प्रभात रोड, भांडार कर रोड गल्ल्यांचे रुंदीकरणः खरंच गरज आहे का?

Submitted by अश्विनीमामी on 14 January, 2021 - 00:14

पुण्यातील रम्य अश्या प्रभात रोड व भांडारकर रोड भागाचे वैशि ष्ट्य म्हणजे ह्या भागातील जुनी टुमदार घरे, सोसायट्या व शांत गल्ल्या. काही टू वे आहेत तर काही डेड एंड. ह्या भागात वर्दळ व वाहनांची गर्दी वाढल्याचे कारण देत पुणे महापालिकेने ह्या गल्ल्या रुंद करायचा घाट घातला आहे.

प्रभात रस्ता परिसरातील दहा गल्ल्यांमधील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर करण्यात येणार आहेत. तसेच भांडारकर रस्ता परिसरातील गल्ल्यांमधील रस्त्यांचे रुंदीकरणही प्रस्तावित आहे. याविरोधात नागरिकांनी महापालिकेकडे हरकती-सूचना दिल्या आहेत. गल्लीबोळातील रस्त्यांवर हरित कवच आहे. हा भाग शांत असून गल्लीबोळातील रस्त्यांवर वाहतुकीचा ताण नाही. रस्ता रुंदीकरणामुळे वृक्षराजी नष्ट करावी लागणार आहे. काही सोसायटय़ांमधून रस्ते जाण्याची भीती आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण नको, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. मात्र हा विरोध डावलून रस्ता रुंदीकरणाचा घाट महापालिकेने घातला आहे. प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १४ या गल्ल्यांमधील रस्ता रुंदीकरण नियोजित आहे. तसेच भांडारकर रस्त्यावरील काही गल्ल्यांमधील रस्ता रुंदीकरणासंदर्भातही महापालिकेने संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली आहे. प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्ता परिसरात मिळून जवळपास तीस गल्ल्या आहेत.

शहरातील ६ मीटर रुंदीचे ३३५ रस्ते ९ मीटर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्याबाबत जाहीर प्रकटन देण्यात आले असून हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. अस्तित्वातील मोठे रस्ते रुंद करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावाही करण्यात आला होता. प्रत्यक्षात मोठे रस्ते सोडून गल्लीबोळातील रस्त्यांवर घाला घातला जात आहे. नागरिकांचा विरोध असताना आणि त्याबाबत हरकती नोंदविण्यात आल्यानंतरही रस्ता रुंदीकरणासंदर्भातील नोटिसा महापालिकेने दिल्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा घाट नक्की कोणासाठी घातला जात आहे, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात असून रस्ता रुंदीकरणाची ही प्रक्रिया वादग्रस्त ठरणार आहे. मुळातच वाहतूक नसलेल्या गल्लीबोळातील रस्त्यांचे रुंदीकरण का केले जात आहे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सहा मिटर रुंदीची गल्ली ९ मीटर रुंद करण्यात अनेक घरा सोसायट्यांचे पुढचे गार्डन नाहिसे होईल. व धूळ व प्रदुषण वाढेल. महत्वाचे
म्हणजे त्या भागातली रम्य शांतता नाहिशीच होईल. माझे पुण्यातले बालपण व किशोर वय ह्या गल्ल्यांमधे बाग ड ण्यातच गेले आहे. घर,
शाळा, क्लास मित्र मैत्रीणींची घरे, बागा ह्या सर्व ह्याच भागात आहेत. विकासाचा रेटा मला कळतो पण ते खास वातावरण आता एकदम नाहिसे होईल म्हणून वाइट वाटले. कालाय तस्मै: नमः रुंदीकरण होण्या आधी एक व्हिडीओ घेउन ठेवावा.

पुणेकर ह्या बद्दल निषेध नोंदव त आहेतच पण आपले काय मत?

मूळ बातमीची लिंक

https://www.loksatta.com/pune-news/notice-to-residents-of-bhandarkar-roa...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी!
यात खूप मोठी मेख आहे. काही वर्षात या ठिकाणचे बंगले, जुन्या इमारती यांचा पुनर्विकास होईल, तिथे वाढणारी लोकसंख्या, वाहतूक या करता हि सगळी सोय आहे. जागा विकासक या सगळ्या मागे आहेत, कारण यात खूप मोठे अर्थकारण दडलेले आहे.

त्या भागातली रम्य शांतता नाहिशीच होईल.
आणि
ह्या भागात वर्दळ व वाहनांची गर्दी वाढल्याचे कारण देत .....

या दोन्ही वाक्यांचा आपसात ताळमेळ लागत नाही.
शांत गल्ली म्हणजे वर्दळ कमी मग तिथे रुंदीकरणाची गरजच बाद होते..

की खरोखर वर्दळ वाढली आहे तिथे पण कोणे एके काळी तिथे असलेल्या शांततेशी आपले भावनिक नाते जोडले गेले असल्याने ते तसे वाटत नाहीये हे तपासून बघायला हवे.

जागा विकासक या सगळ्या मागे आहेत, कारण यात खूप मोठे अर्थकारण दडलेले आहे. >>> +१
६ च्या ९ मी. रुंद गल्ल्या झाल्या की वाढीव एफएसआय प्रमाणे बांधकाम करता येते हेच त्यामागचे कारण असावे असे मानण्ण्यास जागा आहे.

ॠन्म्या तुला कारण देत चा अर्थ न कळायला ते इंग्रजीत नाहीये लिहिलेले.
रम्य आणि शांतच आहेत ह्या गल्ल्या आणि तरीही वर्दळ व वाहनांची गर्दी वाढल्याचे कारण देऊन गल्ल्या रुंद करण्याच्या घाट घालत आहेत.

अख्ख पुणे वाढत असताना सगळीकडे रुंदीकरण होत असताना फक्त प्रभात रोड भांडारकर रोड असे काय स्पेशल आहेत की त्यांना ह्यातून सूट मिळावी. माझ्या माहिती प्रमाणे प्रभात रोड भांडारकर रोड हे डेक्कन परिसराच्या आसपास आहेत जे पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहराचा मध्यवर्ती भागातच रुंदीकरण नाही करायचं मग कुठे करायचं???

शहराचा मध्यवर्ती भागातच रुंदीकरण नाही करायचं मग कुठे करायचं???>> रस्ते रुंद करुन भागलं असतं तरं

करतायत तर रुंदेकरण करु द्यावे अन ते एकदा झालं की आपल्या कार साठी सोसायटीच्या बाहेरील वाढीव रोडवर छापा मारून पार्किंग ताब्यात घ्यावे. फुकटात पार्किंग मिळेल याची १००% गॅरेंटी वर मध्यवर्ती भाग म्हणजे सीसीटीव्ही असतील त्यामुळे गाडीसाठी २४ तास फुकटचा वॉचमन उपलब्ध राहील.

शहराचा मध्यवर्ती भागातच रुंदीकरण नाही करायचं मग कुठे करायचं??? >>> झम्पू, तुम्ही पुण्याचे आहात का? या गल्ल्यांमधुन फिरता का? हे तिरकसपणे विचारत नाही, तर प्रत्यक्षात अनुभवलं आहे का हे विचारायचं आहे.
मुख्य प्रभात रोड आणि भांडारकर रोड रुंदीकरण करायचं असतं तर लोकांनी विरोध केला नसता पण रहिवाशांना inconvenience आणि झाडतोड करून गल्ल्यांचे रुंदीकरण याला विरोध आहे. जेव्हा दत्तवाडीकडुन म्हात्रे ब्रिजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे रुंदीरकरण झाले तेव्हाही दोन्ही बाजुच्या बंगल्याची कंपाउंड्स आत दाबली गेली. बागा गेल्या. कित्येक बंगल्याममधुन बाहेर आलं की डायरेक्ट फुटपाथवर अशी परिस्थिती आहे, पण तेव्हा विरोध झाला नाही. वाहतुक सुरळीत करण्यासाठी ते अत्यावश्यक होतं. पण डेक्कनला गल्ल्यांमधे रिंग रोड सिस्टीमची ट्रायल घेऊन मग योग्य तो निर्णय घेण्याअगोदरच रस्ता रुंदीरकरण ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे नरेन सांगितलेली शक्यता जास्त दिसते.

जिथे रस्ता रुंदीरकरण गरजेचं आहे आणि शक्य आहे तिथे कानाडोळा करून जिथे कमी गरज आणि पर्यावरणाचं नुकसान आहे तिथे घाई का? उदा. हचिंग्ज स्कुल कडुन सॅलीसबरीच्या चौकात आलं की भर चौकात डावीकडे जो प्रचंड बंगला आहे त्याच्या कंपाउंड वॉलने एक धोकादायक ब्लाइंड कॉर्नर तयार झाला आहे. रस्ता पण खुप विचित्र वळतो आणि अरुंद झाला आहे, पण हे बंगले आर्मी ऑफिसर्सचे असल्याने कोणीही हात लावत नाही. खरं तर ते गार्डन एवढं मोठं आहे की त्या गार्डनमध्ये सतत 150-200 लोक मावतील अशी फंक्शन्स आणि पार्टीज चालु असतात. त्यामुळे कंपाउंड थोडं आत ढकलल्याने फार फरक पडणार नाही. पण गव्हर्नमेंट स्वतःच्या प्रॉपर्टीज तोडताना मात्र विचार करणार.

नरेन, विचार करायला लावणारी आणि लॉजिकल पोस्ट. खरंच खुप बांधकाम व्यावसायिकांचा या जुन्या बंगल्यावर डोळा आहे. डेक्कनला बिल्डिंग म्हणजे तुफान पैसा.

स्ते रुंद करुन भागलं असतं तरं
टिपिकल पेठेतली मनोवृत्ती. जगात सहा लेनचे हायवे झाले तरी ह्यांना बोळातून गाडी ( गाडी पण Activa) चालवायलाच मजा येणार.

अख्ख्या जगात डाऊनटाऊन मधल्या जागा conserve करतात आणि आपल्याला त्या जागा पाडून बकालपणा वाढण्यातच प्रगती वाटते.

प्रभात रोड आणि भांडारकर रोड downtown Lol Lol

शिवाजी जन्मवा पण शेजारच्या घरात हीच मानसिकता आहे विरोध करण्या मागे. इतर वेळी मेट्रो, ट्रॅफिक, प्रदूषण, गुन्हेगारी अशा प्रश्नावर जाब विचारणारे लोक, जेंव्हा विकास ह्यांच्या दारात येतो तेंव्हा, नको आम्हाला विकास आमचं आमचं जुनं राहू द्या अशी मानसिकता दाखवतात.

धरण बांधण्या साठी शेतकऱ्यांनी जमिनी देणे कसे गरजेचे आहे.
रस्ते बांधण्यासाठी जमिनी देणे कसे गरजेचे आहे.
मेट्रो साठी जंगल तोडणे कसे गरजेचे.
हे पटवून सांगणारे स्वतः वर वेळ आली की वेगळीच भूमिका घेतात.
हे फक्त प्रभात रोड वाल्यांची रीत नाही
मुंबई मध्ये पेडर रोड वाल्यांनी पण अशीच भूमिका घेतली होती.

इथे एक मोठा टॉवर बांधून सर्व रहिवासी त्यात हलवावे. उरलेल्या जागेत जगातील सर्वात मोठी बाग बनवावी. आतापेक्षा 10 पट झाडे लावा. प्रशस्त रस्ते, निसर्गोपचार केंद्र, नाट्यगृह, संस्कृति संग्रहालय असावे. एक विमानतळ, हेलिपॅड, अप्पूघर असे सर्वच असावे.

किंवा अंबानी अदानी समूहाला देशहितासाठी जागा देऊन सर्वांना तेव्हढी मोठी घरे पाटस, नारायणगाव, जेजुरी अशा ठिकाणी फुकट बांधून द्यावीत.

जागा विकासक या सगळ्या मागे आहेत, कारण यात खूप मोठे अर्थकारण दडलेले आहे. >>> +१
>>>
हे पटण्यासारखेच कारण आहे. पण यात प्रॉब्लेम काय आहे?
विकासाला विरोध का?
जर बैठी घरे, बैठ्या वस्त्या पडून त्या जागी ऊंच ईमारती उभ्या राहणार असतील तर चांगलेच आहे की..
एखादे जंगल तोडून, वृक्षतोड करून वा जलाशयात भर घालून नवीन उभारण्यापेक्षा हे चांगलेच आहे की..
मला पुण्याचे काय माहीत नाही, त्यामुळे हा परीसर कसा आहे हे नेमके माहीत नाही, पण मुंबईत असे डेव्हलपमेंट बरेच झाले आहे. आमच्याही ३ पैकी २ घरांचे डेव्हलपमेंट झाले आहे. ३ आणि ४ माळ्यांच्या बिल्डींगचे १५ आणि ३६ माळ्यांचे टॉवर झाले आहेत.
आता डेव्हलपमेंट होणार तर बिल्डर लॉबी, चार उद्योगपती, सरकारी कर्मचारी मिळून पैसे छापणारच, ती सिस्टीमच आहे आपल्यात. पण कोणीतरी पैसे कमावतेय म्हणून विरोध केला तर अश्याने विकासाची काहीच कामे होणार नाहीत.
शांत परीसर कोणालाही आवडतोच, पण वाढत्या गरजेसमोर कॉम्प्रोमाईज करावे लागणारच.
ईमोशनल अटॅचमेंट आणि वैयक्तिक आवड ईतकाच मुद्दा पहिल्या नजरेत दिसत आहे की आणखी काही कारण आहे हे त्या भागातील लोकं समजावू शकतील का?

खोथरुडात नव्वदच्या दशकापर्यंत सारी झाडीच होती बऱ्याच भागात. भरपूर लोकांनी प्रति गुंठा किरकोळ दराने जागा घेतल्या त्या भागात. आता तिथे काय परिस्थिती आहे ते सर्वजण पाहतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हिरवळ सम्पली पण कोणी आवाज उठवलेला ऐकला नाही. विशेष म्हणजे वर उल्लेख केलेल्या भागात राहणारे बांधकाम व्यावसायिक पुण्यात साऱ्या भागात बांधकामे करत असतात.

किंवा अंबानी अदानी समूहाला देशहितासाठी जागा देऊन सर्वांना तेव्हढी मोठी घरे पाटस, नारायणगाव, जेजुरी अशा ठिकाणी फुकट बांधून द्यावीत.
Lol Lol

'जिथे रस्ता रुंदीरकरण गरजेचं आहे आणि शक्य आहे तिथे कानाडोळा करून जिथे कमी गरज आणि पर्यावरणाचं नुकसान आहे तिथे घाई का? '
इथे ' रस्तारुंदीकरण' ऐवजी फक्त ' मेट्रो रेल वे ' असा शब्द घातला की आरे मेट्रो का नको ते कळेल.
रस्त्यांच्या रुंदीकरणाविषयी मुंबईत (उपनगरात) पाहिले आहे की सोसायटी मेंबर्सच ( मुंबईत बंगले नाहीत) रुंदीकरणाचा आग्रह धरतात कारण थोडी जमीन गेली तरी ३.१४ एफ एस आय मिळतो आणि बिल्डर्स धावत येतात. मुंबईत आता मध्यम मोठे फ्लॅट्स घेणे सुद्धा बहुतेकांना शक्य नसते. तेव्हा निदान पुनर्विकासात तरी मोठी जागा मिळेल अशी मूळ सदस्यांची अपेक्षा आणि त्यांना आशा असते.

ऋन्मेष,
त्या भागातली रम्य शांतता नाहिशीच होईल.
आणि ह्या भागात वर्दळ व वाहनांची गर्दी वाढल्याचे कारण देत .....
या दोन्ही वाक्यांचा आपसात ताळमेळ लागत नाही.
>>>

ताळमेळ नाहीच लागला का अजून ?
का भावनिक कारणांमुळे आणि वैयक्तिक आवड म्हणून कबूल करायचं नाहीये. Wink

आपण जिथे राहतो त्या भागात.
1) वाहनांची वर्दळ कमी असावी
2) प्रचंड मोठी बाग असावी.
3)फेरीवाले नसावेत.
4) पूर्ण भाग हिरवागार असावा.
अशी सर्व च लोकांची इच्छा असते आणि सर्वच लोकांची गरज पण असते.
प्रभात रोड ल जे नियम लागू होतील तेच नियम शहरातील सर्व च भागांना लागू होतील
फक्त एकच वस्ती साठी विशेष नियम असावेत ही मागणी अयोग्य आहे.

उलट शहरातील त्या मध्यवर्ती ठिकाणी पी.एम.पी.एम.एल. चा मोठा डेपो आणि शहरातील सर्व भागात बसेस जाण्यासाठी बसेस उपलब्ध करुन देणारे प्रशस्त असे मध्यवर्ती बस स्थानक बांधावे जेणे करून शहराच्या बाहेरील भागातून मध्यवर्ती भागात कामासाठी/ खरेदीसाठी/ मनोरंजनासाठी/ नोकरीसाठी/ असेच फिरण्यासाठी लोकांना बसेस उपलब्ध होतील आणि वाहतुकीत सुसुत्रता देखील येईल. या बसेस रुंदीकरण केलेल्या गल्ल्यांतून वेगाने धावू शकतील अन त्यांना घाबरून गल्ली बोळातून बेदरकार वाहन चालवणार्‍यांना आपोआप आळा बसेल.

Pages