रेल्वेमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: आपल्या सूचना व सल्ले. "विनंती स्वीकरली आहे"

Submitted by ऋग्वेद on 20 November, 2014 - 07:49

भारताच्या इतिहासात दुसर्यांदा महाराष्ट्राकडे देशाचे एक महत्वाचे असे "रेल्वे मंत्रीपद" मिळाले आहे. ( राम नाईक यांच्याकडे एनडीएच्या काळात आलेले होत परंतु ऑगस्ट ते ऑक्टोंबर १९९९ असे अवघे ३ महिनेच होते ) माननिय श्री. सुरेश प्रभुंसारख्या हुशार आणि कल्पक नेतृत्वाकडे हे पद गेल्याने नक्कीच अपेक्षा वाढली आहे. भारतीय अर्थकारणात रेल्वेचा सहभाग महत्त्वाचा आहे. रेल्वे ही भारताच्या नसनसातुन वाहत आहे. एक प्रमुख दळणवळणाचे साधन म्हणुन तसे स्वस्त आणि जलद मालवाहतुक साधन म्हणुन देखील रेल्वेचे भारतात मुख्य योगदान आहे.
आजपर्यंत जास्त रेल्वेमंत्रीपद हे उत्तर भारतात असणार्या नेत्यांनाच मिळत होती. त्यामुळे महाराष्ट्रामधुन भरघोस उत्पन्न मिळुन सुध्दा योग्य म्हणावे असा परतावा मिळाला नाही. महाराष्ट्रातुन एकुण उत्पन्ना पैकी जवळापास ५०% पेक्षा जास्त उपन्न रेल्वेला मिळते पण दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पाच्यावेळी महाराष्ट्राच्या तोंडाला पानेच पुसली जातात. अर्थात दरवेळेला महाराष्ट्रालाच वाटा मिळाला पाहिजे अशी मागणी नाही पण इमानदारीने पुढच्या स्टेशनवर जाण्याकरीता देखील रांग लावुन तिकिट काढणार्याला योग्य मोबदला मिळावा इतकी तरी रास्त अपेक्षा ठेवणे वागवे ठरणार नाही. सगळ्यांच सरकारांनी रेल्वे वाढवली तिचे उत्पन्न वाढवले बरीच कामे केली तरी लोकांच्या अपेक्षा पुर्ण झाल्या नाहीत. बर्याच जणांच्या अपेक्षा अवास्तव वगैरे असतील. रेल्वेखात्याने देखील स्वतःतर्फे बरीच अपेक्षा पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असेलच. अश्या प्रयत्नातुनच आजची रेल्वे आपल्याला अनुभवायला मिळते हे खरे आहे. इंटरनेट ई - तिकिट वगैरे सुविधा अश्याच कल्पनेचा जन्म त्यातुन झाला. अश्या विविध कल्पनेतुन सुचनेतुन त्याप्रत्यक्षात उतरतील की नाही याची चाचपणी करता येईल. नुसते डब्बे वाढवुन फेर्‍यावाढवुन समस्येतुन समाधान मिळत नसते. बर्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्यातुन चांगले उत्तम परिणाम येउ शकतात.
कोणी मुंबई लोकल ट्रेन बद्दल सल्ले देतील तर कोणी ज़ळगाव, कोल्हापुर स्टेशन वरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांबाबत सल्ले सांगतील तर कोणी स्टेशन बद्दल तर कोणी रेल्वे रुळांबद्दल अश्या विविध उत्तम सल्ले गोळा करुन रेल्वेमंत्र्यांना देण्याचा मानस आहे ( त्यावर किती अंमलबजावणी होईल? , सल्ल्यांना गंभीरपणे घेतील का? वगैरे बद्दल सांगता येणार नाही परंतु मी स्वतः तरी सुरेश प्रभुं यांच्या पर्यंत पोहचतील या प्रयत्नात असणार आहे. )

काही सल्ले:-

१) जुलै महिन्यात रेल्वेखात्याने स्टेशन वर ट्रेन (लांबपल्ल्याची) येण्याच्या ३० मिनीट अगोदर रिझर्वेशन करण्याची सोय रद्द केली होती. ( चौकशी काउंटर वर अश्या प्रकारची तिकिटे मिळत होती हे बर्‍याच कमी जणांना माहीत असेल ) ती पुन्हा चालु केली पाहिजे. रिझर्वेशन मधुन रेल्वेला जास्त उत्पन्न मिळते तसेच ग्राहकाचे समाधान देखील होते. डब्ब्यात असणार्या मोकळ्या सीटचा काळाबाजार कमी प्रमाणात होतो. कारण पुढच्या स्टेशनवर त्या रिकाम्या असणार्या सीटचे रिझर्वेशन देखील होउ शकत असल्याने ती सीट दुसर्याला देउ शकत नाही. या सुविधेचा वापर जास्त लोकांनी करावा या करिता माहीती जनमानसांना योग्य माध्यमातुन देण्यात यावी.

२) मुंबईच्या लोकल ट्रेनचे डब्बे एकमेकांना आतुन जोडण्यात यावे. लांब पल्ल्यांच्या गाड्या या आतुन जोडलेल्या असतात. त्यामुळे गाडीतली गर्दी विभागली जाते लोक मोक़ळ्या जागेकडे धाव घेतात. परंतु लोकल ट्रेन मधे डब्बे जोडलेले नसल्याने गर्दी विशिष्ट डब्ब्यांमधेच खच्चुन राहते. याचे कारण रेल्वे स्टेशन्स वर असणारे पादचारी पुल. बर्याच स्टेशन्सवर पादचारीपुल हे सुरुवातीला आणि शेवटी असतात त्यामुळे त्यावरुन येणारी लोक स्टेशन वर आल्यावर तिथेच रेंगाळत राहतात ( ऑफिस मधुन व्यवसायमधुन काम करुन दमलीभागलेली लोक बर्याचदा असेच करतात हा अनुभव देखील आहे.) अश्यामुळे १२ डब्ब्याच्या गाडीमधले पहिले ३ आणि शेवटचे३ या डब्ब्यांमधे गर्दी अतिप्रचंड असते. मधल्या डब्यांमधे इतकी गर्दी नसते वर फर्स्ट क्लासचा मोठा डब्बा देखील मधे येत असल्याने त्याबाजुला लोक कमीच जातात. हेच जर डब्बे मधुन जोडले गेल्यास गाडी चालु झाल्यावर आपोआपच लोक मोकळ्या जागेकडे जातील. महिलांचा डब्बे आणि फर्स्ट क्लासचे डब्बे हे शेवटी आणि सुरुवातीला ठेवल्यास मधले जनरल डब्बे जोडु शकतात. उदा. १५ डब्ब्यांची गाडी मधे दोन्ही बाजुचा दीड डब्बा जर महिलांसाठी आरक्षित ठेवला आणि उरलेला अर्धा डब्बा महिलांकरीता फर्स्टक्लासचा ठेवल्यास सध्या असलेल्या जागेपैकी जास्त जागा महिलांना आणि फर्स्टक्लासवाल्यांना मिळेल. त्यानंतरचा १ डब्बा पुरुष फर्स्टक्लास साठी ठेवावा म्हणजे दोन्ही बाजुंनी ३-३ असे ६ डब्बे महिला आणि फर्स्टक्लास यांच्या वाटणीला येतील आणि त्या मधले ९ डब्बे जनरल होतील ते आतुन एकमेकांना जोडावे म्हणजे गर्दीची विभागणी होउन डब्ब्यांमधे जास्त गर्दी होणार नाही.

३) इंटरनेटचे युगः- आजकालच्या जमान्यात इंटरनेटचा वापर जास्त होउ लागला आहे. तिकिटघरांसमोर इतक्या रांगा लागलेल्या असतात की बारशाला जायचे असल्यास लग्नालाच पोहचतो की काय असे वाटु लागते. त्या मधे देखील सणावारांना आणि महिन्याच्या १-१० तारखेला जास्तच गर्दी असते. मासिक पास काढायचा राहुन जातो. मग सकाळी होणारी धावपळ होतच असते. एक तर ऑफिस मधुन २ तास गर्दीत उभे राहुन आल्यावर पासच्या रांगेत उभे राहण्याचे त्राण नसते तर सकाळी लोकल ट्रेन सुटु नये म्हणुन होत असलेली धावपळ दोन्ही ठिकाणी वेळ काही जमत नाही. मग लेटमार्क वगैरे वगैरे बर्याच गोष्टी घडतात. म्हणुन रेल्वेने मुंबई लोकल साठी वेगळी वेबसाईट सुरु करुन तिथे ई-पास / ई-तिकिट काढण्याची सोय ठेवावी. मोबाईल मधुन कंम्पुटर मधुन लोक हव्या त्यावेळी तिकिट्स पासेस काढु शकतात त्यामुळे त्यांचा वेळ देखील वाचेल. त्याचबरोबर "पेपर"ची बचत देखील मोठ्या प्रमाणात होईल तिकिट छपाईचा खर्च कमी होईल. मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर देखील उपयोगी होउ शकतो.

आपले योग्य आणि अमुल्य कल्पना, सल्ले आणि सुचना नक्कीच विचारात घेतल्या जातील.

धन्यवाद

------------------------------------------------------------------------------------

काही दिवसांपुर्वी श्री. सुरेश प्रभु यांना संपर्क केला होता आणि त्यांना एक विनंतीपत्र पाठवण्यात आले होते. त्यात या धाग्याचा आणि मायबोलीचा संदर्भ देउन इथे आलेल्या सुचना आणि सल्ल्यांना त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा मानस व्यक्त केला होता.
त्यानुसार श्री. सुरेश प्रभु यांच्याकडुन सुचना आणि सल्ले पाठवण्याचे उत्तर आले आहे.

आपल्या सुचना आणि सल्ले यांचे वर्गीकरण, मुद्देसुद आणि नीटनेटके करण्याचे काम चालु आहे. ते झाल्यानंतर ईमेल द्वारे आणि पत्राद्वारे त्यांच्यापर्यंत या मागण्या पोहचवण्यात येतील. आशा आहे की आपल्या सर्व सुचना मागण्यांची श्री. सुरेश प्रभु नक्कीच दखल घेतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढील संदेश आज ईमेलवर मिळाला :

Ever commented seriously for improvement in railways? If yes, it's time to contribute. Visit before 17.1.2015 on http://www.indianrailways.gov.in/railwayboard/uploadDoc.jsp and suggest directly to Railway Ministry. Let's contribute. Let's initiate change.

मुंबईत 'एसी' लोकल्स सुरू होणार म्हणून लोकसत्तेत बातमी आहे
http://www.loksatta.com/mumbai-news/12-ac-railway-locals-for-mumbai-1060...

डीटेल्स वाचून मात्र 'एसी' म्हणले आल्टरनेटिंग करंट वर चालणारी अशा अर्थाने तर नव्हे अशी शंका आली (लोकल्सच्या इलेक्ट्रिकल असेम्ब्ली मधे वेगळे काही करावे लागते का कल्पना नाही, पण मूळच्या डीसी वाल्या उपकरणांमधे काहीतरी बदल करावा लागत असेल). वातानुकुलित म्ह्णूनही उल्लेख आहे म्हणजे तशीही असावी.

डब्यातला एसी प्रचंड स्ट्राँग लागेल गर्दीच्या वेळेस. कारण एसी रूम्स मधे सुद्धा जास्त गर्दी झाली तर कोंदट होते. येथे तर अनेकपट पब्लिक असते. तसेच एरव्ही एसी "कमी" ही करता यायला हवा. हा सगळा अ‍ॅनेलिसीस कोणीतरी केला असेल अशी आशा आहे.

याच बातमीत इतर मार्ग जोडण्याबद्दलही चांगल्या बातम्या आहेत.

फारेंडा, अल्टरनेट करंटवर ठाणे-व्हिटी मध्य रेल्वे धावू लागली आहे.

मुलुंड सोडल्यावर साधारण कोपरी ब्रिजच्या आसपास गाडीतले दिवे पंखे बंद होता दोन-तीन सेकंदांसाठी, तेव्हा समजतं ट्रेन आता डिसीवर शिफ्ट झाली Wink

एसी लोकलचे दरही जास्त असतील, ते ज्यांना परवडतील तीच लोकं त्यातून प्रवास करतील. त्यामुळे गर्दी नसेल बहुतेक. दोन्हीकडची गर्दी विभागली गेली तरी पुरेसं आहे.

नुकत्याच घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर विचार करता ठाण्यापर्यंत असणार्‍या अतोनात गर्दीचं एकमेव कारण म्हणजे ठाणे-वाशी आणि पुढे पनवेलपर्यंत वाढवलेला ट्रान्सहार्बर मार्ग. कळवा-ऐरोली हा मार्ग चालू झाला तरच या समस्येवर बर्‍यापैकी उपाय सापडेल. अर्थात कळव्याला नव्याने समस्या उद्भवल्या नाहीत म्हणजे मिळवलं.

एसी बस योजना फ्लॉप गेली ना? >>>> मी तरी एसी बस भरुन (स्टॅण्डिंग नव्हे) जाताना पाहिल्या आहेत. त्या बस पीक अवर्सनाच असतात. मधल्या काळात बंद असतात.

एसी गाड्यांमध्ये रस्त्यावर कमी चारचाकी गाड्या उतराव्यात असा हेतू आहे का?>>> ज्यांना सद्ध्याचा पब्लिक ट्रान्स्पोर्ट नकोसा वाटतो त्यांच्यासाठी तो चांगला ऑप्शन ठरला तर उत्तम होईल.

खासगी कंपन्यांच्या एसी बसेस आल्या होत्या त्याबद्दल. त्या चारचाकीला पर्याय म्हणून होत्या बहुतेक.
बेस्टच्या लांब पल्ल्याच्या बसेस पॅक्ड असतातच. कमी अंतराच्या रिकाम्या धावतात.

आता या एसी गाड्यांसाठी नविन वेळापत्रक की जुन्या गाड्यांच्या वेळापत्रकांच्या जागी यांना आणणार ?
जसे. ३.५० ची बोरिवली-चर्चगेट या लोकल ऐवजी आता एसी लोकल धावणार. हे दुपारी वगैरे ठिक आहे. पण ऑफिसच्या वेळी लोकांची ठरलेली लोकल रद्द करुन एसी आणली तर लोकांना ती सोडुन दुसरी पकडावी लागणार सहाजिकच अजुन गोंधळ वाढणार. आणि इथे टिसी आहेत कुठे एसी गाडीत चढलेल्यांचे टिकिट चेकिंग करायला ? फुकटेच जास्त वापर करतील. धन्य आहेत

खासगी कंपन्यांच्या एसी बसेस आल्या होत्या त्याबद्दल.>> म्हणजे कुठल्या?

लोकांची ठरलेली लोकल रद्द करुन एसी आणली तर लोकांना ती सोडुन दुसरी पकडावी लागणार सहाजिकच अजुन गोंधळ वाढणार.>>> पण त्या गाडीच्या, मागच्या/ पुढच्या गाडीत नेहमी चढणार्‍या लोकांपैकी काही एसी गाडीत नाही का चढणार? म्हणजे गर्दी विभागली नाही का जाणार?

एसी लोकल ही देखिल सुविधा ठरु शकते. लोक्स रोडवरुन एसी लोकल्सवर शिफ्ट झाली रस्त्यावरुन जरा कमी वाहनं गेली तर ट्रॅफिक जामची समस्या कमी होईल ना? तसंच काही लोक एसी लोकल्स प्रिफर करतीलच. मुंबईत तरी वेळेची बचत करणारा रेल्वे हाच मार्ग आहे. कधी बाय रोड जायची वेळ आली तर पिसाटायला होतं ट्रॅफिकमध्ये अडकून. तिकडे घड्याळाचा काटा पुढे सरकत असतो आणि गाड्या ढिम्म हलत नाहीत. ऑफिसात अ‍ॅक्सेस कार्डला ट्रॅफिक जाम वगैरे कळत नाही.

गर्दीच्यावेळी इतर लोकल्सच्या मधे एसी गाडीची वेळ अ‍ॅडजेस्ट करुन सोडली तर काहीच प्रोब्लेम नाही जसे लेडीज स्पेशल लोकलसाठी केले होते पण आहे ती लोकल रद्द करुन तिच्याजागी जर एसी लोकल आणणार असेल तर काय उपयोग होणार आहे? समजा आहे ती लोकल १००० माणसांना घेउन जाते तर एसी लोकल १००० पैकी किती लोकांना घेउन जाणार? उरलेली माणसे मागिल लोकलवर भार वाढवणार.
या गोष्टीला सुविधा म्हणणार??

समजा आहे ती लोकल १००० माणसांना घेउन जाते तर एसी लोकल १००० पैकी किती लोकांना घेउन जाणार? उरलेली माणसे मागिल लोकलवर भार वाढवणार.
या गोष्टीला सुविधा म्हणणार??>>

समजा आहे ती लोकल १००० माणसांना घेऊन जाते, त्यातली ४०० माणसं एसी लोकलमध्ये चढली. आहे त्या लोकलच्या पुढची लोकल १००० माणसांना घेऊन जाते, त्यातली ४०० माणसं एसी लोकलसाठी लवकर आली आणि मागची लोकल १००० माणसांना घेऊन जाते, त्यातली ४०० माणसं एसी लोकलसाठी रेंगाळली, तर सांगा बघू ही सुविधा आहे की नाही?

जातील जातील भौ एसी लोकल्स पण भरुन. फक्त त्या पीक अवर्समध्ये ठेवायला हव्यात. ज्यांची सद्ध्याच्या रेल्वेप्रवासाची सहनशक्ती संपत आली आहे, वय वाढलं तरी नाईलाजाने रेल्वेनेच जावं लागतंय ते नक्की जातील. आमच्याच ऑफिसमध्ये आणि जवळपासच्या ऑफिसांमध्ये कितीतरी प्रायव्हेट बस सुरु केल्या आहेत लोकांनी. का? तर सुखाचा प्रवास व्हावा. हे लोक त्या पायी महिन्याला ५०००-६००० देतात. रेल्वेपेक्षा जास्त वेळ लागतो. पुन्हा त्या बसचं ठराविक टायमिंग असतं. ती बस गेली की जातात रिक्षाने किंवा ट्रेननेच. त्याऐवजी एसी ट्रेन्स झाल्या तर ह्या लोकांचा फायदाच आहे कारण त्यांना एक लोकल हुकली तर पुढच्या लोकलचा ऑप्शन आहे.

लेडिज स्पेशल नविन होती तेव्हा तीही रिकामी जायची. आताची अवस्था बघा! Happy

त्या मेट्रो बघा कश्या खचाखच भरुन जातात पीक अवर्सना Happy मला तर मेट्रो लई आवडलीय, गारेगार आणि सुम्कन वेस्टर्न्/सेंट्रल उड्या मारणारी Proud

लेडिज स्पेशल नविन होती तेव्हा तीही रिकामी जायची. आताची अवस्था बघा >> तिच्यासाठी वेळ अ‍ॅडजेस्ट केलेला हे विसरु नये.
आणि अतिरिक्त वेळेत एसी लोकल आली तर काहीच प्रोब्लेम नाही आहे. उलट चांगलेच आहे.

ओ दिवाकर देशमुख, अतिरिक्त वेळ कुठली हो? अशी वेळ नॉन ऑफिस अवर्सनाही मोठ्या मुश्किलीने असते. अश्या वेळी एसी लोकल असेल तर तिचा उपयोग कोणाला? ना रेल्वेला फायदा ना प्रवाश्यांना.

तिच्यासाठी वेळ अ‍ॅडजेस्ट केलेला हे विसरु नये.>> हे भगवान!
केश्वे, कळलं काय नक्की काय समस्या आहे ती? आता खरंच कामाला लाग.

अर्रे बाबा पण करतील की काहीतरी अ‍ॅडजस्ट. शेवटी त्यांनाच वेळापत्रक २४ तासांमध्येच बसवायचंय. त्यात रात्री २-३ तास ट्रेन्स झोपतात. लाईफलाईन आहे ती, तिच्यासाठी पॅसेंजर्सही तिला समजून घेतातच. फारच क्वचित अत्यंत चुकीचा असा 'दिवा' इन्सिडन्स घडतो.

तेच विचारले होते वेळ अ‍ॅडजेस्ट करुन करणार आहेत की लोकल रद्द करुन पण काहींना कळल तर ना Lol

Lol

तेच विचारले होते वेळ अ‍ॅडजेस्ट करुन करणार आहेत की लोकल रद्द करुन पण काहींना कळल तर ना >>>>> सगळं वेळापत्रकच पुन्हा बनवावं लागलं तरी काय हरकत आहे म्हणते मी? साधं घरात काही बदल करायचा असेल तर सगळ्यांचं शेड्युल आपण अ‍ॅडजस्ट करतोच की. मी नाईज्जा करत फुगून थोडीच बसतो?

Pages