चिनी तत्वज्ञानानुसार यिन आणि यांग ह्या दोन विरोधी गोष्टी परस्परपुरक प्रकारे एकत्र येऊन एक संपूर्ण गोष्ट बनवतात ज्यामुळे विश्वात संतुलन आणि सुसंवाद निर्माण व्हायला मदत होते.
कर्बोदक आणि प्रथीने एकत्र येऊन बनते एक परिपूर्ण जेवण ज्यावर तूप मीठ लिंबू आणि तुळशीपत्र ह्यांनी चार चांद लावले की जे सात्विक प्रसादाचे पान तयार होते त्याने भूक खवळलीच पाहिजे आणि हे खाल्ल्यावर घरातही संतुलन आणि सुसंवाद निर्माण झालाच म्हणून समजा.

वरण भात
भारतीयांच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश आवर्जुन केला जातो. विविध डाळींपासून गोड आणि तिखट असे अनेक नैमित्तिक पदार्थ केले गेले तरी डाळीपासून सांबार, रसम, डाळ तडका, डाळ फ्राय ( बाहेर जेवायला गेलं की तरुण मुलं ह्या दोन्ही पैकी काय घेऊ या ह्यावर चर्चा करतात, मला दोन्ही मधला फरक अजून ही कळला नाहीये. असो. ) साधं वरण, आमटी असं काहीतरी घरोघरी रोज केलं जातं. आणि भात किंवा भाकरी, पोळी, रोटी बरोबर ते आवडीने खाल्लं ही जातं. दुधी भोपळा, श्रावण घेवडा, कोबी तसेच पालेभाज्यांमध्ये ही मुगडाळ किंवा चणाडाळ घालून त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही ही वाढवलं जातं.