मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

व्हिटॅमिन्सवरचा विश्वास उडत चालला आहे. अमुक मध्ये तमुक इतक्या प्रमाणात इत्यादी लिहून शाळेतली पोरेही कंटाळली असतील. तरीही कोणताही आजार झाला की व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांची चवड देतच असतात डॉ. आता अँटिऑक्सिडंटसचे नवीन खूळ काढलंय. आता मार्कांपुरतं व्हिटॅमिन्सचं महत्त्व राहिलं.

धन्यवाद Happy

व्हिटॅमिन्स हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांना आवडण्यासारखं आहे का?>> हो आहे. साधारण 6 वी, 7 वीपासून च्या मुलांना आवडेल. (मराठी माध्यम/सेमी)

व्हिटॅमिन पुस्तकाची भाषा फार जड आहे का ?>> अजिबात नाही. विज्ञान आवडत नसलं तरी कळतं आणि वाचावसं वाटतं.

वर्णिता, फेलानी परिचय आवडला.
आसाम आणि मेघना ढोके - यांच्यामुळे इंटरेस्टिंग वाटतंय.
मेघना ढोकेने ईशान्येकडच्या राज्यांमध्ये पत्रकारितेच्या माध्यमातून बरीच भटकंती केली आहे. त्यासाठी तिला एक फेलोशिप मिळाली होती बहुतेक. तिथल्या एन.आर.सी. प्रकरणावरचं तिचं पुस्तक (मोई कुन आमी कुन) विकत घेऊन ठेवलंय, पण अजून वाचायचंय.

<<<फेलानी
अरुपा पतंगिया कलिता
अनुवाद : मेघना ढोके>>

वर्णिता, परिचय वाचून अंगावर काटा आला.. किती काय काय सोसावं लागतं, ते पण काहीच चूक नसताना..

हल्ली वाचन पूर्वीसारखं होत नाही , पूर्वी नवीन पुस्तक हातात आलं की तासाभरात फडशा पाडून व्हायचा आता अर्धी कथा एकावेळी अर्धी संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी इतका स्पीड कमी झाला आहे ..

अरुण साधू यांची 2 पुस्तकं वाचली - बिनपावसाचा दिवस आणि बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या इमारती .. आधी अरुण साधू फक्त विज्ञानकथा लिहितात असा मोठ्ठा गैरसमज होता , पण ते सामाजिक , राजकीय अशा वेगवेगळ्या अंगांचं लिखाण करतात हे समजलं ..

कथा सुंदर आहेत सगळ्या .... 1 - 2 कथांमध्ये अगदी तळागाळातल्या परिस्थितीत राहणाऱ्या माणसांना चांगले दिवस येतात कथेच्या एंडिंगला , त्या एंडिंगनी खूप समाधान वाटलं ... बाकी सगळ्या थोडाफार निराशाजनक शेवट असलेल्या आहेत .... म्हणजे कथा म्हणून निराशाजनक नाही तर त्यातल्या माणसांचं आयुष्य त्रासांनी भरलेलंच राहतं , अशा अर्थाने ..

कथा म्हणून सगळ्याच उत्कृष्ट होत्या .

शैलेंद्र यांच्या जीवनप्रवासावरचं ' सुहाना सफर और ' हे पुस्तक वाचत आहे , विजय पाडळकर नावाचे लेखक आहेत . सुरेख आहे पुस्तक . सलग सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं वाचन होत नाहीये , अधलं मधलंच उघडून वाचत आहे , एक चतुर्थांश झालं असेल वाचून .

त्यांच्या आयुष्याबद्दल , अनुभवांबद्दल जाणून घेताना खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे आणि जुने सिनेमा , गाणी , गाणं कोणता प्रसंग / भावना व्यक्त करतं आहे - यांचंही डिस्क्रिप्शन लेखकाने बऱ्यापैकी चांगलं केलं आहे ..

टॉलस्टॉय एक माणूस
सुमती देवस्थळे
राजहंस प्रकाशन. १९७४, ...२००५
पाने पाचशे.
या लेखकाच्या एक दोन कथा पूर्वी वाचल्या होत्या पण हे पुस्तक त्यांच्या जीवनावरच लिहिले आहे. फार सुंदर पुस्तक. वर्णन करता येत नाही. इतके वर्षांत का वाचले नाही हा विचार आला.

Spirit Hacking: Shamanic keys to reclaim your personal power, transform yourself and light up the world - Shaman Durek (Author)

२०% रोचक + ८०% बुलशिट!
----------------------------------

The Sufi Path of Love: Entering the Heart of Hearts
Llewellyn Vaughan-Lee

आवडले. मस्त आहे. लवकर संपले.

नॅशनल बुक ट्रस्टने प्रकाशित केलेलं मराठी लघुकथा हे संकलन वाचनालयात मिळालं. संपादक भालचंद्र फडके. त्यांची प्रस्तावना फार आवडली. मराठी लघुकथेच्या प्रवासाचा विस्तृत आढावा घेतला आहे. शिवाय कथांच्या निवडीतलं वैविध्य लक्षणीय आहे. बर्‍याच नावाजलेल्या कथा आहेत.
याआधी निवडक मराठी कथा हे संकलन वाचलं होतं. मुंबई विद्यापीठाने ते बी ए साठी लावलं होतं. त्यापेक्षा हे संकलन आणि प्रस्तावना अधिक आवडले. अर्थात हे जरा जुने असल्याने अलीकडचे लेखक त्यात नाहीत.

दि बा मोकाशींची 'आणि आमोद सुनासि आले ' ही कथा यात आहे. कथा पकड घेते हे सांगायला नकोच. पण मला त्यातल्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा , त्या ओव्यांचा कथानकाशी असलेला संबंध कळला नाही. कोणी उलगडू शकेल का?

माझ्यापाशी संदर्भाला कथा हाताशी नाही, आणि सगळे तपशील आठवत नाहीत, पण एकीकडे माळकऱ्याचा मुलगा वादळात जाणं आणि दुसरीकडे वासराचा जन्म यांतून जीवन, जगणारा आणि जगवणारा ही त्रिपुटी ओवीत वर्णन केल्याप्रमाणे नाहीशी होताना दिसते.
मुलाला वाचवता आलं नाही म्हणून वाटणारं दुःख हेही कर्तेपणाच्या आभासातूनच आलेलं, आणि गरत्या गायीची सुटका करण्याचे सायासही. वाचवणारा मी कोण? वाचणारं वासरू किंवा न वाचलेला मुलगाही कोण? जीवन जगणारे आपण असतो की आपल्या माध्यमातून जीवनच आपणाला जगून घेत असतं? की हे सगळं एकमेकांपासून निराळं नाहीच? असा काहीसा अर्थ मला लागला होता.
चुभूदेघे. Happy

जीवन आणि मरण यांतलं अद्वैत, हा कथेचा मुख्य गाभा.
एकदा पूर आला आणि पुण्यात दूध मिळेना. दूध मावळातून येई. मोकाशी पावसात दूध आणायला बाहेर पडले. घरी आले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर पूर आलेल्या नदीतून वाहून जाणाऱ्या म्हशी आल्या. त्यातून दोनतीन दिवसांत ही कथा त्यांनी लिहून काढली.

कथा लिहिली तेव्हा त्यात ओव्या नव्हत्या. यांत कोणत्या ओव्या वापराव्या, हे त्यांना कळेना. त्या अस्वस्थतेत दोनचार दिवस गेले. त्यांच्या कथांची पहिली वाचक त्यांची पत्नी होती. एक दिवस त्यांनी पत्नीला कथा वाचून दाखवली. त्या म्हणाल्या, हा तर अमृतानुभव!
मग त्या ओव्या कथेत उतरल्या.
.
मोकाशी थोर कारण फक्त शेवटच्या ओव्या चपखल बसल्या असं नाही. अमृतानुभव ग्रंथात असलेल्या अनेक बाबी कथेत येतात. उदाहरणार्थ, परदुःख आणि आत्मदुःख. शिवाय शैव आणि वैष्णव हे धागे आहेतच. रामजी - विठ्ठल, शिवा - पारुबाई आणि तिचे शंकर - पार्वती.
कथेचं शीर्षक मात्र मोकाशी यांनी चुकवलं. आमोद सुनासि जाले, असं हवं.

या कथेच्या निर्मितीवर अरविंद गोखले यांनी लघुकथा लिहिली आहे. त्यांच्या संपादित कथांच्या संग्रहात ती आहे.

जीवन आणि मरण यांतलं अद्वैत, हा कथेचा मुख्य गाभा....,....+१.

आमोद सुनासि आले.........
नाकाने आपल्याला सुगंध कळतो.इथेतर नाकच सुगंध झाले होते.

कॉलेजला असताना दूरदर्शनवर ह्या कथेवरील नाट्य रूपांतर पाहिले होते.नंतर कथाही वाचली होती.पण ह्या ओवीचा अर्थच कळला नव्हता.सृजनाचा आनंद मृत्यूमुळे शून्यवत झाला इतकेच वाटले होते.पण या ओवीने मात्र बराच काळ छळले होते.

धन्यवाद चिनूक्स! हा लेख पूर्वी वाचला होता.कालही ह्या लेखावरील प्रतिसाद वाचत होते.डोक्यात अस्मिता होती.
वरचा प्रतिसाद संपादित करते.

बघायला हवं. पण टॉलस्टॉयने ताबा घेतला आहे.
त्याने सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या पण प्रत्यक्ष त्यांच्या घरात काय चाललं होतं? स्वार्थ, परोपकार, प्रेम, आर्थिक परिस्थिती, जमीनदार (तो स्वतः चार हजार एकरांचा मालक) विरुद्ध गुलाम नोकर ( त्यांच्याकडे तेहतीस होते), गरीब लोकांसाठी मदत ( सरकार झार आणि धर्मसंस्था विरुद्ध) , पुस्तकांसाठी अभ्यास आणि लेखन, बायकोची साथ, चार लहान मुलं झोपल्यावर रात्री अकरा पाच नवऱ्याने गिचमिड करून दिवसभर लिहिले कागद सुवाच्य अक्षरात बायकोने लिहून काढणे, नंतर कमाईचे हक्क कॉपीराईट मुक्त करण्यावरून घरात बायकोशी भांडणं(ती सोळा वर्षांनी लहान), कौटुंबिक जीवन एकीकडे (तेरा बाळंतपणं बायकोची, नऊ मुलं वाचली मोठी झाली) , सौ डोस्टोवस्कीकडे जाऊन बायकोने प्रकाशन व्यवसाय शिकून कादंबऱ्या स्वतःच प्रकाशित करणं टॉलस्टॉयला न आवडणे. कथा कादंबऱ्यांत मारे प्रेमाची कौतुके चालत पण बायकोशी सतत वितंडवाद . टॉलस्टॉयने आपले गुलाम मुक्त करण्याची योजना बनवली, त्यांना सांगितली पण त्यांना पटेचना. कायदेशीर रूप देण्यासाठी सरकारकडे(झारकडे) पाठवली. पण त्याने नाकारली. पुढे तीच प्रसिद्ध करून श्रेय लाटले. धर्माचं जोखड कधीच मानलं नाही, चर्चमध्ये गेला नाही, भरपूर विरोधी लेखन केलं. लोकांचा राजा तोच होता. सत्यात जगणारा लेखक होता.

काळे करडे स्ट्रोक्स -प्रणव सखदेव.

मुंबईतल्या कॉलेज तरुणांची भाषा वाटावी म्हणून वाक्यात पेरलेले इंग्रजी शब्द. पुढे त्याची सवय होत गेली. पण मग मी शोभा डे ची कादंबरी पुरुष निवेदकाकडून मराठीत वाचतोय असं वाटू लागलं. हा नायक डोंबिवलीचा म्हणून मध्यमवर्गीय. पण रुइया कॉलेज निवडतो. त्यामुळे थेट मुंबईची पार्श्वभूमी. सिगारेट्स, ड्रिंक्स, ड्रग्ज, सेक्स. पूल क्लब्स, अपमृत्यू , खून, समलिंगी संबंध , नात्यात शरीरसंबंध असा सगळा मसाला. मध्ये कुठेतरी कॉलेज. थोडं शिक्षण. मग अचानक वळणं. फाटाफुटी, मनस्ताप, भरकटणं. मग करियरचा धावता आढावा.
त्याच्या आयुष्यात आलेली कोणीही व्यक्ती सर्वसाधारण , धड म्हणावी अशी नाही. मध्ये काही चिंतनाचे, निसर्गवर्णनाचे छान तुकडे आलेत. पावसात तुंबलेल्या मुंबईचं वर्णन तेवढं आवडलं, त्यात २६ जुलैची आठवण, दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या , टु जी ते थ्री जी फोन, ईमेल .
शेवटच्या पंधरावीस पानांत निवेदन अचानक वर्तमानकाळात .

या कादंबरीसाठी लेखकाला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

याच लेखकाचा नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य हा कथासंग्रह वाचनालयात दिसत असतो. अनेकदा उचलून परत ठेवला. सध्या लेखक अनुवादात रमलेला दिसतो.

Pages