रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी

Submitted by अस्मिता. on 11 December, 2020 - 19:23

रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी

पश्चिम बंगालबद्दल प्रचंड, प्रचंड आकर्षण वाटतं त्याची मुख्य कारणं म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दक्षिणेश्वरी , रवींद्रनाथ टागोर व शांति निकेतन ... मी मागच्या जन्मी बंगाली होते बहुतेकं !

रवींद्रनाथांनी ज्या पद्धतीची लेखन व काव्यनिर्मिती केली आहे , केवळ अद्भुतं ! त्यांच्या नायिका तर आजही खऱ्या वाटतात , कालबाह्य असूनही त्यांचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व कुठेतरी मनात मुरतंच. कालबाह्य म्हणताना वाटतं की खरंच अगदिच कालबाह्य आहे का कारण अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे स्त्रियांना , माझ्या दृष्टीने ज्याला ध्येय म्हणता येईल ते कधीकधी एक प्रकाशवर्ष दूर आहे असं वाटतं. सध्या समाज म्हणून ढोबळमानाने आपण, दारू पिऊन मारत "तर" नाही/ नोकरी "करू" देतो / "शिकू" देतो / बाहेरचं "सुद्धा" खातो / मतं "सुद्धा" विचारतो / घरात "मदत" करतो म्हणजे मी/हा मर्यादा पुरूषोत्तम आहे या स्टेशनावर कुठेतरी लटकतं आहोत. ही मर्यादा पुरूषोत्तम उपमा लिंगनिरपेक्ष आहे हं ! कुठेतरी स्त्रियांनी पण या मान्यतांना रूढी/दैव/नैसर्गिक कल समजून यांचे पोषण केलं असणारंच म्हणूनच ते ध्येय प्रकाशवर्ष . नाहीतर मगं मला बिनोदिनी आणि चारूलताला अजिबात समजून घेता आलं नसतं नाही का , पणं येतयं..यातचं काय ते आलं.

रवींद्रनाथांच्या या दोघी नायिका माझ्या सर्वांत आवडत्या , या दोघींपैकी एकीला निवडणे म्हणजे माझा कुठला डोळा मला अधिक आवडतो हे ठरवणे , तरीही मी 'चोखेर बाली'तल्या बिनोदिनी पासून सुरवात करतेयं.
'चोखेर बाली' ही कथा चार व्यक्तिरेखांभोवती फिरते पण एक पाचवी अदृश्य व्यक्तिरेखा आहे याकथेत ती म्हणजे त्याकाळातले विधवांचे जीवन. ते सतत अवतीभवती असतंच ज्याच्यामुळे कुणालाचं न्यायं मिळत नाही , रादर मिळणार नाही हे माहिती असूनही आपणं गुंतत जातो. कारण या व्यक्तिरेखांचे ते गुणदोष आपण स्वतःतं बघू शकतो.

1_28wGh8oy0Wxovjii10MzqQ.jpeg.jpg

बिनोदिनी , बिहारी, आशालता व महिन्द्रबाबू (महिन) या चौघांची ही कथा आहे. महिन हा एक स्खलनशील, स्वतःव्यतिरिक्त कुणावरही प्रेम नसणारा आत्मकेंद्री तरुणं आहे. ज्याच्या विधवा आईने त्याला एकट्याने लाडाकोडात वाढवून प्रसंगी इतरांना त्याच्यासाठी त्याग करायला भाग पाडले आहे. बिहारी हा त्याचा जवळचा मित्र आहे पण महिनने वेळोवेळी त्याचा फक्त वापर केला आहे. बिहारीचे सौजन्य इतके मोठे आहे की हे लक्षात येऊनही हे नाते त्याने टिकवलयं.

महिन हा उच्चशिक्षित असल्याने त्याची आई त्याचे लग्न त्याला आवडेल अशा तिच्याचं जवळच्या मैत्रिणीच्या अनाथ मुलीशी बिनोदिनीशी ठरवते. बिनोदिनी ही त्या काळाच्या मानाने बरीच शिकलेली व गायनवादनात प्रविण अशी सुविद्य व सुस्वरूप तरुणी असते. पण महिन तिला न बघताचं लग्नाच्या चार दिवस आधी 'मी लग्नासाठी तयार नाही' हे कारण पुढे करून लग्न मोडतो. याकारणाने बिनोदिनीचे लग्न कुणाशी तरी उरकण्यात येते व तिच्या नशिबी लगेचच वैधव्य येते. या काळात बिहारीसाठी पण एका अशिक्षित खेडूत मुलीशी आशाशी विवाहाचा प्रस्ताव येतो. आशा बिहारीला आवडते पण महिन आशाच्या मोहात पडून स्वतःच बोहल्यावर उभा रहातो. महिनच्या आईला आशा कधी आवडलेलीचं नसते , नंतर महिन दुरावल्याचे कारण आशाचं आहे असं वाटून महिनची आई दुसऱ्या गावी निघून जाते जिथे त्यांना बिनोदिनी भेटते. कुठेतरी त्या बिनोदिनीच्या अशा परिस्थितीला स्वतःला जबाबदार मानतात व तिच्याशी जवळीकं वाढवतात. स्वभावातल्यां गोडव्यानी व गुणांनी बिनोदिनीही त्यांना आपलेसे करते.

केवळं बिहारीने आर्जवं केल्याने महिन स्वतःच्या आईशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्कात रहातो. ती सगळी पत्रं व त्यातील महिन व आशा यांच्या सुखी वैवाहिक जीवनाची वर्णनं बिनोदिनी त्यांना वाचून दाखवतं असते. इथेचं मत्सराग्निची ठिणगी पडते. जे सुख आज माझं असतं ते आज कुणीतरी अशिक्षित मुलगी भोगतेयं या विचाराने बिनोदिनी अस्वस्थ होते. आपल्यालाही हे पटतं, हळूहळू याचं मत्सराग्निने प्रतिशोधाचा वणवा पेटतो.

बिनोदिनी मनाशी काहीतरी निश्चित ठरवून महिनच्या आईसोबत त्यांच्या घरी येते. तिथे ती भोळसट आशाशी मैत्री करते , त्या हेतुपुरस्सरं मैत्रीला ती 'चोखेर बाली' हे नावंही देते , सरळसरळ अर्थाने डोळ्यातलं खुपणं , पणं हे 'तुझे सुख मला नाही नं बघवतं', या अनुशंगाने आहे. बिनोदिनीकडे रूपगुणबुद्धी सर्व तर आहेच शिवाय ह्याची तिला सार्थ जाणीव सुद्धा आहे. ही जाणीव कथेत तिला आणखी डिझायरेबल , हवीहवीशी बनवते. त्यामुळे कुठेतरी याचा तिनं स्वतःच्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी वापरं करणं सहजं वाटतं. शिवाय महिन व बिहारी यांच्या बौद्धिकचर्चेत ती व्यवस्थित भाग घेऊ शकते, आशा नाही. आशा स्वतःहून कुठेतरी अलिप्त होतं जाते. त्यामुळे महिनला , जो आधीच नीतीमुल्यांच्या बाबतीत यथातथाच आहे , प्रेमात-मोहात पाडणं तिच्यासाठी फारचं सोपं होतं. महिन व बिनोदिनीचे कायिक प्रेमसंबंध होतात पण त्यावेळेस ती बिहारीकडे खरोखरचं आकृष्टं होते. त्याच्याशी तिला मनमोकळे बोलता येत असते. फक्त दुस्वासी महत्त्वाकांक्षेपोटी ती महिन सोबत असते , ते प्रेम नसतं... ना महिनचं कुणावरं प्रेम असतं ना आशावर ना बिनोदिनीवर ना बिहारीबद्दलं त्याला काही वाटत असतं !

MV5BMWI1ZTcyOTEtY2Q3Ni00YmUyLWI2ZWMtNzlkNGQ2YTMyZjZmXkEyXkFqcGdeQXVyMzU4MTE1OTM@._V1_.jpg

बिनोदिनीसाठी महिन आशाला माहेरी जायला भाग पाडतो. इकडे त्याच्या आईला ह्या गोष्टींची कुणकुण लागते. बिहारीला स्वतःलाही बिनोदिनीबाबतं नक्की काय वाटते हे कळत नसल्याने तो आशा आणि महिनच्या संसारात विष कालवल्याबद्दल बिनोदिनीला अपराधी मानतो व तिथून निघून जातो. प्रतिशोधाचा वणवा शांत झाल्याने बिनोदिनीला हे निरर्थक आहे हे लक्षात येते. तोपर्यंत तिची "कीर्ति" समाजात पसरते , ती विधवाश्रमात निघून जाते. तिथेही महिन तिच्या मागे येतो व तिला एकत्र होण्यासाठी विनवण्या करतो . त्याच्या मदतीने रागावून निघून गेलेल्या बिहारीला शोधता येईल असे वाटून बिनोदिनी खोटंच तयार होते. हे कळल्यावरं महिन कपटाने त्यांची भेट होऊ देत नाही व तिला सोडून परत आशाकडे येतो. आशाशिवाय त्याला कुणी नाही हे त्याच्या लक्षात येतं. आशा आणि आई ह्या तर आनंदाने त्याचा स्वीकार करण्यास तयारचं असतात.
MV5BOTk4OWI0MjctNjdkMy00OWY1LWIzZDMtZDQxZDhmNmU1YmU0XkEyXkFqcGdeQXVyODI1ODQ2MzY@._V1_UY1200_CR751,0,630,1200_AL_.jpg

निर्धनं व निराधारं बिनोदिनीचे आयुष्य पुन्हा मांजा तुटलेल्या पतंगासारखे दिशाहीन होते. तिच्या आधुनिक विचारांमुळे तीन पांढऱ्या साड्यांचे चौथ्या पांढऱ्या साडीतले गाठोडं घेऊन या विधवाश्रमातून त्या विधवाश्रमात तिची हकालपट्टी होतं असते. अचानकचं कित्येकं वर्षांनी एका स्टेशनवर तिची बिहारीशी भेट होते. महिनने बिहारीलाही बिनोदिनी टायफॉईडमध्ये निवर्तली असं सांगितलं असतं. या अचानक भेटीने मनं पुन्हा स्वच्छं होतात. इथेचं बिनोदिनी म्हणते की मी जरं सुशिक्षित विचारी नसले असते तर बरं झालं असतं निदान समाजाच्या उपेक्षा अन्याय वाटल्या नसत्या व दैव समजून सहन करनं सोपं झालं असतं. बिहारीला चुकवून इथूनही ती निघून जाते. विधवांच्या विकासासाठी उर्वरित आयुष्य वेचते. या गोष्टीचा अंत बिनोदिनीच्या आयुष्यासारखाचं अधांतरी रहातो.

*******

रवींद्रनाथांना एक संवेदनशील लेखक म्हणून याचा शेवट बिहारी व बिनोदिनी एकत्र आलेले दाखवण्याचा मोह झाला असणारचं , अशी वदंताही आहे. पणं या कथेने सुद्धा गदारोळ झाला होता , त्या काळात विधवेला नायिका करून तिच्या इच्छांना अधोरेखित करनं सुद्धा साहस होतं. कधीकधी असंही वाटतं की काळाच्या फारही पुढे जाण्याचा प्रयत्न करता येत नाही , समाजात राहून समाजाच्या कलाकलाने असे बदल घडवण्यासाठी प्रेरितं करणारं साहित्य निर्माण करावं लागतं. नाहीतर समाजाने बहिष्कृत केल्याने सगळंच वाया जाऊन आपणं अजून मागे जाण्याची भीती असते. कुठल्याही सिस्टीमला, यंत्रणेला त्या यंत्रणेच्या बाहेर राहून बदलता येणं अशक्यं होऊन बसते. त्यामुळे काही वेळेला सावधं रहाणे, नमते घेणे हीच दुरदृष्टी असते.

महिन, आशा व आईकडे पर्यायाने समाजात मानाने परत जाऊ शकला. पुरुषानं मर्यादांची कितीही मोडतोड केली, तरी त्याला ती क्षम्य , कारण क्षमा करायला स्त्री आहे हा आग्रह व विश्वास! उद्या जर या मर्यादा स्त्रीचं झुगारून द्यायला निघाली, तर सगळ्यां व्यवस्थाच निराधार व्हायच्या. हे मोठे संकटच नाही का, त्यापेक्षा स्त्रीनं कसं सदैव आज्ञाधारक राहावं. हळवं बोलावं, गहिवरावं, हुंदके द्यावेत, तळमळावं, त्याकरता आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या परावलंबी रहावं हे सर्वांच्या सोयीचं होतं . या सोयीला संस्कृती असं गोड नाव देऊन ठेवलयं. 'या'ला संस्कृती मानण्याने खरी संस्कृती कोणती हेही कळणार नाही. हे त्याकाळातं तर असायचं , दुर्दैवाने अजूनही हे चित्र दिसतंच.

जेव्हा जेव्हा तू स्त्री आहेस म्हणून तुला स्वयंपाक/संसार/ संगोपन/नटनंमुरडणं/दागदागिने/साड्या/कुलधर्म कुलाचार/पाहुणचार इत्यादी आवडले"च"/ केलं"च" पाहिजे असं कुणी विचार करतं असलं की उलट्या दिशेने पण
बिनोदिनीची चरफडं किंचित समजून घेता येते. पुन्हा काही गोष्टींना किंमत दिली नाहीचं तर त्यावरं स्त्री म्हणून जोखलेले योग्य वाटत नाही. स्त्रीपुरुष सर्वांना नीतीमुल्यांचे एकचं परिमाणं असनं आदर्श वाटतं. एखादी गोष्ट स्त्रीने फक्त ती स्त्री आहे म्हणून केलीच पाहिजे किंवा नाहीच केली पाहिजे ह्या दुराग्रही चौकटी पटत नाहीत. चौकटी नकोच !!

प्रदीर्घकाळं घेतलेली अशी छोटी छोटी पावलंही मैलाचा दगड ठरू शकतात. ही कादंबरी १९०३ साली लिहिली होती , त्यानंतर शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी 'चरित्रहीन' ही विधवांवर , नायिकाप्रधान असणारी यापेक्षा पुढचं साहसं असणारी कादंबरी १९१७ साली लिहिली. कुठेतरी त्या मागची प्रेरणा बिनोदिनी असेलही !

मी 'चोखेर बाली' कादंबरी वाचलेली नाही. त्या कादंबरीबद्दलं वाचलंय व नेटफ्लिक्सवरीलं
'स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागौर' या मालिकेची पारायणं केली आहेत. राधिका आपटेने सुरेखं काम केलयं. या लेखात 'बिनोदिनी' या व्यक्तिरेखेच्या आकलनात काही त्रुटी किंवा अपूर्णता असतीलही , तरीही मी या कथेबाबत केवळं मला आस्था आहे म्हणून लिहिलंय. बिनोदिनीचे व तिच्यासारख्यां अनेक खऱ्यां नायिकांचे सुद्धा आभार कारण त्यांच्यामुळे मी बऱ्याचं गोष्टींकडे कृतज्ञतेने बघू शकते.

आभार Happy !
©अस्मिता

*संदर्भ

* In Chokher Bali, Tagore draws parallels between the educated and the uneducated through Asha and Binodini. According to Mary Wollstonecraft “girls that have been… weakly educated are often left by their parents without any provisions”. Binodini is likewise left without any financial provision, but is left with education which allows her the liberty of free thinking. Binodini represents a new female subjectivity whom western education transforms into a woman with her own heart and mind, and is not tied to traditional customs. 

*https://stateoftalent.org/topic/fa7413-book-review-of-rabindranath-tagore

* https://www.google.com/amp/s/feminisminindia.com/2019/02/15/chokher-bali...

* चित्रं आंतरजालावरून साभार.
वेमा प्रताधिकार भंग होत असतील तर सुचवणे, काढून टाकण्यात येतील. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय.
मागे एकदा दिवाळी अंकात टागोरांच्या नष्टनीड बद्दल वाचले होते.
ती त्यांच्याच आयुष्याशी निगडीत आहे असे लेखात म्हटले होते.
या कादंबरीवर आधारित चारुलता हा चित्रपट सत्यजित राय यांनी काढला होता

धन्यवाद अंजली , धन्यवाद कुमारसर !
@कुमारसर
नष्टनीडबद्दल नव्हतं माहिती , पण चारूलतावरचा सिनेमा ठाऊक होता. तो ठाकूर यांच्या जीवनाशी निगडीत होता हे ऐकलं होतं पण त्याबाबत मत बनवता आलं नव्हतं. थोर व्यक्तींबद्दल समाजात चर्चा होतातचं , असं वाटून फार खोलात गेले नाही.
असो. नष्टनीड शोधते आता, आभार !

खूप खूप आवडला लेख. चोखेर बाली वाचून बरीच वर्षे झालीत. आता पुन्हा वाचायची इच्छा झालीय. अशी पुस्तके बऱ्याच गॅप नन्तर वाचली तरी काहीतरी वेगळं,मागच्या वेळी न उमगलेलं सापडतं.

पुरुषानं मर्यादांची कितीही मोडतोड केली, तरी त्याला ती क्षम्य , कारण क्षमा करायला स्त्री आहे हा आग्रह व विश्वास! उद्या जर या मर्यादा स्त्रीचं झुगारून द्यायला निघाली, तर सगळ्यां व्यवस्थाच निराधार व्हायच्या. हे मोठे संकटच नाही का, त्यापेक्षा स्त्रीनं कसं सदैव आज्ञाधारक राहावं. हळवं बोलावं, गहिवरावं, हुंदके द्यावेत, तळमळावं, त्याकरता आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या परावलंबी रहावं हे सर्वांच्या सोयीचं होतं . या सोयीला संस्कृती असं गोड नाव देऊन ठेवलयं. 'या'ला संस्कृती मानण्याने खरी संस्कृती कोणती हेही कळणार नाही. हे त्याकाळातं तर असायचं , दुर्दैवाने अजूनही हे चित्र दिसतंच. >>>
पूर्ण परिच्छेदाला अनुमोदन.

चांगला परिचय. ~२ वर्षापूर्वी ही मालिका बघितली होती. रविंद्रनाथांच्या कथांना आता सव्वा शतक उलटून गेलं तरी त्या कथा भुरळ पाडतात.

बिनोदिनी सोबतच सगळ्या पात्रांची छान ओळख करून दिली आहेस लेखात...
सुंदर लेख...

चोखेर बाली सिनेमा आठवला. ऐश्वर्या ने बिनोदिनी चे काम छान केले आहे. महिन तर स्त्रीलंपट आहेच.

शेवट छान दाखवला आहे. बिनोदिनी बिहारीला सोडून जाताना त्याचा संदर्भ 1905च्या बंगाल फाळणी बरोबर दाखवला आहे.

अस्मिता छान लिहिले आहेस.. मी मूवी नाही बघितला. फार पूर्वी पुस्तक वाचलंय.. आता मूवी बघेन.. मला बिनोदिनी आणि शरतचंद्र चट्टोपाध्याय ची साबित्री पण आवडते..

छान परिचय करून दिलात. व्यक्तिरेखांची स्वभाववैशिष्ठ्ये, त्यांच्यातील नातेसंबंध व त्यातून निर्माण होणाऱ्या भावनिक गुंतवणुकी हा त्याकाळात कथांचा आत्मा तर होताच. पण यातून वाचकाला खिळवून ठेवताना protagonist मार्फत नकळतपणे सामाजिक सल अधोरेखित करणे हे काम प्रतिभावंतच करू जाणोत. त्या पार्श्वभूमीवर हे...

>> काळाच्या फारही पुढे जाण्याचा प्रयत्न करता येत नाही , समाजात राहून समाजाच्या कलाकलाने असे बदल घडवण्यासाठी प्रेरितं करणारं साहित्य

"अगदी अगदी " वाटते.

>> पुरुषानं मर्यादांची कितीही मोडतोड केली, तरी त्याला ती क्षम्य , कारण क्षमा करायला स्त्री आहे हा आग्रह व विश्वास! उद्या जर या मर्यादा स्त्रीचं झुगारून द्यायला निघाली, तर सगळ्यां व्यवस्थाच निराधार व्हायच्या. हे मोठे संकटच नाही का, त्यापेक्षा स्त्रीनं कसं सदैव आज्ञाधारक राहावं. हळवं बोलावं, गहिवरावं, हुंदके द्यावेत, तळमळावं, त्याकरता आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या परावलंबी रहावं हे सर्वांच्या सोयीचं होतं . या सोयीला संस्कृती असं गोड नाव देऊन ठेवलयं.

Spot on! Happy

जेव्हा जेव्हा तू स्त्री आहेस म्हणून तुला स्वयंपाक/संसार/ संगोपन/नटनंमुरडणं/दागदागिने/साड्या/कुलधर्म ..................ह्या दुराग्रही चौकटी पटत नाहीत. .....
हा paragrqph अगदी पटला.
छान लिहिलय. तिने कामही खूप छान केलय ..
उत्तम कपडेलत्ते, उत्तम नायक नायिका, त्याकाळातलं वातावरण, आशाच्या सुंदर,
भारी साड्या, घोडा गाडी....सगळेच खूप छान.

छान लिहिलेय. टागोरांच्या कथांची मालिका नेटफ्लिक्सवर पाहिलीय. मालिका छान बनवली आहे, पात्रे छान निवडलीत, जुना काळ सुद्धा चांगला उभा केला.

बंगाली संस्कृतीबद्दल एक अगम्य आकर्षण मलाही आहे. आपण मागच्या जन्मी बंगाली असणार हाच निष्कर्ष मीही काढलाय Happy मी रविंद्रनाथांचं साहित्य वाचलेलं नाहिये ह्यामागे एक खुळं आणि अगदीच प्रॅक्टीकल नसलेलं कारण आहे की मूळ बंगाली कथा वाचायच्या आहेत. आता बंगाली तर येत नाही. आणि शिकायला सवड मिळत नाहिये तेव्हा एकूणच सगळं प्रकरण '६५ नंतर बघू यात' अश्या तडजोडीपर्यंत येऊन ठेपलंय. तुमचा लेख आवडला. अजून वाचायला आवडेल.

धन्यवाद वीरू, अनया, स्वप्ना_राज, मानवदादा, आंबट गोड, अतुल, श्रवु, हीरा , सियोना , रूपाली, mrunali, सीमंतिनी , वर्णिता ..... Happy
मनःपूर्वक आभार !

@स्वप्ना_राज
आपण मागच्या जन्मी बंगाली असणार हाच निष्कर्ष मीही काढलाय ...>>> एक समविचारी मैत्रिण मिळाली मगं Happy
बंगाली शिकायला मलाही आवडेल.

@आंबटगोड व मानवदादा ,
काळ खरंच सुरेख उभा केलायं , कपडे, घरं , सेटस् सुरेख आहेत.

@श्रवु व वर्णिता Happy
तुम्ही वाचलयं चोखेर बाली हे वाचून मलाच आनंद झाला आहे.
शरतचंद्र चट्टोपाध्याय ची साबित्री पण आवडते..... हे मी बघते, आभार श्रवु .
@सियोना
संदर्भ 1905च्या बंगाल फाळणी बरोबर दाखवला आहे... हो का ? बरं. कादंबरी १९०३ ची आहे सिनेमात कदाचित थोडं वेगळे आहे वाटतं. धन्यवाद.

पुन्हा एकदा आभार Happy !

अस्मिता, स्वप्ना_राज मला पण घ्या बरं तुमच्यात. मलाही बंगाली संस्कृतीचं, साहित्याचं फार आकर्षण आहे. मी दादर इस्टला चित्रा टॉकीजजवळ 'बंग भाषा प्रसार समिती' ह्या संस्थेचे बंगाली भाषेचे
क्लासेस असायचे, तिथे एक वर्ष शिकले होते. बंगाली पुस्तकं, चित्रपट मूळ स्वरूपात अनुभवता यावं म्हणून ही धडपड केली होती.
त्यानंतर लग्न करून पुण्यात आले. तिथे काही क्लास मिळाला नाही. राहिलंच ते.

अनया , घेतलं आमच्यात Happy ! बंगाली मैत्रिणी @ मायबोली काढावं लागेल आता, संख्या वाढतंच चालली आहे. Happy
मला फक्त 'आपनि क्यामोन आछेन' ? येतं.

@अनया , दिसतयं तसं....
Choritrohin is a 1917 novel by Bengali novelist Sarat Chandra Chattopadhyay. It tells a story of Sabitri, a beautiful woman and widow, who has been thrown out from her husband's home by her in-laws driven to work as a maidservant in a youth hostel, where she falls in love with her master.

ह्या कादंबरीवर १९९०-९१ साली दूरदर्शनवर मालिका होती. त्यातला नायक म्हणजे एकदम डोळ्यात बदाम! बंगाली जुनी पुस्तकं फार संथ असतात, त्यामुळे कोणी मालिका बघायचं नाही. मी आणि माझा भाऊ मात्र न चुकता बघायचो.
पुढे खूप वर्षांनी ते (भाषांतरीत) पुस्तक वाचलं.

चरीत्रहीन मालिका प्रसारभारती चॅनेलवर आहे युट्यूवर . प्लेलिस्ट चा दुवा खाली दिलाय. यात पहिला भाग सगळ्या शेवटी आहे.
https://www.youtube.com/watch?v=s_R3RplZrYI&list=PLUiMfS6qzIMy87q5bIBELJ...

बिनोदिनीवर तुमचा टेक आवडलाय आणि त्याला जोडून येणारं तुमचं चिंतनही. खूब भालो अस्मिता.

रवींद्रनाथांच्या बहुतेक नायिका त्यांच्या सांप्रत काळापेक्षा पुढचा विचार करणाऱ्या, हुशार आणि वैचारिक स्पष्टता असलेल्या स्त्रिया आहेत. कितीतरी सिनेमा, नाटके आणि कथा त्यांच्या लेखनगंगोत्रीतून पाझरल्या आहेत. ओझरती ओळख करून देण्याचा एक छोटा प्रयत्न मी केलाय इथे :-

https://www.maayboli.com/node/73034

थांबू नका, आता एकदा चारुलतावरपण लिहा.

Pages