गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी)

Submitted by जिप्सी on 10 June, 2010 - 23:38

मराठी संगीत भावगीत, चित्रपटगीत, लोकगीत, नाट्यगीत अशा विविध दालनांनी सजले आहेत.
गीतकारांचे अर्थवाही शब्द, संगीतकारांनी बांधलेली सुयोग्य चाल आणि गायकांची कर्णमधुर कारागिरी, अशा अनेक गाण्यांचा खजिना मराठी गीतांमध्ये आहे.
इथे आपण आपल्याला आवडलेल्या मराठी भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत, लोकगीत, लावणी इ. गाण्यांची चर्चा करुया. यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या धाग्याच्या पहिल्या गाण्याची सुरुवात सुमनताई कल्याणपूर यांनी गायलेल्या "घाल घाल पिंगा वार्‍या" या माझ्या आवडत्या गाण्याने करूया.
कृ. बा. निकुंभ यांचे काळजाला भिडणारे शब्द, कमलाकर भागवत यांचे कर्णमधुर संगीत आणि सर्वावर कळस म्हणजे सुमनताईंचा भावूक आवाज. सासुरवाशीणीची माहेरविषयी असलेली हुरहुर सुमनताईंनी अगदी अचुक गायली आहे.
हे गाणे कधीहि ऐकले तरी डोळ्यासमोर लगेच गावाकडील एक परस असलेले घर, परसात पारिजातकाचे झाड, कपिला गाय, असे चित्र उभे राहते.
शेवटच्या दोन ओळींबद्दल तर काही लिहायलाच नको."आले भरून डोळे पुन्हा गळाही दाटला, माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला".

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्ष झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आचवलं

फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो
चंद्रकलेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंग हुंगुनिया करी कशी गं बेजार

परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुल वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय

आले भरून डोळे पुन्हा गळाही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला

दिस नकळत जाई.. पुर्वी अरूण दाते यांनी गायलेलं अन सध्या गारवा फेम मिलिंद इंगळे यानी गायलेलं माझ्या अफाट आवडतीचं हे गाणं... रोज जितक्या जास्त वेळा ऐकणं शक्य होईल तितका वेळ मी हे गाणं ऐकतो.

दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही
क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही

संपूर्ण गाणी इथे लिहिणार?>>> लालू संपूर्ण गाणी नाही लिहिली तरी चालेल. पण गाणे तुम्हाला का आवडले त्याबद्दल सांगायचे आहे. Happy
यात नेमके तुम्हाला काय आवडले (शब्द, संगीत, आवाज की सगळेच) तेच सांगायचे आहे.

पु लं नी संगीतबद्ध केलेली २ गाणी : हसले मनी चांदणे - माणिक वर्मा; माझिया माहेरा जा - ज्योत्स्ना भोळे दोन्हीचे गीतकार कवि राजा बढे.

मला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी गाणी आवडतात. त्यामुळे एकच नक्की असे सांगता येत नाही. सध्या ह्रुदयनाथांचे '

वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले गेले......... ते दिन गेले..

हे गाणे आवडतेय.. जराशी संथ चाल आहे या गाण्याची. त्यामुळे मुळचा उदास भाव अजुनच ठळक होतो. याचे कवी कोण आहेत? सारे... मध्ये नाव सांगितलेले पण मी विसरले आता.

या प्रकारच्या गाण्यात मला फडक्यांचे

अंतरीच्या गुढगर्भी एकदा जे वाटले,
एकदा जे वाटले, ते प्रेम आता आटले

हेही गाणे आवडते. प्रत्येक शब्दाचा योग्य उच्चार आणि प्रत्येक शब्दामधुन व्यक्त झालेली भावना गळ्यातुनही तशीच व्यक्त व्हायला पाहिजे हा त्यांचा आग्रह ह्या गाण्यातुन पुर्णपणे प्रत्ययाला येतो.

तशी माझी ऑल टाईम फेवरीट आहेत -

जे वेड मजला लागले, तिजलाही ते लागेल का?
माझ्या मनीची ही व्यथा, कोणी तिला सांगेल का?

आणि

आज प्रितीला पंख हे लाभले रे
झेप घेऊनी पाखरु चालले रे..

स्वप्नात रंगले मी, चित्रात दंगले मी (?? शब्द आत्ताच आठवत नाहीयेत, सकाळीच गुणगुणत होते Sad )
स्वप्नातल्या जगी या, झोपेत जागले मी..

ही आहेत.

'जे वेड..' अशासाठी की त्या गाण्यात जयश्री गडकर प्रचंड गोड दिसते.. हिरो (राजा गोसावी Sad ) तिचेच फोटो प्रोसेस करत गात असतो.. त्या फोटोत आणि गाण्यात दोन्ही ठिकाणी ती खुपच सुंदर दिसते. गाणे नुसते ऐकायलाही अतिशय गोड आहे.

आणि दुसरी दोन आशा आणि फडके यांनी गायलेली अतिशय मधुर अशी गीते. पहिल्या गाण्याची चालही अतिशय गोड आहे..... मी आजवर अनेकदा ऐकलीत ही दोन्ही गाणी पण तरीही परत परत ऐकते. माझ्या सुदैवाने रोज सकाळी १०७.५ एफेमवरच्या रेडीओ जॉकींनाही हीच दोन गाणी भारी आवडतात त्यामुळे आठवड्यातुन एकदातरी मला ही गाणी ऐकायला मिळतात.

साधना,
ही गाणी मलाही खूप आवडतात

कुणाकडे हे गाणे आहे का? (शब्द)

अजून तरळते दृष्टीपुढती ते मोराचे पीस निळे
झिळमिळत्या रंगांचे गारूड अजून मला पुरते न कळे

आजच हे गाणे विविधभारती वर ऐकले
यात शब्द, संगीत, आवाज की सगळेच सुरेख आहे
बरेच दिवसांपासून शोधत होतो

माझी आत्ता पटकन आठवलेली फेवरीट्स
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा- जबरदस्त कल्पना,आणि अर्थातच आशा!
समईच्या शुभ्र कळ्या- एका वेगळ्याच जगात नेणारे गाणे.
सखी ग मुरली मोहन मोही मना- काय अजब चाल आहे!
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात- शब्द,संगीत, आणि आवाजाची एकत्रित जादू.

वेगवेगळी फुले उमलली रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले गेले......... ते दिन गेले..

हे गाणे आवडतेय.. जराशी संथ चाल आहे या गाण्याची. त्यामुळे मुळचा उदास भाव अजुनच ठळक होतो. याचे कवी कोण आहेत?

कवी भवानीशंकर पंडित.

सारेगमपेक्षा आकाशवाणीवर original गाणी ऐकता येतात. पुन्हा टाळ्या वाजवायची सक्ती पण नाही.

कवी भवानीशंकर पंडित.

येस्स्स.. हेच नाव सांगितलेले त्यांनी...
या गीताचे कवी कोण हा प्रश्न मला कधी पडलाच नाही, गाणे लागले की गाण्यातच इतके हरवुन जायला होते की कवी वगैरेपर्यंत पोचलेच नाही..

मी आकाशवाणीवरच ऐकलीत ही सगळी गाणी.. सारे,... त जाऊन मुळ गाण्याचा खुन पाडलेला कोण ऐकेल?? Happy जरी कितीही मुळाबरहुकूम गायले तरी आशा/लता/फडके यांची सर येणार नाही कोणालाच..

जवळजवळ ३० वर्षांपुर्वी मी यशोदा या चित्रपटातली दोन गाणी दुरदर्शनवर पाहिली होती. त्यातले एक

घुमला गगनी निनाद हा.....

हे बहुतेक आशाने गायलेय. हे गाणे तेव्हा दोन-चारदा दाखवले होते. नंतर विविधभारतीवरही चारपाचदा ऐकले. हल्ली बरेच वर्षे मात्र गायबलेय हे गाणे.

त्यातलेच दुसरे

माळते, माळते, माळते मी माळते
केसात पावसाची फुले मी माळते

अतिशय सुंदर चाल आहे या गाण्याची. हे मी दुरदर्शनवर फक्त एकदाच पाहिलेय, पण अजुनही चालीसकट मुखडा लक्षात आहे. हे गाणे नंतर कुठेही ऐकले/पाहिले नाही. नेटवर आठवणीतली गाणी वर वगैरे शोधले पण यशोदा नावाचा चित्रपट आलेला हेच कोणाला माहित नाही, तर गाणी कुठुन माहित असणार? आज परत शोधेन. कुणाला माहित असल्यास लिंक द्या...

घुमला गगनी निनाद हा.....
घुमला हृदयी निनाद हा आहे ना?
संगीत दत्ता डावजेकर. गायिका अनुराधा पौडवाल. (हे फक्त आठवणीतून ;व्हेरिफाय केलेले नाही)
माळते बहुधा अपर्णा मयेकर किंवा रेखा डावजेकर (डी डींची लेक)

गायिका अनुराधा पौडवाल.

??? खरे काय?? मला तर हा चित्रपट खुप्च जुना वाटला. अनुराधाने 'आला आला वारा..' पासुन सुरवात केली ना गायला??
ते गगनी की ह्रुदयी माहित नाही. मुळात गाणे ऐकुनच इत्कई वर्षे झालीत... पण गाण्यात आकाश दिसलेले त्यामुळे कदाचित गगनीही असावे...

जुनाच आहे १९७४ अनुराधाचे मराठीतले पदार्पण . बघा डीडी नी हिंदीत लताला आणि मराठीत अनुराधाला प्रथम संधी दिली.

योगेश ला म्हणालो होतो सवडीने लिहिन, पण रोमात असताना काही पोस्ट वाचल्या म्हणून दाखल झालो.
घुमला हृदयी निनाद हा, अनुराधा पौडवालचेच.

माळते मी माळते, केसात पावसांची फुले मी माळते, वाणी जयराम चे

आणि रेखा डावजेकरचे

मीच मला पाहते, पाहते आजच का ?

तिन्ही यशोदा मधलीच.
बाकिची गाणी, घेऊन परत येतोच आहे.

शपथ या बोटांची - आशा --वसंत देसाई....या गाण्यात शीळ घातलेली आहे ..मराठीतले मला तरी असे एकच गाणे आढळले.

मला जी गाणी पुर्ण मिळाली, ती मी मायबोलीवर लिहिली आहेतच, पण जी फ़क्त
आठवणीत आहेत, ती इथे लिहितोय. कदाचित इथे मला, बाकिचे लोक मदत करु शकतील.

१. माझी न मी राहिले, तूजला नाथा सर्व वाहीले

गायलय लताने. काव्य बहुतेक शांता शेळके, यांचे आहे. गाण्याची चाल खुपच सुंदर आहे.
लताचा आवाड गोड असला, तरी काहि गाण्यात तिची तयारीची गायकी दिसते, त्यापैकी
हे एक. शब्द सुंदर आहेत हे वेगळे लिहायला नकोच.
आठवताहेत त्या ओळी अशा.
पहिली ती भेट होति, फ़ुलले मी गाली ओठी
कळले ना मला वेडीला, वेड लावून प्रिती गेली
रंग रंगातूनी मिसळले, माझी न मी राहिले.


२. आनंद मनी माईना, कसं ग सावरु ?

हे बहुतेक सुमन कल्याणपूरचे आहे. सिनेमातले आहे. सुलोचनावर चित्रीत झालेय.
सुलोचना बहुतेक जिजाबाईचा भुमिकेत आहे. बस्स बाकी काही आठवत नाही
अर्थात्च चाल खुप सुंदर आहे.
आनंद मनी माईना, कसं गं सावरु
घे गगन भरारी पाहे, मन पाखरु, पाखरु

३. दे मला गे चंद्रिके, प्रिती तूझी
रानहरीणे दे गडे, भिती तूझी

अर्थातच लता. उत्तम पण तिनेच गावी अशी चाल. मराठीत दुर्मिळ
अशी सरगम या गाण्यात आहे. जरा अवघड कविता असली, तरी उपमा
सहज कळतात. हे गाणे मी पुर्ण लिहिले आहे, इथे.

४. सखी गं मुरली मोहन मोही मना
गाऊ किती पुन्हापुन्हा, त्याच्या गुणा

आशा किती तयारीची गायिका आहे, त्यासाठी हे गाणे पुरेसा पुरावा आहे.
यातल्या अकारांत ताना, अप्रतिम. तूलनाच नाही. सारेगामात कुणीतरी
गायचा प्रयत्न केला होता.( म्हणजे धाडसच केले होते) हे गाणे धर्मकन्या
सिनेमातले. जयश्री टी वर चित्रीत झालेय. या गाण्याची चाल इतकी अवघड
आहे, कि नृत्यनिपुण असुनही, तिला नाच नाही.
चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा, म्हणजे काय ते हे गाणे ऐकुन कळतेच.


५. पैठणी बिलगुन म्हणते मला, जानकी वनवास गं संपला

वरच्याच धर्माकन्या सिनेमातले हे गाणे. हे फ़ारसे ऐकण्यातले नाही. (संगीत पं
ह्रुदयनाथ मंगेशकर ) गायिका आशा. भैरवीतली अप्रतिम चाल.
शब्द खास नाहीत, पण चाल उत्तम. भैरवी तसा अगदी नेहमीच्या ऐकण्यातला
राग. पण इथे तिला एक वेगळाच रंग चढलाय. हे गाणे सिनेमाची नायिका
अनुपमा वर हे चित्रीत झालेय.

६. परिकथेतील राजकुमारा, स्वप्नी माझ्या येशील का
माझ्याकाळातल्या लहान मुली परिकथांत रमत असत. अजूनही त्यात बदल झाला
नसावा. एक विशिष्ठ वय झाल्यावर, मग त्या परिकथेतील राजकुमाराचे त्यांना
वेड लागते. मन वास्तवाशी फ़ारकत घेऊ लागते. त्या वयातल्या भावना
या गाण्यात अचूक उतरल्या आहेत. त्या काळात, प्रत्येक लहान मुलगी
हे गाणे गुणगुणत असे. हे गायलय कृष्णा कल्ले यांनी
परिकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का ?
भाव दाटले मनी अनामिक, साद तयाला देशील का

कृष्णा कल्ले यांनीच गायलेली आणखी दोन गाणी.

मीरेचे कंकण, भक्तीचे दर्पण
स्मरे ते रंगून, हरीनाम
पायीच्या पैंजणी, बोलतो घुंगरू
कसे मी विस्मरु, हरीनाम

आणि

कशी मी आता जाऊ, जाऊ, जाऊ घरी
सांग मला, सांग मला श्रीहरी, कशी मी आता जाऊ रे

हि दोन्ही गाणी मध्यंतरी गायबच झाली होती. मग एच एम व्ही
ने, गोविंदा रे गोपाला नावाचा संच काढला होता, त्यात ती मिळाली
आणि आता तर कृष्णा कल्ले यांचाच एक संच आला आहे, त्यात हि
तिन्ही आहेत.

७. कोपला का

जयमाला शिलेदार या माझ्या अत्यंत आवडत्या गायिका. चेहरा कायम हसतमुख
गायकी ताकदिची आणि स्वभाव अतिशय प्रेमळ.
चमकला ध्रुवाचा तारा, या नाटकातले त्यांचे हे पद. या पदाची चाल इतकी
अनवट आहे कि आणखी कुणी, हे गायचे धाडस करत असेल असे वाटत नाही.
या गाण्याचे शब्द मला नीट आठवत नाहीत. पण रडवितोस का तूझ्या रे मुला,
जगती ठाई ठाई, अशा ओळी आहेत.

८. लपविला लाल दिनकर गजमणि

स्वयंवर नाटकातले, महाराणी च्या तोंडचे हे पद. हि भुमिका जयमाला बाईच
करत असत.मी प्रत्यक्ष त्यांचा तोंडूनच ऐकले आहे. आणि जयमाला बाईंपेक्षा
कुणी हे चांगले गाऊ शकते यावर माझा विश्वास बसला नसता. पण मग मी
हे पद डॉ कल्याणी देशमुख यांनी गायलेले ऐकले आणि मला मानावेच लागले.
हे पद आहे हिंडोल रागात. (पं भीमसेन जोशींनी गायलेले, रम्य हि स्वर्गाहून
लंका, हे गाणे पण याच रागातले. ) डॉ देशमुखांनी हे गाणे तब्बल साडेसात
मिनिटे गायले आहे. अप्रतिम आवाज लागलाय आणि ताना तर बहारीच्या
आहेत.

९. संथ वाहते कृष्णामाई
सुधीर फ़डक्यांची गाणी आठवताना, सहसा या गाण्याची आठवण कुणी काढत
नाही, पण मला मात्र हे गाणे खुप आवडते. सारंग रागातले हे गाणे, या रागाचा
भाव अचूक पकडते.
संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदु:खांची
जाणीव तिजला नाही.

चला, आता परत कधीतरी

व्वाह! सगळ्यांनीच काय सुंदर सुंदर गाण्यांची आठवण करून दिलीत.

दिनेशदांनी फुल्ल टू खजिना खुला केला Happy

माळते, माळते, माळते मी माळते,केसात पावसाची फुले मी माळते हे नक्कीच वाणी जयराम यांचेच आहे.

माझी न मी राहिले, तूजला नाथा सर्व वाहीले हे गाणे "मंगळसूत्र" चित्रपटातले आहे का? याच चित्रपटात कृष्णा कल्ले यांचे "पुनवेचा चंद्रमा आला घरी, चांदाची किरण दर्यावरी, चांदण्याच्या तोर्‍यात, खार्‍या खार्‍या वार्‍यात तुझा माझा एकांत रे साजना..,..." हे अप्रतिम गाणे आहे.

सखी गं मुरली मोहन मोही मना
गाऊ किती पुन्हापुन्हा, त्याच्या गुणा >>>आज सकाळीच हे गाणे ऐकत होतो.
चंदनाचा गंध येतसे पंचप्राणा, म्हणजे काय ते हे गाणे ऐकुन कळतेच.>>>>> अगदी अगदी

पहिली ती भेट होति, फ़ुलले मी गाली ओठी
कळले ना मला वेडीला, वेड लावून प्रिती गेली
कशी फुलापरी उमलले, माझी न मी राहिले.
चांदण्याचे सूर झाले गायिली मी धुंद गाणी
धुंद होते रातराणी धुंद होत जीव दोन्ही
रंग रंगात मिसळले.
संगीतकार बाळ पार्टे

दशरथ पुजारी, सुमन कल्याणपुर या नावांसोबत, सुरेश भट, असे फक्त मला वाटते, एकाच गाण्याच्या बाबतीत ऐकायला येते.
चल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली
बाहेर चांदण्याला हलकेच जाग आली

भटांची लेखणी पण वेगळाच साज घेऊन आलीय इथे, आणि म्हणूनच हे गाणे या दोघांकडे आले असावे.
गाणे सुंदर आहेच.

भटांची किती गाणी आठवावीत
मालवुन टाक दीप..
लताने या गाण्याला फार उंचीवर नेऊन ठेवलेय. (मी पूर्ण लिहिले आहे इथे )

मग आशा तरी का मागे राहील

मी मज हरपून बसले रे,

तरुण आहे रात्र अजुनी.

मलमली तारुण्य माझे

उषःकाल होता होता

या गाण्यांना तिच्याशिवाय कोण न्याय देऊ शकले असते. एकेका शब्दावर मेहनत घेतली आहे दोघींनी.
भटांवर गेल्याच आठवड्यात ईप्रसारण वर छान कार्यक्रम झाला होता.

पण ही तशी आठवणीतली गाणी. मग काहि विस्मरणात गेलेल्या गाण्यांबद्दल लिहिन.

सुरेश भटांचे आणखी एक गाणे - गझल -मी एकटीच माझी असते कधी कधी
गायिका निर्मलादेवी संगीत श्रीकांत ठाकरे
आशाचे चांदण्यात फिरताना माझा धरलास हात...(सुरेश भट)

कृष्णा कल्ले - ना घ देशपांडे- यशवंत देव
मन पिसाट माझे अडले रे, थांब जरासा

भरत/दिनेशदा,
हे शेवटचे कडवे Happy

सुख माझे ठेवू कोठे, मज माझा हेवा वाटे
नच काही उणे संसारी, किती आनंद हृदयी वाटे
जन्मेजन्मी तुझी जाहले
माझी न मी राहिले......

वाव.. आता वाचायला वेळ नाहीये.. परत एकदा निवांतपणे पाहिन....

योगेश मेल करते. आज्-उद्या खरेच घाईत आहे..

लताच्या कोळीगीतांचा संग्रह जवळजवळ ३५ (जास्तच असतील) वर्षांपुर्वी आला होता. गीतं शांता शेळके यांचीच
होती. त्या वेळी ध्वनिमुद्रिकाच असायच्या. (आणि खास समारंभाना लाउडस्पीकर्स लावले
जात असत.) आज इतक्या वर्षांनीही यातली गोडी कमी झालेली नाही. अजूनही तरुण
मुलांच्या पिकनिक ग्रुपमधे हि गाणी ऐकू येतात. असे लिहून कळणार नाही, पण गाण्याचा
मुखडा लिहिला तर नक्कीच कळेल

मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याच्या राजा
भर पाण्यावरी बंदराला करतो ये जा

खरे तर शांता शेळके मंचरच्या, पण त्यांनी कोळी जीवनातली सर्व प्रतीके, इथे छान वापरली
होती. अंजीरी साडी, चांदिचं म्हावरं वगैरे शब्द छानच होते. या गाण्यासाठी लताबरोबर
हेमंतकुमारचा आवाज का घेतला, असे विचारले गेले. पण त्यापुर्वीही हेमंत कुमारने
मराठी गाणी गायली होती. (मराठी पाउल पडते पुढे, चित्रपट मराठा तितुका मेळवावा.)
यातली बाकीची दोन गाणीही उत्तम होती. पण काहिश्या अवघड चालींमुळे ती गळ्यात
रुजली नाही.

राजा सारंगा, माज्या सारंगा, डोलकरा रं
धाकल्या दिरा रं, चल जावया घरा

एक वेगळाच हळवा आणि नाजूक क्षण या गाण्यात पकडला होता. इथे साजण नसून
धाकला दिर सोबतीला आहे. कोलीवाडा रं राहिला दूर, अशी अवस्था आहे.

तिसरे गाणे होते,

वादळ वारं सुटलं, वार्‍यान तूफ़ान उठलं गो
भिरभिर वार्‍यात, पावसाच्या मार्‍यात
सजणान, होडिला पाण्यात लोटलं

अत्यंत उडती, वादळाचा आभास निर्माण करणारी चाल आहे याची. भिरभिरत्या वाऱ्याची
आठवण करुन देणारी, लताची आलापी आहे.
एकली मी आज घरी बाय, संगतीला माज्या कुनी नाय,
अशी अवस्था आहे,
कोळीगीते लोकप्रिय असण्याचा काळ, खरे तर खुप आधीचा, (त्या काळात गजानन वाटवे,
ज्योत्स्ना भोळे यांनी उत्तम कोळीगीते गायली होती.)

पण लताचा विषय निघालाय तर तिचेच आणखी एक गाणे लिहितो. हे आहे एका चित्रपटातले.
चित्रपटाचे नाव आयलय तूफान दर्याला, जयवंत कुळकर्णी आणि लता असा वेगळाच संयोग
या गाण्यात होता. हे गदिमांचे गीत आहे. मस्त ठेका आहे. लताने अगदी वेगळाच आवाज लावलाय.
गाण्याची सुरवात कोरस करतात मग लता एक आलाप घेऊन, दुसरी ओळ गाते.
तो आलाप तर खासच आहे. लताचा आवाज इतका वेगळा लागलाय, कि खरोखरच एखादी
कोळीण गातेय कि काय, असे वाटत राहते. अर्थात तिने नेहमीप्रमाणेच, उच्चारांवर मेहनत
घेतली आहेच. शब्द साधारण असे आहेत.

आयलय बंदरा चांदाच जहाज,
हवलुबायची पुनीव आज
परसन झायली इक्किरा माय
डोंगरची माय गो, डोंगरची माय,
आयचे लेकराला कमती काय ?
कमती नाय काय कमती नाय.

( मी ज्यावेळी लताच्या शब्दोच्चारांबद्दल लिहितो, त्यावेळी मला ते दिवस आठवतात, कि ज्यावेळी
मी ही गाणी ऐकत ऐकत लिहिण्याच्या प्रयत्न करत असे. त्यावेळी तिचे उच्चार किती स्पष्ट असतात,
ते जाणवायचे. इथेही मला चुकिची ऐकू आलेली गाणी, या बीबीवर तिची गाणी अगदी क्वचितच असतात.)

अशी चांगली गाणी आता कानावर पडणही दुर्मिळ झालय.

सुप्रसिद्ध लोकशाहीर श्री.विठ्ठल उमप यांचे हे खास 'तक्रार गीत' अचानक एका स्थानिक कार्यक्रमीत सादर केलेले पाहिले. त्यातील शब्द इतके चांगले वाटले की, कार्यक्रम समाप्तीनंतर त्या स्थानिक संगीतकाराकडून पूर्ण गीत मिळविले, तेच देत आहे :

"दादा अशी बायको ही काय कामाची ?
करुनशी केली, नात्यामधली
पोरगी ही मामाची !!

आय बाबाचे हट्टासाठी
मीनी झेतली नय आरकाठी
पोर लाऊनशी, दिली पाठी -
आशा मनाशी बालगली मोठी
दादा मी फसलो लरत बसलू -
निवर केली शामाची !!

माजे मामाची, लारकी लेक
नाकी डोली ती भारी सुरेखे
केली पसन ही झ्यायली चुक
लगीन केलं पन, मिल ना सुख
फॅशनवाली, ही घरवाली
आवर तीला सिनेमाची !!

तीची लगाम सोरीली सैल
तर मनाच बनईला बैल
मना समजलं नव्हतं पयलं
आता मन नय थार्‍याव रायलं
आर मुद्दाम, करीना काम
किमत नय घामाची !!

पोरा बालाकर नीट पाहीना
पाय घरमधी हीचा रायना
माजे जीवाचे केली दैना
अरे अनंता, तुलाच चिंता
पुरल्या मुक्कामाची !!

(दुर्दैवाने ज्याच्याकडून हे गीत मिळाले त्यांच्याकडे गीतकाराचे नाव नव्हते, फक्त श्री.उमप यांचाच संदर्भ लागला.)

ज्योत्स्ना भोळे, यांचे नको वळून बघू माघारी, जा रे खुषाल दर्यावरी, हे गाणे पण गाजले होते.
मला वाटते शाहिर दादा कोडके यांचे पण एक छान दर्यागीत होते

नाचे दर्यावर तारु थय थय थय
चारी बाजूनी तूफान भरलय !!

मग रफी आणि पुष्पा पागधरे यांचे

अगो पोरी संभाल दर्याला
तूफान आयलय भारी

हे पण मस्त गाणे होते.
आणि हो पुष्पा पागधरे यांचेच

आला पाऊस, आला पाऊस मातीच्या वासात गं
मोती गुंफीत मोकळ्या केसात ग.

हे गाणे मायबोलीवर पुर्ण लिहिले आहे.

असेच एक शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले व प्रदीप विलास यांनी संगीतबद्ध केलेले आणि हेमंत कुमार व श्यामा चित्तार यांनी गायलेले "दर्यावरी रं तरली होरी रं, तुझी माझी जोरी बरी, साजणा होरीतुन जाऊ घरी रं" सुंदर कोळीगीत.

आला पाऊस, आला पाऊस मातीच्या वासात गं हे तर ऑल टाईम फेव्हरीट गाणे Happy पावसाळा नसला तरी माझ्या प्लेलिस्टमध्ये नेहमी असलेले Happy

Pages