तेंंडूलकर माफ करा, आम्ही अजूनही तुम्हाला समजू शकलो नाही !

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

kamala.jpg

सध्या तेंडूलकरांच्या "कमला" नाटकावर आधारीत, "कमला" याच नावाची मालिका चालू आहे.

मी ही मालिका पाहीली नाही. ती किती चांगली किंवा वाईट आहे हे मी सांगू शकत नाही.

सध्या सोशल मिडीयामधे ही मालिका किती भंकस आहे याबद्दल प्रतिक्रिया वाचतो आहे. प्रत्येक प्रेक्षकालाच आपले मत व्यक्त करायचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच.

पण काही प्रतिक्रियामधे "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?", "संहीता बदलताच कशी तुम्ही", "पेलता येत नाही तर कशाला तेंडुलकरांची नाटकं करायला जाता?" , "ही मालिका बंदच करायला पाहिजे" असा सूर दिसतो.

ही मालिका अत्यंत भंकस असेलही. आणि आज तेंडुलकर असते तर त्यांना ती पाहून खूप दु:खही झाले असते कदाचित.
पण त्यापेक्षाही कितीतरी जास्त दु:ख, "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?" या सारख्या वाक्यांचे झाले असते. "त्यांना एका मखरात बसवले गेले आहे आणि त्यांच्या त्या प्रतिमेचा उपयोग करून इतरांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य चेपण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातोय" याचे झाले असते.

माझा तेंडूलकरांचा काहीच अभ्यास नाही. मग माझी तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे का?

हो आहे ! फक्त माझीच नाही तर तेंडुलकरांचे काहीही वाचलेल्या , पाहिलेल्या , मग ते अगदी तुटपुंजे का असो, त्या प्रत्येकाची तेंडूलकरांबद्दल बोलायची लायकी आहे. आणि हे मी तेंडूलकरांकरूनच शिकलो आहे.

आणि कुठल्याही दिग्दर्शकाला तेंडुलकरांचे नाटक/कलाकृती याचे त्याला योग्य वाटेल ते ईंटरप्रिटेशन करायचा अधिकार आहे.

आता हे ईंटरप्रिटेशन किती चांगले आणि किती वाईट होईल तो भाग वेगळा. आणि ते कसे वाटले हे सांगायचाही प्रत्येक वाचकाला/प्रेक्षकाला अधिकार आहेच. पण तो अधिकार्/ते स्वातंत्र्य अमुक व्यक्तींनाच असे ईंटरप्रिटेशन करता येईल, इतरांना करता येणार नाही असे सांगू शकत नाही.

जाता जाता: २००२ साली प्रिया गेल्यावर, तेंडुलकर अमेरिकेत आले होते. त्यातले बरेच दिवस ते बॉस्टनलाही राहिले होते. माझ्याकडेही राहून गेले आहेत. त्या दिवसात एक माणूस म्हणून, मुलगी गेल्याच्या दु:खाने व्यतिथ झालेला बाप म्हणून, त्यांना जवळून बघायला मिळालं. आपल्याला मखरात बसवलं जातंय, एका चौकटीत बसवून आपल्या प्रतिमेचा उपयोग करून काही विचारांना दाबलं जातंय असं त्यांना जाणवायला लागलं होतं आणि त्याचा उबगही येत चालला होता.

ज्या व्यक्तिने आयुष्यभर त्याला काय वाटलं ते लिहिलं, अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला , तिचंच नाव , "त्यांना समजण्याची तुमची लायकी नाही म्हणून तुम्ही व्यक्त होऊ नका" असे म्हणण्यासाठी वापरण्यात येत असेल तर आपण तेंडूलकरांना समजूच शकलो नाही.

विषय: 
प्रकार: 

<ज्या तेंडुलकरांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला, आणि आता सर्वमान्य असले तरी त्यांच्या काळात लोकांना पटत नसलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नवीन आयाम आपल्याला शिकवले, त्यांचंच नाव वापरून नवीन प्रयोगांना आपण दाबून टाका म्हणत असू तर त्याशिवाय दुसरा मोठा विरोधाभास नाही.>

अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी फार मोठा लढा दुर्गाबाई भागवत आणि सुनीताबाई देशपांडे यांनी दिला. या दोघींइतकी जहरी टीका मराठी सांस्कृतिकजगतात इतर कोणी केली नसेल. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे म्हणून कोणी टीका करू नये, ही अपेक्षा चुकीची आहे.

मुद्दा केवळ 'मालिका बॅन करा' हे म्हणणं चुकीचं आहे, इतकाच असेल, तर त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा इतका महत्त्वाचा का व्हावा? प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा हक्क आहे आणि त्यावर टीका करण्याचा हक्क इतरांना आहे, हे अमान्य असण्याचं कारण नाही. 'मालिका बॅन करा' हे या बाफवर कोणी म्हटल्याचं दिसलं नाही, तशी मागणी तेंडुलकरांशी संबंधित असलेल्यांनीही केल्याचं कळलं नाही. एखाद्या कोणी तसं इतरत्र लिहिलं असेल तर याचा अर्थ 'तेंडुलकरांचा पराभव झाला' असा घ्यायचा का?

तेंडुलकरांच्या संहितांवर चित्रपट निघाले, नाटकं निघाली. तेंडुलकरांच्या लिखाणाने, त्यांच्याबरोबर काम करण्याने आम्हाला लिखाणातल्या, सादरीकरणातल्या नेमकेपणाचा महत्त्व कळलं, असं सांगणारे आजही अनेक आहेत. तेंडुलकरांच्या मूळ मुद्द्याला जेव्हा तीलांजली दिली जाते, तेव्हा तेंडुलकरांची आपण काय किंमत करतो, हे कळतं. कोण्या एखाद्याने 'मालिका बॅन करा' असं लिहिण्याने तेंडुलकरांचा पराभव होत असेल, तर त्यापेक्षा मोठा पराभव तेंडुलकरांचा मुद्दा समजून न घेता प्रेक्षकशरण कलाकृती निर्माण होण्यात आहे.

"श्यामची आई" नावाचे पुस्तक मी लिहिले आणी त्यात काकोडकर टाईप मसाला घातला तर ? शिवाय ( साने गुरुजींच्या पुस्तकावर आधारित) अशी तळटीप शीर्षकात जोडली तर? केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हे योग्य ठरेल का ?

प्रस्तुत सिरियल चे जे लेखक आहेत त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचा कुणीही प्रयत्न करत नाहीत. अगदी ती मालिका बॅन करा अशी मागणी करणारेही. त्या सिरियल लेखकाने ( किंवा आणखी कुणीही) "तेंडुलकर एक सुमार दर्जाचे नाटककार होते" असा एखादा लेख लिहिला तर त्यांचे ते स्वातंत्र्य आहे. आणी असा लेख प्रसिद्ध होऊ नये असा कोणताही प्रयत्न "गळचेपी" या व्यख्येत मोडेल.

ती तुमची नवनिर्मीती असेल व ते तुमचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य! त्याकरता कोणी साने गुरुजींचे (किंवा काकोडकरांचेही :फिदी:) नांव घेऊन 'असे लिहायला नको होतेत, बंद करा' असे म्हणू नये. Happy

(टीप - तुम्ही दोघांपैकी एकाच्या संहितेवर आधारीत काहीतरी करत आहे हे मात्र जाहीर करायला हवेत :फिदी:)

ते सोडा विकू,
उद्या मी रामची आई असे पुस्तक 'सानेगुरुजींच्या शामच्या आई वर आधारित' असे लिहून रामची आई रामला अफलातून शिव्या देत असे, संध्याकाळी बंदुका गुप्ती चालविण्याचे प्रशिक्षण देत असे, रामचे बाबा मोठेठे बिजनेसमन असून नैतिकतेपेक्षा पैसा महत्वाचे असे शिकवत असल्याचे, आपल्या नातेवाईकांच्या जमिनी वगैरे लुटून त्यांना बेघर करत असल्याचे दाखविले तर चालेल काय?

>>>तेंडुलकरांच्या मूळ मुद्द्याला जेव्हा तीलांजली दिली जाते, तेव्हा तेंडुलकरांची आपण काय किंमत करतो, हे कळतं.<<<

हे तेंडुलकरांवरचे प्रेम, तेंडुलकरांप्रती असलेला आदर व तेंडुलकरांच्या कलाकृतींच्या गुणवत्तेबाबत एक रसिक म्हणून असलेला पझेसिव्हनेस आहे. ह्याचा अभिव्यक्तीस्वातंत्र्याशी संबंध नाही.

उद्या तेंडुलकरांची एक संहिता घेऊन कोणी एक हौशी कलाकार 'तेंडुलकरांनी किती सामान्य लिहिले' असा कार्यक्रम करू लागला तर आपल्या भावना दुखावतील की आपल्यातील अभिव्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या करणारा दुखावेल, हे तपासून बघायला हवे सगळ्यांनी!

बेफिकीर,

<मुद्दा केवळ 'मालिका बॅन करा' हे म्हणणं चुकीचं आहे, इतकाच असेल, तर त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा इतका महत्त्वाचा का व्हावा?> असं मी वर लिहिलं आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि कलाकृतीचा लावलेला अर्थ यांत गल्लत होते आहे.

<उद्या तेंडुलकरांची एक संहिता घेऊन कोणी एक हौशी कलाकार 'तेंडुलकरांनी किती सामान्य लिहिले' असा कार्यक्रम करू लागला तर आपल्या भावना दुखावतील की आपल्यातील अभिव्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या करणारा दुखावेल, हे तपासून बघायला हवे सगळ्यांनी!>

हे कसं शक्य आहे? Proud 'तेंडुलकरांनी किती सामान्य लिहिले' ही त्या हौशी कलाकाराची संहिता नसेल का? 'तेंडुलकरांनी किती सामान्य लिहिले' या नावाखाली तेंडुलकरांनी काहीही लिहिलेलं नाही. 'तेंडुलकरांनी किती सामान्य लिहिले' हे त्या कलाकारानं केलेलं मूल्यमापन असेल, आणि त्याला विरोध होण्याचं कारण नाही. टीका होऊ शकेल, विरोध नाही.

'आधी अभ्यास करा, मग लिहा' असं म्हटल्यानंही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत नाही. कारण 'लिहूच नका' असं म्हटलेलं नाही. 'अभ्यास करून, समजून घेऊन लिहिता येत नाही का?' असं म्हणतानाही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत नाही. दुर्गाबाईंनीही आनंद साधल्यांच्या महाभारताबद्दलच्या लिखाणावर टीका करताना 'तो सामान्य कुवतीचा लेखक होता' असं म्हटलं होतं.

बाकी, 'कमला'वर टीका करणार्‍यांच्या 'भावना दुखावल्या' हा निष्कर्ष कुठून आला, हे कळत नाही. असा सरसकट आरोप करणं चुकीचं वाटतं. Proud

उद्या तेंडुलकरांची एक संहिता घेऊन कोणी एक हौशी कलाकार 'तेंडुलकरांनी किती सामान्य लिहिले' असा कार्यक्रम करू लागला तर आपल्या भावना दुखावतील की आपल्यातील अभिव्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या करणारा दुखावेल, हे तपासून बघायला हवे सगळ्यांनी!

इतरांचे माहित नाही पण निदान माझ्या तरी भावना वगैरे दुखावणार नाहीत. "तेंडुलकर एक सामान्य लेखक होते" हे त्या कलाकाराचे मत असेल आणी ते व्यक्त करायचा त्याला नक्कीच अधिकार असावा. तेंडुलकर किती सामान्य होते हे दाखवण्यासाठी फेअर यूज म्हणून त्यांच्या संहितेतला काही भाग वाचून दाखवला तरी हरकत नाही.

>>>मुद्दा केवळ 'मालिका बॅन करा' हे म्हणणं चुकीचं आहे, इतकाच असेल, तर त्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा इतका महत्त्वाचा का व्हावा?<<<

(अंदाज असा आहे की) मालिका बॅन करा म्हणणार्‍यांनी भावनेच्या भरात तसे म्हंटलेले असावे व हे लक्षात घेतले नसावे की असे काही निर्माण व सादर करण्याचा त्या त्या निर्मात्याला अधिकार आहे. (फेसबूक किंवा इतरत्र झालेल्या चर्चेचा मी साक्षीदार नसल्यामुळे 'अंदाज' हा शब्द वापरला) Happy

>>>तेंडुलकरांनी किती सामान्य लिहिले' ही त्या हौशी कलाकाराची संहिता नसेल का? <<< सहमत आहे. चर्चेच्या ओघात तसे लिहिले गेले. सुधारतो.

कमला मालिकेमुळे आपल्या तेंडुलकरांबाबतच्या आदरभावना दुखावल्या गेल्या आहेत हे लक्षात घेतले जात नाही आहे असे वाटत आहे. (कलाप्रांतातील धार्मिक भावना :फिदी:)

कमला मालिकेच्या निर्मात्यांना त्यांनी सादर केलेली मालिका निर्माण व सादर करायचे स्वातंत्र्य असायला हवे हे मान्य होत नाही आहे (/नसावे).

>>>तेंडुलकरांच्या मूळ मुद्द्याला जेव्हा तीलांजली दिली जाते, तेव्हा तेंडुलकरांची आपण काय किंमत करतो, हे कळतं.<<<

हे काय दुखावणं आहे?

<कमला मालिकेमुळे आपल्या तेंडुलकरांबाबतच्या आदरभावना दुखावल्या गेल्या आहेत हे लक्षात घेतले जात नाही आहे असे वाटत आहे.>

हा तुमचा निष्कर्ष. एखाद्या कलाकृतीवर टीका करणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होत नसते.

<कमला मालिकेच्या निर्मात्यांना त्यांनी सादर केलेली मालिका निर्माण व सादर करायचे स्वातंत्र्य असायला हवे हे मान्य होत नाही आहे>

'मालिका तयार होऊ नये' असं कोणी आणि कुठे म्हटलं? मालिका तेंडुलकरांच्या मूळ मुद्द्याशी प्रामाणिक असावी, इतकीच बारकुशी अपेक्षा आहे. मग सरिता राजकारणी असल्याचं दाखवू दे, कमला बार डान्सर असू दे, पत्रकाराच्या मित्राचे विवाहबाह्यसंबंध असू दे, फरक पडत नाही, मूळ मुद्द्याशी प्रतारणा नको. मूळ मुद्द्याशी फारकत घेणार असाल, तर नाव वापरू नका. स्वतःचं नाव लावा.

आणि वर म्हटयाप्रमाणे 'भावना दुखावल्या' हा तुमचा निष्कर्ष आहे. आणि समजा दुखावल्या, तरी त्याचा अभिव्यक्तिस्वातंत्र्याशी काय संबंध?

>>>मालिका तेंडुलकरांच्या मूळ मुद्द्याशी प्रामाणिक असावी<<<

हे गृहीतक अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आड येत आहे. 'आधारीत' म्हंटल्यानंतर कोणतेही फेरफार व दर्जात्मक घसरण शक्य आहे हे समजून घ्यायला आपण नकार देत आहोत.

>>>हा तुमचा निष्कर्ष. एखाद्या कलाकृतीवर टीका करणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली होत नसते.<<<

ही कलाकृतीवरील टीका निखळ टीका ह्यापेक्षाही पलीकडे पोचली असावी असे मूळ धाग्यातील खालील विधाने वाचून वाटत आहे.

>>>पण त्यापेक्षाही कितीतरी जास्त दु:ख, "तेंडुलकरांचे नाटक करायचे धाडस तुम्हाला होतेच कसे?" या सारख्या वाक्यांचे झाले असते. "त्यांना एका मखरात बसवले गेले आहे आणि त्यांच्या त्या प्रतिमेचा उपयोग करून इतरांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य चेपण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातोय" याचे झाले असते.<<<

बेफिकिर यांच्या मताशी सहमत आहे.उत्तम मांडणी केली आहे.
>>अजय ह्यांचे म्हणणे असे दिसते की आज तेंडुलकर असते तर त्यांनीही 'कमला' मालिकेवर जहरी टीका केलीही असती, पण अशी मालिका निर्माणच होऊ नये असे ते कधीच म्हणाले नसते.<<
४ एप्रिल २०१५ रोजी डीएसके गप्पा कार्यक्रमात जब्बार पटेल यांनी हेच मत कमला नव्हे पण त्यांच्या कलाकृती च्या दृष्टीकोना बद्दल व्यक्त केले होते.
एक जोक आठवला. एका नाटककाराने एक ट्रॅजिक नाटक लिहिले. त्याचा पहिला प्रयोग झाल्यावर प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले काय कॉमेडी लिहिता हो!
तेंडुलकर भक्त हे तेंडुलकर आपली प्रॉपर्टी आहे व त्याच्याबद्दल बोलण्याचा अन्य लोकांना बोलायचा अधिकार नाही अशा आशयाचे मत अप्रत्यक्षरित्या व्यक्त करीत असतात. प्रेमापोटी त्यांच्या कलाकृतीची तोडमोड झालेली त्यांना सहन होत नाही. पण हे मानवीस्वभाव नुसार होत राहणार. तेंडुलकरांना काय अभिप्रेत असाव याचा अंदाज करुन तसे ते नसल्यास कलाकृतीची विटंबना झाली असे ही म्हणु शकतात. इतिहासात शिवाजी महाराजांना काय अभिप्रेत होत असा अंदाज करुन आजही अस्मितांच राजकारण होत असताना आपण पहातोच. शिवाजी महाराज, मराठी माणुस हे मुद्दे हायजॅक होउ शकतात तर तेंडुलकर ही हायजॅक होउ शकतात. प्रतिक्रिया या पुर्वग्रहदूषित वा पोषित असू शकतात तर कलाकृती का नाही?
तेंडुलकर वाचलेत का? त्यांच्या लेखनावर तुमचा काही अभ्यास आहे का? तुमची लायकी तरी आहे का त्यांच्या बद्दल बोलायची? वगैरे वगैरे गोष्टी काहींनी थेट टंकल्या नसल्या तरी त्यांच्या मनात असणारच आहेत. जरी एखाद्याचा अभ्यास असला तरी यांना खरे तेंडुलकर* कळलेच नाही असे ही म्हणता येते.
* इथे अन्य अस्मितेच मुद्दे टाकता येतात.

<हे गृहीतक अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या आड येत आहे. 'आधारीत' म्हंटल्यानंतर कोणतेही फेरफार व दर्जात्मक घसरण शक्य आहे हे समजून घ्यायला आपण नकार देत आहोत>

अजिबात नाही. 'आधारित आहे' असं म्हटल्यानं मूळ मुद्द्याला धक्का पोहोचवण्याचा अधिकार नसतो. वर अनेक प्रतिसादांमध्ये मी व इतरांनी सोदाहरण लिहिलं आहे.

>>>अजिबात नाही. 'आधारित आहे' असं म्हटल्यानं मूळ मुद्द्याला धक्का पोहोचवण्याचा अधिकार नसतो. वर अनेक प्रतिसादांमध्ये मी व इतरांनी सोदाहरण लिहिलं आहे.<<<

हेच तर ते गृहीतक आहे की आजवरची सुचलेली उदाहरणे हा अंतिम नियम असणार! त्यापलीकडे वेगळे काही घडूच नये वगैरे! असो!

कामानिमित्त बाहेर जात असल्यामुळे यथाशक्ती सहभाग काही काळाने!

नरेंद्र दाभोळकरांच्या जीवनावर कुणी एक काल्पनिक कादंबरी लिहिली आणी त्यात दाभोळकर कोणत्याही कामाला सुरुवात करताना मुहुर्त बघत, आपल्या मुलाला आलेली मंगळ असलेली स्थळे नाकारत असे प्रसंग घातले तर? वर "नरेंद्र दाभोळकर यांच्या जीवनावर आधारित" अशी मखलाशी केली तर ? ते त्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल का?

>>नरेंद्र दाभोळकरांच्या जीवनावर कुणी एक काल्पनिक कादंबरी लिहिली आणी त्यात दाभोळकर कोणत्याही कामाला सुरुवात करताना मुहुर्त बघत, आपल्या मुलाला आलेली मंगळ असलेली स्थळे नाकारत असे प्रसंग घातले तर?<<
तर विडंबन वा विनोदी कलाकृती म्हणुन लोक बघतील. Lol

'आधारित आहे' असं म्हटल्यानं मूळ मुद्द्याला धक्का पोहोचवण्याचा अधिकार नसतो. >>> हे गृहितक/उदाहरणे/अंतिम नियम इ.इ. हे सर्व चिनूक्स आणि इतरांनी मिळून आज सकाळीच तयार केले असावे असे काही आहे का?

जीवनावर आधारित म्हटले तर ही बाब चुकीची आहे असे म्हणता येईल. भविष्यात जर वर्तमान इतिहास म्हणून लिहिला गेला तर या मोडतोडी होतील ही .
वरच्या प्रतिक्रियात मी हा मानवी स्वभाव आहे हे लिहिलेले आपण लक्षात घ्यावे.

> हे गृहितक/उदाहरणे/अंतिम नियम इ.इ. हे सर्व चिनूक्स आणि इतरांनी मिळून आज सकाळीच तयार केले असावे असे काही आहे का?>>>

Wink

आगाऊ,
मूळात तेंडुलकरांचे काहीच न वाचलेल्या आणि तेंडुलकरांची सामाजिक भूमिका माहितच नसलेल्या लोकांशी (हे अजय यांच्याबाबत नाही) तुम्ही 'तेंडुलकर' या मुद्द्यावर वाद घालण्यात काही अर्थं आहे का?

> शिवाजी महाराज, मराठी माणुस हे मुद्दे हायजॅक होउ शकतात तर तेंडुलकर ही हायजॅक होउ शकतात
अगदी बरोबर घाटपांडे.
खुद्द तेंडुलकरांना त्यांच्या हयातीतच हे जाणवायला लागले होते आणि त्याचा उबग आला होता. "मला एका मखरात बसवलं जातंय आणि त्याचा उपयोग इतरांना गप्प बसवण्यासाठी करताहेत." हे त्यांचेच उद्गार आहेत.

मुळ कथा एकाची असते. सादरीकरण करताना त्याची पटकथा होते. याचे कारण सर्वच्या सर्व प्रसंग सादरकरणे नेपथ्याची लिमीटेशन असतात किंवा मुळ कथेतला प्रभावी सीन चे चित्रीकरण्/सादरीकरण तितके प्रभावी होणार नसते. बर्‍याच वेळा व्यावसायीक दृष्टीकोनातुन पात्रांची काटछाट होत असावी. सिनेमा किंवा नाटकाची लांबी ३ तासाची होण्यासाठी मुळ कथेतले प्रसंग पटकथेत येणार नाहीत.

इतके स्वातंत्र्य पटकथाकाराने/ दिग्दर्शकाने घ्यावे. जर त्या लेखकाचे/ नाटककाराचे नाव वापरले तर मग मात्र कथेच्या आशयात बदल होऊ नये इतकीच माफक अपेक्षा असायला हरकत नाही.

सिरीयलला तीन तासांचे बंधन नसल्यामुळे मुळ विषय जसाच्या तसा ठेऊन त्यात उपकथानक घुसडले जातात. कमला कधीच वडाच्या पुजेला गेली नसेल ( मुळ नाटकात ) मग इथे ती जाणार कारण सिरीयल किमान वर्षभर चालु राहिली पाहीजे. त्याशिवाय त्याला मिळणार्‍या जाहीराती, त्यातुन नव्या कलाकारांना संधी कश्या मिळणार ?

इतका उदात्त विचार ठेऊन हे चालु ठेवायला हवे. किमान तेंडुलकर नावाचे नाटककार मराठीत होते हे पुढच्या पिढीला समजेल आणि मुळ नाटक वाचयला/आलेच तर पहायला पुढची पिढी तयार होईल हे ही नसे थोडके.

मूळ 'कमला' नाटकात कमलेला विकत घेऊन घरी आणल्यानंतर सरितेला अनेक प्रश्न पडतात. आपल्याला साहेबाने ७०० रुपयांना विकत घेतलं, तसं सरितेलाही विकत घेतलं असावं, अशी कमलेची समजूत. सरिता मात्र स्वतःच्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारू लागते. त्या घरातलं तिचं स्थान, तिच्या नवर्‍याच्या आयुष्यात तिचं स्थान यांबद्दल ती विचार करते. त्या अनुषंगाने काही कृतीही तिच्या हातून घडतात. आपण साहेबांच्या दासी या विचारातून कमला साहेबांची कामं करण्याचा प्रयत्न करते. आपणही आपल्या नवर्‍याच्या अशाच दासी आहोत, हा विचार सरितेला एकीकडे अस्वस्थ करतो, तर दुसरीकडे तिला कमलेनं आपल्या नवर्‍यावर अगदी थोडा का होईना, पण हक्क दाखवायला नकोय. दोन स्त्रिया, त्यांच्या आपापल्या परीने दासी असणं हा या नाटकातला महत्त्वाचा मुद्दा आहे.

'आधारित' मालिकेत हे सगळं गायब आहे. कमलेला घरी आणल्यानंतर सरिता कमलेशी या पातळीवर स्पर्धा करणार नाही. मग ही मालिका नक्की कशाबद्दल आहे? मूळ कलाकृतीचा फॉर्म बदलताना कथानकातल्या 'मूळ मुद्द्याशी' इमान राखा, ही अपेक्षा केली, तर यात अभिव्यक्तिस्वातंत्र्य कसं बाधित झालं? 'बाजीराव मस्तानी' चित्रपटात काशीबाई आणि मस्तानी या दोघी शनिवारवाड्यात एकत्र दिलखेचक नृत्य करताना दिसणार आहेत. हे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्य आहे. पण भन्साळीभाऊंना 'जरा इतिहास वाचा' असं सांगितलं तर शनिवारवाडा हायजॅक केला, असा अर्थ होत नाही. Happy

जमल्यास हे वाचा - http://www.maayboli.com/node/9146

चिनूक्स आणि नीरजाशी पूर्णपणे सहमत.

ज्या तेंडुलकरांनी अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी लढा दिला, आणि आता सर्वमान्य असले तरी त्यांच्या काळात लोकांना पटत नसलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे नवीन आयाम आपल्याला शिकवले, त्यांचंच नाव वापरून नवीन प्रयोगांना आपण दाबून टाका म्हणत असू तर त्याशिवाय दुसरा मोठा विरोधाभास नाही

>>> नवीन प्रयोग?? त्या मालिकेत नवीन प्रयोग असतील??

थोडस अवांतर-
माणुस अंधश्रद्द असतो कारण अंधश्रद्ध असणे ही त्याची गरज असते असे तेंडुलकर म्हणतात - संदर्भ तिमिरातून तेजाकडे ले. नरेंद्र दाभोलकर, पृष्ठ ३८४
या विषय तेंडुलकरांच्या लेखनात काही आले आहे का? ही माहिती मला हवी आहे कोणी देउ शकेल काय?

चिनूक्स,

एक प्रश्न उद्भवला मनात. काशीबाई आणि मस्तानी यांच्या शनिवारवाड्यातल्या एकत्र दिलखेचक नृत्याच्या पार्श्वभूमीवर भंडसाळीभाऊंना इतिहास वाचायला सुचवणं यथोचित आहे. मात्र हाच अनुलाग (अॅनॉलॉजी) कमलाला लावावा का? कमला ही कल्पित कथा आहे, याउलट बाजीराव, काशीबाई, मस्तानी या जिवंत ऐतिहासिक व्यक्ती आहेत.

आ.न.,
-गा.पै.

कमला ही कल्पित कथा आहे, याउलट बाजीराव, काशीबाई, मस्तानी या जिवंत ऐतिहासिक व्यक्ती आहेत.
<<
<<
माझ्या माहीतीनुसार 'कमला' नाटक सत्यकथेवर आधारीत आहे.

कदाचित मालिका निर्मात्याला अपेक्षित नसेल परंतु एका पुरूषाची प्रॉपर्टी अश्या दोन स्त्रिया ह्या त्याच्या सुरक्षिततेसाठी व हाच मालक सात जन्मी मिळूदे ह्यासाठी वट पौर्णिमेचा उपास, व्रत वगैरे करतात ह्यात त्यांची मानसिक गुलामगिरी अधोरेखित होते आहे. कथेचा जो इसेन्स आहे तो ह्या परता अधिक चांगला कसा व्यक्त होईल. एकीने हे पूर्ण मानले आहे तर दुसरी जरा शंकेत आहे एव्ढेच.
हेच तेंडुलकरांना म्ह्णायचे होते ना?

Pages