ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन

Submitted by AstrologyYesOrNo on 26 December, 2021 - 05:45

ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन
डॉ. नागेश राजोपाध्ये
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मायबोलीवर ज्योतिष विषयावर अनेक लेख आणि प्रतिसाद वाचले. TV वर पण अनेक परिसंवाद ऐकले. वाद घालून डेड एन्ड आल्यावर सगळे शेवटी हेच म्हणताना दिसतात कि ज्योतिषावर संशोधन व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या मनाचे पूर्ण समाधान होईल असे आणि आम्ही स्वतः केलेले असे असे हे संशोधन आपल्या समोर ठेवत आहे. अतिशय शास्त्रोक्त, हजारो पत्रिका घेऊन कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले हे परीक्षण वैदिक ज्योतिष शास्त्राच्या इतिहासात पहिलेच असेल. अगदी ज्याला आपण दूध का दूध पानी का पानी म्हणतो असे! वास्तविक पहाता हे संशोधन कोणीतरी या पूर्वीच करायला पाहिजे होते. आणि कोणीतरी कशाला ज्योतिषांनीच हे संशोधन खरेतर करायला हवे होते कारण ते या विद्येचा व्यावसायिक वापर करत आले आहेत त्यामुळे ती त्यांची प्राथमिक जबाबदारी होती. पण असो,आपण सरळ मुद्द्यावर येऊया.

मी तुम्हाला आम्ही केलेला प्रयोग थोडक्यात सांगतो - सर्व प्रथम पत्रिकांचे दोन मोठे संच (groups) केले कीजे एकमेकाच्या अगदी विरुद्ध गुणधर्माचे आहेत. म्हणजे 338 पत्रिका मतिमंद विरुद्ध 338 पत्रिका हुशार लोकांच्या या दोन्ही संचाना ज्योतिष शास्त्रात बुद्धीचे अशुभ फळ मिळण्यासाठी असलेले नियम लावले आणि ते दोन्हीकडे किती लागू पडले याची तुलना केली. अर्थातच ज्योतिष विद्या खरी असेल तर ते नियम मतिमंद पत्रिकांना जास्तीत जास्त लागू पडताना दिसतील आणि त्याउलट हुशार लोकांच्या पत्रिकांना फारसे लागू पडणार नाही. असे झाले तर ते शास्त्र आहे असे मान्य केले पाहिजे नाहीतर नाही. बघा इतका सोपा हा प्रयोग आहे.

आता इथून पुढे जायच्या अगोदर मी तुम्हाला एक इशारा देतो - जर असे कुठले एक कारण असेल कि ज्यामुळे सर्व सामान्य माणसे ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही या प्रश्नापासून दूर राहिली असतील तर ते म्हणजे आपला (म्हणजे आपल्या सर्वांचाच) मानसिक आळशी पणा. जरा शास्त्रीय concept समोर आली कि ‘कशाला डोक्याला ताण द्यायचा’ असे म्हणून आपण आपली विचार प्रणाली switch off करतो. या एकाच कारणाने सर्वसामान्य माणूस या विषयातले सत्य शोधू शकलेला नाही आणि आयुष्यभर त्याची किंमत पण मोजत आला आहे. पण आपण आज इथे असं नको करायला. हा विषय सोप्यातला सोपा करून सांगायची जबाबदारी माझी, पण त्याच बरोबर त्यासाठी थोडा तल्लख विचार करायची जबाबदारी तुमची. आणि तुम्ही ते केले तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये हा विषय तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी कायमचाच मिटवून टाकाल आणि लग्न, करिअर, business असे महत्वाचे निर्णय घेताना मनाचा गोंधळ उडणार नाही.

आपण इथे जे करत आहोत त्याला एम्पिरिकल टेस्टिंग (Empirical Testing) म्हणतात. कुठल्याही शास्त्राला ‘शास्त्र’ म्हणून सिद्ध होण्यासाठी ही परीक्षा पास करावी लागते. परदेशामध्ये पाश्चिमात्य ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी अनेक वेळा घेतली गेली (आणि ते कधीच पास होऊ शकले नाही). आपल्याकडे मात्र वैदिक ज्योतिष शास्त्राची अशी चाचणी घेण्यासंदर्भात कुठल्याच स्तरावर कसलीही चर्चा नाही (मौनम सर्वार्थ साधनम) आणि म्हणूनच आम्ही हा प्रयोग करणे महत्त्वाचे मानले.

आपल्या suspense स्टोरीचा भाग १ (episode 1) म्हणजे आपण ज्योतिषातले प्रत्येक महत्वाचे तत्व किंवा नियम घेणार आणि त्याला तपासून बघणार. तुम्ही ज्योतिषाकडे कधी गेला असाल तर ते पत्रिकेकडे बघत त्यांच्या एका विशिष्ट भाषेत स्वतःशी कम आपल्याशी संवाद करतात बघा! उदाहरणार्थ 'अमुक अमुक ग्रह नीचेचा आहे आणि शिवाय तो शनीच्या युतीत आहे. इतका बिघडल्यावर बरोबर आहे ..त्रास होणारच...' हे जे ग्रहाचे ‘निचेचे असून शनि बरोबर (किंवा पापग्रहा बरोबर) युतीमध्ये असण्याने’ बिघडणे आहे आणि त्यामुळे आपल्याला त्या ग्रहाच्या कारकत्वा संबंधात अशुभ फळ मिळणे आहे - ते झाले ज्योतिष शास्त्राचे तत्व. हे अगदी fundamental तत्व आहे म्हणजे प्रत्येक ज्योतिषी ते वापरणारच. आता मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा प्रयोगात जर हे तत्व चेक करायचे असेल तर कुठल्या ग्रहासाठी चेक करायचे हे जर मला तुम्हाला समजावून सांगायचे असते तर परत ‘ कारक ग्रह’ वगैरे शास्त्रीय आणि ज्योतिषीय भाषा वापरावी लागली असती पण सुदैवाने आपल्याकडे कॉम्पुटरजी असल्याने आपण त्याला सांगितले कि बाबा सगळ्या ग्रहांसाठीच चेक कर. कारण बुध, चंद्र बुद्धीचे कारक म्हणून आपण त्यांच्यासाठी चेक करायचो आणि मग कोणीतरी येऊन म्हणणार अहो गुरु पण बुद्धिसाठी महत्वाचा असतो तो तुम्ही टेस्ट केला नाही. आपल्याला कुठलीही शंका ठेवायची नाहीये म्हणून आपण सगळेच ग्रह टेस्ट केले.

आता परीक्षेचा निकाल काय लागला ते बघू - जर हे तत्व खरे असेल तर असे योग आपल्याला मतिमंद पत्रिकांमध्ये जास्तीत जास्त मिळायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात दोन्ही संचांमध्ये आम्हाला ते सारख्याच प्रमाणात सापडले. म्हणजे बघा, ज्या ग्रहाच्या नीच असण्याची आणि शनी किंवा मंगळाबरोबर असण्याची आपल्याला भीती वाटत होती ते योग हुशार लोकांच्या पत्रिकेत पण तेवढीच सापडतात जेवढी मतिमंद लोकांच्या. मग हे कसले आले तत्व? नाही पण असे विधान करायची आपण इतकी घाई करायला नको, अजून प्रयोग करू आणि मग म्हणू. आणि ज्योतिषा विषयी पण काही बोलायला नको कारण अजून बाकीची तत्वे टेस्ट करायची बाकी आहेत. आणि ती आम्ही केली. ग्रहाच्या संदर्भात त्याच्या बिघडण्याची जेवढी महत्वाची तत्वे आहेत ती आम्ही सगळी one by one टेस्ट केली ( संदर्भ ३,४,५). म्हणजे ग्रहाचे क्रूर नक्षत्रात असणे (अजून एक डरावना योग) , ग्रह नीच राशीत आणि शिवाय ६,८,१२ व्या स्थानात अशी अनेक तत्वे लावून तुलना केली. आम्हाला यातील एकही तत्व लागू पडण्यात दोन्ही संचात कुठलाही फरक दिसला नाही. जी तत्वे ग्रहांची असतात तीच भावेशांच्या बाबतीत असतात आणि ती आम्ही (परत शंका नको म्हणून) बाराच्या बारा भावेशांना लावून टेस्ट केली. त्यातही कुठलाही फरक दिसला नाही. आणि शेवटी यांची काही तत्वे पत्रिकेतील स्थाना बाबतीत असतात. ती अर्थातच वेगळी असतात जसे कि स्थानात पाप ग्रह असणे, स्थानावर पाप ग्रहाची दृष्टी असणे वगैरे. त्यातही आम्हाला बारापैकी कुठल्याही स्थानात कुठलाही फरक अढळ नाही.

वर सांगितलेली तत्वे अशुभ फळासाठी होती. तशीच ज्योतिषात शुभ फळ मिळण्यासाठी पण प्रमुख तत्वे असतात आणि ती हुशार लोकांच्या पत्रिकेत जास्त आढळायला पाहिजे होती ती पण दोन्ही संचात ग्रह, भावेश आणि स्थानांसाठी सारखीच सापडली. हे एक प्रकारचे Verification होते आणि त्याने आमचे निष्कर्ष जास्तच दृढ झाले कि हि तत्वे वैध नाहीत.

इथे आपल्या सस्पेन्स स्टोरीचा भाग १ समाप्त होत आहे पण जाता जाता मी एक डायलॉग मारणार आहे - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.

आता सस्पेन्स स्टोरीचा भाग २ - मी पण अनेक वर्षे ज्योतिषी होतो त्यामुळे मला हे माहिती आहे कि अशुभ भाकीत करण्यापूर्वी आपण one by one अशुभ फळ देणारी सगळी तत्वे लावतो आणि त्याचा एकत्रित विचार करून भविष्य सांगतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर सगळे कुयोग मिळून एकूण किती रहाडा घालतात (किती नेगेटिव्हिटी तयार करतात) त्या basis वर भविष्य सांगितले जाते. आपल्या कडे कॉम्पुटरजी असल्याने त्याचे हि सिम्युलेशन केले आणि त्याला सांगितले दोन्ही संचांची तुलना करून सांग. तर दोन्ही कडे सारखीच नेगेटिव्हिटी मिळाली. Verification साठी वर केल्याप्रमाणे शुभ तत्वांची पण तपासणी केली ती हि सारखीच. आता बोला?

म्हणजे सगळी तत्वे एक एक करून तपासली तर ती सिद्ध होत नाहीत, एकत्र लावून बघितली तरी हि होत नाहीत मग त्यांना काय अर्थ आहे? पुढे जाण्या अगोदर आपला डायलॉग परत मारतो - सोच लो ठाकूर - हीच ती तत्वे जी लावून तुमची आमची पत्रिका बघितली जाते.

इथे आम्ही जे सांगतोय ते एकूण प्रयोगाच्या फक्त २५% आहे प्रत्यक्षात खूप काही गोष्टी केल्या. भाकीत सांगताना हमखास वापरली जाणारी अनेक मूलभूत तत्वे, वेगवेगळे ६८ शुभ अशुभतेचे मापदंड, केंद्रातील शुभ ग्रह / पापग्रह, क्रूर नक्षत्रातील ग्रह, मग काय योगकारक ग्रहांची स्थिती वगैरे जेवढे तपासता येईल ते सर्व. सगळंच इथे सांगायला बसलो तर तुम्ही कंटाळून जाल म्हणून सिम्पल सिम्पल आणि वर वर सांगतोय. या प्रयोगाची खासियत म्हणजे आपण ३३८ अधिक ३३८ अशा सगळ्या मिळून ६००+ पत्रिका घेतल्या होत्या की जे संख्याशास्त्राच्या दृष्टीने अनिर्वाय (mandatory) आहे. आत्तापर्यंत या प्रमाणात ज्योतिषशास्त्राचे परीक्षण झालेले आमच्या बघण्यात तरी नाही. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या या चाचण्यांचे निकाल व अनुमान यापूर्वी आपल्यासमोर आलेले नाही. हा प्रयोग कोणीही करू शकतो आणि तो ज्योतिषांनी जरूर करावा.

आता तुम्ही म्हणाल की एक प्रयोग करून एवढे मोठे हजारो वर्षे चालत आलेले शास्त्र खोटे कसे ठरवता? म्हणूनच आम्ही अनेक प्रयोग केले. अविवाहित (350 पत्रिका) विरुद्ध दीर्घकाळ लग्न टिकलेले (350 पत्रिका) यातही आम्हाला हेच रिझल्ट मिळाले. त्यानंतर साठ वर्षांच्या आत कर्करोग झालेले (254 पत्रिका) विरुद्ध कर्करोग कधीही न झालेले (498 पत्रिका), घटस्फोटित (३५० पत्रिका) विरुद्ध दीर्घ विवाहित (३५० पत्रिका), सेलेब्रिटी विरुद्ध सर्वसाधारण लोक असे अनेक प्रयोग केले. आणि त्या सर्व प्रयोगात तीच तत्वे तपासली (आठवा नाहीतर डायलॉग मारावा लागेल). पण त्या सर्व प्रयोगात वर सांगितलेलेच रिझल्ट मिळाले. म्हणूनच आम्ही ठाम पणे सांगू शकतो की या शास्त्रात, त्यांच्या तत्वात, नियमात काहीही तथ्य नाही. हे सर्व माझ्या दहा वर्षांच्या संशोधनाचे सार आहे.

जाते जाते last time - सोच लो ठाकूर, हि तीच तत्वे आहेत जी वापरून तुमची आमची पत्रिका बघितली जाते ...... मग आता तुम्हीच ठरवा, पत्रिका बघून लग्न करायचे का नाही, करिअर कुठल्या विभागात करायचे ते ज्योतिषाला विचारायचे का आपले आपण ठरवायचे. नातेसंबंधीचे निर्णय घेताना second opinion ज्योतिषाकडे जाऊन घ्यायचे का counselor कडे जाऊन घ्यायचे तेही ठरवा. शुभेच्छा !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Latest Update - येणाऱ्या प्रतिसादांवरून समजते कि या विषयावर अजून बरेच लिहायला पाहिजे होते. शास्त्रीय कल्पना या plane लिखाणापेक्षा audio - visual ने जास्त चांगल्या समजतात म्हणून अधिक माहिती पाहिजे असल्यास खालील youtube video जरूर बघा.
Title - Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?
https://youtu.be/RBKuOeOF79w
संदर्भा खाली ज्योतिष समर्थकांचे ‘अपेक्षित (नेगेटिव्ह) प्रतिसाद आणि त्यावर माझा खुलासा’ हे हि दिलेले आहे त्यात बऱ्याचशा शंकांचे निरसन होईल.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आभार -
श्री. प्रकाश घाटपांडे यांचा या संशोधनामधील एका महत्वाच्या प्रयोगात म्हणजे ‘मतिमंद विरुद्ध हुशार लोकांच्या पत्रिकांचा तुलनात्मक अभ्यास’ या प्रयोगात प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्या योगदानाशिवाय हा प्रयोग पूर्ण होऊ शकला नसता.
—--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लेखकाची ओळख -डॉ. नागेश राजोपाध्ये हे गेले 20 वर्षे ज्योतिषविद्येचा अभ्यास करत आहेत. (सुरवातीला एक ज्योतिषी म्हणून आणि नंतर एक टीकाकार म्हणून). त्यांनी पुणे विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयात Ph.D. केली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळाची सुरवात ISRO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून केली परंतु नंतर बहुतेक सर्व वेळ IT क्षेत्रात व्यतीत केल्यानंतर ते Accenture मधून Associate Director म्हणून निवृत्त झाले. सध्या आपला सर्व वेळ ते ज्योतिषविद्येच्या empirical परीक्षणाला आणि संशोधनाला देत आहेत.
संपर्क - astrobasedresearch@gmail.com
—-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -
१. वरील संशोधनाविषयी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सांगायचे असेल तर खालील Youtube विडिओ ची लिंक फॉरवर्ड करा.
Astrology Yes Or No (Marathi) ज्योतिषशास्त्र खरे आहे का नाही?

https://youtu.be/RBKuOeOF79w

हिंदी व्हिडिओ लिंक - https://youtu.be/5iVmPUo42aE

२. या संशोधनाचे अधिक तपशील म्हणजे - कुठले नियम तपासले, डेटा कसा घेतला, कुठून घेतला, संख्याशास्त्रीय चाचण्या (statistical tests) कशा केल्या वगैरे तपशील बघायचा असल्यास www.astrologyyesorno.com ला भेट द्या. त्यातील मराठी वेबसाईटवर ‘संशोधन’ या वेब पेज वर सर्व तपशील दिला आहे. किंवा प्रकाशित पेपर बघू शकता

३. An article in The Skeptic, UK, June 2021 by Dr. Nagesh Rajopadhye
When put to the test, the predictive powers of Indian astrology simply don’t hold up
Link - https://www.skeptic.org.uk/2021/06/when-put-to-the-test-the-predictive-p...

४. Empirical testing of few fundamental principles of Vedic astrology through comparative analysis of astrological charts of cancer diseased persons versus persons who never had it
International Journal of Applied Research - 2021; 7(5): 74-85
Link - DOI - https://doi.org/10.22271/allresearch.2021.v7.i5b.8548

५. Comparison of Vedic astrology birth charts of celebrities with ordinary people: An empirical study, International Journal of Jyotish Research, 2021; 6(1): 104-116
(Volume 6, Issue 1, Part B, pages 104-116)
DOI : https://doi.org/10.22271/24564427.2021.v6.i1b.114

६. ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य
आजचा सुधारक, ऑगस्ट, 2021 चळवळ, परीक्षण, विज्ञान, विवेक विचार, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धा - डॉ. नागेश राजोपाध्ये
https://www.sudharak.in/2021/08/7477/

७. जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला पत्रिका न बघता लग्न करण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी खरोखर मदत पाहिजे असेल तर लिहा – astrologyyesorno@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अपेक्षित प्रतिसाद आणि खुलासा
या विषयावर मी अनेक webinars दिले आहेत, सोशल मीडिया (Quora, reddit, FB etc) वर पण लिहिले आहे. त्या अनुभवावरून ज्योतिष समर्थकां कडून खालील प्रतिसाद येतो असा हमखास अनुभव आहे. सर्व सामान्य वाचक त्याने confuse होऊ नये म्हणून अपेक्षित प्रतिसाद आणि त्यावरील माझा खुलासा खालील प्रमाणे आहे
—---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिक्रिया - हे एवढेच परीक्षण पुरेसे आहे का ? याशिवाय अजून परीक्षण करायला पाहिजे अशी आमच्या कडे तत्वे आहेत.
खुलासा - ज्योतिषविद्येमधील जी प्रमुख तत्वे आम्ही वैध नाहीत हे सिद्ध करून दाखवले आहे, ती इतकी fundamental आहेत कि ती वापरल्याशिवाय कुठलेही भविष्य सांगितले जाऊच शकत नाही. ज्योतिषाच्या कुठल्याही पुस्तकात ती दिलेली असतात आणि त्यांना कुठलाही ज्योतिषी अमान्य करणार नाही. त्यामुळे आजच्या मितीला जे ज्योतिष त्या तत्वांच्या आधारे सांगितले जाते ते तरी निश्चितच अर्थहीन आहे हे सरळसरळ दिसत आहे. ज्योतिषाच्या परीक्षणाचा मुख्य problem म्हणजे प्रत्येकाचे वेगळे नियम आहेत. उदा घटस्फोट घेतला तर एक standard document असे मिळणार नाही कि जे पत्रिकेतील exactly कुठल्या योगांमुळे घटस्फोट होतो याच्या नियमांची यादी देईल. अशी सर्वमान्य यादी असती तर परीक्षण करणे सोपे आहे. पण तशी नसल्यामुळे जगातील लाखो ज्योतिषांच्या लाखो याद्या अवैध सिद्ध करणे हे केवळ अशक्य आहे. त्यापेक्षा मी लेखात म्हणाल्या प्रमाणे खरेतर ज्योतिषांनीच पुढाकार घेऊन असे परीक्षण करायला पाहिजे आहे कारण त्यांच्या भविष्यावर लोक जीवनातील महत्वाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे कोणाला कुठले नियम वैध आहेत वाटत असेल तर त्याने ते तसे ६००+ पत्रिका घेऊन सिद्ध करून दाखवावे. किंवा असा शास्त्रीय प्रयोग अगोदर झाला असेल तर त्याचा संदर्भ द्यावा. माझ्या बघण्यात जे ज्योतिषाच्या बाजूने संशोधन आले ते फार तर फार १०० पत्रिकांचा आधार घेऊन आणि ते सुद्धा selective data घेऊन केलेले दिसले कि जे अर्थातच शास्त्रीय नाही.
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिष हि प्रोबॅबिलिटी आहे, तुम्ही ती वस्तुनिष्ठ समजून objectively टेस्ट करू शकत नाही.

खुलासा - Creating confusion is one the best defense या उक्ती प्रमाणे probability हा शब्द वापरून ज्योतिषाचे समर्थन होताना हल्ली दिसते जे अर्थहीन आहे. खरेतर Empirical testing मध्ये जे test होते ती probability च टेस्ट होते. त्यामुळेच मतिमंद असण्याचे नियम हुशार लोकांच्या पत्रिकेत आढळले तर केवळ त्याच एका गोष्टीला दाखवून आपण कधीच म्हणत नाही कि ते नियम अवैध आहे. ते काही % विरुद्ध संचात आढळणे ठीक आहे (इथे probability येते कि जी आपण मान्य करतो) पण आपली अपेक्षा हि आहे कि दिलेला नियम मतिमंदसाठी असेल तर तो मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये हुशार लोकांच्या पत्रिकांपेक्षा सिग्निफिकन्टली जास्त % ने लागू पडला पाहिजे. म्हणजेच त्याची मतिमंद लोकांच्या पत्रिकांमध्ये आढळून यायची probability हि significantly जास्त असली पाहिजे. ते तसे आहे का नाही हे आपण test करतो. ह्याचा अर्थच असा आहे कि आपण probability च टेस्ट करत आहोत.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - ज्योतिषांना हे कधीच पटणार नाही, आपल्या कडच्या लोकांनाही हे पटणार नाही, मग या सगळ्या संशोधनाचा काय उपयोग?

खुलासा - माझ्या मते समाजात ४०-५० % अशी लोक आहेत जे ज्योतिष किंवा त्यांचे कट्टर समर्थक या वर्गात मोडतात. त्यांना आपण सोडून देऊ. त्यांच्या साठी मी हे संशोधन केलेले नाही कारण मी आकाश पातळ एक केले तरी त्यांना हे पटणार नाही याची मला कल्पना आहे. या उपर १० ते १५ % अशी लोक आहेत जे कधीही ज्योतिषावर विश्वास ठेवणार नाहीत. यांना पटवून द्यायचा प्रश्नच येत नाही. उरली ३५-४० % लोक जे confused आहेत. जे आज घाबरून ज्योतिषाच्या मागे जातात, विषाची परीक्षा नको म्हणून ज्योतिषाचे ऐकून काही थोडेफार पाळतात, पण एका बाजूला त्यांना खरेतर ते पटत नसते आणि त्यांना आपले स्वतःचे असे मत अजून बनवायचे आहे. माझे संशोधन हे ह्या लोकांसाठी आहे. लक्षात ठेवा आजची तरुण पिढी हि बरीसचशी या वर्गात मोडते.

यावर पण मी थोडे अजून संशोधन केले. ज्यांचे वय ३०+ आहे त्यांना पटवून देणे कठीणच असते. वेळ वाचवण्यासाठी आजकाल मी तिथे जास्त convince करत बसत नाही. पण त्याउलट जे तरुण आहेत (३० minus) त्यांना पटवून देण्याच्या बाबतीत माझा success rate हा ६०-७०% आहे. त्यांचे विचार by default legacy च्या विरुद्ध असतात. ते खूप technology च्या आधारे विचार करतात, शास्त्रीय कल्पना लवकर समजतात आणि आपले मत बदलायला तयार असतात असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हि खूपच दिलासा देणारी बाब आहे कारण हीच पिढी आपले भवितव्य आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अपेक्षित प्रतिसाद - अमुक ज्योतिषाने आम्हाला / आमच्या नातेवाईकांना सांगितलेले भविष्य बरोबर ठरलेले आहे, कित्येकांनी website वर लिहूं ठेवललेल खरे झाले आहे मग तुम्ही ज्योतिषशास्त्र खरे नाही असे कसे म्हणता

खुलासा - माझा मुद्दा इथे हाच असेल कि शास्त्रीय परीक्षणाशिवाय आपण एक दोन अनुभवांना किंवा घटनांना त्या विद्येचे proof मानू शकत नाही. मी स्वतः संशोधन करण्या पूर्वी काही महिने असे संशोधन कोणी केले आहे का याचा शोध घेत होतो. मला तरी ज्याला आपण ‘शास्त्रोक्त’ म्हणू असे ज्योतिष विद्येच्या बाजूने असलेले संशोधन किंवा परीक्षण सापडले नाही. जे संशोधन म्हणून प्रसिद्ध झाले आहे त्या खरे तर case studies आहेत. म्हणजे एखादा योग कॅन्सरला कारणीभूत होतो असे कोणाला सिद्ध करायचे असेल तर तो तसा योग असलेल्या ४०-५० पत्रिका घेऊन ते दाखवणार कि बघा असे योग आहेत. हे शास्त्रीय परीक्षण होत नाही. त्यासाठी पत्रिकांचे कॅन्सर असलेले आणि कॅन्सर नसलेले असे दोन गट तयार केले पाहिजे, डेटा प्रत्येक संचात ३००+ घेतला पाहिजे, तुम्ही सांगत असंणारे cancer असण्याचे नियम कॅन्सर नसणाऱ्यांच्या पत्रिकेत कसे नाहीयेत किंवा त्या दोन संचात कसा लक्षणीय फरक आहे हे दाखवले पाहिजे, त्यासाठी स्टॅटिस्टिकसची सिग्निफिकन्स टेस्ट केली पाहिजे आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत कि ज्या केल्याशिवाय आपण त्याला मान्यता देऊ शकत नाही. या मितीला तरी ज्योतिष सिद्ध होईल असे ‘शास्त्रीय’ परीक्षण माझ्या बघण्यात नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा समाजात बदल घडणे ही निरंतर प्रक्रिया आहे.शिवाय अनिश्चितता या ना त्या स्वरुपात रहाणारच. त्यामुळे अंधश्रद्धाही या ना त्या स्वरुपात राहणारच.

ओके. अनिश्चितता संपते असं मला म्हणायचं नाही पण जेव्हा समाजाच्या धारणा बदलतात तेव्हा त्यांच्याशी संबंधित अनिश्चिततांचे परीणाम कमी होत जातात. उदाहरणार्थ, पत्रिका पाहून लग्न करणे हे पाश्चात्य देशात फारसे दिसत नाही कारण लग्नसंस्थेशी संबंधित अनिश्चिततांविषयी (घटस्फोट, मूल नसणं, जोडीदाराचा अकाली मृत्यू) तिथल्या सामाजिक धारणा वेगळ्या आहेत. या घटनांचे गुणदोष संबंधित व्यक्तीच्या माथी न मारण्याइतका समाज सुसंस्कृत आहे. त्यामुळे ती अनिश्चितता टॅबू रहात नाही.

@विकास , परीस, मंजूताई, जिज्ञासा - धन्यवाद ! प्रबोधन हाच मार्ग आहे हे खरंच आहे पण अनुभव असा आहे कि वयाच्या अमुक एका मर्यादे पर्यंत माणसांनी आपली मते बनवलेली असतात आणि नंतर तो ती बदलायला सहसा तयार होत नाही. फारच थोडे जिज्ञासू असतात जे नवीन माहिती जाणून घेऊन, त्याचे विश्लेषण करून आपले मत बदलतील. तुम्ही वरती वाचले असेल कि म्हणूनच मी या संशोधनाला खास करून १५-३० वयोगटापर्यंत नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी काही नवीन ideas असतील तर जरूर सांगा.

@ जिज्ञासा आणि प्रकाशजी - समाजाची धारणा बदलायला पाहिजे हे बरोबर आहे आणि ती बदलणे हि निरंतर आणि दीर्घ प्रक्रिया आहे हे हि खरेच. हे म्हणजे एखादा मोठा पर्वत हलवण्यासारखे आहे कि जे अर्थातच कोणा एकट्या दुकट्याचे काम नाहीये. दुर्दैवाने ज्योतिषाच्या संदर्भात तरी असे कार्य करणारी, विविध कार्यक्रम देशभर राबवून प्रबोधन करणारी एखादी dynamic, committed अशी संस्था मला दिसत नाही.

नागेशजी,
उपक्रम स्तुत्यच आहे परंतु मुळ रोगाऐवजी एका लक्षणावर उपचार केल्यासारखं आहे. असुरक्षिततेचे भय घालवण्यासाठी फक्त ज्योतिषच नव्हे तर कोणताही बाह्यआधार न शोधण्याची मानसिकता कशी निर्माण करता येईल हे जास्त महत्वाचं वाटतं. भय निर्माण होण्याचं कारण म्हणजे विचार, त्यामुळे आधी विचार निर्मितीची प्रक्रिया समजली पाहिजे. आठवण(मेमरी), स्वानुभव, परज्ञान (वाचीव, ऐकिव) आणि वेळ ह्या सर्वांचा विचार निर्मितीतला सहभाग आणि विचारातुन निर्माण होणारया संकल्पना आणि शारीरिक संवेदना(भय,राग,मत्सर,हुरहुर,आनंद,दुःख इ.). त्या संवेदनांना मनाने दिलेला आसक्ती किंवा तिरस्काराचा प्रतिसाद. हा सर्व चक्रव्युह बौद्धिक पातळीवर समजला तरी प्रात्यक्षिक पातळीवर उमजण्यासाठी लागणारे महत्प्रयास, सातत्य आणि सराव. फार मोठा आवाका आहे. पण सुरवात तरी व्हायला हवीच. (स्वतःपासुन) Happy

उदाहरणार्थ, पत्रिका पाहून लग्न करणे हे पाश्चात्य देशात फारसे दिसत नाही
>>> तुम्ही nri बद्धल म्हणताय का?

जोपर्यंत सुर्यमालिकेचे आकाशगंगेत असणारे स्थान विचारात घेतले जात नाही तोपर्यंत सगळी चर्चा निरर्थक आहे.

@ विकास, तत्वतः विचार बरोबरच आहे, तुम्ही सांगता आहेत तो approach सुद्धा बरोबर आहे पण तो सर्व सामान्यांसाठी कठीण आहे. काही सुशिक्षित लोकांमध्ये बदल होताहेत पण मोठा बदल बाकी आहे. म्हणूनच आजतागायत मनुष्य या भीती मधून बाहेर आला नाहीये. केवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज अशा गोष्टींच्या मागे आहे हे आपण बघतच आहोत. आणि कित्येक वेळा असुरक्षतता, भीती या ज्योतिषाच्या मानण्यामुळेसुद्धा तयार होताहेत. मला तर असे खूप लोक अँप्रोच होतात. अशांसाठी हे उपयोगी पडते.बाकी सगळ्याबाजूने प्रयत्न करायचे एवढेच हातात आहे.

@च्रप्स - तुम्ही nri बद्धल म्हणताय का? >>>>>> माझ्या मते ते परदेशातील परदेशी लोकांविषयी बोलत आहेत. तुम्हालाहि कल्पना असेलच परदेशात त्यांच्या कडे पत्रिका बघणे, गुण मिलन वगैरे प्रकार लग्न करताना तरी नसतो हे खरेच आहे. पण याचा अर्थ ती लोक ज्योतिषावर विश्वास ठेवत नाहीत असे नाहीये. आपल्या पेक्षा कदाचित कमी % लोक विश्वास ठेवत असतील पण western astrology हा प्रकार भरपूर प्रचलित आहे. आजकाल डेटिंग करण्या पूर्वी sign compatibility बघण्याचा प्रकार ऐकिवात येतो आहे.
गम्मत म्हणजे त्यांची आणि आपली पत्रिका वेगळी असते पण दोघेही पत्रिकेवरून आमची भविष्य खरी ठरतात असा claim करतात.

आपण त्रिमितीय जीव आहोत. म्हणजे आपल्या जाणीवा तीन मितीमध्ये बद्ध असतात. या तीनही मितीमध्ये आपण मागे पुढे पाहू शकतो. काळ ही चौथी मिती. जाणिवांच्या मर्यादेमुळे या मितीचे मात्र आपल्याला फक्त एकाच म्हणजे मागच्या दिशेने आकलन होते. पुढच्या दिशेने काय काय आहे ("वाढून ठेवलंय") ते कळत नाही,

आता थोडी वेगळी कल्पना करू. समजा आपले डोळे झाकलेत. किंवा असे समजा कि आपल्याला फार फार अंधुक दिसते आहे. आणि आपल्याला चालायला सांगितले. आता काय होईल? तिसरी मिती पुढच्या दिशेने गायब झाली. मागचा भूभाग (जितका चाललो आहे) कसा होता ते मात्र माहित आहे. त्यावरून पुढे काय काय आहे, समुद्र आहे कि दरी आहे? उंच आहे कि खोल आहे? अंदाज काढता येईल का? फार थोड्या प्रमाणात काढता येईल. पण नक्की नाही. म्हणूनच आपण चाचपडत चालू. मागे सपाट असणारा रस्ता पुढच्या पावलाला अचानक असमतोल झाला तर ठेच लागेल. आपण अंध असताना "द्विमितीय जीव" असतो असे मानायला हरकत नाही. तिसरी मिती एकाच (मागे गेलेल्या) दिशेने जाणवते. पण समजा याच द्विमीतिय जीवाला, तिसरी मिती जाणवायला लागली, म्हणजे जर अचानक डोळे उघडले, तर तो जीव पूर्वीच सारखा राहील का? नक्कीच नाही. तो वेगळ्याच प्रकारचा, म्हणजेच "त्रिमितीय जीव" असेल. त्याच्या जाणीवाच वेगळ्या म्हणजे द्विमितीय जीवापेक्षा पूर्णपणे भिन्न असतील.

अगदी तसेच, काळाच्या दिशेने पुढे काय आहे ते सगळे आपल्याला दिसू/जाणवू लागले तर आपण आता जसे जीव आहोत तसे नसणार. आपण वेगळे म्हणजे "चार मितीय" जीव असणार. ज्यांना "मागे पाहिल्यास आजवरचे घडलेले व घडू शकत होते असे सगळे आणि पुढे पाहिल्यास पुढे काय काय घडू शकेल ते सगळे" जाणवू/दिसू लागेल. अर्थातच ते "चार मितीतले" जीवन कसे असेल याची आपण (त्रिमितीय जीव) कल्पनाही करू शकत नाही. कारण आज ज्याला आपण काळ म्हणतो ती "चार मितीय जीवासाठी" बस्स एक "मागे व पुढे पाहता येण्यासारखी" अजून एक मिती असेल यापलीकडे त्याला महत्व नसेल.

थोडक्यात काय, तर आता आपण जसे 'त्रिमितीय जीव' आहोत त्या जाणीवांच्या मर्यादेत आपल्याला भविष्य, म्हणजे चौथ्या मितीची पुढची दिशा, हि दिसूच शकत नाही असे म्हटले तर वावगे होणार नाही.

हे मला जितके या विषयातले आकलन आहे त्यानुसार मांडले आहे. इथे या धाग्यावर सांगायचा विचार बरेच दिवस सुरु होता पण नेमक्या उदाहरणांत कसे मांडावे हे कळत नव्हते. ते मी थोडफार मांडू शकलो आहे ही आशा.

काळ ही चौथी मिती >> इथे सुरुवातीला 'समजा' असा शब्द हवा. कदाचित तो अध्याहृत असल्याने तुम्ही लिहिला नसावा. पण आजकाल अनेक ठिकाणी 'काळ हीच चौथी मिती' असल्याचे गृहीत धरतात, तसे वाटू नये म्हणून सुचवले. काही भौतिकशास्त्रज्ञांच्या मते काळ ही मिती नसून तीन मितीतील बदलांचे गणितीय मापक आहे.

Pages