द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

चेतन भगतच्या या नव्या पुस्तकाची क्रॉसवर्डमध्ये मोठी चळत पाहिली, त्याची आधीची दोन्ही पुस्तक वाचली होती, फार खास नसली तरी फाईव्ह पॉईंट समवन टीपी म्हणून ठीक वाटल होत. वन नाईट ऍट कॉल सेंटरही नावीन्य म्हणून ठीक, अर्थात शेवटचा अचाट आणि अतर्क्य भाग सोडला तर..

चळतीतून एक पुस्तक सहज उचलल, किंमत पंच्याण्णव रुपये फक्त. 'सो चीप !!!!' ही माझी पहिली प्रतिक्रिया होती, किंमत वाचल्यावर आणि मग पुस्तक वाचल्यावरही.

अमदावादेत क्रीडासाहित्याचे दुकान कम क्रिकेट कोचिंग कम गणित क्लासेस आपल्या ओमी व इश या मित्रांसोबत चालवणारा एक गोविंद पटेल, त्यांचा अली नावाचा पुढे भारतीय क्रिकेटचे भविष्य होउ शकेल असे त्यांना वाटणारा एक बारा तेरा वर्षाचा विद्यार्थी जो सारख्या सिक्स मारत असतो, त्याला क दर्जाच्या हिंदी चित्रपटाला लाजवतील अशा अतर्क्य प्रकारे गोव्यात एका मॅचमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बळंच गळ्यात पडून थेट ऑस्ट्रेलियात नेणे आणि त्याने तिथले नागरिकत्व आणि ऑस्ट्रेलियातर्फे भविष्यात खेळण्याची संधी मी जन्मोजन्मी भारतीयच राहीन असे म्हणत नाकारणे असे हास्यास्पद [त्याने ऑस्ट्रेलियन नागरिकत्व नाकारल्यावर ऑस्ट्रेलियन निराश होतात] घटनातून पाने भरता भरता, गोविंदने त्या दोनपैकी एका मित्राच्या इशच्या बहीणीला गणित शिकवता शिकवता एकमेकांना प्रेमाचे धडे देणे, आणि तिच्या अठराव्या वाढदिवसालाच तिच्याच घराच्या गच्चीवर खाली घरात तिचे आई वडील भाऊ असतांना ती ऍडल्ट झाल्याचा अधिकार बजावणे आणि मग पुढची चिंता यातही बरीच पाने खर्ची पडल्यावर, ओमीचे मामा जे हिंदुत्ववादी व वाईट्ट असतात आणि अलीचे बाबा जे मुसलमान असल्याने दयाळू, सर्वधर्मसमभाव मानणारे व विचारी आणि काँग्रेस पक्षाचे नेते असतात यातही एकदोन लुटुपुटुचे संघर्ष झाल्यावर काही काळाने म्हणजे आपल्याला अजून थोडा कंटाळा आल्यावर मामांचा लहान मुलगा तेरा चौदा वर्षाचा हा गोध्रा हत्याकांडात जेमतेम दोन तीन ओळीत संक्षिप्त बळी पडतो, मग पुढे पन्नास पाने मामा व इतर पिसाट हिंदू मिळून गरीब मुसलमानांची तपशीलवार कत्तल करू लागतात.

हे तीन मित्र अलीला वाचवायला एकदम रजनीकांतच होतात आणि मामांच्या पन्नास जणांच्या पेटलेल्या सशस्त्र जमावाशी झुंज देतात, त्या जमावावर पेट्रोल ओतून पेटवून काय देतात, गॅस सिलिंडरचा स्फोट काय करतात, हे सगळे अर्थात स्वतःला खरोंच पण येऊ न देता, अशा सर्व मर्कटलीला केल्या पण तरी शेवटी मुख्य व्हिलन मामा व त्याचे पाच साथीदार उरतातच. एवढ्या सगळ्या गडबडीतही इशची बहीण गोविंदला ती प्रेग्नंट नसल्याची खुशखबर एसेमेसने कळवते [ धन्य ती मुलगी !!! कुणाच काय तर कुणाच काय हेच खरे !!] आणि ती खबर इशच वाचतो आणि मुळात तो फोन गोविंदकडून आपण पोलिसांना बोलावण्याकरता घेतला होता हे विसरून गोविंदलाच बदडू लागतो. इकडे मामा पद्धतशीर डोळे मिटून मंत्र वगैरे म्हणून मग अलीला त्रिशूळ भोसकणारच [ येथे आपण हसून गडाबडा लोळू लागतो ] तेवढ्यात ओमी 'नही' वगैरे सुटेबल उद्गार काढत मध्ये येतो आणि त्रिशूळ त्याच्याच पोटात भोसकला जातो. मग त्याचे मामा हाय मैने ये क्या कर दिया इत्यादी. पण इथेच आपला छळ थांबत नाही. मामा एकदम वाईट्ट हिंदुत्ववादी असल्याने ते पुन्हा त्रिशूळ घेउन उठतात आणि अलीला मारतात पण आता इश व गोविंद वाचवतात आणि प्रतिकाराला सज्ज होतात. आता अलीच्या हातात बॅट आणि मामांकडे त्रिशूळ आणि ते आमने सामने आता काय होणार ? अली बॅट सरसावतो, मामा ही पुढे येतात तेवढ्यात... तेवढ्यात इश त्याला बॉल टाकतो आणि अली मामांच्या टकलावर सिक्सर मारतो, अजून एक बॉल आणि अजून एक सिक्सर कपाळावर की मामा मरूनच खाली पडतात.

एवढे सगळे झाल्यावर लेखकाचे जाउ द्या हो, पण आपल्यासारखे वाचकही एवढे निर्लज्ज की पुढे वाचत रहातात. आता भांडणामुळे इश आणि गोविंदच्या दुकानाचा बटवारा होतो, अलीच्या ऑपरेशनसाठी इश दो लाख रुपये जमवतो तर गोविंद तीन, पण इश गोविंदचे पैसे घेणे नाकारतो एवढेच नव्हे तर त्या पैशाला गोविंदचा स्पर्श आहे म्हणून ते परत देतांना स्वतः हँड्ग्लोव्हज घालून मग ते पैसे परत देतो. आपल्या डोक्यावरचे सर्व केस अगोदरच उपटून झाले असल्याने पुढे वाचणे एवढेच हातात असते. तर हा धक्का सहन न झाल्याने गोविंद आत्महत्या करायचा प्रयत्न करतो, पण तेंव्हाही तो लेखकाचा फॅन असल्याने लेखकाला ईमेल पाठवून गोची करून ठेवतो. मग लेखक सिंगापूरहून अमदावाद आणि विद्या, इश आणि गोविंदचे परस्परांशी त्या त्या नात्याला सुटेबल असे मिलन करून हा छळवाद संपतो.

केवळ मार्केटिंगच्या आधारे एखादी तद्दन फालतू गोष्टही कशी खपवता येते हे असली पुस्तक वाचली आणि त्यांच्या खपाचे आकडे पाहिले की कळते.
मग आता शेवटपर्यंत वाचायच कशाला ? भेळेचा कागदही मागून पुढून पूर्ण वाचायची सवय आहे....मग भोगा आपल्या कर्माची फळं......

---- ता. क. चौथी चूक : टू स्टेट्स

थ्री मिस्टेक्स हे पुस्तक वाचलं तेंव्हा याहून भिकार आणि टाकाऊ लेखन करणे शक्य नाही असे माझे मत झाले होते. ते किती चुकीचे होते हे आता चेतन भगतचेच २ स्टेट्स वाचल्यावर कळले.

प्रस्तावनेत चेतन भगतने तो भारतातला सर्वात लोकप्रिय लेखक आहे असे जाहीर करून त्याबद्दल वाचकांचे आभार मानले आहेत. हे जर खरे असेल तर आपली वाचनसंस्कॄती अजूनही मानवी उत्क्रांतीच्या किती खालच्या पातळीला आहे याची भिती वाटू लागते.

पुस्तकाचे चार भाग आहेत. पहिल्या भागात लेखक आणि त्याची होणारी बायको एकेमेकांना आयआयएममध्ये भेटून मागच्या सर्व पुस्तकातल्याप्रमाणेच फक्त नाव बदलून प्रेमात पडतात. भाग दोन मध्ये लेखक मद्रदेशात जाउन तिच्या आई, वडील व भावाला कंटाळा आणून पटवतो. तीन मध्ये मुलगी दिल्लीला येउन लेखकच्या आई व नातेवाइकांना पसंत पडू पहाते. भाग चार मध्ये हे मद्रदेशीय व जमनापार पालक भांडतात, भांडणे मिटवतात व एक्दचे लग्न पार पडते. परिशिष्टात दांपत्याला जुळी अप्त्यप्राप्ती झाली असून ती कुठल्या राज्याची असे विचारल्यावर भारताची असे बाणेदार उत्तर दांपत्य देते व तीन ओळींची ही कहाणी दोनशे पाने खाऊन संपते.

पुण्यातील कोणाला हवे असल्यास माझ्याकडे २ स्टेट्स हे पुस्तक मला परत न देण्याच्या अटीवर उपलब्ध आहे.

विषय: 
प्रकार: 

२ राज्यावरच्या सिनेमात शारुख काय हिरोच्या बापाचा रोल करणारेय?<< हिरोच्या नाहीरे हिरवीणिच्या तेव्हढच त्याला तिच्या गळ्यात पडता येईल ना Wink Wink Wink
आणि असंही यात हिरोच्या बापाला काडीचीही किंमत नाहिये

Pages