माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिनेशदा, काल सगळी तयारी झाली होती गवारच्या भाजीची पण आयत्यावेळी खिचडीची फरमाईश झाली. मग काय तेच गोळे खिचडीत टाकले, काय मस्त झाली होति, सगळे खुश झाले. नविन प्रकार झाला.
धन्स

अरे वा गोळ्यांची खिचडी का ? असे गोळे भाताबरोबर पण व्यवस्थित शिजतात. भात बाहेर शिजवायचा आणि अर्धवट शिजल्यावर हे गोळे सोडायचे. बरोबर कढी हवी.

संक्रांतीला गुळपोळ्यांचा आणि तिळ गुळाच्या वड्यांचा प्रयोग केला आणि साफ फसलाय Sad
गुळाचे सारण एकदम भरभरीत कोरडे झाले. गुळ आणला तेव्हा तो खूप ओलसर असा नव्हता. पण सारण केल्यावर थोडा दुधाचा हबका मारून बघितले. तरीहि पोळी लाटताना गुळ फार पसरत नव्हता आणि पोळ्या फुटत होत्या. वड्या करायला घेतल्यावरही असेच त्याचा गोळा काही बनला नाही थापायला. असे का?
आणि आता डबाभर गुळ, तीळ, सुके खोबर्‍याचं मिश्रण झालंय त्याचं काय करावं (वांग्याच्या भाजीत घालून संपवायला मला कमीतकमी ८-१० वेळा तरी भाजी करावी लागेल Happy )

जेवणात गोडा मसाला वापरत असशिल तर बर्‍याच भाज्यात हे मिश्रण वापरता येईल.
(गरम मसाला, कांदा लसुण मसाला वैगरे वापरत असशिल त्यात गुळ नाहि चांगला लागत)

अंजली, थोडा तेलाचा हात घेऊन गूळ चांगला मळून घे आणि ट्राय कर.

साक्षी, गवारीच्या भाजीला फोडणीत थोडा ओवा टाकायचा म्हणजे सुंदर स्वाद येतो. तसेच गूळ, गोडा मसाला, साधं लाल मिरचीचं तिखट, मीठ, थोडं ओलं खोबरं टाकलं तरी सुंदर होते भाजी. वरुन कोथिंबीर घालायची.

गवारीच्या भाजीत तेलावर मोहरी-हिंगाच्या सोबतीनी थोडे मेथीदाणे, लाल मिरच्या आणि ओवा टाका. मस्त चव येते. मग शेंगा आणि हळद्-मीठ घालून, झाकण ठेऊन एक वाफ काढा. त्यानंतर त्यात धणे आणि जीरे पावडर, तिखट टाकून पुन्हा झाकून शिजवा. सुकीच करा. शिजवताना फारतर थोडासा पाण्याचा हबका मारा. थोडे दूध घातले तरी चालेल किंवा नाही तरीही.

वर दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे लाल भोपळा किंवा त्याच्या काढलेल्या जाड सालीही चिरून घालतात.

अश्विनी, मी बरेचदा जाड साली काढून लांब चिरून घालते. श्राध्द, तेराव्याचं काही माहित नाही. आरोग्याकरता चांगले.

गवार भोपळा भाजी श्राद्ध, तेराव्याला करतात का? >>>>>>> ९९% हो.

आणि लाल भोपळ्याची भाजी मी साल न काढताचं करते, तीळकूट, मेथीदाणे, दाण्याचकूट, हीरवी मिरची इ. घालुन, छान होते.

कुठल्याही शुभकार्याला गवार भोपळा भाजी चालते. तशा दोन्ही भाज्या सारक, नेहमी करावी.
गवार नुसती उकडून, त्यात दही व फोडणी घालून कोशिंबीर करता येते. त्या शेंगा, जून असतील तर तेलावर परतून चटणी करता येते.
जवारीच्या बीयांत गवारगम असतो, तो हृदयासाठी चांगला. अनेक बिस्किटात तो वापरतात.

मी गाजराची कोशिंबीर केलेली , गाजर किसून त्यावर कमी तेलाची मोहरी, जिरे, कडिपत्ता, हिंग आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी घातलेली , आणि खायला घ्यायच्या आघी मीठ टाकलेले. खाताना चव चांगली लागत होती, पण थोड्यावेळाने बरेच पाणी सुटत होते. कशामुळे ? आण्खीन काही टाकायला हवे होते का ? दाण्यांचा कूट वगैरे ..

होय, दाण्याचं कूट किंवा ओलं खोबरं.. पण किस अगदी बारीक असेल तर गाजराला पाणी सुटतं. जरा जाडसर असेल तर पाणी सुटत नाही.

हो,हो, गवारीच्या भाजीला फोडणीत ओवा हवाच. कदाचित वातूळ म्हणून घालत असावेत.
तसंच गवार्+भोपळा असेल तर ओवा, मेथी दाणे हवेतच.

विकु,
१. तिखटपणा कमी करायचा असेल तर कोरडं खोबरं किंवा ओलं खोबरं घालून चटणी मिक्सरमधून फिरवा.
२. किंवा टोमॅटोची संख्या वाढवता आल्यास बघा.
३. ही चटणी एखाद्या भाजी / उसळीत ढकलून फ्रेश चटणी तयार करा.
४. ह्या चटणीत लसूण बारीक करून घाला. जास्त झणझणीत होईल! Light 1 Proud

५. दही, कोथिंबीर, ओल खोबरं (ऑप्शनल) घालुन खा Happy
६. कांदा, लसुण तेलावर परतुन त्यावर ही चट्णी घालुन परतुन घ्या. वरतुन गरम मसाला/पावभाजी मसाला/सब्जी मसाला घालुन मिक्सरमधे ब्लेंड करा. फ्रि़ज मधे बाटलीत भरुन ठेवा. कुठल्याही रस्साभाजीत, उसळ वगैरे करताना ही ग्रेव्ही वापरा Happy खुप असेल तर पोर्शन्स करुन फ्रिझ करा. अशी ग्रेव्ही सँडविचला लावुन पण छान लागते.
७. यात कांदा बारीक चिरुन, काकडी चिरुन घाला. सेलरी किंवा पातीचा कांदा पण घालता येइल. थोड पाणी घालुन सारखं करा फ्रिज मधे ठेवा - देशी गॅझपाचो कोल्ड सूप म्हणुन प्या. सोबत सूप स्टिक्स, मोनॅको बिस्किट्स खा.
८. देशी 'ब्लडी मेरी' करुन प्या Proud

रविवारी भाजणीच्या चकल्या केल्या, प्रमाण अगदि व्यवस्थित घेतले होते. जेव्हा केल्या तेव्हा छान कुरकुरीत लागत होत्या, पण काल पाहिल्या तर अगदि नरम पडल्यात. काय करु ? बर्‍याच आहेत. Sad

विजय, एक जनरल सूचना. आले तसे फार तिखट नसते. खोकल्यावरचे औषध म्हणून चालू शकेल.
विनोदाचा भाग सोडा. तोंडात मिरची जाउन हाय हाय झाल्यास, कधीही पाणी पिऊ नये. मिरचीतील तिखट द्रव्य पाण्यात विरघळत नाही. पाणी प्यायल्याने ते जास्तच पसरते. त्यापेक्षा साजूक तूप, मऊ भात वा दही खावे.
प्रतिभा, हाच प्रश्न इथे आधी विचारला होता. पुर्ण थंड व्हायच्या आधी डब्यात भरल्या का ? डबा हवाबंद नव्हता का ? आतून कच्च्या राहिल्या का ?
आता त्या सुधारण्यासाठी थोडा थोडा वेळ मायक्रोवेव्ह अवन मधे ठेवून बघा, साध्या अवनमधे ठेवल्या तरी चालतील.

पहिल्यांदाच इथे मिळणारे उकडे तांदूळ आणले होते.
कमी पाणी,जास्त पाणी,कुकरात्,पातेल्यात असा सर्व प्रकारे भात केला पण खाताना कच्चाच लागतोय.
पाणी जास्त घातलं तर वरती बुळबुळीत पण आत कच्चाच.
काय चुकत असावे?

Pages