फसलेल्या 'कास्टिंग'ची पिचकवणी 'दुनियादारी' (Duniyadari - Marathi Movie Review)

Submitted by रसप on 20 July, 2013 - 02:53

कॉलेज.… कट्टा.… चहा.… सिगरेट.…दोस्ती-यारी आणि जराशी भाईगिरी.… साधारण असं सगळं असलेली एक कविता, नवीन-नवीन कविता करायला लागलो तेव्हा मी लिहिली होती. कमी अधिक फरकाने असं कॉलेज अनेकांनी पाहिलेलं व अनुभवलेलं असावं, ह्याचा प्रत्यय काल थेटरात 'दुनियादारी' बघताना आला. अनेक पुस्तकं वाचायची बाकी आहेत, त्यापैकी सुहास शिरवळकरांचे मूळ पुस्तक - दुनियादारी - सुद्धा आहे. त्यामुळे चित्रपट जरी त्या पुस्तकावरून घेतला असला तरी मी त्याकडे स्वतंत्र नजरेने पाहू शकलो, अनुभवू शकलो.

तर होतं काय की, पुण्यात एक कॉलेज असतं. जिथे मुंबईहून एका मोठ्या उद्योगपतीचा एकुलता एक मुलगा श्रेयस तळवलकर (स्वप्नील जोशी) शिकायला येतो. कॉलेजात आल्याबरोबर त्याला एक 'फॅक्ट चेक' मिळतो. कॉलेजचा प्रस्थापित दादा दिगंबर पाटील उर्फ दिग्या उर्फ डीएसपी (अंकुश चौधरी) व कॉलेजचा (की बाहेरचा हे नीट नाही) दुसरा एक स्ट्रगलिंग दादा साई देढगावकर (जितेंद्र जोशी) ह्यांच्या दुश्मनीत तो सापडतो. जो 'उसूल'वाला दादा असतो, त्याच्या म्हणजे अर्थातच दिग्याच्या बाजूने श्रेयस जातो आणि त्यांच्यात यारी होते.
कॉलेज म्हटलं की दोस्ती-यारी, भाईगिरी येते तशीच प्रेमप्रकरणंही येतात. दिग्याची असते सुरेखा (ऋचा परियल्ली). आणि श्रेयस अडकतो शिरीन (सई ताम्हनकर) अन् मीनू (उर्मिला कानिटकर) दोघींत ! मध्ये मध्ये लुडबुड करायला साई आहेच. ही प्रेमप्रकरणं व भाईगिरी, ह्या सर्वांना बरीच दुनियादारी करायला लावते. ती काय काय आणि कशी कशी हे पुस्तकात किंवा चित्रपटात समजेल.

duniyadari.jpg

चित्रपटाच्या मुख्य पात्रांपैकी कुणीही कॉलेजवयीन वाटत नाही. दिग्या आणि साई नापास होऊनही पडून असतात, असं जरी मानलं तरी बाकीच्यांचं काय ? स्वप्नील जोशीला स्वेटर घातल्याने तो आणखीच तुंदिलतनु दिसतो. काही कॅमेरा कोनांतून त्याने विग घातला असावा असाही संशय आला. सई ताम्हनकर जितके कमी व घट्ट कपडे घालते तितकी ती मराठीतली भक्कम सोनाक्शी सिन्हा वाटते. चित्रपट म्हाताऱ्या सईच्या फ्लॅशबॅकमध्ये घडतो. त्या वयस्कर शिरीनच्या भूमिकेत ती अधिक शोभते. जितेंद्र जोशी नकारात्मक भूमिकेत असल्याने त्याला किळसवाणा दाखवला असावा. तो तसा दिसतो. विचित्र वाढलेलं पोट, पिंजारलेले केस आणि ती ओठांवरून जीभ फिरवायची स्टाईल ह्या सगळ्यामुळे तिरस्करणीय साई व्यवस्थित उभा होतो. अंकुश चौधरी 'स्टाइलिश भाई'च्या भूमिकेत आणि उर्मिला कानिटकर कॉलेजवयीन तरुणीच्या भूमिकेत 'त्यातल्या त्यात' फिट्ट वाटतात. स्व. आनंद अभ्यंकर, उदय सबनीस, वर्षा उसगांवकर, उदय टिकेकर, संदीप कुलकर्णी आणि नागेश भोसले छोट्या छोट्या भूमिकांत आहेत. फक्त दोन किरकोळ सीनमध्ये असलेला नागेश भोसले अक्षरश: पडदा खाऊन टाकतो. सुशांत शेलारला काहीच काम नाही.

शिरीन मेडिकलची विद्यार्थिनी दाखवलेली असताना ती ह्या दुसऱ्याच कॉलेजात का येत असते ? तिच्या आगमनाला ती फाडफाड इंग्रजी का झाडते ? ती काही परदेशातून वगैरे आलेली नसते !
तिला मेडिकलवाली दाखवण्याचं कारणच काय ? - हे चाणाक्ष प्रेक्षकाला कळायला वेळ लागत नाही. किंबहुना, ती डॉक्टर होणार असल्यामुळे तिचं कहाणीत अपरिहार्य असलेलं कर्तव्य ती जेव्हा करते, तेव्हा काहीच आश्चर्य वाटत नाही. खरं तर एक अंगावर येऊ शकणारा शेवट केवळ पिचकवणी सादरीकरण व पोकळ पटकथेमुळे फुसका बार निघतो.

श्रेयस मीनूला समजावतानाचा संवाद वगळता बाकी संवाद फक्त परिस्थितीजन्य निर्मिती असावीत असे वाटतात. द व्हेरी फेमस 'तुझी माझी यारी, तर #@त गेली दुनियादारी' हे मला तरी काही विशेष वाटलं नाही.

एका दृश्यात, बहुतेक अंकुश किंवा कुणी तरी दुसरा, 'व्हेस्पा'वर बसलेला दाखवला आहे. दोन-एक सेकंदाचं दृश्य.. ही 'व्हेस्पा' सध्याची 'प्याज्यो' कंपनीने आणलेली व्हेस्पा आहे. ही 'छोटीशी' चूक निश्चितच नाही. जुन्या काळाची वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या काळच्या गाड्या दाखवणं अतिशय महत्वाचं असतं. चांगल्या चित्रपटनिर्मितीसाठी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष पुरवायलाच हवे.
गाणी त्रास होणार नाही, इतपत श्रवणीय नक्कीच आहेत. 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया..' चांगलं जमलं आहे. 'देवा तुझ्या गाभाऱ्याला..' हे फेसबुकमित्र मंदार चोळकरचं गाणंसुद्धा चांगलंच जमून आलं आहे.

मराठीत चांगल्या कलाकारांची वानवा कधीच नव्हती. सर्वच बाबतीत मराठी चित्रपट वेगवगेळे प्रयोग करताना कधीच मागे राहिला नाही. आता चांगली प्रोडक्शन हाऊसेससुद्धा मराठीत आली आहेत. ह्या सगळ्याचं भान ठेवून पडद्यावरील कलाकारांनी स्वत:ला प्रेझेंट करतानाही पारंपारिकता दूर करायला हवी. कहाणीची गरज म्हणून जीवापाड मेहनत घेऊन शरीर बनवणारा एखादाच नटरंग अतुल कुलकर्णी मराठीत दिसतो. बाकी लोक कुठलीही व्यक्तिरेखा असो, शारीरिक मेहनत घेत नाहीत असंच वाटतं. कॉलेजची कहाणी असतानासुद्धा फुगीर शरीरयष्टी घेऊन हे लोक कसे काय वावरू शकले, कळलं नाही. सुरुवातीच्या एका दृश्यात अंकुश चौधरीला धावताना पाहिल्यावर जाणवतं स्लिम-ट्रिम असला तरी ते पुरेसं नाही, इतकं ते कृत्रिम वाटतं. दुनियादारी 'कास्टिंग'मध्ये जबरदस्त फसला आहे. ह्या कथेसाठी तरुण, तजेलदार चेहरे खूप आवश्यक होते. ओबडधोबड थकेल चेहरे आणि बेढब शरीरं ह्यांमुळे ही 'दुनियादारी' अस्सल वाटत नाही.

एकंदरीत, पिचकवणी सादरीकरण आणि पूर्णपणे वाया घालवलेला शेवट इतकंच अडीच तासानंतर लक्षात राहातं आणि वाटतं, नसता पाहिला तरी चाललं असतं.

रेटिंग - * *
http://www.ranjeetparadkar.com/2013/07/duniyadari-marathi-movie-review.html

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही सर्वजण (जे पुस्तक पण चांगले नाही) असे म्हणत आहेत ते बर्‍याच अलिकडच्या पिढीतले असाल असे वाटते.

कारण पुस्तक ज्या काळात लिहिले गेले त्या काळात ते गाजण्याचे कारण म्हणजे तेव्हाच्या अनेक कॉलेजवयीन लोकांना ते अगदी आपलेसे वाटले होते. रादर इतर पुस्तकांपेक्षा देखील दुनियादारी जास्त खुप जास्त गाजले सुशिंचे.
तुम्हा लोकांना ते आता छान वाटणार नाही कारण आताच्या काळाला ते कमी अ‍ॅप्लिकेबल आहे.

मी या पुस्तकासाठी जीव टाकणारे लोक पाहिले आहेत.
सुशिंशी दुनियादारीबद्दल बोलायला मिळावे म्हणुन धडपडणारे लोक पाहिले आहेत.
खुद्द सुशि असते तर त्यांनादेखील चित्रपट खुप चांगला झाला आहे असे वाटले नसते.
मालिकेची खंत त्यांनी आधीच बोलून दाखवली होती.

पु.लं.चे नारायण, हरितात्या, रावसाहेब, इ. पात्रे आजकाल कोणाला सहजी कळणार नाहीत.
तुझे आहे तुजपाशी आता जर पाहिलात प्रयोग तर तो आजच्या काळाला फारसा अ‍ॅप्लिकेबल नाही.
पण त्यामुळे या कलाकृतींनी एक काळ फार गाजवला होता तेवढे तरी मान्य करायला हरकत नसावी.

महेश, मी याच पिढीतली आहे की Uhoh
मला पुस्तक आवदलं आणि आत्ताही थोडासा बदल केला तर रिलेट झालंच Uhoh

तुम्हा लोकांना ते आता छान वाटणार नाही कारण आताच्या काळाला ते कमी अ‍ॅप्लिकेबल आहे.
>>
अमान्य!
दुनियादारी थोडीशी बदलते नाहीशी होत नाही Happy

पु.लं.चे नारायण, हरितात्या, रावसाहेब, इ. पात्रे आजकाल कोणाला सहजी कळणार नाहीत.
>>>>
अरेरे!
आय हेट सच सेंटेंन्सेस!

पु.लं.चे नारायण, हरितात्या, रावसाहेब, इ. पात्रे आजकाल कोणाला सहजी कळणार नाहीत.>>>>>>>>>. काहीही.....ही पात्रे कितीही जुनी असली तरी अजुन जिवंत आहेत...ही तीनच का नंदा प्रधान, भय्या नागपुरकर अशी अनेक पात्रे कितीही वेळ वाचली तरी मन भरत नाही.....अलिकडच्या आणि पलिकडच्या पिढीचा संबंध काय....
आजच्या काळाला एखादे पुस्तक किंवा साहित्य अ‍ॅप्लिकेबल असते वा नसते हे पुलंना वाचले की कळते....सुशींची दोन तीन पुस्तकं वाचलीत बरी वाटली....प्रॉब्लेम लेखका बरोबर नाही तर अमुक एक कथे बद्दल आहे अस म्हणतोय आम्ही....
मी ही याच पिढीतली आहे पण त्याचा संबंध नाही.....जुने चांगले मुव्ही तरी कुठे आजच्या सारखे आहेत तरी ते आपले आवडते असतात... नै का???

>>पु.लं.चे नारायण, हरितात्या, रावसाहेब, इ. पात्रे आजकाल कोणाला सहजी कळणार नाहीत.
>>अरेरे!
>>आय हेट सच सेंटेंन्सेस!

कटू असले तरी सत्य आहे हे Sad

उदय तुला पण आवडतो ना हा मुव्ही... डोळा मारा आणि सई पण. >>>>>>> चल काहीही काय....

मी बघितला सुद्दा नाही........आनि सई आवडायला माझे इतके ही वाईट दिवस आले नाही .. अजुन ऐश्वर्या जिवंत आहे Wink

कटू असले तरी सत्य आहे >>>>>>>>. काही कटु बिटु नाहीये,....तुम्हालाच अस वाटतय की हे कोणाला कळत नाही आजच्या पिढी मधे.......बाकीच्यांना नाही

ओह्ह्ह.....उदय....तुला ऐश्वर्या आवडते???? दुसरी छान कोणी नाही आहे का बॉलिवूड मधे...... हाहा....

>>तुम्हालाच अस वाटतय की हे कोणाला कळत नाही आजच्या पिढी मधे.......बाकीच्यांना नाही
ओके कळत असेल तर चांगलेच आहे Happy

त्या सई चे डोळे मला काहितरी विचित्र वाटतात...बटाट्या सारखे आहेतच पण नॉर्मल लोकांपेक्षा तीचे डोळे फार जवळ जवळ आहेत..>> अनिश्का, तिचे डोळे बोक्यासारखे आहेत, गोल. तिला मिश्या लावल्या तर चेहरा पण तसाच वाटेल बहुधा.

हायला सईच्या सौंदर्यावर अश्या कॉमेंट्स... Uhoh

मी तर दुसर्‍यांदा सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा तिच्या छोटाल्या स्कर्टवाल्या मोठाल्या पोस्टर बरोबर फोटो ही काढून घेतला होता... बस्स लोकलज्जेस्तव फार भारी पोज वगैरे दिली नाही एवढेच ..

हायला सईच्या सौंदर्यावर अश्या कॉमेंट्स... >ती तुला सुंदर वैगरे वाटत असेल तर, तिच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेन्ट्स समज Happy

अनिश्का. | 17 February, 2014 - 14:58 नवीन
त्या सई चे डोळे मला काहितरी विचित्र वाटतात...बटाट्या सारखे आहेतच पण नॉर्मल लोकांपेक्षा तीचे डोळे फार जवळ जवळ आहेत....

>> अगदी अगदी... माझंही डिट्टो हेच निरिक्षण आहे तिच्याबाबत !

महेश दादा,

तुमचा 'तुम्ही सगळे जण....' वाला प्रतिसाद 'दुनियादारी' व 'सुशि' दोघांची अकारण तरफदारी करण्याचा एक अत्यंत केविलवाणा प्रयत्न वाटला, क्षमा करा.

पु.ल. आणि सुशि, पु.लं.ची व्यक्तिचित्रणं आणि सुशिंचं लेखन ह्यातली तुलना तर अत्यंत दुर्दैवी वाटली.

दुनियादारीत (पुस्तक) असे 'का ही ही' नाही, जे आमची किंवा कुठलीही पिढी जगली नाही. अनेक लोक ह्या पुस्तकाची व सुशिंची स्तुती ऐकून घेतात कारण त्यांना वाद करायचे नसतात, पण प्रत्यक्षात एक मोठा वर्ग असा आहे जो 'सुशि म्हणजे लोकल, बसमध्ये ऑफिसला जाताना चाळण्यासाठी लिहिणारे एक पुस्तकलेखक, ज्यांची पुस्तकं एकदा वाचून ठेवून द्यायची' असे मानतो.
ऑन द अदर हॅण्ड, आमच्याच काय, आमच्याही आधीच्या पिढीतल्याही बहुतेकांनी न पाहिलेली पु.लं.च्या व्यक्तिचित्रणातली पात्रं आजही जिवंत वाटतात. (शाळेत असतानापासून आजपर्यंत मला 'अंतू बर्वा' पाठ आहे.)

साधी गोष्ट आहे. तुम्हाला पुस्तक आवडलं, ते मी स्वीकारतो. कारण तो तुमचा लुकआऊट आहे. पण जर मला ते पुस्तक साधारण वाटलं, तर तो माझा लुकआऊट आहे, असे तुम्ही का स्वीकारत नाही ? ते मला का आवडलं नाही, ह्याची स्पष्टीकरणं का द्यावीत..??

ती तुला सुंदर वैगरे वाटत असेल तर, तिच्या सौंदर्यावर कॉम्प्लिमेन्ट्स समज..
>>>>>>>
हो खरे तर ते बोक्यासारखे दिसणे कॉम्प्लीमेंट पण असू शकते, कारण मी कित्येक मुलींना मांजरीबोक्यांची चित्रे वा खरीखुरी पिल्ले पाहून ओह सो क्यूsट करत किंचाळत लाडात येताना, त्यांच्या गालांशी वगैरे खेळताना पाहिलेय. इथेही थोडे फार तसेच चित्र डोळ्यासमोर आणू शकतो तर.. Happy

कालपरवा कोणत्यातरी अ‍ॅवॉर्ड फंक्शनमध्ये देवा तुझ्या उंबर्‍याला ह्या गाण्याला काहीतरी पारितोषिक मिळाले.

ते पाहून मला पुन्हा आठवले की हे गाणे दुनियादारी या चित्रपटात वाट्टेल त्या प्रसंगी ऐकवलेले असून मुळात व्यक्तिरेखांच्या शहरी रंगालाही ते शोभत नाही. अचाट कल्पनाशक्ती आहे ही! Angry

रसप, अरे मी समजू शकतोच की एखादी कलाकृती (पुस्तक, चित्रपट, इ.) एकाला आवडली तर दुसर्‍याला नावडू शकते.

पण तुझे जे म्हणणे आहे की
>>पण प्रत्यक्षात एक मोठा वर्ग असा आहे जो 'सुशि म्हणजे लोकल, बसमध्ये ऑफिसला जाताना चाळण्यासाठी लिहिणारे एक पुस्तकलेखक, ज्यांची पुस्तकं एकदा वाचून ठेवून द्यायची' असे मानतो.

ते मानायला मन तयार नाही. कारण महाराष्ट्रातली एकही लायब्ररी नसेल की जिथे सुशिंचे पुस्तक नव्हते.
एवढेच नव्हे तर असंख्य ठिकाणी प्रतिक्षा यादी असायची.

पु.लं. आणि सुशि अशी तुलना करण्याचा कोणताच इरादा नव्हता. पु.लं.च्या लेखनाचा मी पण चाहता आहेच. तरी देखील त्यांचे लिखाण आता अ‍ॅप्लिकेबल नाही असे म्हणतो त्याचे कारण त्यांनी रेखाटलेली पात्रे आता सहजासहजी आजुबाजुला उपलब्ध नाहीत. कंत्राटी लग्नाच्या जमान्यात नारायण दाखवू म्हणल्यास दाखवता यायचा नाही. नवरा नवरी ओळखु आले तरी खुप.
तुझे आहे तुजपाशी चा प्रभाव त्या काळात पडणे साहजिक होते कारण तेव्हा विनोबांसारखे लोक अस्तित्वात होते. त्यामुळे लोक चटकन रिलेट करून एन्जॉय करू शकत होते.

असो हे असे होणार, होत राहणार, कालाय तस्मै नमः

रसप, इब्लिस, दोघांनाही प्र चं ड अनुमोदन!!!!

आधी मी अशी मत मांडली, तेव्हा सगळे भांडत तुटून पडले होते. अर्थात मी जास्त चिडून लिहील होत. पण आपण आपले पैसे अस काही तरी फालतू वाचण्यात घालवले म्हणाल्यावर पश्चात्ताप हा होणारच न!!!

कंत्राटी लग्नाच्या जमान्यात नारायण दाखवू म्हणल्यास दाखवता यायचा नाही. <<<< हल्ली ईव्हेंट मॅनेजर हाच तर नारायण असतो. नाव बदललं तरी पात्रं तीच राहतात. Happy

मला दुनियादारी आवडतं. फार काही अभिजात अथवा उच्च साहित्यकृती मूल्य असलेले वगैरे पुस्तक नाहीच्चे. साधे सरळ वाचावे असले पुस्तक आहे. आयुष्याच्ये गहनगंभीर तत्त्वज्ञान आणि जीवनविषयक मूल्ये वगैरे त्यात शोधायला गेलात तर धाडकन आपटाल. (पण तरीही) आजच्या कॉलेजवयीन मुलांना ते पुस्तक भावणं जरा कठीणच आहे.

सिनेमा एखाद सीनपुरता टीव्हीवर पाह्य्ला, तोदेखील अजिबात आवडला नाही. कारणं काहीही असोत.

११

Pages