हात जोडूनी नभाला घालतो मी साकडे
चंद्र दे आणून माझा खिन्न माझे झोपडे ||
अंगणी येऊन माझ्या मेघ कोणी थांबतो
ओळखीचा ना तरीही जीव हा भांबावतो
पापण्यांच्या उंबर्याशी आठवांची सर झडे ||
धीर देतो रोज वारा भोवती रेंगाळुनी
शब्द काही सांत्वनाचे बोलुनी जाते कुणी
कोण बघतो झाकलेल्या काळजावरचे तडे ||
का उगा लावू दिव्याची झुंज अंधारासवे
तेज माझ्या संचिताचे तेवढे मजला हवे
हे अभासी चांदण्याचे काय कामाचे सडे ||
..................................................शाम
माझ्या गावात कधी आता
माझा मामा रहात नाही -
आजोळी जाण्याचा त्यामुळे
प्रसंग कधी येतच नाही......
धूर सोडणारी झुकझुक गाडी
साधे झाडही दिसत नाही
शहरात राहिला मामा आता
त्याला नोकरी मिळत नाही ...
वेळ नसल्यामुळे तो
मला कधी बोलवत नाही
मामी सुगरण आहे का
त्यामुळेच माहित नाही...
वर्षात कधीतरी एकदाच
शिकरण-पोळी खाते म्हणे -
एवढे मात्र ऐकून आहे
बाकीच काही ठाऊक नाही...
मामाची रंगीत गाडी नाही
मामाची उंचउंच माडी नाही
लपली काळाच्या पडद्याआड
आजी बरळते काहीबाही....
' तुझ माझ्यावर खरच प्रेम आहे - '
--विचारून माझ्या प्रेमाचा
का अपमान करतोस रे.....
वाऱ्याच्या प्रत्येक झुळकेबरोबर
तू सावरलेल्या माझ्या
चेहऱ्यावरच्या अवखळ बटा...
सागरतीरी मी वाळूत
ओढलेल्या रेघोट्यावर
तुझे अलगद फिरलेले बोट...
ओलेत्या माझ्या चेहऱ्यावरचे
तू आपल्या ओठांनी टिपून
घेतलेला पावसाचा एकेक थेंब...
क्याफेतल्या उष्टावलेल्या
कॉफीच्या मग धरलेल्या
माझ्या हातावर तो हळूच
फिरलेला तुझा हात ...
डोळ्यात डोळे घालून
अगणित काळापर्यंत
पाहिलेले एकमेकांचे प्रतिबिंब ...
माझ्या हृदयाच्या कप्प्यातल्या
एका कोपऱ्यात मी दडवलेल्या
त्या सगळ्या आठवणी ...
" फुलू दया ना मला जरा ,
बघू दया ना जग जरा -
तुम्ही सजीव, मीही सजीव
कळून घ्या भावना जरा -"
एक कळी स्फुंदत होती ,
वेलीजवळ मी असताना -
मन आपले उलगडत होती
हितगुज माझ्याशी करताना !
" काही करू शकत नाही
जगाविरुद्ध जाता येत नाही -
मरणाऱ्याला जगवते जग
जगणाऱ्याला मारते जग -"
...केविलवाणे होत म्हणालो ,
दु:ख जाणूनही कळीचे .
खिन्न हसून ती वदली ..
" नशिबाचे भोग ज्याचे त्याचे ! "
.
किती जणांचा धावा केला
कुणी न तेव्हां धावत आला
किती दमले मी टाहो फोडुन
रडले कुढत अपुल्याच मनातुन
जपण्याचा मी प्रयत्न केला
शीलाच्या माझ्या ठेव्याला
दुर्दैवाचा घाला पडला
नशिबी दुर्योधन धडपडला
जगास फुटला नाही पान्हा
धावत नाही आला कान्हा
सुन्न-खिन्न टाकून मी मान
पुरुषार्थाचा बघत अपमान !
. . .
तुला भेटल्यावर मी
एकही शब्द बोललो नाही !
अगदी स्वाभाविक आहे
तुझा नंतरचा रुसवा फुगवा ;
सांगू का खरेच सखे ,
तुला पाहताक्षणीच -
नुसतेच पहावेसे
वाटत राहिले...
शब्दांनाही !
.
बहरलेला वृक्ष होतो ,
एकदा मी छानसा -
गळुन गेली फूल पाने..
एकटा मी हा असा !
नाचती पक्षी कसे
बघुनिया खांद्यावरी..
खेळताना, होइ मजला
हर्ष माझ्या अंतरी -
रात पा-याची, वा-याचा दंगा
गंध श्वासाशी घालतो पिंगा
कडेशेवट राधा-हृदय हे
वाट पाहते ये ना श्रीरंगा
नीज लोचनी दाटली छद्मी
आत मोहन-भेटीची उर्मी
कुठे उरले आता माझी मी
वाट पाहते ये ना श्रीरंगा
राधा-मन हे सारखे गावे
शाममय हे तनही व्हावे
शाम-चांदणे एकदा प्यावे
वाट पाहते ये ना श्रीरंगा
इथे न यमुना इथे न गोकुळ
गोपसुतांची इथे न वर्दळ
कसा राहिला भरून अजुनही
वैजयंती ग, तुझाच दरवळ?
कृष्ण कुठे का आता उरला ?
कुणीच नाही त्यास पाहिला
सांग सानिके सूर तुझे हे
आजही असती निर्मळ मंजुळ?
वैजयंती वा असो सानिका
जगा भुलविते तुझी राधिका
युगे लोटली अजुन तरीही
चराचरातुन कृष्णच केवळ
त्याच्या व्यापातून बाहेर पडतोचना
तो येते ती शुकशुक करीत
तो ठरतो हताश तर ती वाटते छचोर
त्याच्या पोटात जाळ तर तिच्या गात्राला अत्तर
तो एक चिंधूक तर ती नरम अस्तर
अंगातून निथळावा घाम तशी त्याची आग
डोळे जळवणारी
पंक्चरझाली सायकल अनवाणी रेटणारी
देहाला यावीत फुले तसा तिचा सहवास
वासना चाळवणारा
काळ्याभोर केसांचा वास गुरफटणारा
वेदनेतून उगवते वेदना तशी
मिळकतीच्या विवंचनेत हरवावा शेवटचा रुपया
मरेपर्यंत, जीव तुटेपर्यंत
मिळण्याच्या शेवटच्या आशेपर्यंत
धुंडाळत रहावे कचकचाटात
इच्छेच्या टोकाला इच्छा तशी
नजरेच्या स्पर्शागणिक मांसल देहात पडावी भर
थकेपर्यंत, पापणी मिटेपर्यंत