स्वयंवर भरले सौंदर्याचे
विजा घेऊनी आले राजे
अंबर वाकून उतरले जिथे
चमचम नटव्या तारकांचे
कुणी पसरली भगवी वाळू
शुभ्र देखण्या वैराग्यावरती
हिर्या माणकांची श्रीमंती
लखलखली अलंकारांची
उमरावी आसमंती कंदील
उजळत गेले उत्तररात्री
त्या रेशमी मैफिलीमधले
सूर विहरले नदीच्या पात्री
त्या नदीतला फकीर कोणसा
एकतारीसवे बेभान गायला
त्यास नुरले भान कोठले
उमटले गाणे शब्दांबरीचे
एकतार्यासंगे नाचे फकिरी
स्वयंवर थबकले महालीचे
खुदकन हासले नटवे चांदवे
चांदणे बरसले अंतरीचे
कधी कधी मनात इतकं असतं, इतकं असतं की शब्द बद्ध करणं सोप्प नसतं! अशा वेळेला काय करायचं. आपलं कविपण विसरून जायचं. कवितेला मनमुक्त भटकू द्यायचं. कुठे? आयुष्याच्या वाटेवर. मुक्त मुशाफिरी करायला. म्हणजे होईल असं की कविता पुन्हा येईल आणि ती येईल अशी की बस्स!
कशी बशी सुचत नसते ना, आतून काही यावं लागतं,व्हावं लागतं तेव्हाच
मनातून , आत्म्यातून, ते लहरीपण स्वतःला जाणवतं . शरीराशी असलेली फारकत, फकिरपण कवितेलाच माहिती हो
फकीर
विशाल पसरल्या जीवनी
टीचभर तुझी कहाणी
अस्तित्व तुझे मानवा
अळवावरचं पाणी
भवसागरी पोहतांना
कष्टला किती जीवनी
राज्य, वैभव गेले
गेली राजघराणी
दमून दमून जमविले
हातात कितीक पाणी
निसटून सर्व गेले
स्थिती केविलवाणी
नाही कुणी कुणाचा
अटळ भविष्यवाणी
आपल्याच ओंजळीत
आपलेच पाणी
आयुष्यभर गायली
अनेक सुंदर गाणी
कातर संध्याकाळी
फकिराची आर्त विराणी