मी वाचलेले पुस्तक - ३

Submitted by Admin-team on 20 April, 2022 - 18:19

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे.

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

(हे वाक्य एकेकाळी फार मजेदार अर्थाने वापरले जायचे) आमच्या तेव्हाच्या बॅकयार्ड मधेच जवळजवळ १०-१५ प्रकारचे पक्षी येत असे लक्षात आले. >> शेवटचे वाक्य त्या आधीच्या वाक्यानंतर एव्हढ्या निष्पाप पणे फक्त फाच लिहू शकतो Wink

'कुण्या गावाचं आलं पाखरू' का ? > अस्मिता Lol

Lol

ते शेवटचे वाक्य आधी लिहीले होते. नंतर पोस्ट वाचताना तो अँगल जाणवला. तेव्हा निष्पाप बिष्पाप काही नाही Happy

बरं पक्षी - कोणत्याही प्रकारचे - सोडा आणि पुस्तकांवर या.

Audubon Society चं नाव ज्याच्यावरून पडलंय तो John James Audubon, त्याने बर्डिंगच्या विश्वात कमाल काम करून ठेवलंय. मी त्याच्यावरचा एक लेख वाचल्यावर मनोमन त्याला दंडवत घातला. ज्या काळात आणि ज्या प्रकारे त्याने डॉक्युमेन्टेशन केलंय ते अविश्वसनीय आहे.
मात्र माझ्याकडे बर्डिंगसाठीची नजर आणि पेशन्स दोन्ही नाही Proud

द बिग इयर - प्रत्यक्षात हा खटाटोप करणारे पण मला अचाट वाटतात. त्यातल्या Noah Strycker चा एक लेख वाचला होता. नंतर त्याच्यावरची एक डॉक्यु. की मुलाखत काहीतरी शोधून ती सुद्धा पाहिली होती.
जगात माणसं काय काय करत असतात हे फीलिंग (परत एकदा) आलं !

आपल्याकडेही बरेच फोटोग्राफर आहेत. नयन खानोलकर त्यापैकी एक.
आंध्रामध्ये स्नाईपरचा फोटो मिळवणे
तणमोराचा फोटो मिळवणे
भिमाशंकर येथील जुलै महिन्यात दिसणाऱ्या चमकणाऱ्या बुरशीचा फोटो घेणे
वगैरे

अ स्ट्रीट कॅट नेम्ड बॉब-

जेम्स एक होमलेस व ड्रग अ‍ॅडिक्ट मनुष्य आहे. त्याला एकदा हे बोक्याचे खूप देखणे पिल्लू सापडते. हा टॉमकॅट - बॉब जेम्सचे म्हणजे लेखकाचे भावविश्व संपूर्ण व्यापून दशांगुळे उरतो. या माणसाचे संपूर्ण आयुष्य बदलवुन टाकतो. या बोक्यावरची त्याची माया, त्याला नव्याने झालेली जबाबदारीची जाणिव इतकं सुरेख वर्णन आहे. मग आपल्या मुलांची आपण आजारपणात करतो तशी त्याची आजारपणात, तो शुश्रुषा करतो. तो म्हणजे लेखक स्वतः व्यसनमुक्त कसा होतो, त्यात बॉबची कशी अप्रत्यक्ष मदत होते - ते ही वाचण्यासारखे आहे.
.
बरं हा लेखक यु के चा असल्याने इतके छान वाक्प्रचार आपल्याला सापडतात. माय मदर हॅड इची फीट (आई कोठेही एका ठिकाणी स्थिर स्थावर होत नसे), वोल्फिंग डाउन फुड, बीईंग अंडरवेदर, आयसिंग ऑन केक - असे आपण माहीत असलेले पण सहसा न वापरणारे वाक्प्रचार येतात. ही यु के च्या लोकांची खासियत. बॉबला कचरा धुंडाळायची सवय असते तर लेखक गंमतीने म्हणतो - बॉब वॉज अ स्ट्रीट कॅट. यु कॅन टेक कॅट आऊट ऑफ स्ट्रीट बट यु कॅनॉट टेक स्ट्रीट आऊट ऑफ कॅट Happy इंग्रजी भाषा वाघिणीचं दूध म्हणतात ती मूळात ब्रिटिशर्स्चीच तेव्हा त्यांचे इंग्रजी नक्कीच मस्त असते.
.
मुख्य म्हणजे, आपण सामान्य लोकं, होमलेस लोकांना कसे वागवतात. कसे वागवतो, तुच्छ लेखतो, अक्षरक्षः डिह्युमनटाईझ करतो. व्हर्बल अ‍ॅब्युझ, हाडतुड करणे हे तर सर्रास होते. त्यामुळे हे लोक कोडगे तर होतातच पण त्यांची संपूर्ण आयडेंटीटी, व्यक्तीमत्व पार चिरडून जाते, दे आर नोबडी, एक पोकळी आहे ते लोक म्हणजे - ब्लॅक होल. त्यांना काम करण्याची इच्छा असून कोणीही काम देतही नाही पण "गेट अ जॉब यु स्कम" वगैरे अपमान त्यांच्यावर भिरकावण्यात आपण पुढे असतो.
.
आणि अशा पिचलेल्या, ड्रग अ‍ॅडीक्ट जेम्सला हा बोका, त्याचे प्रेम किती किती मदत करते, कसेकसे त्याला खोल गर्तेतून बाहेर काढते. इन फॅक्ट त्याची हेरॉइनची सवय/व्यसन कसे सुटते, त्याची ही एक ट्रायम्फन्ट कहाणी आहे. विलक्षण आहे.
आपल्याला खूप खूप भूक असते आणि त्या काळात काही मिळत नाही तेव्हा एक भाकरीचा तुकडाही आपल्याला कसे बळ देतो, कसा नरीशींग (पौष्टिक) ठरतो तसा हा लेखक याला ना प्रेम, माया ना स्वाभिमान, ना 'स्व' ची जाणिव पण बॉबचे प्रेम त्याच्याकरता किती उभारी देणारे ठरते त्याची ही नितांत सुंदर कहाणी आहे.
आणि हा बॉब तर इतका देखणा आहे. अतिशय गोड बोका आहे. खाली फोटोत पहाच.

होमलेस लोकांना कसे वागवावे, निदानपक्षी त्यांचा अपमान कसा करु नये - ही शिकवण जरी या पुस्तकातून मिळाली तरी खूप झाले.

सामो,किती विलक्षण पुस्तक परिचय करून दिला आहेस!

मागे हरिहर/शाली यांचा पक्षी निरीक्षणावर एका धागा होता.

तो वाचल्याने जरा पक्षांकडे जास्त लक्ष जाऊ लागले.खरेच असतात की बारीक बारीक पक्षी.आपलेच लक्ष जात नसते इतकेच.मुंबईचा पक्षी म्हणजे कबूतर! नंतर कावळा.चिमणीही दिसायला कठीण झालेल्या दिवसात शिंजिर, खंड्या सनबर्ड,भारद्वाज(याची जोडी तर रोज सकाळी सोसायटीत वावरायची), साळुंकी आणि पाणकावळा आणि अगदी हल्ली दिसलेल्या आणि कुंडीतल्या गवताच्या बिया खाणाऱ्या chestnut मुनिया हे सारे असतातच.

>>>>>मागे हरिहर/शाली यांचा पक्षी निरीक्षणावर एका धागा होता.
त्यांचे धागे अफाट सुंदर असत. त्यांनी परत यावे - अजुन काय म्हणणार.

चांगलं आहे पुस्तक. वाक्प्रचार म्हणाल तर बरेच नामवंत लेखक हे वापरण्याचं (लिहिण्याचं) टाळतात. अगदी सर्वसामान्य वाचकांनी लेखन वाचावं अशी त्यांची इच्छा असते. मग साहित्यिकपणा दूरच ठेवतात .नकोच. बाकी एकटेपणा घालवणे यासाठी प्राणी असणे उत्तमच. मांजरांचं बरं असतं आपल्या आजुबाजूला घुटमळतात पण तरीही आपलेपणा, स्वातंत्र्य टिकवून ठेवतात. भुंकूंन ,चावून त्रास देण्याची सवय नसते.
पुस्तकाची ओळख छान देता. कुठेही फार उघड न करता (spoiler?) ते वाचायला उत्सुक करता. मी-माझं मांजर -मी असं वरवर लेखन वाटलं तरी एक सूप्त प्रवाह वाहतो. जवळीक,गुंता,भावना जीवन कसे सुसह्य करतात.
यावरून आठवलं. 'restoration' मालिका आहे हिस्ट्री चानेलवर. त्यात एक कर्मचारी मालकाला सांगतो की मला रजा हवीय उद्या. " माझ्या मांजराला vet डॉक्टर कडे न्यायचं आहे. आजारी वाटतंय."
"जा. नाहीतरी तुला दुसरं आहे कोण."

मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे. यातला एक अंश मायबोलीवर आणि एक शालेय पाठ्यपुस्तकात वाचल्यानंतर हे पुस्तक कधीपासून वाचायचं होतं.
पुस्तकाला अनेक प्रस्तावना आहेत. प्रकाशकाची, शब्दांकन करणारीची, आवृत्तीगणिक. इतर काही लेखक पत्नींप्रमाणे हेही कथन कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, जे जसं घडलं तसं सांगणारं. तक्रारीचा सूर न लावणारं आहे. खंत आहे. पती लेखक+ कार्यकर्ता. त्याचं संसारात लक्ष नाही. लेखिका अशिक्षित असूनही तिची समज मात्र स्तिमित करणारी. तिने स्वतःहून कुटुंबनियोजनाच्या साधनांची माहिती करून घेऊन ती वापरणं आणि नवर्‍याची त्याबाबतची अनभिज्ञता - काहीशी बेफिकिरी.
या जोडप्याला त्यावेळच्या प्रथितयश साहित्यिकांचा जो अकृत्रिम स्नेह लाभला तसं आताच्या साहित्यिकांत असेल का?
ओढगस्तीचा संसार करून वाढवलेली मुलं शेवटी दुरावणं हे वेदनादायी आहे. शेवटच्या भागात दोघे नेरळला राहायला गेले. त्यात त्यांच्या प्रकृतीच्या समस्या. या वळणावर पुस्तक संपतं. ते वाचून पुढे त्यांचं कसं झालं असेल अशी काळजी वाटते. म्हणून चेक केलं , तर पुस्तक प्रकाशन झाल्यनंतर वर्षभरातच दोघांचं निधन झाल्याचं दिसलं.

सामो..पक्षीनिरीक्षणावरच्या पुस्तकाची मस्त ओळख करून दिलेय. अस्मिताने सांगितलेला मूव्हीही नोंदवतेय.

सामो, तुम्हाला कळवायचं राहिलं.. The Harvest moon पुस्तक आवडलंय..छान छोटी छोटी idillyc, atmospiric narrations आहेत. खरं तर ते एका दमात वाचायचं पुस्तक नाही..coffee घेत, fireplace पाशी बसून निवांत वाचत, रंगून जाण्याचं, पुरवून पुरवून वाचायचं पुस्तक आहे.

मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे.
किंडल वर घेऊन वाचलं.
> कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, जे जसं घडलं तसं सांगणारं. तक्रारीचा सूर न लावणारं आहे. खंत आहे. +१

आता पाहिलं तर त्या गेल्या वर्षी गेल्या असं दिसतं. म्हणजे नारायण सुर्वे गेल्यावर बारा वर्षे होत्या. My bad.
मी वाचलेल्या आवृत्तीत ते गेल्यानंतरचं प्रकरण नव्हतं. पण पेपरात आलेलं दिसतंय.

पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवर पुस्तक महोत्सव आहे १६ ते २४ डिसेंबर पर्यंत. बरंच मोठं प्रदर्शन आहे.
मराठीतल्या बऱ्याच प्रकाशनांचे, साहित्य अकादमीचे आणि नॅशनल बुक ट्रस्टचे स्टॉल्स आहेत. शिवाय इतर भारतीय भाषांतल्या पुस्तकांचे पण स्टॉल्स आहेत.‌ हिंदी पुस्तकांचं 'राजकमल'वाल्यांचं प्रदर्शन, कलेक्शन चांगलं आहे.

>>>>>सामो, तुम्हाला कळवायचं राहिलं.. The Harvest moon पुस्तक आवडलंय..छान छोटी छोटी idillyc, atmospiric narrations आहेत. खरं तर ते एका दमात वाचायचं पुस्तक नाही..coffee घेत, fireplace पाशी बसून निवांत वाचत, रंगून जाण्याचं, पुरवून पुरवून वाचायचं पुस्तक आहे.

क्या बात है. खरय फार संथपणे घुटक्या घुटक्याने आस्वाद घ्यायचे ते पुस्तक आहे. विशेषतः मी मिडवेस्ट्मध्ये राहील्याने खूप रिलेट केले. तिथे हंटिंगचा एक सीझन असतो. लोकांकडे सर्रास छर्‍र्‍याचय बंदुका असतात. लोक साधे, शेतकरी किंवा असे साधे असतात. माझ्या ऑफिसातील माझ्या कलीग्ज ककडेबकर्‍या, घोडे बिडे होते. म्हणजे आय टीत बरं का- प्रोग्रॅमर्स कडे. काहींकडे बोट होती. मग उन्हाळ्यात ती बाहेर निघायची.

>>>>>>मी-माझं मांजर -मी असं वरवर लेखन वाटलं तरी एक सूप्त प्रवाह वाहतो. जवळीक,गुंता,भावना जीवन कसे सुसह्य करतात.
धन्यवाद शरदजी.

एम टी आयवा मारू
-अनंत सामंत

या कादंबरीचं नाव खूप वर्षं ऐकून होते. अनंत सामंतांच्या अनेक कथा पूर्वी दिवाळी अंकांमध्ये वाचल्या होत्या.
एम टी म्हणजे मोटर टँकर. आयवा मारू हे जहाजाचं नाव. एका तेलवाहू जहाजावर घडणारी ही कादंबरी आहे. लेखकाने स्वतः जहाजावर आयुष्य काढलं आहे.

जहाजाचा उल्लेख खलाश्यांमध्ये स्त्रीलिंगी केला जातो. जहाजावर एखादी स्त्री असणं हे जहाजाला आवडत नाही अशी जुन्या खलाश्यांची समजूत असते. पण ऑफिसर्सच्या बायका काही काळ जहाजावर येऊन राहणं हेही कॉमन आहे. अशीच एका ऑफिसरची पत्नी, उज्ज्वला आयवा मारूवर येते. काही अपरिहार्य कारणाने अजून एकाची आई जहाजावर येऊन जाते. निवेदकाची प्रेयसीही जहाजावर येऊन जाते. या तीन स्त्रिया आणि 'शिप' ही चौथी स्त्री. इतर सगळे पुरुष. या सगळ्यांची एकमेकांमधे गुंतलेली ही गोष्ट आहे.
कादंबरी अत्यंत उत्कंठावर्धक आहे. लेखक स्वतः खलाशी असल्यामुळे जहाजावरचं वातावरण, खलाश्यांचं आयुष्य अगदी चित्रदर्शी उभं राहिलं आहे. माणसांचे गुंतागुंतीचे आणि थांग न लागणारे स्वभावही चांगले उभे केलेले आहेत. पुढे काय होईल, शेवटी काय होईल, याचा अंदाज येत नाही. अनेक धक्के बसतात.

बऱ्याच दिवसांनी, हातातून खाली ठेवू नये असं वाटायला लावणारी कादंबरी वाचून झाली!

संप्रति१, ते पुस्तक प्रदर्शन पाहिलं. खूप मोठं आहे. दोन वेळा जाऊन सगळे स्टॉल्स संपवले. आवडलं. भरपूर पुस्तकं बघायला मिळाली. काही विकत घेतली.

वावे, Happy
माझेही दोन राउंड झाले. आज तिसरा आणि शेवटचा होईल. मला तो 'राजकमल'चा आणि साहित्य अकादमी चा स्टॉल खूपच आवडलाय. त्यांनी जवळपास सगळ्याच वाचकांचा विचार करून तमाम नव्या जुन्या हिंदी पुस्तकांचं कलेक्शन आणलं आहे. जो जे वांछिल तो ते लाहो..!
माझा मराठी चा सॅच्युरेशन पॉईंट फार पूर्वीच येऊन गेल्यामुळे अलीकडे हिंदी तच धुडगूस चाललाय. Happy असं जाणवतंय की आपलं त्यांचं प्रमाण एकास तीन असं आहे. मराठीत एक चांगला लेखक/लेखिका असेल, तर हिंदीत तीन तसे सापडतात.
त्यामुळे जातोय आणि अजून अजून पुस्तकं काखोटीला मारून घेऊन येतोय. तशीही हिंदी पुस्तकांची प्रदर्शनं/दुकानं इथे दुर्मिळच असल्यामुळे आत्ता‌ हा जो हावरटपणा करतोय तो क्षम्य आहे, अशी ढील स्वतःस दिली आहे. Happy

हो हिंदीचं कलेक्शन खूपच चांगलं वाटलं मलाही. तुम्ही सुचवत जा हिंदी पुस्तकं. मी आत्ता तरी फक्त मुलासाठी एक कथासंग्रह घेतलाय.

हलते डुलते झुमके
मनस्विनी लता रविंद्र

हा कथासंग्रह नुकताच वाचून संपवला. 'Not my cup of tea' असं या पुस्तकाच्या बाबतीत म्हणणं योग्य ठरेल कदाचित.
सुरुवातीच्या 'झोप' आणि 'क्लृप्तीपत्रक' या कथा त्यांच्या वेगळेपणामुळे चांगल्या वाटल्या. पण क्लृप्तीपत्रकामध्येही दहावीत गेलेल्या मुलीच्या मानाने ते निवेदन कधी प्रगल्भ वाटतं तर कधी बालिश वाटतं. टीनेजर्स असेच असतात हे मला माहिती आहे, पण तरी 'पालकांच्या वागणुकीतला विरोधाभास दाखवून देणे' या उद्देशाने ते लिहिल्यासारखं वाटलं. पण तरीही चांगली वाटली ही कथा.

त्यानंतर 'कॅसिनोचं रॅपर असलेला बॉक्स' पासून पुढच्या कथा मला क्रमाने निष्फळ वाटत गेल्या. पात्रं बदलून प्रत्येक कथेत आपण तेच तेच वाचतोय असं वाटायला लागलं. खलाशाची गोष्ट ( 'तीव्र ठणक') बराच काळ उत्सुकतेने वाचली, इंटरेस्टिंग वाटली, पण शेवटी हाताला काही लागलं असं नाही वाटलं. थोड्याफार फरकाने पुढच्या सगळ्याच कथांच्या बाबतीत हे म्हणता येईल. शेरलॉक होम्स, वॉटसन आणि 'लव्ह इन द टाईम ऑफ कॉलरा' या कादंबरीतली पात्रं घेऊन नवीन गोष्ट जी लिहिली आहे, त्यात होम्स, वॉटसन आणि त्या इतर पात्रांचं प्रयोजन मला समजलं नाही. स्थळकाळाचे संदर्भ एरवीही निर्माण करता आले असते. 'वांती' ही कथा तर मला अजिबातच समजली नाही!
शेवटची 'हलते डुलते झुमके' त्या मानाने समजली, पण त्यातही शेवटी हाताला काही लागलं नाही असं वाटलं!

लहानसं कथासूत्र घेऊन कथा फुलवणं हे मला आवडतं, उदाहरणार्थ किरण गुरवांचे क्षुधाशांती भुवन आणि बाळूच्या अवस्थांतराची डायरी हे कथासंग्रह. पण त्या फुलवण्याला काही तरी सुस्पष्ट प्रयोजन असलं पाहिजे अशी माझी अपेक्षा असते, ती कदाचित ढोबळ किंवा पारंपरिक असेल, पण तशी ती आहे हे खरं. 'हलते डुलते झुमके' या पुस्तकातलं कथा फुलवणं मला 'abstract' वाटलं. एखाद्या कथेत ठीक आहे, पण प्रत्येकच कथेत ते आवडावं, अशी माझी प्रकृती नाही.

पथेर पांचाली
अनुवाद प्रसाद ठाकूर.
मेहता पब्लिशिंग हाऊस, प्रकाशन २०१२,२०१६,२०२०.
(मूळ बंगाली पुस्तक १९२९ याच नावाचे. लेखक बिभुतीभूषण बंदोपाध्याय. पण अनुवादात नाव बॅनर्जी लिहीले आहे.)
बरेच वर्षं हे पुस्तक आणि सत्यजीत रे'चा सिनेमा गाजला होता. आता मराठी अनुवाद सापडला वाचनालयात म्हणून आणून वाचले. कथेत काहीही विशेष नाही गाजण्यासारखं. बंगालमधील एका ब्राह्मण कुटुंबातील दोन लहान मुलांचं विश्व आहे . छोटा मुलगा अपूर्व (अप्पू) आणि मोठी बहीण दुर्गा या मुलांचं बालपण आणि खेळ. आजुबाजूचे काही लोक वगैरे. लेखनशैली काही खास नाही.
(बंगालचा गोट्या?)

मास्तरांची सावली - कृष्णाबाई नारायण सुर्वे.
कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, जे जसं घडलं तसं सांगणारं. तक्रारीचा सूर न लावणारं आहे. खंत आहे. +१>> +1

एम टी आयवा मारू
-अनंत सामंत >> ओळख आवडली. बघते मिळतंय का वाचनालयात.

फेलानी
अरुपा पतंगिया कलिता
अनुवाद : मेघना ढोके

फेलानी म्हणजे फेकून दिलेली. आहे ही एक कथाच पण काल्पनिक नाही तर सत्य घटनांवर आधारित. फेलानीच्या नशिबी जन्मापासूनच संघर्ष आला. चंदनाच्या जंगलात घुसखोरांची टोळी शिरली.घुसखोरांनी गोळीबार केला, घरं पेटवली. त्यात आई-वडील मारले गेले. नुकतेच जन्मलेलं बाळाचं बोचकं तळ्यात टाकलं . नेमकं ते लव्हाळ्यात अडकलं आणि एका भल्या माणसानं बाहेर काढलं. ते फेकून दिलेलं बाळ म्हणजे ही फेलानी. त्यातून ती जगली आणि शेवटपर्यंत चिवटपणे उभी राहिली.

काडी काडी जमवून मांडलेला संसार, फळांनी डवरलेली स्वतःच्या हाताने जोपासलेली बाग, फळाफुलांनी बहरलेली, अंगणात बांधलेलं छोटं तळं, हे सगळं कष्टाने- मायेने उभारणारे चार हात, जोडीला त्यांचं छोटं सात वर्षाचं एक बाळ, आणि एक जन्माला येऊ पाहणारं बाळ. अशी कितीतरी कुटुंब सुखा समाधानाने नांदत होती आणि अचानक हिंसाचार सुरू होतो. जातीय - वांशिक द्वेष उफाळून येतो. या छोट्या गावातही दंगल उसळते. नांदती घरं पेटवली जातात. धान्याची गोदामं, गाई गुरं सगळं डोळ्यासमोर राखरांगोळी होताना दिसतं. बरं सगळं पुन्हा उभं करायला माणसं तरी जिवंत राहिली का? तर नाही. शेकडो माणसं मारली गेली .एकेका घरातली अर्धी माणसं गेली ;अर्धी जिवंत राहिली .

ही कथा घडते आसाममध्ये. खरंतर घटना कुठे घडते हे महत्त्वाचं नाहीच. चळवळीचं नाव ,गाव, वंश , पंथ कुठलाही असो रक्तपात, दंगल ,स्थानिक अर्थव्यवस्थेचे मोडलेलं कंबरडं ,सत्तेसाठीची झुंज, राजकारण्यांची स्वार्थी गणितं आणि शेवटी या सगळ्यात बळी जाणारा सामान्य माणूस. त्या सामान्य माणसाची कथा हेच शेवटी सत्य उरतं.

दंगल भडकली. शांत झाली. राहती गाव बेचिराख झाली . आता जिवंत राहिलेल्यांनी राहायचं कुठं ? खायचं काय? हे दोन जिवंत अस्तित्वाचे मूलभूत प्रश्न सोडवतात निर्वासितांच्या छावण्या. त्या छावण्यातलं आयुष्य, गलिच्छ वातावरण ,अपुरं अन्न याच्याशी जुळवून घेणं जमायला लागतंय तोपर्यंत छावण्यातही वाढू लागतो वस्तूंचा आणि त्याबरोबर हळूहळू देहाचा व्यापार. हे वास्तव वाचताना अंगावर येतं. फेलाणीला हवं असतं गरिबीचं पण स्वाभिमानाचं जगणं. ती आपल्या चिमुकल्या बाळाला घेऊन या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. आणि तिच्याबरोबर आपल्याला भेटतात माणसांचे असंख्य नमुने. डोळ्यासमोर घडलेला क्रूर हिंसाचार बघून वेड लागलेली सुमला, तिच्यावर प्रचंड प्रेम करणारा तिचा नवरा, कालीमातेचा- देवीवरील लोकांच्या श्रद्धेचा आधार घेऊन स्वतःचा जीव जगवणारी कालीबुरी, बांबूच्या वस्तू बनवून जगणाऱ्या बायका , त्यांचे व्यसनी नवरे ,कुमारी माता, एकल माता , लहान मुलांचे शालेय / व्यवहारिक शिक्षण मिळवण्यासाठीची धडपड.

माणसाला माणूस भेटला की एक नात्याची वीण तयार होते. छावण्यातून बाहेर पडलेली ही काही माणसे जंगलात नदीकाठी झोपड्या उभारून वसाहत निर्माण करतात. कष्ट करून शांतपणे जगण्यासाठी. या माणसांचा धर्म, जात, वंश, पंथ वेगवेगळा असतो. पण त्यांना त्याची फिकीर नसते. किंवा यामुळे असुरक्षितही वाटत नसतं. हे सगळेजण एकमेकांच्या अडीअडचणीला मदत करतात .घासातला घास देतात. पण जवळच्या शहरातून दंगलीचा पाठ- शिवणीचा खेळ इथेही यांना सोडत नाही. दंगल ,बंद, कर्फ्यू ,सरकारच्या वाटाघाटी हा खो खो चालूच राहतो. उपासमार, आणि कर्फ्यू यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होतात. जणू काही घडलंच नाही अशी ही सगळी जण पुन्हा पुन्हा जगण्याला भिडतात. या सगळ्याला पुरून उरतं हे जगणं,त्यांची उमेद ,आशा.

व्हिटॅमिन्स
अच्युत गोडबोले, डॉ वैदेही लिमये

व्हिटामिन्सच्या सप्लिमेंट्स, व्हिटामिन्सची कमतरता या शब्दांशी आपण सगळेच परिचित आहोत. अगदी शाळेत असतानाच आपण शिकतो की गाजरात 'अ' जीवनसत्व असतं - जे डोळ्यांसाठी चांगलं असतं. आवळ्यात, लिंबूत 'क' जीवनसत्व वगैरे वगैरे. अशी व्हिटामिन्सची माहिती आपण बरेचदा आरोग्यविषयक पुस्तकातून वाचतो. हे पुस्तक फक्त हीच माहिती नाही तर या व्हिटामिन्स चे शोध कसे लागले, त्या शोधामागच्या गोष्टी, संशोधकांनी घेतलेली अपार मेहनत आणि जोडीला घडलेल्या असंख्य गमतीजमती ही सांगतं.

आपण जे अन्न खातो, श्वसन करतो त्यात नक्की काय असतं. शरीरात जाऊन ते काय काम करतं. रोग /आजार होतो म्हणजे नक्की काय होतं हे प्रश्न जेव्हा सगळ्यात प्रथम माणसाला पडले तेव्हा त्याने ते कसे सोडवले हा इतिहास वाचणं मजेशीर आहे.

जगाच्या पाठीवर कितीतरी रोगांनी हाहा:कार माजवले. अनेक जण मृत्युमुखी पडले तर कित्येकांना अपंगत्व आलं. रोगाचं खरं कारण सापडून त्यावर उपाय मिळवायला कित्येक वर्षे गेली. सुरुवातीला आजार हा फक्त जंतूंपासूनच होतो असा समज होता. आहारातील कमतरतेचा आजाराशी काही संबंध असणे हेच कळायला कित्येक वर्षे गेली. आहार आणि आजार यांचा संबंध जगन्मान्य व्हायला कितीतरी शास्त्रज्ञांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली.

माणसाने शोधून काढलेलं पहिलं व्हिटामिन म्हणजे थायमिन. थायमिनच्या शोधाची कहाणी असो की बेरीबेरी या रोगाची थरारकथा. जसजशी औद्योगिक क्रांती होत गेली तसतसे काही आजार बळावत केले. साधं भाताचे उदाहरण. चमकदार पॉलिश्ड तांदूळ आला आणि फक्त भातावर जगणाऱ्या कित्येकांच्या जीवावर उठला. बेरीबेरी ची माहिती मिळावी म्हणून निबंध स्पर्धा घेतल्या गेल्या . कोंड्यासारख्या टाकाऊ पदार्थाच्या अभावाने रोग होऊ शकतो इथून झालेली सुरुवात ते विशिष्ट जीवनसत्व पदार्थाच्या नक्की कुठल्या भागात आहे ते वेगळं करून त्याची रासायनिक कुंडली मांडून त्याचे योग्य प्रमाण ठरवेपर्यंतचा प्रवास..... या प्रवासातले अडथळे.... उलट सुलट आलेले रिझल्ट.... प्रमाण कमी जास्त झाल्याने होणारे दुष्परिणाम या अशा किचकट प्रश्नांची उकल, एकेक व्हिटामिन म्हणजे एक एक प्रकरण आहे.

शेतावर कामाला जावं लागल्याने शाळा बुडवणारा एल्मर शिक्षण खर्च भागावा म्हणून फावल्या वेळात असंख्य जोडधंदे करून शिकला .केमिस्ट्री च्या प्रेमात पडला. पैशाच्या अभावी इंजीनियरिंग सोडून रसायनशास्त्रात मास्टर्स करणारा स्टीव्हन बॉबकॉक . अभिनय, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, कायदा या परस्पर संबंध नसलेल्या कित्येक विषयात गती असलेला जॉर्ज वॉल्ट शेवटी जनुकीय विज्ञानात स्थिरावला. ही काही मोजकी उदाहरणे. व्हिटामिन्सच्या शोधयात्रेतल्या अशा कितीतरी संशोधकांनी कित्येक शोध लावले ज्यांचा आजही मनुष्य ऋणी आहे. अशा बऱ्याच संशोधकांची माहिती पुस्तकात आहे.

मानवजातीसाठी आवश्यक असणारे व्हिटामिन्स, त्यांचे शोध, या जीवनसत्वा अभावी घडलेली रोगांचे थैमान , प्रत्येक व्हिटामिन ने मानवाला दिलेलं नवंज्ञान या सगळ्याचा गोषवारा म्हणजे हे पुस्तक आहे. बायोकेमिस्ट्री तज्ञ डॉ वैदेही लिमये यांच्याबरोबर शरीरक्रियाशास्त्रावर पुस्तकं लिहावी असं ठरल्यावर या मालिकेतील पहिले पुस्तक 'रक्त'. वाचकानी या पुस्तकाचे भरभरून स्वागत केल्यावर लेखकद्वयीने मालिकेतील दुसरे पुस्तक आणलं ते म्हणजे - 'व्हिटामिन्स'. विज्ञानाशी संबंधित पुस्तक असलं तरी विज्ञानाशी कट्टी असलेल्या वाचकालाही खिळवून ठेवेल असं ओघवत्या भाषेतलं हे पुस्तक रंजक आहे.

Pages