आहारातून आरोग्याकडे..

Submitted by हेम on 21 March, 2012 - 12:07

ऑक्टो. २०१० मध्ये पावसाळ्यात बंद असलेलं जॉगिंग सुरु केलं तेव्हा वजन होतं ६५ किलो. साधारणपणे दररोज ६ कि.मी. आरामात धावणं व्हायचं. मार्चात उन्हाच्या चाहुली तिव्र व्हायला लागल्या की जॉगिंग थांबायचं. जेवणामध्येही बदल नाही. दरवर्षीचा हा सरासरी परिपाठ. आता डोंगर चढायचा खुळा छंद असल्याने, व हा सिझन भटकण्याचा असल्याने शारीरीक क्षमतेसाठी हे पाळावं लागायचं. ही क्षमता कमी पडली तर ट्रेकमध्ये 'बघणं' कमी व दमणं जास्त होतं. मार्चात जॉगिंग थांबवलं तेव्हा वजन झालेलं ६९ किलो... !!
मी चक्रावलो. खाण्यात बदल नाही. जंक फुड -कोल्ड्रिंक्स-हॉटेलिंग वगैरेंना फाट्यावर मार देऊनही हे असं कां ते कळेना! ऑगस्ट २०११ - वजन ७३ किलोवर गेलं. आता स्वतःमध्ये होणारे बदल टिपायला सुरुवात झाली होती. यावर्षी अॅसिडीटीमध्ये प्रचंड वाढ झालेली होती, केस गळायला सुरुवात झालेली.., सूर्य वर येतांना मानेकडून वरपर्यंत डोकेदुखीही चढत यायची. ..अशी अवस्था! बरं, अॅसिडीटीवर आजूबाजूला कोणाला सल्ला विचारणार? डॉक्टरांपासून सगळेच जाडजूड! ..आणि प्रत्येकजण सल्ला देतांना दुसर्या कोणाकडून तरी ऐकलेला किंवा डॉकने दिलेला सल्ला पुढे सुपुर्द करायची. आता चाळीशीत आलायस,.. असं चालायचंच आता हळूहळू! वगैरे नकारात्मक रडे सल्ले तर खूपच!! ..आणि प्रॉब्लेम प्रत्येकाला, पेक्षा घरातल्या प्रत्येकाला तरी!!
* * *

ऑक्टो. २०११ मध्ये दिवाळीच्या आधी एका मित्राने त्याच्याकडे बोलावलं.- '.. मुंबईचे एक माधव जोशी म्हणून एक न्युट्रीशिअन आहेत. .त्यांचं १ तासाचं आहार व आरोग्य या विषयावर बोलणं आहे, तेव्हा तू ये. ' म्हटलं येतो. गेलो. त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी कांय खावे यापेक्षा कांय खाऊ नये आणि ते कां खाऊ नये हा भाग स्पष्ट केला. त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
६ गोष्टी पुर्णपणे बंद करा, पेक्षा गटारात फेका.
१) साखर २) चहा/कॉफी ३) सर्व बेकरी पदार्थ ४) रिफाइंड तेल ५) लोणचं ६) पापड. आणि हे कां खाऊ नका हे त्यांनी वेगळ्या पद्धतीने विषद केलं त्याकडे नंतर येऊच..!!

मी मुळांत प्रचंड गोड खाणारा. Happy मस्तपैकी लालसर होईपर्यंत खरपूस भाजलेल्या बेसनाचा एक लाडू मी कधीच खाल्लेला नाही.. एकावेळी जोडी लागायची. Happy साहजिकच माझ्या मर्मावरच हा माणूस घाला घालतोय म्हटल्यावर मी व्याख्यानानंतर अर्धा-पाऊण तास या न खाण्याच्या पदार्थांवरून त्यांच्याशी काथ्याकूट केला, विशेषतः साखरेवरुन! त्यांनीही माझे समाधान होईपर्यंत व्यवस्थित उत्तरे दिली पण जीभेच्या मेंदूचे काही समाधान होत नव्हते. Happy माझे बॉडी पॅरॅमिटर्स काढले. बहुतेक सगळे सीमारेषेवर.. ओलांडली नसली तरी माझ्यासाठी तो धक्काच होता.
झालं! त्या मिनिटाला मी साखर, चहा/कॉफी, सगळे बेकरी पदार्थ, लोणचे व पापड यांना माझ्या जीभेपासून तलाक दिला. रिफाईंड तेलावर माझा डायरेक्ट कंट्रोल नसल्याने त्याला शक्य तितके नाही या वर्गात ठेवले.
घरी आल्यावर हा निर्णय सांगितला. माझ्यापुरता मी पाळणार, तुम्हांला त्रास नाही असं जरी सांगितलं तरी माझ्या या निर्णयाचा घरात कुठेतरी परिणाम होणार होताच. दिवाळीचा सगळा फराळ घरात तयार होता. पण तिथे मी जीभ जिंकली. हे पदार्थ पूर्ण बंद केल्यावर पहिले दोन दिवस डोकेदुखीचा प्रचंड त्रास झाला. आता या त्रासाचं शास्त्रीय कारण मला सांगता येणार नाही. दिवाळी संपल्यावर मी आधी किती साखर/ गोड खायचो ते उरलेल्या पदार्थांवरुन लक्षात येतच होते. खरा त्रास कंपनीत होणार होता. सर्व सहकार्यांबरोबर दिवसभरांत त्यांच्या चहाच्या वेळी, जेवतांना त्यांना माझी बाजू समजावून सांगतांना पार कावायला व्हायचं. कारण याचा नेमका परिणाम कांय नी कधी माहित नव्हतं. कॅलेंडरच्या तारखेवर पहिल्या दिवसापासून 'खाल्ले नाही' म्हणून फुली मारायला लागलो. सलग फुल्यांचे दिवस वाढत गेले तशी स्वतःशी कमिटमेंट पक्की होत गेली. बाकी माझ्या जेवणांत काही बदल नव्हता. जॉगिंगही नियमित सुरु होते.
४३ वा दिवस. मी बाबांना (वडीलांना) घेऊन नियमित तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेलो होतो. तिथल्या वजनकाट्यावर वजन केलं. ७१ किलोग्रॅम.....!! आनंदाने उडीच मारली. आधी माधव जोशींना फोन लावला. ते हसत म्हणाले.."उतरवली की नाही तुझी चरबी..!! नुसत्या या ६ गोष्टी बंद करुन एवढा फरक पडला, आता मी सांगेन तसं खायला लागल्यावर तुझी घडी नीट बसेल की नाही बघ..परवा नाशिकला येतोय, तेव्हाच तुझे पॅरामिटर्स काढूया! " मलाही त्याबद्दल जाम उत्सुकता लागली. ते आल्यानंतर पॅरॅमिटर्स काढले, ते खाली देतोय. कंसामध्ये नंतरचे म्हणजे पहिल्या ४५ दिवसांत बदललेले पॅरामीटर्स. आता तर आणखी सुधारीत आहेत.
वजन- ७५.४ (७०.९)
चरबी %- २६ (२१.२)
स्नायू %- ५३ (५२.८)
पाणी %- ५२ (५६)
व्हिसरल फॅट %- ९ (७)
मेटॅबोलिक वय- ५५(४०)
फिजिक रेटींग- २ (५)
बोन मास- २.८ (२.८)

यावेळी त्यांना प्रश्न केला की एका महिन्यांत एकदम ४.५ किलो वजन कमी होणं कितपत योग्य, त्यांवर "ही अनावश्यक चरबी गेलीय. आता यापुढे १ किलोसाठीसुद्धा तुला किती घाम गाळावा लागेल हे लवकरच कळेल तुला!" असं सांगून त्यांनी स्नायू वाढवण्यासाठीचे व्यायाम आणि शिफ्टच्या वेळेप्रमाणे कसा आहार घ्यायचा ते सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळा जिन्नस वाण्याच्या दुकानांत व भाजी मंडईत मिळणारा. आता सध्या मी या ६ गोष्टी+प्रिझर्वेटीव्ज्+कृत्रिम रंग असलेले पदार्थ टाळूनही मस्त चमचमीत खातोय. अगदी गोडासकट. कारण साखरेऐवजी सेंद्रिय गूळ, रिफाइण्ड तेलाऐवजी घाण्याचं किंवा फिल्टर तेल, चहाऐवजी गुजराथी लोकांकडे असतात ते उकाळे वापरायला हरकत नाही असं माधव जोशी सांगतात. पण हे ऑप्शनसुद्धा कशाला हवेत तर शेवटी आपल्याला हे आजीवन पाळायचे आहे म्हणून. माझ्या बदललेल्या पॅरामीटर्सचा कागद पाहून आता माझ्या कुटुंबातच कांय, पण गंमत करणार्या सहकार्यांनीही या गोष्टी पाळायला सुरुवात केली आहे व त्यांनाही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. माझ्या एका पन्नाशीच्या मधुमेही व गोळ्या सुरु असलेल्या सहकार्याची उपाशीपोटी साखर नेहमी १५० ते १६० यायची. त्याने या गोष्टी वर्ज्य केल्यावर एका महिन्यांत ती ११८ पर्यंत उतरली. त्याला आता डॉक्टरांनी गोळ्यांचा डोस परत नीट ठरवण्यासाठी बोलावणे केले आहे. त्याचेही बाकी खाणे व्यवस्थित सुरु आहे.
माझी अॅसिडीटी पहिल्या १० दिवसातच गेली. वजन ६७ वर स्थिर आहे. आता थोडे वजन वाढवायचे आहे पण स्नायूंचे.
वाढलेल्या ढेरीचे आता सपाट पोटांत रुपांतर झाल्याने Rock Climbing चा आता मी पुन्हा आनंद घ्यायला लागलो आहे. उर्जा क्षमता (एनर्जी लेव्हल) खूप वाढली आहे. एकूण सध्या आरोग्यदायी चाललंय!

आता या माधव जोशींबद्दलची थोडी माहिती देतो...
श्री. माधव जोशी बँकेत नोकरीला होते. रसायनशास्त्राचे पदवीधर. १९८२ च्या सुमारास ते नाना पालकर स्मृती समितीत रुग्णसेवा करत असत. त्यावेळी अनेक व्याधींनी ग्रस्त रुग्ण आणि त्यामुळे ग्रस्त त्यांचे कुटुंब बघून आपण कधीच 'रुग्ण' व्हायचे नाही अशी खुणगाठ त्यांच्या मनाशी बांधली गेली. पण...वयाच्या पन्नाशीच्या आधीच गुडघे, कंबर व पाठ्दुखी सुरु झाली. साहजिकच डॉक्टरांनी बरीच बंधनं घातली. आरोग्याचा शोध घेता घेता स्वतःच अनारोग्याच्या मार्गाला लागले. आपले आरोग्य परत मिळवण्यासाठी त्यांनी नाना तर्हेचे सगळे उपाय करुन पहिले पण तात्पुरता परिणाम दिसे, परत ये रे माझ्या मागल्या किंवा आणखी काही तरी नविन उद्भव! योगासने, रेकी, आहारशास्त्र, निसर्गोपचार, प्राणायाम, कपालभाती या सगळ्या गोष्टींचा प्रयोगशील अभ्यास या दरम्यान झाला. सरतेशेवटी ते एका निष्कर्षाप्रत आले, तो म्हणजे आपल्या रक्ताचा पी.एच.

त्यांच्या भाषेत सांगायचं तर ..
"आपल्या आरोग्याचा संबंध आपल्या रक्ताच्या ७.४ या पी.एच. शी आहे. पी.एच. म्हणजे power of hydrogen. म्हणजे एखाद्या द्रवातील हायड्रोजन आयनची संख्या. ते ० ते १४ या रेंजमध्ये मोजलं जातं. '०' ph म्हणजे अत्यंत अॅसिडीक- '७' ph म्हणजे उदासिन आणि '१४' ph म्हणजे अल्कली. आपल्या रक्ताचा ph '७.४' म्हणजे किंचित अल्कली आहे. आपल्या शरीरात चालू असलेल्या चयापचय व श्वसन क्रियेमुळे रक्ताचा ph सतत प्रभावित होत असतो. ph कमी झाला तर त्याला अॅसोडोसिस म्हणतात. जास्त झाला अल्कलॉसिस म्हणतात. पैकी आपण अॅसिडोसिसचाच विचार करुया. या प्रकारात ph कमी होऊन अॅसिडचं प्रमाण वाढतं. निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या असंतुलनाला नियंत्रित करण्यासाठी निसर्गानेच शरीरात पुरेशी व्यवस्था केलेली असते पण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपण निसर्गतः निर्माण होणार्या ph च्या अंसंतुलनात बरीच भर टाकत असतो, ती अशी-
१- अॅसिडोसिस निर्माण करणारं अन्न (मांस, मासे, अंडी, डाळी, धान्ये) यांचा अतिरेक व दूध, फळे, भाज्या, मोड आलेली धान्ये, नाचणी या अल्कली अन्नाचं कमी सेवन.
२- साखर, वनस्पती तूप, शितपेयं, चहा, दारु, तंबाखू यांचं सेवन
३- अॅसिडोसिस निर्माण करणारी औषधे सेवन
४- प्रिझर्वेटिव्ज, कृत्रिम रंग असलेलं अन्न सेवन
आणि इथे गडबड होते.
आता साखर कां नको?
साखर कशी बनते हे सामान्यपणे कुणालाही माहित नसतं. साखरेमध्ये तिच्या पचनासाठी लागणारे कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व फॉस्फरस हे ३ घटक नसतात. उसाच्या रसात किंवा सेंद्रिय गुळांत ते असतात. उसाच्या रसाची ज्यावेळी साखर बनवतात त्यावेळी त्यांत फॉर्मल डिहाईडसारखी घातक रसायने मिसळली जातात. यामुळे हे ३ घटक साखरेतून नष्ट होतात. अशी साखर पोटांत गेल्यावर पचनासाठी लागणारे हे घटक आपल्या शरीरातून घेतले जातात. उदा. कॅल्शिअम हाडांतून नाहीतर दातांतून घेतले जाते. परिणामी हाडे/ दात लवकर ठिसूळ होतात. मात्र एवढा उपद्व्याप करून साखरेपासून शरीराला काहीही फायदा मिळत नाही. कर्बोदके इतर खाण्यातून मिळतातच की!
आपल्या जेवणात ८०% अॅसिडीक व २०% अल्कली पदार्थ असतात. ते प्रमाण उलट करायचं म्हणजे २०% अॅसिडीक व ८०% अल्कलाईज्ड. ते कोणते ते वर १ नं.च्या मुद्द्यांत आलं आहेच. "
माधव जोशींनी या विषयावर 'सात पुर्णांक चार दशांश' या नांवाचं पुस्तकही प्रकाशित केलं आहे. त्यांतही या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे मांडल्या आहेत.

तळटीपः लेख थोडा विस्कळीत वाटेल. अनुसरुन बरेच विषय आहेत. थोडक्यांत मांडण्याचा प्रयत्न केलाय. या विषयांतील अनेक तज्ञ इथेही आहेत. त्यांच्याही सूचना/ मार्गदर्शन मिळेल. उदा. इथे उल्लेखलेल्या आहारासंबंधी, साखर-रिफाइण्ड तेल कसे बनते? त्यांत रसायने मिसळतात कां? त्यांचा शरीरावरील परिणाम वगैरे माहिती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख !
मुलांना चहा कॉफी हे व्यसन आपणच लावतो , मला आठवतंय कि मी पहिल्यांदा चहा प्यायला तेंव्हा हा प्रकार रोज हे सर्व मोठे लोक का पितात असा प्रश्न पडला होता ! सर्वांनी हि काळजी घ्यावी कि मुलांना चहा कॉफी ह्या सवयी आपण तरी लावू नयेत , एकदा त्यात पडल्यावर ते बंद करणे खूप कठीण होऊन बसते

चांगला लेख आणि उपयुक्त माहिती.

सगळं पटलं पण ते लोणचं आणि पापड सारखे पारंपरिक पदार्थ बंद का करायचे ते कळलं नाही. नुकतंच डॉ. कादरवेली (जे रसायन शास्त्रात PhD आहेत) यांचं व्याख्यान ऐकण्यात आलं. त्यांच्या मते मुरलेलं लोणचं आरोग्यासाठी चांगलं आहे. कॅन्सर सेल्स न ते स्पंज सारखं शोषून घेतं आणि शरीराबाहेर सोडतं अस त्यांचा अभ्यास सांगतो. पद्मभूषण डॉ बी. एम. हेगडे यांचंही काहीसं असंच मत आहे.

पापडाबद्दल तितकीशी माहिती नाही.

..

Pages