आहारातून आरोग्याकडे..

Submitted by हेम on 21 March, 2012 - 12:07

ऑक्टो. २०१० मध्ये पावसाळ्यात बंद असलेलं जॉगिंग सुरु केलं तेव्हा वजन होतं ६५ किलो. साधारणपणे दररोज ६ कि.मी. आरामात धावणं व्हायचं. मार्चात उन्हाच्या चाहुली तिव्र व्हायला लागल्या की जॉगिंग थांबायचं. जेवणामध्येही बदल नाही. दरवर्षीचा हा सरासरी परिपाठ. आता डोंगर चढायचा खुळा छंद असल्याने, व हा सिझन भटकण्याचा असल्याने शारीरीक क्षमतेसाठी हे पाळावं लागायचं. ही क्षमता कमी पडली तर ट्रेकमध्ये 'बघणं' कमी व दमणं जास्त होतं. मार्चात जॉगिंग थांबवलं तेव्हा वजन झालेलं ६९ किलो... !!
मी चक्रावलो. खाण्यात बदल नाही. जंक फुड -कोल्ड्रिंक्स-हॉटेलिंग वगैरेंना फाट्यावर मार देऊनही हे असं कां ते कळेना! ऑगस्ट २०११ - वजन ७३ किलोवर गेलं. आता स्वतःमध्ये होणारे बदल टिपायला सुरुवात झाली होती. यावर्षी अॅसिडीटीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती, केस गळायला सुरुवात झालेली.., सूर्य वर येतांना मानेकडून वरपर्यंत डोकेदुखीही चढत यायची. ..अशी अवस्था! बरं, अॅसिडीटीवर आजूबाजूला कोणाला सल्ला विचारणार? डॉक्टरांपासून सगळेच जाडजूड! ..आणि प्रत्येकजण सल्ला देतांना दुसर्या कोणाकडून तरी ऐकलेला किंवा डॉकने दिलेला सल्ला पुढे सुपुर्द करायची. आता चाळीशीत आलायस,.. असं चालायचंच आता हळूहळू! वगैरे नकारात्मक रडे सल्ले तर खूपच!! ..आणि प्रॉब्लेम प्रत्येकाला, पेक्षा घरातल्या प्रत्येकाला तरी!!
* * *

ऑक्टो. २०११ मध्ये दिवाळीच्या आधी एका मित्राने त्याच्याकडे बोलावलं.- '.. मुंबईचे एक माधव जोशी म्हणून एक न्युट्रीशिअन आहेत. .त्यांचं १ तासाचं आहार व आरोग्य या विषयावर बोलणं आहे, तेव्हा तू ये. ' म्हटलं येतो. गेलो. त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी कांय खावे यापेक्षा कांय खाऊ नये आणि ते कां खाऊ नये हा भाग स्पष्ट केला. त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
६ गोष्टी पुर्णपणे बंद करा, पेक्षा गटारात फेका.
१) साखर २) चहा/कॉफी ३) सर्व बेकरी पदार्थ ४) रिफाइंड तेल ५) लोणचं ६) पापड. आणि हे कां खाऊ नका हे त्यांनी वेगळ्या पद्धतीने विषद केलं त्याकडे नंतर येऊच..!!

मी मुळांत प्रचंड गोड खाणारा. Happy मस्तपैकी लालसर होईपर्यंत खरपूस भाजलेल्या बेसनाचा एक लाडू मी कधीच खाल्लेला नाही.. एकावेळी जोडी लागायची. Happy साहजिकच माझ्या मर्मावरच हा माणूस घाला घालतोय म्हटल्यावर मी व्याख्यानानंतर अर्धा-पाऊण तास या न खाण्याच्या पदार्थांवरून त्यांच्याशी काथ्याकूट केला, विशेषतः साखरेवरुन! त्यांनीही माझे समाधान होईपर्यंत व्यवस्थित उत्तरे दिली पण जीभेच्या मेंदूचे काही समाधान होत नव्हते. Happy माझे बॉडी पॅरॅमिटर्स काढले. बहुतेक सगळे सीमारेषेवर.. ओलांडली नसली तरी माझ्यासाठी तो धक्काच होता.
झालं! त्या मिनिटाला मी साखर, चहा/कॉफी, सगळे बेकरी पदार्थ, लोणचे व पापड यांना माझ्या जीभेपासून तलाक दिला. रिफाईंड तेलावर माझा डायरेक्ट कंट्रोल नसल्याने त्याला शक्य तितके नाही या वर्गात ठेवले.
घरी आल्यावर हा निर्णय सांगितला. माझ्यापुरता मी पाळणार, तुम्हांला त्रास नाही असं जरी सांगितलं तरी माझ्या या निर्णयाचा घरात कुठेतरी परिणाम होणार होताच. दिवाळीचा सगळा फराळ घरात तयार होता. पण तिथे मी जीभ जिंकली. हे पदार्थ पूर्ण बंद केल्यावर पहिले दोन दिवस डोकेदुखीचा प्रचंड त्रास झाला. आता या त्रासाचं शास्त्रीय कारण मला सांगता येणार नाही. दिवाळी संपल्यावर मी आधी किती साखर/ गोड खायचो ते उरलेल्या पदार्थांवरुन लक्षात येतच होते. खरा त्रास कंपनीत होणार होता. सर्व सहकार्यांबरोबर दिवसभरांत त्यांच्या चहाच्या वेळी, जेवतांना त्यांना माझी बाजू समजावून सांगतांना पार कावायला व्हायचं. कारण याचा नेमका परिणाम कांय नी कधी माहित नव्हतं. कॅलेंडरच्या तारखेवर पहिल्या दिवसापासून 'खाल्ले नाही' म्हणून फुली मारायला लागलो. सलग फुल्यांचे दिवस वाढत गेले तशी स्वतःशी कमिटमेंट पक्की होत गेली. बाकी माझ्या जेवणांत काही बदल नव्हता. जॉगिंगही नियमित सुरु होते.
४३ वा दिवस. मी बाबांना (वडीलांना) घेऊन नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. तिथल्या वजनकाट्यावर वजन केलं. ७१ किलोग्रॅम.....!! आनंदाने उडीच मारली. आधी माधव जोशींना फोन लावला. ते हसत म्हणाले.."उतरवली की नाही तुझी चरबी..!! नुसत्या या ६ गोष्टी बंद करुन एवढा फरक पडला, आता मी सांगेन तसं खायला लागल्यावर तुझी घडी नीट बसेल की नाही बघ..परवा नाशिकला येतोय, तेव्हाच तुझे पॅरामिटर्स काढूया! " मलाही त्याबद्दल जाम उत्सुकता लागली. ते आल्यानंतर पॅरॅमिटर्स काढले, ते खाली देतोय. कंसामध्ये नंतरचे म्हणजे पहिल्या ४५ दिवसांत बदललेले पॅरामीटर्स. आता तर आणखी सुधारीत आहेत.
वजन- ७५.४ (७०.९)
चरबी %- २६ (२१.२)
स्नायू %- ५३ (५२.८)
पाणी %- ५२ (५६)
व्हिसरल फॅट %- ९ (७)
मेटॅबोलिक वय- ५५(४०)
फिजिक रेटींग- २ (५)
बोन मास- २.८ (२.८)

यावेळी त्यांना प्रश्न केला की एका महिन्यांत एकदम ४.५ किलो वजन कमी होणं कितपत योग्य, त्यांवर "ही अनावश्यक चरबी गेलीय. आता यापुढे १ किलोसाठीसुद्धा तुला किती घाम गाळावा लागेल हे लवकरच कळेल तुला!" असं सांगून त्यांनी स्नायू वाढवण्यासाठीचे व्यायाम आणि शिफ्टच्या वेळेप्रमाणे कसा आहार घ्यायचा ते सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा जिन्नस वाण्याच्या दुकानांत व भाजी मंडईत मिळणारा. आता सध्या मी या ६ गोष्टी+प्रिझर्वेटीव्ज्+कृत्रिम रंग असलेले पदार्थ टाळूनही मस्त चमचमीत खातोय. अगदी गोडासकट. कारण साखरेऐवजी सेंद्रिय गूळ, रिफाइण्ड तेलाऐवजी घाण्याचं किंवा फिल्टर तेल, चहाऐवजी गुजराथी लोकांकडे असतात ते उकाळे वापरायला हरकत नाही असं माधव जोशी सांगतात. पण हे ऑप्शनसुद्धा कशाला हवेत तर शेवटी आपल्याला हे आजीवन पाळायचे आहे म्हणून. माझ्या बदललेल्या पॅरामीटर्सचा कागद पाहून आता माझ्या कुटुंबातच कांय, पण गंमत करणार्या सहकार्यांनीही या गोष्टी पाळायला सुरुवात केली आहे व त्यांनाही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. माझ्या एका पन्नाशीच्या मधुमेही व गोळ्या सुरु असलेल्या सहकार्याची उपाशीपोटी साखर नेहमी १५० ते १६० यायची. त्याने या गोष्टी वर्ज्य केल्यावर एका महिन्यांत ती ११८ पर्यंत उतरली. त्याला आता डॉक्टरांनी गोळ्यांचा डोस परत नीट ठरवण्यासाठी बोलावणे केले आहे. त्याचेही बाकी खाणे व्यवस्थित सुरु आहे.
माझी अॅसिडीटी पहिल्या १० दिवसातच गेली. वजन ६७ वर स्थिर आहे. आता थोडे वजन वाढवायचे आहे पण स्नायूंचे.
वाढलेल्या ढेरीचे आता सपाट पोटांत रुपांतर झाल्याने Rock Climbing चा आता मी पुन्हा आनंद घ्यायला लागलो आहे. उर्जा क्षमता (एनर्जी लेव्हल) खूप वाढली आहे. एकूण सध्या आरोग्यदायी चाललंय!

आता या माधव जोशींबद्दलची थोडी माहिती देतो...
श्री. माधव जोशी बँकेत नोकरीला होते. रसायनशास्त्राचे पदवीधर. १९८२ च्या सुमारास ते नाना पालकर स्मृती समितीत रुग्णसेवा करत असत. त्यावेळी अनेक व्याधींनी ग्रस्त रुग्ण आणि त्यामुळे ग्रस्त त्यांचे कुटुंब बघून आपण कधीच 'रुग्ण' व्हायचे नाही अशी खुणगाठ त्यांच्या मनाशी बांधली गेली. पण...वयाच्या पन्नाशीच्या आधीच गुडघे, कंबर व पाठ्दुखी सुरु झाली. साहजिकच डॉक्टरांनी बरीच बंधनं घातली. आरोग्याचा शोध घेता घेता स्वतःच अनारोग्याच्या मार्गाला लागले. आपले आरोग्य परत मिळवण्यासाठी त्यांनी नाना तर्हेचे सगळे उपाय करुन पहिले पण तात्पुरता परिणाम दिसे, परत ये रे माझ्या मागल्या किंवा आणखी काही तरी नविन उद्भव! योगासने, रेकी, आहारशास्त्र, निसर्गोपचार, प्राणायाम, कपालभाती या सगळ्या गोष्टींचा प्रयोगशील अभ्यास या दरम्यान झाला. सरतेशेवटी ते एका निष्कर्षाप्रत आले, तो म्हणजे आपल्या रक्ताचा पी.एच.

त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
"आपल्या आरोग्याचा संबंध आपल्या रक्ताच्या ७.४ या पी.एच. शी आहे. पी.एच. म्हणजे power of hydrogen. म्हणजे एखाद्या द्रवातील हायड्रोजन आयनची संख्या. ते ० ते १४ या रेंजमध्ये मोजलं जातं. '०' ph म्हणजे अत्यंत अॅसिडीक- '७' ph म्हणजे उदासिन आणि '१४' ph म्हणजे अल्कली. आपल्या रक्ताचा ph '७.४' म्हणजे किंचित अल्कली आहे. आपल्या शरीरात चालू असलेल्या चयापचय व श्वसन क्रियेमुळे रक्ताचा ph सतत प्रभावित होत असतो. ph कमी झाला तर त्याला अॅसोडोसिस म्हणतात. जास्त झाला अल्कलॉसिस म्हणतात. पैकी आपण अॅसिडोसिसचाच विचार करुया. या प्रकारात ph कमी होऊन अॅसिडचं प्रमाण वाढतं. निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या असंतुलनाला नियंत्रित करण्यासाठी निसर्गानेच शरीरात पुरेशी व्यवस्था केलेली असते पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या अंसंतुलनात बरीच भर टाकत असतो, ती अशी-
१- अॅसिडोसिस निर्माण करणारं अन्न (मांस, मासे, अंडी, डाळी, धान्ये) यांचा अतिरेक व दूध, फळे, भाज्या, मोड आलेली धान्ये, नाचणी या अल्कली अन्नाचं कमी सेवन.
२- साखर, वनस्पती तूप, शितपेयं, चहा, दारु, तंबाखू यांचं सेवन
३- अॅसिडोसिस निर्माण करणारी औषधे सेवन
४- प्रिझर्वेटिव्ज, कृत्रिम रंग असलेलं अन्न सेवन
आणि इथे गडबड होते.
आता साखर कां नको?
साखर कशी बनते हे सामान्यपणे कुणालाही माहित नसतं. साखरेमध्ये तिच्या पचनासाठी लागणारे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व फॉस्फरस हे ३ घटक नसतात. उसाच्या रसात किंवा सेंद्रिय गुळांत ते असतात. उसाच्या रसाची ज्यावेळी साखर बनवतात त्यावेळी त्यांत फॉर्मल डिहाईडसारखी घातक रसायने मिसळली जातात. यामुळे हे ३ घटक साखरेतून नष्ट होतात. अशी साखर पोटांत गेल्यावर पचनासाठी लागणारे हे घटक आपल्या शरीरातून घेतले जातात. उदा. कॅल्शिअम हाडांतून नाहीतर दातांतून घेतले जाते. परिणामी हाडे/ दात लवकर ठिसूळ होतात. मात्र एवढा उपद्व्याप करून साखरेपासून शरीराला काहीही फायदा मिळत नाही. कर्बोदके इतर खाण्यातून मिळतातच की!
आपल्या जेवणात ८०% अॅसिडीक व २०% अल्कली पदार्थ असतात. ते प्रमाण उलट करायचं म्हणजे २०% अॅसिडीक व ८०% अल्कलाईज्ड. ते कोणते ते वर १ नं.च्या मुद्द्यांत आलं आहेच. "
माधव जोशींनी या विषयावर 'सात पुर्णांक चार दशांश' या नांवाचं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. त्यांतही या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत.

तळटीपः लेख थोडा विस्कळीत वाटेल. अनुसरुन बरेच विषय आहेत. थोडक्यांत मांडण्याचा प्रयत्न केलाय. या विषयांतील अनेक तज्ञ इथेही आहेत. त्यांच्याही सूचना/ मार्गदर्शन मिळेल. उदा. इथे उल्लेखलेल्या आहारासंबंधी, साखर-रिफाइण्ड तेल कसे बनते? त्यांत रसायने मिसळतात कां? त्यांचा शरीरावरील परिणाम वगैरे माहिती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'सात पूर्णांक चार दशांश' मिळतं का पाहते आता.
पुण्यात येतात का माधव जोशी? कन्सल्टेशन करतात का?

छान...

हेम फार सुरेख माहिती देतो आहेस.

एक महत्वाचा प्रश्न :
ग्रीन टी घ्यावा असं म्हणतात. त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे ?
मी कधीच चहा घेत नाही. रोज सकाळी एक कपभर दूध, साखर न घालता घेते. पण कोणीतरी सांगितलं की त्या दुधापेक्षा साखर, दूध न घालता, मध घालून ग्रीन टी घेतला तर वजन कमी होण्यास मदत होते.

ह्यात कितपत तथ्य आहे ?

ग्रीन टी भारतात अजून तितकासा लोकप्रिय नाही. पण बिन दूधाचा आणि बिन साखरेचा ग्रीन टी नक्कीच चांगला.
माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे टी (काढा या अर्थी, चहा नव्हे) असतात. सध्या नीम,
दालचिनी, हिब्बी (अंबाडीची बोंडे), लाईम, ऑरेंज असे वेगवेगळ्या स्वादाचे चहा आहेत. सकाळी उठल्याबरोबर यापैकी एक चहा, मला तरतरी देतो. यात मी दूध, साखर, मध यापैकी काहीच टाकत नाही. यांच्या चवीपेक्षा (ती वाईट नसते) गंध मनाला तरतरी देतात.

दिनेश..........अरे मी कधीच चहा पीत नाही त्यामुळे मनापासून नको वाटतं. पण काही लोकांनी मुद्दाम प्यायला सांगितला वजन कमी करायला. म्हणून विचारतेय हे कितपत खरं आहे.

थोडंफार मेटॅबोलिसम फास्ट वगैरे होत असेल पण असं अगदी लक्षात येण्याइतपत कुठलाच (लिगल) पदार्थ खालल्यावर /प्यायल्यावर वजन घटवू शकत नाही.

व्हेसरल फॅट..
लिव्हरच्या भोवताली साठलेली चरबी म्हणजे हे फॅट. बाहेरुन दिसुन येत नाही. म्हणजे बारीक व्यक्तीचे व्हेस. फॅट जास्त असू शकते किंवा ढेरी असलेल्या व्यक्तीचे कमीही असू शकते. व्हेसरल फॅट १०% पेक्षा जास्त असेल व बॉडी फॅट ३०% पेक्षा जास्त असेल तर कुंडलीत ह्र्दयरोगाचा झटका लिहिलेला आहे. आता व्हेसरल फॅट वाढण्याची कारणे पाहू..
महत्त्वाचे १ ले कारण म्हणजे दारु पिणं. दारुने लिव्हर खराब होऊन म्येला, म्हणजे व्हेसरल फॅट वाढलेले असते.
२ रं कारण अवेळी जेवण.
३ रं कारण म्हणजे पाणी पिण्याच्या सवयी. जेवतांना तांब्याभर पाणी प्यायचं, त्यानंतर एकदम पुढच्या जेवणावेळी. या सवयीने व्हेसरल फॅट वाढतं.
व्हेसरल फॅट कमी करण्यासाठी साधे घरगुती उपाय म्हणजे..
दारु सोडा- जेवण वेळेवर घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे दर तासाला अर्धा ग्लास तरी पाणी पोटात गेलंच पाहिजे.

माहितीपूर्ण सुंदर लेख. माझ्या एका मित्राने हा लेख वाचताच श्री. माधव जोशींना फोन करुन ते पुस्तक मागवले आहे. मनापासून धन्यवाद हेम.

हेम,

तुमचे पहिले पोस्ट हे शास्त्रिय आणि छद्मशास्त्रिय (pseudo scientific) गोष्टींची सरमिसळ आहे.
काही गोष्टींना शास्त्रिय आधार आहेत तर काहींना अजिबात नाहीत.

व्हिसरल फॅट वरचे पोस्ट मात्र अगदीच चुकीचे आहे.
दारू पिण्याचा, अवेळी जेवण्याचा आणि पाणी वारंवार न पिण्याचा आणि व्हिसरल फॅट वाढण्याचा संबंध कळला नाही. मेयो क्लिनिकच्या वेबसाईटवर असलेले हे व्हिसरल फॅट्वरचे हे दुवे बघा.
http://www.mayoclinic.com/health/belly-fat/MC00054
http://www.mayoclinic.com/health/belly-fat/WO00128

शरीरातील चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय अनेक लोक सांगतात पण शास्त्रिय आधार असलेला एकमेव उपाय म्हणजे कमी आणि परिपूर्ण आहार खा आणि व्यायाम करा. बाकीचे सर्व "रामबाण" उपाय तात्पुरते यशस्वी होतात पण तुमची जीवनशैली कायमची बदलल्याशिवाय वजन आणि चरबी कमी होत नाही.

व्हिसरल फॅट व बेली फॅट वेगळे आहेत. व्हिसरल फॅट बाहेरुन दिसत नाही. माझ्या व्हिसरल चरबी करण्याबाबत बोलतांना जोशींनी मला वरील प्रश्न विचारले होते. पहिला दारु, दुसरा अवेळी जेवणाबाबत. या दोन्ही गोष्टी मी नाही करत म्ह्टल्यावर त्यांनी सरळ तू पाणी पिण्याची सवय बदल' असे थेट सांगितले. मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे (तासाला अर्धा ग्लास पाणी पिणे) पाळण्याचा प्रयत्न केला. ४५ दिवसांत व्हिसरल चरबी ९ वरुन ७ वर उतरली.
.. शेवटी अपेक्षित परिणाम महत्त्वाचा!

बाळबोध प्रश्न - व्हिसलर फॅट मोजतात कसे?
मलाही बर्‍याच जणांनी ग्रीन टी विषयी सांगितले पण इथे पुण्यात कुठे मिळतो व कुठल्या ब्रँडचा घ्यावा हे सांगितले नाही. माझे वजन बरेच वर्ष स्थिर व योग्य होते पण या एका वर्षात मेनॉपॉजचा त्रास सुरु झाल्यापासून वजन व पोट थोडेसे वाढले आहे, हिमोग्लोबिनही कमी झाले आहे. मी माधव जोशींना फोन करावा का? त्यांना फोनवर सल्ला मागणे किती उचित आहे? कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद!
-- श्रुती

माझी मँगलोरी मैत्रिण (पांढरा तांदूळ) भात शिजत आला की वरचं पाणी पूर्ण काढून टाकून वाफेवर भात शिजवते. त्याने फरक पडतो का?

भाताबद्दल उपयुक्त माहीती,

कित्येकशे वर्षां पासून आपण भात खातोय मग आताच हा भात ईतका Dangerous कसा काय ठरला ?

सर्व साधारणपणे कोकण किनार पट्टी वरले लोक भात खातात. भात हा त्या प्रदेशात मुख्य अन्न आहे,

१, भाताचा प्रकार :
ऊकडा तांदुळ, हात सडीचा तांदुळ. ऊकडा तांदुळ हा मूळातच ब्रॉऊन राईस त्यात एकदा त्यातील स्टार्च
काढून टाकलेल असते.

२. भात शिजवण्याची पद्द्त ;
पूर्वीच्या काळात ( म्हणजे प्रेशर कूकर यायच्या आधी ) भात शिजवताना / शिजवल्यावर भातातील स्टार्च
काढुन टाकत ( ड्रेन करत)
आता प्रेशर कूकर मध्ये तो स्टार्च भातातच मुरतो.

३. भात खाण्याच्या वेळा : पुर्वी भात फक्त दुपारच्या जेवणात घेत असत. आता तिन्ही त्रिकाळ भात
खाल्ला जातो.

४. भात खायची पद्द्त.: भात खाताना बनणार्या आमट्या, कढ्या, तिखट असत, भाता बरोबर लोणची असणे
अत्यावश्यक असे. लोणच्या मूळे तोडांत लाळेच प्रमा ण वाढते व भात पचण्यास मदत होते.

Compared with minimally processed whole grains such as brown rice, white rice has a lower content of many nutrients including insoluble fibre, magnesium, vitamins, lignans, phytoestrogens, and phytic acid, which are lost during the refining process. Some of these nutrients, especially insoluble fibre and magnesium, have been associated with lower risk of type 2 diabetes in prospective cohort studies. Thus, a high consumption of white rice may lead to increased risk of diabetes because of the low intake of beneficial nutrients, in addition to its higher glycaemic load.

थोडक्यात भात खाऊन दुसरे अन्नसत्व जास्त असलेले पदार्थ न खालल्यामुळे डायबेटिस होऊ शकतो. शेतकाम करणारे, मजुरीची कामे करणारे, किंवा एकंदरित कुठल्यान कुठल्या कारणाने जास्त व्यायाम असलेल्यांना ह्यांना हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थानी इतका त्रास होणार नाही. भात आणि बैठी जीवनशैली (?) ह्या दोन्ही गोष्टी डायबेटिस व्हायला कारणीभुत ठरतात असा हा लेख दर्शवतोय असं मला वाटतं.

माधव जोशींचं पुस्तक दुकानांमधून तरी मिळालं नाही मला. आता त्यांनाच फोन करेन पुस्तकासाठी.

प्रेशर कुकरमध्ये भात शिजवण्याआधी तांदूळ स्वच्छ धुवुन घेतले तर स्टार्च निघून जात नाही का ?

नाही.
स्टार्च काढण्याकरता भात शिजत आल्यावर जे वर पाणी उरत ते काढून टाकायला भात रोवळी, कोलँडरमध्ये वगैरे उपसायचा. (मग पुन्हा बारीक गॅसवर पूर्ण शिजायला ठेवायचा)

मधुमेह असलेले काही जण भात करण्याआधी कोरडे तांदूळ भाजून घेतात व नंतरच त्याचा भात शिजवितात. कच्चे, कोरडे तांदूळ भाजल्यामुळे त्यातील कर्बोदक व स्टार्चचे प्रमाण कमी होते का?

तांदूळ नुसता धूवून त्यातील स्टार्च जात नाही.

भात पातेल्यात जास्तीच्या पाण्यात शिजवला व नंतर ड्रेन केला तरच त्यातील स्टार्च जाईल. हे ड्रेन केले ले पाणी
जर तास दोन तास ठेवले तर लगेच जेल ( Semi Solid State) होते.

प्रेशर कूकर मध्ये भात ड्रेन करण्याचा चान्स नसतो.

भारताला जगाच Diabetes Capital चा दर्जा दिला गेलाय. याचा अर्थ भारतातील लोक हे जागातील इतर
लोकांपेक्षा डायबेटिस ला जास्त बळी पडतात आणी ते सर्वच्या सर्व भात खाणारे नसतात.
तसेच भारत ह्र्दय विकारांत ही जगाला लवकरच मागे टाकेल अशी परीस्थीती आहे,
भारतीय माणसाला एका युरोपीयन माणसाच्यापेक्षा तीन पटीने ह्र्दय विकार होण्याची शक्यता असते.

याचा अर्थ आपल्या जीन्स मध्ये काहीतरी असे आहे ज्या मूळे आपण मूळातच नाजुक प्रक्रुतीचे असतो.

का?

जगातील २/३ जन संख्या फक्त भारत व चीन ह्या देशात सामावलेली आहे. ह्या दोन देशात ह्र्तू व हवामान
बाकिच्या जगापेक्षा जिवनाला अधिक अनुकूल आहे, त्या मूळे ईथे जन्माला येणारे जीव बाकीच्या जगापेक्षा
कमी विषम परीस्थीतीचा सामना करतात. त्या मूळेच आपले जीन्स बाकी जगापेक्षा कमकूवत असतात.

आपल्या जेवण पद्दतीच व एकदंरीत जिवन पद्दतीच बारीक परीक्षण केल तर हे लक्षात येते की आपल्या
पूर्वजांना याची जाणिव असावी. त्यांनी माणसासाठी आयुर्वेदाची उपाय योजना केली,
त्यावर ह्रूतुचर्या, दिनचर्या याची सांगड घातली. त्यावर योग, साधना पद्दती सांगीतली.

दिड दोन वर्षा पुर्वी सर्व जग स्वाईन फ्लू / बर्ड फ्लुच्या साथीने हादरला. सर्व देशातील सरकारांनी लोकांना
चिकन खाऊ नये असा सल्ला दिला, पण भारतात, सरकारने स्पष्ट शब्दात सल्ला दिला होता की
आपली चिकन पुर्ण शिजवण्याच्या पद्द्ती मूळे चिकन खाऊन ह्या स्वाईन फ्लू / बर्ड फ्लु साथीचा काही
प्रादुर्भाव होणार नाही,

सर्व जगात फक्त भारतीय उअपखंडातच हळदीचा जेवणात वापर होतो. हळदि मूळे स्वादात फरक पडत नाही.
तरीही ह़ळदीची योजना भारतीय खाद्य पदार्थात केली गेलीय.

आपण जेवणात फोडणीला वापरणारे पदार्थ (जीरे, धने, मिर्ची, मोहरी, सोंफ, आले, लसूण मीठ )
अल्कलाईन आहेत. जेवणात जास्त वापरले जाणारे पदार्थ जसे ( नारळ, किशमिश बेदांणे, ) हे सुद्दा अल्कलाईन
आहेत. वरील सर्व पदार्थ उदा, दाखल दिले आहेत.

या पदार्थाची योजना कोणी केली ?

आता मोठे डायट्रीशनस जगाला अल्कलाईन फूड कडे जाण्याचा सल्ला देतात त्या पार्श्वभूमीवर भारतीय
खाद्य पदार्थ पद्द्ती जी असा आहार आपल्याला काही शे वर्ष तरी देत आहे याचा विचार व्हावा.

<<<<भात खायची पद्द्त.: भात खाताना बनणार्या आमट्या, कढ्या, तिखट असत, भाता बरोबर लोणची असणे
अत्यावश्यक असे. लोणच्या मूळे तोडांत लाळेच प्रमा ण वाढते व भात पचण्यास मदत होते.>>>

तुम्हि ह्या पोस्ट मध्ये लिहलेल बाकि सगळ पटल वरील वाक्यात तुमची थोडि गल्लत होतेय अस मला वाटल किंवा त्यात तुम्हाला नक्कि काय म्हणायच आहे ते मला नीट कळल नाहि.

लाळेमध्ये salivary alpha 1,4 amyalse (ptyline) हे वितंचक (enzyme) असत जे स्टार्च मधिल दोन ग्लुकोज रेणुंमधिल alpha 1,4 glycosidic bond तोडत त्यामुळे ग्लुकोज चे रेणु सुटे होउन शोषले जाण्यासाठी उपलब्ध होतात. सामान्यपणे ह्या वितंचकाचा जितका ज्यास्त सम्पर्क स्टार्च शी येइल तितकि ज्यास्त प्रमाणात ही प्रक्रिया होइल पण एका मर्यादेबाहेर हे शक्य नाहि कारण अगदी ३२ वेळा जरी चावला तरी तो तोंडात जितका वेळ राहिल तो तुलनेने अन्न जितका वेळ लहान आतड्यात असत त्यापेक्षा कमीच असेल. गिळल्यानंतर अन्न जेंव्हा जठरात जात तेन्व्हा बर्‍याच प्रमाणात हे वितंचक निकामी होत कारण जठरातिल आम्ल. त्या pH वर हे वितंचक काम करु शकत नाहि. पण काहि थोड्या प्रमाणात जे निकामी न होता कार्यरत रहात ते परत लहान आतड्यात कार्यरत होत कारण लहान आतड्यातिल alkaline pH. ह्याच्या जोडिने लहान आतड्यात pancreatic alpha 1,4 amylase हे वितंचक उपलब्ध असत जे वरिल प्रमाणेच काम करत. अन्नतिल कार्बोदकांचे पचन प्रामुख्याने ह्या पॅन्क्रिआतिल वितंचकाच्या सहाय्याने केल जात.

पुर्वीच्या काळि तंतुमय आवरणासकट (हातसडिचा तांदुळ्/ब्राउन राइस) खात असत शिवाय अन्न ही तशी सहजासहजी उपलब्ध नसलेलि गोष्ट होती त्यामूळे दर दिवशी शरीराला कॅलरी आणि कार्बोदके ह्यांचा पुरवठा मर्यादित प्रमाणात असायचा शिवाय शाररिक श्रम भरपुर त्यामुळे उपलब्ध अन्नातुन ज्यास्तित ज्यास्त मिळवायच ह्या हेतुने 'एक घास बत्तीस वेळा चावुन खा' हा सल्ला दिला गेला असेल असे मला वाटते. ह्यामुळे दोन हेतु साध्य होतात तोंडात ज्यास्त प्रमाणात स्टार्च च विघटन होत आणि ज्यास्त प्रमाणात वितंचक उपलब्ध झाल्यामुळे जठरात निकामी होण्यापासुन वाचण्याच प्रमाण देखिल वाढत. परिणामी तुलनेने ज्यास्त प्रमाणात ग्लुकोज शोषणासाठी उपलब्ध होइल.

मात्र मधुमेहि रुग्णांसाठी हा सल्ला योग्य नाहि कारण अस केल्याने अंतिमतः ज्यास्त प्रमाणात ग्लुकोज उपलब्ध होइल (रक्तातिल साखर वाढेल) अस होण्याच प्रमाण तुलनेने कमी असल तरी ह्याची मधुमेहिंना काहिच आवश्यकता नाहि. कारण साखर वाढु शकेल अस अन्नाच (भात, साबुदाणा, बटाटे, मैदा, रवा इ.) प्रमाण त्यांनि आहारात शक्य तितक्या मर्यादित प्रमाणात ठेवलेल त्यांच्यासाठी ज्यास्त चांगल.

Pages