रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी

Submitted by अस्मिता. on 11 December, 2020 - 19:23

रवींद्रनाथांची नायिका : बिनोदिनी

पश्चिम बंगालबद्दल प्रचंड, प्रचंड आकर्षण वाटतं त्याची मुख्य कारणं म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दक्षिणेश्वरी , रवींद्रनाथ टागोर व शांति निकेतन ... मी मागच्या जन्मी बंगाली होते बहुतेकं !

रवींद्रनाथांनी ज्या पद्धतीची लेखन व काव्यनिर्मिती केली आहे , केवळ अद्भुतं ! त्यांच्या नायिका तर आजही खऱ्या वाटतात , कालबाह्य असूनही त्यांचे प्रगल्भ व्यक्तिमत्त्व कुठेतरी मनात मुरतंच. कालबाह्य म्हणताना वाटतं की खरंच अगदिच कालबाह्य आहे का कारण अजूनही फार मोठा पल्ला गाठायचा आहे स्त्रियांना , माझ्या दृष्टीने ज्याला ध्येय म्हणता येईल ते कधीकधी एक प्रकाशवर्ष दूर आहे असं वाटतं. सध्या समाज म्हणून ढोबळमानाने आपण, दारू पिऊन मारत "तर" नाही/ नोकरी "करू" देतो / "शिकू" देतो / बाहेरचं "सुद्धा" खातो / मतं "सुद्धा" विचारतो / घरात "मदत" करतो म्हणजे मी/हा मर्यादा पुरूषोत्तम आहे या स्टेशनावर कुठेतरी लटकतं आहोत. ही मर्यादा पुरूषोत्तम उपमा लिंगनिरपेक्ष आहे हं ! कुठेतरी स्त्रियांनी पण या मान्यतांना रूढी/दैव/नैसर्गिक कल समजून यांचे पोषण केलं असणारंच म्हणूनच ते ध्येय प्रकाशवर्ष . नाहीतर मगं मला बिनोदिनी आणि चारूलताला अजिबात समजून घेता आलं नसतं नाही का , पणं येतयं..यातचं काय ते आलं.

रवींद्रनाथांच्या या दोघी नायिका माझ्या सर्वांत आवडत्या , या दोघींपैकी एकीला निवडणे म्हणजे माझा कुठला डोळा मला अधिक आवडतो हे ठरवणे , तरीही मी 'चोखेर बाली'तल्या बिनोदिनी पासून सुरवात करतेयं.
'चोखेर बाली' ही कथा चार व्यक्तिरेखांभोवती फिरते पण एक पाचवी अदृश्य व्यक्तिरेखा आहे याकथेत ती म्हणजे त्याकाळातले विधवांचे जीवन. ते सतत अवतीभवती असतंच ज्याच्यामुळे कुणालाचं न्यायं मिळत नाही , रादर मिळणार नाही हे माहिती असूनही आपणं गुंतत जातो. कारण या व्यक्तिरेखांचे ते गुणदोष आपण स्वतःतं बघू शकतो.

1_28wGh8oy0Wxovjii10MzqQ.jpeg.jpg

बिनोदिनी , बिहारी, आशालता व महिन्द्रबाबू (महिन) या चौघांची ही कथा आहे. महिन हा एक स्खलनशील, स्वतःव्यतिरिक्त कुणावरही प्रेम नसणारा आत्मकेंद्री तरुणं आहे. ज्याच्या विधवा आईने त्याला एकट्याने लाडाकोडात वाढवून प्रसंगी इतरांना त्याच्यासाठी त्याग करायला भाग पाडले आहे. बिहारी हा त्याचा जवळचा मित्र आहे पण महिनने वेळोवेळी त्याचा फक्त वापर केला आहे. बिहारीचे सौजन्य इतके मोठे आहे की हे लक्षात येऊनही हे नाते त्याने टिकवलयं.

महिन हा उच्चशिक्षित असल्याने त्याची आई त्याचे लग्न त्याला आवडेल अशा तिच्याचं जवळच्या मैत्रिणीच्या अनाथ मुलीशी बिनोदिनीशी ठरवते. बिनोदिनी ही त्या काळाच्या मानाने बरीच शिकलेली व गायनवादनात प्रविण अशी सुविद्य व सुस्वरूप तरुणी असते. पण महिन तिला न बघताचं लग्नाच्या चार दिवस आधी 'मी लग्नासाठी तयार नाही' हे कारण पुढे करून लग्न मोडतो. याकारणाने बिनोदिनीचे लग्न कुणाशी तरी उरकण्यात येते व तिच्या नशिबी लगेचच वैधव्य येते. या काळात बिहारीसाठी पण एका अशिक्षित खेडूत मुलीशी आशाशी विवाहाचा प्रस्ताव येतो. आशा बिहारीला आवडते पण महिन आशाच्या मोहात पडून स्वतःच बोहल्यावर उभा रहातो. महिनच्या आईला आशा कधी आवडलेलीचं नसते , नंतर महिन दुरावल्याचे कारण आशाचं आहे असं वाटून महिनची आई दुसऱ्या गावी निघून जाते जिथे त्यांना बिनोदिनी भेटते. कुठेतरी त्या बिनोदिनीच्या अशा परिस्थितीला स्वतःला जबाबदार मानतात व तिच्याशी जवळीकं वाढवतात. स्वभावातल्यां गोडव्यानी व गुणांनी बिनोदिनीही त्यांना आपलेसे करते.

केवळं बिहारीने आर्जवं केल्याने महिन स्वतःच्या आईशी पत्रव्यवहाराद्वारे संपर्कात रहातो. ती सगळी पत्रं व त्यातील महिन व आशा यांच्या सुखी वैवाहिक जीवनाची वर्णनं बिनोदिनी त्यांना वाचून दाखवतं असते. इथेचं मत्सराग्निची ठिणगी पडते. जे सुख आज माझं असतं ते आज कुणीतरी अशिक्षित मुलगी भोगतेयं या विचाराने बिनोदिनी अस्वस्थ होते. आपल्यालाही हे पटतं, हळूहळू याचं मत्सराग्निने प्रतिशोधाचा वणवा पेटतो.

बिनोदिनी मनाशी काहीतरी निश्चित ठरवून महिनच्या आईसोबत त्यांच्या घरी येते. तिथे ती भोळसट आशाशी मैत्री करते , त्या हेतुपुरस्सरं मैत्रीला ती 'चोखेर बाली' हे नावंही देते , सरळसरळ अर्थाने डोळ्यातलं खुपणं , पणं हे 'तुझे सुख मला नाही नं बघवतं', या अनुशंगाने आहे. बिनोदिनीकडे रूपगुणबुद्धी सर्व तर आहेच शिवाय ह्याची तिला सार्थ जाणीव सुद्धा आहे. ही जाणीव कथेत तिला आणखी डिझायरेबल , हवीहवीशी बनवते. त्यामुळे कुठेतरी याचा तिनं स्वतःच्या इच्छा पुऱ्या करण्यासाठी वापरं करणं सहजं वाटतं. शिवाय महिन व बिहारी यांच्या बौद्धिकचर्चेत ती व्यवस्थित भाग घेऊ शकते, आशा नाही. आशा स्वतःहून कुठेतरी अलिप्त होतं जाते. त्यामुळे महिनला , जो आधीच नीतीमुल्यांच्या बाबतीत यथातथाच आहे , प्रेमात-मोहात पाडणं तिच्यासाठी फारचं सोपं होतं. महिन व बिनोदिनीचे कायिक प्रेमसंबंध होतात पण त्यावेळेस ती बिहारीकडे खरोखरचं आकृष्टं होते. त्याच्याशी तिला मनमोकळे बोलता येत असते. फक्त दुस्वासी महत्त्वाकांक्षेपोटी ती महिन सोबत असते , ते प्रेम नसतं... ना महिनचं कुणावरं प्रेम असतं ना आशावर ना बिनोदिनीवर ना बिहारीबद्दलं त्याला काही वाटत असतं !

MV5BMWI1ZTcyOTEtY2Q3Ni00YmUyLWI2ZWMtNzlkNGQ2YTMyZjZmXkEyXkFqcGdeQXVyMzU4MTE1OTM@._V1_.jpg

बिनोदिनीसाठी महिन आशाला माहेरी जायला भाग पाडतो. इकडे त्याच्या आईला ह्या गोष्टींची कुणकुण लागते. बिहारीला स्वतःलाही बिनोदिनीबाबतं नक्की काय वाटते हे कळत नसल्याने तो आशा आणि महिनच्या संसारात विष कालवल्याबद्दल बिनोदिनीला अपराधी मानतो व तिथून निघून जातो. प्रतिशोधाचा वणवा शांत झाल्याने बिनोदिनीला हे निरर्थक आहे हे लक्षात येते. तोपर्यंत तिची "कीर्ति" समाजात पसरते , ती विधवाश्रमात निघून जाते. तिथेही महिन तिच्या मागे येतो व तिला एकत्र होण्यासाठी विनवण्या करतो . त्याच्या मदतीने रागावून निघून गेलेल्या बिहारीला शोधता येईल असे वाटून बिनोदिनी खोटंच तयार होते. हे कळल्यावरं महिन कपटाने त्यांची भेट होऊ देत नाही व तिला सोडून परत आशाकडे येतो. आशाशिवाय त्याला कुणी नाही हे त्याच्या लक्षात येतं. आशा आणि आई ह्या तर आनंदाने त्याचा स्वीकार करण्यास तयारचं असतात.
MV5BOTk4OWI0MjctNjdkMy00OWY1LWIzZDMtZDQxZDhmNmU1YmU0XkEyXkFqcGdeQXVyODI1ODQ2MzY@._V1_UY1200_CR751,0,630,1200_AL_.jpg

निर्धनं व निराधारं बिनोदिनीचे आयुष्य पुन्हा मांजा तुटलेल्या पतंगासारखे दिशाहीन होते. तिच्या आधुनिक विचारांमुळे तीन पांढऱ्या साड्यांचे चौथ्या पांढऱ्या साडीतले गाठोडं घेऊन या विधवाश्रमातून त्या विधवाश्रमात तिची हकालपट्टी होतं असते. अचानकचं कित्येकं वर्षांनी एका स्टेशनवर तिची बिहारीशी भेट होते. महिनने बिहारीलाही बिनोदिनी टायफॉईडमध्ये निवर्तली असं सांगितलं असतं. या अचानक भेटीने मनं पुन्हा स्वच्छं होतात. इथेचं बिनोदिनी म्हणते की मी जरं सुशिक्षित विचारी नसले असते तर बरं झालं असतं निदान समाजाच्या उपेक्षा अन्याय वाटल्या नसत्या व दैव समजून सहन करनं सोपं झालं असतं. बिहारीला चुकवून इथूनही ती निघून जाते. विधवांच्या विकासासाठी उर्वरित आयुष्य वेचते. या गोष्टीचा अंत बिनोदिनीच्या आयुष्यासारखाचं अधांतरी रहातो.

*******

रवींद्रनाथांना एक संवेदनशील लेखक म्हणून याचा शेवट बिहारी व बिनोदिनी एकत्र आलेले दाखवण्याचा मोह झाला असणारचं , अशी वदंताही आहे. पणं या कथेने सुद्धा गदारोळ झाला होता , त्या काळात विधवेला नायिका करून तिच्या इच्छांना अधोरेखित करनं सुद्धा साहस होतं. कधीकधी असंही वाटतं की काळाच्या फारही पुढे जाण्याचा प्रयत्न करता येत नाही , समाजात राहून समाजाच्या कलाकलाने असे बदल घडवण्यासाठी प्रेरितं करणारं साहित्य निर्माण करावं लागतं. नाहीतर समाजाने बहिष्कृत केल्याने सगळंच वाया जाऊन आपणं अजून मागे जाण्याची भीती असते. कुठल्याही सिस्टीमला, यंत्रणेला त्या यंत्रणेच्या बाहेर राहून बदलता येणं अशक्यं होऊन बसते. त्यामुळे काही वेळेला सावधं रहाणे, नमते घेणे हीच दुरदृष्टी असते.

महिन, आशा व आईकडे पर्यायाने समाजात मानाने परत जाऊ शकला. पुरुषानं मर्यादांची कितीही मोडतोड केली, तरी त्याला ती क्षम्य , कारण क्षमा करायला स्त्री आहे हा आग्रह व विश्वास! उद्या जर या मर्यादा स्त्रीचं झुगारून द्यायला निघाली, तर सगळ्यां व्यवस्थाच निराधार व्हायच्या. हे मोठे संकटच नाही का, त्यापेक्षा स्त्रीनं कसं सदैव आज्ञाधारक राहावं. हळवं बोलावं, गहिवरावं, हुंदके द्यावेत, तळमळावं, त्याकरता आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या परावलंबी रहावं हे सर्वांच्या सोयीचं होतं . या सोयीला संस्कृती असं गोड नाव देऊन ठेवलयं. 'या'ला संस्कृती मानण्याने खरी संस्कृती कोणती हेही कळणार नाही. हे त्याकाळातं तर असायचं , दुर्दैवाने अजूनही हे चित्र दिसतंच.

जेव्हा जेव्हा तू स्त्री आहेस म्हणून तुला स्वयंपाक/संसार/ संगोपन/नटनंमुरडणं/दागदागिने/साड्या/कुलधर्म कुलाचार/पाहुणचार इत्यादी आवडले"च"/ केलं"च" पाहिजे असं कुणी विचार करतं असलं की उलट्या दिशेने पण
बिनोदिनीची चरफडं किंचित समजून घेता येते. पुन्हा काही गोष्टींना किंमत दिली नाहीचं तर त्यावरं स्त्री म्हणून जोखलेले योग्य वाटत नाही. स्त्रीपुरुष सर्वांना नीतीमुल्यांचे एकचं परिमाणं असनं आदर्श वाटतं. एखादी गोष्ट स्त्रीने फक्त ती स्त्री आहे म्हणून केलीच पाहिजे किंवा नाहीच केली पाहिजे ह्या दुराग्रही चौकटी पटत नाहीत. चौकटी नकोच !!

प्रदीर्घकाळं घेतलेली अशी छोटी छोटी पावलंही मैलाचा दगड ठरू शकतात. ही कादंबरी १९०३ साली लिहिली होती , त्यानंतर शरदचंद्र चट्टोपाध्याय यांनी 'चरित्रहीन' ही विधवांवर , नायिकाप्रधान असणारी यापेक्षा पुढचं साहसं असणारी कादंबरी १९१७ साली लिहिली. कुठेतरी त्या मागची प्रेरणा बिनोदिनी असेलही !

मी 'चोखेर बाली' कादंबरी वाचलेली नाही. त्या कादंबरीबद्दलं वाचलंय व नेटफ्लिक्सवरीलं
'स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागौर' या मालिकेची पारायणं केली आहेत. राधिका आपटेने सुरेखं काम केलयं. या लेखात 'बिनोदिनी' या व्यक्तिरेखेच्या आकलनात काही त्रुटी किंवा अपूर्णता असतीलही , तरीही मी या कथेबाबत केवळं मला आस्था आहे म्हणून लिहिलंय. बिनोदिनीचे व तिच्यासारख्यां अनेक खऱ्यां नायिकांचे सुद्धा आभार कारण त्यांच्यामुळे मी बऱ्याचं गोष्टींकडे कृतज्ञतेने बघू शकते.

आभार Happy !
©अस्मिता

*संदर्भ

* In Chokher Bali, Tagore draws parallels between the educated and the uneducated through Asha and Binodini. According to Mary Wollstonecraft “girls that have been… weakly educated are often left by their parents without any provisions”. Binodini is likewise left without any financial provision, but is left with education which allows her the liberty of free thinking. Binodini represents a new female subjectivity whom western education transforms into a woman with her own heart and mind, and is not tied to traditional customs. 

*https://stateoftalent.org/topic/fa7413-book-review-of-rabindranath-tagore

* https://www.google.com/amp/s/feminisminindia.com/2019/02/15/chokher-bali...

* चित्रं आंतरजालावरून साभार.
वेमा प्रताधिकार भंग होत असतील तर सुचवणे, काढून टाकण्यात येतील. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२ लिंकबद्दल आभार.
अनिंद्य, 'रविंद्रनाथकी कहानियाँ' मालिकेच्या सुरवातीला त्या मालिकेच्या दिग्दर्शकांनी अगदी हेच विचार मांडले होते की रविंद्रनाथांच्या नायिका स्वतंत्र बाण्याच्या, निर्णयक्षमता असणाऱ्या होत्या. मग आजच्या नायिका अशा का असतात? आपण मागे कसेकाय गेलो?
अस्मिता, लेख वाचला. फार्फार आवडला. पुढच्या लेखाची वाट बघते आहे.

हल्ली भारतीय कादंबर्‍या फार वाचल्या जात नाहीत. पण सिनेमात अनेक नायिका स्वतंत्र बाण्याच्या, निर्णयक्षमता असणाऱ्या आहेत उदा: हजारो ख्वाईशे, बँड-बाजा-बरात, बचना ए हसीनो मधली दिपिका. मोठी लिस्ट देवू शकेन. पण अवांतर भयास्तव टाळते. 'रविंद्रनाथकी कहानियाँ' मालिकेच्या अनुषंगाने टीव्ही मालिकांबाबत आपण मागे कसे काय गेलो हा प्रश्न असेल तर उत्तर एकच - Happy एकता कपूर. आता पापप्रक्षालनार्थ (!!) लिपस्टीक अंडर माय बुरखा इ करते. पण समाजाचे व्हायचे ते नुकसान झालेले आहे.

हजारो ख्वाईशे, बँड-बाजा-बरात, बचना ए हसीनो मधली दिपिका...>>>
या यादीत हँसी तो फसीची परिणिती चोप्रा आहे का , मला फार आवडली होती ती... थोडं अवांतर चालेल सीमंतिनी Happy
कादंबरी मात्र वाचावी वाटतंच नाही आजकाल , Nonfiction बरं वाटतं.
मालिका असह्य होतातं.

लेख आवडलाच... नेटफ्लिक्सवरच्या मालिकेत पाहिली होती ही कथा. बिहारीबद्दल फार्फार वाईट वाटलं होते तेव्हा...
रविंद्रनाथांना एक संवेदनशील लेखक म्हणून याचा शेवट बिहारी व बिनोदिनी एकत्र आलेले दाखवण्याचा मोह झाला असणारचं >> अगदी अगदी
मला मात्र बिहारी आणि आशा एकत्र आलेला शेवट आवडला असता Happy
लिहित रहा ग ...

हंसी तो फंसी मध्ये परिणिती शास्त्रज्ञ दाखवली आहे म्हणून टाकू शकते लिस्टमध्ये. आधी नव्हती. माझी लिस्ट तशी मॅलिएबल, डक्टाईल इ इ आहे.

थोडे अवांतर चालेल म्हणून अवांतर- २०१० पासूनच्या दहा (+ २ फ्री) आवडत्या नायिका - पिकू मधली पिकू, इष्कीया मधली विद्या बालन, देढ इष्कीया मधली हुमा, तनू वेडस मनू मधली तनू, तुम्हारी सुलू मधली सुलू, उरी मधल्या तिघी (यामी, किर्ती, आणि ती हेर), देल्ही क्राईम मधली शेफाली, दम लगा के मधली भूमी, उडता पंजाब मधली आलिया, आणि जरा विचित्र वाटेल पण एक था टायगर मधली कटरिना. माझी कल्पनाशक्ती चांगली असती तर ह्या सगळ्याजणी शशी गोडबोलेच्या (इंग्लिश विंग्लिश) ग्रॅज्युएशन पार्टीत एकमेकींना भेटल्या असे एक स्कीट लिहीले असते. काही कॉमन नाही ह्या मुलीत but they might have a good time together Happy
अवांतर पूर्ण

तनू वेड्स मनू मधली तनू अनेकांना आवडते, पण खरच ती स्वतंत्र बाण्याची आहे का? असा प्रश्न ज्यांना पडतो त्यांनी हा लेख वाचावा:
https://koolkanya.com/blogs/speaking-out/what-do-they-do-why-dont-female...
कोणत्याही स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी येते. तनू ला स्वातंत्र्य हवयं पण जबाबदारी नकोय असे माझे मत. Happy
बाकी सिनेमाच दिग्दर्शनही solid गंडलयं.
१) प्रियकराबरोब पळून जाऊन लग्न करायचय. पण marriage registrar चे ऑफिस किती वाजता उघडते आणि किती वाजता बंद होते याची नीट चौकशी करता येत नाही? कुठल्याही सरकारी कामाला बाहेर पडताना सगळी कागदपत्र, पेन बरोबर घेऊन बाहेर पडावे एवढं कळत नाही?
आई वडिलांना पसंत नसललेल्या राजा अवस्थीशी लग्न करायचे आहे, पण साग्रसंगीत लग्न आई-वडिलांनी लावून द्यावं ही अपेक्षापण आहे. 'स्वतः पैसे कमाव, आणि कर हव्या त्या मुलाशी लग्न' असं तिचे आई-वडिल तिला का सांगत नाहीत?
२) तनू इंग्लंडमधे साड्या नेसून फिरते आणि घरी कानपूरमधे धाकट्या बहीणीला बघायला मुलाकडची लोक येतात तेव्हा नुसता टॉवेल गुंडाळून बाहेर येऊन बसते. तिच्या बिचार्‍या आई-वडिलांची मला फारच दया येते. का सहन करतात अश्या मुलीला? घराबाहेर का काढत नाहीत?

छान लेख.

ऐश्वर्याचा चोखर बाली आला होता तेव्हा स्टोरी वाचली होती पण त्यात काही आवडण्यासारखं वाटलं नाही. लेख वाचूनही तेच परत कन्फर्म वाटलं की मूळ कादंबरीही मला आवडणार नाही. टागोरांचं लिखाण आहे म्हणजे ते कायम आवडेलच असं नाही!

विद्या बालनच्या सिनेमातील भूमिका जास्त खर्या वाटातात. तिला उगाच चौथा खान म्हणत नाहीत. बाकी हिरॉईन तिची कॉपी करतात.

तनुजा त्रिवेदी सारख्या मुली आहेत म्हणूनच अस्मितासारख्या लेखकांना लिहायची वेळ येते - चौकटी नकोतच. ४-५ कर्मचारी सांभाळतात त्या सरकारी हापिसात पेन नाही हे आपण सहज मान्य करतो. पण स्वतःच्या लग्नाला जाणार्‍या मुलीकडे पेन असावे अशी चौकट सहज आखतो. Happy

अशी चौकट सहज आखतो.>>बरं नका आखू चौकट. पण मग सरकारी ऑफिसात पेन नाही म्हणून निदान कुरकुर/ आग पाखड/ तक्रार नोंदवणे असे काहीतरी करताना दिसली असती तनुजा त्रिवेदी तरी तिचा स्वतंत्र बाणा मानला असता मी.
राजा अवस्थीसुद्धा पेन घेऊन येऊ शकला असता. किमान त्याला तरी भारतात सरकारी ऑफिसमधे काय scene असतो माहिती असणे अपेक्षित आहे. आणि इतपत व्यवहार ज्ञान त्याला नसेल तर तनुजाची निवड अगदीच चुकली आहे हे स्पष्ट आहे. आणि हे त्या बिचार्‍या आई-वडिलांना कळत असणार, म्हणूनच त्यांनी विरोध केला असणार.
पण तरीही तनुजाला चौकट मोडायची असेल तर जरूर मोडावी पण स्वतःच्या जबबादारीवर. ती पुन्हा मनूवरच सगळा भार टाकायला निघालेली दिसते. आपला भार सतत दुसर्‍यावर टाकणे आणि मग त्या दुसर्‍या माणसाने काही अपेक्षा ठेवल्या/ व्यक्त केल्या तर त्या अपेक्षांना चौकट मानून त्या धुडकावून लावणे हा सोयिस्कर स्वतंत्र बाणा चांगला आहे. Happy
टागोरांची बिनोदिनी खरचंच समाजाच्या चौकटीत जखडलेली वाटते आणि म्हणून तिने केलेला स्वार्थीपणा थोडातरी पटणारा वाटतो. पण तनूजावर अशी कोणतीही बंधने नाहीत. तिच्या शिक्षणाचा उपयोग करून ती खरोखरच स्वतंत्र आणि आत्मनिर्भर आयुष्य जगू शकते. पण तिला तसं करायची इच्छा नसावी.
तनु वेड्स मनु मी फक्त आणि फक्त माधवनसाठी बघितला होता. >> मी सुद्धा Happy

खूप छान लिहिलाय लेख, आवडला

लहानपणी रवींद्रनाथ टागोर यांच्या शॉर्ट स्टोरीज वाचल्या होत्या. तुनळी वर सुद्धा काही शॉर्टफिल्म्स बघितल्या होत्या. त्याची आठवण झाली.

हसी तो फसी मला पण खूप आवडतो, मस्त टिपी आहे. गाणी तर सगळीच ऑल टाईम फेव्हरेट.

तनु वेडस मनु मी माधवनसाठी सुद्धा पूर्ण नाही बघू शकली

छान लिहिले आहे. नेटफ्लिक्सवरील स्टोरीज ऑफ रवींद्रनाथ टागौर मी पण पाहिली आहे. कोणत्याच गोष्टीला १-२ तासाच्या एपिसोड मध्ये न्याय मिळत नाही असं वाटलं. पण त्यामुळे रवींद्रनाथांचं साहित्य वाचावसं वाटायला लागलं आहे. बघू कधी जमतं आहे ते.

अनया, अस्मिता Happy विद्यार्थी तयार आहेत आता शिक्षक मिळायला हवा.

>>मला फक्त 'आपनि क्यामोन आछेन' ? येतं.
आणि मला फक्त आमार शोनार बांगला Happy

अर्रे काय हे
"आमी तोमाकी भालो बाशी"
येत नाही असं कुठे असतंय का?

लिखाण आवडले.
(हे सांगायचे राहूनच गेले होते. )

मराठी माध्यमात शिकल्यामुळे बंगाली शिकायला सोपं गेलं होतं. व्याकरणाची रचना बरीचशी सारखी आहे.
आता बहुतेक सगळंच विसरायला झालं आहे. फक्त ' आमी किछु किछु बुझीते पारी, बोलिते पारी ना' एवढं लक्षात आहे. (थोडं थोडं समजतं पण बोलता येत नाही)

धन्यवाद स्वातीताई, मंजुताई, कॉमी, अनिंद्य, सोहा , VB , सुमुक्ता, हर्पेन, जाई, राधिका, सनव ...
मनःपूर्वक आभार Happy

राधिका , अनया , स्वप्ना , अनिंद्य ...
लिहित रहाणारं , प्रेमळ प्रोत्साहनासाठी आभार Happy !

अनिंद्य , तुमचे लेख मनलावून पुरवून पुरवून वाचणारं आहे.
धन्यवाद.

स्वातीताई , लिंकसाठी अनेक आभार .

सोहा व सीमंतिनी
तुम्हा दोघींची तनुवरची चर्चा रोचक वाटली. Happy

@स्वप्ना_राज
अनया, अस्मिता...  विद्यार्थी तयार आहेत आता शिक्षक मिळायला हवा.>>>
चारपाच वाक्य गोळा झाली आहेत, त्यालाच श्रीगणेशा समजुयात. Happy

अनया
मराठी माध्यमात शिकल्यामुळे बंगाली शिकायला सोपं गेलं होतं. >>> मला थोडा वाव आहे मगं Happy किछु किछु वाक्य गोड आहे.

बऱ्याच मराठी लोकांना बंगाली संस्कृतीचे आकर्षण दिसून येते. विशेषतः जे रसिक मराठी लोकं असतात ते. काय कारण असू शकते?

जिद्दु , मी शितू वाचले आहे पण विसरले आहे , मी जबरदस्त गोनीदा चाहती आहे. धन्यवाद.

जाई , मला तर एका अमराठी व अबंगाली मैत्रिणीच्या नवऱ्याने सांगितले की तुम्हा दोघांची संस्कृती (बौद्धिक/आध्यात्मिक /साहित्यिक) मला थोडी सारखी वाटते व आवडते. मलाही ते पटले पण शौर्याने लढण्यात महाराष्ट्रीयन काकणभर सरस आहेत/होते , हे माझे मत आहे. आपल्यासारखे लढवय्ये आपणंच Happy , बाकी बंगाली सगळं फारचं आवडतं.

बंगालीचे आकर्षण का दोन प्रमुख कारणे मनात येतात - एक मराठी माणूस तसा खुल्या मनाचा असतो. दोन - पुलं चे वंगचित्रे. स्वातंत्र्यपूर्व काळात बंगाल व महाराष्ट्र दोन्ही प्रोग्रेसिव्ह (पुरोगामी) राज्ये होती, वैचारिक देवाणघेवाण होती. पण स्वातंत्र्यानंतर पुलंच्या त्या पुस्तकामुळे बंगालची साहित्यिक ओळख पुन्हा नव्याने महाराष्ट्रातील सामान्य जनास अधिक झाली. दूरदर्शनवरील चांगल्या बंगाली मालिकांमुळे तिला खतपाणी मिळाले.

सोहा, सिनेमा जरूर बघ एकदा कारण त्याने तुझे बरेचसे प्रश्न दूर होतील उदा: तनुजा पेनबद्दल आगपाखड करत नाही. तिला त्याच रात्री जयपूरला जाऊन लग्न करायचे असते. पेन तिच्या खिजगणतीतही नसते. लग्न महत्त्वाचे, पेन नाही. आई-बापावर तिला भार टाकायचा नसतो तर उलट पळून जाऊन लग्न करायचे असते. मनू शर्मा मधे पडून लग्न जुळवतो तर 'बगावत छीन ली' म्हणून ती खट्टू असते. तू सिनेमा पाहिलास, तरी प्रश्न असतील तर मग आपण तनु वेड्स च्या धाग्यावर चर्चा चालू ठेवू. बिनोदिनीशी तनूची तुलना नाहीच करता येत. तनू सिमरन ही नाही की बाबूजीने जा जी ले म्हणायची वाट बघेल. ती कमावती नाही, ती थोडीशी फ्लॉड आहे - रेबेल विदाऊट कॉज आहे. मला आवडली, इतरांना आवडावी असा आग्रह नाही. इथे तनूबद्दल माझ्याकडून एवढेच.

यादीतील बाकी ९ जणी बद्दल काही मतभिन्नता नाही हे केवढं मोठं यश आहे त्या त्या नायिकांचं.

संयुक्ताचा एक धागा होता सीमंतिनी , त्यावरही चर्चा करता येईल. बघते मिळतो का....
मला आवडलेल्या नायिका ... असा काहीतरी .... !
https://www.maayboli.com/node/48019
इथे पहा.

बंगालमध्ये इंग्रज राजवटीच्या काळात जो Renaissance झाला त्याचं आकर्षण असू शकेल.
याबद्दल अनेक लेख उपलब्ध आहेत. राममोहन रॉय, ईशवरचंद्र विद्यासागर सारखे रिफॉर्मर, जगदीशचंद्र बोसांसारखे शास्त्रज्ञ, विवेकानंद ,रामकृष्ण, इस्कॉनचे प्रभूपाद सारखे धार्मिक रिफॉर्मर, टागोरांसारखे लेखक , वंदे मातरम लिहिणारे बंकिम चटोपाध्याय , बंकिम पाल, खुदिराम बोस ते सुभाषबाबू बोसांसारखे फ्रीडम फायटर हे सगळे एकाच राज्यात साधारण एकाच कालखंडात किंवा एकापाठोपाठ एक असणं हा रिसर्चचा विषय ठरलाय. अगदी अमेरिकेत आम्ही कौतुकाने बोस ब्रॅंडचे हेडफोन्स घेतो तो बोस ब्रँड एका बंगाली ओरिजिनच्या माणसाने अमेरिकेत सुरू केला.

बंगालबद्दलचं आकर्षण हे 'सध्याच्या' बंगालचं असेल असं मला वाटत नाही(ममताचा बंगाल!).

वरचा renesaince देखील फक्त बंगाली हिंदू उच्चवर्णीय समाजापूरता मर्यादित होता ज्याला बंगाली भद्र लोक म्हणतात.

जिद्दु,
इंटरेस्टिंग पोस्ट आहे.
मला असंच चोखेर बालितला चौकोन गॉन विथ द विंड मधल्यासारखा वाटला. त्याला विधवा इश्यूची बॅकग्राउंड नाहीये. पण स्कारलेट बिनोदिनी, बटलर म्हणजे बिहारी, अँड सो ऑन.
गॉन विथ द विंड नंतर आलीय. युनिव्हर्सल थिम्स वगैरे.

Pages