागायला त्या मुलीचा आत्मविश्वास कमी पडला तर संपलीच ती..

मोकीमी, यासाठी अमेरिकेसारख्या देशांमध्ये ''मैत्रीण'' किंवा इतरही संघटना आहेत, ज्या अशा स्त्रियांना मदत करतात. मात्र त्याबद्दल माहिती असायला हवी. मला वाटतं, परदेशात (अमेरिकेत) लग्न करून जाणार्‍या प्रत्येक मुलीकडे अशा संघटना, मदत मागायची झाल्यास भारतीय वकिलातीचा पत्ता - संपर्क, स्थानिक पोलिस / संघटनांचे संपर्क असणे आवश्यक आहे. अमेरिकेत ९११ ची सुविधा आहे. जर न्याय मागायचा ठरविला, अत्याचाराला बळी पडायचे नाही असे ठरविले तर पुढचा मार्ग अवघड नाही. अगदी अशा बिकट प्रसंगात कोणाशी बोलावेसे वाटले तरी मैत्रीण सारख्या संघटना मदत करतात. त्यांच्या कौन्सेलर्स तुमचे म्हणणे ऐकून घेतात, शक्य तिथे शक्य तो सल्ला देतात, मार्ग सुचवितात.
व्हर्बल अ‍ॅब्यूज - तोंडी शिवीगाळ सिद्ध करणे अवघड असते. पण जर अशी शिवीगाळ पब्लिक प्लेसमध्ये किंवा इतरांसमोर केली असेल तर ते सिद्ध करता येते. फिजिकल अ‍ॅब्यूज वर मात्र स्थानिक पोलिस यंत्रणा तत्काळ अ‍ॅक्शन घेऊ शकतात. जर त्या अनिवासी भारतीय नवर्‍याला आपली नोकरी, वर्किंग विसा इत्यादी टिकवून ठेवायचे असेल तर त्याला पोलिसांनी दिलेली समजही पुरते. त्याचे नाव नोकरीच्या ठिकाणी खराब झाले तर त्याला अमेरिकेतून काढता पाय घ्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नाईलाजाने का होईना, त्या नवर्‍याला बरे वागावे लागते.

डिपेंडंट विसा वर तिकडे गेलेल्या मुलींचा इंडिपेडंट विसा (काय म्हणतात ते माहीत नाही) कधी होतो? का त्या आयुष्यभर डिपेंडंट विसा वरच राहातात?

लग्नाच सर्टीफिकेट वगैरे मुलीकडेच होतं. जे तिने+भावाने जाळुन टाकलं >> लग्नाचं सर्टिफिकेट परत मिळवता येतं. लग्न जिथे रजिस्टर केलं असेल त्या कार्यालयात अर्ज दिला की मिळून जाइल. आधिच्या सर्टिफिकेटची कॉपी किंवा नोंदणी क्रमांक माहिती असेल तर जास्त सोपं जाईल.

अत्ताच १ महिना अमेरिकेला जाउन आले. एकंदर आयुष्य फार कठीण आहे. >> मोकि मी, अहो असं काही कठीण आयुष्य वगैरे नाहिये. Happy घरातली कामं एकट्या बाईने करायची नसतात घरातल्या सर्वांनी विभागून घ्यायची असतात हे अंगात भिनले की पटापट होऊन जातात. जाणावत पण नाही. मजा म्हणजे आम्हाला आता देशात गेले की मोलकरणींवर अवलंबून घरचे वेळापत्रक चालताना दिसते ते अशक्य वाटते सहन करायला! सवयीचा प्रश्न आहे.
एच ४ ही अवघड फेज आहे हे खरे. पण निराश न होता हात पाय मारले की बाहेर येता येते त्यातून. शिक्षण घेणे, वॉलन्टियर वर्क असे बरेच काही करता येते. ३-४ वर्षात ग्रीन कार्ड / इएडी आले की जॉब करता येतोच.

धन्यवाद मनिष. काय मुर्खपणा करुन ठेवतात कॉलेजातली मुलंमुली साथियाने इंस्पायर होउन. नंतर सगळं निस्तारत बसायचं.

फिजीकल अब्युज माझ्या जर्मनीतल्या मैत्रीणीने एक वर्षभर सहन केलेला. तिचा नवरा संशयाने पछाडलेला. दारु पिऊन मारायचा स्ट्रिपटीज वगैरे करायला लावायचा तिला. रात्रीची बोँबाबोँब रडारड ऐकुन पोलीस आलेले त्यांच्याकडे. तिचा ३ ४ वर्षाँचा मुलगापण होता. शेवटी आईवडलांना सांगुन तिकीट काढुन आली परत भारतात

>> पण डिपेंडंट विसा वर तिकडे गेलेल्या मुलींचा इंडिपेडंट विसा (काय म्हणतात ते माहीत नाही) कधी होतो? का त्या आयुष्यभर डिपेंडंट विसा वरच राहातात?
होतो की! मी गेले होते डिपेन्डन्ट व्हिसावर आणि महिन्याभरात H1घेऊन काम सुरूही केलं होतं. खरा प्रश्न व्हीसाचा नसतोच. सबर्बमधे राहत असाल तर भारतासारखी पब्लिक ट्रान्स्पोर्टची सोय नाही हा असतो असं मला वाटतं. प्रत्येक वेळी लहानसहान गोष्टीसाठीही बाहेर जायचं झालं तर कोणातरी कार असलेल्या / ड्रायव्हिंग येणार्‍या व्यक्तीवर अवलंबून रहावं लागत असेल तर ती खरी डिपेन्डन्सी. पण लवकर ड्रायव्हिंग घ्यायचं शिकून.
प्रत्येक गावात पब्लिक लायब्ररीज असतात, कम्यूनिटी सेन्टर्स असतात. तिथून माहिती काढून नवीन गोष्टी शिकता येऊ शकतात, व्हॉलन्टिअरिंग करता येतं. घरात इन्टरनेट अ‍ॅक्सेस असतोच आता सहसा. ऑनलाइन लिखाण/वाचन करता येतं, घरबसल्याही शिकता येतं, ज्यातून पैसे मिळवायचे नाहीत असं कुठलंही काम करता येतं. ठरवलं तर कित्ती काय काय करता येतं!
डिपेन्डन्ट व्हीसा याचा एकमेव अर्थ म्हणजे तुम्ही अर्थार्जन करू शकत नाही. बाकी काय वाट्टेल ते करू शकता. धीर सोडू नका. फोन/ईमेलद्वारे घरच्या मंडळींच्या संपर्कात रहा.

खरच ज्या मुलिंना / मुलांना तिकडे जाउन फसवणुक, अत्याचार, मारहाण इ.इ. सहन करायला लागतं त्यांची काय हालत होत असेल...... दिवसेंदिवस रस्त्यांवर माणूस दिसत नाही... मदत काय मागणार आणि कोणा कडे?.....
>>> मोकीमी, सहन करणार्‍या इथे आजूबाजूला माणसं असूनही सहन करत राहतात.

मी नुसत्या सपोर्ट सीस्टीम बद्दल नाही तर एकंदर एकलकोंड्या लाईफस्टाईल बद्दल म्हणते आहे. आणि इकडुन तिकडे गेलेल्या नव्या नवर्‍यांना नक्कीच ह्या एकल्कोंडेपणा, सपोर्ट सीस्टीमचा अभाव आणि त्यात जर वाईट अनुभव आले तर येणारं नैराश्य, ह्यांचा सामना करायला लागत असणारच.... त्या दृष्टीने कठीण आयुष्य म्हंटलं. मुळात विषय तिकडे जाणार्‍या आणि फसलेल्या मुलींचा आहे. अनेकदा तिकडे जाताना नुसता झगझगाट दिसतो, पण तिकडे गेल्यावर 'घी देखा, पर बडगा नही देखा" ही अवस्था होते. त्यात हे घर काम ही आलच....

बाकी घरातल्या सगळ्यांनी जबाबदार्‍या वाटुन घ्याव्या हे जगात कुठेही लागु पडतं....

मामी म्हणते ते खरं आहे...मुळातच जर हिंमत नसेल तर इकडे काय आणि तिकडे काय.

लग्नातील फसवणूक विषयी बीबी आहे म्हणून इथेच विचारते.

खोटी शिक्षणाची सर्टीफिकेट बनवून इथे अमेरीकेत आलेल्या मुलीने फक्त ग्रीन कार्ड मिळावे म्हणून लग्न केले असेल व नवर्‍याचा छळ करत असेल तर काय मदत मिळू शकते?
लग्नानंतर त्या मुलाला कळले की मुलीने फक्त ग्रीन कार्ड साठीच लग्न केले... कारण तिचा स्टुंडंट विसा संपत आला होता व आता सिटिझनशिप मिळेपर्यंत मुलाला(नवर्‍याला ) सोडत नसेल तर कशी केस करावी?

घर वगैरे आपल्या नावावर केलेय, रोज शिव्या देणे नवर्‍याला वगैरे मुलीच प्रकार चालू आहेत.....

एकल्कोंडेपणा, सपोर्ट सीस्टीमचा अभाव >> सपोर्ट सिस्टिम म्ह्ण्जे नक्कि काय अपेक्शित आहे? फोन फिरवला कि आइ/सासु मदतिस येणे??

तिचा स्टुंडंट विसा संपत आला होता >> मग तिचि आधिचि सर्टिफिकेट अमेरिकेतिल विद्यापिठाने तपासलि नाही??? कोणत विद्यापिठ हे अमेरिकेत?

सपोर्ट सिस्टिम म्ह्ण्जे नक्कि काय अपेक्शित आहे? फोन फिरवला कि आइ/सासु मदतिस येणे??>>>>

आई, सासु, ह्यातर आहेतच..... पण शेजारी, मित्र, अगदी ओळखीचा कीराणामाल वाला, दूकानदार...... मुख्य म्हणजे ओळखीची माणसे....

तुम्ही म्हणाल ह्यँ ही काय सपोर्ट सीस्टीम झाली..... उत्तर होय... हेच आहे. उदाहरणे

१) सासरे एकटे होते घरात. नवी बिल्डींग होती. स्टुलावरुन पडले.... शेजार्‍यांनी आवाज ऐकुन दार तोडुन ताबडतोब हॉस्पिटल मधे नेले. आम्ही येई पर्यंत प्लास्टर घातलेले होते. हे शेजारी ओळखीचेही नव्हते.

२) मामे सासरे आजारी होते. दोन्ही मुलगे-सूना अमेरीकेत. एबी नीगेटीव्ह रक्त गट. संपुर्ण मुंबईत फक्त कांदिवलीला रक्त मिळाले. सगळ्या भाचे कंपनीने धावाधाव करुन त्यांना वाचवले. एकही दिवस हॉस्पिटल मधे कोण रहाणार हा प्रश्नच आला नाही... येवढी फौज होती.

३) शेजर्‍यांना हार्ट अ‍ॅटॅक आला. बाबा अक्षर्शः नेसत्या लेंग्यावर त्यांना गाडीत घालुन घेवुन गेले. योग्य मदत मिळाली.

४) साबांना बरं नव्हतं. मुलगी शेजार्‍यां कडे ३ तास ठेवुन आम्ही धावपळ करत होतो.

५) मला बेडरेस्ट होती मागच्या वर्षी. रोज सासरे खाण्या पिण्याची काळजी तर घेत होतेच, पण हात धरुन बाथरुम मधे नेणे इ. करत होते. गप्पा मारणे तर नेहेमीचेच.

६) मुलगी लहान असताना , साबा रस्त्यात पडल्या. हॉस्पिटल मधे ४ दिवस होत्या. त्या वेळी बेबी सीटर काकुंनी (पेठे काकुंनी) दोन रात्री मुलीला सांभाळले...... अगदी आनंदाने

ही सपोर्ट सीस्टीम. तुम्ही म्हणाल , अमेरीकेत एक फोन केला की वैद्यकिय सुविधा, पोलीस, फायर ब्रीगेड ह्या संघटना ताबडतोब धावुन येतात. पण फोन करण्या येवढंही भान जर नसेल तर?.....

ह्या झाल्या मोठ्या गोष्टी... पण अनेक लहान गोष्टी असतात. आम्ही जुन्या घरी रहात नाही, तरी वॉचमन, शेजारी आवर्जुन पत्र, कुरीयर घेतात...., मुलगी खाली खेळत असेल तर इतर आज्या लक्ष ठेवतात, घरात कोणी नसेल आणि कोणी ए.एम.सी. वाला आला, तर शेजारी बसवुन ठेवतात, फोन्करुन कळवतात, शाळेतुन मुलीला आणायला जायला उशीर झाला, तर एखादी जवळ रहाणारी पॅरेंट फोन करुन विचारते. आपण ही नकळत असा कोणच्या तरी सपोर्ट सीस्टीम चा भाग होत असतो.

नीदान मध्यमवर्गिय लोकांना इकडे अशा सपोर्ट सीस्टीम्ची सवय असते. आर्थात अगदी न मदत करणारे लोकही असतात. पण आपण इथे नीदान अशी सपोर्ट सीस्टीम तयार करु शकतो. प्रत्येक वेळेला आई, सासु हेच सपोर्ट असे नाही. माझी आई माझे लग्न झाल्यावर ७ वर्ष सातार्‍यात रहात होती. माझ्या अडचणीच्या वेळेला ती इच्छा असुनही येवु शकत नव्हती.

जाउदे बाफ ला सोडुन खुप लिहिलं गेलं.......

मोकीमी अगदी खरे लिहलेय तुम्ही.. मला हा अनुभव आलाय...
मला वर्टिगोचा त्रास होत होता मध्यंतरी तेव्हा असेच चक्कर येत होती सतत, (त्यावेळी माझी लेक फक्त २ वर्षाची होती) ... तेव्हा मला खुप एकाकी जाणवले होते विषेशतः लेकीकडे बघुन, नवरयाला फोन करुन बोलवले होते पण त्याला सुट्टी घेणे जमत नव्हती शेवटी अर्धा तासाची वेळ काढुन तो घरी आला आणि लेकीला आणि मला जेवायला दिले होते..

जाउदे बाफ ला सोडुन खुप लिहिलं गेलं.......>> नाही योग्यच लिहिलत आपण. फक्त सूर पटला नाही. जर क्युरीओसिटी/उत्सुकतेपोटी लिहिले असते तर चर्चा पुढे सरकली असती आणि ४-५ लोकांनी अनुभव लिहिले असते. इतर देशातही माणसेच राहतात आणि त्यांना ही वरील सर्व घटनांशी सामना करावा लागतो. ते कसा करतात, त्यांची 'सपोर्ट सिस्टीम' काय असते हे जाणून घ्यायची उत्सुकता वाटली तर अवश्य सांगा. जर आपण आपल्या एक महिन्याच्या अनुभवावरून सर्व गोष्टी समजल्या आहेत आणि ठाम मते बनवली आहेत असे झाले असेल तर उगीच कशाला पुढचे काही लिहा.

सिमन्तीनी आपण जरूर लिहा.

माझ्या अनुभवात इथे सपोर्ट सिस्टेम बर्याच वेळेस नव्याने निर्माण करावी लागते आणि इट्स नॉट इझी किंवा असे म्हणेन इट डिपेंड्स अपोन पर्स्नॅलिटिज इन्व्होल्वड, एका जागी घालवलेला काळ संपर्कात येणारे लोक वगैरे. अमेरिकन "संस्कृतीची" ओळख व्हायला वेळ लागतो. एक कंफर्ट यायला वेळ लागतो अशा वेळेस इनिशिअल फेज मधे (जनरलाइझेशनचा धोका पत्करून) आपापल्या "वांशिक" , " सांस्कृतीक" परिघातच अशा सपोर्ट सिस्टिम निर्माण करण्यावर भर असतो. माय्बोली हे मला त्याचेच उदाहरण वाटते.

आपापल्या "वांशिक" , " सांस्कृतीक" परिघातच अशा सपोर्ट सिस्टिम निर्माण करण्यावर भर असतो. माय्बोली हे मला त्याचेच उदाहरण वाटते.>> योग्य लिहिलेत. अजून काही गोष्टी:
१. अमेरिकेत कुटुंब प्रधान मानले तरी एकूण समाजाची रचना एकटी निर्बल व्यक्ती सन्मानाने राहू शकेल (खरे तर इथल्या कुमारीमाता लक्षात घेतल्या तर दुकटी निर्बल स्त्री सन्मानाने राहू शकेल) ह्या पायावर झालेली आहे. एकूणच लोकसंख्या कमी म्हणून काही जागी मदतीस तंत्रज्ञान वापरले जाते.
उदा: घरात वृद्ध व्यक्ती एकटी असेल आणि फोन करता येणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते असे असेल तर सेन्सर/कामेरा ह्यांची मदत घेतली जाते. ह्या सेन्सरचे दुसरे टोक (रिसिव्हिंग) आपल्या प्रिय व्यक्तीच्या फोनवर असते. आपण घरात पडलात तर शेजारी येण्याआधी आपला मुलगा ९११ ह्या अपघात मदत नंबरला फोन करू शकतो. सर्वाना परवडते का? बर्याच लोकांना परवडते पण घरात सेन्सर हवा का, का इतर सपोर्ट सिस्टीम असावी अशी चर्चा इथल्या घरातूनही होते. जे.ना हल्ली सेन्सरचे महत्त्व पटायला लागलेले दिसते. पार्क मध्ये खेळताना मुलांच्या गळ्यातही आया सेन्सर लावतात. कुत्रा-मांजर ह्याच्या कानात व्हेत डॉक्टर चीप बसवतात. म्हणजे ते हरवले तर शोधता येतात. हे सगळे आपल्या पूर्वग्रहांमुळे स्वीकारायला जड जाऊ शकते.
२. आपण रहात नाही त्या घरी मेल-फोरवर्डची सोय असते. पोस्टला डायरेक्ट नवा पत्ता कळवायचा. पत्र बरोबर मिळतात. शेजार्यांचे पाय धरायची गरज नाही.
३. इतर कुणीही व्यावसायिक (पोलीस सोडून) अवचित, आगंतुक घरी येत नाहीत. कुणी आले म्हणून दार वाजवले तर ती व्यक्ती बाता मारतीये, दार उघडू नका. तुमच्याशी वेळ ठरवूनच केबल, फोन इ इ माणसे येतात.
४. मुलांना आणायला उशीर झाला तर सहसा शाळा लहान मुले रस्त्यावर सोडत नाहीत. जास्त वेळ सांभाळावे लागले तर पैसे जातील पण मुल सुरक्षित असतात. पालकही जबाबदारीने वाहतुकीतील वेळ गृहीत धरून शाळा-आफ्टरस्कूल ठरवतात. पहिल्या दिवशी इतर आया मदत करणार नाहीत पण हळूहळू तेही होते.
थोडक्यात: नवीन लग्न करून आलात आणि कुठलाही व्यवहार एकटीने जमत नाही असे दिसले तर आपली माहिती कमी पडत आहे हे लक्षात घ्यावे. माहिती मिळवण्याच्या मागे लागा, देशाला दोष देणे सोपे आहे पण त्याने तुमचे प्रश्न सुटणार नाहीत.
हा झाला व्यावहारिक भाग. भावनिक भाग दुसरी पोस्त लिहिते.

भावनिक आधार कुठे शोधावा:
१. पेशवा यांनी सांगितल्याप्रमाणे वांशिक, सांस्कृतिक परीघ शोधावे. अमेरिकेत कुठे आहात त्यानुसार ह्याची व्याप्ती ठरते. बे-एरिया, न्यूयोर्क इ इ मोठ्या ठिकाणी मराठी लोक सहज सापडतात. मराठी मंडळ असते. आपले पूर्वग्रह (उदा: तिथे काय फक्त आजी-आजोबा नाहीतर पोर-बाले असणारे असतात. आमच्या सारखे नवपरिणीत कोणी दिसत नाहीये) दूर ठेवून मिसळत रहा. लहान गावात आला असाल तर भारतीय असोसिएशन असतात. सामान्यपणे सर्वांची वेब-साईट असते. 'वेळेस मदत मिळेल' अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा 'त्यांना वेळ असेल तर मदत मिळेल' हि खुणगाठ मनाशी ठेवा आणि जास्त लोकांशी संपर्क ठेवा.
२. नोकरी अथवा व्होलेतीयरिंगचे ठिकाण- ही खूप मोठी सपोर्ट सिस्टीम असते. माझ्या एका ऑफिस सहकारीचे ऑपरेशन झाले, ७ वर्षाचा मुलगा आणि नवरा. सगळ्यांनी तिला आणि मुलाला रोज डबा ३ आठवडे दिला. नवरा आपले आपले करून जेवायचा Happy तिचे पथ्य त्याला जमायचे नाही पण इतरांनी त्यालाही जेऊ घालावे हे त्याला पटायचे नाही. थोडक्यात मदत नेमकी मागावी आणि मग सहसा ती मिळते.
३. अपार्टमेत - फार थोड्या मुली आल्या आल्या बंगलीत राहतात. बहुतेक बिल्डींगमध्ये राहतात. शेजार्यांना 'ड्रिंक' साठी बोलावणे शिष्टसंमत मानले जाते. तो मार्ग जमत नसेल तर बिल्डींगचे जिम, लौन्द्री इथे ओळखी होत राहतात. हाय म्हणायला लाजू नका आणि कोणी हाय म्हणाले तर बाय म्हणू नका. एवढे जमले तर चांगल्या ओळखी होतात. मॅनेजरला बहिण/भाऊ माना Happy .
४. धार्मिक स्थाने - अनेक चर्च मध्ये चांगले उपक्रम होत असतात. इथल्या लोकांची ही फार मजबूत सपोर्ट सिस्टीम (?) असते. आपण ही आपल्या धर्माचे लोक देवळात, मशिदीत शोधू शकता.
५. 'मीट-अप'/छंदवर्ग - इथे मैत्री जुळते. नवरा सोबत आला नाही तरी छंदवर्गला जा. कार नाही हे कारण फार दिवस टिकत नाही कारण कुणी न कुणी ओळखीचे होते आणि तुम्हाला ड्रायव्हिंग येत नाही याची त्यांना समज असते. अर्थात हळू हळू बस/ड्रायव्हिंग चे प्रयत्न करा.
एकूण ह्या काय सांगायच्या गोष्टी आहेत असे वाटेल पण सुरुवातीला आपले पूर्वग्रह, भाषा, कार लायसन्स इ इ सर्वावर मात करण्यासाठी एक एक छोटे पाउल महत्त्वाचे ठरते. रस्त्यावर कुणी दिसत नाही ह्याला घाबरू नका. रस्त्यावर कुणी दिसले तरी तिथे मदत मागावी इतक्या आपण वाटेवर पडलेलो नाही. योग्य जागा तयार करा आणि योग्य व्यक्तीस मदत मागा. इथून पळून जाणे हा एक मार्ग आहे. पण इतर मार्ग शोधायचे ठरवलेत तर सापडतात. (हे सगळ जरी मी दुसर्याला उद्देशून लिहिले असले तरी हा खरा संवाद मी 'मायसेल्फ फ्यु मिस्टेक्स अगो' बरोबर केलेला आहे.)
आजारपणातील भावनिक आधार हा इथे अगदी स्वतंत्र विषय होऊ शकतो - सवडीने त्याबद्दलच्या सोयी लिहीन.

Pages