तडजोड (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 3 July, 2017 - 06:22

"तुला भात रोज पाहिजेच असतो का? एक दिवस नसेल..."

"हो.. माझं त्याशिवाय जेवण होत नाही...."

"मग स्वतः कुकर लाव, करून घे" मी कुकर किचनच्या ओट्यावर आपटत म्हणाले, त्या आवाजाने नितीन दचकला, मी एवढी चिडेल असे त्याला वाटले नव्हते, तो माझ्याकडे बघत होता, त्याच्या डोळ्यात भीती होती, मी उजव्या हाताने कुकरचा दांडा घट्ट पकडला होता, माझे हात रागाने थरथरत होते, श्वास फुलला होता, घामाची धार केसातून, कपाळापर्यंत आली होती.

नितीन माझ्याकडे बघत एक पाऊल मागे सरकला, तसा मी कुकरवरचा हात सैल केला, मी पुढे झुकली गेले, या रागामुळे माझे अवसान गळाले होते, मी ओट्याचा आधार घेतला.

नितीन सावकाश दिवाणखान्यात गेला, सोफ्यावर बसला, त्याने टीव्ही लावला, मी टीव्हीच्या आवाजाने संतापले, सर्र्कन, एका क्षणात, मुठी आवळल्या गेल्या, मी हातात तोच कुकर घेतला, मी दिवाणखान्याकडे धावले, तो कुकर, नितीनच्या दिशेने भिरकावून दिला. तो जड कुकर नितीनपर्यंत पोहोचलाच नाही, त्याच्या पायापर्यंत गेला, तो बेसावध होता, हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं, तो दचकला, त्याने घाबरून माझ्याकडे बघितले, त्याने पाय वर केले, मांडी घालून सोफ्यावर रेलून बसला, पण माझ्या नजरेला नजर द्यायची त्याची हिम्मत झाली नाही.

नितीनने टीव्हीचा आवाज कमी केला, त्याच्या या थंड प्रतिक्रियेमुळे, मी घुसमुसत आमच्या बेडरूमकडे गेले, दरवाजा जोरात लावला, खोलीची भिंत हादरली, खिडकीच्या काचा थरारल्या, मी दाराची कडी लावली, मागे फिरले, खोलीच्या मध्यभागी येऊन उभी राहिले, वर पंख्याकडे बघितले.
"ह्या नितीनला ना..." मी काही पुटपुटणार तेवढ्यात माझ्या पायातले त्राण गेले, मी खाली कोसळले, मी इतकी दमले होते की खाली पडल्यावर मला कूस ही बदलता आली नाही, पण शांत झाले, रडायला लागले, ओरडून रडावसं, रडून ओरडावंसं वाटत होतं, पण पोटातल्या भुकेमुळे, घशातल्या तहानेमुळे, श्वास घेताना ही धाप लागत होती.

नितीन आणि माझ्या लग्नाला जेमतेम आठ महिने झाले होते, नवीन लग्न झाले तेव्हा स्वप्नवत दिवस होते, सगळं चांगलं होतं, सुदंर होतं, माझं होतं, स्वतःच होतं, प्रेमाचं होतं, हक्काचं होतं पण..पण मग नाही माहिती काय झालं, नितीनच्या छोट्या, छोट्या सवयींचा कंटाळा आला, त्रास होऊ लागला, मनस्ताप झाला, शेवटी तिरस्कार वाटू लागला.

नितीनचा मार्केटिंगचा जॉब होता, त्यामुळे सतत फिरती वर असायचा, आधी सोमवारी संध्याकाळी सातला तर शुक्रवारी यायला त्याला रात्रीचा एक वाजायचा आणि मग टीव्ही! नेहमीचं होतं! शनिवारी, रविवारी जरा कुठं बाहेर जाऊ म्हटलं की, वैतागायचा, खेकसायचा, नाहीतर घुम्यासारखा माझ्याकडे बघायचा! मला इतका राग यायचा ना, वाटायचं एक द्यावी ठेऊन.

माझ्या मनातला राग, ओठावर कधी आला ते कळले नाही, माझ्या नजरेतला द्वेष त्याच्यापर्यंत पोहचत तर होता, आता व्यक्त होत होता, त्याच्यासाठी कर्कश झाला होता.
नवीन लग्न झाल्यावर आम्ही भांडणे मोजायचो, आता आम्ही किती वेळा एकमेकांशी बोललो हे मोजायला लागलो होतो.

मी सुद्धा जॉब करत होते, पण घरी येऊन परत स्वयंपाक का करू? काय गरज आहे? सकाळी केलेलं याला चालत नव्हतं, म्हणून परत रात्री याच्यासाठी पोळ्या करा, सांगितलंय कोणी? मी इंजिनियर झाले ते पोळ्या करण्यासाठी का? अशी एकच गोष्ट नव्हती, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. मी तरी बाबांना म्हटले होते, नवरा निदान इंजिनियर असावा, असा बीकॉम, बेअक्कल नको, पण माझं कोण ऐकतय? करा लग्न, करा संसार!
मी अजून तशीच पडून होते, जेवले नव्हते, नीट उठता येत नव्हते, पण तरीही याने एकदा ही दार वाजवले नाही, मला मग कधी झोप लागली कोण जाणे, पण रात्री कधी तरी दाराचा आवाज झाला.

अगदी प्रेमळ आवाजात म्हणाला..
"साय.."
मला जाग आली होती, पण राग गेला नव्हता, मी तशीच पडून राहिले, पंख्याकडे बघत.
"साय..अग दार उघड"
"मी नाही उघडणार, तुला दार मोडता ही येणार नाही" मी ओरडणार होते, पण मी शब्द तिथेच गिळले, भूक लागली होती ना.

"सायली, दार उघड, असं का करतेस" नितीनचा आवाज वाढला, पण मी उठणार नव्हते, आज रात्री तर नाहीच नाही.
"सायली, एकदा दार उघड, मग लावून घे" नितीन परत म्हणाला.

मला खरंच उठता येत नव्हतं, किंवा उठायचं नव्हतं, काहीही असेल, मी परत झोपायचा प्रयत्न..
"सायली" नितीन जसा ओरडला तसा, त्याने दार ढकलायला सुरुवात केली, दारावर हात पाय मारू लागला, माझ्या नावाचा जयघोष करत!
पण मी पण आज काही केल्या उठणार नव्हते, बघू किती वेळ दार वाजवतोय.

थोड्या वेळाने दार वाजवणे बंद झाले.
मी झोपी गेले, मला पहाटेच जाग आली, जरा बरं वाटत होतं, मी उठले, दार उघडले, तसा दारावर डोकं ठेऊन झोपलेला नितीन आत कलंडला, त्याला जाग आली, मी त्याच्याकडे न बघत बाथरूमला जाऊ लागले, नितीन माझ्या मागे डोळे चोळत आला,
"साय ऐक ना, सॉरी रे, माझं चुकलं" नितीन मागे येत, विनवणी करायला लागला, मी त्याच्या चेहऱ्यावर बाथरूमचा दरवाजा लावला.
"ऐक ना सायली, काय झालं, सॉरी ना, माझं चुकलं, ऐक ना..."
मला काही बोलायचं नव्हतं, मी बाथरूम मधून बाहेर आले, नितीन माझ्या मागे मागे करत होता.

"सायली ऐक ना, काल रात्री मी घाबरलो" मी थांबले, मी त्याच्याकडे बघितले.
"तू असं का केलंस, दरवाजा का लावून घेतलास? मी घाबरलो होतो, प्लीज असं कधी करू नको प्लीज!" असे म्हणत त्याने माझा दंड पकडला, "हात सोड" मी शांतपणे, आवाजात जरब ठेऊन म्हणाले, त्याने लगेच हात सोडला.

मी फ्रिज मधून दूध काढले, चहाचं भाडं बाहेर काढलं, "थांब मी करतो" माझ्या हातातून भाडं काढून घेत नितीन म्हणाला. मी त्याच्याकडे न बघत, दिवाणखाण्यात गेले, टीव्ही लावला, पण जशी मी सोफ्यावर बसले तसे मला जाणवले, माझी झोप पूर्ण झाली नाहीये, मी एका बाजूने कलंडले, परत झोपले.
नितीनने गरम चहाच्या कपाने, माझ्या दंडावर चटका दिला, तशी मी दचकून जागी झाले, नितीन हसला, मला हसवण्याचा प्रयत्न केला, पण मी रागाने बघत त्याच्या हातातून चहाचा कप घेतला, चहा पिऊ लागले.
"कसा झालाय?"
मी काही उत्तर दिले नाही.

"आपण एक मेड ठेऊ, ती करेल स्वयंपाक, मी वॉचमनला विचारतो, त्याच्या ओळखीची असेल कोणीतरी"
मी काही म्हटले नाही.

"तुला ऑफिसला सोडू?"
मला काहीच बोलायचं नव्हतं.

"वाटेत नाश्ता करू"
मी काही म्हटले नाही, मी चहा संपवला आणि ऑफिसला जायची तयारी करू लागले.

नितीनने माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मला त्याचे तोंड सुद्धा बघायचं नव्हतं, अशी भांडण कधीतरी मधून होत असतं, पण आता सवयीचं झालं होतं. मला त्याच्या "सॉरी" चा आता कंटाळा येऊ लागला होता, काय तेच परत सॉरी आणि मी लगेच त्याला माफ करू का? कशाला? काय गरज आहे? आधी त्रास द्यायचा आणि मग फक्त सॉरी!!
मी त्याला काही न सांगता, घरातून निघाले, घराचा दरवाजासुद्धा लावला नाही.

संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळेला, नितीन माझ्या ऑफिसला आला, असा अचानक कधी, आला नव्हता. मला त्याच्या बरोबर जायचं नव्हतं पण आमची भांडण जगजाहीर करायची नव्हती, काही गत्यंतर नव्हतं, मला त्याच्या बाईकवर बसावं लागलं, त्याने बोलायचा भरपूर प्रयत्न केला पण त्याला मी भीक घातली नाही, त्याने बाईक मॉल जवळ थांबवली.
"मी पिक्चरला येणार नाही" मी सावकाश म्हणले.
"अग चल ना, मस्त पिक्चर आहे, रिव्ह्यूज पण चांगले.."

मी बाईक वरून उतरले, शांतपणे चालायला लागले, तसा नितीन माझ्यामागे धावत आला, माझ्या समोर येऊन थांबला.
"थांब ना, ओके ऐक, इथेच जेवण करू, सुशी खाणार?" नितीनने विचारले, मला खूप भूक लागली होती, पण कंटाळा सुद्धा आला होता, सगळ्याचा, ह्याचा, सॉरीचा, लग्नाचा, या मॉलचा, या शहराचा..पण जाऊ दे, आता खाऊन घेऊ.

मला कधी जेवणावर राग काढता येत नाही, माझ्या मनात विचार डोकावला तशी मी खुद्कन हसले, स्वतःशीच आणि नितीनकडे चोरून बघितले, त्याचे लक्ष नव्हते, आता नको का तुला वरण भात? वरून तूप घेऊन? मी त्याच्याकडे बघत मनात म्हणत होते, त्याच्या लक्षात आले, त्याने भुवया उडवून "काय झाले" असे विचारले, मी साहजिकच नजर फिरवली.

मी खुप जेवले, नितीन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मीच टाळत होते, माझा राग अजून गेला नव्हता, आता हा दोन दिवस छान वागेल आणि परत पहिले पाढे पंचावन्न! पण असे काही झाले नाही, नितीन त्या रात्रीच्या भांडणापासून खूपच बदलला, कधी ओरडला नाही की कधी भांडला नाही, मी म्हणेल तसं, माझ्यासाठी, वेळ काढून, प्रेमाने वागत होता, मला फार आश्चर्य वाटले, याला कुठल्या चांगल्या भुताने पछाडले तर नाही ना? काय जादू झाली?
माझ्यासाठी हे चांगले दिवस होते, अगदी नवीन, लग्न झाल्यासारखे, मी परत एकदा आनंदात होते, चेहऱ्यावरून दिसून दिले नाही, अजून माझा राग कायम आहे असेच भासवले.

आमच्याकडे नवीन कामवाली बाई आली, तरी हा माझ्यासाठी, माझ्या आवडीची डिश ऑर्डर करायचा, रोज कुठेतरी बाहेर घेऊन जायचा, एकदा तर माझ्यासाठी फुलं आणली, मला विचारावंस वाटलं, का इतकं चांगलं वागतोस? पण मी काही विचारले नाही, मी खुश होते, आनंदी होते. एक महिना हे सर्व चालू होतं, हा इतका कसा बदलला आहे, याचं आश्चर्य कमी आणि संशय वाढला होता, पण मी दुर्लक्ष करत होते, मी एका बॉस सारखं वागत होते, मी जे पाहिजे ते मागायचे आणि तो ते करायचा! एकदम आदर्श कर्मचारी झाला होता आणि मी एक खडूस बॉस!! पाहिजे तेव्हा, पाहिजे ते, पाहिजे तसं, काम करवून घेणारी! आपल्याला असं ऑफिस मध्ये वागता येत नाही, माज दाखवून, पण तशा वागण्याचा हेवा वाटतो, मग फक्त आपल्या घरीच कधीतरी असं वागण्याचा प्रयत्न करतो.

आमची कुकरची वरची भांडण होऊन आता एक महिना झाला होता, नितीन मला म्हणाला,
"उद्या मुंबईला जावं लागतंय, निदान एक आठवडा तरी थांबावं लागेल"
माझ्या चेहऱ्यावरची रेष सुद्धा हलली नाही. आता जरा कुठे मला आराम मिळेल, जरा कुठे मनासारखं वागता येईल.
सकाळी मला न उठवता तो मुंबईला पसार झाला आणि मला जरा कुठे स्वातंत्र मिळालं !!

मी माझ्या साऱ्या मैत्रिणींना गोळा केलं, माझ्या घरी मस्त पार्टी केली, ऑफिसला दांडी मारून हिल्स स्टेशनवर फिरायला गेले, हे किती छान होतं, फ्रेंड्स, फिरायला जाणं, गप्पा मारणं, निवांत, मनसोक्त, मनासारखं, मनापासून, जगणं, आपण उगीच लवकर लग्न केलं, जरा आरामात लग्न केलं असतं, तर किती मजा आली असती, चार पाच दिवस कसे गेले कळलं सुद्धा नाही, कोणाची कटकट नाही, की काही नाही, मस्त लाईफ होतं. मी किती तरी वर्षाने माझ्या आवडीची गाणी गात होते.

मी ट्रिप वरून परत घरी आले, बॅग ठेवली, या नितीनचा काही पत्ता नव्हता, "पोहचलास का?" असा एक मेसेज मी त्याला केला होता, त्याला सुद्धा त्याने "येस बॉस" असं उत्तर दिलं होतं, माझ्यासाठी एक नवीनच टोपणनाव शोधून काढलं होतं, पण त्यानंतर मी काही रिप्लाय नाही दिला, कशाला द्यायचा, करू दे ना त्याला रिप्लाय? मला माझ्या ट्रिपबद्दल काही सांगायचे नव्हतं, कशाला ना उगीच? याला जास्त काही गोष्टी सांगायलाच नकोत, उगीच फाटे फुटतात.

नितीनचा मेसेज आला नाही, मी दमले होते, तशीच झोपून राहिले, मस्त झोप झाल्यावर उठले, सगळी कामं आरामात करत होते, घरात पसारा दिसत होता, मी घर आवरायला घेतलं, कपडे धुवायचे होते, नितीनचे कपाट उघडले, नितीनची एक ही वस्तू कपाटात नव्हती. मी माझे कपाट उघडले, माझ्या गोष्टी जागेवरच होत्या, जश्याच्या तशा!! मग चोरी? नाही, पण माझ्या गोष्टी तर तश्याच होत्या, पण मग.. मी घरभर फिरले, नितीनच्या वस्तू शोधत, ब्रश पासून चप्पलांपर्यंत सर्व गोष्टी गायब होत्या, नितीनचे कपडे, त्याचं सामान, त्याच्या रोज वापरायच्या गोष्टी, सर्व काही, घरातून नाहीसं झालं होतं, मग याच्या वस्तू कुठे गेल्या? हा मुंबई वरून परत कधी आला? मला का नाही सांगितलं? याच सगळं सामान कुठंय?

मी पटकन नितीनला फोन केला, कॉलला काहीच उत्तर आले नाही, फोन केला एकदा, दोनदा आणि बऱ्याच वेळा, पण त्याचा फोन लागला नाही, मी दुसऱ्या नंबरने फोन केला त्याने माझा आवाज ऐकून फोन कट केला. मी त्याला व्हाट्सअँप वर मेसेज केले, पण काही उत्तर मिळाले नाही. माझी नजर त्याच्या व्हाट्सअँप स्टेटस वर गेली, त्याने अगदी मराठीत एका शब्दाचा स्टेटस ठेवला होता, अशा परिस्थितीत ते बघून मी हसले सुद्धा, तो शब्द होता "सुटका"

मी जरा शांत बसले, नेमकं काय होतं आहे याचा विचार करू लागले आणि हळू हळू गोष्टी उलगडायला लागल्या, माझी आणि नितीनची सुरुवात तर छान होती मात्र आमचं त्यानंतर सगळंच बिघडलं, पटलं मात्र काहीच नाही. हे आमच्या दोघांच्या मनात कुठेतरी साचलेलं होतं, त्यामुळे आम्ही दोघेही गुदमरलेलं होतो.

एकमेकांपासून वेगळं कधीतरी होणारच होतो, पण मग भांडणं करून, त्रास देऊन, अपमान करून, अपमान पुरवून कशाला ना ब्लड प्रेशर वाढवायचं? सहज वेगळं होता येतील, हे न सांगता नितीनने करून दाखवलं. त्याला एका चांगल्या वळणावर निरोप घ्यायचा होता, त्याने स्वतःला ही त्रास करून घेतला नाही आणि मला ही त्रास होणार नाही याची काळजी घेतली.
नातं प्रत्येक दिवशी तुटत असताना, त्याने एका क्षणात सगळे संबंध तोडले.

त्यानंतर मी आणि नितीन कधी भेटलो नाही, बोललो नाही, आम्ही भेटलो ते घटस्फोट घेताना, त्याचे दोन मित्र त्याच्या बरोबर आले होते, नितीन मोजकंच बोलला आणि निघून गेला. कायमचा. आम्ही वेगळे झालो ते चुकीचं होतं की बरोबर हा प्रश्न उरतच नाही, पण आम्ही कसे वेगळे झालो हे माझ्या कायम लक्षात राहील.

कधी आठवण आली मी त्याचे व्हाट्सअँप स्टेटस बघते, त्यावरून कळते की तो काय करत असेल, अजूनपण एकाच शब्दाचे स्टेटस ठेवतो, त्याने एकदा "लिसा" नावाने स्टेटस ठेवला होता, नवीन मुलगी भेटली वाटतं? का माझी आठवण आली म्हणून? काही असेल, त्याच्या सायलीची आता मात्र लिसा झाली होती.

-चैतन्य रासकर
https://www.facebook.com/chaitanya.raskar.5

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला कथा आवडली आणि पटलीदेखील!

इतर वेळी सामान्य सर्वसाधारण वागणारी व्यक्ती नावडत्या माणसासोबत राहून राहून कशी ज्वालामुखी बनत जाते ते पाहिलं आहे. अशा दोघांनी वेगळे होणेच योग्य. त्यांनंतर ती सायको वाटणारी व्यक्ती परत नॉर्मल होते.

धन्यवाद ऋन्मेऽऽष Happy

तुम्ही जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे,
कथेतील पात्र नकारात्मक वागतात, त्यांचे स्वभाव टोकाचे आहे, त्यामुळे या पात्रांबद्दल काही सकारात्मक विचार, भावना वाटणार नाहीत, त्यामुळे अर्थातच कथा आवडणार नाही,
"हे चुकीचे आहेत किंवा असं नसतं वागायचं " असं जरी कथा वाचून कोणाला वाटलं असेल तरी मी समाधानी होईल.

धन्यवाद अॅमी Happy

तुम्ही कमी शब्दात सायलीचं योग्य वर्णन केलं आहे, मला तेच सांगायचं होतं, एखादी व्यक्ती एकाच दिवशी भांडली तरी ती भांडकुदळ ठरत नाही, कधीतरी प्रतिकूल परिस्थितीचा ताण वाढतो, मग आपली चिडचिड होते, ती तात्पुरती चीडचीड असते, परिस्थती अनुकूल झाली की स्वभावात ही तसाच बदल होतो, सांगायचा मुद्दा हाच की प्रतिकूल परस्थितीत दुसऱ्याला किंवा स्वतःला त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न आपण करू शकतो.

हे चुकीचे आहेत किंवा असं नसतं वागायचं " असं जरी कथा वाचून कोणाला वाटलं असेल तरी मी समाधानी होईल.>> का पण? काही चुकीचं नाहीये त्यात. लग्न केलं पण नाही पटलं एकमेकांशी. त्याचे दोष जास्त खुपु लागले ती चिडचिडी झाली. एवढी की कुकर पण फेकला तिने Lol
मग झाले वेगळे. कुठलंही नातं टिकवण्यासाठी दोन्हीकडुन तेवढी कमिटमेंट, समजुत्दारपणा असायला हवा. नसतो काही वेळा. वेगळे झाले. त्यात चुकीचं काय आहे? म्हणजे मनात नसताना त्याने तिची हाजीहाजी करुन किंवा इतर वेळेसारखं तिने त्याला ह्यावेळीही माफ करुन गोड शेवट करायला हवा होता का?
सगळेच शेवट गोड नसतात. आणि कधी कधी जे शेवट आपल्याला गोड वाटत नाहीत ते त्या व्यक्तीसाठी खरे गोड आणि रीलीफ देणारे असु शकतात.
असो जास्तच लिहिलं जरा.

@सस्मित

"कधी कधी जे शेवट आपल्याला गोड वाटत नाहीत ते त्या व्यक्तीसाठी खरे गोड आणि रीलीफ देणारे असु शकतात"
सुरेख, जिंकलंत Happy
तुम्ही कथेचं तात्पर्य अगदी व्यवस्थित मांडलत.
अशा प्रतिक्रियेमुळे हुरूप वाढतो, तुम्ही इतक्या आपुलकीने कथा वाचत आहात हे बघून बरं वाटलं .

कथा छान आहे, वेगळी आहे, आवडली Happy
एखाद्या निगेटिव्ह पात्राला कथेच्या मध्यभागी ठेऊन कथा लिहिणं, हे अवघड काम इथे लीलया केलं आहे.

वरील सर्व प्रतिसाद वाचले.
@चैतन्य माझे मत मांडायला हा मंच वापरू इच्छितो.

आपले लिखाण आपल्या स्वतःला व वाचकाला पटणारे अन समाधान देणारे हवे. जर समोरच्याला पटले तर तो आपला चाहता होतो अन्यथा टिका होते. होणाऱ्या टिकेतून चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जावे पण आपली मतं लादू नये. आपल्या लेखनातून वाचकाला मिळणारे समाधान हा एकमेव निकष असावा.
मला माबो जाॅईन करायला लावणार्‍या लेखकांमधे आपण आहात म्हणून हा माझा स्वार्थी लेखनप्रपंच. चुभुदेघे

@पाथफाईंडर
मत "लादली"? बाप रे, मला हसूच आलं Lol मत लादली असती तर अनेक मायबोलीकरांनी तसे उत्तर दिले असते, असं मलातरी कधी वाटलं नाही.
"टीका" होतेय? असं मुळीच दिसत नाही.
काही लोंकाना कथा आवडली, काहींना नाही आवडली, विषय संपला.
जर कोणी आक्षेप घेत असेल, तर लेखक सवांद साधण्याचा किंवा बाजू मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो.

@चैतन्य वरील सर्व प्रतिसाद वाचले. माझे मत मांडायला हा मंच वापरू इच्छितो. आपले लिखाण आपल्या स्वतःला व वाचकाला पटणारे अन समाधान देणारे हवे. जर समोरच्याला पटले तर तो आपला चाहता होतो अन्यथा टिका होते. होणाऱ्या टिकेतून चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जावे पण आपली मतं लादू नये. आपल्या लेखनातून वाचकाला मिळणारे समाधान हा एकमेव निकष असावा.
मला माबो जाॅईन करायला लावणार्‍या लेखकांमधे आपण आहात म्हणून हा माझा स्वार्थी लेखनप्रपंच. चुभुदेघे

@कल्पना1 धन्यवाद मी माझा वरील प्रतिसाद संपादित केलाय व ओरिजिनल या पोस्ट मधे ठेवला आहे. प्रथम एक नमुद करू इच्छितो की माझे वरील लिखाण चैतन्यला उद्देशुन नाही. इथे काही निगेटिव्ह प्रतिसाद आलेत तसे सध्या बाकी माबोवरही दिसत आहे त्यावरील माझे जनरल मत टाकायला हा मंच वापरतो आहे. असे मला लिहायचे होते.

दुसरे मी रेग्युलर लेखक नाही /धागा काढायचा अनुभव नाही त्यामुळे बाकी धाग्यांवर लिहीतो. वरील लिखाणातील वाक्ये मागेपुढे झाल्याने अर्थ बदलला.
माझ्या लिखाणाने आपणास वाईट वाटल्यास साॅरी.
@चैतन्य साॅरी

@अनुश्री_ @कल्पना१ @पाथफाईंडर
मनःपूर्वक आभार, तुम्ही आपुलकीने कथा वाचता, प्रतिक्रिया देता हे बघून फार मोठं समाधान मिळतं Happy

छान

Pages