जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

Submitted by मार्गी on 14 December, 2018 - 10:40

जे सत्य सुंदर सर्वथा....: ८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):६. बीड ते अंबेजोगाई

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

काल रात्री मोठा पाऊस झाला. मी थांबलो होतो तिथे उकाडा व डासांमुळे झोप नाही लागली. जवळजवळ रात्रभर जागाच होतो. पहाटे चारला संस्थेतले एक जण बघायला आले. मग काही वेळ त्यांच्यासोबत बोलत बसलो. पहाटेच्या अंधारात फिरून आलो. संस्थेच्या कामाविषयी आणखी गप्पा झाल्या. नंतर त्यांनी अगत्याने माझ्यासाठी पोहे बनवले. पहाटेही पावसाचंच वातावरण आहे. त्यामुळे चांगला उजेड व्हायला वेळ लागला. त्यामुळे १९ नोव्हेंबरला रोजच्यापेक्षा थोडं उशीरा निघालो. निघतानाही रवीजी आणि मुलांनी खूप उत्साहाने मला निरोप दिला. सेवालयमधली ही भेट ह्या मोहीमेतला कदाचित सर्वांत मोठा अनुभव होता. इतकं काही बघायला आणि समजून घ्यायला मिळत आहे! आणि सेवालयात आल्यावर परत जाणं कठीण असतं हे ऐकलं होतं, त्याचाही अनुभव आला. तसंच हवामानही वेगळंच आहे व रात्रभर आराम न झाल्यामुळे थोडा थकवा वाटतोय. तसा आजचा टप्पा छोटाच आहे- फक्त ७६ किलोमीटर जायचं आहे. पुढच्या शनिवारपर्यंत मोठा टप्पा नाही आहे. आता हळु हळु मोहीमेचा शेवट जवळ येणार आहे.

हसेगांववरून निघाल्यावरच रस्त्यावर पाणी व चिखल असल्याचं दिसलं. पण आतली गावं असूनही रस्ते चांगले आहेत. हसेगांव लातूरच्या अगदी जवळ आहे. काल रात्री सेवालयाच्या हॅपी इंडियन व्हिलेजवरून लातूरचे दिवेही दिसत होते. पण जसा ही सगळी समस्या आहे- समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या अगदी जवळ असूनही एचआयव्हीसोबत जगणारे लोक दूर असतात, जणू परके असतात, तसंच शहराच्या इतकं जवळ असूनही हे केंद्र शहरापासून दूरच आहे. असो. मला अहमदपूरला जायला लातूरला जाण्याची गरज नाही. गावातले रस्ते विचारत जाईन. रवीजींनी जसं सांगितलं आहे, तसं विचारत गेलो. हायवेच्या जवळ येत असताना एक वळण चुकलं. त्यामुळे थोड्या लांबून म्हणजे बाभळगावातून जावं लागलं. महाराष्ट्र सरकारने अशी घोषणा केली आहे की महाराष्ट्रात उघड्यावर शौच बंद झालं आहे. पण माजी मुख्यमंत्र्यांचं गावच अजून बाकी आहे हे कळालं. पण बाभळगांववरून चांगला रस्ता मिळाला आणि लवकरच नांदेड हायवेला आलो. इथे एक गंमत झाली! दुचाकीवरून जाणारे एक जण मला बघून थांबले व त्यांनी माझी विचारपूस केली. जेव्हा मी सांगितलं की, मी १४ दिवसांमध्ये ११६५ किमी सायकल प्रवास करतोय, तेव्हा त्यांनी चक्क माझ्यासोबत एक सेल्फी घेतली!! आता इतकंच बाकी राहिलं होतं! ह्याआधी माझ्यासोबत अशी सेल्फी कधी घेतली गेली होती, हे जरा आठवलं. तेव्हा आठवण झाली की, जेव्हा मी लदाख़मध्ये सायकल चालवत होतो, तेव्हा लामायुरूला पोहचल्यानंतर काही जणांनी अशी सेल्फी घेतली होती! तेव्हा ही मोहीमसुद्धा त्या कोटीची मोहीम बनतेय तर! वा!

आज खूप दिवसांनंतर चांगला हायवे मिळाला आहे आणि खूप दूरवरचे बोर्डस दिसत आहेत. नागपूर, जबलपूर आणि अगदी कोलकाता किती दूर आहे, हेही दिसत आहे. माझ्या प्रवासातला शेवटचा मुख्य टप्पा असलेलं अकोलाही त्यात आहे! थोड्याच दिवसांमध्ये तिथे पोहचेन. मला चांगला रस्ता मिळाला आहे आज, पण ह्या विषयावर जे लोक काम करत आहेत, त्यांची वाट कधी सोपी होणार, हा मात्र प्रश्नच आहे... रस्त्यावर पायी जाणारे काही वारकरी/ भाविक दिसत आहेत. एका हॉटेलात चहा- बिस्कीट घेत होतो, तेव्हा एकाने मला चक्क विचारलं, तुम्हीच तिकडे सोलापूरकडे सायकल चालवत होता ना? कदाचित मला त्यांनी बघितलं असेल! आज पावसाचं वातावरण आहे, पावसासाठी माझी तयारी आहे, पण पाऊस आला नाही. अर्थात् ऊन्हापासून आराम मिळाला.

ढगाळ वातावरणात मस्त दृश्ये चालू असताना लातूर रोड, चाकूर आणि मग शिरूर ताजबंद अशा गावांना मागे टाकत आरामात अहमदपूरला पोहचलो. अहमदपूरमध्ये मला कस्तुरबा गांधी महाविद्यालयात जायचं होतं, पण चुकून पहिले महात्मा गांधी महाविद्यालयात जाऊन आलो. कस्तुरबा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांशी काही वेळ बोललो. माझ्या प्रवासाचं स्वरूप व उद्दिष्ट सांगितलं. ह्या विषयाबद्दल सांगितलं. महाविद्यालयाच्या प्राचार्यांसोबतही भेट झाली. इथे आणखी काही कार्यक्रमाचं नियोजन न झाल्यामुळे लवकरच मोकळा झालो. अहमदपूरमध्ये माझ्या बाबांचे एक स्नेही आहेत. बाबा डॉक्टर आहेत व त्यांचे पेशंटस "चारो ओर फैले हुए हैं". तशा एका काकांकडे आज मुक्काम करेन. आणि आज मला चांगला आराम करावाच लागेल. काल रात्री झोप झालेली नाही. अर्थात् सायकल चालवताना काही अडचण आली नाही. संध्याकाळी अहमदपूरमध्ये काही पत्रकार व आयसीटीसी काउंसिलर सूर्यवंशीजींना भेटलो. थोड्या वेळ बोलणं झालं, त्यांनी स्वागतही केलं आणि फोटोही घेतले गेले. आज ७६ किमी झाले व आता मोहीमेतील सहा दिवस बाकी आहेत.

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): ९. अहमदपूर ते नांदेड

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

ह्या मालिकेतला मधलाच एक लेख प्रथम वाचला. आणि मग सुरुवातीचे सगळे भाग क्रमाने वाचले. छान लिहिलं आहे तुम्ही. करताय ते काम तर प्रशंसनीय आहेच. महाभयानक रस्त्यावरून सायकलने प्रवास करताय हे वाचून तर सलामच केला. ह्या संस्थांची माहिती डिटेलमध्ये दिली आहे हे छान. मदत करायला सोपं जाईल. आणि एका मायबोलीकराने तिथे जाऊन कामाची प्रत्यक्ष खात्री करून घेतली आहे हा मोठा प्लस पॉईंट आहे. ह्या क्षेत्रात काम करणार्‍या सार्‍या लोकांचं कौतुक वाटलं. ह्या संस्थांसंबंधी तुम्ही लोकसत्ताला कळवलं आहे का? दर वर्षी गणेशोत्सव/नवरात्रामध्ये लोकसत्तात सामाजिक काम करणार्‍या संस्थांबद्दल माहिती येते आणि लोकांना मदतीचं आवाहन केलं जातं त्याला खूप प्रतिसादही मिळतो.

रच्याकने, एव्हढ्या लांबच्या प्रवासात फक्त चहा-बिस्किटं आणि चिप्स हा नाश्ता वाचून जरा विचारात पडले. फलाहार जास्त योग्य नाही का? आणि हो, त्या हॉटेलवाल्याला बोर्डची कॉपी देऊ शकलात का ह्याची उत्सुकता आहे.

पु.ले.शु.

धन्यवाद स्वप्ना राज ताई!! आपण आवर्जून सर्व लेख वाचले व सविस्तर प्रतिसादही दिला!! ह्यातली बालगृह तशी अनेकांना माहिती असलेली आहेत. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. सेवालयच्या रवीजींची झी मराठीवर मुलाखतही झाली होती. एक बालगृह लोकसत्तात आलंही होतं त्याच सदरात. बाकीही अगदी अननोन अशी नाहीत. पण सतत संस्थांमध्ये मुलं- पीडीत व्यक्ती येत असतात. त्यांची व्यवस्था करावी लागते. म्हणून व महागाईमुळे मदतीची गरजही सतत असतेच. आपल्याला मदत करायची असेल तर एक पर्याय मुलांचं पालकत्व घेणं हा आहे. म्हणजे वर्षाचा खर्च त्या मुलाचा करायचा. आणि मदतीबरोबरच त्यांना भेटणं, संवाद साधणं हेही गरजेचं आहे.

बाकी चहा बिस्कीट- चिप्स हा नाश्ता पचायला सोपा, कुठेही चटकन मिळेल असा होतां म्हणून सायकल चालवताना इतर काही घेण्याच्या ऐवजी ते घेत होतो. शिवाय चिक्की- केळं हे होतंच.

त्या हॉटेलच्या काकांना मी बोर्ड देऊ शकलो नाही, कारण माझ्याकडे नव्हता. पण त्यांना म्हणालो होतो की तुम्हीही असा बनवू शकता.

धन्यवाद! Happy